Thursday, 15 September 2022

सविवेक श्रद्धा : डोळस श्रद्धा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सविवेक श्रद्धा : डोळस श्रद्धा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

            _*तीन वेदात पारंगत विद्वान वक्कलि नावाचा ब्राह्मणपंडित भगवान बुद्धांच्या आश्रमात गेला.* बत्तीस लक्षणांनी परिपूर्ण असे तथागतांचे सुंदर, तेजस्वी शरीर पाहून, तसेच प्रभावशाली ओजस्वी व्यक्तिमत्व पाहून तो भावुक ब्राह्मण प्रभावित होऊन त्यांच्याकडे आकर्षिला गेला. त्या भगवान बुद्धांच्या अंगप्रत्यंगातून जे प्रभाकिरण प्रस्फुटित होत होते त्याने वक्कलि भावविभोर होऊन गेला. शिवाय त्यांच्या अंतःकरणांतून ओघवणाऱ्या अपरिमित मैत्री आणि करुणामय तरंगांचा परिणाम तर होताच. वक्कलिने मनाशीच पक्का निर्णय घेतला की भगवानांच्या या दैवी रूपसंपदेचं सदैव दर्शन घ्यायचं. म्हणून गृहत्याग दाढीमिशा मंडण करून प्रव्रजित झाला आणि भिक्षु संघात सामील झाला. हेतू हाच की भगवानांचे सान्निध्यसुख नियमित मिळावे. आता भावभक्तीने प्रेरित होऊन रस-लोलुप भ्रमराप्रमाणे तो भगवानांच्या रूपसौंदर्याने भाळून नेहमी त्यांच्यासभोवतालीच भ्रमण करीत राहिला. न शीलाची चिंता, ना समाधीने मनाची एकाग्रता, ना विपश्यना साधनेच्याद्वारा प्रज्ञा जागृती. जेव्हा पहावे तेव्हा भगवानांच्या समोर, सुंदर ते ध्यान अनिमिष नेत्रांनी पाहणे हेच एकमेव काम. कारुण्य सिंधू भगवान तथागतांनी पाहिलं की *हा नवागत भिक्षु रूपसौंदर्याच्या भावनेने इतका पछाडलेला आहे आंधळा झाला आहे की धर्माच्या सत्य स्वरूपाला दुरावला आहे. त्याची कान उघाडणी करतांना ते म्हणाले, 'हे भोळ्या भिक्षु भाविका! माझ्या या शरीराकडेच काय वेड्याप्रमाणे पहात राहिला आहेस? माझे शरीरही आंत तितकेच घाणेरडे आहे जेवढे कुणाही सामान्य माणसाचे असते. मला पाह्यचं असेल तर माझ्यात सामावलेला धर्म पहा. जो धर्माचे स्वरूप पाहतो त्यालाच माझ्या सत्य स्वरूपाचे दर्शन घडते. खऱ्या अर्थाने मला बघायचं असेल तर माझ्यात सामावलेल्या सत्य स्वरूपाकडे पहा. बाह्य शरीर पाहू नकोस :-*_

*_यो खो धम्मं पस्सति, सो मं पस्सति, यो मं पस्सति, सो धम्मं पस्सति ।_*

     _महाकारुणिक भगवानांचा हा धर्मफटकार, भावावेशामुळे अंधःकारात बुडणाऱ्या वक्कलि ब्राह्मणाचे प्रज्ञाचक्षु उघडता झाला._

           *_धर्माचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भगवान बुद्धच आहेत ही गोष्ट त्या तात्काळ समजली. म्हणून केवळ बाह्य शरीर दर्शनावर समाधान मानणे निव्वळ वेडेपणा आहे, हे ही लक्षात आले. त्यांचे सत्यधर्मदर्शन होणेच आवश्यक आहे. 'दिट्ठ धम्मं निब्बाणं' दर्शन झाले पाहिजे. आणि हा सांदृष्टिक निर्वाणधर्म तर अंतर्मुख होऊन आपण स्वतःच आपल्या अंतरंगात पाहिला पाहिजे. बाह्योपचार-बाह्यदर्शन काही कामाचे नाही. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. विपश्यना प्रज्ञाद्वारे जर आपण आपल्या अंतरंगाचे सत्य दर्श घेतले नाही, तर जीवनभर बुद्धाचे चीवर वस्त्र धरून त्यांच्यामागे राहून देखील सत्यधर्मापासून मैलोगणति दूरच राहणार. परंतु भगवानांपासून हजारो मैल दुर राहून कुठेही एकांतात अंतर्मुखी होऊन आपल्या हृदयांतील सत्यधर्माचा साक्षात्कार करून घेऊ लागला तर तो साधक बुद्धाच्या जवळच असतो. धर्माचा साक्षात्कार म्हणजेच बुद्धाचा साक्षात्कार. धर्माशी जवळिक हीच बुद्धांशी जवळीक नाही का? अखेर बुद्ध म्हणजे तरी काय ? सम्यक् सम्बोधिचं जिवंत-जागृत स्वरूप म्हणजेच बुद्ध होय._*

           _एकदा ही गोष्ट लक्षात येताच वक्कलिचे अंधश्रद्धेचे काळे ढग दूर झाले. सत्यधर्माच्या स्वच्छ प्रकाशांत त्याची वाटचाल सुरू झाली. त्याने भगवान बुद्धांपासून विपश्यना साधनेचे कर्मस्थान घेतले. अंतर्मुखी होण्याची सरळ विधी घेतली. आणि दूर एकांतवासांत जाऊन अभ्यास करण्यास सुरूवात केली. पुर्व भक्तीभावाने अधून मधून अडचणी निर्माण केल्या तरी शेवटी वक्कलिने निष्ठेने साधना करून सच्च्या साधकाप्रमाणे निर्वाणचा साक्षात्कार करून घेऊन कृतकृत्य झाला. सर्व आस्रवे, क्लेश, संयोजने व बंधने तोडून मृत्यूपूर्वी तो ह्या जीवनांत विमुक्तावस्थेला पोचला._

           _तर असे दिसून येते की *अंधभक्ती, अंधविश्वास आणि अंधश्रद्धेच्या भावावेशाने अभिभूत झालेला साधक खऱ्या अर्थाने प्रगती करू शकत नाही.* हे भाववेश नेहमीच बाधक असल्याचे अनुभवाला येते. भगवान म्हणतात,

*_'तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता'_*

          _*म्हणजे तथागत फक्त मार्गदर्शन करणारे आहेत. साधना विधी शिकविणारे आहेत पण शेवटी काम करण्यासाठी पाऊल तर तुम्हालाच उचलावे लागणार आहे. सारा मार्ग तुम्हालाच आक्रमावयाचा आहे. याकडे डोळे झाकून भावूकतेने जर आपण बुद्धाला अथवा दुसऱ्या कुठल्यातरी लहान मोठ्या गुरुला आपला उद्धारकर्ता-तारक मानून केवळ त्याच्यावरील अंधश्रद्धा व अंधभक्ती मध्ये बुडून त्याचा आश्रित होऊन बसलो व साधनेचा अभ्यास सोडून आपल्या स्वतःला अक्षरशः दुर्बल, असमर्थ समजू लागलो आणि खरोखरीच पंगु तसेच निष्क्रीय होऊ लागलो तर धर्माच्या नावावर अशी भक्ती भावावेशवाली हीन भावना आपल्यासाठी कधीही कल्याणकारी होणार नाही. खरे कल्याण आपले आत्मबळ जिवंत ठेवले तरच आहे. *आत्मबल जीवित ठेवणे आणि मुक्ती मार्गावरील जबाबदारीची जाणीव ठेवून सावध रहाणे याला अहंकार म्हटले जाणार नाही.*

      _विमुक्ती मार्गाने जातांना आत्मभावाप्रति अहंमन्यता ठेवण्यापासून अलिप्त राहणे नितांत आवश्यक आहे. आपल्यातील सुप्त अहंकार आणि मीपणा मनांतून साफ काढून टाकणे अनिवार्य आहे. परंतु अहंकाराला काढण्याच्या नावाखाली हीनभाव म्हणजे न्यूनगंड बाळगून स्वतःला दुर्बल व परावलंबी बनविणे म्हणजे विनाशकारी अहंकाराविरुद्ध उचललेले असे पाऊल की, जे आम्हाला ह्या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नेणारे आहे. हा एक प्रकारचा अतिरेकच आहे, की जो आमच्यासाठी तितकाच हानीकारक आहे. आम्हाला मधला मार्ग चोखाळायचा आहे. दोन्ही अतिरेकी टोकांना सोडून कल्याणकारी मध्यममार्ग स्वीकारायचा आहे. ज्यात एकीकडे अहंभाव आणि आत्मभावामुळे डोक्यात वारे भरत नाही. ज्यामुळे अहंगंड निर्माण होऊन आपल्याशिवाय इतरांना काही स्थान नसल्यासारखे वागत नाही तर दुसरीकडे असा न्यूनगंड टाळतो ज्यामुळे दुसऱ्याच्या आधारावर स्वतःला अगदीच निष्क्रीय बनवण्यापासून वाचवतो._

      _ही अस्मिता जागरूक ठेवणे आणि मुक्ति मार्गावर चालण्यासाठी आपल्या जबाबदारीच्या संबंधी जागरूक रहाणे अहंकार नव्हे._

       _आपल्या कल्याणमित्र मार्गदर्शक धर्मगुरुच्या प्रति नैसर्गिक श्रद्धा, भक्ति आणि कृतज्ञतायुक्त नम्रतेने राहणे चुकीचे नाही. परंतु त्यावेळी आपले विवेकाचे ज्ञानचक्षु उघडे हवेतच. डोळस श्रद्धा हवी. *आपल्या गुरुविषयी अंधश्रद्धा, अंधभक्ती आणि अंधविश्वास बाळगून त्याच्या प्रत्येक कामात चमत्कार, . तसेच त्याचे बोलणे अद्भुत अलौकिक मानणे, जेवढे साधकाला तेवढेच आचार्यालाही हानीकारक असते.* अशा प्रकारे गुरू आणि शिष्य दोघेही अंधभावावेशांत राहिले, तर दोघाचेही अंधःपतन होऊन तो साधनामार्गही पतित होतो. इतिहास याला साक्ष आहे. *भगवान बुद्धांची ही कल्याणकारी विपश्यना साधनाविधी सिद्धी आणि चमत्कारांच्या नादी लागणाऱ्या धर्ममार्तंडांनी आणि त्यांच्या अंधविश्वासु अनुयायांनी विलुप्त करून टाकली. स्वतः गुरुंनी गुरूंचे गुणगान करीत गुरुच्या अलौकिक शक्तीचा वारेमाप अतिरंजित प्रचार करीत लोकांमधील अंधश्रद्धा वाढविली.* तिचे भरण पोषण केले. ज्यामुळे त्यांच्या गुरुजींचा मानसन्मान वाढावा आदरसत्कार वाढावा हा हेतूच उराशी बाळगला. परिणाम काय झाला? आचार्याांच्या या प्रसिद्धी यश लोलुपतेने हा विशुद्धीमार्ग दूषित केला आणि अशा प्रकारे भगवान तथागतानंतर काही शतकातच या कल्याणकारी विपश्यना साधनेचा भारतातून लोप झाला. शील, समाधी आणि प्रज्ञा यांनी युक्त, परम परिशुद्ध धर्म, विपश्यना साधनेच्या मदतीने प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा या देशांत आला आहे. या साधनामार्गाची शुद्धता कायम राहिली तर त्यामुळे सत्-धर्म चिरकाल प्रतिष्टित होऊन लोकांना त्याचा मिळत राहील. यासाठी हे नितांत आवश्यक आहे की कोणीही साधक किंवा साधिकांनी आपल्या मार्ग निर्देशक आचार्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा अलौकिक चमत्कार शोधत बसू नये किंवा थोपू नयेत. त्यांच्यावर मिथ्या ईश्वरत्वाचा भार ठेवून अंधश्रद्धेमध्ये बुडू नये. तरच गुरु शिष्याची एक स्वस्थ, आदर्श, स्वच्छ परंपरा स्थापित होईल. ती शुद्ध परंपरा बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी राहील. पूर्व संस्कारांच्या प्रभावामुळे कुठे कुठे कुणा कुणा विपश्यना साधकांमध्ये असा अंधविश्वास निर्माण होऊ लागतो तेव्हा लगेचच त्याला थांबविले पाहिजे._

        _आपले सर्वांचे कल्याण ह्याच गोष्टीत सामावलेले आहे की आम्ही ह्या ध्रुव सत्याला व्यवस्थित समजून घेऊ, 'आपल्या आतच जागलेल्या ह्या अनित्यबोधाच्या विपश्यना चेतनेपेक्षा अधिक संरक्षण देणारा अभय देणारा दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही. खोट्या आशा आणि फोल कल्पनांमध्ये बुडून न जाता आपल्यातील ह्या विपश्यना चैतन्याला सतत जागृत ठेवणे श्रेयस्कर आहे'._

        _प्रत्येक क्षणी आपल्या आत जे अनुभवाला येत आहे, ते अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, नष्ट होणारे आहे, परिवर्तनशील, सतत बदलणारे आहे, असा त्याचा स्वभाव आहे. ही त्याची प्रकृति आहे. हा त्याचा धर्मच आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म अष्टकलापांनी बनलेले अणु-रेणू परमाणु-कणांनी बनलेला हा शरीराचा प्रपंच पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणे प्रत्येक क्षणाला उत्पन्न होतो व नष्ट होत आहे. याच परमाणूंच्या कणांशी एकरूप अशी ही चित्तसंतती आहे. ती देखील त्याचप्रमाणे उत्पन्न होते व नष्ट होत आहे. शरीर आणि मन यांचा संयुक्त जीवनप्रवाह किती भग्न होणारा आहे. हा भंग प्रत्येक क्षणाला कशा प्रकारे होत आहे. या सत्याचे-वास्तवाचे विपश्यनेच्या दृष्टीने दर्शन घेत रहाणे हेच महत्वाचे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची आसक्ती ह्या जीवनधारेच्या प्रती रहाणार नाही. हाच मनाच्या शुद्धीचा मंगल मार्ग आहे. या क्षणाला ज्या वास्तवाचे- सत्याचे दर्शन होत आहे. त्याचे प्रति सजग रहाणे हाच आपला धर्म आहे. कुठल्यातरी भावी स्वप्नील रमणीय स्थितीच्या मधुर कल्पना व आसक्तीयुक्त आकांक्षा आपल्या प्रगतीला मारक ठरणारी सर्वांत मोठी धोंड आहे. त्यापासून स्वतःला वाचवा._

        _*विपश्यना धर्म वर्तमानात जगण्याचा धर्म आहे.* यावेळी जे जसे अनुभवात येत आहे तेच आपल्याला उपयुक्त आहे. न भूतकाळ, जो मांगे पडला आहे आणि न भविष्यकाल, जो अजून आलेला नाही. तेव्हा कल्पना आणि कामनांपासून दूर रहा. कल्पना आणि इच्छा आकांक्षा यांच्या पासून सावध रहा. निस्सार परावलंबी बनू नका. आपली प्रज्ञा स्वतःच जागवून या क्षणाचेच यथार्थ दर्शन करीत रहा. परावलंबनापासून दूर रहा._

       _हीच *'अत्तसम्मा पणिधि'* आहे. सम्यक् आत्म प्राणिधान आहे. स्वावलंबन आहे. स्वतःच्या ठिकाणी असलेले स्व-स्थित सत्याचे आलंबन आहे. धर्माचे आलंबन आहे. ज्ञान, विवेक, विद्या, आलोक, प्रज्ञा, आणि बोधीचे आलंबन आहे. आपण सारे ह्या आलंबनातच जगू या!_


*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १५/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_15.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...