Monday, 29 November 2021

चकमा

 *"चकमा" प्राचीन बौद्ध परंपरा जोपासणारा एक समाज*  Chakma People of Bangladesh and Buddhism.


'चकमा' एक प्राचीन जमात असून तिचा इतिहास बुद्धांच्या काळापासून ज्ञात असल्याचे दिसते. मगध शहरांमध्ये या समाजाचे वास्तव्य होते. ही जमात स्वतःला शाक्य कुळातील मानते आणि बौद्ध परंपरा पाळते. प्राचीन मगध देशातुन म्हणजेच आताच्या बिहारमधून त्यांचे हळूहळू स्थलांतर झाले. हिमालयातील काही प्रांतात ते विसावले. तर काहीजण अरक्कन प्रांतात ( म्यानमार )  स्थलांतरित झाले. मात्र बहुसंख्य बांगलादेशच्या चित्तगाव टेकड्यांच्या प्रदेशात ( Chittagong Hill Tracts ) विखुरले. चित्तगाव हे बांगलादेशातील मोठे बंदर असून हजारो वर्षापूर्वी तेथे असलेल्या असंख्य चैत्यामुळे त्याला चैत्यग्राम असे म्हणत असत. ब्रिटिशांनी त्याचे चित्तगाव केले व तेथील प्राचीन चकमा समाजास स्वायत्तता दिली. आज या चित्तगाव पर्वतीय प्रदेशात चकमा समाज प्रमुख असून त्यांचे सोबत मारमा, तांचाग्या आणि बरुआ हा बौद्ध समाज सुद्धा रहात आहे व आपापल्या बौद्ध परंपरा पाळीत आहे. 


सन १९६४ मध्ये बांगलादेशातील कर्णफुली नदीवरील धरणामुळे चकमा समाज विस्थापित झाला व आजूबाजूच्या प्रदेशात व देशात पसरला. नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी या भूभागावर म्हणजेच नेफा ( NEFA ) येथे अनेकजण स्थलांतरित झाले. सन १९७२ मध्ये नेफाचे नाव अरुणाचल प्रदेश झाले. सद्यस्थितीत पूर्वेकडील बांगलादेश, म्यानमार या देशात व भारतामध्ये मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात चकमा समाज विखुरलेला आहे. त्यांनी थेरवादी बौद्ध परंपरा जोपासली असून तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. बांगलादेशात आता अल्पसंख्याक चकमा समाजाच्या विकासासाठी प्रांतीय कौन्सिल स्थापन केले आहे. तसेच भारतात देखील २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतातील चकमा समाजास भारतीय नागरिकत्व देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. शाक्य कुळ असलेला हा समाज स्वतःला सूर्यवंशी तसेच लढवय्या समजतो. त्यांचे प्राचीन ग्रंथ पाली भाषेत आहेत. तसेच पौर्णिमेचे सर्व सण हा समाज साजरा करतो. 


आता या समाजाची बोलीभाषा बंगाली असून वर्णमाला  मुळाक्षरे बंगाली आहेत. यांच्या प्रत्येक गावात एक बौद्ध विहार असतेच. त्या विहारातील भिक्खुंना खूप मान असतो. येथील सर्व व्यवस्था या समाजातील वरिष्ठ लोक पाहतात. चकमा समाज बुद्धमाता 'महामाया देवी' यांना लक्ष्मीदेवी म्हणून पूजतो. बुद्ध पौर्णिमा हा सण तर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुरुषांचा पेहराव शर्ट-पॅन्ट असतो. मात्र महिला सणांच्या दिवशी पारंपरिक रंगीत वेशभूषा परिधान करतात. विहाराला भेट देतात. तेथे सामूहिक बुद्ध वंदना आणि ध्यान साधना केली जाते. बुद्धमूर्तीला फुले-फळे अर्पण करतात. भिक्खुंचे आशीर्वाद घेतात. 


बंगाली नवीन वर्षाचा सण 'बिशु' सुद्धा या समाजात तीन दिवस साजरा केला जातो. बंगाल या नावाचा उदय मुळात बौद्ध संस्कृतीवरून झालेला आहे. या प्राचीन वंग प्रदेशात म्हणजेच आताच्या बांगलादेशात पाल राजवटीत एकेकाळी बारा बौद्ध विद्यापीठे कार्यरत होती. धम्म संस्कृतीचे पडघम त्यावेळी तेथे दुमदुमत होते. मात्र १२ व्या शतकातील तुर्कीश आक्रमणांनी (बक्तियार खिलजी) होत्याचे नव्हते केले. विध्वंसाचा चिखल झाला. विहारे उध्वस्त केली. इतिहासाची ही पाने चाळताना खिन्नता वाटते. अजूनही तिथल्या काही मस्जिदीनां 'बुद्धेर मोक्कान' म्हणतात. आजही अल्पसंख्याक असलेल्या बंगाली बौद्ध, चकमा व इतर जमातींनी अन्यायाचा प्रतिकार करीत बौद्ध परंपरा जपली आहे. म्हणूनच त्यांचे कौतुक करावेसे वाटते.


https://www.youtube.com/watch?v=XOOooKFox9I


--- संजय सावंत (नवी मुंबई) www.sanjaysat.in


🏮🏮🏮

Sunday, 28 November 2021

मैत्री पारमिता


 *|| मैत्री पारमिता ||*

    _fraternity..._

             

      लेखन: आनंद आरकडे.


बोधी म्हणजे _"प्रज्ञा"_

आपल्या अनुभूतिद्वारे सत्याचा साक्षात्कार , आतंरिक सत्याचे ज्ञान , चार आर्यसत्याला आत्मसाद करणारे ज्ञान.

बोधी म्हनजेच _" बुद्धत्व."_

बुद्धत्व प्राप्त झालेला प्राणी म्हणजेच बुद्ध.

              बोधिसत्व ( _बुद्धत्व प्राप्तिस्तव प्रयत्नरत प्राणी_) आपल्या आयुष्यात अवघ्या जगावर उपकार आणि त्याचे परित्राण करण्याचा संकल्पयुक्त प्रयत्न करतो. असा मनुष्य बुद्धत्व प्राप्तिकरीता प्रयत्नरत असतो. बुद्धत्व प्राप्तिकारिता प्रयत्नरत असलेला मनुष्य म्हणजेच बोधिसत्व मनाच्या अवस्थांची दहा स्थित्यंतरे  पूर्ण करतो . ही स्थित्यंतरे म्हणजे दहा पारमिता. स्थाविरवादात पारमितेला _" पारमि "_ असे संबोधन आहे. _"पारमि"_ या शब्दाचा अर्थ _"पूर्णता"_.

दहा पारमिता पैकी *" मैत्री पारमिता "* अतिशय महत्वपूर्ण आहे.

                   _"मेत्ता"_ या पालि शब्दाला समानार्थी मराठी शब्द मैत्री आहे. मेत्ता म्हणजे अघाद सदिच्छा भावना. मेत्ता भावना कुल,गोत्र, जात धर्म,वंश वर्ण,श्रीमंति, सौंदर्य, सत्ता, शत्रुत्व असा भेदभाव करावयास शिकवत नाही. मेत्ता भावना केवळ मनुष्यप्राण्याकरिता सिमित नसते. मेत्ता भवना सर्व लहान, मोठ्या, दृश्य, अदृश्य, पाळीव, हिंस्त्र, पृथ्वीवरील, भूमिगत, अन्तरिक्षातील ,जीवसृष्टिमधील प्राण्यांविषयी असू शकते.

                 पूर्वाश्रमिचा पुत्र _"राहुल"_ अथवा विरोधात कटकारस्थाने रचणारा _" देवदत्त"_ या दोहोंच्या बाबतीत समसमान _" मैत्री भावना"_ बुद्धाने जोपासलि. ते सुडबुद्धिने वागणारे, विघ्नसंतोषी धर्मसंस्थापक नव्हते. बुद्ध हे समस्त मानव जातीचे *नैतिक शास्ता* आहेत. बुद्धांच्या अन्तःकरणात सर्व मनुष्य तथा प्राण्यांबाबत समान _"मैत्री भाव"_ होता. 

                तथागत बुद्धांच्या अंगी उच्चप्रतिची मंगलमैत्रीची भावना  असल्याने त्यांना कोणत्याही अवस्थेत , निद्रेत अथवा जागृत, चित्त एकाग्रतेची समाधी लाभत असे. त्या सम्यक समाधी मार्गानेच भगवंताना काया, वाचा, मनाच्या नऊ *अभिज्ञा*( _विशेष संबोधी_) प्राप्त झाली होती. त्या अभिज्ञा व शील, समाधि, प्रज्ञेच्या सहाय्यानेच बुद्ध आपली _सम्यक संबोधी_ व _धम्म विनयाचे_ संरक्षण करीत असत.

                 बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कर्मठ हिंदूंनी आयुष्यभर छळ केला, त्यांना अपमानित केले. तरी देखील हिन्दू समाजात सुधारणा घडवून अणण्याकरिता बाबासाहेबांनी _"हिन्दूकोड बिल"_ संसदेत सादर केले. प्रसंगी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच बाबासाहेबांनी  हिन्दू समाजाबाबत आकास भाव न ठेवता सामान न्याय या तत्वावर आधारित भारतीय संविधानाची निर्मिति केलि.

म्हणजेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी उपदेशीलेले _" मैत्री पारमिता"_ हे तत्व अंगी बाणवले आणि त्याची जोपासना केली. सदर उदाहरणावरुन आपणास उमगते की, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धत्व प्राप्तिकारिता प्रयत्नरत होते म्हणजेच ते 

_" बोधिसत्व "_होते.

               बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य हे *स्वातंत्र्य, समता, बंधुभाव( _fraternity_)*  या त्रिसूत्रावर आधारित होते. स्वातंत्र्य , समता, बंधुभाव या तत्वाच्या अधारेच त्यांची जातविरोधी चळवळ जातिवादी ठरत नाही. स्वातंत्र्य आणि समता याच्यापेक्षाही आंबेडकरांना *बंधुभावाचे तत्व* जास्त महत्वाचे वाटते.

बाबासाहेब म्हणतात...

_" माझ्या तत्वज्ञानात बंधुतेला फार उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य नि समता यांचे संरक्षण फक्त बंधुभावनेतूनच होऊ शकते."_

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धानी उपदेशीलेले "मैत्री पारमिता" ( *_fraternity_*) हे तत्व संविधानात समाविष्ट केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...

_"बंधुभाव हे लोकशाहीचे दूसरे नाव होय , आपल्या सभोवतालच्या माणसांबद्दल आदराची भावना म्हणजे बंधुभाव ."_

(सं: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड१ पृ५७)


                   बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुभाव( *_fraternity_*) या तत्वाला पर्यायी शब्द म्हणून बुद्धाच्या _" मैत्री "_ या तत्वाचा स्पष्ट उल्लेख _"बुद्ध कि कार्ल मार्क्स"_ या आपल्या ग्रंथात केला आहे.


                  बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धांना २२ प्रतिज्ञा दिल्या, त्यापैकी  १२ व १३ प्रतिज्ञा त्यांनी _"दस पारमिता"_ चे पालन करण्या संधर्भात  दिली आहे.  


                    भगवान बुद्धांनी उपदेशीलेल्या "मैत्री पारमिते"चे सार  _"जयमंगलअट्ठगाथेच्या"_ एका कवनात आढळते .


नालागिरी गजवरं अतिमत्तभूतं,

दावाग्गी चक्कमसनिव सदारुणन्तं |

मेतंबूसेक विधिना जितवा मुनिन्दो ,

तं ते जसा भवतु ते जयमंगलानि ||


अर्थ: 


_" ज्या मुनिंद्राने( बुद्धाने_) _अग्निचक्र विजेप्रमाने अत्यंत भयानक वेगाने येणाऱ्या मदोन्मत्त अशा नालागिरी हात्तीला आपल्या मैत्रीरूपी  जलवृष्टीने शांत केले, त्याला जिंकले, त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण मंगल होवो."_


*नमो बुद्धाय !*  *जय भीम !*


*🌼🌿🍀🍁🍂🌸🌺🌹🌻💐*

Saturday, 27 November 2021

क्रांतीबा ज्योतिराव फुले

              ☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

*_क्रांतीबा ज्योतिराव फुले_*

              ☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

          महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीरशिक्षणही घेतले. लहूजीबुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले, मल्लविद्या संपादन केली. शिक्षण पुरे केल्यावर १८४० मध्ये जोतीरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून ५ किमी. वर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी झाला. सावित्रीबाईचे शिक्षण जोतीरावांनीच पुरे केले. त्या स्वयंस्फूर्तीने जोतीरावांच्या समाजसुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या. शालेय शिक्षण चालू असतानाजोतीरावांनी अनेक मित्र मिळविले. सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इ. मित्र शेवटपर्यंत जोतीरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिकटून राहिले. जगाचा, पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन, अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली. द राइट्‌स ऑफ मॅन (१७९१-९२) या टॉमस पेन (१७३७-१८०९) याच्या ग्रंथाची त्यांनी अनेक पारायणे केली मानवी समतेचा आणि स्वातंत्र्याचा ध्येयवाद आत्मसात केला. या तत्त्वांच्या आधारे ते भारतीय समाजाचे, विशेषतः हिंदू समाजाचे, उत्कृष्ट चिंतन करू शकले. संस्कृत ग्रंथही त्यांनी वाचले. वेद, स्मृती, पुराणे यांच्यातील कथांचा अभ्यास केला. अश्वघोषाच्या नावावर प्रसिद्ध असलेले वज्रसूची हे उपनिषद त्यांना फार आवडले. त्यात अनेक ब्राह्मण ऋषिमुनींचे कूळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे. जातिभेद हा खोटा आहे, हे तत्त्व स्पष्ट रीतीने मांडले आहे. कबीराच्या बीजक ग्रंथातील ‘विप्रमति’ या प्रकरणाचा त्यांच्या विचारसरणीवर प्रभाव पडला. त्यांनी एका ठिकाणी स्वतःचा ‘कबीर साधूच्या पंथाचा’ असा निर्देश केला आहे. अशा चिंतन मननाने त्यांची भारतीय समाजक्रांतीची विचारसरणी तयार झाली. जगातील क्रांतिकारकांच्या नेत्यांमध्ये शोषित समाजातून पुढे आलेले यांच्यासारखे नेते फार थोडे, कार्ल मार्क्स, लेनिन इ. मध्यमवर्गीय नेते कामगारक्रांतीचे पुरस्कर्ते झाले. फुले, आंबेडकर हे शोषित समाजातून निर्माण झाले. हे त्यांचे वैशिष्ट्य होय.

जोतीरावांनी आपल्या विचारांचा एक सुबोध व सुंदर, सूत्रबद्ध सारांश सांगितला आहे – ‘‘विद्येविना मति गेली मतीविना नीति गेली नीतीविना गति गेली! गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले.’’ त्यांनी हा निष्कर्ष शेतकऱ्याचा आसूड (१८८३) मध्ये प्रारंभी सांगितला आहे. त्यांच्या सगळ्या सत्यशोधक चळवळीचा भावार्थ यात आला आहे. प्रचलित हिंदू धर्मसंस्था, त्यावर आधारलेली हिंदूंची समाजरचना व ब्रिटिशांची शासनसंस्था व सर्वांचा समुच्चित परिणाम म्हणजे शूद्र शेतकऱ्यांचे आणि दलितांचे सध्या दिसणारे अपार दैन्य होय या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्याकरिता त्यांनी लोकशिक्षण हाच मुख्य उपाय होय, असे ठरविले. अज्ञानग्रस्त शूद्र, अतिशूद्र जसे ब्राह्मणादी वरिष्ठ वर्गाच्या दास्यात खितपत पडले आहेत त्याचप्रमाणे स्त्री जातदेखील पुरूष वर्गाच्या दास्यात युगानुयुगे सापडली आहे हे लक्षात घेऊन जोतीरावांनी मुलींसाठी एक शाळा स्थापन केली (१८४८). त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाई यांनी याच शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू केले. ब्राह्मण समाजासह सर्वच समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधी होता. जातिभेदाची आणि पवित्र रूढींची बंधने अंधश्रद्धेने पाळीत होता. त्यास फार थोडे अपवाद होते. सुधारकांना स्वतःचे कुटुंब, स्वतःची जात-जमात आणि एकंदरीत सर्व समाज विरोध करीत आणि वाळीत टाकीत. जातिबहिष्काराचे असहाय असे दडपण क्रियावान सुधारकांना सोसावे लागले जिवलग नातेवाईकांचा विरोध होत असे. उदा.,  जोतीरावांचे वडील गोविंदराव यांनी मुलगा व सून यांना घराबाहेर काढले आणि खुद्द माळी समाजाने नाना प्रकारे अवहेलना चालू केली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन जोतीराव व सावित्रीबाई यांची समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. नंतर रास्ता पेठेत व वेताळ पेठेत आणखी दोन शाळा काढल्या (१८५१). अस्पृश्यांसाठी शाळा काढली. या त्यांच्या प्रयत्नांना तत्कालीन मोठमोठ्या विचारवंत समाजसुधारकांचा आणि राज्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत राहिला. १८५२ मध्ये सरकारी विद्या खात्याकडून मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली जोतीरावांच्या शिक्षणकार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.


त्यावेळचे सर्वच भारतीय समाजसुधारक हे स्त्रियांची दास्यातून आणि दुःस्थितीतून सोडवणूक करण्याकरता प्रयत्नशील झाले होते. हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवाविवाह निषिद्ध मानला होता. बालपणी आणि वारंवार उद्‌भवणाऱ्या प्राणघातक साथींच्या रोगांमुळे पतिनिधन होऊन तरूणपणीच वैधव्य आलेल्यांची संख्या मोठी होती. केशवपन केल्याशिवाय विधवा ही अपवित्र मानली जात होती. समाजाची आणि कुटुंबाची त्यांच्यावर करडी नजर असे. बाल व तरुण विधवांचा प्रश्न सोडविण्याकरिता पुनर्विवाहाची चळवळ सुधारकांनी सुरू केली. या चळवळीला जोतीरावांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा होता. तारुण्यकाली स्वाभाविकपणे वासनेला बळी पडलेल्या विधवांची फार विटंबना होत होती. गर्भपाताचे प्रयत्न होत, जन्मलेल्या बालकांची हत्याही होई. त्यांना संरक्षण देण्यासाठी फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली (१८६३). या गृहात अशा स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय केली होती. जोतीरावांनी पुढे जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक म्हणून घेतला तो काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा होता. विधवांच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी चळवळ उभी केली व त्याकरता न्हाव्यांचा संपही घडवून आणला.

अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नालाही त्यांनी तितक्याच मनस्वीपणेचालना दिली. अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही एक अत्यंत गंभीर अशी कायमची समस्या लक्षात घेऊन आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला.

महाराष्ट्रातील तत्कालीन भिन्न मतांच्या व विचारसरणींच्या समाजसुधारकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये जोतीरावांचा सहभाग नेहमीच असे. उदा., ⇨आर्य माजाचे संस्थापक स्वामी ⇨ दयानंद सरस्वती (१८२४-८३) यांची पुणे येथे ⇨ महादेव गोविंद रानडे (१८४२-१९१०) प्रभृती सुधारकांनी मिरवणूक काढली. त्याचे पुढारीपण जोतीरावांनी केले. उलट जीर्ण मतवादी रूढीनिष्ठांनी या मिरवणुकीची थट्टा व विडंबन करण्याकरिता गर्दभानंदांची दिंडी सुरू केली (१८७५).


फुले हे १८७६-८२ या कालावधीत पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. समाजाच्या मौलिक परिवर्तनाकरिता समाजरचनेतील धर्मभेदमूलक विद्वेष, जातिभेदमूलक उच्च-नीच भाव, स्त्रीदास्य, हिंदू धर्मसंस्थेतील मूर्तिपूजा, संस्कृत भाषेतील कर्मकांड इ. गोष्टींचे उच्चाटन करून समताप्रधान समाज निर्माण करण्याकरिता व अंधश्रद्धेचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती करण्याकरिता सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ मध्ये फुले यांनी केली. या सत्यशोधक समाजाचे सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक सदस्य व्हावेत, अशी योजना केली होती. फुले यांनी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके आणि पुस्तिका प्रसिद्ध केल्या. त्यावेळच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण व नागरी अशा दोन्ही प्रकारच्या सामाजिक जीवनात ब्राह्मणांचे धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्व होते. धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्वाच्या मार्गाने बहुजन समाजाची पिळवणूक चालली होती. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज सापडला होता. या हिंदू धर्माच्या पारलौकिक विचारसरणीचा प्रवर्तक व समर्थक वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग होय. बहुजन समाजावर ब्राह्मणांनी लादलेली ही मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्याकरिता ब्राह्मणांचे कसब (१८६९), गुलामगिरी (१८७३), सत्सार (अंक १ व २, १८८५) इ. निबंध लिहिले. या निबंधांमधून पुराणातील अवतारांच्या कथांचा ऐतिहासिक दृष्टीने उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्य ब्राह्मण हे मूळचे इराणचे, त्यांनी भारत जिंकला आणि येथल्या तथाकथित शूद्रातिशूद्र शूर जमातींना जिंकून त्यांना धार्मिक कर्मकांडाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे सामाजिक व आर्थिक शोषण केले व ते आतापर्यंत चालू राहिले, असा भावार्थ काढला आहे. श्रमिक बहुजन समाजाच्या आर्थिक अवनतीचे उत्कृष्ट चित्र शेतकऱ्याचा आसूड या विस्तृत निबंधामध्ये फुले यांनी रेखाटले आहे. ही शेतीच्या आर्थिक दुरवस्थेची समस्या अजूनही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ३२ वर्षे होऊन गेली तरी सुटलेली नाही. या निंबधामध्ये भारतीय ग्रामोद्योग किंवा कुटिरोद्योग ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या आर्थिक धोरणाने कसे ढासळले आहेत, याचेही हृदयविदारक वर्णन केलेले आहे. शेतीचा धंदा आधुनिक तंत्रविज्ञानावर उभारावा आणि ग्रामीण उद्योगांना आधुनिक तंत्रविद्येचा आधार द्यावा, अशी उपाययोजना फुले यांनी या निबंधात सुचविली आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी लिहिलेला हा विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतो, ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे.

सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या निंबधात (मृत्यूनंतर प्रसिद्ध, १८९१) फुले यांनी आपल्या समग्र विचारांचे सार असलेल्या विश्वकुटुंबवादाची सुसंगत मांडणी केली आहे. हा निबंध लिहीत असताना त्यांना पक्षाघात झाला होता. अशा विकलांग अवस्थेत त्यांनी हा निबंध लिहून पुरा केला. यात स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मुलभूत मानवी मूल्यांच्या आधारावर समाजरचना कशी असावी, हे सांगितले आहे. ज्या तत्त्वांच्या आधारावर अमेरिकन राज्यक्रांती व फ्रेंच राज्यक्रांती झाली तीच तत्त्वे या पुस्तकात भारतीय समाजरचनेच्या संदर्भात मांडली आहेत. यात सांगितलेला सत्यधर्म हा ‘यूटोपिया’च होय. जगातल्या मोठमोठ्या सामाजिक व राजकीय क्रांत्या युरोपियन ध्येयवादाने प्रेरित झालेल्या दिसतात. फुले म्हणतात- ‘‘स्त्री अथवा पुरूष जे एकंदर सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मताच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवड निवड न करणारे, या सर्व स्री पुरूषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून वागावे. इतकेच काय, एकाच घरात बौद्ध धर्मी बायको, ख्रिस्त धर्मी नवरा, इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्यधर्मी पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म.’’ यात आर्थिक समता सूचित केली आहे आणि सर्वधर्मी समभाव स्वच्छ रीतीने मांडलेला आहे.

फुले यांनी अखंडादि काव्यरचना (१८६९) केली आहे आणि काही काव्यरचना सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्येही अखेरीस घातली आहे. यात निर्मात्याने केलेल्या विश्वरचनेबद्दल जिव्हाळा प्रकट झाला आहे. शब्दकळा रसाळ आहे.

जोतीराव फुले यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई ( १८३१-९७) यांनी अनन्यभावाने आयुष्यभर सहकार्य दिले. स्त्रीमुक्ति आंदोलनाची महाराष्ट्रातील पहिली अग्रणी म्हणून महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास त्यांची दखल जरूर घेईल. जोतीरावांची सगळी विचारसरणी त्यांनी आत्मसात केली होती, जोतीरावांच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली. त्यांनी काव्यरचनाही केली आहे. काव्यफुले (१८५४), मातुश्री सावित्रीबाई भाषणे व गाणी (१८९१), बावनकशी सुबोधरत्नाकर (१८९२), जोतिबांची भाषणे (१ ते ४-संपा.) इ. त्याचे उपलब्ध साहित्य आहे.

जोतीरावांचे इतर वाङ्‌मय पुढीलप्रमाणे आहे : छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा (१८६९), हंटर-शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन (मूळ इंग्रजी-१८८२), इशारा (१८८५).


संदर्भ : 

१. Keer, Dhananjay, Mahatma Jotirao Phooley :Father of our Social Revolution, Bombay, 1974.

२. कीर, धनंजय, महात्माज्योतीराव फुले, मुंबई, १९६८.

३. कीर, धनंजय मालशे, स. गं. संपा.  महात्मा फुले : समग्र वाङ्‌मय, मुंबई, १९६९.

४. जोशी, लक्ष्मणशास्री, ज्योति निबंध, वाई, १९४७.

५. माळी, मा. गो. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले, गारगोटी, १९८०.


जोशी, लक्ष्मणशास्री परळीकर, नरेश

श्रेष्ठ मंगल काय आहे?

 ☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

_*श्रेष्ठ मंगल काय आहे?*_

                ☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
        
          _एकदा भगवान श्रावस्ती नगरातील जेतवन उद्यानात श्रेष्टी अनाथपिंडिकाने बांधलेल्या संघारामात विहार करीत होते. तेव्हा त्यांना विचारण्यात आले :-_

*_बहु देवा मनुस्सा च, मङ्गलानि अचिन्तयुं ।_*
*_आकङ्खमाना सोत्थानं, ब्रुहि मङ्गलमुत्तमं ।।_*
         
            _कल्याणाची ईच्छा करणारे कित्येक देव आणि मानव मंगल धर्माच्या संदर्भात चिंतामग्न आहेत. हे तथागत, आपणच कृपा करून योग्य असे श्रेष्ठ मंगल कशात आहे ते सांगा._

*_भगवान -_* हे आयुष्यमान,

_*असेवना च बालानं -* अज्ञानी लोकांपासून दूर राहणे,_
_*पण्डितानञ्च सेवना -* ज्ञानी लोकांची संगत करणे आणि_
_*पूजा च पूजनेय्यानं -* पूजनीय जनांची पूजा करणे_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*पतिरुपदेसवासो च -* उपयुक्त देशात राहणे_
_*पुब्बे च कतपुञ्ञता -* पूर्व कर्मांचे संचित पुण्य असणे आणि_
_*अत्तसम्मापणिधी च -* स्वतः सम्यक रूपाने समाहित राहणे_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*बाहुसच्चञ्च सिपञ्च -* अनेक विद्या आणि कला-कौशल्यात निपुण असणे_
_*विनयो च सुसिक्खितो -* विनयि राहून सुशिक्षित व्हावे आणि_
_*सुभासिता च या वाचा -* सुभाष्य असावे,_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*मातापितु उपट्ठानं -* आई-वडिलांची सेवा करणे_
_*पुत्तदारस्स सङ्गहो -* परिवाराचे पालन-पोषण करणे आणि_
_*अनाकुला च कम्मन्ता -* आकुळ-व्याकुळ करणार नाही असा पापरहित व्यवसाय करणे,_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*दानञ्च धम्मचरिया च -* दान देणे, धर्माचरण करणे_
_*ञातकानञ्च सङ्गहो -* नातेवाईक आणि संबंधितांना मदत करून सांभाळणे,_
_*अनवज्जानी कम्मानि -* आणि वर्जित असलेली दुष्कर्मे न करणे,_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*आरती विरती पापा -* तन-मनाने पापाचा त्याग करणे,_
_*मज्जपाना च संयमो -* मद्यपानापासून दूर राहणे आणि,_
_*अप्पमादो च धम्मेसू -* कुशल धर्माचे पालन करण्यात नेहमी जागरूक असणे अर्थात अप्रमत्त असणे._
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*गारवो च निवातो च -* पूज्य व्यक्तीचा गौरव करणे, नेहमी विनम्र राहणे_
_*सन्तुट्ठि च कतञ्ञुता -* संतुष्ट राहणे, कृतज्ञ राहणे,_
_*कालेन धम्मस्सवनं -* आणि योग्य वेळी धर्म श्रवण करणे_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*खन्ती च सोवचस्सता -* सहनशील असणे, आज्ञाधारक असणे_
_*समणानञ्च दस्सनं -* श्रमनांचे दर्शन करणे आणि_
_*कालेन धम्मसाकच्छा -* योग्य वेळी धर्म चर्चा करणे_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*तपो च ब्रह्मचरियञ्च -* तपाचरण करणे, ब्रह्मचर्य पालन करणे_
_*अरियसच्चान दस्सनं -* चार आर्य सत्यांचे दर्शन करणे आणि_
_*निब्बानसच्छिकिरिया च -* निर्वाणाचा साक्षात्कार करणे_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

_*फुट्ठस्स लोकधम्मेहि -* (लाभ-नुकसान, यश-अपयश, निंदा-स्तुती व सुख-दुःख या आठ प्रकारच्या) लोक धर्मांच्या संपर्कामुळे_
_*चित्तं यस्स न कम्पति -* चित्त विचलित होऊ न देणे_
_*असोकं विरजं खेमं -* शोक रहित, निर्मळ आणि निर्भय राहणे,_
_*एतं मङ्गलमुत्तमं -* हे श्रेष्ठ मंगल आहे._

*_एतादिसानि कत्वान, सब्बत्थमपराजिता ।_*
*_सब्बत्थ सोत्थिं गच्छन्ति, तं तेसं मङ्गलमुत्तमं ।।_*

(सुत्तनिपात २६२-२७२, मङ्गलसुत्त)
(खूद्दकपाठ ५.१-१३, मङ्गलसुत्त)

         _*जे वरील (अडतीस) मंगलधर्माचे पालन केल्याने सर्वत्र विजयी होतात, सर्वत्र कल्याण प्राप्त करतात त्या मंगल-मार्गीयांचे हेच श्रेष्ठ मंगल आहे.*_

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

*_संदर्भ :- मंगलमय गृहस्थ जीवन_*

*_संकलन - महेश कांबळे

*२८/११/२०२१*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.

 *_भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्याच्या एक दिवस आधीचे संविधान सभेतील शेवटचे भाषण._*


           …माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. …केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्यामते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते.परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करुशकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करुशकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे की अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या आस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करुनचआपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील. आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय. बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करुनदेते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरुन कळून येईल. ब्राईसच्याच शब्दात मी उद्धृत करुइच्छितो, ती घटना अशी- “काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करुनत्यात सर्व लोकांसाठी असेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, “हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे.” उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी ‘राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि “हे प्रभो, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे.” या शब्दांचा स्वीकार करण्यात आला.” ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना ‘भारतीय लोक’ या शब्दाची चीड येत असे. भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करुशकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल. …स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुनलोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.


(स्त्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)


Thursday, 25 November 2021

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान,

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान,

विरोधकांचे आरोप व त्याचे खंडन- भाग १

==================================


२९ ऑगस्ट १९४७ रोजी सिन्हा यांनी मांडलेल्या ठरावांनुसार ७ सदस्यांची संविधानाची मसुदा समिती गठीत करण्यात यावी असा ठराव झाला. त्यानुसार ३० ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. दोन महिन्यानंतर म्हणजे २७ ऑक्टोबर १९४७ रोजी मसुदा समितीची पहिली बैठक घेण्यात आली.


डॉ राजेंद्रप्रसाद यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बी. एन.राव. यांनी तयार केलेला ड्राफ्ट सर्व सदस्यांना वितरित करावा असे पत्राद्वारे कळवले परंतु बी एन राव यांच्या ड्राफ्ट सोबत इतर ज्या उपसमिती होत्या त्यांचे ही रिपोर्ट ग्राह्य धरूनच संविधानाचा नवा मसुदा तयार करायचा आहे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर सदस्यांचे मत घेऊन डॉ राजेंद्रप्रसाद सिंग यांना कळवले. ( म्हणजे बी एन राव यांच्या ड्रॅफ्टवर संविधान तयार झाले, बाबासाहेब यांचे त्यात काही योगदान नवते हा दावा खोटा आहे).


३० ऑगस्ट १९४७ नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुद्यातील कलमांचे स्वतः लक्ष देऊन स्वतःच्या शब्दरचना असलेली कलमे तयार केली हे महत्वाचे व नमूद करायला हवे. २७ ऑक्टोबर १९४७ पासून मसुद्याच्या कलमावर, त्याची शब्दरचना, त्यातले बदल, कोणते शब्द वाढवावे,शब्दरचना कोणत्या कलमाची बदलावी याचा विचार करत सखोल चर्चा घडवून आणत त्यावर निर्णय घेण्यात आले. 


२१ फेब्रुवारी १९४८ ला मसुदा सादर करताना त्या मसुद्या सोबत बाबासाहेब यांनी डॉ राजेंद्रप्रसाद  यांना एक पत्र लिहले होते ते सर्वांनी वाचूनच काढले पाहिजे. त्या पत्रातील प्रस्तावना अशी आहे की ' संविधान सभेने २९ ऑगस्ट १९४७ रोजी पारित केलेल्या ठरावानुसार नियुक्त केलेल्या मसुदा समितीने तयार केलेला भारताचा नवीन संविधान मसुदा समितीतर्फे मी सादर करत आहे' ( त्यामुळे बी एन राव यांच्या ड्राफ्टच स्वीकारला गेला हे खोटे आहे हे सिद्ध होते)


या पत्रात बाबासाहेब यांनी इतर सभासदांच्या उपस्थिती बद्दल माहिती देत, मसुदा समितीने कोणते निर्णय घेतले, काय काय बदल केले याची मांडणी करत संविधानाच्या उद्देशपत्रिका पासून,भारताचे वर्णन, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, संघराज्याच्या राष्ट्पतीचे अधिकार,राजसभेचे गठन आदी अनेक मुद्दे व त्यामधील बदलांवर भाष्य केले आहे.  बाबासाहेब यांनी एक एक मुद्दा घेत आधीचा मसुदा आणि नंतर तयार झालेला मसुदा यामधील कोणते बदल करण्यात आले व का केले याचे विवेचन दिले आहे. (त्यामुळे बाबासाहेब यांच्यावर त्यांनी संविधान सभेत काहीच केले नाही हा जो दावा ठोकला जातो तो किती पोकळ आहे ते कळते, जर आपण या सर्वांचा अभ्यास केला तर कळून येईल की बाबासाहेब यांना घटनेचे शिल्पकार का म्हणतात तरीही बी एन राव यांना बाबासाहेब यांनी धन्यवाद दिलेच)


२६ फेब्रुवारी १९४८ ला भारत सरकारच्या गँजेटने हा मसुदा लोकांची मते जाणून घ्यावा व त्यांचे सल्ले- मते जाणून घेण्यासाठी प्रकाशित केला आणि लोकांना संविधानाच्या मसुद्यासाठी तबल ८ महिन्याचा कालावधी दिला.( संविधान निर्मिती प्रक्रियेत लोकांचा सहभाग नवता, त्यांचा मतांचा विचार केला नाही हा दावा ही सपशेल फेल ठरतो).


डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार नाही असे बरेच लोक म्हणतात परंतु ४ नोव्हेंबर १९४८ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा जेव्हा संविधान सभेला सादर केला तेव्हा प्रचंड बुद्धीमतेच्या जोरावर त्यानी जे भाषण केले त्याचा परिणाम इतर सदस्यांवर झाला या सभेत उपस्थित असलेल्या काही सदस्यांचे मी मते देत आहे.


१ टी.टी. कृष्णमाचारी - " सभागृहाला जाणीव असेल की, तुम्ही नियुक्त केलेल्या सात सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला व त्या जागी दुसरा नेमण्यात आला.  एक सदस्य मरण पावला व ती जागा ही भरण्यात आली नाही.एक सदस्य दूर अमेरिकेत होते व त्यांचीही जागा भरण्यात आली नाही. दुसरा एकजण संस्थानचा कारभारात गुंतलेला होता व तेवढ्या पुरती ती ही जागा रिकामी होती.एक किंवा दोन सदस्य दिल्ली पासून दूर राहत होते प्रकृती अस्वस्थमुळे हजर राहू शकले नाही . तेव्हा हे संविधान तयार करण्याचे ओझे अंतिमतः डॉ आंबेडकरावंर पडले ( संविधान तयार करत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती फार चांगली नवती. डायबेटीस,हाय ब्लड प्रेशर, ब्रॉंनकायटीस,न्यूरायटीस सारखे आजार त्यांना असतानाही बाबासाहेब यांनी हे कार्य पूर्ण केले ) व त्यांनी हे काम यशस्वीरित्या पार पडले. हे त्यांचे कार्य निःसंशय प्रशंसनीय आहे व याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत."


२ काझी सयद करीमुद्दीन- " संविधानाचा मसुदा विचारार्थ ठेवण्याचा प्रस्तावावर डॉ आंबेडकर यांनी केलेल्या प्रस्ताविक भाषणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांचे भाषण लक्षणीय होई आणि मला खात्री आहे की, पुढील पिढ्यांपर्यत एक महान 'घटनाकार' म्हणून त्यांची निश्चितपणे नोंद होईल."


३ डॉ पी एस देशमुख - " माझे सन्मानिय मित्र डॉ आंबेडकरांचे भाषण उत्कृष्ट दर्जाचे होते. सादर करण्यात आलेल्या मसुद्यावरील ते प्रारंका9 भाष्य होते . सर्वाना विदितच आहे, ते एक नामांकित वकील आहेत आणि मला वाटत त्यांच्यावरील जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जर त्यानं पूर्ण मोकळीक मिळाली असती तर या संविधानाला त्यांना वेगळा आकार देता आला असता".


४ डॉ जोसेफ अलबन डिसुजा- " सुरवातीपासून शेवटपर्यंत तज्ज्ञांना शोभेल असे तुलनात्मकदृष्ट्या श्रेष्ठ स्वीकारण्यायोग्य, कार्यक्षम स्वरूपाचे संस्मरणीय दस्तावेज डॉ आंबेडकर आणि त्यांच्या मसुदा समितीने सादर केले आहे".


वरील सदस्यांच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला समजूनच आले  असेल की बाबासाहेब यांच्या संविधान निर्मिती प्रक्रियेत योगदान नाकारणारे विरोधक किती अंधारात आहे .


- मैत्रेय दिपक

घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा

 ☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

*_घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा_*

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

             _प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयंतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे अवश्य आहे. हे संकेत व नीती पुढीलप्रमाणे आहे :-_
               *_सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहूसंख्याकांच्या नियमाचे पालन._*

_त्याचप्रमाणे सरकारनेही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत :-_
              
                 _*देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे असे दिसून आल्यास घटनात्मक नितीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकारपदाचा त्याग केला पाहिजे व शेवटची गोष्ट म्हणजे राज्यशासन निःपक्षपाताने चालविले पाहिजे.*_
         
             _आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्त्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. *अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की, घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटींवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिले असतात. त्यांना जर ही अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकारसुत्रे खाली ठेवली पाहिजेत.*_
         
           _*अल्पसंख्याकांबद्दल सरकारने आदर बाळगला पाहिजे. अल्पसंख्यांकांना आपली मते मांडण्याची योग्य संधी असावी. याच पायावर पार्लमेंटरी लोकशाहीची उभारणी झालेली आहे.*_

           _*त्याचप्रमाणे निःपक्षपाती राज्यकारभार चालणे अवश्य आहे. ब्रिटिश जनता कोणत्याही राजकीय पक्षाच्या लायकीचे मोजमाप त्याच्या गुणावरून करते. म्हणून एखादा पक्ष अधिकारावर आला तर त्याचे समाधान केले पाहिजे, त्याला खूष ठेवले पाहिजे. अशा वशिलेबाजीचा तेथे प्रश्नच उपस्थित होत नाही, भारतात मात्र अधिकारावर असलेला पक्ष काही लोकांना विशेष सवलती देतो असे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे.*_
          
            *_जुन्या घातक प्रवृत्तीवर मात करून क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छळ राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे. लोक या मार्गे लागतील अशी मला खात्री आहे.*_

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

*_ संदर्भ :-_*
*१)* _*डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्मियांची परिषद आटोपून कोलंबोहून मुंबईस परत येत असता १०/०६/१९५० रोजी त्यांचे त्रिवेंद्रम येथील लेजिस्लेस्टिव्ह चेंबरमध्ये भाषण झाले*_
*२)* _*जनता १७/०६/१९५०*_
*३)* _*डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३ पान नं २१८-२१९*_

*_संकलन : महेश कांबळे_*
_*२६/११/२०२१*_

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

Wednesday, 24 November 2021

प्रशांत मार्ग

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

 *_प्रशांत मार्ग_*

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️       

              _जेव्हा विपश्यी साधक गांभीर्याने साधनेस प्रारंभ करतो तेव्हा बहुधा त्यांना तप्त संवेदनांचा दाह सहन करावा लागतो. हा दाह, ही उष्णता हवामानाची नसते. कित्येकदा साधकाला असा अनुभव येतो की आपले शरीर पेटत्या भट्टीत होरपळत आहे, पोळून निघत आहे. साधकाने अशावेळी साधना थांबिवली, बहिर्मुख झाला किंवा दुसऱ्या एखाद्या कामास प्रवृत्त झाला तर हा सारा दाह नाहीसा होतो. साधना पुन्हा सुरू करताच तसाच ज्वालाग्राही अनुभव येतो. *समंजस, गंभीर साधक मात्र या दाहकतेकडे अनित्यबोधाच्या तटस्थ भावनेने पाहतो, जरा देखील प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही, बघतो की हा दाह हळूहळू कमी होतो व यथावकाश पूर्णपणे शमतो. परिणामतः विलक्षण शीतलता अनुभवास येते. अशी आंतरिक शीतलता ही शरीराची सहजधर्मी शीतलता नसते किंवा ऋतूतील मोसमाचा गारठा नसतो. हा पूर्वसंचित मनोविकारांचा ताप आहे, जो तटस्थभावाने केलेल्या विपश्यना साधनेमुळे उफाळून येतो आणि तटस्थता टिकवून ठेवली तर मनाचा समतोल साधन्याच्या वृत्तीचा परिपाक म्हणून सहजभावाने या उद्रेकाचे निराकरण होते, उपशमन होते.* या कर्म संस्कारांचा ताप जितका कमी कमी होत जातो, क्षीण होत जातो तसतशी साधकाला सुखशांती अनुभवायला मिळते._

*_उप्पज्जित्वा निरुज्झन्ति तेसं वूपसमो सुखो ।_*
           
           _जेव्हा संजूतदारपणाने साधक मानसिक समतोल राखून संवेदनांकडे तटस्थपणे पाहू लागतो तेव्हा तोच आंतरिक ताप त्याच्या मांगल्याला, कल्याणाला कारण होतो. पुर्वसंचित कर्म बीजांचा या आंतरतापाने नाश होतो आणि त्यांच्या अत्याधिक दुःखद भविष्यकालीन परिणामांपासून त्याची कायमची मुक्तता होते. *जेव्हा या आंतरतापाच्या समाप्तीनंतर शीतलता अनुभवास येते तेव्हा साधक सुखाची झोप घेतो.*_
          
           _जो साधक सर्व प्रकारच्या कर्मकांडापासून आणि दार्शनिक तत्वज्ञानापासून अलिप्त राहतो आणि अधीर न होता अनन्य भावनेने विपश्यना साधनेचा अभ्यास करतो तो जर अजून खूपच गांभीर्याने आपल्या अंतर्मनांच्या गाभ्यात सुप्तावस्थेत दबुन राहिलेल्या, खोलवर रुजलेल्या संस्कारांतून बाहेर पडून त्यांचे उपशमन करून घेतो तेव्हा त्याला इंद्रियातील अवस्थेचा साक्षात्कार होऊन अलौकिक अनुभूतीचा प्रत्ययकारी अनुभव येतो. अनित्य धर्माच्या इंद्रियजगतांतून बाहेर पडून नित्यधर्मरूपी निर्वाण सत्याचा त्याला साक्षात्कार घडतो. *जेथे तृष्णा नष्ट होते - तृष्णारूपी ज्वलन समाप्त होते, ती निर्वाण अवस्था. अशा तण्हानं खयमज्झगा च्या अवस्थेत पोहोचलेल्या साधकालाच भगवान बुद्धांनी शितलीभूत किंवा शितीभूत या शब्दाने संबोधिले आहे.* अशा साधकाला भव बंधनापासून संपूर्ण मुक्ती मिळते. आपण एका साधिकेचे उदाहरण पाहू_
                 
               _लिच्छवी गणराज्यातील वैशाली नगरात राहणाऱ्या क्षत्रिय कुलोत्पन्न सद्गृहिणीची ही कथा. शुद्धधर्माची कल्याणकारी वाणी ऐकून मनांत वैराग्य उत्पन्न झाले. परंतु पतीच्या विरोधामुळे संसारात राहून पत्नी-धर्माचे पालन करीत रहावे लागले. एक दिवस स्वयंपाक करीत असतांना तिच्याकडून चुलीवर अतिशय गरम असलेल्या पातेल्यात फोडणीसाठी तेल न टाकताच चुकून नुसतीच भाजी टाकली गेली. भांड्याच्या तापलेल्या तळामुळे भाजी करपून जळून खाक झाली. गृह जीवनातील ही सामान्य घटना पण तिच्या जीवनातील प्रेरणादायक घटना ठरली. तिच्या मनात धर्म संवेग जागवणारी ठरली, *अनित्य आहेत, अनित्य आहेत, सारे संस्कार अनित्य आहेत.* त्या संस्कारात रुची घेतली नाही तर ते संस्कार या शुष्क भाजीप्रमाणे जळून नष्ट होणार. आता काम-भोग विलासाचे रसास्वादान तिला असह्य झाले. तीव्र वैराग्याची भावना जागृत झाली. यावेळेस पतीने तिला साथ दिली, तिला भगवान बुद्धांच्या आश्रमांत प्रसन्नतापूर्वक पोहोचविले. *महाप्रजापती गौतमीने तिला प्रवज्जा दिली. तिला विपश्यना शिकविली.* तिनेही मोठ्या पुरुषार्थाने साधना केली. कृत्यकृत्य झाली, वितराग झाली, अर्हन्त झाली. साधनेच्या कालावधीत काम-मोह-मद-मत्सर इत्यादी विकारवासनांचे जागलेले तांडव शांत झाले. आंतरिक मनःशांतीचा सुखद गारवा निर्माण झाला. पहिल्यांदा जी रात्र-रात्र बैचेन अवस्था होती, तगमग होती, ती नीवली, शांत झाली. भगवान बुद्धांनी तिचे पूर्वायुष्ये बघितले होते. आताची बदललेली तिची स्थिती बघून प्रसन्नतेने जे उत्स्फूर्त उदान वचन केले ते ही साध्वी वारंवार उल्हासाने पुनःपुन्हा गात असे :_

_*सुखं सुपाहि थेरिके, कत्वा चोळेन पारुता ।*_
*_उपसन्तो हि ते रागो, सुक्खडाकं व कुम्भियं ।।*_
             
           *_हे एकांतप्रिय मठवासिनी । तू सुखाची शांत निद्रा घे. आपल्या हातांनी विणलेल्या वस्त्रांचा वापर करून परमशांतीचा आस्वाद घे. कारण तप्त कढईत पडलेल्या सुक्या शुष्क भाजीप्रमाणे तुझी सारी रागाची / लोभाची संस्कार बीजे भाजून निघाली आहेत. शांत झाली आहेत._*
         
              _भगवान बुद्धांची ही कल्याणकारी हर्षेवाणी सर्व साधक साधिकांची दुःखापासून कायमची मुक्तता मिळवावी हाच आपल्या मांगल्याचा सर्वतोपरी कल्याणकारी व सर्वोत्तम उपाय आहे._

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन : महेश कांबळे_*
*_२६/११/२०२१*_
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

Tuesday, 23 November 2021

बुद्धप्रतिमा अयोग्य असल्यास काय करावे ?

 *बुद्धप्रतिमा अयोग्य असल्यास काय करावे ?* 

What To Do When You See The Image Of The Buddha Used Inappropriately.


दररोजच्या कामकाजात, व्यवहारात असंख्य छोट्यामोठ्या वस्तू आपण हाताळत असतो. अनेक नवनवीन उत्पादने बाजारात येत असतात. यातील काही उत्पादनावर बुद्धप्रतिमा दिसून येतात. या बुद्धप्रतिमा जरी आकर्षक असल्या तरी त्या उत्पादनावर छापणे निश्चितच गैर आहे. काही वेळेला उच्च कलाकृती, सुशोभीकरण किंवा जाहिरातीच्या नावाखाली अशा बुद्ध प्रतिमांचा वापर केल्याचे दिसून येते. भारतात बौद्ध समाज जागृत असल्यामुळे अशा बुद्धप्रतिमेचा वापर उत्पादक आपल्या प्रॉडक्टवर करीत नाही. अन्यथा हा समाज खवळून उठतो याची उत्पादकास चांगली जाणीव आहे. मात्र युरोपीयन देशात काही वेळेस बुद्धप्रतिमेचा वापर काही उत्पादनावर केल्याचे दिसून येते. तसेच कलेच्या नावाखाली बुद्धप्रतिमा घरात किंवा कार्यालयात रंगविल्या जातात. किंवा त्यांची शिल्पे तयार करून भिंतीला लावली जातात ते सुद्धा गैर आहे. बुद्ध प्रतिमा या बुद्धीचे, शांततेचे, दुःखमुक्तीचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. तरी अयोग्य अशा बुद्धप्रतिमा दिसल्यास काय करावे याचे बौद्ध संस्थांनी नियम घालून दिले आहेत. थायलंडच्या बौद्ध संस्थेचे नियम हे सर्वमान्य झालेले आहेत व ते खालील प्रमाणे आहेत.


१) कला प्रदर्शनात कलेच्या, सुशोभीकरणाच्या, जाहिरातीच्या  किंवा व्यापाराच्या नावाखाली अयोग्य अशा बुद्ध प्रतिमेचा वापर केलेला आढळल्यास संबंधित प्रदर्शन किंवा कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याकडे निषेध नोंदवून सदर प्रतिमा ताबडतोब काढून टाकण्यास सांगावे व बुद्ध प्रतिमेचे अवमुल्यन केल्याबद्दल पत्र लिहून समज द्यावी. किंवा तक्रार दाखल करावी.


२) अयोग्य बुद्धप्रतिमा असलेली उत्पादने खरेदी करू नयेत. तसेच कोणास भेटही देऊ नयेत किंवा त्याचा फोटो कुठे शेअर करू नये. ( उदा. बुद्धप्रतिमा पेन स्टँड, बुद्ध प्रतिमेची खुर्ची - फुलदाणी- फोटोफ्रेम - झाडे लावण्याच्या बुद्ध प्रतिमेच्या कुंड्या इत्यादी.)


३) अनेक शैक्षणिक वस्तू बाजारात येत असतात. बुद्धीचे प्रतीक म्हणून अनेकदा त्यात बुद्ध प्रतिमेचा वापर केलेला आढळतो. असे दिसल्यास कंपनीस पत्र लिहून तक्रार करावी व सदर वस्तूच्या विक्रीवर बंदी घालावी.


४) एखाद्या उत्पादनामध्ये सुरेख बुद्ध मूर्तीचा वापर केला असेल तर त्यातील बुद्धमूर्ती काढून वेगळी करावी व मूर्तीस वंदन करण्यासाठी ती दर्शनीय भागात ठेवावी.


५) घरात किंवा कार्यालयात भिंतीवर बुद्ध प्रतिमांचे मोठे शिल्प लावणे किंवा उभारणे हे देखील निषिद्ध आहे, हे ध्यानात ठेवावे. कारण अशा ठिकाणी बुद्ध प्रतिमेचा आदर कायमस्वरूपी राखला जात नाही. बुद्धमूर्ती ही दररोज वंदन केली जाईल अशा जागीच दर्शनीय भागात ठेवावी.


६) हल्ली नुसता बौद्ध समाज नव्हे तर इतर समाज देखील बुद्धमूर्ती आपल्या दिवाणखान्यात, घरामध्ये ठेवू लागला आहे. बुद्धमूर्ती ही घरांमध्ये आणि कार्यालयात अलौकिक शांतता प्रदान करणारी आहे. तिच्या नुसत्या अस्तित्वाने घरात आणि कार्यालयात आनंदमयी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तिचे स्थान योग्य असावे. कोपऱ्यात किंवा अडगळीचे नसावे.


७) काही बुद्ध कलाकृतीत बुद्धांचा चेहरा हा अर्धवट चित्रीत केलेला असतो हे निश्चितच निषिद्ध आहे, हे ध्यानात ठेवावे. अशा मूर्ती किंवा कलाकृती घरात लावू नयेत. हल्ली सिरॅमिकच्या छोट्या बुद्धमूर्ती मार्केटमध्ये दिसून येतात. परंतु त्या पूर्णाकृती नसल्यास अयोग्य समजाव्यात. तसेच नुसतेच शीर किंवा हात असल्यास त्या विकत घेऊ नयेत.


८) बार आणि रेस्टॉरंटमध्ये बुद्धप्रतिमा  ठेवू नयेत. तसेच त्यांचा सुशोभीकरणासाठी वापर करू नये. बुद्ध हे जगातील ५०० मिलियन बौद्धांचे श्रद्धास्थान आहे. अन्य धर्मातील श्रद्धास्थानाप्रमाणे त्यांचा ही आदर केला पाहिजे. 


९) शरीर हे सतत मलिन होणारे असते व ते नाशवंत आहे. त्यामुळे बुद्धप्रतिमा टॅटू म्हणून शरीरावर गोंदवू नये. हे निषिद्धच आहे. तसेच बुद्धप्रतिमा असलेल्या वस्त्रांचा पेहेराव करू नये. 


१०) बुद्धमूर्तीस क्षती पोहोचली असल्यास सदर मूर्तीचे तलावात, नदीत किंवा सागरात विसर्जन करावे. परंतु क्षतिग्रस्त मूर्ती घरात, विहारात किंवा कार्यालयात ठेवू नयेत असा अलिखित नियम आहे. त्याजागी लगेच दुसऱ्या बुद्धमूर्तीची स्थापना करावी.


थायलँड मधील ध्यान साधनेच्या आचार्या अचरावादी वोगंसकोन यांनी अयोग्य बुद्धमूर्ती प्रतिमेच्या संदर्भात आवाज उठविला असून त्याबाबतीत नियमावली घालून दिलेली आहे. सर्व बौद्धराष्ट्रांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे बुद्धप्रतिमेचा आणि चिन्हांचा कोणी अवमान केल्यास तो दंडनीय अपराध तेथे समजला जातो. थोडक्यात तुम्ही कोणत्याही धर्माचे असा पण बुद्धप्रतिमेचा आदर हा राखलाच पाहिजे. 


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जावे. https://www.knowingbuddha.org/dos-and-donts


--- संजय सावंत ( नवी मुंबई ) www.sanjaysat.in

Monday, 22 November 2021

विनयधर परिवार

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

*_विनयधर परिवार_*

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

              _बौद्ध परंपरा विनयाविषयी सर्व नियमांची निर्मिती / प्रज्ञापन भगवान बुद्धांच्या मुखातून झाली असे मानते. म्हणून बुद्धांनाच विनय म्हटले आहे. *आचार्य बुद्धघोषांनी लिहिलेली विनयपिटकाची अट्टकथा "समन्तपासादिका" मधील "बाहिर निदान कथेत" भिक्खुंची अप्रतिहत परंपरेचा उल्लेख केला आहे, ज्यांनी बुद्धकाळापासून त्यांच्या त्यांच्या काळापर्यंत विनयपिटकाचा उपदेश दिला.*_
           _बुद्ध काळात विनयधरात उपाली प्रमुख होते हे अंगुत्तर निकायाच्या एतदग्ग वग्गावरून जाणतो. प्रथम संगतीच्या वेळी आयुष्यमान उपालीनेच विनयाच संगायन केले होते अशी विनयपिटकाची ओळन्ओळ सांगते._*त्या महान विनयधरांची विनय परंपरा महाविनय, बुद्धांच्या विनयाचा बुद्धकालीन विनय स्थविर उपालिंपासून प्रारंभ होतो.* अर्थात विनयधराचा प्रारंभिक मूळ पुरुष म्हणजेच विनयधर परिवाराचा मूळ पुरुष महाप्रज्ञावान, विनयसूर्य उपाली स्थविरच आहेत ह्यात तिळमात्रही खोटे नाही. *बुद्धकालीन बुद्धशिष्य स्थविर आयुष्यमान उपालिंपासून ते महाधम्मप्रिय अशोकांच्या समकालीन मोग्गलिपुत्ततिस्स स्थवीरांपर्यंत विनयधरांचा परिवार 'परिवार' ग्रंथाच्या प्रथम परिच्छेदात आलेला आहे.*_   
               _विनयाचे जन्मदाता महामानव सम्यक संबुद्ध भगवान तथागत आहेत आणि त्यातून जन्म घेऊन विनयधर परिवाराला वाढविणारा तथागत बुद्धांनंतर प्रारंभ होतो तो विनयसूर्य आणि विनयातील ध्रुवतारा -_

*१)* सर्वप्रथम आयुष्यमान उपाली स्थविर
*२)* दुसरा विनयधर आयुष्यमान दासक स्थविर
*३)* तिसरा विनयधर आयुष्यमान सोणक स्थविर
*४)* चौथा विनयधर आयुष्यमान सिग्गव स्थविर
*५)* पाचवा विनयधर आयुष्यमान मोग्गलिपुत्ततिस्स स्थवीर
                 _हे पाच जम्बुद्विपाचे श्रेष्ठ विनयधर आणि प्रथम संगीतीपासून ते तृतीय संगीतिपर्यंत विनयाला सुरक्षित व सुव्यवस्थित चालविणारे महान तारे आहेत._
                _त्यानंतर तृतीय संगीताच्या पुढे विनय परंपरा गतिमान करणारा गतिज्ञ ज्याने जम्बुद्विपातुन सिंहल द्विपापर्यंत नेऊन पोहचविण्याचा हिमालय प्रयास करणारा विनयधर परिवारातील धीर, गंभीर, महाप्रज्ञामयी आणि साहसी विनयधर म्हणजे_
*६)* सहावा विनयधर आयुष्यमान महामहिंद्र चक्रवर्ती महान सम्राट अशोकांचा मुलगा. *पुढील 'विनयधर परिवाराचा' आयुष्यमान महेंद्र हा मूळ पुरुष ठरला कारण त्यांपासून विनयधर परिवार विदेशात निर्माण झाला.* आयुष्यमान महेंद्र जम्बुद्विपातुन धर्माच्या प्रचार आणि प्रसार हेतू सिंहलद्वीपला गेले आणि धम्माबरोबर विनयाची सीमा पण त्यांनी विस्तृत केली, धम्माला गती दिली आणि विदेशात विनयाच्या परंपरेचा परिवार निर्माण केला.

*७)* सातवा विनयधर आयुष्यमान अरिट्ठ स्थवीर
*८)* आठवा विनयधर आयुष्यमान आर्यतिस्सदत्त स्थवीर
*९)* नववा विनयधर आयुष्यमान कालसुमन स्थवीर
*१०)* दहावा विनयधर आयुष्यमान दीर्घ स्थवीर
*११)* अकरावा विनयधर आयुष्यमान दिघसुमन स्थवीर
*१२)* बारावा विनयधर आयुष्यमान कालसुमन स्थवीर
*१३)* तेरावा विनयधर आयुष्यमान नाग स्थवीर
*१४)* चौदावा विनयधर आयुष्यमान बुद्धरक्षित स्थवीर
*१५)* पंधरावा विनयधर आयुष्यमान तिस्स स्थवीर
*१६)* सोळावा विनयधर आयुष्यमान देव स्थवीर
*१७)* सतरावा विनयधर आयुष्यमान सुमन स्थवीर
*१८)* अठरावा विनयधर आयुष्यमान चुलनाग स्थवीर
*१९)* एकोणविसावा विनयधर आयुष्यमान धम्मपालित स्थवीर
*२०)* विसावा विनयधर आयुष्यमान रोहण स्थवीर
*२१)* एक्केविसावा विनयधर आयुष्यमान खेम स्थवीर
*२२)* बाविसावा विनयधर आयुष्यमान उपतिस्स स्थवीर
*२३)* तेविसावा विनयधर आयुष्यमान फुस्सदेव स्थवीर
*२४)* चोविसावा विनयधर आयुष्यमान सुमन स्थवीर
*२५)* पंचेविसावा विनयधर आयुष्यमान पुप्फ स्थवीर
*२६)* सव्वीसावा विनयधर आयुष्यमान महासिव स्थवीर
*२७)* सत्ताविसावा विनयधर आयुष्यमान उपाली स्थवीर
*२८)* अठ्ठाविसावा विनयधर आयुष्यमान महानाग स्थवीर
*२९)* एकोणतीसावा विनयधर आयुष्यमान अभय स्थवीर
*३०)* तिसावा विनयधर आयुष्यमान तिस्स स्थवीर
*३१)* एकेतीसावा विनयधर आयुष्यमान पुप्फ (फुस्सपण) स्थवीर
*३२)* बत्तीसावा विनयधर आयुष्यमान चूलअभय स्थवीर
*३३)* तेहतीसावा विनयधर आयुष्यमान तिस्स स्थवीर
*३४)* चौतिसावा विनयधर आयुष्यमान चुलदेव स्थवीर
*३५)* पस्तीसावा विनयधर आयुष्यमान सीव स्थवीर

                 _ह्या महाप्रज्ञ, विनयज्ञ मार्ग विद्वांनी ताम्रपर्णी द्विपात विनय पिटकाला प्रस्थापित आणि प्रकाशित केले. ज्याप्रकारे कोणत्याही महाविद्यालयाच्या भिंतीवर तयार केलेल्या प्रस्तरपटावर त्यांच्या प्राचार्याच्या कोरलेल्या नावाच्या सूचित कशाचीच शंका नसते अथवा कोणीच करीत नाहीत, त्याचप्रमाणे आपणाला पण स्थविरवादि परंपरेच्या विनयधरांच्या नावाच्या यादीत प्रामाणिकच मानावे लागेल._ 

*कारण स्वतः भगवान बुद्धांनी आपल्या विनयशील विनयधरांची प्रशंसा केली ते म्हणतात -*_

_*"यं मया सावकानं सिक्खापदं पञ्ञतं, तं मम सावका जीवित हेतु पि नातिककमन्ति."*_
*_(अंगुत्तरनिकाय)_*
        
             ह्याचा अर्थ होतो *_"ज्या शिक्षापदांना, सदाचाराच्या नियमांना मी आपल्या श्रावकांसाठी प्रज्ञप्त / सूचित केले आहे, निर्माण केले आहे, ते त्या सदाचाराच्या नियमाला प्राणापेक्षाही जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी ते त्याचे उल्लंघन करणार नाहीत."_*

              _हे असे महाप्रज्ञावान तेजोनिध विनयात परिपूर्ण होते. म्हणूनच २५०० वर्षापर्यंत आजही आणि पुढेही ते नाव विश्वाच्या विनयाच्या इतिहासात अटळ राहतील ह्यात काहीच शंका नाही._

☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

*संदर्भ :-*
*_विनयपिटक - परिवार - विनयधर परिवार_*

*संकलन :- महेश कांबळे*
*२३/११/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

Saturday, 20 November 2021

प्राचीन संस्कृती अवशेष जतन करणारे पुरातत्वखाते

 *प्राचीन संस्कृती अवशेष जतन करणारे पुरातत्वखाते* 

ASI and Museums have played an integral role in preserving the history of our society.


ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा येथील समाजाची प्राचीन संस्कृती व सांस्कृतिक ठेव पाहून चकित झाले.  येथील भाषांची व लिप्यांची संख्या बघून ते गोंधळले होते. एवढ्या भाषा असूनही समाजात संघर्ष आणि गोंधळ कसा होत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्या वेळेला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या कारकिर्दीत (१७७३-१७८५) पुरातत्त्व विषयी एक स्थायी स्वरूपाचे खाते हवे हा विचार रुजू झाला. त्यानुषंगाने बंगालच्या एशियाटीक सोसायटीची स्थापना १५ जानेवारी १७८४ रोजी झाली आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे बीज रोवले गेले. मात्र भारतीय स्वातंत्र्य लढ्याला झालेली सुरुवात आणि १८५७ चा उठाव यामुळे प्रत्यक्षात खाते सन १८७१ मध्ये आकारास आले. 


या खात्यातर्फे भारतीय भूखंडात पुरातन स्थळांवर जेव्हा सर्वेक्षण केले गेले तेव्हा जमिनीवर तसेच जमिनीखाली असंख्य पुरातन अवशेष असल्याचे दिसून आले. यातील काही ठिकाणी उत्खनन देखील झाले होते. पण त्याला शिस्त नव्हती. शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव होता. मात्र नंतर अलेक्झांडर कनिंगहॅम, जेम्स बर्जेस आणि जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत पुरातत्व खात्याची कामगिरी खूप चांगल्या प्रकारे झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने मोहोन्जो दडो- हडप्पा, बौद्ध, जैन,  हिंदूं, आणि मुस्लिम स्थळे, प्राचीन मंदिरे, मशिदी, लेण्यां आणि शिलालेख अशा अनेक सांस्कृतिक बाबींची काळजी घेतली. त्याचप्रमाणे इजिप्त, कंबोडिया,  व्हिएतनाम, म्यानमार अशा देशातील पुरातत्व खात्यांना सुद्धा मदत केली आहे. 


आपल्या देशातील ३६७५ पुरातत्त्वीय अवशेषांची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाची तर २००० अवशेषांची जबाबदारी राज्य सरकारांच्या संरक्षणाखाली आहे.  महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण ठरविण्याकरिता नेमलेल्या समितीचा अहवाल विस्कळीत व भोंगळ असल्याने पुरातन अवशेषांकडे कुणी लक्ष देत नाही. तसेच लोकप्रतिनिधी यांचा सांस्कृतिक ठेव्याबाबतचा अभ्यास शून्य असल्याने अर्थसंकल्पात  संग्रहालयासाठी पुरेशी तरतूद केली जात नाही. मनुष्यबळाची कमतरता असल्याने सुधारणा होत नाही. त्याचप्रमाणे या खात्याला असलेले अधिकार खूपच मर्यादित आहेत आणि खात्यात काम करणाऱ्यांना पदोन्नती व प्रगती करण्यास देखील वाव नाही. हे सर्व बदलले गेले पाहिजे. प्राचीन अवशेष सुस्थितीत राखले गेले तरच पुढच्या पिढीला आपला दैदिप्यमान इतिहास कळेल.


तसेच दरवर्षी उत्खननात अनेक  प्राचीन अवशेष मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन संग्रहालये  स्थापित करण्याची गरज आहे. भारतातील अनेक संग्रहालयाच्या गोदामात अनेक प्राचीन अवशेष उजेडात येण्याची वाट पाहत आहेत. ब्रिटिश समाजाला इतिहासाचे प्रचंड भान होते आणि आहे आणि म्हणूनच इंग्लंड सारख्या छोट्या आकारमानाच्या देशात १३०० संग्रहालये आहेत.(भारतातील प्राचीन बौद्ध संस्कृतीचे अवशेष येथे खूप आहेत ) या संग्रहालयामध्ये स्थानिक आणि परदेशी पर्यटक वर्षभर मोठ्या संख्येने येतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी संग्रहालयामध्ये बदल करण्यात येतात. नूतनीकरणाची प्रक्रिया सतत राबवली जाते. म्हणूनच  ब्रिटिश संग्रहालये जगातील समृद्ध संग्रहालये झाली आहेत. 


आपल्या भारतात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक संग्रहालय असतेच. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतर्फे संग्रहालयाची वाट वर्षातून एकदा तरी दाखवली पाहिजे. त्यामुळे तरुण नागरिकांना पुरातत्वची गोडी लागून व माहिती मिळून आपल्या सांस्कृतिक ठेव्याबद्दल आणि इतिहासाबद्दल त्यांच्या मनात अभिमान निर्माण होईल. पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सुद्धा संग्रहालये लोकप्रिय करण्याच्या मोहिमा आखल्या पाहिजेत. जेणेकरून सामान्य नागरिकांना मुलांबाळां समवेत संग्रहालयात जाण्यास रस वाटेल. संग्रहालय उभे करणे म्हणजेच आपला इतिहास जागृत ठेवणे होय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.


---- संजय सावंत www.sanjaysat.in


( संदर्भ :- जॉन मार्शल-एक असामान्य पुरातत्वज्ञ, लेखक जयंत खेर )


🛑🛑🛑

मध्य प्रदेश नव्हे बुद्ध प्रदेश

 *'मध्य प्रदेश' नव्हे 'बुद्ध प्रदेश'* 

Rich Heritage of Buddhism in MP


              मध्यप्रदेश मध्ये एकूण ५२ जिल्हे आहेत. आणि हे ५२ जिल्हे १० मंडळात विभागले आहेत. यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सम्राट अशोककालीन स्तूप, चैत्य, विहार, संघाराम, शिलालेख आणि लेण्यां होत्या आणि आहेत. मात्र बाराव्या शतकातील परकीय आक्रमण, संपलेला राजाश्रय आणि पुरोहित वर्गाचा वरचढपणा यामुळे मध्य भारतातील बुद्धिझमला सुद्धा तडाखा बसला. तरीही आज मध्यप्रदेशातील बौद्ध स्थळांची यादी बघितली तर ती वाढतच चालली आहे. नव्याने अनेक ठिकाणी उत्खनन होणे आवश्यक झाले आहे. सध्यस्थितीतील त्यांची यादी खालील प्रमाणे आहे. 


१) सोनारी येथे अनेक स्तुप असून हे प्रसिद्ध स्तूप संकुल रायसेन जिल्ह्यात आहे. 

२) ढेकीनाथ / ग्यारसपूर येथे एक स्तुप असून तो विदिशा जिल्ह्यात येतो. 

३) मुरेलखुर्द / घाटपिपलिया येथे ७२ स्तुप आढळले असून ते सर्व रायसेन जिल्ह्यात येतात.

४) अंधेर / करोदं गाव येथे ८ स्तुप असून ते रायसेन जिल्ह्यात येतात.

५) सतधारा ठिकाण प्रसिद्ध असून येथे ३० स्तुप आहेत. ते ही रायसेन जिल्ह्यात येतात. 

६) सारू-मारू / पंगुरारीया / बुधनी येथे अनेक स्तुप शिलालेख, संघाराम अवशेष आढळले असून ते सिहोर जिल्ह्यात येतात.

७) तालपूर / बुधनी इथेही अनेक स्तुप, शिलालेख, संघाराम यांचे अवशेष आहेत. व ते ही सिहोर जिल्ह्यात येतात. 

८) उदयगिरी ठिकाण विदिशा जिल्ह्यात असून येथे लेणी, स्तंभ, स्तुप अवशेष आहेत. 

९) वाघाची गुंफा ( बुद्ध लेणी ) धार जिल्ह्यात असून येथे चैत्यगृह आणि बुद्ध प्रतिमा आहे.

१०) भारहुत स्तुप प्रसिद्ध असून तो सतणा जिल्ह्यात आहे.

११) धामणार हे ठिकाण मंदसौर जिल्ह्यात असून येथे लेणी व चैत्यगृह आहे.

१२) सिरपूर हे ठिकाण महासमुंद जिल्ह्यात असून येथे स्तुप व विहार आहे.

१३) गुर्जरा हे ठिकाण दतिया जिल्ह्यात असून येथे सन १९२४ मध्ये सम्राट अशोककालीन लघू शिलालेख मिळाला आहे.

१४) वैश्य टेकरी उज्जैन जिल्ह्यात असून तेथे एक विहंगम स्तुप आहे.

१५) देवगढ / ललितपूर हे झांसी जिल्ह्यात असून तेथे बुद्ध शिल्प आढळले आहे. 

१६) जराये का मठ / बरूआ सागर हे सुद्धा झांसी जिल्ह्यात असून तेथे चैत्य आणि विहार आहे. 

१७) सुरवाया मठ, रनोद मठ आणि तिराही ही तिन्ही ठिकाणे शिवपुरी जिल्ह्यात असून येथे मौर्यकालीन स्थापत्यकला आढळली आहे. 

१८) चंद्रह मठ हे ठिकाण सिधी जिल्ह्यात असून तेथे आता मठ आहे.

१९) मालादेवी/ग्यारसपूर आणि पठारी गुंफा ही ठिकाणे विदिशा जिल्ह्यात असून येथे अनुक्रमे मौर्यकालीन स्थापत्यकला आणि लेण्या आहेत. 

२०) विदिशा तर सम्राट अशोक राजांची सासुरवाडी. त्या जिल्ह्यातील सर्व एकूणएक स्थळे ही बौद्ध संस्कृतीची होती. आज सर्व सरमिसळ झाली असून मूळ संस्कृती विस्मरणात गेली आहे. 

२१) सांचीस्तुप सारखे अत्यंत महत्वाचे बौद्धस्थळ विदिशा जवळ आहे तरीही त्याचा सामावेश रायसेन जिल्ह्यात जाणूनबुजून केला आहे. 

                  भारतभर आणि भारताबाहेर ज्या सम्राट अशोक राजांनी संघाराम, चैत्य, स्तुप, विहार, स्तंभ आणि शिलालेख उभारून धम्माचा प्रसार केला त्यास मध्यभारत अपवाद कसा राहील ? उजैन येथे काही काळ त्यांचा निवास होता. मध्य भारतातील विदिशा तर त्यांच्या पत्नीचे माहेरघर. पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांचे बालपण तर इथेच गेले. सांची सारख्या कलाकृती जेथे निर्माण झाल्या तो प्रांत तर बौद्ध संस्कृतीने फुलून गेला होता. यास्तव मध्यप्रदेशात आता असलेली काही प्रार्थना स्थळें ही पुरातन बौद्ध संस्कृतीच्या अवशेषांवर उभी आहेत हे आवश्य ध्यानी ठेवा. आणि म्हणूनच एकेकाळी बौद्ध संस्कृती नांदत असलेल्या व सम्राट अशोकराजांच्या पदस्पर्शाने कंपित झालेल्या 'मध्य प्रदेश' भूमीला खरेतर 'बुद्ध प्रदेश' असे संबोधणे योग्य ठरेल.


--- संजय सावंत ( नवी मुंबई )

❇❇❇

Thursday, 18 November 2021

उपोसथ व्रत

*बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि*.

प्रत्येक पौर्णिमा खरे तर सर्वांनी एकत्र येऊन सामुदायीक पद्धतीने साजरी करायला हवी. या दिवशी आपणा सर्व भगवान बुध्दांच्या अनुयायांनी न विसरता उपोसथ ग्रहण करायचे आहे. समजा काही कारणास्तव सामुहीक पद्धतीने नियोजन झाले नाही तरी प्रत्येकाने आप आपल्या वैयक्तिक पातळी वर उपोसथ ग्रहण करायचे आहे.


🌞 *उपोसथ व्रत* 

*"भगवान बुध्द म्हणतात"*

_जे मी उपदेशिलेल्या धम्मानुसार उपोसथ व्रताचे पालन करतात, म्हणजे अष्टशीलाचे पालन करतात त्यांनाच उपासक आणि उपासिका म्हणतात ."_


🌞 *अष्टशील (उपोसथ )*


🔅१) प्राणी हिंसा करण्यापासून विरत राहणे. 

🔅 २) न दिलेली वस्तु घेण्यापासून विरत राहणे. 

🔅 ३) ब्रह्मचर्याचा भंग करण्यापासून विरत राहणे. 

🔅 ४) खोटे बोलण्यापासून विरत राहणे. 

🔅 ५) दारु, मद्य मादक पदार्थाचे सेवन करण्यापासून विरत राहणे. 

🔅 ६) विकाली म्हणजे मध्यानानंतर भोजन करण्यापासून विरत राहणे. 

🔅 ७) नाच, गाणे, वाद्य, अश्लिल दृश्य, हार व सुगंधी द्रव्य व अलंकार यापासून विरत राहणे. 

🔅 ८) उच्च प्रतीचे व विलासयुक्त शय्या आसनापासून विरत राहणे. 

          सामान्यत: बौध्द उपासक आणि उपासीकांना आपल्या जीवनात पंचशीलांचे पालन करावे लागते. त्याशिवाय उपोसथ व्रत धारण करणाऱ्यांना आणखी तिन शीलांचे पालन करणे अपेक्षित आहे. 


🌸 *हे तिन शील म्हणजे* 🌸 

🔹 *१. विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामी।*

अर्थ - अवेळी भोजन करणार नाही, असे व्रत मी स्वीकारतो. 

🔹 *२. नच्च-गीत-वादित-विसुक-दस्सना वेरमणी, सिक्खापदं समादियामी।*

अर्थ - नृत्य-गायन-संगीत आणि तमास-दर्शन करणार नाही, असे व्रत मी स्वीकारतो. 

🔹 *३. माला-गंध-विलेपन धारण, मंडन-विभूसत्थाना वेरमणी सिक्खापदं समादियामी।*

अर्थ - हारतुरे, अत्तरे, सुगंधी द्रव्ये, उटणे, किंवा अलंकार धारण करणार नाही, असे व्रत मी स्वीकारतो. 


                  अशाप्रकारे पाच शील आणि हे तिन शील मिळून *अष्टशील* होतात. यालाच *आर्य अष्टांग उपोसथ किंवा आर्य-उपोसथ* म्हटले जाते. 

                एकवेळ गृहस्थांना रोजच्या जीवनात पंचशीलाचे पालन करता येईल, पण अष्टशीलाचे पालन करणे कठीण आहे. म्हणून अष्टशीलाचे पालन करण्याचे व्रत महिन्यातील चार दिवस म्हणजे पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, अमावस्या ह्या दिवसी करण्याची मुभा गृहस्थांना दिली आहे. म्हणजे चंद्र-मास कालगणनेच्या आधारावर शुक्ल पक्षातील अष्टमी, पौर्णिमा, कृष्णपक्षातील अष्टमी आणि कृष्णपक्षातील चतुर्दशी हे चार दिवस उपोसथ व्रतासाठी मानले जातात. 

               ह्या दिवशी बौध्द उपासक आणि उपासीकांनी अष्टशील ग्रहण करून पालन करावे लागते. हा दिवस उपोसथ व्रतासाठी पवित्र असतो. उपोसथ व्रत ही भगवान बुद्धांनी गृहस्थांना दिलेली शिकवण आहे. उपोसथ व्रत ग्रहण करून आचरणात आणणे आणि आपल्या जीवनाचा भाग बनविणे तितकेच कठीण आहे. परंतु आपल्या जीवनातील विकारांना दूर ठेवण्यासाठी शील-समाधी-प्रज्ञा आणि विपश्यना साधनेचा सतत अभ्यास करून असं जीवन जगणे तसं कठीण नाही. अशावेळेस उपोसथ व्रताचं आचरण करणे सहज सुलभ होऊन जातं. त्यामुळे ह्या व्रताचं पावित्र जपता येते. 

            गृहत्याग करणारे भिख्खू-भिख्खूनिंना अनुक्रमे २२७ व ३११ विनयाचं पालन करावे लागते. परंतु तथागतांनी गृहस्थांच्या व्यवहारीक समस्या लक्षात घेता, त्यांच्यासाठी केवळ आठ विनय सांगितले आहेत. म्हणजेच आठवड्यातून एकदा आर्य अष्टांग उपोसथाचे पालन करून अहर्त किंवा निर्वाण पदाचा मार्ग अनुसरता येते. 


🌸 *उपोसथाचे आचरण करण्यासाठी पुढील गोष्टीचे भान ठेवणे आवश्यक आहे.*

🔅१. सकाळी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे, 

🔅 २. वंदना घेणे, 

🔅 ३. ध्यान-साधना (विपश्यना) करणे, 

🔅 ४. प्रसन्न मुद्रेने विहारात जाणे, 

🔅 ५. तेथे भिख्खू-भिख्खूनी असतील तर त्यांचेकडून जर नसतील तर स्वता:च आर्य अष्टांग उपोसथ शील ग्रहण करणे, 

🔅 ६. त्यापूर्वी आठवडाभरातील कायिक-वाचिक-मानसिक आचरणाचे स्मरण करणे, 

🔅 ७. शील-सदाचार पालन करतांना सजग राहून सुध्दा काहीना काही शील भंग होणे शक्य आहे. म्हणून भिक्खूंची क्षमायाचना करणे किंवा स्वता: बुध्द, धम्म आणि संघ ह्या तिन रत्नाचे स्मरण करून क्षमायाचना करणे. क्षमायाचना केल्याने मन कोमल आणि नम्र बनते. 

🔅 ८. आर्य अष्टांग उपोसथ म्हणजे काय, ते का करावे, त्यामुळे फायदा काय, त्याचे पावित्र का जपावे, अशा गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. 

🔅 ९. संध्याकाळी घरी जातांना किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठतांना आपल्या कायिक-वाचिक-मानसिक आचरणाचे स्मरण करून आपल्याकडून काही शीलभंग तर झाला नाही ना याची तपासणी करणे, जर काही दोष आढळला तर पश्चाताप न करता (कारण पश्चातापाने दु:ख वाढते) धम्माच्या आधारावर स्वीकार करणे व धम्माचारणच्या प्रती कटिबध्द आणि दृढनिश्चय राहून मन शांत आणि प्रसन्न करणे. 

🔅 १०. मैत्री भावनेचा अभ्यास करणे, 

🔅 ११. भिक्खुंना धम्मदान करणे. इत्यादी गोष्टी महत्वाचे आहे. 

                   भगवान बुद्धांनी अनेक प्रसंगात उपासक तथा भिक्खुंना आर्य-उपोसथाबाबत उपदेश दिला आहे. उपोसथ व्रताने आपले जीवन विकार मुक्त होते, चित्त निर्मळ होते, मंगलमय व सुखी बनते. उपोसथ व्रताच्यादिवशी दिवसातून एकदा दुपारी १२ वाजेपर्यत भोजन करावे लागत असल्याने सकाळी घरून येतांना उपासक आपापल्या घरून भोजन आणू शकतात. तेव्हा सारेजण बुद्धविहाराच्या मंगलमय वातावरणाच्या सानिध्यात सहभोजनाचा आनंद घेऊ शकतात. हाही एक फायदा आहे. 

             *बौध्द धम्मात उपोसथव्रत पालनासाठीच्या प्रत्येक महीन्याची शुध्द अष्टमी, वद्य अष्टमी व चांदण्यारात्रीच्या पंधरवड्यातील अष्टमी म्हणजे शुध्द अष्टमी व अंधाऱ्या रात्रीच्या पंधरवड्यातील अष्टमी म्हणजे वद्य अष्टमी तसेच अमावस्येच्या अगोदरचा दिवस म्हणजे वैद्य चौदस आणि पोर्णिमा या महिन्यातील चार दिवशी उपासक - उपासिका विहार असेल तर विहारात जाऊन, विहार नसेल तर आपल्या घरीच उपोसथ व्रताच्या दिवशी सकाळीच उठून स्नानादी आटोपून अष्टशीलाचे ग्रहण करावे म्हणजे अगोदर विहारात किंवा घरी बुध्दाच्या मुर्तीसमोर मेणबत्ती व अगरबत्ती श्रध्दायुक्त होऊन लावावी. नंतर उकडू बसून त्रिवार सरणागमन म्हणजे :-*

 _" नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स ।"_

तीन वेळा म्हणावे . 

नंतर त्रिशरण म्हणावे, म्हणजे 

*_बुध्दं सरणं गच्छामि। धम्मं सरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि ।_*

दुतियम्पि व ततियम्पि म्हणून तीन वेळा म्हणावी.

                 नंतर अष्टशील म्हणावे आणि दिवसभर व रात्रभर त्या आठ नियमाचे मन:पूर्वक पालन करावे. त्या दिवशी बाराच्या अगोदर जेवण करावे. 

        नंतर उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिशरण पंचशील ग्रहण करुनच जेवावयास बसावे. मग पून्हा आठ दिवसांनी उपोसथ व्रतास धारण करावे आणि त्याचे मन:पूर्वक पालन करावे. जे गृहस्थ आणि गृहिणी अशा त-हेने महिन्यातून चार दिवस जसे सांगितले आहे त्या दिवशी उपोसथ व्रताचे धारण करुन पालन करतो, जे धम्माच अनुसरण करत असतात, त्या गृहस्थ आणि गृहिणीलाच उपासक आणि उपासिका म्हणतात. *१४ ऑक्टोबर १९५६ या धम्म दिक्षेच्या दिवशी स्वत: बाबासाहेबांनी उपोसथ व्रत ग्रहण केले होते ही गोष्ट बाबसाहेबांची धम्मावर किती श्रद्धा होती हे दर्शवते.*

https://mikamblemahesh.blogspot.com/2021/11/blog-post_18.html

🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...