*'मध्य प्रदेश' नव्हे 'बुद्ध प्रदेश'*
Rich Heritage of Buddhism in MP
मध्यप्रदेश मध्ये एकूण ५२ जिल्हे आहेत. आणि हे ५२ जिल्हे १० मंडळात विभागले आहेत. यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सम्राट अशोककालीन स्तूप, चैत्य, विहार, संघाराम, शिलालेख आणि लेण्यां होत्या आणि आहेत. मात्र बाराव्या शतकातील परकीय आक्रमण, संपलेला राजाश्रय आणि पुरोहित वर्गाचा वरचढपणा यामुळे मध्य भारतातील बुद्धिझमला सुद्धा तडाखा बसला. तरीही आज मध्यप्रदेशातील बौद्ध स्थळांची यादी बघितली तर ती वाढतच चालली आहे. नव्याने अनेक ठिकाणी उत्खनन होणे आवश्यक झाले आहे. सध्यस्थितीतील त्यांची यादी खालील प्रमाणे आहे.
१) सोनारी येथे अनेक स्तुप असून हे प्रसिद्ध स्तूप संकुल रायसेन जिल्ह्यात आहे.
२) ढेकीनाथ / ग्यारसपूर येथे एक स्तुप असून तो विदिशा जिल्ह्यात येतो.
३) मुरेलखुर्द / घाटपिपलिया येथे ७२ स्तुप आढळले असून ते सर्व रायसेन जिल्ह्यात येतात.
४) अंधेर / करोदं गाव येथे ८ स्तुप असून ते रायसेन जिल्ह्यात येतात.
५) सतधारा ठिकाण प्रसिद्ध असून येथे ३० स्तुप आहेत. ते ही रायसेन जिल्ह्यात येतात.
६) सारू-मारू / पंगुरारीया / बुधनी येथे अनेक स्तुप शिलालेख, संघाराम अवशेष आढळले असून ते सिहोर जिल्ह्यात येतात.
७) तालपूर / बुधनी इथेही अनेक स्तुप, शिलालेख, संघाराम यांचे अवशेष आहेत. व ते ही सिहोर जिल्ह्यात येतात.
८) उदयगिरी ठिकाण विदिशा जिल्ह्यात असून येथे लेणी, स्तंभ, स्तुप अवशेष आहेत.
९) वाघाची गुंफा ( बुद्ध लेणी ) धार जिल्ह्यात असून येथे चैत्यगृह आणि बुद्ध प्रतिमा आहे.
१०) भारहुत स्तुप प्रसिद्ध असून तो सतणा जिल्ह्यात आहे.
११) धामणार हे ठिकाण मंदसौर जिल्ह्यात असून येथे लेणी व चैत्यगृह आहे.
१२) सिरपूर हे ठिकाण महासमुंद जिल्ह्यात असून येथे स्तुप व विहार आहे.
१३) गुर्जरा हे ठिकाण दतिया जिल्ह्यात असून येथे सन १९२४ मध्ये सम्राट अशोककालीन लघू शिलालेख मिळाला आहे.
१४) वैश्य टेकरी उज्जैन जिल्ह्यात असून तेथे एक विहंगम स्तुप आहे.
१५) देवगढ / ललितपूर हे झांसी जिल्ह्यात असून तेथे बुद्ध शिल्प आढळले आहे.
१६) जराये का मठ / बरूआ सागर हे सुद्धा झांसी जिल्ह्यात असून तेथे चैत्य आणि विहार आहे.
१७) सुरवाया मठ, रनोद मठ आणि तिराही ही तिन्ही ठिकाणे शिवपुरी जिल्ह्यात असून येथे मौर्यकालीन स्थापत्यकला आढळली आहे.
१८) चंद्रह मठ हे ठिकाण सिधी जिल्ह्यात असून तेथे आता मठ आहे.
१९) मालादेवी/ग्यारसपूर आणि पठारी गुंफा ही ठिकाणे विदिशा जिल्ह्यात असून येथे अनुक्रमे मौर्यकालीन स्थापत्यकला आणि लेण्या आहेत.
२०) विदिशा तर सम्राट अशोक राजांची सासुरवाडी. त्या जिल्ह्यातील सर्व एकूणएक स्थळे ही बौद्ध संस्कृतीची होती. आज सर्व सरमिसळ झाली असून मूळ संस्कृती विस्मरणात गेली आहे.
२१) सांचीस्तुप सारखे अत्यंत महत्वाचे बौद्धस्थळ विदिशा जवळ आहे तरीही त्याचा सामावेश रायसेन जिल्ह्यात जाणूनबुजून केला आहे.
भारतभर आणि भारताबाहेर ज्या सम्राट अशोक राजांनी संघाराम, चैत्य, स्तुप, विहार, स्तंभ आणि शिलालेख उभारून धम्माचा प्रसार केला त्यास मध्यभारत अपवाद कसा राहील ? उजैन येथे काही काळ त्यांचा निवास होता. मध्य भारतातील विदिशा तर त्यांच्या पत्नीचे माहेरघर. पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांचे बालपण तर इथेच गेले. सांची सारख्या कलाकृती जेथे निर्माण झाल्या तो प्रांत तर बौद्ध संस्कृतीने फुलून गेला होता. यास्तव मध्यप्रदेशात आता असलेली काही प्रार्थना स्थळें ही पुरातन बौद्ध संस्कृतीच्या अवशेषांवर उभी आहेत हे आवश्य ध्यानी ठेवा. आणि म्हणूनच एकेकाळी बौद्ध संस्कृती नांदत असलेल्या व सम्राट अशोकराजांच्या पदस्पर्शाने कंपित झालेल्या 'मध्य प्रदेश' भूमीला खरेतर 'बुद्ध प्रदेश' असे संबोधणे योग्य ठरेल.
--- संजय सावंत ( नवी मुंबई )
❇❇❇
No comments:
Post a Comment