☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
*_घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा_*
☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
_प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयंतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे अवश्य आहे. हे संकेत व नीती पुढीलप्रमाणे आहे :-_
*_सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहूसंख्याकांच्या नियमाचे पालन._*
_त्याचप्रमाणे सरकारनेही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत :-_
_*देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे असे दिसून आल्यास घटनात्मक नितीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकारपदाचा त्याग केला पाहिजे व शेवटची गोष्ट म्हणजे राज्यशासन निःपक्षपाताने चालविले पाहिजे.*_
_आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्त्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. *अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की, घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटींवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिले असतात. त्यांना जर ही अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकारसुत्रे खाली ठेवली पाहिजेत.*_
_*अल्पसंख्याकांबद्दल सरकारने आदर बाळगला पाहिजे. अल्पसंख्यांकांना आपली मते मांडण्याची योग्य संधी असावी. याच पायावर पार्लमेंटरी लोकशाहीची उभारणी झालेली आहे.*_
_*त्याचप्रमाणे निःपक्षपाती राज्यकारभार चालणे अवश्य आहे. ब्रिटिश जनता कोणत्याही राजकीय पक्षाच्या लायकीचे मोजमाप त्याच्या गुणावरून करते. म्हणून एखादा पक्ष अधिकारावर आला तर त्याचे समाधान केले पाहिजे, त्याला खूष ठेवले पाहिजे. अशा वशिलेबाजीचा तेथे प्रश्नच उपस्थित होत नाही, भारतात मात्र अधिकारावर असलेला पक्ष काही लोकांना विशेष सवलती देतो असे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे.*_
*_जुन्या घातक प्रवृत्तीवर मात करून क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छळ राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे. लोक या मार्गे लागतील अशी मला खात्री आहे.*_
☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
*_ संदर्भ :-_*
*१)* _*डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्मियांची परिषद आटोपून कोलंबोहून मुंबईस परत येत असता १०/०६/१९५० रोजी त्यांचे त्रिवेंद्रम येथील लेजिस्लेस्टिव्ह चेंबरमध्ये भाषण झाले*_
*२)* _*जनता १७/०६/१९५०*_
*३)* _*डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३ पान नं २१८-२१९*_
*_संकलन : महेश कांबळे_*
_*२६/११/२०२१*_
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️
No comments:
Post a Comment