Tuesday, 30 August 2022

चिमूटभर मोहरी

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_चिमूटभर मोहरी_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


         _*श्रावस्ती नगर, अत्यंत गरीब आणि त्याकाळी खालच्या मानल्या गेलेल्या जातीत जन्मलेली एक दुर्दैवी तरुणी, नाव होत गौतमी तिस्स [तिष्या ]. परंतु शरीराने अत्यंत हाडकुळी-दुबळी म्हणून घरचे लोक तिला गौतमी तिस्सा ऐवजी गोतमी किसा [कृश शरीराची] म्हणू लागले. हळू हळू शेजारीपाजारीही 'किसा गोतमी' ह्याच नावाने ओळखू लागले.*_

         _कर्मधर्म संयोगाने तिचा विवाह श्रावस्ती नगरीतील उच्च घराण्यातील श्रीमंत कुटुंबातील एका चांगल्या मुलाशी झाला. धनधान्यसंपन्न परिवार, सुंदर युवापतीही प्रेमळ स्वभावाचा. असं वाटलं की गौतमीच्या जीवनातील दुःखाचा अध्याय संपला. किसा गोतमीचे भाग्य उजळले. पण परिस्थिती तशी राहिली नाही. पतीचे अपार प्रेम लाभूनही घरांतील अन्य लोक तिच्यावर कमालीचे नाराज होते. रात्रं-दिवस सर्वांची सेवा करूनही घरातील लोक तिचा तिरस्कारच करीत. एक तर गरीब मुलगी, आणि वरून हलक्या जातीची. जात-पात सधन-निर्धन या प्रकारच्या भेदभावांनी समाज सडला होता. समाजात भयंकर रोग पसरला होता. त्यामुळे किसाच्या कुटुंबातील लोकांच्या डोक्यात हे भूत शिरले होते. म्हणून संबंध तर झाला पण मनापासून ते कुणालाच आवडले नव्हते. त्यांचे छद्मी बोलणे, टोमणे ऐकून तिच्या हृदयाला घरे पडत यापेक्षा एकाद्या गरीब घरी पडली असती, लहान म्हटल्या जाणाऱ्या कुळजातीत दिली असती तर अधिक चांगले झाले असते. अशा वातावरणांत धनसंपदा काय कामाची? घृणा तिरस्कार, उपहास यांनी तिला जीव नकोसा झाला. फक्त पतीप्रेमाचाच काय तो सबळ आधार होता._

        _विवाहानंतर पुष्कळ वर्षे तिला संततीप्राप्ती झाली नाही. त्यामुळे कुटुंबात तिची आणखीनच कुचंबणा सुरू झाली. तिरस्कार वाढतच चालला घराण्यातील एकुलता एक मुलगा तोच जर निःसंतान राहिला तर वंश वाढणार कसा? कसली पुण्यहीन वांझोटी सून घरात आली ? अन् पुण्यशील असती अशा गरीब घराण्यात कशाला जन्मली असती? अन् एवढ्या उच्च घराण्य पडली तरीही निपुत्रिकच का राहिली? खरोखर ही दळभद्रीच आहे. या अभागिनीमुळे आपला निर्वंशच होणार. या प्रकारची निखाऱ्यासारखी बोलणी ऐकून ऐकून ती बेजार झाली. पण करणार काय? असहाय्य अवस्था. मुकाट्याने अश्रू पीत सारं काही सहन करीत राहिली._

          _परंतु पुन्हा काही दिवस गेले, आणि काळ बदलला. ती गर्भवती झाली. दहा मास पूर्ण होताच एका गुटगुटीत बाळाला तिने जन्म दिला. जीवन एकदम उजळून निघाले. पुत्रवती म्हणून आदर मिळू लागला. सर्वांची मनोकामना पूर्ण झाली. तिने घराण्याचे नाव चालवायला कुटुंबाला सुंदर पुत्र जो दिला. जसं जस बाळ वाढू लागले तस तशी बाळाची किलबिल घरांतील वातावरण प्रसन्न करू लागली. सारेजण त्याला कडेवर घेण्यासाठी आतुर होऊन उठत. किसाचे घरवाले हे विसरून देखील गेले की मुलाची आई हलक्या कुळातली गरीब घराण्यातील आहे. गृहलक्ष्मीचं स्थान घरांत तिला मिळाले. व्यवस्थित मानपान होऊ लागला._

       _पाळण्यातलं बाळ आता रांगायला लागलं. त्याच्या बाललीलांनी सर्व प्रसन्न झाले. अडखळत दोन चार पावले टाकू लागला. त्याच्या बालिश खोड्यांनी सारेच हरखून गेले. घराच्या प्रांगणात आनंदाचे फुलबाजे उडू लागले. किसाला आपल्याच भाग्याचा हेवा वाटू लागला. मुलाला छातीशी घट्ट पकडून ती प्रेमाने त्याचे मुके घेई. ह्या लाडक्यामुळेच तिचे दिवस पालटले. तिचे दुःख दूर झाले._

         _परंतु हे सुदिन फारच लौकर संपले. एक दिवस किसा गौतमीच्या आनंदावर विरजण पडले. मेघावाचून वीज कोसळली. घराबाहेरील बगीच्यात खेळात दंग झालेल्या तिच्या बाळाला अतिविषारी काळा नाग चावला. पाहता पाहता हसरा प्रफुल्ल चेहरा काळानिळा पडला. शरीर थंडगार पडले. श्वास बंद झाला. हृदयाचे स्पंदन थांबले. घरच्या मंडळीनी खूप धावपळ केली. औषध पाणी केले. तंत्र मंत्र केले. पण काही उपयोग झाला नाही. मुलाने प्राण साइले ते सोडलेच. घरात हाहा:कार उडाला. किसा गोतमीच्या दुःखाला तर पारावारच राहिला नाही. प्रत्येक माता आपल्या एकुलत्या एक मुलावर आसक्त असते आणि किसा गौतमीचा तर तोच एक सुखाचा आधार होता. त्याच्यामुळेच तिला चांगले दिवस लाभले होते. आतां पुढे काय? ती दुःखाने वेडी झाली._

          _जेव्हा लोक म्हणू लागले की मुलाचे शव स्मशानांत दफन करायला हवे. तेव्हा हे शब्द तिच्या हृदयात भाल्याप्रमाणे घुसले. हे लोक आता माझ्या मुलाला घराबाहेर नेणार. 'मी मुळीच तसे करू देणार नाही.' तिने मुलाचे प्रेत हृदयाशी घट्ट धरून ठेवले नी आक्रोश करू लागली. 'नाही हो! माझा बाळ अद्याप मरण पावला नाही. विष चढल्यामुळे नुसता बेशुद्ध पडला आहे. गाढ झोप लागलीय त्याला. कुणीतरी याला वाचवा. कुणी तर शुद्धीवर आणा हो! कुणी तरी त्याला उठवा. जर खरोखर प्राण गेले असले तर असं एखादं औषध द्या का त्यामुळे त्याचे प्राण परत येतील. तो जिवंत होईल. तुमच्याने हे होत नसेल तर मी कुणाकडून तरी औषध मागून आणीन. माझ्या बाळाला मी जागवीन."_

        _आणि तशाच संभ्रमावस्थेत मृतबाळाला छातीशी अगदी घट्ट धरून ती घराबाहेर पडली. प्रत्येकाच्या घरी जाऊन याचना करू लागली. रस्त्यात जो कोणी भेटेल त्याच्या समोर पदर पसरून भीक मागू लागली, “मला कुणीतरी औषध द्या, ज्याच्याने माझा बाळ जागा होईल. त्याची गुंगी दूर होईल. तो मरण पावला नाही._

           _लोक सांगत होते "माई! हा मृत झालाय. आता कोणतेच औषध लागू पडणार नाही. आयुष्याची दोरी तुटली त्याला काय औषध!" हे ऐकून तिचा शोक आणखीनच अनिवार होई. मुलाला आणखी घट्ट आवळून धरी. दुसऱ्या व्यक्तीकडे औषधासाठी धाव घेई._

           _*तिची ही करुणावस्था पाहून एका माणसाला फारच दया आली तो म्हणाला, "माई! याला कोणी सामान्य वैद्य औषध देऊ शकणार नाही. यावेळी ह्या लोकी महाभिषक महावैद्य बुद्ध उपस्थित आहेत. शहराबाहेर त्यांचा जेतवन विहार आहे. भगवान तिथे यावेळी रहात आहेत. त्यांच्याकडे जा. तेच तुला योग्य ते औषध देतील."*_

            _उल्हसित होऊन किसा गोतमी धावत पळतच जेतवनात पोहोचली. भगवान तेव्हा साधनेतील बारकावे साधकांना समजावून देत होते. आकुळ व्याकुळ किसा गोतमी न थांबता भगवान बुद्धांच्या समोरच जाऊन उभी राहिली आणि मृत बाळाचे प्रेत त्यांच्या पायाशी ठेऊन ओक्साबोक्शी रडू लागली._

          _*भन्ते! भगवान! लोक माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावू पहात आहेत. हा मेलेला नाही. भगवान, तो तर गाढ झोपला आहे. बेशुद्धावस्थेत आहे. आपण याला उठवा, जागं करा. शुद्धीवर आणा!*_

            _"बेटी! हा निष्प्राण झाला आहे. किसाला धक्काच बसला. अधिकाधिक हुंदके देत राहिली व स्फुंदत स्फुंदत म्हणाली, "जरी निष्प्राण आहे. तरी भगवान! आपण महाभिषक आहात! मला कुणीतरी सांगितलं की आपल्याजवळ संजीवनी औषधी आहे. महाराज, आपण याच्या शरीरांत नवे प्राण घाला. याला औषध द्या!"_

            _*भगवान बुद्धांनी पाहिले की आता ही भावावेशांच्या विक्षिप्त अवस्थेत आहे. धर्मनियामकतेच्या गोष्टी या अवस्थेत हिला समजणारच नाहीत. त्यांच्या बोधिदृष्टीला हे ही दिसलं की पटाचाराप्रमाणेच आपल्या पूर्वजन्मात भगवान काश्यप बुद्धांच्या सात बहिणीपैकी ही एक आहे. त्यांच्याबरोबर खूप चांगली तपश्चर्या केलेली आहे. पूर्व संचित चांगले आहे. पुण्यपारमीचा पुरेसा साठा हिच्याजवळ आहे. आता आपल्या कुठल्यातरी दुष्कर्माचे फळ भोगत आहे. परंतु हिच्या दुःख विमुक्तीची वेळ आता जवळ आली आहे.*_

            _भगवानांनी आपल्या शांत-गंभीर वाणीत करुणेची मंदाकिनी ओसंडीत म्हटले, "हां, बेटी! तुला कुणी सांगितलं ते खरं आहे. मी भिषक आहे. वैद्यच आहे. तुला योग्य औषध देईन."_

         _“द्या, भगवान् द्या! मी आपले उपकार जन्मभर विसरणार नाही. किसाचा चेहरा आशेने प्रफुल्लित झाला._

        _“शहरातून कुणाकडून तरी चिमूटभर मोहऱ्या मागून आण. "_

         _"ही आत्ताच घेऊन येते भगवान!" ती झटकन उठली नी जायची घाई करू लागली. “पण एक लक्षात ठेव. अशा परिवारातून आण, ज्यांच्याकडे अजूनपर्यंत कुणीही मरण पावलेलं नाही._

_"हां हा भगवान्! अशाच घरातून आणीन."_

         _मुलाला छातीशी घट्ट पकडून ती नगराच्या दिशेने आवेगात धावतच निघाली. "आता माझं बाळ नक्की सजीव होऊन उठणार."_

       _जे पहिलं घर दिसलं तिथे जाऊन आपली दुःखद कथा सांगितली व चिमूटभर मोहरी मागितली._

         _त्या कुटुंबियांना अपार सहानुभूती वाटली. 'माई! तुझं बाळ जगलं वाचलं तर चिमूटभर का हव्या तर मणभर मोहऱ्या घेऊन जा.' ते म्हणाले._

               _“पण तुमच्या घरांत कुणी अजूनपर्यंत मेले तर नाही ना ?" किसाने विचारलं. हे ऐकताच त्यांचा चेहरा उतरला. "मेलं कसं नाही? माई! आमच्या घरांत तर अनेक माणसं मरण पावलेली आहेत. "_

           _अशा रीतीने एकेका घरी चिमूटभर मोहरीची भीक मागत किसा शहराच्या गल्ली बोळातून भटक भटक भटकत राहिली. तिला एक देखील घर वा परिवार मिळाला नाही की ज्या घरात कुणीही निधन पावलेले नव्हते. दिवसभर थकली भागली किसा सायंकाळी सावध झाली. मुद्दा लक्षात आला प्रत्येक घरी लोक मरत असतात. लहान मुले, तरुण, वृद्ध, स्त्रिया, साऱ्यांना मरण आहे. या शहरात जिवंत असणाऱ्या लोकांपेक्षा मेलेल्यांची संख्य अधिक आहे. एवढी सारी माणसे आपल्या घरातल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतरही माझ्या सारखी वेडीपिशी झाली नाहीत. जन्म मरण कुणाच्याच हातात नाही. हे सत्य समजाविण्यासाठी भगवानांनी माझ्याकडे चिमूटभर मोहरीच्या दाण्यांचे दान मागून आणायला सांगितले._

          _सर्व सामान्य अशीच ही घटना. *केवळ चिमूटभर मोहरीचे दाणे, पण तेच दान त्या दुःखाने व्याकुळ जीवाला धर्माची चेतना देण्यासाठी प्रेरणादायक ठरते.* तिची स्मृती ताळ्यावर आली. सावध होताच लगेच बाळाचे मृतशरीर जमिनीत पुरण्यासाठी लोकांच्या स्वाधीन करून जेतवन आश्रमात भगवान बुद्धांच्याजवळ आश्रयाला आली._

        _" मिळाली का चिमूटभर मोहरी ?” आल्या आल्याच भगवानांनी तिला विचारले._

          _"नाही भगवान! मोहरीचे दाणे नाही मिळाले पण गेलेला होश मात्र परत आला. प्रत्येक जन्म घेणाऱ्याला मरण अटळ आहे. पुढे मागे, आज ना उद्या, कुणी ना कुणी मरतच असते. कुणीही थांबू शकत नाही. "_

       _*भगवानांनी पाहिलं, आता मनःस्थिती धर्म समजण्यालायक झाली आहे. तिला धर्मदेशना दिली. साऱ्या वातावरणात विमल प्रशांत धर्म तरंग-लाटा पसरल्या. भगवान म्हणाले, “मृत्यू सर्व प्राण्यांचा अनिवार्य धर्मस्वभाव आहे. केवळ गाववाले नव्हते, केवळ नगरवासी नव्हेत, केवळ एकाच कुळाचे नव्हेत तर देवदेवतांसह सर्व प्राणीमात्रांचा हा धर्मस्वभाव आहे. सारेच अनित्यधर्मा आहेत. मरणधर्मा आहेत. हे सत्य ज्यांना समजत नाही त्यांना पशु-पक्षी, पुत्र-पुत्री, धनसंपत्ती यांच्या विषयी नेहमी आसक्ती वाटत राहते. मोहमूढ अवस्थेत ते वावरत राहतात. आणि जन्मो-जन्मी वारंवार मृत्यूच्या चक्रात सापडतात. ज्याप्रमाणे नदीला अकस्मात पूर येतो तेव्हा प्रगाढ निद्रेत असलेला सारा गांव वाहून जातो. तद्वतच या प्रमत्त आसक्त लोकांना वारंवार ही मृत्यूधारा वाहून नेते.*_

        _*जो कोणी या मोहनिद्रेतून जागा होतो, आणि अनित्यबोध जागवतो, उदय व्यय, उदयव्यय यांचे दर्शन घेत घेत जन्मो-जन्मीच्या जन्म-मरणाच्या दुःखचक्रातून नेहमीसाठी मुक्त होतो.*_

      _*उदय-व्ययाच्या सत्याचे दर्शन न घेता शतायू होऊन जगण्यापेक्षा या अनित्यधर्म उदयव्ययाचे दर्शन घेऊन केवल एक दिवस जगणे अधिक श्रेष्ठ आहे."*_

         _महाकारुणिकाच्या धर्मवाणीचा अमृतरस कानी पडताच किसा गोतमीचे अनेक जन्मांचे संग्रहित पुण्य जागले. शरीराच्या अणुरेणूत धर्मचितना जागली. ती एकाग्र चित्त झाली. अंतर्मुखी व स्वमुखी झाली. तिला आपल्याआत "उदय-व्यय, उदय-व्यय अनित्यधर्माचे सम्यक दर्शन झाले. उदय-व्यय उदय-व्ययाचे दर्शन करता करता उत्पाद-निरोधाचे दर्शन झाले. विरज, विमल धर्मचक्षु उघडले. काही क्षण निर्वाणाचा साक्षात्कार झाला. किसा धन्य झाली. स्रोतापन्न अवस्थेत प्रतिष्ठित झाली. नितांत दुःख विमुक्तीच्या मार्गावर प्रतिष्ठित झाली._

        _श्रद्धायुक्त अंत:करणाने, कृतज्ञता भावनेने भावविभोर होऊन भगवानांच्याजवळ प्रव्रज्याची याचना केली. भगवानांनी अनुमती दिली. किसा गोतमीने आदरपूर्वक त्यांना तीन वेळा प्रदक्षिणा घातली. वंदन केले आणि भिक्षुणी विहारात जाऊन संन्यस्त जीवन अंगीकारले._

        _आता तिचे दिवस भगवानांच्या सानिध्यात साधना करण्यात जाऊ लागले. भगवानांची मंगल धर्मवाणी तिच्या मनात शिल्लक राहिलेली मलिनता धुऊन काढण्यास सहाय्यक झाली. समर्पित चित्ताने विपश्यना साधनेत मग्न झाली. एक दिवस साधना करतांना भगवान बुद्धांची वाणी तिच्या कानी आली._

_*यो च वस्ससतं जीवे अपस्स अमतं पदं।*_

_*एकाहं जीवितं सेय्यो पस्सतो अमतं पदं।*_

         *_"अमृतपद निर्वाणाचा साक्षात्कार न होता भले कोणी शतायुषी जीवन जगू दे, परंतु त्यापेक्षा अमृतपद निर्माणाचा साक्षात्कर करून कुणी एक दिवस जरी जगला तरी ते जीवन अधिक श्रेष्ठ आहे. श्रेयस्कर आहे."_*

       _या प्रेरणादायी शब्दांनी किसा गौतमीच्या मनांत धर्मसंवेग जागला. 'मी क्षणभर 'निर्वाण'ची अनुभूती करून स्रोतापन्न अवस्था प्राप्त केली परंतु नितांत विमुक्तीसाठी अरहंतची निरोधसमापत्तीची निर्वाणिक अवस्था अनुभवली पाहिजे तेव्हाच या जीवन मरणाच्या रहाटगाडग्यातून, भवचक्रातून सुटका होईल._

         _*या प्रेरणेने प्रभावित होऊन दृढ निश्चयाने पुरुषार्थ भावनेने विपश्यना साधना करता करता तिने क्रमशः सकदागामी, अनागामी आणि अरहंत फल प्राप्ती करून घेतली, साधना सफल झाली. साधिका जीवनमुक्त झाली.*_

          *_किसा गोतमी भगवानांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक झाली. भिक्षुणींचे जीवन अत्यंत साधे असते. पण त्या सर्व भिक्षुणींत सर्वात साधे सरळ जीवन किसा गोतमीचे होते. त्या भिक्षुणींमध्ये सर्वाधिक साधेपणाने जीवन जगणाऱ्या गोतमीला, जाडेभरडे चीवर धारण करणाऱ्या भिक्षुणींमध्ये भगवानांनी 'अग्र' उपाधी दिली._*

       _*परम साध्वी किसा गौतमीने आपले शेष जीवन लोकसेवेसाठीच प्रदान केले. कित्येक दुःखी स्त्रियांनी तिच्या जीवनापासून प्रेरणा घेतली, मार्गदर्शन घेतले आणि दुःखविमुक्तीचा मार्ग स्वीकारला. किसा गौतमीच्या करुणाभरल्य चित्ताने इतर स्त्रियांचे दुःख व्यवस्थित समजून घेतले. किती प्रकारच्या त्यांच्या दुःख व्यथा? योग्य पती मिळाला नाही तरी दुःख, सासरची माणसं चांगली मिळाली नाहीत तर दुःख, संतती नाही म्हणून दुःख, नाहीतर गर्भपालनाचे दुःख, प्रसूती वेदनांचे दुःख, बालसंगोपनाचे दुःख, स्वतःचे पाऊल घसरले तर अपरिमित दुःख. पूर्व जन्मातील आपली बहीण पटाचाराचा जीवन वृत्तांत आठवला. दुराचारामुळे पती, दोन मुले आणि आईवडिलांचा, भावाचा अंत यांमुळे भोगावे लागलेले तिचे असीम दुःख ! या लोकजीवनात दुःखच दुःख. ज्या कल्याणकारी मार्गाचा अवलंब करून किसा स्वतः दुःखमुक्त झाली तोच हा कल्याणकारी मार्ग इतरांना वाटू लागली.*_

         _*जेव्हा कधी तिला स्वतःचा भूतकाल आठवे तेव्हा भगवान बुद्धांविषयी अपार कृतज्ञतेची भावना हृदयात ओसंडू लागे, “मी किती भाग्यवती, भगवान तथागतांसारखे कल्याणमित्र लाभले!' कल्याणमित्राचे साहचर्य मिळाले तर जीवनात मांगल्य निर्माण होते. दुर्जनातील दुर्जन व्यक्ती ही सत्संगतीने सज्जन बनते. दुःखी माणसाची दुःखापासून मुक्तता होते. तो दुःख भोगायचे सोडून दुःखाचे अवलोकन करू लागतो. दुःखाचे मूळ कारण शोधतो. दुःख विमुक्तीच्या मार्गावरून स्वतः वाटचाल करून दुःखाचे प्रत्यक्ष दर्शन करून घेतो आणि अशा प्रकारे नितांत दुःखनिरोध अवस्था, परमपद निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो. "*_

           _"माझ्यासारख्या अभागिनीने याच एका जीवनात नव्हे तर अगणित पूर्व जन्मांत किती दुःखे सहन केली आहेत. कोण जाणे किती प्रियजनांचा विरह सोसावा लागला. त्या सर्व मृत पावलेल्या प्रियजनांच्या अस्थि एकत्र केल्या तर हिमालयाएवढा ढीग होईल. त्यांच्या मरणानंतर ढाळलेले अश्रू जमा केले तर सर्व समुद्रांच्या पेक्षाही ते अधिक होईल."_

            _*“कारुण्याचा महासागर तथागतांच्या सत्संगतीनेच माझी सारी दुःखे निमाली. शील, समाधि आणि प्रज्ञायुक्त अष्टांग मार्ग सदाचरणाचा धर्मपंथ स्वीकारून धर्माच्या आरशात परम सत्याचे दर्शन घेतले अन् जन्म जन्मांतरींच्या दुःखांचे ओझे हलके झाले. हृदयात खोलवर रुतून बसलेल्या मर्मभेदी दुःखदायक तृष्णेचा तीर बाहेर पडला. मी कृतकृत्य झाले. विमुक्त झाले, धन्य झाले. "*_

*_असा कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_अशी मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३०/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_30.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 26 August 2022

गतिरोध - जलधारेचा की जीवन प्रवाहाचा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_गतिरोध - जलधारेचा की जीवन प्रवाहाचा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

        _श्रावस्ती कोशल देशाच्या राजधानीत अतिधनाढ्य श्रेष्ठी परिवार लहानमोठ्या अनेक खोल्या असलेला सात मजल्यांचा विशाल वाडा, या प्रचंड वाड्यांत चार माणसांचे छोटेसे कुटुंब. श्रेष्ठी परिवार, सेठ, सेठाणी, एक मुलगा, एक मुलगी. मुलीने किशोरी अवस्था संपवून उन्मादक यौवनात पदार्पण केलं. घरात अपार वैभव, विलासाची साधने. बाहेर देखील 'सर्व अस्ति'. श्रावस्ती नाचगाणी, आमोदप्रमोद, खेळलोकनाट्ये आकर्षक मनोरंजक मोहमयी महानगरी. *पिताश्रींना पैशाचा अनिवार मोह, रात्रंदिवस पेशामागेच धावपळ, रात्रंदिवस तोच ध्यास. मातेला समाजात मिरविण्याची ओढ, सांस्कृतिक कार्यक्रमात गुंतून गेलेली. मुलांच्या विकासाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. त्यांचे योग्य ते संगोपन संवर्धन होत नव्हते.* लहान मुलाला सांभाळण्यासाठी एक स्वतंत्र नोकर ठेवला होता. तरुण मुलीची काळजी घेण्यासाठी दुसरा तरुण सेवक, ज्याच्या वाईट संगतीमुळे त्या अल्लड युवतीच्या जीवनात कामवासनेची आग जागृत झाली. पाय घसरला नी एकदा पाय घसरला तो कायमचाच. विशाल हवेलीत एकांत अनाचाराला भरपूर मोकळीक मिळाली. दोघेही पापाच्या चिखलात दिवसेंदिवस अधिकच रुतले. रुतले ते रुततच गेले._

    _मुलीला विसावे वर्ष लागले तेव्हा माता पित्याला तिचे हात पिवळे करण्याची आठवण झाली. एका सुखी संपन्न, प्रतिष्ठित घराण्यातील योग्य वराशी वाङ्निश्चय करण्यात आला. मंगलदिन निश्चित करण्यात आला. आज घरात वऱ्हाडी मंडळी येणार. तेव्हा दोघा अनाचाऱ्यांना चिंता वाटू लागली. परगृही गेल्यावर एक दुसऱ्याची दृष्टीभेटही होणे शक्य नाही. मग शरीरसंबंधाची कशाला ?_ 

    _वासनांच्या चिखलाने बरबटलेल्या पुतळ्याला नकली प्रेमाचा सुंदर झगा घालून, भ्रामक त्यागभावनेची भडक आभूषणे चढवून दोघांनी आपली दुष्कर्मे झाकण्याचा प्रयत्न केला व घरांतून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांचाही दृढ निश्चय, भले झोपडीत राहू पण एकत्र संगतीनेच राहू. वरात घरात येण्याच्या आत त्यांची पलायन योजना यशस्वी झाली. थोडे बहुत दागदागिने वस्त्रे गोळा करून श्रावस्तीला पाठ फिरविली आणि दूर एका छोट्याशा गावांत जाऊन राहिले._

    _*साठलेलं पाणी किती दिवस पुरणार ?* आणलेलं सोननाणं पैसा थोड्याच दिवसात संपला. *पापकर्माची फळे फळास येऊ लागली.* अत्यंत दारिद्रयावस्थेत दिवस कंठण्याची पाळी आली. दोन वर्षात युवती गर्भवती झाली गर्भाच्या वाढीबरोबर चिंताही वाढल्या. विपन्नावस्थेत बाळंतपण कसं करायचं? बाळाचं संगोपन कसं करायचं? आई वडिलांची आठवण येऊ लागली. मन पश्चातापाने पोळू लागले. 'माझ्या दुष्कृत्याने त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. निश्चित रागावले असतील. पण आईबापच आहेत. मी त्यांची क्षमा मागितली तर ते क्षमा करतील. ' माहेरी लौकर जाण्याची इच्छा बळावली. मन उतावीळ झाले पण प्रियकर-पती घाबरला. त्याला वाटले श्रावस्तीला गेलो तर राजाची अवकृपा होईल. राजदंड भोगावा लागेल. तो यायला तयार होईना. 'आज जाऊ उद्या जाऊ' चा बहाणा करीत तो टाळाटाळ करू लागला. प्रियकराच्या खोट्या आश्वासनाने निराश झाली. गर्भाची वाढलेली अवस्था पाहून त्या दुःखी युवतीने एकटीनेच जायचे ठरविले. पती बाहेर गेलेला पाहून शेजारणीला सूचना देऊन ती श्रावस्तीला निघाली. वाटेत घनदाट जंगल होते. थकली भागली गर्भारशी निर्भयपणे मंद गतीने एकटीच चालत होती. घरी परतलेल्या पतीराजांना कळले तसा तोही आल्या पावली तिच्या मागोमाग निघाला. धावत पळत त्याने तिला गाठले. पण ती परतायला तयार होईना. लाचार पतीही तिच्याबरोबर निघाला. वाट चालता चालता ती वाटेतच प्रसूत झाली. एका मुलाला जन्म दिला. पतीने फारच आग्रह केला तेव्हा ती परत पतिगृही परतली._ 

    _अशा प्रकारे दैन्यावस्थेत दोन वर्षे लोटली. पुन्हा गर्भवती झाली. आई वडिलांची आठवण सतावू लागली. पतीने पुन्हा मागच्या सारखीच चालढकल चालविली. तो सासुरवाडीस जाण्याचे टाळू लागला. शेवटी तिने पूर्ववत एकटीनेच जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मुलाला कडेवर घेऊन, तशा गर्भार अवस्थेत ती श्रावस्तीकडे निघाली. नाईलाजाने पतीही तिच्या मागोमाग निघाला. दैवाचा खेळ ‘ये रे माझ्या मागल्या' प्रमाणे सुरू झाला. त्या निर्जन वनांत पुन्हा तिच्या प्रसूती कळा वाढल्या आणि दुर्दैवाने यावेळी आकाशात वावटळ उठली वादळ सुरू झाले. वळवाचा मुसळधार पाऊस पडू लागला. आसर्यासाठी जरादेखील जागा मिळाली नाही. प्रसूतीकळा वाढतच होत्या. कुठे तरी विसाव्याला जागा हवी होती. पति विचार करु लागला.  सुखासमाधानात वाढलेल्या या मुलीला माझ्यामुळे दुर्दैवाचे दशावतार पहावे लागत आहेत. या वादळी वार्यापासून वाचविण्यासाठी मला काहीतरी केलेच पाहिजे. काही लाकडे तोडून, सुकी पाने जमवून डोके झाकायला एखादे खोपटे तरी बांधू या.  त्या भीषण वादळांत काळ्याकुट्ट अंधारात तो भटकू लागला. गर्भार युवती पाण्या-चिखलात विव्हळत पडून राहिली. पण त्या अरण्यरुदनास प्रतिसाद कोण देणारा त्या निर्जन वनांत? कोण मदत करणार? अशा बिकट परिस्थितीत ती पुन्हा प्रसूत झाली. एका लहान मुलाला  जन्म दिला. चांगले फटफटले पहाटेपर्यंत पती परतला नाही हे पाहून ती नवप्रसूता घाबरून गेली. दोन्ही मुलांना छातीशी घट्ट धरून पतीच्या शोधार्थ बाहेर पडली. थोड्याच अंतरावर काळा निळा पडलेला ताठर झालेला पतीचा मृतदेह तिने पाहिला. त्याला विषारी सापाने दंश केला होता. आता काय करायचं? तिचे केविलवाणे करुण आक्रंदन सुरू झाले. दोन्ही मुलांना छातीशी धरून एकटीच श्रावस्तीकडे निघाली._

    _प्रलयकारी भयानक वर्षा थांबायचं नांव नाही. रस्त्यातील छोटे छोटे ओढे देखील नदीचे रूप घेऊन वाहत होते. *छोटीशी अचिरवती नदी* देखील पुराच्या पाण्याने सुसाट वेगाने वहात होती. दोन मुलांसह नदी पार करणे अशक्यच होते. तिने युक्ती योजली. मोठ्या मुलाची समजूत घालून त्याला नदीच्या अलिकडच्या तीरावर ठेवले व नवजात मुलाला घेऊन ती नदी पार करू लागली. नदीपलिकडे किनाऱ्यावर कपड्यात गुंडाळून त्या नवजात मुलाला ठेवले. एका झाडाखाली ते पोर विसावले. मोठ्या मुलाला आणायला म्हणून ती पुन्हा नदीत उतरली तरी सारे लक्ष त्या नवजात मुलाकडेच होते. त्याचे काही अशुभ न होवो. ती नदीच्या माजधारेत पोहचली तोच एक भले मोठे गिधाड तो मांसाचा गोळा भासणारा नवजात शिशु झपाट्याने उचलतांना दिसले. ती जिवाच्या आकांताने 'शू शू' असा आवाज काढू लागली. दोन्ही हात हालवू लागली. पण गिधाडावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने नवजात बालकाला आपल्या पंजांनी आवळून उंच आकाशांत भरारी मारली. परंतु त्याचा परिणाम असा झाला की पलिकडील तीरावर असलेल्या मुलाला वाटले की आई मलाच मोठ्यांदा हाका मारून हात हलवून बोलावत आहे. त्याने तात्काळ नदीत उडी घेतली व वाहत्या पाण्याच्या लोंड्यात पहाता पहाता दिसेनासा झाला. *दुःखी कष्टी दुर्देवी माता.*_

    _*पतीला सर्पदंश झाला. एका मुलाला गिधाडाने खाल्ले. दुसऱ्याला नदीने आपल्या पोटात घेतले. विचारी अभागिनी शोक करीत, रडत श्रावस्तीकडे निघाली.* अजूनही तिला खूप वाईट दिवस भोगावयाचे होते. *दुष्कर्माची आणखी फळे पिकायची होती.* श्रावस्ती नगरात पोहचण्यापूर्वी घाट लागला. स्मशानांत चिता जळत होत्या. तिथे तिने एका श्रावस्ती निवासी माणसाला विचारले कुणाचे निधन झाले ? तिला कळले की काल रात्री तुफान वादळी वाऱ्याने व भयंकर पर्जन्य वृष्टीमुळे नगरशेटचा सात मजली वाडा कोसळून नगरशेट, त्यांची पत्नी व त्यांचा एकुलता एक मुलगा इमारतीच्या ढासळलेल्या ढिगाऱ्याखाली सापडून मरण पावले._

    _ते तर तिचे आईवडील आणि एकुलता एक भाऊ होते. त्यांचेच मृतदेह चितेवर जळत होते. दुःखाचा पहाडच तिच्यावर कोसळला होता. आता जगात तिचा कुणीच आधार राहिला नव्हता. तिला स्वतःला सांभाळता आले नाही आणि तोल जाऊन तिथेच बेशुद्ध पडली._

    _काही वेळाने शुद्धीवर आली. पण गेलेला होश परत आला नाही. पूर्ण विक्षिप्त वेडी झाली. एकेक करीत शरीरावरचे सारे कपडे तिने फाडून टाकले. ठार वेडी झाली. पूर्ण नग्नावस्थेत श्रावस्तीच्या राजमार्गावरून, गल्ली बोळातून फिरू लागली. डोक्यावरचे केस ओरबाडून छाती बडवून आक्रोश करीत फिरू लागली._

    _हाय! माझ्या पतीला विषारी सर्प चावला, एका पोराला गिधाडाने खाल्ले मोठा पोर नदीत बुडाला, आई-बाप-भाऊ इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली मेले. त्या सर्वांना एकत्रच जाळले._

    _लोक तिचे करुण आक्रंदन-विलाप ऐकून दुःखी होत पण करणार काय?  तिचे वेडाचार पाहून, आपल्या घराचे दरवाजे, खिडक्या बंद करीत. तिला कुणी जवळ येऊ देत नसे. 'वेडी रे वेडी' म्हणून पोरेटोरे टवाळी करीत, तिच्या मागे लागत. दुरून दगड-धोंडे, धूळ फेकत._

    _*अशा विपन्नावस्थेतहि आपल्या पूर्वसंचित पुण्यामुळे एक दिवस ती जेतवन विहाराजवळून जात होती. तेथे भगवान बुद्ध लोकांना धर्म प्रवचन देत होते. लोकांनी तिला तेथे येतांना पाहताच पळवून लावायचे ठरविले. ही आपल्या  वेडगळपणामुळे धर्मचर्चेला बाधा तर आणणार नाही? एवढ्यात भगवान बुद्धाने तिला पाहिले. लोकांना थांबविले. ती दुखियारी भगवानांच्याजवळ गेली.  भगवान कारुण्यपूर्ण शब्दात म्हणाले, 'माझी दुःखी बेटी! सांभाळ स्वतःला त्या वाणीत प्रेममय अमृत होते. तिने ते प्रेममय शब्द ऐकले मात्र, तोच सावध  झाली. आपल्या नग्नावस्थेकडे पाहून ती विलक्षण लज्जीत झाली. ती पटकन उकडवी खाली बसली. शेजारी उभ्या असलेल्या एका धर्मबंधूने तिच्या अंगावर आपली चादर टाकली. तिने ती स्वतःभोवती गुंडाळली. विक्षिप्त अवस्थेत सर्वांगावरील  वस्त्रे फेकून देणाऱ्या त्या स्त्रीने चादर अंगावर ओढून घेतली म्हणून त्या दुःखी स्त्रीला 'पटाचारा' असं लोक म्हणू लागले.*_

    _*पटाचारा भगवानांच्या जवळ गेली दोन्ही हात जोडले, पाय जोडले, मस्तक जमिनीवर टेकले. पंचांग प्रणाम करीत म्हणाली, 'भगवान, मला आश्रय द्या. मी निराधार दुःखी आहे. "*_

_"बेटी! तू योग्य ठिकाणी आली आहेस. तुला इथे अवश्य आश्रय मिळेल.' भगवानांच्या या आश्वासक शब्दांनी तिला धीर आला._

    _"महाराज! माझ्या पतीला नागाने दंश केला. एका मुलाला गिधाडाने खाल्ले. दुसरा मुलगा नदीत वाहून गेला. आईबाप-भाऊ इमारत कोसळून ढिगार्यात सापडून मरण पावले. त्यांना एकाच चितेवर जाळले. आता या जगात मला कुणाचाही आधार नाही. कोण आश्रय देणार मला?"_

    _आपले दुःखमय जीवन आठवून ती ओक्साबोक्शी रडू लागली._

    _*"बेटी! आईबाप, भाईबंधु, पति-पुत्र कुणीही शरण देत नाही. खरा आधार धर्माचरणाचा असतो. आपण जो धर्म धारण करतो, जसे आचरण करतो तो आचार - धर्मच योग्य साह्य करतो. तेच आपले खरे आश्रयस्थान असते. तू कोणत्या आप्त नातेवाईकासाठी दुःखाश्रू ढाळत आहेस ? या अनादि भवसंसारात तू अनंत वेळा जन्म घेतला आहेस. सर्व जन्मात तुझे हे प्रिय आप्तजन मरण पावले आहेत. त्यांच्या निधनानंतर तू जे अश्रू ढाळलेस ते सर्व जर एकत्र केले तर या चार महासागराएवढं पाणीही त्या तुलनेत कमी पडेल. आणि आणखी किती जन्म तू यांच्यासाठी प्रिय-वियोग झाला म्हणून रडत राहणार आहेस? प्रमाद सोड. ही चूक करू नकोस. सावध हो. जागृत हो. या असीम दुःखमय भवसागराचे वास्तव स्वरूप समंजस माणसाच्या लगेच लक्षात यायला हवं व शीघ्रातीशीघ्र यातून मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे. कायमचे दुःखविमुक्त झाले पाहिजे.''*_

    _*भगवान बुद्धांच्या वाणीतून अमृताचा वर्षाव झाला. योग्य समंजस व्यक्तीने तो ग्रहण केला. ही अमृतमय वाणी ऐकता ऐकता ती एकाग्र झाली. थोडा काळ ती आत्ममुखी झाली. अंतर्मुखी बनली. शरीराच्या अंगप्रत्यंगातून अणुरेणुचा उदयव्यय-उदयव्यय होत असल्याचा प्रत्ययकारी अनुभव आला. अनेक पूर्वकर्मसंचित पुण्याईचे फळ तिला मिळाले. अनित्यबोध झाला. सारं परिवर्तनीय आहे. सारखं बदलत आहे. या अनित्यबोधी धर्मगंगेत तिने अवगाहन केले. तिथे बसल्या बसल्याच तिला  तिला निर्वाण अवस्थेची अनुभूती आली. पटाचारा स्रोतापन्न झाली.*_

    _*कृतज्ञताविभोर होऊन तिने भगवान बुद्धांना नमस्कार केला. भिक्षुनींनी तिला संन्यस्त जीवनाची दीक्षा दिली आणि पटाचाराने दृढ निश्चय मुक्तमार्गाची वाटचाल चालू ठेवली.*_

    _जे भवसंस्कार राहिले होते त्यांना सामोरे जायचे होते. अंतर्तप करीत करीत विपश्यना साधनेने त्यांना भस्मसात करायचे होते. अकालीच मृत्यूला प्राप्त झालेल्या स्वजन प्रियजनांच्या आठवणीने साधना करणे कठीण जात होते. असे होत होत एक दिवस सायंकाळी दृढ संकल्प करून साधनेच्या तयारीस ती लागली. लोटा भरून बादलीतील पाणी घेतले. त्याने पाय स्वच्छ धुतले. सुक्या जमिनीवर वाहत वाहत ते पाणी जिरून गेले. फार पुढे गेले नाही. एक लोटा पाणी पुन्हा पायावर ओतलं. यावेळी देखील पाणी तसंच वहात गेलं. पण पहिल्यापेक्षा थोडे जास्त दूर जाऊन जमिनीत जिरलं. तिसऱ्यांदा तसच ते वाहिले पण आणखी दूर वाहात गेले नी जिरले._

    _या छोट्याशा घटनेने तिच्या ज्ञानतंतूंना अलगद धक्का दिला. मोहजन्य अज्ञानाचा पडदा दूर झाला. जशी जलधारा तशीच जीवनधारा. या जगात कुणाची जीवनधारा अल्पावकाशांत सुकते तर काही जणांची मध्यवयातच सुकून जाते तर काही वयोवृद्ध होऊन जातात. पण मृत्यू सर्वांनाच आहे. कोणी जिवंत राहात नाही. या मरणानुस्मृतीच्या आधाराने साधना करण्यास बसली त्याच वेळेला भगवानांचे अमृतमय बोल कानांत घुमले :_

-*यो च वस्ससतं जीवे अपस्तं उदयब्बयं ।*_ 

_*एकाहं जीवितं सेय्यो पस्सतो उदयब्बयं ॥*_


    _*उदय-व्ययाची सत्यता विपश्यना साधनेच्या द्वारा पाहिल्याशिवाय भले कोणी शतायु होवो पण त्यापेक्षा उदयव्ययाची अनित्यबोधाची अनुभूती घेऊन एक दिवसाचं जीवन अधिक श्रेयस्कर आहे. अधिक कल्याणकारी आहे.*_

    _ही धर्मवाणी ऐकताच साधिका पटाचारीचा रोम न रोम पुलकीत झाला. मी जीवनाची गेली पंचवीस वर्षे या उदयव्ययाच्या अनुभूतीशिवाय फुकट घालविली. आता भगवानांच्या अपार अनुकंपेने या सत्याचा साक्षात्कार झाला आहे. या सत्याकडे तटस्थतेने पाहण्यामुळे निर्वाणाचे पहिले दर्शन झाले. याच उदय-व्ययाचे निरंतर दर्शन घेत घेत प्रगतीच्या पुढील अवस्था दृष्टीपथात येतील._

    _*शेतकरी शेतात परिश्रम करतो. नांगरट करतो. बीज पेरतो. तेव्हाच फळ प्राप्त होते. आता मी शील प्रतिष्ठित बुद्ध कन्या झाले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने अप्रमत्त होऊन पुरुषार्थ केला तर परममुक्त अवस्थेला निश्चितच पोहोचेन असा दृढ निश्चय करून ती आपल्या पर्णकुटीत विपश्यना करण्यास बसली.*_

    _*जवळच जळणाऱ्या दिव्याची ज्योत मंद होत होती. ती वात सुईच्या टोकाने ठीक करण्याचा प्रयत्न करीत असतांनाच विझून गेली. आणि अंतर्बोध जागला. ज्याप्रमाणे या दिव्याची ज्योत मालविली त्याप्रमाणे माझ्या मनांतील लोभ, द्वेष आणि मोह या संस्कारांची ज्योत विझली तर मानवी जीवनाचे सार्थक होईल.*_

    _*पटाचाराचा दृढनिश्चय पक्का झाला. विपश्यना साधनेशी एकरूप झाली. शरीर आणि मनाच्या प्रपंपाचे, त्याच्या अनित्यतेचे लक्षण तटस्थ भावनेने निरीक्षण करता अंतर्मनाच्या गाभाऱ्यात सुप्तावस्थेतील संस्काराचे पापुद्रे निखळू लागले. रात्र संपण्यापूर्वीच ती स्रोतापन्न अवस्थेतून सकदागामी नंतर पुढे अनागामी व अनागामी अरहंत अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचली. भवचक्राचा - जन्ममरणाचा फेरा संपला. नितांत मुक्तावस्था प्राप्त झाली. मानव जीवन सफल झाले. सार्थकी लागले.*_

    _*पटाचारा भगवान बुद्धांच्या प्रमुख शिष्यांतील एक बनली. ज्या थोड्याशा भिक्षु भिक्षुणींना, गृहस्थ- गृहिणींना भगवानांनी 'अग्र' उपाधी प्रदान केली. त्यांत पटचारा ही एक होती. भिक्षुणीच्या विनय नियमांना जाणणाऱ्या व चांगल्या प्रकारे पालन करणाऱ्या साध्वीमध्ये तिची गणना अग्रगण्य स्थानी केली जाऊ लागली. तिने आपले संपूर्ण उर्वरित जीवन आपल्या सारख्याच दुःखपीडित स्त्रियांना धर्माच्या मार्गावर आणून दुःखमुक्त करण्यातच घालविले. आपल्या कल्याणासहित अनेकांच्या कल्याणाला कारण झाली. पटाचारा 'विपश्यना' मिळाल्याने आणि विपश्यनेला पटाचारासारखी साध्वी मिळाल्याने दोघीही धन्य झाल्या.*_

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २९/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼




Thursday, 25 August 2022

कर्नाटक किनारपट्टीतील बुद्धिझम आणि नाथ संप्रदाय

 *कर्नाटक किनारपट्टीतील बुद्धिझम आणि नाथ संप्रदाय* Buddhism in coastal Karnataka






आपल्या महाराष्ट्रात कोंकण किनारपट्टीत जशी कुडा लेणी, गंधारपाले लेणी, पन्हाळेकाजी लेणी आहेत तशी कर्नाटकच्या किनारपट्टी भागात लेणी नाहीत परंतु तरीही एकेकाळी बौद्ध धर्म तेथे पसरला होता. अनेक पुरातन बुद्धमूर्ती कादरी ( मंगलोर), हायगुंडा, बाब्रूवाडा आणि मुलर (उडुपी) येथे मिळाल्या आहेत. कर्नाटक किनारपट्टीतील मंगलोर जवळील 'कादरी श्री मंजुनाथ मंदिर' हे देवस्थान प्रत्यक्षात एकेकाळचे वज्रयान बौद्ध विहार आहे. तेथील देवळात दुर्मिळ पंचधातूची बुद्धमूर्ती आहे. तिला बाजूला कोनाड्यात सरकवून मुख्य गाभाऱ्यात शिवाची स्थापना केली आहे. १० व्या शतकातील या महायान पंथाच्या बुद्धमुर्तीला सर्वसामान्यजन ब्रम्हदेवाची मूर्ती समजतात. परंतु ही मूर्ती म्हणजे बोधिसत्व मंजुश्री, बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि बुद्ध अशा तीन त्रयींची आहे. काही अभ्यासक बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांची आहे असेही मानतात. या पंचधातु मूर्तीखाली 'कादरीका विहार' असा स्पष्ट उल्लेख आहे. यामुळे पूर्वी हे मंदिर महायान-वज्रयान पंथाचे मोठे विहार होते हे स्पष्ट दिसते. सदर मूर्ती अलुप राजा कुंदवर्मन याच्या कारकीर्दीत इ.स. ९६८ मध्ये घडविण्यात आली.


तीन चेहरे आणि सहा हात असलेली ही मूर्ती अवलोकितेश्वर म्हणून ओळखली जाते. या मूर्तीच्या मुकुटावर भूमीस्पर्श मुद्रेतील भगवान बुद्धांची प्रतिमा आहे. तसेच या प्रतिमेच्या पाठीमागे प्रभावलय सुद्धा दिसते. येथील दुसरी अवलोकितेश्वरची मूर्ती ४ फूट उंच असून तिला चार हात आहेत. अमिताभ बुद्ध ध्यान मुद्रेतील प्रतिमा तिच्या मुकुटावर दिसून येते. तिसरी बुद्धमूर्ती ३ फूट उंच आहे. तिला व्यासमुनी असे म्हणतात. येथील गर्भगृहातील स्तंभावर बुद्ध प्रतिमा स्पष्टपणे दिसतात. तसेच तेथील एका स्तंभावर ध्यान बुद्धा असे कोरलेले आढळते. यावरून हे देवस्थान एकेकाळी मोठे 'बुद्ध विहार' असावे हे स्पष्ट दिसून येते. काळाच्या ओघात या मूर्त्यांची ओळख हिंदू देवता अशी बदलून गेली आहे. 


तसेच या देवस्थानात महासिद्ध साधक मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ यांची शिल्पे देखील आहेत. हे तीनही महासिद्ध मुनी हे ८४ सिद्धी प्राप्त केलेले साधक होते. बौद्ध धर्मात ८४ हजार गाथांना महत्त्व आहे. यातील ८२ हजार गाथा या भगवान बुद्धांनी स्वतः उपदेशीलेल्या आहेत. तर २ हजार गाथा त्यांच्या शिष्यांनी सांगितल्या आहेत. अशा एकूण ८४ हजार गाथां आहेत. या ८४ हजार गाथांचे हिंदू धर्मामध्ये 'चौर्‍यांशी लक्ष योनी' झाले. आणि '८४ सिद्धी' म्हणून नाथ संप्रदायात रुजल्या. बौद्ध धर्म लोप पावताना त्याचे तत्त्वज्ञान नाथ संप्रदायात जाऊन स्थापित झाल्याचा कादरी विहार हा एक मोठा दुवा आहे. तेंव्हा पासून ते आजतागायत बुद्ध तत्वज्ञान नाथ संप्रदायात गुप्तरीत्या तग धरून राहिले आहे. 


मच्छिंद्रनाथ यांनी शैव नाथपंथ स्थापित केला. हठयोगाचे ते जाणकार होते. १० व्या शतकात ते कादरीका बौद्ध विहार येथे शिष्य गोरखनाथांबरोबर आले. पातंजली योग याची सुधारीत आवृत्ती कुंडलिनी जागृती पद्धत त्यांनी विकसित केली. भारतात तोपर्यंत बुद्धांच्या मूळ ध्यानधारणा साधनेत अनेक बदल झाल्याने तिची शुद्धता लोप पावली होती. मात्र भारताबाहेरील देशात ती शुद्ध स्वरूपात टिकून राहिली. नाथ संप्रदायात वर्णद्वेष आढळत नाही. नाथ संप्रदायाचे 'रुपनाथ' नावाचे एक महत्त्वाचे स्थळ मध्यप्रदेशात आहे. तेथे सम्राट अशोक राजाचा शिलालेख आहे. दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांच्यात सलोख्याचे संबंध आढळतात. नवनाथामध्ये (९ नाथ) प्रबुद्ध, पिप्पलायान, द्रुमिल अशी बौद्ध नावे आढळतात. नाथ संप्रदायात योग आणि ध्यान उपासना महत्वाची मानली गेली आहे.


इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात सम्राट अशोकाने धम्मप्रसारा करिता पाठविलेले स्थाविर धम्मरक्खित हे बनवासी येथेच आले होते. बौद्ध धर्मातील महायान पंथामध्ये हरिती देवी सुपीकतेचे, सुफलतेचे प्रतीक मानले गेले असून ती मुलांसोबत दिसून येते. मलनाड या कर्नाटक किनारपट्टीतील स्थळी तिचे शिल्प आढळले आहे. गोकर्ण, शृंगेरी, कोल्लूर अशा अनेक ठिकाणी पुरातन बुद्धमुर्त्या सापडल्या आहेत. विशेष करून दक्षिण कन्नडा आणि उडुपी भागात अनेक देवालये ही पूर्वीची बौद्ध विहार स्थळे असल्याचे दिसून येत आहेत. प्राध्यापक मुरुगेश यांनी सांगितले की अनेक विहारांचे रूपांतर हिंदू मंदिरात झालेले आढळते. येथे तिसऱ्या शतकात आलेला बौद्धधर्म हा दहाव्या शतकापर्यंत टिकून होता. इ.स. ९६८ मधील नोंदी नुसार 'मंगलोर' शहराचे नाव 'मंगलपुरा' असल्याचे आढळले आहे.


कर्नाटकातील किनारपट्टी भागात होनावर तालुक्यात शरावती नदीमुळे तयार झालेले हायगूंडा नावाचे बेट आहे. तेथे जाण्यास आता नुकताच पूल बांधला आहे. यापूर्वी तेथे बोटीने जाता येत असे. मात्र या बेटावर अद्याप रस्ते नाहीत. तिथे काही क्षतिग्रस्त झालेल्या पुरातन बुद्धमूर्ती आढळल्या आहेत. बनवासी पासून हे बेट ७० कि.मी. दूर आहे. या बुद्धमूर्ती तीसऱ्या ते पाचव्या शतकातील असाव्यात.दक्षिण भारतातील पश्चिम किनारपट्टी भाग हा एकेकाळी बौद्ध धर्माच्या संस्कृतीने गजबजलेला असावा याला पुष्टी मिळते. त्याबाबत नवीन माहिती उजेडात येत असून अनेकांना संशोधनाचा विषय प्राप्त होत आहे. 


संदर्भ :- https://www.deccanchronicle.com/nation/in-other-news/051117/sunday-story-the-buddha-towers-in-karnatakas-coast-too.html


---- संजय सावंत ( नवी मुंबई )


⚛⚛⚛


Tuesday, 23 August 2022

बोधिसत्व पद्मपाणि आणि अजिंठा

 *बोधिसत्व पद्मपाणि आणि अजिंठा*

 Bodhisatwa Padmapani of Ajanta 


भारतातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांना अंकित केल्याचे दिसून येते. बुद्ध पदाला पोहोचण्यापूर्वी अनेक जन्मात बोधिसत्व म्हणून जन्म घेतला पाहिजे असे म्हटले गेलेले आहे. अजिंठा लेणीमध्ये लेणी क्रमांक १ मध्ये बोधिसत्व पद्मपाणी यांचे भित्तीचित्र आहे. आणि ते सर्व जगभर प्रसिद्ध पावलेले आहे. ज्याने हातात कमळ धरलेले आहे तो बोधिसत्व पद्मपाणि होय. इ.स.२-३ ऱ्या शतकातील भारतीय चित्रकलेला  अजरामर करणाऱ्या या अप्रतिम सुंदर भित्तिचित्राने जगातील सर्व कलाप्रेमींना संमोहित केलेले आहे. भारतामध्ये अनेक लेण्यांच्या भित्तीचित्रात किंवा शिल्पांमध्ये पद्मपाणी आणि वज्रपाणी आपल्याला पाहायला मिळतात. पद्मपाणिच्या हातात देठासकट कमळपुष्प असते व दुसऱ्या हाताने उपासकांना संरक्षण देत आहे असे दाखविलेले असते तर वज्रपाणी बोधिसत्वाच्या उजव्या हातात शंख असतो व डाव्या हातात वज्र असते. कधी कधी त्यांना तीन डोकी आणि सहा हात दाखविलेले असतात. शक्ती नावाची स्त्री त्याच्या शेजारी बसलेली असते. 


अजिंठ्याच्या चित्रशैली आधी बुद्धांच्या जीवनातले प्रसंग पाषाण शिल्पाद्वारे कोरण्याचा प्रघात दिसून येत होता. पण या शिल्पकारानां जागेच्या मर्यादेमुळे चौकटी बाहेर जाता येत नव्हते. आवश्यक ते हावभाव शिल्पांच्या चेहऱ्यावर दाखवता येत नव्हते. आणि म्हणूनच अजिंठा लेण्यांमधील भित्तीचित्रांना पाहताना त्याकाळच्या चित्रकारांनी आपली कलाकृती अधिक वेधकपणे चित्तारली असल्याचे आढळते. मानवी स्वभावाचे विविध पैलू, प्राणी, प्रतीके, स्त्रीयां, राजघराण्यातील व्यक्ती आणि जातक कथा यातून बुद्धांचे चरित्र उलगडण्याचा प्रयत्न चित्रकारांनी केलेला दिसतो. थेरवादी पंथामध्ये बोधिसत्व म्हणजे अष्टांगिक मार्गाने चालून बुद्धत्व प्राप्तीच्या अगदी जवळ पोहोचलेली व्यक्ती आहे तर महायानी विचारसरणीतील बोधिसत्व हा प्राणीमात्रावर उपकार करणारा, त्यांना मदत करणारा, आणि सर्वांचा हितचिंतक आहे. तो स्वतः बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही. 


वास्तविक आपण सर्व थेरवादी बौद्ध परंपरा पाळतो. त्रिपिटकास महत्त्व देतो. परंतु आपल्या आजूबाजूस असणाऱ्या लेण्यांमधून आपल्याला असे दिसून येते की महायान पंथाचा देखील विकास खूप झाला होता. या महायन पंथाच्या संस्कृत ग्रंथाबरोबर अनेक हिंदू संस्कृत ग्रंथांची रचना दुसऱ्या तिसऱ्या शतकात करण्यात आली. अनेक देवदेवतांचा मूळ उगम महायान पंथात झाला होता. त्याच देवदेवता आज इतर धर्मात विविध नावांनी रूढ झालेल्या आढळून येतात. मंजुश्री, वज्रपाणी, तारा, प्रज्ञापार्मिता, मारीची, जांबाल, त्रैलोक्य विजय, हरिती, मैत्रेय, वसुंधरा, विश्वपाणि, ज्ञानकेतू, घंटापाणि, सरस्वती, अपराजिता, लोचना, पांडुरा अशा अनेक देवता यक्ष, किन्नर, गरुड, नाग यांचे सोबत विराजमान झाल्याचे दिसून येतात. अजिंठ्यात दाखविलेला बोधिसत्व पद्मपाणि हा अजानबाहू, गोरा, रुंद कपाळ आणि भरदार छाती असलेला असून चेहऱ्यावर सोज्वळ भाव आहेत. डोक्यावर रत्नजडित मुकुट असून हातात निळसर पांढऱ्या रंगाचे कमल पुष्प धरलेले आहे. त्याच्या नेसलेल्या वस्त्रावरून त्या काळातील वस्त्रप्रावर्णाची पद्धत लक्षात येते. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक वैशिष्ट्यपूर्ण लय प्राप्त झाल्यामुळे हा पद्मपाणी अधिकच आकर्षक आणि प्रसन्न दिसतो. मात्र या पद्मपाणीची राणी सावळ्या रंगात रंगवली गेली आहे. तरीही अजिंठ्याची कृष्ण सुंदरी म्हणून ओळखली जाणारी तिची प्रतिमा कमालीची सुंदर आणि कमनीय देहबांध्याची आहे. या निमित्ताने विष्णुदास नाम्याची स्वामिनी देखील काळी असल्याचे अभंगात नमूद केलेले आठवते. 


बोधिसत्व पद्मपाणि यांच्या बद्दल विस्तृतपणे वाचायचे असल्यास २२ एप्रिल २०१९ रोजीचा साप्ताहिक सकाळचा अंक वाचावा. त्यातील राधिका टिपरे यांचा बोधिसत्व पद्मपाणि वरील लेख अतिशय उत्कृष्ट आहे. सन १९७५ मध्ये नववीत असताना अजिंठा  लेण्याला आई-वडिलांसोबत प्रथम भेट दिली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना अनेकदा आजोबा, मामा आणि मित्रांबरोबर लेण्यांचे दौरे झाले. प्रत्येक दौऱ्यात नवनवीन माहिती मिळत गेली. अजिंठ्याच्या बरोबर औरंगाबाद लेण्यांचे दर्शन देखील मनावर कायम कोरले गेलेले आहे. तिथल्या बोधिसत्व पद्मपाणि शिल्पाला तर विसरू शकत नाही इतका त्याचा ठसा मनावर उमटला आहे. तरी औरंगाबादला गेल्यास त्या जिल्हयातील सर्व लेणी पुन्हा नव्या अभ्यासू नजरेने पहा. शिल्पांबरोबर भित्तीचित्रांचा देखील अभ्यास करा. त्यात दडलेली अजून नवीन माहिती तुम्हांस प्राप्त होईल. जगभर अजरामर झालेल्या या कलाकृतींना साकारलेल्या सर्व अनामिक कलाकारांना मानाचा मुजरा. 


--- संजय सावंत ( नवी मुंबई )


🟨🟩🟦🟨🟩🟦







Sunday, 21 August 2022

बुद्धजन्म आणि असितमुनि

 *बुद्धजन्म आणि असितमुनि*

Birth of Buddha and Asit Muni


बौद्ध साहित्यात बुद्ध जन्माची गोष्ट ही अतिशय सुंदर आणि हृदयगम्य आहे. समर्पक आहे. विचार प्रवर्तक आहे. एका महान व्यक्तिरेखेचा जन्म होतो तो सर्वसाधारण माणसाप्रमाणे नाही. निसर्ग सानिध्यात माता शालवृक्षाची फांदी पकडून भूमीला पावलांनी स्पर्श करून उभी आहे. अशा अवस्थेत पूर्व दिशेस सन्मुख होऊन खुल्या वातावरणात सिद्धार्थ बालकाचा जन्म झाला. हे तात्काळ हिमालयात राहणाऱ्या वयोवृद्ध मुनिनां कळले ज्यांचे वय १२० वर्षे आहे. 


त्यांना उमगले की सृष्टी आनंदाने डोलत आहे. वातावरणात धिरगंभीर तरंग पसरत आहेत. एक महान व्यक्तिमत्व पृथ्वीवर अवतरले आहे. धडपडत ते मुनि तात्काळ उठून तरंगाच्या दिशेने, बालकाचा जन्म जेथे झाला त्या दिशेस चालू लागले. त्यांच्या शिष्यांनी विचारले "मुनिवर्य कुठे चाललात ? थांबा..!" मुनि म्हणाले "मला आता सांगायला वेळ नाही"  शिष्यही गुरूंच्या पाठीमागून बुचकळ्यात पडून चालू लागले. दरमजल करीत ते वयोवृद्ध मुनि अंतःप्रेरणेने कपिलवस्तू येथे शुद्धोधन  राजाच्या राजवाड्यात आले.  राजा शुद्धोधन चकित झाला. एवढे वयोवृद्ध मुनि जे पन्नास वर्षात कुठे गेले नाहीत ते इथे अचानक कसे ? 


आल्याआल्या मुनिनीं विचारले "राजा तुझे बालक कुठे आहे ? त्याचे दर्शन मला घेऊ दे." मुनिंच्या डोळ्यातील आतुरता पाहून ते जन्मलेले बालक मुनिंच्या समोर आणले गेले. त्याला पाहताच मुनिनां परमानंद झाला. जवळ जाऊन बालकास न्याहाळले व त्याच्या पायास स्पर्श करून ते मुनि रडू लागले. राजाच्या काळजाचे पाणीपाणी झाले. काही वाईट भविष्य तर बालकाचे नाही ना ? या काळजीने त्यांनी मुनिंना रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले "काही अघटित घडणार म्हणून मी रडत नाही. मी आता या बालकास पाहीले. त्याचा पुढील उज्ज्वल काळ ही मला समजला. पण आता मी त्याला पूर्ण उमलण्या अगोदर पाहत आहे. हे राजा मी बुद्धाला बालक रूपात बघत आहे म्हणून मी आनंदाने रडत आहे. तसेच त्याला बुद्ध झालेला मी बघू शकणार नाही, म्हणून ही मला वाईट वाटत आहे.  माझे आयुष्य आता थोडे राहिले आहे. बुद्धाने जगाला केलेला उपदेश मला ऐकता येणार नाही. बुद्धामुळे पुढे या जगात अनेक अहर्त होणार आहेत. ज्ञानप्राप्तीचा प्रकाश सर्वत्र पसरणार आहे. राजा चिंता करू नकोस. आनंदी रहा. लाखो वर्षातून एखादा असा बुद्ध जन्माला येतो, जो सर्व मानव जातीला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवितो. विश्वाचे कल्याण करतो." 


बौद्ध साहित्यातील हा प्रसंग खरोखर अद्वितीय आहे. कारण एक महान व्यक्तीमत्व अवतरले आहे, हे त्याच्या आई बापाला कळले नाही परंतु हिमालयात राहणाऱ्या वयोवृद्ध असित मुनी यांना कळले. त्यांची ही दिव्यदृष्टी राजाला बालकाचे भविष्य सांगून गेली. जे ज्ञानी तपस्वी असतात त्यांनाच जगात घडणाऱ्या घडामोडींचे आकलन होत असते आणि त्याप्रमाणे ते मार्गक्रमण करीत असतात. नेपाळमध्ये कपिलवस्तू जिल्ह्यात तिलौराकोट हे ठिकाण शुद्धोधन यांची कपिलवस्तू नगरी असल्याचे मान्य झाले आहे आणि तेथेच असितमुनि यांचा स्तुप देखील मिळाला आहे. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी नेपाळ पुरातत्व खाते, लुम्बिनी प्रशासन आणि डरहॅम युनिव्हर्सिटी UK यांनी तेथे पहिल्यांदाच कपिलवस्तू महोत्सव साजरा केला. आणि ५० हजाराच्या वर पर्यटकांनी तेथे हजेरी लावली.


--- संजय सावंत ( नवी मुंबई ) https://sanjaysat.in

(संदर्भ- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

🔹🔸🔹🔸🔹






Thursday, 18 August 2022

बुद्धापेस्ट

 *हंगेरीयाची राजधानी "बुडापेस्ट'' म्हणजेच मूळची "बुद्धापेस्ट''* 

 Buddhism in Hungary


हा मथळा वाचून चकित झालात ना ? पण काय करणार. सत्य हे कधी ना कधी उघडकीस येतेच.या जगात जो जो इतिहास दडला गेला आहे तो तो हळूहळू उघडकीस येत आहे. अयोध्या इथे नुकतेच सापडलेले पुरावे हे जसे बौद्ध संस्कृतीचे दिसत आहेत तसेच हंगेरीया आणि बुद्धीझमचा गेल्या दोन हजार वर्षापासून संबंध असल्याचे तिथल्या आशियाई संस्कृतीवरून आणि ग्रंथावरून दिसून येत आहे. हंगेरियन भाषा ही वेगळी भाषा असून आजूबाजूच्या देशांसारखी नाही. हंगेरियन भाषा ही मूळ मग्यार लोकसंस्कृतीची भाषा आहे आणि ती आशिया खंडातून आली आहे. बौद्ध भिक्खू जसे रोम पर्यंत गेले तसेच इतर काही भिक्खू सुद्धा तुर्क वरून युरोप खंडात गेले असावेत. फक्त आज त्यांची माहिती आपल्याला ज्ञात नाही. 


हंगेरियन लोक हे मूळचे प्राच्य म्हणजे पूर्वेकडील देशांचे आहेत. हे आता सर्वांनी मान्य केले आहे. इथे प्रचलित असलेल्या चालीरीती, परंपरा, लोककथा आणि अध्यात्मिक गोष्टी या आजही पूर्वेकडील देशांसारख्या आहेत. आजही इथल्या लोकजीवनातून दिसत असलेली बुद्धसदृश तत्वप्रणाली ही हंगेरियन लोकांना अनोळखी नाही. हा भूभाग अठराशे वर्षापूर्वी पूर्वेकडच्या भटक्या जमातींच्या (मग्यार) ताब्यात होता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इथला जिप्सी समाज. मुख्य म्हणजे आशिया खंडातील बौद्ध संस्कृतीचे स्वास्तिक चिन्ह (चार अरिय सत्ये) येथे पुरातत्त्वीय उत्खननात आढळून आले आहे. इथले काही हंगेरीयन लोक शामनिझम पाळीत होते. त्यामुळे बहुतेकांना बौद्ध तत्वे माहीत होती. त्यामूळे अनेकजणांनी  बुद्धिझम अंगीकारला होता. व हे सगळे तिबेटियन व मंगोल वंशीय होते. त्यामुळे बुद्धिझमला इथे पोषक वातावरण तयार झाले. व हळूहळू त्याची भरभराट होत गेली. मात्र दुर्दैवाने या संदर्भातील असलेले सर्व पुरावे (डोंगरावरील स्तूप आणि विहार ) ख्रिस्ती धर्ममार्तंडांनी १० व्या शतकात नष्ट करून टाकले. ८-९ व्या शतकानंतर भारतातही तीच परिस्थिती होती व आताही तीच आहे. परंतू इथले धर्ममार्तंड वेगळे होते व आहेत. इ.स. १२६५ मध्ये हंगेरीच्या राजाने मोठा किल्ला बांधला. पण ख्रिस्ती परंपरेची राजवट असून सुद्धा लोक बुद्धा (बुडा) किल्ला म्हणत असत.


त्यानंतर जवळजवळ १५व्या शतकात बुद्धिझमचा पुन्हा उदय होऊ लागला. प्रा. झोल्टन फेलव्हीनझ यांनी डॉ. टी कार्डोस यांचे पुस्तक The Age of the Humanism in Hangary या पुस्तकाकडे लक्ष वेधले. त्यामध्ये लिहिले होते की गेलोत्ती हा एक तत्ववेत्ता, मानवतावादी कवि आणि भविष्यवेत्ता होता. इटालियन धर्मवेड्या पिसाटांपासून तो पळून आला आणि हंगेरीचा राजा मत्तीहास याकडे आसरा घेतला. तिथे तो राजाबरोबर पूर्वेच्या देशातील बुद्ध आणि त्यांचे तत्वज्ञान यावर चर्चा करीत असे. राजा देखील त्यावेळच्या विद्वानांबरोबर बुद्धांच्या तत्वज्ञानाबाबत चर्चा, वाद-विवाद करीत असे. आणि हे सर्व हंगेरी मधील बुडा किल्ल्यात होत असे. 


त्यानंतर जवळजवळ तीन शतकानंतर अलेक्झांडर सोमा डी कोरस (इ.स. १७८४-१८४२) यांनी भुतकाळातील विस्मरणात गेलेला बुद्धिझम परत जीवित केला. बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तिबेटमधील अनेक पर्वतातील बौद्ध मठांना भेटी देऊन ज्ञान प्राप्त केले. कलकत्ता येथे पाली, संस्कृत, मराठी आणि बंगाली भाषा शिकून त्यातील अनेक शब्दांचे भांडार हंगेरीयन भाषेत आणून रुजविले. त्यामुळे हंगेरीतील काही नावांना भारतीय साज चढविल्या सारखा वाटतो. त्यांचे हे अवाढव्य धम्मकार्य पाहून जपानमधील टोकियो बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीने त्यांना १९३३ साली 'बोधिसत्व' घोषित केले. डॉ. ड्युक हे सोमा डी कोरस यांचे नावाजलेले ग्रंथकार होते. त्यांनी सुद्धा बुडापेस्ट नावाबद्दलची माहिती दिली आहे. डन्यूब नदीच्या पश्चिमेकडील डोंगरावर एकेकाळी स्तूप होते. त्यांना बुडा म्हणत. व नदीच्या पूर्वेकडील खालील भागात लामांची सपाट भागावर घरे असत. त्यांना पेस्ट म्हणत. त्यांचा परिसर हा बौद्ध संस्कृतीने उजळून जात असते. यामुळे बुडापेस्ट नाव हळूहळू रुजले गेले. बुडापेस्ट म्हणजेच Lower of Buddha/ Lower of Gompa यावरूनच तिथल्या भागाचे Buda - Pest नाव अधोरेखित झाले.


Alexander Csoma de Koros यांनी केलेल्या कार्यामुळे बुद्धिझम बाबत लोकांमध्ये आवड निर्माण झाली. तेथील प्राचीन ग्रंथांमधून हे सर्व पुरावे पुढे आले आहेत. सन १९०० ते १९३५ या कालावधीत ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, इटली, डेन्मार्क, पोलंड, अमेरिका आणि रशियामध्ये धम्माचा अभ्यास करणारे अनेक विद्वान तयार झाले. यामुळे बुद्ध तत्वज्ञानावरील विश्वास वाढून बौद्ध कम्युनिटी तयार होऊ लागल्या. पुढे १९३२ नंतर हंगेरीयात बौद्ध संघ स्थापन करण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या छाया गडद होऊ लागल्यावर तो प्रयत्न अयशस्वी झाला. परंतु त्यानंतर जर्मन मातृभूमी असलेल्या पद्मा लामांनी बौद्धसंघ येथे रुजविला व हंगेरीयात बोधिसत्व अलेक्झांडर सोमा डी कोरस यांचे स्वप्न साकार केले. तिबेटियन वज्रयान पंथांची शाखा आर्य मैत्रीय मंडळ इथे २ नोव्हेंबर १९५२ रोजी लामा अनागरिका गोविंदा यांनी स्थापन केली. हंगेरियन बुद्धीष्ट मिशन त्यांच्याबरोबरीने कार्य करीत आहे. आजूबाजूच्या देशात सुद्धा धम्माचे कार्य त्यांच्या शाखा करीत आहेत. १९५६ साली २५०० वी बुद्धजयंती जर्मनी आणि फ्रान्स बरोबरीने हंगेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली. आज हंगेरीमध्ये बौद्ध पंथांच्या अनेक संस्था कार्यरत आहेत. जय भीम नेटवर्क ही तेथील संस्था डॉ.आंबेडकर स्कुल चालवीत आहे. जिप्सी आणि नॉनजिप्सी समुदायात तिचा संपर्क वाढत चालला आहे.


--- संजय सावंत ( नवी मुंबई )

🔹🔸🔹🔸🔹







Saturday, 13 August 2022

सम्राट अशोकाची मुलगी चारुमती

 *सम्राट अशोकाची मुलगी चारुमती* 

'Charumati' the daughter of King Ashoka. 


बौद्ध साहित्यात सम्राट अशोक राजाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बद्दल खूप माहिती वाचण्यात आलेली आहे. परंतु सम्राट अशोक राजाला दुसरीही एक मुलगी होती आणि तिचे नाव चारुमती होते हे जास्त कोणाला ज्ञात नाही. सम्राट अशोक राजास पाच राण्या होत्या, त्या पैकी असंधिमित्रा ही दुसरी होती. तिने अशोक राजापासून दासीला झालेली कन्या दत्तक घेतली होती. तिचे नाव चारुमती होते. ती मोठी झाल्यावर तिचा विवाह नेपाळ येथील देवपाल क्षत्रिय या राजकुमारा बरोबर करण्यात आला. तेव्हापासून चारुमती ही तेथेच राहात होती. 


पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेसुद्धा काठमांडूच्या खोऱ्यात थेरवादी बुद्ध धम्माचा प्रचार केला. अशोक राजाच्या उतारवयात जेव्हा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा श्रीलंकेत स्थायिक झाले होते तेव्हा पित्याची काळजी चारुमतीने घेतली. तसेच त्याच्याबरोबर तिने धम्मयात्रा सुद्धा केली. तिच्या कारकिर्दीत तिने देवपटन येथे स्तुप बांधला तो चारुमती स्तूप म्हणून ओळखला जावू लागला.  मात्र गेल्या हजारो वर्षात तो स्तुप हळूहळू विस्मरणात गेला. पुढे त्याचे नाव धनधोज स्तुप झाले व एक जुनी टेकडी म्हणून त्याची ओळख राहिली. तसेच त्याच्या आजूबाजूस वस्ती वाढल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. पुरातत्व खात्यालासुद्धा चारुमती स्तुप कुठे आहे हे ज्ञात होत नव्हते. 


परंतु २००२ मध्ये धनधोज स्तूपाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले तेव्हा तेथील उत्खननात असंख्य छोट्या स्तूपांच्या प्रतिकृती सापडल्या. तसेच शंभराच्यावर लहान बुद्ध मूर्ती सापडल्या.आणि मुख्य म्हणजे तेथील विटांवर चारू-व- ती असे ब्राम्ही लिपीत कोरलेलेे आढळले. तसेच स्फटिका बरोबर सोने-चांदी यांची किरती, लिच्छवि आणि मल्ल यांच्या काळातील नाणी सापडली. तेथील पुरातत्ववेत्ते प्रकाश दर्नल यांनी सांगितले की विटेवर धम्मचक्राचा ठसा असून, दोन स्वस्तिक चिन्हे व चारुमतीचे नाव आढळल्यामुळे हा महत्वाचा स्तुप इतकी वर्षे दुर्लक्षित कसा राहिला याचे आश्चर्य वाटते. 


श्रीलंकेतील बौद्ध साहित्यात चारुमती स्तूपाबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे नेपाळमध्ये जेव्हा चारुमतीचा स्तुप ओळखला गेला तेव्हा मार्गदर्शनासाठी व नूतनीकरणाच्या देखरेखीसाठी श्रीलंकेतील भिक्खू आले होते. त्यावेळेस केलेल्या आव्हानानुसार प्राप्त झालेल्या दानामधून त्याचे नुतनीकरण केले गेले. आता चारुमती स्तुप हळूहळू  पर्यटकांचे आकर्षण होत आहे.


🙏🙏🙏






Friday, 12 August 2022

गारगोटया व तूप

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_गारगोटया व तूप_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _एके दिवशी भगवान बुद्धांकडे एक तरुण माणूस रडत रडतच आला, बुद्धांनी त्याला विचारले, 'तरुण माणसा, काय झाले? का रडतोस?'_

'भगवान, माझे वृद्ध वडील काळ मरण पावले.'

'खरंच! मग मी काय करू शकतो?  रडून तर काही आपण मरण पावलेल्या व्यक्तीला परत आणू शकत नाही?'

'होय भगवंत, रडून काही माझे येऊ शकणार नाहीत हे मी समजू शकतो. पण भगवान, मी आपल्याकडे एक विशेष विनंती करण्याकरिता आलो आहे. कृपया माझ्या मृत पित्यासाठी आपण काहीतरी करा.'

'अरे ! मी तुझ्या मृत पित्यासाठी काय करू शकतो?'

     *_'भगवंत, नाही म्हणू नका. कृपया काही तरी करा. आपण एवढे सामर्थवान आहात, आपण नक्कीच हे करू शकाल. हे छोटे मोठे धर्मगुरू, पुरोहित, पंडे वगैरे मंडळी मृत माणसाच्या मुक्तीसाठी बरेच कर्मकांड करतात आणि सर्व कर्मकांडाची पूर्तता झाल्यावर मृत माणसासाठी स्वर्गाचे दार उघडले जाते. त्याला स्वर्गात प्रवेश करण्याचा परवाना दिला जातो. भगवान, आपण तर थोर, सामर्थ्यवान आहात. आपण जर माझ्या मृत पित्यासाठी काही कर्मकांड केले तर त्यांना नुसता प्रवेश परवानाच काय, पण स्वर्गात कायम वास्तव्य परवाना पण मिळू शकेल, आपण जरूर काहीतरी कराच.'_*

       _तो बिचारा तरुण इतका भावविवश झाला होता की कोणतीही तात्त्विक चर्चा किंवा तर्कसंगत स्पष्टीकरण तो समजू शकला नसता. त्याला सत्य गोष्टी समजाव्यात यासाठी बुद्धांना दुसराच उपाय अवलंबणे जरुरीचे होते. म्हणून ते त्याला म्हणाले 'ठीक आहे. बाजारात जाऊन दोन मडकी घेऊन ये'._

      _भगवान बुद्ध आपल्या मृत पित्यासाठी काही कर्मकांड करण्यास तयार झालेले पाहून त्या तरुणाला खूप समाधान वाटले. तो धावतच बाजारात गेला दोन मडकी घेऊन आला._

भगवान त्याला महणाले, फारच छान! आता असे कर, एक मडके तुपाने भर'. 

तरुणाने एका मडक्यात तूप भरले.

'दुसरे मडके गारगोट्यांनी भर'.

 तरुणाने तीही कामगिरी पूर्ण केली.

"आता त्यांची तोड़े उत्तम प्रकारे बंद कर.'

त्याने तसे केले. 

"आता ती दोन्हीही मडकी समोरच्या तलावात नेऊन ठेव."

तरुणाने मडकी पाण्यात ठेवल्यावर दोन्हीही मडकी पाण्यात बुडाली. 

      *_"आता एक लांब काठी घेऊन ये व या मडक्यांवर मारून ती फोड" भगवान बुद्धांनी सांगितले._* 

        तरुणाला भगवान बुद्धांनी आपल्या मृत पित्यासाठी केलेले हे आश्चर्यजनक कर्मकांड बघून खूपच समाधान वाटले.

        _आपल्या जुन्या परंपरेप्रमाणे माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा त्याचे मृत शरीर स्मशानात नेत असे. ते शरीर चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला जात असे. *शरीर अर्धवट जळाल्यावर एका भक्कम काठीने त्याचे डोके फोडले जाई. इथे जेव्हा त्याची कवटी फोडली जाई. अशी मान्यता होती की, त्याचवेळी त्याच्यासाठी स्वर्गाचे दार उघडले जाई.* काल माझ्या वडिलांना अग्नी दिला व आज भगवान बुद्धांनी एक रूपक म्हणून ही मडकी फोडावयास सांगितले असणार असे त्या तरुणास वाटले. तो या कर्मकांडामुळे फारच संतुष्ट झाला होता._

        _बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्या तरुणाने एक काठी घेऊन जोरदार फटका मारून, ती दोन्ही मडकी मोठ्या त्वेषाने फोडली. त्याचबरोबर एका मडक्यातले सर्व तूप वर येऊन पाण्यावर पसरून तरंगू लागले. तर दुसऱ्या मडक्यातील गारगोट्या मात्र तळाशीच राहिल्या._

       _त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले, 'छान! तरुण गृहस्था, तुझ्यासाठी एवढे केले. आता तुझ्या त्या तांत्रिकाना, मांत्रिकांना आणि पुरोहितांना बोलाव व अशी प्रार्थना करावयास अगर मंत्र म्हणावयास सांग की, 'हे गारगोट्यांनी, वर या। आणि हे तुपा, तुपा तू मात्र खाली जा, खाली जा.' मला तरी बघू दे हे कसे घडते ते."_

         _'भगवंत! आपण तर माझी थट्टा करायला सुरुवात केलीत. आपण म्हणता प्रार्थनेने तूप खाली जावे वा गारगोट्या वर याव्यात हे कसे शक्य आहे भगवान! गारगोट्या पाण्यापेक्षा जड आहेत, त्यामुळे त्या वर येणे शक्य नाही. त्या खालीच राहणार. त्या वर येऊच शकणार नाहीत. हा तर निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे तूप हे पाण्यापेक्षा हलके असते व ते पाण्यावर तरंगणारच. ते पाण्यात तळाशी राहूच शकणार नाही.'_

     *_'तरुण गृहस्था! तुला तर निसर्ग नियमांची बरीच माहिती दिसते. पण माणसाच्या निसर्ग नियमांना तू कसा समजू शकत नाहीस? जर सर्व आयुष्यात तुझ्या पित्याची कर्मे या गारगोट्यांसारखी जड असतील तर ती त्यांना अधोगतीलाच नेणार. त्यांना कोण वर काढू शकेल? आणि जर त्यांची कर्मे या तुपासारखी हलकी फुलकी असतील तर त्यांना सद्गतीच मिळणार. त्यांना कोण खाली ढकलू शकेल?'_*

       _*जितक्या लवकर आपण निसर्गाचा हा नियम समजू व या नियमांनुसार आपले जीवन जगायला लागू तितक्या लवकर आपण आपल्या दुःखातून क्लेशातून बाहेर येऊ."*_

         *_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

                                *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जगण्याची कला_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १२/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_12.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Thursday, 11 August 2022

भगवा बुध्दो

 *भगवा बुध्दो*


हल्ली आंबेडकराईट बौध्दांमध्ये काही प्रबोधन करणारी मंडळींकडून एक प्रचार पहावयास, ऐकावयास, वाचावयास मिळतो. तो म्हणजे बुध्दांना 'भगवान बुध्द' असे म्हणू नये.  भगवान हा शब्द बुध्दांसाठी वापरणे चुकीचा आहे. 

तो चुकीचा कसा यासाठी ते अनेक तर्कसंगत नसलेले दाखलेही देतात. 


त्यापैकी काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न आपण पाहू. 


१. Budda and His Dhamma या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म कसा ? 


२. बाबासाहेबांनी बुध्दाला भगवान असे कुठे म्हटले आहे ? 


३. पालि शब्दकोषात 'भग' या शब्दाचा अर्थ स्त्री, योनी असा होतो तर 'वान' या शब्दाचा अर्थ तृष्णा असा होतो ? 


४. पालि त्रिपिटकात भगवा हा शब्द ब्राम्हणातून आलेल्या बौध्द भिक्खूकडून त्रिपिटकात घुसडवला आहे. गाथा वंदना ह्या नंतरच्या काळातील आहेत. 

असे प्रश्न निर्माण करून संभ्रम निर्माण केला जातो. 


यांच्या १ल्या प्रश्नाबाबत सांगायचे झाले तर Buddha and His Dhamma या ग्रंथात आपणाला ठिकठिकाणी 'Lord Buddha' असे संबोधलेले दिसून येते. परंतु मूळ इंग्रजी ग्रंथ न वाचता लोक ग्रंथाच्या Title वरचं अडकून पडलेले दिसतात. 


यांच्या दुसऱ्या प्रश्नाबाबत सांगायचे झाले तर बाबासाहेबांनी लेखन व भाषणे खंड १८ मधील ३ऱ्या भागात अनेक भाषणात बुध्दाला 'भगवान बुध्द' असे संबोधलेले दिसते. 


यांच्या तिसऱ्या प्रश्नाबाबत ही लोक पालि शब्दकोष समोर ठेवतात व भगवान या शब्दाची फोड करून भग + वान 

भग - स्त्री, योनी

वान - तृष्णा 

असा सरळसरळ अर्थ घेतात. 

परंतु पालित 'भग' या शब्दाचा अर्थ 'भाग्य' सुध्दा होतो. पालित सहा प्रकारचे भाग्य आहेत.

इस्सरिय - Supremacy

धम्म - Doctrine, Nature's truth

यस - Success

सिरि - Glory

काम - pleasure

पयत्त - Purified


मुळात *'भगवान'* असा पालि शब्द नाही त्यामुळे तो पालि शब्दकोषात भग + वान असा शोधू नये. तो शब्द *'भगवन्तु'* असा असून त्याचाच *'भगवा'* होतो. 


*भगवन्तु = भाग्यवंत*


भग हा 'धातू' असून वन्तु हा 'प्रत्यय' आहे. 


भग

भग + वन्तु = भगवन्तु 


पठमा विभत्ति एकवचन = भगवा


*******

भगवन्तु

भगवन्तु + सि

न्तु change into आ

भगव + आ

भगवा


*कच्चायन व्याकरण*


*सि यो, अं यो, ना हि, स नं, स्मा हि, स नं, स्मिं सु.*


का च पन तायो विभत्तियो? सि, यो इति पठमा, अं, यो इति दुतिया, ना हि इति ततिया, स, नं इति चतुत्थी, स्मा, हि इति पञ्चमी, स, नं इति छट्ठी, स्मिं, सु इति सत्तमी.

*******


*मोग्गल्लानब्याकरणं, दुतियो कण्डो स्यादि*


*न्तुस्स.*


सिम्हि न्तुस्स टा होति, गुणवा.

********


वरील कच्चायन व्याकरण व मोग्गलान व्याकरणातून आपणास कळण्यास मदत होते की *भगवन्तु चा भगवा* कसा होतो. 


आता ह्यांच्या चौथा प्रश्न 'भगवा' हा शब्द ब्राम्हणातून आलेल्या बौध्द भिक्खूंकडून त्रिपिटकात घुसडवला गेला आहे हे पाहू. मुळात हे लोक पालि भाषा व त्याच्या वाड़्मयाच्या अभ्यासाकडे कानाडोळा करणारे असतात. इकडे ते कधीच वळत नाहीत अथवा वळलेले नसतात त्यामुळे हा गोंधळ निर्माण होतो. कोणत्या ब्राम्हणातून आलेल्या भिक्खूने भगवा हे शब्द घुसडवले हे लोक सिध्द करू शकतात काय? तीसरी संगिती मोगलीपुत्त यांच्या अध्यक्षतेखाली झाली ते ब्राम्हण होते काय? चौथी श्रीलंकेत झाली, पाचवी सहावी ब्रम्हदेशात, तिकडे विद्वान भिक्खू नव्हते काय ? मूळात संगिती कश्याप्रकारे होते आणि बुध्दवचन कशी संरक्षित ठेवली जातात याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 

भगवान बुध्दांच्या हयातीतच महामंगल सुत्त, करणीय मेत्त सुत्त, पराभव सुत्त इ. गाथांची वंदनांची रचना झाली. या गाथांमध्ये आपल्याला *भगवा* शब्द सापडतो. त्याचा समावेश त्रिपिटकात आहे. 


भगवा कोणाला म्हटले जाते याबाबत पालि वाड़्मयातूनच काही उदाहरणे घेऊ.


*भग्गरागो भग्गदोसो, भग्गमोहो अनासवो.*

*भग्गास्स पापका धम्मा, भगवा तेन वुच्चती”ति..*


ज्याने आपला राग, दोष, मोह, आसवं नष्ट केले आहेत. 

ज्याने आपले पापधर्म काढून टाकले आहेत, त्यालाच भगवा म्हणतात.


*“भगवाति वचनं सेट्ठं, भगवाति वचनमुत्तमं.*

*गरु गारवयुत्तो सो, भगवा तेन वुच्चती”ति*


भगवन्ताचे वचन श्रेष्ठ असतात, भगवन्ताचे वचन उत्तम असतात. 

तो गुरू गौरवाने युक्त असतो, त्यालाच भगवा म्हणतात.


*भाग्यवा भग्गवा युत्तो, भगेहि च विभत्तवा.*


*भत्तवा वन्तगमनो, भवेसु भगवा ततो”ति*


ते भाग्यवंत आहेत, ते भग्न करणारे आहेत, ते भग ( भाग्य ) युक्त आहेत. 

ते सतत उत्पन्न होण्यास नाकारणारे आहेत, म्हणून ते 'भगवा' आहेत. 


*भगी भजी भागी विभत्तवा इति,*


*अकासि भग्गन्ति गरूति भाग्यवा.*


*बहूहि ञायेहि सुभावितत्तनो,*


*भवन्तगो सो भगवाति वुच्चती”ति..*


भाग्यवंत, सोबत असणारा, भागी, विभक्त करणारा, ज्याने भग्न केले आहे, तोच गुरू 'भगवा' आहे. 

ज्याने स्वतला अनेक मार्गाने संपूर्ण केले आहे, जो निर्वाणापर्यंत पोहचला त्याला 'भगवा' म्हणावे. 


[BLESSED]

53. Blessed (bhagavant) is a term signifying the respect and veneration accorded

to him as the highest of all beings and distinguished by his special qualities.21

Hence the Ancients said:

“Blessed” is the best of words,

“Blessed” is the finest word;

Deserving awe and veneration,

Blessed is the name therefore.


- Visuddhimagga.


टिप :- सदर लेख कोणा एका व्यक्तीला उद्देशून द्वेषाने लिहिलेला नसून ज्यांना ज्यांना 'भगवान' या शब्दाबद्दल आक्षेप आहे अश्यांसाठी माहीतीपर लिहिला आहे. 


- अरविंद भंडारे

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट

Monday, 8 August 2022

समस्येचे मूळ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_समस्येचे मूळ_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          *_भगवान बुद्ध म्हणत, 'दुःखाचे मूळ अगदी तळातून शोधा'.' त्यांना मुक्ती मिळाली त्या रात्री ध्यानाला बसतांना त्यांनी दृढ निश्चय केला होता की दुःख कसे निर्माण होते व ते निवारण्याचा मार्ग कोणता ह्याचा शोध घेतल्याशिवाय ध्यानातून उठायचेच नाही..._*

                       *_१) दुःखाची स्पष्टता_*

              _दुःखाचे अस्तित्व भगवान बुद्धांनी अगदी स्पष्ट जाणले. दु:खाचे अस्तित्व है कितीही नीरस असले तरी ते अटळ असे सत्य आहे. आयुष्याची सुरुवातच दुःखातून होते. आपण जेव्हा मातेच्या गर्भात असतो तेव्हा तेथील अवस्थेचे स्मरण किंवा ज्ञान आपल्याला नसते. पण आईच्या पोटातून जेव्हा आपण बाहेर येतो, तेव्हा आपण रडतच येतो सर्वसाधारण अनुभव असा आहे. जन्म हा एक फार मोठा आघात आहे._

             _जन्माला आलेल्या आपल्या सर्वांना दुःख, आजारपण आणि म्हातारपण यांना सामोरे जावे लागणारच आहे. पण तरीसुद्धा आपण कितीही आजारी असलो, कमजोर झालो असलो, वृद्धापकाळामुळे जर्जर झालेलो असलो तरी देखील आपल्यातील कोणालाही मृत्यू नको असतो. कारण मृत्यू हे फार मोठे दुःख आहे._

              _सगळ्याच सजीव प्राण्यांना ही दुःखे सहन करावीच लागतात आणि आपल्या आयुष्य संक्रमणात आणखीही अनंत मानसिक व शारीरिक दुःखे भोगावी लागतात. अनेक दुःखात आपण अडकतो व सुखापासून वंचित होतो. *आपल्याला जे हवे असते ते मिळत नाही. उलट जे नको असते तेच आपल्या वाट्याला येते. ह्या सर्व घटना म्हणजेच दुःख !*_

            _थोडा खोलवर विचार करणाऱ्या कोणालाही या घटनांमधील वरवरची दुःखे सहज समजू शकतात, परंतु बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांचे मात्र या बुद्धीच्या मर्यादितील तुटपुंज्या स्पष्टीकरणाने समाधान झाले नाही. दुःखाचे खरे स्वरूप अनुभवण्यासाठी त्यांनी अंतर्मनात शोध घेणे चालूच ठेवले. त्यांना असे दिसून आले की *पाचही स्कंधांची आसक्ती हेच दुःखाचे खरे कारण आहे. अतिशय सूक्ष्म स्तरावर विचार केल्यास असे आढळते की, आपल्या शरीर व मनाबद्दल आपण प्रत्येकाने निर्माण केलेली अमर्याद आसक्तीच ह्या दुःखाला कारणीभूत आहे. आपले शरीर आणि विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार यांनी युक्त असे मन, ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया असूनसुद्धा ह्या 'मी' बद्दल आपल्याला प्रचंड आसक्ती असते. जे प्रत्यक्षात क्षणोक्षणी बदलत असते. अशा काल्पनिक असत्य 'मी' ला आपण कितीतरी बांधून घेत असतो. त्यात इतके गुंतून राहत असतो की ज्याचा परिणाम केवळ दुःखातच होतो.*_

                    *_२) आसक्ती_*

            _आसक्तीचे अनेक प्रकार आहेत. प्रथम शारीरिक सुखात आनंद शोधणाऱ्या सवयीबद्दल आसक्ती वाटते. मद्य पिणारा, मद्यप्राशनाने आपली व्यसनाधीनता वाढते हे माहित असूनसुद्धा मद्य पिण्यामुळे होणाऱ्या सुखद संवेदनांचा अनुभव घेण्यासाठी मद्य पिणे पसंत करतो. त्याचप्रमाणे आपण सुखद संवेदनांच्या अभिलाषेच्या आधीन जातो. *एक इच्छा पूर्ण होते न होते तोच आपले मन दुसऱ्या इच्छेच्या मागे धाव घेते. कोणत्याही वस्तूची अभिलाषा पूर्ण झाल्यावर ज्या सुखद संवेदना होतात त्या मिळवण्यासाठी ही हाव वाढत जाते.* वस्तू कोणती. ही गोष्ट दुय्यम ठरते. आपल्याला हव्या असतात त्या सुखद संवेदना. आणि ही हाव, कधीही तृप्त न होणारी व्यसनाधीनता निर्माण करते. ज्याप्रमाणे मद्य पिणारा आपल्याला झिंग यावी म्हणून प्रत्येक वेळेला आपला डोस वाढवीत जातो. अगदी त्याचप्रमाणे सुखाची तृप्ती करण्यासाठी ही हाव हळूहळू वाढतच जाते. अशाप्रकारे अनेक गोष्टी प्राप्त होऊन सुद्धा आपण तृप्त होतच नाही व जोपर्यंत हाव संपत नाही तोपर्यंत आपण आनंदी, सुखी होणार कसे ?_

                _*दुसरी मोठी आसक्ती म्हणजे 'मी', अहं विषयी आपण निर्माण केलेली आपली प्रतिमा.* आपणा सर्वांना हा 'मी' जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती वाटते. लोहचुंबकाला लोहकण चिटकून रहावेत तसेच आपण ह्या 'मी' मध्ये गुंतून, अडकून राहतो. लोहचुंबक जसा आपल्या भोवती असणाऱ्या लोहकणांना आपण केंद्रबिंदू मानून पाहिजे तसे आपोआपच खेचून घेतो, अगदी त्याच प्रमाणे आपल्या जन्मजात प्रेरणेने आपण आपल्या भोवताली आपल्या आवडीप्रमाणे सभोवतालचे जग गोळा करतो. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जवळ करतो व न आवडणाऱ्या दूर करतो. पण जगात राहणाऱ्या लोकांत आपण एकटेच नसतो. आपल्या ह्या 'मी' च्या आशा-आंकाक्षा दुसऱ्या 'मी' शी घासणारच व त्यातून संघर्ष हा निर्माण होणारच. एकाने तयार केलेली रचना ही दुसऱ्याच्या रचनेशी घासून कुरबुरी निर्माण करणारच. ह्या दुसऱ्या 'मी' मुळे आपणही आकर्षण व अपकर्षण याची शिकार होणारच! या सर्वाचा परिणाम असमाधान व दुःख ! त्यांचा सामना आपल्याला टाळता येणार नाही._

             _*पुढे आपली ही आसक्ती आपल्यापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचे क्षेत्र 'मी' व 'माझे' पर्यंत वाढते.* 'मी' ची प्रतिमा जपण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्या जवळच्या असतात, ज्यांच्याशी आपला संबंध येतो, ज्यांची आपल्याला मदत होते, त्या साऱ्यांबद्दल आपण प्रचंड आसक्त होतो. है "माझे जर नित्य असते तर ह्या आसक्तीमुळे कोणत्याही समस्या निर्माण झाल्या नसत्या. कारण ह्यांचा उपभोग या 'मी' ला शेवटपर्यंत घेता आला असता. पण दुर्दैवाने तसे नसते. त्या 'मी' ला 'माझे' पासून एक ना एक वेळेस दूर जावे लागते. *निरोपाची केव्हा ना केव्हा तरी अटळ आहे आणि त्या वेळेस 'माझे' बद्दलची, 'मी' ची आसक्ती जेवढी जास्त तेवढे जास्त दुःख ह्या 'मी' ला होणार.*_

           _*आसक्तीची पुढची पायरी 'मी', 'माझे' वरून 'माझे विचार', 'माझ्या श्रद्धा यांचे रूप घेते.* 'ह्या श्रद्धा, हे विचार ह्यात तथ्य असो वा नसो. ह्या कितीही योग्य वा अयोग्य असोत, आपण जर यांचेबद्दल आसक्ती निर्माण केली तर आपण नक्कीच दुःखी होणार. आपणा सर्वांची अशी खात्री असते की आपले स्वतः विचार, आपल्या परंपरा, ह्याच सर्वात श्रेष्ठ आहेत व त्यावर जर कोणी टीका केली तर ती ऐकून देखील आपण अस्वस्थ होतो. आपण इतरांना आपले स्वतःचे विचार, आपल्या परंपरा, ह्याच सर्वात श्रेष्ठ आहेत व त्यावर जर कोणी टिका केली तर ती ऐकून देखील आपण अस्वस्थ होतो. आपण इतरांना आपले विचार, आपल्या श्रद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो व त्यांनी जर त्या स्वीकारल्या नाहीत तर आपण अस्वस्थ होतो. परंतु प्रत्येक माणसाला त्याचे स्वतःचे विचार त्याच्या स्वतःच्या श्रद्धा असतात हे मात्र आपण विसरतो. कोणते विचार बरोबर आहेत, योग्य आहेत याची चर्चा देखील निरर्थक असते. त्यापेक्षा *सर्व पूर्वग्र बाजूला सारून सत्य काय आहे याचा शोध घेणे फायद्याचे नाही का? पण आपले विचार व श्रद्धा यांच्या बद्दलची आसक्ती आपल्याला हे करू देत नाही व आपणास दुःखी बनवते.*_

             _*अजून एक आसक्ती असते, ती आपल्या 'संप्रदाय व कर्मकांडाविषयी!" या गोष्टींचा मूलभूत अर्थ समजावून घेण्यापेक्षा आपण त्याच्या बाह्य अवडंबरांनाच, वरपांगीपणालाच जास्त महत्त्व देऊन जो कोणी असे कर्मकांड किंवा आचरण करीत नाही तो माणूस खरा धार्मिक नाही असेच मानतो.* खऱ्या गाभ्याशिवाय कर्मकांड म्हणजे निव्वळ रिकामे कवच होय आपण विसरतो. राग, लोभ वासना व दुर्भावना यांनी भरलेल्या अंतःकरणाने केलेली ईश्वराची भक्ती, प्रार्थना किंवा कर्मकांड हे निरर्थक, कवडीमोलाचे व कुचकामी असते. आपणास जर खरे धर्मनिष्ठ व्हावयाचे असेल, आपला धर्माकडील कल विकसित करावयाचा असेल, तर आपले अंतःकरण शुद्ध केले पाहिजे. ते सर्वाबद्दलच्या करुणेने भरून घेतले पाहिजे. संप्रदायाची आसक्ती आपल्याला त्या कर्मकांडापासून दूर होऊ देत नाही व आपण धर्माच्या खऱ्या गाभ्यापासून वंचित राहून त्याच्या निव्वळ कवचाला चिकटून राहतो. *धर्माचे खरे सार न समजल्यामुळे नेहमी दुःखीच राहतो.*_

       *_आपल्या सर्व दुःखांची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या आसक्तीमुळे होते, आसक्ती व दुःख यांची वाटचाल बरोबरच होत राहते._*


          *_३) नियमबद्ध उत्पत्ती [प्रतीत्य-समुत्पाद ]_*

*_दुःख निर्माण करणारी कारणे व परिणाम यांची साखळी_*

                *_आसक्ती कशामुळे निर्माण होते ? आसक्ती कशी निर्माण होते ? तर आवड व नावड यांच्या क्षणिक मानसिक प्रतिक्रियेमुळे आसक्ती निर्माण होते असे बोधिसत्व-सिद्धार्थ गौतम यांना स्वतःच्या स्वभावाचे विश्लेषण करीत असतांना आढळले. क्षणाक्षणाला वाढणाऱ्या व प्रगटणाऱ्या सुप्त मनातील प्रतिक्रियाच प्रचंड शक्तिशाली राग व द्वेष यांच्या द्वारे आसक्ती निर्माण करतात. क्षणिक प्रतिक्रियांचेच प्रगट रूप म्हणजे आसक्ती आसक्ती हेच दुःखाचे तात्कालिक कारण आहे._*

           _आवड व नावड यांची प्रतिक्रिया कशी निर्माण होते ? जरा खोलवर शोध घेतला तर असे आढळेल की आवड व निवड ही संवेदनांची अपत्ये आहेत. सुखद संवेदनांमुळे आपल्याला आवड निर्माण होते, तर नावडीचे कारण आहे दुःखद संवेदना. सुखद संवेदना हव्याहव्याशा वाटतात तर दुःखद संवेदना नकोशा होतात._

          *_संवेदना म्हणजे काय ? त्या कशा निर्माण होतात? आपल्या स्वतःचे परीक्षण करतांना भगवान बुद्धांना असे आढळले की, त्या संपर्कामुळे, विषय-स्पर्शामुळे निर्माण होतात. दृश्यांचा डोळ्यांशी संपर्क, आवाजाचा कानाशी संपर्क, गंधाचा नाकाला होणारा संपर्क, जिभेला चवीचा होणारा संपर्क, त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा शरीराला होणारा संपर्क, मनाचा विचारांशी, भावनेशी, भूतकाळाच्या आठवणी, भविष्याची स्वप्ने किंवा कल्पना ह्यांच्याशी होणाऱ्या संपर्कामुळे संवेदन निर्माण होतात. पाच ज्ञानेंद्रिये व मन यांच्या द्वारे आपण सर्व जगाचा अनुभव घेतो कोणतीही वस्तू किंवा घटना ह्याचा त्या त्या वस्तूच्या ज्ञानेंद्रियांशी व मनाशी जेव्हा संबंध येतो तेव्हा त्या अनुभवानुरूप सुखद किंवा दुःखद संवेदना निर्माण होतात._*

             _प्रथमतः स्पर्श किंवा संबंधच का येतो? ह्याचे परिशीलन करीत असतांन भगवान बुद्धांना असे आढळले की, सहा ज्ञानेंद्रिये - पाच शारीरिक व एक मन जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत त्यांचे त्या त्या विषयाचे स्पर्श अनिवार्य आहेत. जग हे दृश्य, आवाज, गंध, चव, स्पर्श, असंख्य विचार व चिंतन अनेक घटनांनी भरलेले आहे. जोपर्यंत आपली ग्रहणशक्ती कार्यरत आहे, तोपर्यंत स्पर्शसंबंध अटळ आहे._

              _ही सहा ज्ञानेंद्रिये अस्तित्वात का येतात? कारण त्याचे अस्तित्व हे मन [नाम] व शरीर [रूप] यांच्या जीवन प्रवाहासाठी अत्यावश्यक आहे. तर मग मन व शरीर यांचा जीवन प्रवाह का असतो? आणि तो कशामुळे वाहतो? आपल्या प्रखर तपश्चर्येत सिद्धार्थ गौतमांना असे आढळले की, *मन व शरीर यांचा जीवन प्रवाह विज्ञानामुळे निर्माण होतो.* ही ज्ञानशक्तीच ज्ञाता व ज्ञान, कर्ता व कर्म "मी" व इतर अशी जगाची विभागणी करते आणि हा फरकच मी कोण आहे याची विशिष्टता आणतो. प्रत्येक क्षणी विज्ञान निर्माण होते व विशिष्ट शारीरिक व मानसिक आकार घेते. प्रत्येक पुढल्या क्षणी हे विज्ञान नवे वेगळे रूप धारण करते. आपल्या संपूर्ण आयुष्यभर जाणिवेचा बदलता प्रवाह वाहत असतो व सरतेशेवटी मृत्यू येतो. परंतु विज्ञान तेथेही संपत नाही. मधे कोठेही न थांबता पुढच्या क्षणी ते दुसरा आकार घेते, दुसरे रूप घेते. विज्ञानाचा हा प्रवाह एका अस्तित्वातून दुसऱ्यात, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात असा अखंड वाहत असतो._

            _पुन्हा प्रश्न येतोच की, हा *विज्ञानाचा प्रवाह कशामुळे वाहतो? हा प्रवाह संस्कारांना आधार बनवून निर्माण होतो. मन हे सतत संस्कार बनवतच असते आणि प्रत्येक प्रतिक्रिया [ संस्कार ] ही विज्ञानाच्या प्रवाहाला प्रेरणा देते व त्यामुळेच विज्ञान पुढच्या क्षणापर्यंत टिकते. प्रतिक्रिया जेवढी शक्तिशाली, तेवढीच शक्तिशाली प्रेरणा ती उत्पन्न करते.* छोटीशी क्षणिक प्रतिक्रिया थोडावेळच विज्ञानाचा प्रवाह चालवू शकते. पण जेव्हा आवड व नावड यांच्या प्रतिक्रिया तीव्र स्वरूप धारण करतात, विकसित होतात, तेव्हा त्या मात्र दीर्घकाळ चालणारा विज्ञानाचा प्रवाह, काही सेकंद, काही मिनिटे, काही तास असा टिकवू शकतात. आवड व नावड ह्या प्रतिक्रिया अधिक तीव्रतर झाल्यास त्या काही दिवस, महिनेच काय पण वर्ष वर्ष सुद्धा प्रवाह टिकवू शकतात. आणि काही प्रतिक्रियांची पुनरावृत्ती होत होत त्या तीव्रतम होत गेल्या, वाढत गेल्या तर त्यांची ताकद विज्ञानाचा प्रवाह एका क्षणातून दुसऱ्या एका तासातून दुसऱ्या एका दिवसातून दुसऱ्या एका वर्षातून दुसऱ्यातच काय पण एका जन्मातून दुसऱ्या जन्मात वाहवण्यासही पुरेशी ठरते._

           *_ह्या प्रतिक्रिया, क्लेशसंस्कार कशामुळे निर्माण होतात? खोलवर सत्याचे निरीक्षण करतांना बोधिसत्वांना असे आढळले की, अविद्येमुळेच प्रतिक्रियांचा जन्म होतो. आपण प्रतिक्रिया करतो आहोत याचे भानच आपल्याला नसते.* ज्यावर आपण प्रतिक्रिया करत असतो. त्याच्या खऱ्या स्वरूपाचे आपल्याला ज्ञानच नसते. आपल्या क्षणभंगुर व्यक्तिनिरपेक्ष अस्तित्वाची आपल्याला कल्पनाच नसते. आणि त्याबद्दलच्या आसक्तीमुळे आपल्याला दुःखाखेरीज काहीच मिळत नाही. आपल्या खऱ्या अस्तित्वाच्या अविद्येमुळेच आपण अंध प्रतिक्रिया करतो. आपण प्रतिक्रिया करतो आहोत ह्याचेही भान न बाळगता आपल्या अंध प्रतिक्रिया नुसत्या सुरूच नसतात, तर त्या एक सारख्या तीव्रतर होत जातात. आणि याप्रमाणे आपण अविद्येमुळे या सवयीचे गुलाम बनतो. या प्रकारे दुःख चक्र सतत फिरतच राहतेः-_

*_अविद्येच्या आधारे संस्कार निर्माण होतात._*

*_संस्कारांच्या आधारे विज्ञान निर्माण होते._*

*_विज्ञानाच्या आधारे मन [नाम] व शरीर [रूप] यांची जीवनधारा निर्माण होते. _*

*_मन व शरीर ह्या आधारे सहा इंद्रिये अस्तित्वात येतात._* 

*_सहा इंद्रियांच्या आधारे [विषय] स्पर्श निर्माण होतो._* 

*_स्पर्शाच्या आधारे संवेदना निर्माण होते._* 

*_संवेदनांच्या आधारे तृष्णा निर्माण होते._*

*_तृष्णेच्या आधारावर उपादान [आसक्ती] निर्माण होणारच._* 

*_उपादानाच्या आधारे 'भव' [निर्मिती] प्रक्रिया सुरू होते._* 

*_"भव' प्रक्रियेच्या आधारे जन्म होतो._*

_*जर जन्म झाला तर त्याबरोबर वार्धक्य, मृत्यू, शोक, क्रंदन, शारीरिक व मानसिक यातना आणि क्लेश येणारच._*

             _अशाप्रकारे हा दुःखाचा डोंगर निर्माण होतो. कारण व परिणाम यापासून निर्माण झालेल्या दुःखाच्या साखळीमुळे, प्रतीत्यसमुत्पादामुळे आपण आपल्या सद्यस्थितीला आलो आहोत. दुःखमय भविष्यकाळाशी सामना करीत आहोत._

               _सरते शेवटी सिद्धार्थ गौतमाला सत्याचा उलगडा झाला. *'अहं' च्या खऱ्या स्वरूपाबद्दलच्या अविद्येतूनच दुःख निर्मितीला सुरुवात होते. दुःखाचे पुढचे कारण म्हणजे अविद्येमुळे अंध प्रतिक्रिया करण्याची मनाला लागलेली सवय, 'संस्कार' यालाच पाली भाषेत 'सङ्खार' असे नाव आहे. आपण राग-द्वेषाच्या प्रतिक्रिया निर्माण करतो त्यामुळे आसक्ती, तृष्णा निर्माण होत असते. त्यातूनच सगळ्या दुःखांचा जन्म होतो. अंध प्रतिक्रिया करण्याच्या सवयीलाच भविष्य निर्माण करणारे कर्म म्हटले आहे. ह्या प्रतिक्रिया केवळ आपल्या मूळ स्वभावाच्या, सत्य स्वभावाच्या अज्ञानामुळेच निर्माण होतात. म्हणूनच अविद्या, राग व द्वेष हे त्रिकुटच आपल्या आयुष्यातील सर्व दुःखनिर्मितीच्या मुळाशी आहे.*_

           *_४) दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग_*

           _एकदा दुःखनिर्मितीचे कारण सापडल्यावर भगवान बुद्धांनी दुःखाचा अंत कसा करायचा या प्रश्नाची तड लावावयाचे ठरवले तेव्हा कारण व परिणाम यामुळे निर्माण होणाऱ्या कर्माची त्यांना आठवण झाली. याच्या अस्तिवामुळे ते निर्माण होते, याच्या निर्मितीतूनच त्याची निर्मिती होते. याचे अस्तित्व संपले की त्याचेही अस्तित्व संपते. याचा अंत झाला की त्याचाही अंत झालाच. *'कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. जर कारण नाहीसे झाले तर तो परिणामही होणार नाही ह्याप्रकारे दुःखनिर्मितीचे चक्र उलटे फिरवता येईल :*_

*जर अविद्येचा समूळ नाश झाला तर सर्व संस्कार [प्रतिक्रिया] अंत पावतील.* 

*जर सर्व संस्कारांचा अंत झाला तर विज्ञान अंत पावेल.*

*जर विज्ञान अंत पावले तर मन [नाम] व शरीर [रूप] यांची जीवनधारात अंत पावेल.*

*जर मन- शरीर जीवनधारा अंत पावली तर सहा ज्ञानेंद्रिये अंत पावतील*

*जर सहा ज्ञानेंद्रिये अंत पावली तर स्पर्श अंत पावेल.*

*जर स्पर्शाचा अंत झाला तर संवेदना अंत पावतील.*

*जर संवेदना अंत पावली तर तृष्णा अंत पावेल. जर तृष्णा अंत पावली तर आसक्ती अंत पावेल.*

*जर आसक्ती अंत पावली तर निर्मिती [भव] अंत पावेल.*

*जर निर्मिती अंत पावली तर जन्माचा अंत होईल.*

*जर 'जन्म' अंत पावला तर त्याबरोबर वार्धक्य, मृत्यू, शोक, क्रंदन, मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेश यांचा अंत होईल.* 

          _*आणि या प्रकारे सर्व दुःखचक्रच थांबेल. नाश पावेल, अंत पावेल '*_

             _आपण जर आपले अज्ञान नाहीसे केले तर विविध प्रकारच्या दुःखाला कारणीभूत होणाऱ्या अंध प्रतिक्रिया थांबतील आणि एकदा का दुःख संपले की आपण खऱ्या सुखाचा व शांतीचा अनुभव घेऊ शकू. दुःखचक्राचे अशाप्रकारे मुक्तीचक्रात रुपांतर करता येऊ शकते._

      _सिद्धार्थ गौतमांनी ज्ञानप्राप्तीतूनच अशाप्रकारे मुक्तीचा साक्षात्कार करून घेतला व हाच मार्ग त्यांनी जिज्ञासूंना शिकवला. ते म्हणत,_

        *_'दुष्कृत्यांमुळे आपणच आपले नुकसान करून घेतो व अशुद्ध होतो. सत्कृत्यांमुळे आपणच आपले भले करू शकतो व शुद्ध होतो._*

          _दुःख निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांना आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत, या जबाबदारीचा स्वीकार करून आपण दुःखमुक्त कसे व्हावे हे आपणच शिकू शकतो._

          *_५) पुनर्जन्मांची धारा_*

            _*प्रतीत्यसमुत्पादाच्या चक्रावरून बुद्धांनी पुनर्जन्माची प्रक्रिया समजावून सांगितली आहे. यालाच 'संसार' असेही म्हणतात. त्याकाळी भारतात पुनर्जन्मांची कल्पना सर्वसाधारणपणे सत्य म्हणून स्वीकारलेली होती. बऱ्याच लोकांना आज ही कल्पना परकी वाटते, एक असमर्थनीय संकल्पना वाटते.* ती स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी ही संकल्पना काय आहे, काय नाही हे समजावून घेणे जरूरीचे आहे._

         _मागील व पुढील जन्माची अखंड धारा, पुन्हा पुन्हा येणाऱ्या अस्तित्वाचे चक्र म्हणजेच संसार. आपली कर्मेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास प्रेरक ठरतात._

          _आपण केलेल्या उच्च किंवा नीच कर्मावरून आपणास उच्च वा नीच जन्म प्राप्त होतो, ह्या जन्मातील चांगल्या किंवा वाईट कृत्यांची परिणती पुढच्या जन्मी बक्षिसाच्या किंवा शिक्षेच्या रूपात होते, अशी कल्पना जे संप्रदाय पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांमध्ये थोड्याफार फरकाने मानली जाते. *बुद्धांना मात्र असे आढळले की, कितीही उच्च कोटीतला का जन्म असेना, त्यातही दुःख अटळ आहे म्हणूनच आपण सुदैवी पुनर्जन्माची अपेक्षा किंवा त्यासाठी प्रयत्न न करता कुठल्याही प्रकारच्या जन्मापासूनच मुक्तीची अपेक्षा केली पाहिजे. जन्ममुक्तीच सर्वात सुदैवी आहे. कारण आपले ध्येय हे दुःखातून पूर्णपणे सुटका हेच असावयास पाहिजे. सर्व दुःखचक्रातून मुक्त झाल्यावरच आपल्याला शुद्ध, निर्मळ आनंदाची प्राप्ती होते की, जी जगातील कोणत्याही सुखकारक अनुभवांपेक्षा वरच्या दर्जाची असते. भगवान बुद्धांची शिकवण ह्या जन्मातच ते सुख प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन करते.*_ 

       _*'संसार' म्हणजे सर्वसामान्य मानतात तशी ती कल्पना नाही की, ज्यात वेगवेगळ्या जन्मात आत्मा आपले अस्तित्व कायम राखून पुन्हा पुन्हा फिरत असतो. खरे तर असे घडत नाही. वेगवेगळ्या जन्मात न बदलणारे असे अस्तित्व नसतेच, यावर त्यांनी भर दिला.* ते म्हणत, 'हे अस्तित्व जसे गाईपासून दूध मिळते, दूधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप' तसे जेव्हा ते दूध असते तेव्हा त्याला आपण दही म्हणत नाही किंवा लोणी वा तूपही समजत नाही. त्याचप्रमाणे विचार करताना केव्हाही सध्याच्या अस्तित्वाची अवस्थाच खरी समजली पाहिजे, ती भूत वा भविष्य असत नाही._

          _भगवान बुद्धांचा तोच 'मी' 'अहं' पुन्हा पुन्हा अवतार घेता या कायम तत्त्वावरही विश्वास नव्हता. अगर मागील जन्म किंवा पुढील जन्म नाही हे पण त्यांना मान्य नव्हते. त्यापेक्षा त्यांना जे आढळले व त्यांनी जे शिकविले ते केवळ निर्मितीची एका जन्मातून दुसऱ्यात सातत्याने होणारी क्रिया. आणि जोपर्यंत आपण आपल्या कर्मसंस्कारांचे बळ या क्रियेला देतो तोपर्यंत ही क्रिया सुरुच राहते._

           _*जरी कोणाचा या सध्याच्या जन्माखेरीज कोणत्याही अस्तित्वावर विश्वास नसला तरी प्रतीत्यसमुत्पादाची उत्पत्ती त्यांना समजू शकते. प्रत्येक क्षणी जेव्हा आपल्या अंध प्रतिक्रियांबद्दल आपण बेसावध असतो तेव्हा तेव्हा आपण दुःख निर्माण करीत असतो. याची प्रचिती आपल्याला आत्ता, ह्या इथे येते. जेव्हा आपण अविद्या बाजूला सारून अंध प्रतिक्रिया थांबवतो, त्याच क्षणी निर्माण होणाऱ्या सुखाचा व शांतीचा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते. स्वर्ग वा नरक या इथे व आत्ताच अस्तित्वात असतो. त्यांचा अनुभव आपण या जन्मात व याच शरीरात घेऊ शकतो. भगवान बुद्ध म्हणत, 'जरी आपली पुनर्जन्मावर श्रद्धा नसली, चांगल्या कृत्याबद्दल पुढील जन्मी मिळणारे पुरस्कार किंवा वाईट कृत्यामुळे मिळणारी शिक्षा जरी आपल्याला अमान्य असली, तरी याच जन्मात येथेच आपण द्वेष, दुर्भावना व चिंता यापासून मुक्त राहून सुखी व समाधानी जीवन जगू शकतो.*_

        *_पुनर्जन्मावर श्रद्धा असो वा अविश्वास असो, आपण ह्या शिकवणुकीच्या उपयोगाने आपल्या सध्याच्या आयुष्यातील अंध प्रतिक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांशी सामना करू शकतो. आता आपल्याला भेडसावत असणाऱ्या समस्या सोडवून, अंध प्रतिक्रियांमुळे दुःख निर्माण करण्याची आपली सवय घालवून, दुःखमुक्तीकडे वाटचाल कशी करता येईल, आनंदी जीवन कसे मिळवता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे._*

    *_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

                                *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जगण्याची कला_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_14.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...