🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_चिमूटभर मोहरी_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*श्रावस्ती नगर, अत्यंत गरीब आणि त्याकाळी खालच्या मानल्या गेलेल्या जातीत जन्मलेली एक दुर्दैवी तरुणी, नाव होत गौतमी तिस्स [तिष्या ]. परंतु शरीराने अत्यंत हाडकुळी-दुबळी म्हणून घरचे लोक तिला गौतमी तिस्सा ऐवजी गोतमी किसा [कृश शरीराची] म्हणू लागले. हळू हळू शेजारीपाजारीही 'किसा गोतमी' ह्याच नावाने ओळखू लागले.*_
_कर्मधर्म संयोगाने तिचा विवाह श्रावस्ती नगरीतील उच्च घराण्यातील श्रीमंत कुटुंबातील एका चांगल्या मुलाशी झाला. धनधान्यसंपन्न परिवार, सुंदर युवापतीही प्रेमळ स्वभावाचा. असं वाटलं की गौतमीच्या जीवनातील दुःखाचा अध्याय संपला. किसा गोतमीचे भाग्य उजळले. पण परिस्थिती तशी राहिली नाही. पतीचे अपार प्रेम लाभूनही घरांतील अन्य लोक तिच्यावर कमालीचे नाराज होते. रात्रं-दिवस सर्वांची सेवा करूनही घरातील लोक तिचा तिरस्कारच करीत. एक तर गरीब मुलगी, आणि वरून हलक्या जातीची. जात-पात सधन-निर्धन या प्रकारच्या भेदभावांनी समाज सडला होता. समाजात भयंकर रोग पसरला होता. त्यामुळे किसाच्या कुटुंबातील लोकांच्या डोक्यात हे भूत शिरले होते. म्हणून संबंध तर झाला पण मनापासून ते कुणालाच आवडले नव्हते. त्यांचे छद्मी बोलणे, टोमणे ऐकून तिच्या हृदयाला घरे पडत यापेक्षा एकाद्या गरीब घरी पडली असती, लहान म्हटल्या जाणाऱ्या कुळजातीत दिली असती तर अधिक चांगले झाले असते. अशा वातावरणांत धनसंपदा काय कामाची? घृणा तिरस्कार, उपहास यांनी तिला जीव नकोसा झाला. फक्त पतीप्रेमाचाच काय तो सबळ आधार होता._
_विवाहानंतर पुष्कळ वर्षे तिला संततीप्राप्ती झाली नाही. त्यामुळे कुटुंबात तिची आणखीनच कुचंबणा सुरू झाली. तिरस्कार वाढतच चालला घराण्यातील एकुलता एक मुलगा तोच जर निःसंतान राहिला तर वंश वाढणार कसा? कसली पुण्यहीन वांझोटी सून घरात आली ? अन् पुण्यशील असती अशा गरीब घराण्यात कशाला जन्मली असती? अन् एवढ्या उच्च घराण्य पडली तरीही निपुत्रिकच का राहिली? खरोखर ही दळभद्रीच आहे. या अभागिनीमुळे आपला निर्वंशच होणार. या प्रकारची निखाऱ्यासारखी बोलणी ऐकून ऐकून ती बेजार झाली. पण करणार काय? असहाय्य अवस्था. मुकाट्याने अश्रू पीत सारं काही सहन करीत राहिली._
_परंतु पुन्हा काही दिवस गेले, आणि काळ बदलला. ती गर्भवती झाली. दहा मास पूर्ण होताच एका गुटगुटीत बाळाला तिने जन्म दिला. जीवन एकदम उजळून निघाले. पुत्रवती म्हणून आदर मिळू लागला. सर्वांची मनोकामना पूर्ण झाली. तिने घराण्याचे नाव चालवायला कुटुंबाला सुंदर पुत्र जो दिला. जसं जस बाळ वाढू लागले तस तशी बाळाची किलबिल घरांतील वातावरण प्रसन्न करू लागली. सारेजण त्याला कडेवर घेण्यासाठी आतुर होऊन उठत. किसाचे घरवाले हे विसरून देखील गेले की मुलाची आई हलक्या कुळातली गरीब घराण्यातील आहे. गृहलक्ष्मीचं स्थान घरांत तिला मिळाले. व्यवस्थित मानपान होऊ लागला._
_पाळण्यातलं बाळ आता रांगायला लागलं. त्याच्या बाललीलांनी सर्व प्रसन्न झाले. अडखळत दोन चार पावले टाकू लागला. त्याच्या बालिश खोड्यांनी सारेच हरखून गेले. घराच्या प्रांगणात आनंदाचे फुलबाजे उडू लागले. किसाला आपल्याच भाग्याचा हेवा वाटू लागला. मुलाला छातीशी घट्ट पकडून ती प्रेमाने त्याचे मुके घेई. ह्या लाडक्यामुळेच तिचे दिवस पालटले. तिचे दुःख दूर झाले._
_परंतु हे सुदिन फारच लौकर संपले. एक दिवस किसा गौतमीच्या आनंदावर विरजण पडले. मेघावाचून वीज कोसळली. घराबाहेरील बगीच्यात खेळात दंग झालेल्या तिच्या बाळाला अतिविषारी काळा नाग चावला. पाहता पाहता हसरा प्रफुल्ल चेहरा काळानिळा पडला. शरीर थंडगार पडले. श्वास बंद झाला. हृदयाचे स्पंदन थांबले. घरच्या मंडळीनी खूप धावपळ केली. औषध पाणी केले. तंत्र मंत्र केले. पण काही उपयोग झाला नाही. मुलाने प्राण साइले ते सोडलेच. घरात हाहा:कार उडाला. किसा गोतमीच्या दुःखाला तर पारावारच राहिला नाही. प्रत्येक माता आपल्या एकुलत्या एक मुलावर आसक्त असते आणि किसा गौतमीचा तर तोच एक सुखाचा आधार होता. त्याच्यामुळेच तिला चांगले दिवस लाभले होते. आतां पुढे काय? ती दुःखाने वेडी झाली._
_जेव्हा लोक म्हणू लागले की मुलाचे शव स्मशानांत दफन करायला हवे. तेव्हा हे शब्द तिच्या हृदयात भाल्याप्रमाणे घुसले. हे लोक आता माझ्या मुलाला घराबाहेर नेणार. 'मी मुळीच तसे करू देणार नाही.' तिने मुलाचे प्रेत हृदयाशी घट्ट धरून ठेवले नी आक्रोश करू लागली. 'नाही हो! माझा बाळ अद्याप मरण पावला नाही. विष चढल्यामुळे नुसता बेशुद्ध पडला आहे. गाढ झोप लागलीय त्याला. कुणीतरी याला वाचवा. कुणी तर शुद्धीवर आणा हो! कुणी तरी त्याला उठवा. जर खरोखर प्राण गेले असले तर असं एखादं औषध द्या का त्यामुळे त्याचे प्राण परत येतील. तो जिवंत होईल. तुमच्याने हे होत नसेल तर मी कुणाकडून तरी औषध मागून आणीन. माझ्या बाळाला मी जागवीन."_
_आणि तशाच संभ्रमावस्थेत मृतबाळाला छातीशी अगदी घट्ट धरून ती घराबाहेर पडली. प्रत्येकाच्या घरी जाऊन याचना करू लागली. रस्त्यात जो कोणी भेटेल त्याच्या समोर पदर पसरून भीक मागू लागली, “मला कुणीतरी औषध द्या, ज्याच्याने माझा बाळ जागा होईल. त्याची गुंगी दूर होईल. तो मरण पावला नाही._
_लोक सांगत होते "माई! हा मृत झालाय. आता कोणतेच औषध लागू पडणार नाही. आयुष्याची दोरी तुटली त्याला काय औषध!" हे ऐकून तिचा शोक आणखीनच अनिवार होई. मुलाला आणखी घट्ट आवळून धरी. दुसऱ्या व्यक्तीकडे औषधासाठी धाव घेई._
_*तिची ही करुणावस्था पाहून एका माणसाला फारच दया आली तो म्हणाला, "माई! याला कोणी सामान्य वैद्य औषध देऊ शकणार नाही. यावेळी ह्या लोकी महाभिषक महावैद्य बुद्ध उपस्थित आहेत. शहराबाहेर त्यांचा जेतवन विहार आहे. भगवान तिथे यावेळी रहात आहेत. त्यांच्याकडे जा. तेच तुला योग्य ते औषध देतील."*_
_उल्हसित होऊन किसा गोतमी धावत पळतच जेतवनात पोहोचली. भगवान तेव्हा साधनेतील बारकावे साधकांना समजावून देत होते. आकुळ व्याकुळ किसा गोतमी न थांबता भगवान बुद्धांच्या समोरच जाऊन उभी राहिली आणि मृत बाळाचे प्रेत त्यांच्या पायाशी ठेऊन ओक्साबोक्शी रडू लागली._
_*भन्ते! भगवान! लोक माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावू पहात आहेत. हा मेलेला नाही. भगवान, तो तर गाढ झोपला आहे. बेशुद्धावस्थेत आहे. आपण याला उठवा, जागं करा. शुद्धीवर आणा!*_
_"बेटी! हा निष्प्राण झाला आहे. किसाला धक्काच बसला. अधिकाधिक हुंदके देत राहिली व स्फुंदत स्फुंदत म्हणाली, "जरी निष्प्राण आहे. तरी भगवान! आपण महाभिषक आहात! मला कुणीतरी सांगितलं की आपल्याजवळ संजीवनी औषधी आहे. महाराज, आपण याच्या शरीरांत नवे प्राण घाला. याला औषध द्या!"_
_*भगवान बुद्धांनी पाहिले की आता ही भावावेशांच्या विक्षिप्त अवस्थेत आहे. धर्मनियामकतेच्या गोष्टी या अवस्थेत हिला समजणारच नाहीत. त्यांच्या बोधिदृष्टीला हे ही दिसलं की पटाचाराप्रमाणेच आपल्या पूर्वजन्मात भगवान काश्यप बुद्धांच्या सात बहिणीपैकी ही एक आहे. त्यांच्याबरोबर खूप चांगली तपश्चर्या केलेली आहे. पूर्व संचित चांगले आहे. पुण्यपारमीचा पुरेसा साठा हिच्याजवळ आहे. आता आपल्या कुठल्यातरी दुष्कर्माचे फळ भोगत आहे. परंतु हिच्या दुःख विमुक्तीची वेळ आता जवळ आली आहे.*_
_भगवानांनी आपल्या शांत-गंभीर वाणीत करुणेची मंदाकिनी ओसंडीत म्हटले, "हां, बेटी! तुला कुणी सांगितलं ते खरं आहे. मी भिषक आहे. वैद्यच आहे. तुला योग्य औषध देईन."_
_“द्या, भगवान् द्या! मी आपले उपकार जन्मभर विसरणार नाही. किसाचा चेहरा आशेने प्रफुल्लित झाला._
_“शहरातून कुणाकडून तरी चिमूटभर मोहऱ्या मागून आण. "_
_"ही आत्ताच घेऊन येते भगवान!" ती झटकन उठली नी जायची घाई करू लागली. “पण एक लक्षात ठेव. अशा परिवारातून आण, ज्यांच्याकडे अजूनपर्यंत कुणीही मरण पावलेलं नाही._
_"हां हा भगवान्! अशाच घरातून आणीन."_
_मुलाला छातीशी घट्ट पकडून ती नगराच्या दिशेने आवेगात धावतच निघाली. "आता माझं बाळ नक्की सजीव होऊन उठणार."_
_जे पहिलं घर दिसलं तिथे जाऊन आपली दुःखद कथा सांगितली व चिमूटभर मोहरी मागितली._
_त्या कुटुंबियांना अपार सहानुभूती वाटली. 'माई! तुझं बाळ जगलं वाचलं तर चिमूटभर का हव्या तर मणभर मोहऱ्या घेऊन जा.' ते म्हणाले._
_“पण तुमच्या घरांत कुणी अजूनपर्यंत मेले तर नाही ना ?" किसाने विचारलं. हे ऐकताच त्यांचा चेहरा उतरला. "मेलं कसं नाही? माई! आमच्या घरांत तर अनेक माणसं मरण पावलेली आहेत. "_
_अशा रीतीने एकेका घरी चिमूटभर मोहरीची भीक मागत किसा शहराच्या गल्ली बोळातून भटक भटक भटकत राहिली. तिला एक देखील घर वा परिवार मिळाला नाही की ज्या घरात कुणीही निधन पावलेले नव्हते. दिवसभर थकली भागली किसा सायंकाळी सावध झाली. मुद्दा लक्षात आला प्रत्येक घरी लोक मरत असतात. लहान मुले, तरुण, वृद्ध, स्त्रिया, साऱ्यांना मरण आहे. या शहरात जिवंत असणाऱ्या लोकांपेक्षा मेलेल्यांची संख्य अधिक आहे. एवढी सारी माणसे आपल्या घरातल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतरही माझ्या सारखी वेडीपिशी झाली नाहीत. जन्म मरण कुणाच्याच हातात नाही. हे सत्य समजाविण्यासाठी भगवानांनी माझ्याकडे चिमूटभर मोहरीच्या दाण्यांचे दान मागून आणायला सांगितले._
_सर्व सामान्य अशीच ही घटना. *केवळ चिमूटभर मोहरीचे दाणे, पण तेच दान त्या दुःखाने व्याकुळ जीवाला धर्माची चेतना देण्यासाठी प्रेरणादायक ठरते.* तिची स्मृती ताळ्यावर आली. सावध होताच लगेच बाळाचे मृतशरीर जमिनीत पुरण्यासाठी लोकांच्या स्वाधीन करून जेतवन आश्रमात भगवान बुद्धांच्याजवळ आश्रयाला आली._
_" मिळाली का चिमूटभर मोहरी ?” आल्या आल्याच भगवानांनी तिला विचारले._
_"नाही भगवान! मोहरीचे दाणे नाही मिळाले पण गेलेला होश मात्र परत आला. प्रत्येक जन्म घेणाऱ्याला मरण अटळ आहे. पुढे मागे, आज ना उद्या, कुणी ना कुणी मरतच असते. कुणीही थांबू शकत नाही. "_
_*भगवानांनी पाहिलं, आता मनःस्थिती धर्म समजण्यालायक झाली आहे. तिला धर्मदेशना दिली. साऱ्या वातावरणात विमल प्रशांत धर्म तरंग-लाटा पसरल्या. भगवान म्हणाले, “मृत्यू सर्व प्राण्यांचा अनिवार्य धर्मस्वभाव आहे. केवळ गाववाले नव्हते, केवळ नगरवासी नव्हेत, केवळ एकाच कुळाचे नव्हेत तर देवदेवतांसह सर्व प्राणीमात्रांचा हा धर्मस्वभाव आहे. सारेच अनित्यधर्मा आहेत. मरणधर्मा आहेत. हे सत्य ज्यांना समजत नाही त्यांना पशु-पक्षी, पुत्र-पुत्री, धनसंपत्ती यांच्या विषयी नेहमी आसक्ती वाटत राहते. मोहमूढ अवस्थेत ते वावरत राहतात. आणि जन्मो-जन्मी वारंवार मृत्यूच्या चक्रात सापडतात. ज्याप्रमाणे नदीला अकस्मात पूर येतो तेव्हा प्रगाढ निद्रेत असलेला सारा गांव वाहून जातो. तद्वतच या प्रमत्त आसक्त लोकांना वारंवार ही मृत्यूधारा वाहून नेते.*_
_*जो कोणी या मोहनिद्रेतून जागा होतो, आणि अनित्यबोध जागवतो, उदय व्यय, उदयव्यय यांचे दर्शन घेत घेत जन्मो-जन्मीच्या जन्म-मरणाच्या दुःखचक्रातून नेहमीसाठी मुक्त होतो.*_
_*उदय-व्ययाच्या सत्याचे दर्शन न घेता शतायू होऊन जगण्यापेक्षा या अनित्यधर्म उदयव्ययाचे दर्शन घेऊन केवल एक दिवस जगणे अधिक श्रेष्ठ आहे."*_
_महाकारुणिकाच्या धर्मवाणीचा अमृतरस कानी पडताच किसा गोतमीचे अनेक जन्मांचे संग्रहित पुण्य जागले. शरीराच्या अणुरेणूत धर्मचितना जागली. ती एकाग्र चित्त झाली. अंतर्मुखी व स्वमुखी झाली. तिला आपल्याआत "उदय-व्यय, उदय-व्यय अनित्यधर्माचे सम्यक दर्शन झाले. उदय-व्यय उदय-व्ययाचे दर्शन करता करता उत्पाद-निरोधाचे दर्शन झाले. विरज, विमल धर्मचक्षु उघडले. काही क्षण निर्वाणाचा साक्षात्कार झाला. किसा धन्य झाली. स्रोतापन्न अवस्थेत प्रतिष्ठित झाली. नितांत दुःख विमुक्तीच्या मार्गावर प्रतिष्ठित झाली._
_श्रद्धायुक्त अंत:करणाने, कृतज्ञता भावनेने भावविभोर होऊन भगवानांच्याजवळ प्रव्रज्याची याचना केली. भगवानांनी अनुमती दिली. किसा गोतमीने आदरपूर्वक त्यांना तीन वेळा प्रदक्षिणा घातली. वंदन केले आणि भिक्षुणी विहारात जाऊन संन्यस्त जीवन अंगीकारले._
_आता तिचे दिवस भगवानांच्या सानिध्यात साधना करण्यात जाऊ लागले. भगवानांची मंगल धर्मवाणी तिच्या मनात शिल्लक राहिलेली मलिनता धुऊन काढण्यास सहाय्यक झाली. समर्पित चित्ताने विपश्यना साधनेत मग्न झाली. एक दिवस साधना करतांना भगवान बुद्धांची वाणी तिच्या कानी आली._
_*यो च वस्ससतं जीवे अपस्स अमतं पदं।*_
_*एकाहं जीवितं सेय्यो पस्सतो अमतं पदं।*_
*_"अमृतपद निर्वाणाचा साक्षात्कार न होता भले कोणी शतायुषी जीवन जगू दे, परंतु त्यापेक्षा अमृतपद निर्माणाचा साक्षात्कर करून कुणी एक दिवस जरी जगला तरी ते जीवन अधिक श्रेष्ठ आहे. श्रेयस्कर आहे."_*
_या प्रेरणादायी शब्दांनी किसा गौतमीच्या मनांत धर्मसंवेग जागला. 'मी क्षणभर 'निर्वाण'ची अनुभूती करून स्रोतापन्न अवस्था प्राप्त केली परंतु नितांत विमुक्तीसाठी अरहंतची निरोधसमापत्तीची निर्वाणिक अवस्था अनुभवली पाहिजे तेव्हाच या जीवन मरणाच्या रहाटगाडग्यातून, भवचक्रातून सुटका होईल._
_*या प्रेरणेने प्रभावित होऊन दृढ निश्चयाने पुरुषार्थ भावनेने विपश्यना साधना करता करता तिने क्रमशः सकदागामी, अनागामी आणि अरहंत फल प्राप्ती करून घेतली, साधना सफल झाली. साधिका जीवनमुक्त झाली.*_
*_किसा गोतमी भगवानांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक झाली. भिक्षुणींचे जीवन अत्यंत साधे असते. पण त्या सर्व भिक्षुणींत सर्वात साधे सरळ जीवन किसा गोतमीचे होते. त्या भिक्षुणींमध्ये सर्वाधिक साधेपणाने जीवन जगणाऱ्या गोतमीला, जाडेभरडे चीवर धारण करणाऱ्या भिक्षुणींमध्ये भगवानांनी 'अग्र' उपाधी दिली._*
_*परम साध्वी किसा गौतमीने आपले शेष जीवन लोकसेवेसाठीच प्रदान केले. कित्येक दुःखी स्त्रियांनी तिच्या जीवनापासून प्रेरणा घेतली, मार्गदर्शन घेतले आणि दुःखविमुक्तीचा मार्ग स्वीकारला. किसा गौतमीच्या करुणाभरल्य चित्ताने इतर स्त्रियांचे दुःख व्यवस्थित समजून घेतले. किती प्रकारच्या त्यांच्या दुःख व्यथा? योग्य पती मिळाला नाही तरी दुःख, सासरची माणसं चांगली मिळाली नाहीत तर दुःख, संतती नाही म्हणून दुःख, नाहीतर गर्भपालनाचे दुःख, प्रसूती वेदनांचे दुःख, बालसंगोपनाचे दुःख, स्वतःचे पाऊल घसरले तर अपरिमित दुःख. पूर्व जन्मातील आपली बहीण पटाचाराचा जीवन वृत्तांत आठवला. दुराचारामुळे पती, दोन मुले आणि आईवडिलांचा, भावाचा अंत यांमुळे भोगावे लागलेले तिचे असीम दुःख ! या लोकजीवनात दुःखच दुःख. ज्या कल्याणकारी मार्गाचा अवलंब करून किसा स्वतः दुःखमुक्त झाली तोच हा कल्याणकारी मार्ग इतरांना वाटू लागली.*_
_*जेव्हा कधी तिला स्वतःचा भूतकाल आठवे तेव्हा भगवान बुद्धांविषयी अपार कृतज्ञतेची भावना हृदयात ओसंडू लागे, “मी किती भाग्यवती, भगवान तथागतांसारखे कल्याणमित्र लाभले!' कल्याणमित्राचे साहचर्य मिळाले तर जीवनात मांगल्य निर्माण होते. दुर्जनातील दुर्जन व्यक्ती ही सत्संगतीने सज्जन बनते. दुःखी माणसाची दुःखापासून मुक्तता होते. तो दुःख भोगायचे सोडून दुःखाचे अवलोकन करू लागतो. दुःखाचे मूळ कारण शोधतो. दुःख विमुक्तीच्या मार्गावरून स्वतः वाटचाल करून दुःखाचे प्रत्यक्ष दर्शन करून घेतो आणि अशा प्रकारे नितांत दुःखनिरोध अवस्था, परमपद निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो. "*_
_"माझ्यासारख्या अभागिनीने याच एका जीवनात नव्हे तर अगणित पूर्व जन्मांत किती दुःखे सहन केली आहेत. कोण जाणे किती प्रियजनांचा विरह सोसावा लागला. त्या सर्व मृत पावलेल्या प्रियजनांच्या अस्थि एकत्र केल्या तर हिमालयाएवढा ढीग होईल. त्यांच्या मरणानंतर ढाळलेले अश्रू जमा केले तर सर्व समुद्रांच्या पेक्षाही ते अधिक होईल."_
_*“कारुण्याचा महासागर तथागतांच्या सत्संगतीनेच माझी सारी दुःखे निमाली. शील, समाधि आणि प्रज्ञायुक्त अष्टांग मार्ग सदाचरणाचा धर्मपंथ स्वीकारून धर्माच्या आरशात परम सत्याचे दर्शन घेतले अन् जन्म जन्मांतरींच्या दुःखांचे ओझे हलके झाले. हृदयात खोलवर रुतून बसलेल्या मर्मभेदी दुःखदायक तृष्णेचा तीर बाहेर पडला. मी कृतकृत्य झाले. विमुक्त झाले, धन्य झाले. "*_
*_असा कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*
*_अशी मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ३०/०८/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_30.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment