🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_गतिरोध - जलधारेचा की जीवन प्रवाहाचा_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_श्रावस्ती कोशल देशाच्या राजधानीत अतिधनाढ्य श्रेष्ठी परिवार लहानमोठ्या अनेक खोल्या असलेला सात मजल्यांचा विशाल वाडा, या प्रचंड वाड्यांत चार माणसांचे छोटेसे कुटुंब. श्रेष्ठी परिवार, सेठ, सेठाणी, एक मुलगा, एक मुलगी. मुलीने किशोरी अवस्था संपवून उन्मादक यौवनात पदार्पण केलं. घरात अपार वैभव, विलासाची साधने. बाहेर देखील 'सर्व अस्ति'. श्रावस्ती नाचगाणी, आमोदप्रमोद, खेळलोकनाट्ये आकर्षक मनोरंजक मोहमयी महानगरी. *पिताश्रींना पैशाचा अनिवार मोह, रात्रंदिवस पेशामागेच धावपळ, रात्रंदिवस तोच ध्यास. मातेला समाजात मिरविण्याची ओढ, सांस्कृतिक कार्यक्रमात गुंतून गेलेली. मुलांच्या विकासाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. त्यांचे योग्य ते संगोपन संवर्धन होत नव्हते.* लहान मुलाला सांभाळण्यासाठी एक स्वतंत्र नोकर ठेवला होता. तरुण मुलीची काळजी घेण्यासाठी दुसरा तरुण सेवक, ज्याच्या वाईट संगतीमुळे त्या अल्लड युवतीच्या जीवनात कामवासनेची आग जागृत झाली. पाय घसरला नी एकदा पाय घसरला तो कायमचाच. विशाल हवेलीत एकांत अनाचाराला भरपूर मोकळीक मिळाली. दोघेही पापाच्या चिखलात दिवसेंदिवस अधिकच रुतले. रुतले ते रुततच गेले._
_मुलीला विसावे वर्ष लागले तेव्हा माता पित्याला तिचे हात पिवळे करण्याची आठवण झाली. एका सुखी संपन्न, प्रतिष्ठित घराण्यातील योग्य वराशी वाङ्निश्चय करण्यात आला. मंगलदिन निश्चित करण्यात आला. आज घरात वऱ्हाडी मंडळी येणार. तेव्हा दोघा अनाचाऱ्यांना चिंता वाटू लागली. परगृही गेल्यावर एक दुसऱ्याची दृष्टीभेटही होणे शक्य नाही. मग शरीरसंबंधाची कशाला ?_
_वासनांच्या चिखलाने बरबटलेल्या पुतळ्याला नकली प्रेमाचा सुंदर झगा घालून, भ्रामक त्यागभावनेची भडक आभूषणे चढवून दोघांनी आपली दुष्कर्मे झाकण्याचा प्रयत्न केला व घरांतून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांचाही दृढ निश्चय, भले झोपडीत राहू पण एकत्र संगतीनेच राहू. वरात घरात येण्याच्या आत त्यांची पलायन योजना यशस्वी झाली. थोडे बहुत दागदागिने वस्त्रे गोळा करून श्रावस्तीला पाठ फिरविली आणि दूर एका छोट्याशा गावांत जाऊन राहिले._
_*साठलेलं पाणी किती दिवस पुरणार ?* आणलेलं सोननाणं पैसा थोड्याच दिवसात संपला. *पापकर्माची फळे फळास येऊ लागली.* अत्यंत दारिद्रयावस्थेत दिवस कंठण्याची पाळी आली. दोन वर्षात युवती गर्भवती झाली गर्भाच्या वाढीबरोबर चिंताही वाढल्या. विपन्नावस्थेत बाळंतपण कसं करायचं? बाळाचं संगोपन कसं करायचं? आई वडिलांची आठवण येऊ लागली. मन पश्चातापाने पोळू लागले. 'माझ्या दुष्कृत्याने त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. निश्चित रागावले असतील. पण आईबापच आहेत. मी त्यांची क्षमा मागितली तर ते क्षमा करतील. ' माहेरी लौकर जाण्याची इच्छा बळावली. मन उतावीळ झाले पण प्रियकर-पती घाबरला. त्याला वाटले श्रावस्तीला गेलो तर राजाची अवकृपा होईल. राजदंड भोगावा लागेल. तो यायला तयार होईना. 'आज जाऊ उद्या जाऊ' चा बहाणा करीत तो टाळाटाळ करू लागला. प्रियकराच्या खोट्या आश्वासनाने निराश झाली. गर्भाची वाढलेली अवस्था पाहून त्या दुःखी युवतीने एकटीनेच जायचे ठरविले. पती बाहेर गेलेला पाहून शेजारणीला सूचना देऊन ती श्रावस्तीला निघाली. वाटेत घनदाट जंगल होते. थकली भागली गर्भारशी निर्भयपणे मंद गतीने एकटीच चालत होती. घरी परतलेल्या पतीराजांना कळले तसा तोही आल्या पावली तिच्या मागोमाग निघाला. धावत पळत त्याने तिला गाठले. पण ती परतायला तयार होईना. लाचार पतीही तिच्याबरोबर निघाला. वाट चालता चालता ती वाटेतच प्रसूत झाली. एका मुलाला जन्म दिला. पतीने फारच आग्रह केला तेव्हा ती परत पतिगृही परतली._
_अशा प्रकारे दैन्यावस्थेत दोन वर्षे लोटली. पुन्हा गर्भवती झाली. आई वडिलांची आठवण सतावू लागली. पतीने पुन्हा मागच्या सारखीच चालढकल चालविली. तो सासुरवाडीस जाण्याचे टाळू लागला. शेवटी तिने पूर्ववत एकटीनेच जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मुलाला कडेवर घेऊन, तशा गर्भार अवस्थेत ती श्रावस्तीकडे निघाली. नाईलाजाने पतीही तिच्या मागोमाग निघाला. दैवाचा खेळ ‘ये रे माझ्या मागल्या' प्रमाणे सुरू झाला. त्या निर्जन वनांत पुन्हा तिच्या प्रसूती कळा वाढल्या आणि दुर्दैवाने यावेळी आकाशात वावटळ उठली वादळ सुरू झाले. वळवाचा मुसळधार पाऊस पडू लागला. आसर्यासाठी जरादेखील जागा मिळाली नाही. प्रसूतीकळा वाढतच होत्या. कुठे तरी विसाव्याला जागा हवी होती. पति विचार करु लागला. सुखासमाधानात वाढलेल्या या मुलीला माझ्यामुळे दुर्दैवाचे दशावतार पहावे लागत आहेत. या वादळी वार्यापासून वाचविण्यासाठी मला काहीतरी केलेच पाहिजे. काही लाकडे तोडून, सुकी पाने जमवून डोके झाकायला एखादे खोपटे तरी बांधू या. त्या भीषण वादळांत काळ्याकुट्ट अंधारात तो भटकू लागला. गर्भार युवती पाण्या-चिखलात विव्हळत पडून राहिली. पण त्या अरण्यरुदनास प्रतिसाद कोण देणारा त्या निर्जन वनांत? कोण मदत करणार? अशा बिकट परिस्थितीत ती पुन्हा प्रसूत झाली. एका लहान मुलाला जन्म दिला. चांगले फटफटले पहाटेपर्यंत पती परतला नाही हे पाहून ती नवप्रसूता घाबरून गेली. दोन्ही मुलांना छातीशी घट्ट धरून पतीच्या शोधार्थ बाहेर पडली. थोड्याच अंतरावर काळा निळा पडलेला ताठर झालेला पतीचा मृतदेह तिने पाहिला. त्याला विषारी सापाने दंश केला होता. आता काय करायचं? तिचे केविलवाणे करुण आक्रंदन सुरू झाले. दोन्ही मुलांना छातीशी धरून एकटीच श्रावस्तीकडे निघाली._
_प्रलयकारी भयानक वर्षा थांबायचं नांव नाही. रस्त्यातील छोटे छोटे ओढे देखील नदीचे रूप घेऊन वाहत होते. *छोटीशी अचिरवती नदी* देखील पुराच्या पाण्याने सुसाट वेगाने वहात होती. दोन मुलांसह नदी पार करणे अशक्यच होते. तिने युक्ती योजली. मोठ्या मुलाची समजूत घालून त्याला नदीच्या अलिकडच्या तीरावर ठेवले व नवजात मुलाला घेऊन ती नदी पार करू लागली. नदीपलिकडे किनाऱ्यावर कपड्यात गुंडाळून त्या नवजात मुलाला ठेवले. एका झाडाखाली ते पोर विसावले. मोठ्या मुलाला आणायला म्हणून ती पुन्हा नदीत उतरली तरी सारे लक्ष त्या नवजात मुलाकडेच होते. त्याचे काही अशुभ न होवो. ती नदीच्या माजधारेत पोहचली तोच एक भले मोठे गिधाड तो मांसाचा गोळा भासणारा नवजात शिशु झपाट्याने उचलतांना दिसले. ती जिवाच्या आकांताने 'शू शू' असा आवाज काढू लागली. दोन्ही हात हालवू लागली. पण गिधाडावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने नवजात बालकाला आपल्या पंजांनी आवळून उंच आकाशांत भरारी मारली. परंतु त्याचा परिणाम असा झाला की पलिकडील तीरावर असलेल्या मुलाला वाटले की आई मलाच मोठ्यांदा हाका मारून हात हलवून बोलावत आहे. त्याने तात्काळ नदीत उडी घेतली व वाहत्या पाण्याच्या लोंड्यात पहाता पहाता दिसेनासा झाला. *दुःखी कष्टी दुर्देवी माता.*_
_*पतीला सर्पदंश झाला. एका मुलाला गिधाडाने खाल्ले. दुसऱ्याला नदीने आपल्या पोटात घेतले. विचारी अभागिनी शोक करीत, रडत श्रावस्तीकडे निघाली.* अजूनही तिला खूप वाईट दिवस भोगावयाचे होते. *दुष्कर्माची आणखी फळे पिकायची होती.* श्रावस्ती नगरात पोहचण्यापूर्वी घाट लागला. स्मशानांत चिता जळत होत्या. तिथे तिने एका श्रावस्ती निवासी माणसाला विचारले कुणाचे निधन झाले ? तिला कळले की काल रात्री तुफान वादळी वाऱ्याने व भयंकर पर्जन्य वृष्टीमुळे नगरशेटचा सात मजली वाडा कोसळून नगरशेट, त्यांची पत्नी व त्यांचा एकुलता एक मुलगा इमारतीच्या ढासळलेल्या ढिगाऱ्याखाली सापडून मरण पावले._
_ते तर तिचे आईवडील आणि एकुलता एक भाऊ होते. त्यांचेच मृतदेह चितेवर जळत होते. दुःखाचा पहाडच तिच्यावर कोसळला होता. आता जगात तिचा कुणीच आधार राहिला नव्हता. तिला स्वतःला सांभाळता आले नाही आणि तोल जाऊन तिथेच बेशुद्ध पडली._
_काही वेळाने शुद्धीवर आली. पण गेलेला होश परत आला नाही. पूर्ण विक्षिप्त वेडी झाली. एकेक करीत शरीरावरचे सारे कपडे तिने फाडून टाकले. ठार वेडी झाली. पूर्ण नग्नावस्थेत श्रावस्तीच्या राजमार्गावरून, गल्ली बोळातून फिरू लागली. डोक्यावरचे केस ओरबाडून छाती बडवून आक्रोश करीत फिरू लागली._
_हाय! माझ्या पतीला विषारी सर्प चावला, एका पोराला गिधाडाने खाल्ले मोठा पोर नदीत बुडाला, आई-बाप-भाऊ इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली मेले. त्या सर्वांना एकत्रच जाळले._
_लोक तिचे करुण आक्रंदन-विलाप ऐकून दुःखी होत पण करणार काय? तिचे वेडाचार पाहून, आपल्या घराचे दरवाजे, खिडक्या बंद करीत. तिला कुणी जवळ येऊ देत नसे. 'वेडी रे वेडी' म्हणून पोरेटोरे टवाळी करीत, तिच्या मागे लागत. दुरून दगड-धोंडे, धूळ फेकत._
_*अशा विपन्नावस्थेतहि आपल्या पूर्वसंचित पुण्यामुळे एक दिवस ती जेतवन विहाराजवळून जात होती. तेथे भगवान बुद्ध लोकांना धर्म प्रवचन देत होते. लोकांनी तिला तेथे येतांना पाहताच पळवून लावायचे ठरविले. ही आपल्या वेडगळपणामुळे धर्मचर्चेला बाधा तर आणणार नाही? एवढ्यात भगवान बुद्धाने तिला पाहिले. लोकांना थांबविले. ती दुखियारी भगवानांच्याजवळ गेली. भगवान कारुण्यपूर्ण शब्दात म्हणाले, 'माझी दुःखी बेटी! सांभाळ स्वतःला त्या वाणीत प्रेममय अमृत होते. तिने ते प्रेममय शब्द ऐकले मात्र, तोच सावध झाली. आपल्या नग्नावस्थेकडे पाहून ती विलक्षण लज्जीत झाली. ती पटकन उकडवी खाली बसली. शेजारी उभ्या असलेल्या एका धर्मबंधूने तिच्या अंगावर आपली चादर टाकली. तिने ती स्वतःभोवती गुंडाळली. विक्षिप्त अवस्थेत सर्वांगावरील वस्त्रे फेकून देणाऱ्या त्या स्त्रीने चादर अंगावर ओढून घेतली म्हणून त्या दुःखी स्त्रीला 'पटाचारा' असं लोक म्हणू लागले.*_
_*पटाचारा भगवानांच्या जवळ गेली दोन्ही हात जोडले, पाय जोडले, मस्तक जमिनीवर टेकले. पंचांग प्रणाम करीत म्हणाली, 'भगवान, मला आश्रय द्या. मी निराधार दुःखी आहे. "*_
_"बेटी! तू योग्य ठिकाणी आली आहेस. तुला इथे अवश्य आश्रय मिळेल.' भगवानांच्या या आश्वासक शब्दांनी तिला धीर आला._
_"महाराज! माझ्या पतीला नागाने दंश केला. एका मुलाला गिधाडाने खाल्ले. दुसरा मुलगा नदीत वाहून गेला. आईबाप-भाऊ इमारत कोसळून ढिगार्यात सापडून मरण पावले. त्यांना एकाच चितेवर जाळले. आता या जगात मला कुणाचाही आधार नाही. कोण आश्रय देणार मला?"_
_आपले दुःखमय जीवन आठवून ती ओक्साबोक्शी रडू लागली._
_*"बेटी! आईबाप, भाईबंधु, पति-पुत्र कुणीही शरण देत नाही. खरा आधार धर्माचरणाचा असतो. आपण जो धर्म धारण करतो, जसे आचरण करतो तो आचार - धर्मच योग्य साह्य करतो. तेच आपले खरे आश्रयस्थान असते. तू कोणत्या आप्त नातेवाईकासाठी दुःखाश्रू ढाळत आहेस ? या अनादि भवसंसारात तू अनंत वेळा जन्म घेतला आहेस. सर्व जन्मात तुझे हे प्रिय आप्तजन मरण पावले आहेत. त्यांच्या निधनानंतर तू जे अश्रू ढाळलेस ते सर्व जर एकत्र केले तर या चार महासागराएवढं पाणीही त्या तुलनेत कमी पडेल. आणि आणखी किती जन्म तू यांच्यासाठी प्रिय-वियोग झाला म्हणून रडत राहणार आहेस? प्रमाद सोड. ही चूक करू नकोस. सावध हो. जागृत हो. या असीम दुःखमय भवसागराचे वास्तव स्वरूप समंजस माणसाच्या लगेच लक्षात यायला हवं व शीघ्रातीशीघ्र यातून मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे. कायमचे दुःखविमुक्त झाले पाहिजे.''*_
_*भगवान बुद्धांच्या वाणीतून अमृताचा वर्षाव झाला. योग्य समंजस व्यक्तीने तो ग्रहण केला. ही अमृतमय वाणी ऐकता ऐकता ती एकाग्र झाली. थोडा काळ ती आत्ममुखी झाली. अंतर्मुखी बनली. शरीराच्या अंगप्रत्यंगातून अणुरेणुचा उदयव्यय-उदयव्यय होत असल्याचा प्रत्ययकारी अनुभव आला. अनेक पूर्वकर्मसंचित पुण्याईचे फळ तिला मिळाले. अनित्यबोध झाला. सारं परिवर्तनीय आहे. सारखं बदलत आहे. या अनित्यबोधी धर्मगंगेत तिने अवगाहन केले. तिथे बसल्या बसल्याच तिला तिला निर्वाण अवस्थेची अनुभूती आली. पटाचारा स्रोतापन्न झाली.*_
_*कृतज्ञताविभोर होऊन तिने भगवान बुद्धांना नमस्कार केला. भिक्षुनींनी तिला संन्यस्त जीवनाची दीक्षा दिली आणि पटाचाराने दृढ निश्चय मुक्तमार्गाची वाटचाल चालू ठेवली.*_
_जे भवसंस्कार राहिले होते त्यांना सामोरे जायचे होते. अंतर्तप करीत करीत विपश्यना साधनेने त्यांना भस्मसात करायचे होते. अकालीच मृत्यूला प्राप्त झालेल्या स्वजन प्रियजनांच्या आठवणीने साधना करणे कठीण जात होते. असे होत होत एक दिवस सायंकाळी दृढ संकल्प करून साधनेच्या तयारीस ती लागली. लोटा भरून बादलीतील पाणी घेतले. त्याने पाय स्वच्छ धुतले. सुक्या जमिनीवर वाहत वाहत ते पाणी जिरून गेले. फार पुढे गेले नाही. एक लोटा पाणी पुन्हा पायावर ओतलं. यावेळी देखील पाणी तसंच वहात गेलं. पण पहिल्यापेक्षा थोडे जास्त दूर जाऊन जमिनीत जिरलं. तिसऱ्यांदा तसच ते वाहिले पण आणखी दूर वाहात गेले नी जिरले._
_या छोट्याशा घटनेने तिच्या ज्ञानतंतूंना अलगद धक्का दिला. मोहजन्य अज्ञानाचा पडदा दूर झाला. जशी जलधारा तशीच जीवनधारा. या जगात कुणाची जीवनधारा अल्पावकाशांत सुकते तर काही जणांची मध्यवयातच सुकून जाते तर काही वयोवृद्ध होऊन जातात. पण मृत्यू सर्वांनाच आहे. कोणी जिवंत राहात नाही. या मरणानुस्मृतीच्या आधाराने साधना करण्यास बसली त्याच वेळेला भगवानांचे अमृतमय बोल कानांत घुमले :_
-*यो च वस्ससतं जीवे अपस्तं उदयब्बयं ।*_
_*एकाहं जीवितं सेय्यो पस्सतो उदयब्बयं ॥*_
_*उदय-व्ययाची सत्यता विपश्यना साधनेच्या द्वारा पाहिल्याशिवाय भले कोणी शतायु होवो पण त्यापेक्षा उदयव्ययाची अनित्यबोधाची अनुभूती घेऊन एक दिवसाचं जीवन अधिक श्रेयस्कर आहे. अधिक कल्याणकारी आहे.*_
_ही धर्मवाणी ऐकताच साधिका पटाचारीचा रोम न रोम पुलकीत झाला. मी जीवनाची गेली पंचवीस वर्षे या उदयव्ययाच्या अनुभूतीशिवाय फुकट घालविली. आता भगवानांच्या अपार अनुकंपेने या सत्याचा साक्षात्कार झाला आहे. या सत्याकडे तटस्थतेने पाहण्यामुळे निर्वाणाचे पहिले दर्शन झाले. याच उदय-व्ययाचे निरंतर दर्शन घेत घेत प्रगतीच्या पुढील अवस्था दृष्टीपथात येतील._
_*शेतकरी शेतात परिश्रम करतो. नांगरट करतो. बीज पेरतो. तेव्हाच फळ प्राप्त होते. आता मी शील प्रतिष्ठित बुद्ध कन्या झाले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने अप्रमत्त होऊन पुरुषार्थ केला तर परममुक्त अवस्थेला निश्चितच पोहोचेन असा दृढ निश्चय करून ती आपल्या पर्णकुटीत विपश्यना करण्यास बसली.*_
_*जवळच जळणाऱ्या दिव्याची ज्योत मंद होत होती. ती वात सुईच्या टोकाने ठीक करण्याचा प्रयत्न करीत असतांनाच विझून गेली. आणि अंतर्बोध जागला. ज्याप्रमाणे या दिव्याची ज्योत मालविली त्याप्रमाणे माझ्या मनांतील लोभ, द्वेष आणि मोह या संस्कारांची ज्योत विझली तर मानवी जीवनाचे सार्थक होईल.*_
_*पटाचाराचा दृढनिश्चय पक्का झाला. विपश्यना साधनेशी एकरूप झाली. शरीर आणि मनाच्या प्रपंपाचे, त्याच्या अनित्यतेचे लक्षण तटस्थ भावनेने निरीक्षण करता अंतर्मनाच्या गाभाऱ्यात सुप्तावस्थेतील संस्काराचे पापुद्रे निखळू लागले. रात्र संपण्यापूर्वीच ती स्रोतापन्न अवस्थेतून सकदागामी नंतर पुढे अनागामी व अनागामी अरहंत अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचली. भवचक्राचा - जन्ममरणाचा फेरा संपला. नितांत मुक्तावस्था प्राप्त झाली. मानव जीवन सफल झाले. सार्थकी लागले.*_
_*पटाचारा भगवान बुद्धांच्या प्रमुख शिष्यांतील एक बनली. ज्या थोड्याशा भिक्षु भिक्षुणींना, गृहस्थ- गृहिणींना भगवानांनी 'अग्र' उपाधी प्रदान केली. त्यांत पटचारा ही एक होती. भिक्षुणीच्या विनय नियमांना जाणणाऱ्या व चांगल्या प्रकारे पालन करणाऱ्या साध्वीमध्ये तिची गणना अग्रगण्य स्थानी केली जाऊ लागली. तिने आपले संपूर्ण उर्वरित जीवन आपल्या सारख्याच दुःखपीडित स्त्रियांना धर्माच्या मार्गावर आणून दुःखमुक्त करण्यातच घालविले. आपल्या कल्याणासहित अनेकांच्या कल्याणाला कारण झाली. पटाचारा 'विपश्यना' मिळाल्याने आणि विपश्यनेला पटाचारासारखी साध्वी मिळाल्याने दोघीही धन्य झाल्या.*_
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २९/०८/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_26.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment