Monday, 8 August 2022

समस्येचे मूळ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_समस्येचे मूळ_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          *_भगवान बुद्ध म्हणत, 'दुःखाचे मूळ अगदी तळातून शोधा'.' त्यांना मुक्ती मिळाली त्या रात्री ध्यानाला बसतांना त्यांनी दृढ निश्चय केला होता की दुःख कसे निर्माण होते व ते निवारण्याचा मार्ग कोणता ह्याचा शोध घेतल्याशिवाय ध्यानातून उठायचेच नाही..._*

                       *_१) दुःखाची स्पष्टता_*

              _दुःखाचे अस्तित्व भगवान बुद्धांनी अगदी स्पष्ट जाणले. दु:खाचे अस्तित्व है कितीही नीरस असले तरी ते अटळ असे सत्य आहे. आयुष्याची सुरुवातच दुःखातून होते. आपण जेव्हा मातेच्या गर्भात असतो तेव्हा तेथील अवस्थेचे स्मरण किंवा ज्ञान आपल्याला नसते. पण आईच्या पोटातून जेव्हा आपण बाहेर येतो, तेव्हा आपण रडतच येतो सर्वसाधारण अनुभव असा आहे. जन्म हा एक फार मोठा आघात आहे._

             _जन्माला आलेल्या आपल्या सर्वांना दुःख, आजारपण आणि म्हातारपण यांना सामोरे जावे लागणारच आहे. पण तरीसुद्धा आपण कितीही आजारी असलो, कमजोर झालो असलो, वृद्धापकाळामुळे जर्जर झालेलो असलो तरी देखील आपल्यातील कोणालाही मृत्यू नको असतो. कारण मृत्यू हे फार मोठे दुःख आहे._

              _सगळ्याच सजीव प्राण्यांना ही दुःखे सहन करावीच लागतात आणि आपल्या आयुष्य संक्रमणात आणखीही अनंत मानसिक व शारीरिक दुःखे भोगावी लागतात. अनेक दुःखात आपण अडकतो व सुखापासून वंचित होतो. *आपल्याला जे हवे असते ते मिळत नाही. उलट जे नको असते तेच आपल्या वाट्याला येते. ह्या सर्व घटना म्हणजेच दुःख !*_

            _थोडा खोलवर विचार करणाऱ्या कोणालाही या घटनांमधील वरवरची दुःखे सहज समजू शकतात, परंतु बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांचे मात्र या बुद्धीच्या मर्यादितील तुटपुंज्या स्पष्टीकरणाने समाधान झाले नाही. दुःखाचे खरे स्वरूप अनुभवण्यासाठी त्यांनी अंतर्मनात शोध घेणे चालूच ठेवले. त्यांना असे दिसून आले की *पाचही स्कंधांची आसक्ती हेच दुःखाचे खरे कारण आहे. अतिशय सूक्ष्म स्तरावर विचार केल्यास असे आढळते की, आपल्या शरीर व मनाबद्दल आपण प्रत्येकाने निर्माण केलेली अमर्याद आसक्तीच ह्या दुःखाला कारणीभूत आहे. आपले शरीर आणि विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार यांनी युक्त असे मन, ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया असूनसुद्धा ह्या 'मी' बद्दल आपल्याला प्रचंड आसक्ती असते. जे प्रत्यक्षात क्षणोक्षणी बदलत असते. अशा काल्पनिक असत्य 'मी' ला आपण कितीतरी बांधून घेत असतो. त्यात इतके गुंतून राहत असतो की ज्याचा परिणाम केवळ दुःखातच होतो.*_

                    *_२) आसक्ती_*

            _आसक्तीचे अनेक प्रकार आहेत. प्रथम शारीरिक सुखात आनंद शोधणाऱ्या सवयीबद्दल आसक्ती वाटते. मद्य पिणारा, मद्यप्राशनाने आपली व्यसनाधीनता वाढते हे माहित असूनसुद्धा मद्य पिण्यामुळे होणाऱ्या सुखद संवेदनांचा अनुभव घेण्यासाठी मद्य पिणे पसंत करतो. त्याचप्रमाणे आपण सुखद संवेदनांच्या अभिलाषेच्या आधीन जातो. *एक इच्छा पूर्ण होते न होते तोच आपले मन दुसऱ्या इच्छेच्या मागे धाव घेते. कोणत्याही वस्तूची अभिलाषा पूर्ण झाल्यावर ज्या सुखद संवेदना होतात त्या मिळवण्यासाठी ही हाव वाढत जाते.* वस्तू कोणती. ही गोष्ट दुय्यम ठरते. आपल्याला हव्या असतात त्या सुखद संवेदना. आणि ही हाव, कधीही तृप्त न होणारी व्यसनाधीनता निर्माण करते. ज्याप्रमाणे मद्य पिणारा आपल्याला झिंग यावी म्हणून प्रत्येक वेळेला आपला डोस वाढवीत जातो. अगदी त्याचप्रमाणे सुखाची तृप्ती करण्यासाठी ही हाव हळूहळू वाढतच जाते. अशाप्रकारे अनेक गोष्टी प्राप्त होऊन सुद्धा आपण तृप्त होतच नाही व जोपर्यंत हाव संपत नाही तोपर्यंत आपण आनंदी, सुखी होणार कसे ?_

                _*दुसरी मोठी आसक्ती म्हणजे 'मी', अहं विषयी आपण निर्माण केलेली आपली प्रतिमा.* आपणा सर्वांना हा 'मी' जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती वाटते. लोहचुंबकाला लोहकण चिटकून रहावेत तसेच आपण ह्या 'मी' मध्ये गुंतून, अडकून राहतो. लोहचुंबक जसा आपल्या भोवती असणाऱ्या लोहकणांना आपण केंद्रबिंदू मानून पाहिजे तसे आपोआपच खेचून घेतो, अगदी त्याच प्रमाणे आपल्या जन्मजात प्रेरणेने आपण आपल्या भोवताली आपल्या आवडीप्रमाणे सभोवतालचे जग गोळा करतो. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जवळ करतो व न आवडणाऱ्या दूर करतो. पण जगात राहणाऱ्या लोकांत आपण एकटेच नसतो. आपल्या ह्या 'मी' च्या आशा-आंकाक्षा दुसऱ्या 'मी' शी घासणारच व त्यातून संघर्ष हा निर्माण होणारच. एकाने तयार केलेली रचना ही दुसऱ्याच्या रचनेशी घासून कुरबुरी निर्माण करणारच. ह्या दुसऱ्या 'मी' मुळे आपणही आकर्षण व अपकर्षण याची शिकार होणारच! या सर्वाचा परिणाम असमाधान व दुःख ! त्यांचा सामना आपल्याला टाळता येणार नाही._

             _*पुढे आपली ही आसक्ती आपल्यापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचे क्षेत्र 'मी' व 'माझे' पर्यंत वाढते.* 'मी' ची प्रतिमा जपण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्या जवळच्या असतात, ज्यांच्याशी आपला संबंध येतो, ज्यांची आपल्याला मदत होते, त्या साऱ्यांबद्दल आपण प्रचंड आसक्त होतो. है "माझे जर नित्य असते तर ह्या आसक्तीमुळे कोणत्याही समस्या निर्माण झाल्या नसत्या. कारण ह्यांचा उपभोग या 'मी' ला शेवटपर्यंत घेता आला असता. पण दुर्दैवाने तसे नसते. त्या 'मी' ला 'माझे' पासून एक ना एक वेळेस दूर जावे लागते. *निरोपाची केव्हा ना केव्हा तरी अटळ आहे आणि त्या वेळेस 'माझे' बद्दलची, 'मी' ची आसक्ती जेवढी जास्त तेवढे जास्त दुःख ह्या 'मी' ला होणार.*_

           _*आसक्तीची पुढची पायरी 'मी', 'माझे' वरून 'माझे विचार', 'माझ्या श्रद्धा यांचे रूप घेते.* 'ह्या श्रद्धा, हे विचार ह्यात तथ्य असो वा नसो. ह्या कितीही योग्य वा अयोग्य असोत, आपण जर यांचेबद्दल आसक्ती निर्माण केली तर आपण नक्कीच दुःखी होणार. आपणा सर्वांची अशी खात्री असते की आपले स्वतः विचार, आपल्या परंपरा, ह्याच सर्वात श्रेष्ठ आहेत व त्यावर जर कोणी टीका केली तर ती ऐकून देखील आपण अस्वस्थ होतो. आपण इतरांना आपले स्वतःचे विचार, आपल्या परंपरा, ह्याच सर्वात श्रेष्ठ आहेत व त्यावर जर कोणी टिका केली तर ती ऐकून देखील आपण अस्वस्थ होतो. आपण इतरांना आपले विचार, आपल्या श्रद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो व त्यांनी जर त्या स्वीकारल्या नाहीत तर आपण अस्वस्थ होतो. परंतु प्रत्येक माणसाला त्याचे स्वतःचे विचार त्याच्या स्वतःच्या श्रद्धा असतात हे मात्र आपण विसरतो. कोणते विचार बरोबर आहेत, योग्य आहेत याची चर्चा देखील निरर्थक असते. त्यापेक्षा *सर्व पूर्वग्र बाजूला सारून सत्य काय आहे याचा शोध घेणे फायद्याचे नाही का? पण आपले विचार व श्रद्धा यांच्या बद्दलची आसक्ती आपल्याला हे करू देत नाही व आपणास दुःखी बनवते.*_

             _*अजून एक आसक्ती असते, ती आपल्या 'संप्रदाय व कर्मकांडाविषयी!" या गोष्टींचा मूलभूत अर्थ समजावून घेण्यापेक्षा आपण त्याच्या बाह्य अवडंबरांनाच, वरपांगीपणालाच जास्त महत्त्व देऊन जो कोणी असे कर्मकांड किंवा आचरण करीत नाही तो माणूस खरा धार्मिक नाही असेच मानतो.* खऱ्या गाभ्याशिवाय कर्मकांड म्हणजे निव्वळ रिकामे कवच होय आपण विसरतो. राग, लोभ वासना व दुर्भावना यांनी भरलेल्या अंतःकरणाने केलेली ईश्वराची भक्ती, प्रार्थना किंवा कर्मकांड हे निरर्थक, कवडीमोलाचे व कुचकामी असते. आपणास जर खरे धर्मनिष्ठ व्हावयाचे असेल, आपला धर्माकडील कल विकसित करावयाचा असेल, तर आपले अंतःकरण शुद्ध केले पाहिजे. ते सर्वाबद्दलच्या करुणेने भरून घेतले पाहिजे. संप्रदायाची आसक्ती आपल्याला त्या कर्मकांडापासून दूर होऊ देत नाही व आपण धर्माच्या खऱ्या गाभ्यापासून वंचित राहून त्याच्या निव्वळ कवचाला चिकटून राहतो. *धर्माचे खरे सार न समजल्यामुळे नेहमी दुःखीच राहतो.*_

       *_आपल्या सर्व दुःखांची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या आसक्तीमुळे होते, आसक्ती व दुःख यांची वाटचाल बरोबरच होत राहते._*


          *_३) नियमबद्ध उत्पत्ती [प्रतीत्य-समुत्पाद ]_*

*_दुःख निर्माण करणारी कारणे व परिणाम यांची साखळी_*

                *_आसक्ती कशामुळे निर्माण होते ? आसक्ती कशी निर्माण होते ? तर आवड व नावड यांच्या क्षणिक मानसिक प्रतिक्रियेमुळे आसक्ती निर्माण होते असे बोधिसत्व-सिद्धार्थ गौतम यांना स्वतःच्या स्वभावाचे विश्लेषण करीत असतांना आढळले. क्षणाक्षणाला वाढणाऱ्या व प्रगटणाऱ्या सुप्त मनातील प्रतिक्रियाच प्रचंड शक्तिशाली राग व द्वेष यांच्या द्वारे आसक्ती निर्माण करतात. क्षणिक प्रतिक्रियांचेच प्रगट रूप म्हणजे आसक्ती आसक्ती हेच दुःखाचे तात्कालिक कारण आहे._*

           _आवड व नावड यांची प्रतिक्रिया कशी निर्माण होते ? जरा खोलवर शोध घेतला तर असे आढळेल की आवड व निवड ही संवेदनांची अपत्ये आहेत. सुखद संवेदनांमुळे आपल्याला आवड निर्माण होते, तर नावडीचे कारण आहे दुःखद संवेदना. सुखद संवेदना हव्याहव्याशा वाटतात तर दुःखद संवेदना नकोशा होतात._

          *_संवेदना म्हणजे काय ? त्या कशा निर्माण होतात? आपल्या स्वतःचे परीक्षण करतांना भगवान बुद्धांना असे आढळले की, त्या संपर्कामुळे, विषय-स्पर्शामुळे निर्माण होतात. दृश्यांचा डोळ्यांशी संपर्क, आवाजाचा कानाशी संपर्क, गंधाचा नाकाला होणारा संपर्क, जिभेला चवीचा होणारा संपर्क, त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा शरीराला होणारा संपर्क, मनाचा विचारांशी, भावनेशी, भूतकाळाच्या आठवणी, भविष्याची स्वप्ने किंवा कल्पना ह्यांच्याशी होणाऱ्या संपर्कामुळे संवेदन निर्माण होतात. पाच ज्ञानेंद्रिये व मन यांच्या द्वारे आपण सर्व जगाचा अनुभव घेतो कोणतीही वस्तू किंवा घटना ह्याचा त्या त्या वस्तूच्या ज्ञानेंद्रियांशी व मनाशी जेव्हा संबंध येतो तेव्हा त्या अनुभवानुरूप सुखद किंवा दुःखद संवेदना निर्माण होतात._*

             _प्रथमतः स्पर्श किंवा संबंधच का येतो? ह्याचे परिशीलन करीत असतांन भगवान बुद्धांना असे आढळले की, सहा ज्ञानेंद्रिये - पाच शारीरिक व एक मन जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत त्यांचे त्या त्या विषयाचे स्पर्श अनिवार्य आहेत. जग हे दृश्य, आवाज, गंध, चव, स्पर्श, असंख्य विचार व चिंतन अनेक घटनांनी भरलेले आहे. जोपर्यंत आपली ग्रहणशक्ती कार्यरत आहे, तोपर्यंत स्पर्शसंबंध अटळ आहे._

              _ही सहा ज्ञानेंद्रिये अस्तित्वात का येतात? कारण त्याचे अस्तित्व हे मन [नाम] व शरीर [रूप] यांच्या जीवन प्रवाहासाठी अत्यावश्यक आहे. तर मग मन व शरीर यांचा जीवन प्रवाह का असतो? आणि तो कशामुळे वाहतो? आपल्या प्रखर तपश्चर्येत सिद्धार्थ गौतमांना असे आढळले की, *मन व शरीर यांचा जीवन प्रवाह विज्ञानामुळे निर्माण होतो.* ही ज्ञानशक्तीच ज्ञाता व ज्ञान, कर्ता व कर्म "मी" व इतर अशी जगाची विभागणी करते आणि हा फरकच मी कोण आहे याची विशिष्टता आणतो. प्रत्येक क्षणी विज्ञान निर्माण होते व विशिष्ट शारीरिक व मानसिक आकार घेते. प्रत्येक पुढल्या क्षणी हे विज्ञान नवे वेगळे रूप धारण करते. आपल्या संपूर्ण आयुष्यभर जाणिवेचा बदलता प्रवाह वाहत असतो व सरतेशेवटी मृत्यू येतो. परंतु विज्ञान तेथेही संपत नाही. मधे कोठेही न थांबता पुढच्या क्षणी ते दुसरा आकार घेते, दुसरे रूप घेते. विज्ञानाचा हा प्रवाह एका अस्तित्वातून दुसऱ्यात, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात असा अखंड वाहत असतो._

            _पुन्हा प्रश्न येतोच की, हा *विज्ञानाचा प्रवाह कशामुळे वाहतो? हा प्रवाह संस्कारांना आधार बनवून निर्माण होतो. मन हे सतत संस्कार बनवतच असते आणि प्रत्येक प्रतिक्रिया [ संस्कार ] ही विज्ञानाच्या प्रवाहाला प्रेरणा देते व त्यामुळेच विज्ञान पुढच्या क्षणापर्यंत टिकते. प्रतिक्रिया जेवढी शक्तिशाली, तेवढीच शक्तिशाली प्रेरणा ती उत्पन्न करते.* छोटीशी क्षणिक प्रतिक्रिया थोडावेळच विज्ञानाचा प्रवाह चालवू शकते. पण जेव्हा आवड व नावड यांच्या प्रतिक्रिया तीव्र स्वरूप धारण करतात, विकसित होतात, तेव्हा त्या मात्र दीर्घकाळ चालणारा विज्ञानाचा प्रवाह, काही सेकंद, काही मिनिटे, काही तास असा टिकवू शकतात. आवड व नावड ह्या प्रतिक्रिया अधिक तीव्रतर झाल्यास त्या काही दिवस, महिनेच काय पण वर्ष वर्ष सुद्धा प्रवाह टिकवू शकतात. आणि काही प्रतिक्रियांची पुनरावृत्ती होत होत त्या तीव्रतम होत गेल्या, वाढत गेल्या तर त्यांची ताकद विज्ञानाचा प्रवाह एका क्षणातून दुसऱ्या एका तासातून दुसऱ्या एका दिवसातून दुसऱ्या एका वर्षातून दुसऱ्यातच काय पण एका जन्मातून दुसऱ्या जन्मात वाहवण्यासही पुरेशी ठरते._

           *_ह्या प्रतिक्रिया, क्लेशसंस्कार कशामुळे निर्माण होतात? खोलवर सत्याचे निरीक्षण करतांना बोधिसत्वांना असे आढळले की, अविद्येमुळेच प्रतिक्रियांचा जन्म होतो. आपण प्रतिक्रिया करतो आहोत याचे भानच आपल्याला नसते.* ज्यावर आपण प्रतिक्रिया करत असतो. त्याच्या खऱ्या स्वरूपाचे आपल्याला ज्ञानच नसते. आपल्या क्षणभंगुर व्यक्तिनिरपेक्ष अस्तित्वाची आपल्याला कल्पनाच नसते. आणि त्याबद्दलच्या आसक्तीमुळे आपल्याला दुःखाखेरीज काहीच मिळत नाही. आपल्या खऱ्या अस्तित्वाच्या अविद्येमुळेच आपण अंध प्रतिक्रिया करतो. आपण प्रतिक्रिया करतो आहोत ह्याचेही भान न बाळगता आपल्या अंध प्रतिक्रिया नुसत्या सुरूच नसतात, तर त्या एक सारख्या तीव्रतर होत जातात. आणि याप्रमाणे आपण अविद्येमुळे या सवयीचे गुलाम बनतो. या प्रकारे दुःख चक्र सतत फिरतच राहतेः-_

*_अविद्येच्या आधारे संस्कार निर्माण होतात._*

*_संस्कारांच्या आधारे विज्ञान निर्माण होते._*

*_विज्ञानाच्या आधारे मन [नाम] व शरीर [रूप] यांची जीवनधारा निर्माण होते. _*

*_मन व शरीर ह्या आधारे सहा इंद्रिये अस्तित्वात येतात._* 

*_सहा इंद्रियांच्या आधारे [विषय] स्पर्श निर्माण होतो._* 

*_स्पर्शाच्या आधारे संवेदना निर्माण होते._* 

*_संवेदनांच्या आधारे तृष्णा निर्माण होते._*

*_तृष्णेच्या आधारावर उपादान [आसक्ती] निर्माण होणारच._* 

*_उपादानाच्या आधारे 'भव' [निर्मिती] प्रक्रिया सुरू होते._* 

*_"भव' प्रक्रियेच्या आधारे जन्म होतो._*

_*जर जन्म झाला तर त्याबरोबर वार्धक्य, मृत्यू, शोक, क्रंदन, शारीरिक व मानसिक यातना आणि क्लेश येणारच._*

             _अशाप्रकारे हा दुःखाचा डोंगर निर्माण होतो. कारण व परिणाम यापासून निर्माण झालेल्या दुःखाच्या साखळीमुळे, प्रतीत्यसमुत्पादामुळे आपण आपल्या सद्यस्थितीला आलो आहोत. दुःखमय भविष्यकाळाशी सामना करीत आहोत._

               _सरते शेवटी सिद्धार्थ गौतमाला सत्याचा उलगडा झाला. *'अहं' च्या खऱ्या स्वरूपाबद्दलच्या अविद्येतूनच दुःख निर्मितीला सुरुवात होते. दुःखाचे पुढचे कारण म्हणजे अविद्येमुळे अंध प्रतिक्रिया करण्याची मनाला लागलेली सवय, 'संस्कार' यालाच पाली भाषेत 'सङ्खार' असे नाव आहे. आपण राग-द्वेषाच्या प्रतिक्रिया निर्माण करतो त्यामुळे आसक्ती, तृष्णा निर्माण होत असते. त्यातूनच सगळ्या दुःखांचा जन्म होतो. अंध प्रतिक्रिया करण्याच्या सवयीलाच भविष्य निर्माण करणारे कर्म म्हटले आहे. ह्या प्रतिक्रिया केवळ आपल्या मूळ स्वभावाच्या, सत्य स्वभावाच्या अज्ञानामुळेच निर्माण होतात. म्हणूनच अविद्या, राग व द्वेष हे त्रिकुटच आपल्या आयुष्यातील सर्व दुःखनिर्मितीच्या मुळाशी आहे.*_

           *_४) दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग_*

           _एकदा दुःखनिर्मितीचे कारण सापडल्यावर भगवान बुद्धांनी दुःखाचा अंत कसा करायचा या प्रश्नाची तड लावावयाचे ठरवले तेव्हा कारण व परिणाम यामुळे निर्माण होणाऱ्या कर्माची त्यांना आठवण झाली. याच्या अस्तिवामुळे ते निर्माण होते, याच्या निर्मितीतूनच त्याची निर्मिती होते. याचे अस्तित्व संपले की त्याचेही अस्तित्व संपते. याचा अंत झाला की त्याचाही अंत झालाच. *'कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. जर कारण नाहीसे झाले तर तो परिणामही होणार नाही ह्याप्रकारे दुःखनिर्मितीचे चक्र उलटे फिरवता येईल :*_

*जर अविद्येचा समूळ नाश झाला तर सर्व संस्कार [प्रतिक्रिया] अंत पावतील.* 

*जर सर्व संस्कारांचा अंत झाला तर विज्ञान अंत पावेल.*

*जर विज्ञान अंत पावले तर मन [नाम] व शरीर [रूप] यांची जीवनधारात अंत पावेल.*

*जर मन- शरीर जीवनधारा अंत पावली तर सहा ज्ञानेंद्रिये अंत पावतील*

*जर सहा ज्ञानेंद्रिये अंत पावली तर स्पर्श अंत पावेल.*

*जर स्पर्शाचा अंत झाला तर संवेदना अंत पावतील.*

*जर संवेदना अंत पावली तर तृष्णा अंत पावेल. जर तृष्णा अंत पावली तर आसक्ती अंत पावेल.*

*जर आसक्ती अंत पावली तर निर्मिती [भव] अंत पावेल.*

*जर निर्मिती अंत पावली तर जन्माचा अंत होईल.*

*जर 'जन्म' अंत पावला तर त्याबरोबर वार्धक्य, मृत्यू, शोक, क्रंदन, मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेश यांचा अंत होईल.* 

          _*आणि या प्रकारे सर्व दुःखचक्रच थांबेल. नाश पावेल, अंत पावेल '*_

             _आपण जर आपले अज्ञान नाहीसे केले तर विविध प्रकारच्या दुःखाला कारणीभूत होणाऱ्या अंध प्रतिक्रिया थांबतील आणि एकदा का दुःख संपले की आपण खऱ्या सुखाचा व शांतीचा अनुभव घेऊ शकू. दुःखचक्राचे अशाप्रकारे मुक्तीचक्रात रुपांतर करता येऊ शकते._

      _सिद्धार्थ गौतमांनी ज्ञानप्राप्तीतूनच अशाप्रकारे मुक्तीचा साक्षात्कार करून घेतला व हाच मार्ग त्यांनी जिज्ञासूंना शिकवला. ते म्हणत,_

        *_'दुष्कृत्यांमुळे आपणच आपले नुकसान करून घेतो व अशुद्ध होतो. सत्कृत्यांमुळे आपणच आपले भले करू शकतो व शुद्ध होतो._*

          _दुःख निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांना आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत, या जबाबदारीचा स्वीकार करून आपण दुःखमुक्त कसे व्हावे हे आपणच शिकू शकतो._

          *_५) पुनर्जन्मांची धारा_*

            _*प्रतीत्यसमुत्पादाच्या चक्रावरून बुद्धांनी पुनर्जन्माची प्रक्रिया समजावून सांगितली आहे. यालाच 'संसार' असेही म्हणतात. त्याकाळी भारतात पुनर्जन्मांची कल्पना सर्वसाधारणपणे सत्य म्हणून स्वीकारलेली होती. बऱ्याच लोकांना आज ही कल्पना परकी वाटते, एक असमर्थनीय संकल्पना वाटते.* ती स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी ही संकल्पना काय आहे, काय नाही हे समजावून घेणे जरूरीचे आहे._

         _मागील व पुढील जन्माची अखंड धारा, पुन्हा पुन्हा येणाऱ्या अस्तित्वाचे चक्र म्हणजेच संसार. आपली कर्मेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास प्रेरक ठरतात._

          _आपण केलेल्या उच्च किंवा नीच कर्मावरून आपणास उच्च वा नीच जन्म प्राप्त होतो, ह्या जन्मातील चांगल्या किंवा वाईट कृत्यांची परिणती पुढच्या जन्मी बक्षिसाच्या किंवा शिक्षेच्या रूपात होते, अशी कल्पना जे संप्रदाय पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांमध्ये थोड्याफार फरकाने मानली जाते. *बुद्धांना मात्र असे आढळले की, कितीही उच्च कोटीतला का जन्म असेना, त्यातही दुःख अटळ आहे म्हणूनच आपण सुदैवी पुनर्जन्माची अपेक्षा किंवा त्यासाठी प्रयत्न न करता कुठल्याही प्रकारच्या जन्मापासूनच मुक्तीची अपेक्षा केली पाहिजे. जन्ममुक्तीच सर्वात सुदैवी आहे. कारण आपले ध्येय हे दुःखातून पूर्णपणे सुटका हेच असावयास पाहिजे. सर्व दुःखचक्रातून मुक्त झाल्यावरच आपल्याला शुद्ध, निर्मळ आनंदाची प्राप्ती होते की, जी जगातील कोणत्याही सुखकारक अनुभवांपेक्षा वरच्या दर्जाची असते. भगवान बुद्धांची शिकवण ह्या जन्मातच ते सुख प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन करते.*_ 

       _*'संसार' म्हणजे सर्वसामान्य मानतात तशी ती कल्पना नाही की, ज्यात वेगवेगळ्या जन्मात आत्मा आपले अस्तित्व कायम राखून पुन्हा पुन्हा फिरत असतो. खरे तर असे घडत नाही. वेगवेगळ्या जन्मात न बदलणारे असे अस्तित्व नसतेच, यावर त्यांनी भर दिला.* ते म्हणत, 'हे अस्तित्व जसे गाईपासून दूध मिळते, दूधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप' तसे जेव्हा ते दूध असते तेव्हा त्याला आपण दही म्हणत नाही किंवा लोणी वा तूपही समजत नाही. त्याचप्रमाणे विचार करताना केव्हाही सध्याच्या अस्तित्वाची अवस्थाच खरी समजली पाहिजे, ती भूत वा भविष्य असत नाही._

          _भगवान बुद्धांचा तोच 'मी' 'अहं' पुन्हा पुन्हा अवतार घेता या कायम तत्त्वावरही विश्वास नव्हता. अगर मागील जन्म किंवा पुढील जन्म नाही हे पण त्यांना मान्य नव्हते. त्यापेक्षा त्यांना जे आढळले व त्यांनी जे शिकविले ते केवळ निर्मितीची एका जन्मातून दुसऱ्यात सातत्याने होणारी क्रिया. आणि जोपर्यंत आपण आपल्या कर्मसंस्कारांचे बळ या क्रियेला देतो तोपर्यंत ही क्रिया सुरुच राहते._

           _*जरी कोणाचा या सध्याच्या जन्माखेरीज कोणत्याही अस्तित्वावर विश्वास नसला तरी प्रतीत्यसमुत्पादाची उत्पत्ती त्यांना समजू शकते. प्रत्येक क्षणी जेव्हा आपल्या अंध प्रतिक्रियांबद्दल आपण बेसावध असतो तेव्हा तेव्हा आपण दुःख निर्माण करीत असतो. याची प्रचिती आपल्याला आत्ता, ह्या इथे येते. जेव्हा आपण अविद्या बाजूला सारून अंध प्रतिक्रिया थांबवतो, त्याच क्षणी निर्माण होणाऱ्या सुखाचा व शांतीचा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते. स्वर्ग वा नरक या इथे व आत्ताच अस्तित्वात असतो. त्यांचा अनुभव आपण या जन्मात व याच शरीरात घेऊ शकतो. भगवान बुद्ध म्हणत, 'जरी आपली पुनर्जन्मावर श्रद्धा नसली, चांगल्या कृत्याबद्दल पुढील जन्मी मिळणारे पुरस्कार किंवा वाईट कृत्यामुळे मिळणारी शिक्षा जरी आपल्याला अमान्य असली, तरी याच जन्मात येथेच आपण द्वेष, दुर्भावना व चिंता यापासून मुक्त राहून सुखी व समाधानी जीवन जगू शकतो.*_

        *_पुनर्जन्मावर श्रद्धा असो वा अविश्वास असो, आपण ह्या शिकवणुकीच्या उपयोगाने आपल्या सध्याच्या आयुष्यातील अंध प्रतिक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांशी सामना करू शकतो. आता आपल्याला भेडसावत असणाऱ्या समस्या सोडवून, अंध प्रतिक्रियांमुळे दुःख निर्माण करण्याची आपली सवय घालवून, दुःखमुक्तीकडे वाटचाल कशी करता येईल, आनंदी जीवन कसे मिळवता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे._*

    *_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

                                *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जगण्याची कला_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_14.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...