*१०४ वर्षानंतर*
(२१/०७/२०१८)
मूळलेखक - राजेश चंद्रा ( हिंदी )
मराठी भाषांतर - अरविंद भंडारे
भगवान बुध्दांद्वारे सांगितलेले कम्मठ्ठान अर्थात ध्यान साधनेचा निष्ठापूर्वक अभ्यास करत लकुण्टक भद्दीय अर्हत झाले. अर्हत झाल्यानंतर ते तथागतांच्या दर्शनास आले. भगवंतांना वंदन करून ते धम्मसभेतून हलक्या पावलांनी जसे उठून जाऊ लागले तसे भगवंतांनी त्यांना उद्देशित करत भिक्खूंना संबोधित केले:
"पस्सथ भिक्खवे, अयं भिक्खु मातापितरो हन्त्वा निद्दुक्खो हुत्वा याति,
हे पहा भिक्खूनो, हा भिक्खु माता पित्याची हत्या करून दुख मुक्त झालाय.
"माता पित्याची हत्या करून हा भिक्खु दुख मुक्त झालाय"
भगवंताचे हे शब्द ऐकून सगळे भिक्खू एक दुसऱ्यांकडे आश्चर्यचकीत होऊन पाहू लागले.
ते या गाथेचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात भगवंतांनी आणखी एक गाथा उच्चारून सर्वांना अचंबित करून सोडले.
मातरं पितरं हन्त्वा राजानो द्वे च खत्तिये ।
रट्ठं सानुचरं हन्त्वा अनीघो याति ब्राम्हणो ।।
माता पिता आणि दोन क्षत्रिय राजांची हत्या करून तसेच राष्ट्राचा नाश व सोबत्यांची हत्या करून ब्राम्हण निष्पाप होतात.
या गाथांना जर तश्याच शाब्दीक अर्थात समजण्याचा प्रयत्न केला तर त्या भ्रम निर्माण करतात. त्या केवळ भ्रमच उत्पन्न करत नाहीत तर अर्थाचा अनर्थ करतात.
परंतु भगवंतांचे हे कथन प्रतीकात्मक आहे.
संपूर्ण त्रिपिटकात अनेक प्रसंग असे आहेत जिथे भगवंत प्रतिकांच्या भाषेत उपदेश करतात.
दिघ्घनिकायातील सिगालवादसुत्त प्रतिकवादाचे सर्वश्रेष्ठ आणि लोकप्रिय उदाहरण आहे. ज्यामध्ये भगवंत सिगाल नावाच्या युवकाला सहा दिशांचे अर्थ समजवतात.
पूर्व दिशा अर्थात माता पिता, पश्चिम दिशा म्हणजे पत्नी-मुले, उत्तर दिशा म्हणजे मित्र आणि नातेवाईक, दक्षिण दिशा अर्थात गुरू व आचार्य, खालची दिशा म्हणजेच सेवक, वरची दिशा म्हणजेच अर्हत श्रमण.
हा युवक आपल्या दिवंगत वडीलांच्या सांगण्यानुसार सकाळी सहा दिशांची पूजा करत होता. हे भगवंतांनी पाहिल्यानंतर त्याला सहा दिशांच्या प्रतिकांचे अर्थ सांगितले व त्यांच्या पूजेचे अर्थ सांगितले.
दिघ्घनिकाय म्हणजेच दिर्घ अर्थात दिर्घ प्रवचनांचा संग्रह. हे सिगाल सुत्त दिघ्घनिकायात आहे.
प्रतिकवादाची पराकाष्ठा बघायची असेल तर मज्झिम निकायातील वम्मीक सुत्त वाचावयास हवे. त्यातील प्रतीकांचा अर्थ समजून कुमार कश्यप अर्हत झाले.
इथे लकुण्टक भद्दीय यांच्यासंदर्भात या गाथा ऐकून धम्मसभेत बसलेले काही भिक्खु सोतापन्न झाले, काही सकृदागामी, कोणी अनागामी झाले तर कोणी अर्हत. खुद्दकनिकायातील धम्मपद अठ्ठकथेच्या पकिण्णकवग्गात या गाथांच्या संदर्भात असेच उल्लेख आहेत.
आचार्य अश्वघोष यांनी अट्ठकथांच्या टिकांमध्ये या गाथांवर खुपच सुंदर आणि योग्य प्रतिक व्याख्या केलेली आहे.
लकुण्टक भद्दीय याला उद्देशित करून भिक्खूंना संबोधित करत भगवंत पुढील गाथा म्हणतात.
" पस्सथ भिक्खवे, अयं भिक्खु मातापितरो हन्त्वा निद्दुक्खो हुत्वा याति."
हे पहा भिक्खुनो, हा भिक्खु माता पित्याची हत्या करून दुख मुक्त झालाय.
शब्दावली ध्यान देण्यायोग्य आहे. 'निद्दुक्खो हुत्वा' तो दुख मुक्त झाला.
आणि झाला कसा ?
माता पित्याची हत्या करून.
माता पिता कोण असतात ?
ते जन्मदाता असतात.
आध्यात्मिक अर्थात दुखाची जननी कोण आहे?
दुखाची जननी तृष्णा आहे.
दुखाचे जनक कोण आहेत ?
अस्मिता अर्थात 'मी' पणा म्हणजेच अहंकार.
म्हणजेच दुखाचे माता पिता कोण झाले ?
माता तृष्णा व पिता अहंकार.
आता या प्रतिकांच्या अर्थांना समोर ठेवून भगवंताच्या कथनाला पहा; "अयं भिक्खु मातापितरो हन्त्वा निद्दुक्खो हुत्वा याति" हा भिक्खु माता पित्याची हत्या करून दुख मुक्त झाला.
अर्थात तृष्णा आणि अहंकार यांची हत्या करून हा भिक्खु दुख मुक्त झाला.
भगवंताद्वारे संगायित गाथांमध्ये माता, पिता, क्षत्रिय राजा, क्षोत्रिय राजा, राष्ट्र, सोबती, वाघ, ब्राम्हण या शब्दांचा लौकीक अर्थाशी काही संबंध नाही. ते सर्व आध्यात्मिक प्रतिक आहेत.
माता - तृष्णा
पिता - अहंकार
दोन क्षत्रिय क्षोत्रिय राजा - शाश्वतवादी मिथ्या दृष्टी, उच्छेदवादी मिथ्यादृष्टी.
राष्ट्र - पाच उपादान स्कंध.
अनुचर - राग
पाच व्याघ्र - ज्ञानाची पाच आवरणे.
ब्राम्हण - मैत्री, करूणा, मुदिता, उपेक्खा या चार ब्रम्हविहारात सुप्रतिष्ठित व्यक्ती.
संसाराचा फेरा, जन्म-जरा-मरण, रोग- शोक-दुख हे सर्व कारक आहेत. या प्रतिकांना मनासमोर ठेवून भगवंतांच्या उपदेशित गाथांचे अर्थ समजून घ्या.
मातरं पितरं हन्त्वा राजानो द्वे च खत्तिये ।
रट्ठं सानुचरं हन्त्वा अनीघो याति ब्राम्हणो ।।
माता पिता अर्थात तृष्णा व अहंकार आणि दोन क्षत्रिय राजे म्हणजे मिथ्यादृष्टी, उच्छेदवादी मिथ्यादृष्टीची हत्या करून तसेच राष्ट्र अर्थात पाच उपादान स्कंधांना नष्ट करून सोबती म्हणजेच रागाची हत्या करून ब्राम्हण निष्पाप होतो.
बौध्दिक स्वरूपात आणखी विस्तृत व्याख्या होतील अशी आशा आहे. परंतु भगवंतांच्या वचनांचा योग्य अर्थ ध्यानाभ्यास केल्यानंतर समजतो. जर तिथूनही अर्थ नाही समजला तर अर्थाचा अनर्थ होण्याची संभावना असते. आणखी वरून वचनांची निंदा आलोचना याचा पापदोष घडण्याचा संभव असतो.
तरी भगवंत खुपच विनम्रतेने सांगतात - जसे सोनार सोन्याला आगीत तापवून त्याचा कस तपासतो. तसेच तुम्ही माझ्या वचनांची पारख करा. मगच ते माना.
भगवंत तर आमंत्रण देतात.
एहि पस्सिको - या आणि पहा.
भगवंतांच्या या वचनांच्या अर्थांचा बौध्दिक लोक कधी कधी अनर्थ करून तर्काच्या ऐवजी वितर्क करू लागतात.
भगवंतांच्या या कथनाला सुध्दा पहा.
जसे सोनार सोन्याला आगीत तापवतो.
आगीत तापवणे म्हणजे ध्यानाच्या आगीत तापवणे, विपस्सनेच्या आगीत तापवणे.
बहुतकरून बौध्दिक लोक, इंटेलेक्चुअल लोक ध्यान तर करत नाही आणि बुध्द वचनांचे विवेचन विश्लेषण करू लागतात.
याचे परिणाम काय होतात?
अर्थाचा अनर्थ होतो आणि बुध्दवचनांची हेळसांड केल्याचे पापदोष लागतो.
भगवंतांनी बुध्द वचनांना पारखण्याची सूट दिली आहे, परंतु सोनारासारखी आगीत तापवून म्हणजेच ध्यानसाधनेच्या आगीत तापवून पारखणे. जर तेव्हा दोष दिसले तर जे त्याज्य असेल ते त्यागा व जे ग्राह्य ते ग्रहण करा.
संयुक्त निकायात दोन खुप सुंदर सुत्त आहेत. जे ह्या वेळच्या अमावस्या व पौर्णिमेच्या पवित्र दिवशी सामायिक झाले आहेत. सामायिक या अर्थात कि १३ जुलै, २०१८ ला अमावस्येच्या दिवशी सुर्य ग्रहण आले आहे. तसेच २७ जुलै, २०१८ ला आषाढ पौर्णिमा ज्याला प्रचलित परंपरेत गुरू पौर्णिमा संबोधले जाऊ लागले या दिवशी १०४ वर्षानंतर या शतकातील सर्वात मोठे चंद्र ग्रहण होणार आहे.
एका पंधरवड्यातील सुर्य ग्रहण व चंद्र ग्रहण ही सर्वात दुर्लभ खगोलीय घटना आहे. जी शतकानुशतकात कधी कधी होते. ह्या प्रसंगी बौध्द देशातील श्रध्दाळू उपासक उपोसथ धारण करण्याबरोबर सुर्य ग्रहणादिवशी सुरिय परित्तं व चंद्र ग्रहणादिवशी चन्द परित्ताचे पठन करतात.
ही दोन्ही सुत्तं बऱ्याच काळापासून महापरित्राण पाठाचे अनिवार्य अंग आहे. जर आता या सुत्तांचा पण शाब्दीक अर्थ लावला तर बौध्दिक लोकांच्या टिकेचा चांगला विषय आहे. परंतु याच्या प्रतिक अर्थांना लक्षात घेतले तर परित्तं हि एक रक्षा आहे.
प्रथम या सुत्तांना विना प्रतिक अर्थामध्ये जसे आहेत तसे पाहूया.
चन्द परित्तं ( पालि )
एवं मे सुतं, एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डकस्स आरामे। तेन खो पन समयेन, चन्दिमा देवपुत्तो राहुना असुरिन्देन गहितो होति। अथ खो चन्दिमा देवपुत्तो भगवन्तं अनुस्सरमानो, तायं वेलायं इमं गाथं अभासि:
1. नमो मे बुद्धवीरत्थु विप्पमुत्तोसि सब्बधि।
सम्बाधपटिपन्नोस्मिं तस्स मे सरणं भवाति।।
अथ खो भगव चन्दिमं देवपुत्तं आरब्भ राहुं असुरिन्दं गाथाय अज्झभासि:
2. तथागतं अरहन्तं चन्दिमा सरणं गतो।
राहुं चन्दं पमुञ्चस्सु बुद्धा लोकानुकम्पकाति।।
अथ खो राहु असुरिन्दो चन्दिमं देवपुत्तं मुञ्चित्वा तरमानरूपो येन वेपचित्ति असुरिन्दो तेनुपसंकमि, उपसंकमित्वा संविग्गो लोमहट्टजातो एकमन्तं अट्ठासि; एकमन्तं ठितं खो राहुं असुरिन्दं वेपचित्ति असुरिन्दो गाथाय अज्झभासि:
3. किन्नुसन्तरमानोव राहु चन्दं पमुञ्चसि।
संविग्गरूपो आगम्म किन्नुभीतोव तिट्ठति'ति।।
4. सत्तधा मे फले मुद्धा जीवन्तो न सुखं लभे।
बुद्धगाथाभिगीतोम्हि नो चे मुञ्चेय चन्दिमन्ति।।
चंद्र परित्राण ( मराठी )
असे मी ऐकले आहे की, एके समयी भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामामध्ये विहार करीत होते. त्या समयी देवपुत्र चंद्रमा याला असुरेंद्र राहूने पकडले तेव्हा देवपुत्र चंद्रमा याने भगवंताना स्मरण करून पुढील गाथा म्हटली.
१. हे बुध्दवीर, तुम्हाला माझा नमस्कार आहे.
आपण सर्व प्रकारे विमुक्त आहात. मी भारी विपत्तीत आहे. तेव्हा तुम्ही मला शरण द्या.
तेव्हा भगवंतांनी देवपुत्र चंद्रमा साठी असुरेंद्र राहुला पुढील गाथेत सांगितले.
२. हे असुरेंद्र राहु, देवपुत्र चंद्रमा अर्हत तथागतांना शरण आलाय. बुध्द लोकानुकम्पि आहेत. तुम्ही देवपुत्र चंद्रमा ला मुक्त करा.
तेव्हा असुरेंद्र राहु ने चंद्रमाला सोडून घाबरलेल्या मनस्थितीत जिथे असुरेंद्र वेपचित्री होते तेथे पोहचले. पोहचल्यानंतर रोमांचित होऊन एका बाजूला उभे राहिले. एका बाजूला उभ्या असलेल्या असुरेंद्र राहु ला असुरेंद्र वेपचित्री ने पुढील गाथेत सांगितले.
३. हे असुरेंद्र राहु घाबरलेल्या मनस्थितीत देवपुत्र चंद्रमा ला का तु सोडलेस? आणि भयभीत होऊन इथे का उभा आहेस!
४. देवपुत्र चंद्रमाला सोडण्याचे आदेश बुध्दांनी गाथेत सांगितला. जर देवपुत्र चंद्रमाला सोडले नसते तर माझ्या डोक्याचे सात तुकडे झाले असते. सुखाने जगणे मुश्किल झाले असते.
आणि आता सुरियपरित्तं ( पालि )
एवं मे सुतं, एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डकस्स आरामे। तेन खो पन समयेन, सुरियो देवपुत्तो राहुना असुरिन्देन गहितो होति। अथ खो सुरियो देवपुत्तो भगवन्तं अनुस्सरमानो, तायं वेलायं इमं गाथं अभासि:
1. नमो मे बुद्धवीरत्थु विप्पमुत्तोसि सब्बधि।
सम्बाधपटिपन्नोस्मिं तस्स मे सरणं भवाति।।
अथ खो भगव सुरियं देवपुत्तं आरब्भ राहुं असुरिन्दं गाथाय अज्झभासि:
2. तथागतं अरहन्तं सुरियो सरणं गतो।
राहुं सुरियं पमुञ्चस्सु बुद्धा लोकानुकम्पकाति।।
यो अन्धकारे तमसी पभंकरो
वेरोचनो मण्डली उग्गतेजो ।
मा राहु गिली चरं अन्तलिक्खे
पजं मम राहु पमुञ्च सूरियन्ति।।
अथ खो राहु असुरिन्दो सुरियं देवपुत्तं मुञ्चित्वा तरमानरूपो येन वेपचित्ति असुरिन्दो तेनुपसंकमि, उपसंकमित्वा संविग्गो लोमहट्टजातो एकमन्तं अट्ठासि; एकमन्तं ठितं खो राहुं असुरिन्दं वेपचित्ति असुरिन्दो गाथाय अज्झभासि:
3. किन्नुसन्तरमानोव राहु सुरियं पमुञ्चसि।
संविग्गरूपो आगम्म किन्नुभीतोव तिट्ठति'ति।।
4. सत्तधा मे फले मुद्धा जीवन्तो न सुखं लभे।
बुद्धगाथाभिगीतोम्हि नो चे मुञ्चेय सूरितन्ति।।
सुर्य परित्राण ( मराठी )
असे मी ऐकले आहे की, एके समयी भगवंत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामा त विहार करीत होते. त्या समयी देवपुत्र सुर्यला असुरेंद्र राहु ने पकडले. तेव्हा देवपुत्र सुर्याने भगवंताना स्मरण करून ही गाथा म्हटली.
१. हे बुध्दवीर तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही सर्व प्रकारे विमुक्त आहात. मी भारी विपत्तीत आहे. तेव्हा तुम्ही मला शरण द्या.
तेव्हा भगवंतानी देवपुत्र सुूर्यासाठी पुढील गाथा म्हटली.
२. हे असुरेंद्र राहु, देवपुत्र सुर्य अर्हत तथागतांना शरण आलाय. बुध्द लोकानुकम्पि आहेत. तुम्ही देवपुत्र सूर्याला मुक्त करा.
जो गडद अंधारात प्रकाशमान असतो, जो वैरोचन आभा वलयासह उग्रतेजाने अंतरिक्षात भ्रमण करतो. हे राहु! अशा सुर्याला ग्रासित करू नको. मला शरणागत झालेल्या माझ्या पुत्राला सुर्याला सोडून दे.
तेव्हा असुरेंद्र राहु ने सूर्याला सोडून दिले व घाबरलेल्या मनस्थितीत जिथे असुरेंद्र वेपचित्री होते तेथे पोहचले. पोहचल्यानंतर रोमांचित होऊन एका बाजूला उभे राहिले. एका बाजूला उभ्या असलेल्या असुरेंद्र राहु ला असुरेंद्र वेपचित्री ने पुढील गाथेत सांगितले.
३. हे असुरेंद्र राहु घाबरलेल्या मनस्थितीत देवपुत्र सूर्याला का तु सोडलेस ? आणि भयभीत होऊन इथे का उभा आहेस!
४. देवपुत्र सूर्याला सोडण्याचे आदेश बुध्दांनी गाथेत सांगितला आहे.
जर देवपुत्र सूर्याला सोडले नसते तर माझ्या डोक्याचे सात तुकडे झाले असते व सुखाने जगणे मुश्किल झाले असते.
प्रथमत: वाटते की आपण कोणती तरी पौराणिक मिथक, आख्यान वाचत आहोत, किंवा ऐकत आहोत. असुरेंद्र राहु ने ग्रासित चंद्र आणि सुर्य भगवंतांच्या शरणात आले आहेत. हाथ जोडून मुक्त करण्याची प्रार्थना करत आहेत. आणि भगवंत असुरेंद्र राहु ला चंद्र आणि सुर्याला मुक्त करण्याचे आदेश देत आहेत. त्यानंतर असुरेंद्र राहु घाबरून त्यांना मुक्त करतो. संपूर्ण प्रसंग एखाद्या मिथकाचे कथानक वाटते.
खरं म्हणजे या दोन खगोलीय घटना आहेत. - चंद्र ग्रहण आणि सुर्य ग्रहण, यांना डोळ्यासमोर ठेवून या दोन प्रतिक सुत्तांची रचना करण्यात आली आहे.
काव्यशास्त्रानुसार यामध्ये मानवीकरण अलंकाराचा प्रयोग झाला आहे. ज्याला इंग्रजीमध्ये परसोनिफिकेशन ( Personification ) म्हणतात.
इथे सुर्य, चंद्र, राहु, वेपचित्र याचे मानवीकरण केले आहे. आणि त्या निमित्ताने एक गहन संदेश दिला आहे. त्या संदेशाला आपण जाणू शकलो तर या सुत्तांचे पठन करणे किंवा ऐकणे सार्थक झाले असे समजा. अन्यथा हे पण अंधश्रद्धेचे कारक आहे.
प्रसंग श्रावस्ती येथील आहे. भगवंतांनी श्रावस्तीमध्ये आपल्या जिवनातील सर्वाधिक म्हणजेच २५ वर्षावास केले. वर्षावास ज्याला आता चातुर्मास बोलले जाते, चार महिन्यांचा प्रवास असतो. चार महिन्यात कमीत कमी चार पौर्णिमा येतात, चार अमावस्या येतात, चार कृष्णपक्षातील अष्टमी येतात आणि चार शुक्लपक्षातील अष्टमी येतात. चारा ला पंचवीस ने गुणल्यास शंभर होतात. फक्त श्रावस्तीमधील वर्षावास मोजले तर भगवंतांच्या वर्षावास काळात १०० पौर्णिमा व १०० अमावस्या श्रावस्ती प्रवास काळात आल्या.
सुर्य ग्रहण किंवा चंद्र ग्रहण जेव्हा ही होते ते पौर्णिमा किंवा अमावस्येलाच होते. या शंभर पौर्णिमा व अमावस्येच्या काळात कितीतरी वेळा चंद्र ग्रहण आणि सुर्य ग्रहण झाले असतील. खगोल वैज्ञानिकांसाठी हा शोधाचा एक मनोरंजक विषय होऊ शकेल की भगवान बुध्दांच्या पूर्ण जिवनकाळात किती वेळा सुर्य अथवा चंद्र ग्रहण झाले.
निश्चितच हे त्याच एका घटनेशी संबंधित आहे जेव्हा सुर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण पडले असेल. भगवंत अर्हत आहेत, सम्यक सम्बुध्द आहेत. ते उपायकौशल्याने सांसारिक संवादाला सुध्दा आध्यात्मिक अर्थ देत असत.
एके समयी भिक्खूगण आपआपसांत एका ओबडधोबड भूमिची चर्चा करत होते, की अमुक भूमी रमणीय आहे अथवा नाही. तेव्हा भगवंतांनी सारी चर्चा ऐकल्यानंतर म्हणाले - जिथे श्रमण वास करतात ती भूमी रमणीय आहे.
एके समयी भिक्खूगण एका झोपडीची चर्चा करत होते, की तेथे पावसात पाणी गळत होते जिथे भिक्खू साधनारत होते. तेव्हा त्या समयी भगवंत म्हणाले :
यथागारं दुच्छन्नं वुट्ठी समतिविज्झत्ति ।
एवं अभावितं चित्तं रागो समतिविज्झत्ति ।।
जर घराच्या छतात छिद्र असेल, तर त्यात पावसाचे पाणी येते. असेच संयमरहित चित्तामध्ये राग प्रविष्ट होतो.
या प्रकारे आपण पाहतो की भगवंत प्रत्येक घटनेला एक अंतर्निष्ठ अर्थ देत होते. पंचवीस वर्षावासाच्या दिर्घ अवधीमध्ये एखाद्या सुर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहणाच्या घटनेेसमयी एक गहन आध्यात्मिक संदेश दिला असेल.
एक गोष्ट इथे लक्षात घेण्याजोगी आहे की, जेव्हा भगवंत उपासकाबरोबर सांकेतिक, प्रतिकात्मक संवाद करत असत तेव्हा त्या संकेताचा अर्थसुध्दा विस्ताराने सांगत असत. जसे की सिगालाच्या प्रसंगी, परंतु ते जेव्हा साधनेत परिपक्व भिक्खूंबरोबर चर्चा करीत, तेव्हा ते संकेत आणि प्रतिकांना अव्याव्खायितच सोडत असत. ते साधनेत परिपक्व लोक होते जे संक्षेप व संकेतात बोललेल्या भाषेतील अर्थ जाणून घेत असत.
ह्या सुर्य परित्त व चंद्र परित्ताचा संवाद भिक्खूंसमोर झालेला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ विस्तार नाही आहे.
आध्यात्मिक अर्थात चंद्र आपल्या मनाचे प्रतिक आहे तर सुर्य आपल्या चेतनेचे प्रतिक आहे. आज खगोल वैज्ञानिक सुध्दा या निष्कर्षावर पोहचलेत की चंद्राच्या कलांबरोबर आपल्या मनाचा संबंध आहे. पौर्णिमेच्या दिवशी वेडाचे झटके जास्त येतात, त्याच दिवशी तनाव, उन्माद, अवसाद, आत्महत्या - हत्या ह्या घटना प्रमाणात होतात. पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात भरती ओहोटी जास्त असते. याचप्रमाणे सुर्याबरोबर आपल्या चेतनेच्या चल बिचल होण्याचा खोल संबंध आहेत. सुर्याच्या डागांची संख्या वाढल्यावर पृथ्वीवर पर्यावरणात बरेच बदल होतात. युध्द, वादळ-वारा, पूर इत्यादि घटना जास्त होतात. दोन्ही महायुध्दाच्या काळात सुर्यावरील डागांची संख्या आकस्मिकपणे वाढली होती.
आपल्या आध्यात्मिक जीवनात सुध्दा असेच होते की कधी कधी आपले चंद्र रूपी मन ग्रासले जाते. समस्त नकारात्मक तरंग मनाला घेरतात. अर्थात आपल्या मनाला चंद्र ग्रहण लागते. कधी कधी आपली चेतना समस्त अंधकाराने भरून जाते. आपलेच हित - अहित आपल्याला सुचत नाही. म्हणजेच आपल्या चेतनेला सुर्य ग्रहण लागले. आपल्याला अकुशल वृत्तीच्या राहु ने ग्रासले आहे. आपली चेतना मोह ग्रासित, लोभ ग्रासित, काम ग्रासित होते. अश्याप्रसंगी आपल्या अंतरमनातील बुध्दत्वाच्या शरणात जाणे हाच अंतिम उपाय आहे. हेच आहे बुध्दं सरणं गच्छामी ।
बुध्दाला शरणागत झाल्यावर आपली चेतना, आपले मन नकारात्मक वृत्तीच्या राहु पासून मुक्त होते. हिच आहे ग्रहणापासून मुक्तता. या सुत्तात करूणामय भगवंत सांगतात. " पजं मम राहु पमुञ्च सुरियन्ति राहु !
सुर्य माझा पुत्र आहे, त्याला मुक्त करा.
जसे रडणाऱ्या बालकाला माता आपल्या छातीशी कवटाळते आणि ते बालक गप्प होते, स्वतला सुरक्षित समजते, आरामाचा - शांततेचा अनुभव करते. तसेच सुर्य म्हणजेच आपली चेतना, आपल्या मनाला भगवंत आपला पुत्र म्हणत आहेत. जेव्हा आपण लहान बालकासारखे त्यांना शरण जातो म्हणजेच आपल्या अंतरमनातील बुध्दत्वाला शरण जातो तेव्हा आपले परित्राण होते. परित्राण अर्थात रक्षा. यालाच पालित 'परित्तं' असे म्हणतात. कारण की आपली चेतना, आपले मन परमचैतन्य आपल्या बुध्दत्वाचाच अंश आहे. या अर्थात ते बुध्दपुत्र आहेत.
आषाढी पौर्णिमेच्या दिवशी भगवंताने आपल्या पंच भिक्खूंना दिक्षा दिली होती - कौडिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजी, महानाम यांना. भारताच्या इतिहासात पहिली वेळ गुरू शिष्य परंपरेची सुरूवात झाली. भगवान बुध्दांना लोकगुरू म्हटले गेले. या कारणामुळे आषाढ पौर्णिमेला गुरू पौर्णिमा सुध्दा म्हणतात. या पौर्णिमेच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येतो की ही पौर्णिमा आज प्रत्येक धार्मिक पंथात गुरू पौर्णिमेच्या रूपात स्थापित झाली आहे.
१०४ वर्षानंतर हा अदभुत संयोग आला आहे की, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पुर्ण चंद्र ग्रहण होणार आहे. २३५ मिनिटाचे अर्थात जवळजवळ ३ तास ५४ मिनिटे म्हणजेच जवळजवळ ४ तास.
बौध्द उपासक उपासिकांनी या दिवशी उपोसथ धारण करावे आणि ध्यान साधना करावी, दान पुण्य करावे आणि आध्यात्मिक अर्थांना धारण करीत चन्दपरित्ताचे पठन करावे. बौध्द जगतात अशी धारणा आहे की अशा दुर्लभ प्रसंगी या परित्ताचे पठण करण्याने लांबलेली कार्ये लवकरात लवकर पूर्ण होतात, अडकलेल्याला मुक्ती मिळते, दिर्घ आजारापासून मुक्तता मिळते. आस्था आपल्या जागेवर आहेत परंतु योग्य अर्थाचे अवलोकन केल्यास अज्ञानातून मुक्ती मिळते.
हेच तर वास्तविक परित्राण आहे.
आळवक यक्षाने भगवंतांना प्रश्न विचारला. " किसूधं वित्तं पुरिसस्स सेट्ठं ।
मनुष्याचे सर्वश्रेष्ठ धन काय आहे ?
भगवंतांनी उत्तर दिले - सध्दीध वित्तं पुरिसस्स सेट्ठं ।
श्रद्धा मनुष्याचे सर्वश्रेष्ठ धन आहे.
अर्थाला समजून धम्मं धारण केले तर श्रद्धा फलद्रूप होते.
अन्यथा हीच श्रद्धा अंधश्रद्धा बनते. श्रद्धेने धम्माला धारण करणे यातच परित्राण आहे.