Friday, 27 May 2022

सम्राट अशोक यांचा दैदिप्यमान इतिहास

 *सम्राट अशोक यांचा दैदिप्यमान इतिहास* Famous historical King of India - Samrat Ashoka


सन १८३७ हे भारत खंडातील विस्मयजनक वर्ष होते. त्या वर्षी प्राचीन अवशेष, नाणी, शिलालेख यांच्या वरील लिपीचा उलगडा झाला.  सत्य इतिहासाचे व प्राचीन भाषाशास्त्राचे दालन उघडले गेले. धौली आणि गिरनारचे शिलालेख भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर असून सुद्धा जवळजवळ सारखाच संदेश देत होते हे स्पष्ट झाले. त्याच साली जुलै महिन्यात प्रिन्सेपने सांचीच्या लेखाचे आणि फिरोजशहा स्तंभाच्या लेखाचे भाषांतर जगापुढे आणले. त्याच सुमारास श्रीलंकेत टर्नोरने महावंस ग्रंथाचे भाषांतर करून सम्राट अशोकाचा उल्लेख प्रियदर्शि राजा आहे हे जाहीर केले. यातूनच सम्राट अशोक यांची ओळख पक्की होत गेली. ज्या सम्राटाला इतिहासातून पुसून टाकण्यात आले होते तो पुन्हा शिलालेखातून, स्तंभातून प्रगट झाला. त्याचे एकेकाळचे अवाढव्य साम्राज्य पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले. भारताच्या हरवलेल्या इतिहासाचा एक मैलाचा दगड प्रकाशात आला.


सम्राट अशोकाने जिंकलेल्या सर्व प्रदेशात वैद्यकीय सोयी उपलब्ध असल्या बाबतचा उल्लेख शिलालेखात आहे. तसेच कलिंगच्या युद्धाचा उल्लेख गिरनारच्या २ ऱ्या आणि १३ व्या शिलालेखामध्ये आहे. हा पुराव्यांचा मोठा तपशील प्रिन्सेपने जगजाहीर केला. स्तंभलेखावरून असे ध्यानात येते की सम्राट अशोक खूप आध्यात्मिक झाला होता. शील-सदाचरण, करुणा व गरीबांना मदत करण्याच्या भावनेने ओथंबला होता. सम्राट अशोकाचे धार्मिक सहिष्णुतेचे आवाहन आणि प्राणी हत्येवरील बंदी हे क्रांतिकारी आवाहन होते. याच मुळे ब्राह्मण पुरोहितांच्या वर्चस्वाला धक्का बसला. त्यांचे रक्तरंजित हिंसक यज्ञ बंद पडले. म्हणूनच सम्राट अशोक यांच्या निधनानंतर त्यांनी कपटनिती अवलंबिली. राज्यकर्त्यांवर आपली पकड मजबूत केली. आणि वर अशोकावदान हा निंदनीय व असत्यावर आधारित असलेला संस्कृत ग्रंथ लिहिला. त्याला प्रमाण मानून काही अती हुशार संशोधक सम्राट अशोक यांच्या बद्दल एकांगी व बिनबुडाचे लेख आजही लिहितात. तरी वाचकांनी त्यांना केराची टोपली दाखवावी. 


भाषांतर होत असलेली हुएनत्संगची ६ व्या शतकातील प्रवासवर्णने ब्रिटिश संशोधकांना खूपच माहितीप्रद ठरली. हुएनत्संग भारतात आला तेंव्हा सम्राट अशोकास जाऊन सातशे वर्षे झाली होती. तो म्हणतो वुयूवानची म्हणजेच सम्राट अशोकांची अनेक विहारे, स्तूप ओसाड झाली आहेत. पाखंडी लोकांचे वर्चस्व वाढले आहे. त्याने सम्राट अशोककाळचा कुक्कुटाराम हा जीर्ण झालेला विहार पहिला. सन १७९७ मध्ये मॅकेन्झी आणि १८०९ मध्ये बुकनॉन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून असंख्य प्राचीन अवशेष उघडकीस आले. त्याकाळी कॅमेराचा शोध लागला नव्हता. चित्रकारांची तुकडी घेवून सर्वेक्षण होत असे. त्यांनी केलेल्या रेखाटनातून बुद्ध व अशोककालीन अवशेषांची माहिती जगाला झाली. या काळात अनेक अवशेषांची भयानक नासधूस झाली. कोरीव काम असलेल्या शीला तळ्यांच्या पायऱ्यासाठी, मंदिराच्या  आणि मशिदीच्या बांधकामासाठी वापरल्या गेल्या. ब्रिटिश संशोधकांनी ढिगाऱ्यातून डोकावणारी व दुर्लक्षित पडलेली अनेक शिल्पे बोटीतून इंग्लंडला मुझियमसाठी धाडली.


चार्ल्स एलन यांच्या पुस्तकामुळे ब्रिटिशांनी भारतातून विस्मरणात गेलेला बुद्ध आणि सम्राट अशोक यांचा शोध कसा घेतला याची इत्यंभूत माहिती मिळते. १७ मे २०२२ च्या हिमालयन टाइम्समध्ये *"Buddhism in India: Its rise, fall and rise again"* हा सुंदर लेख नुकताच वाचला. त्यात शेवटी म्हटले आहे - Buddhism will last forever when other religions will fade away in course of time. The arrival of the British in India was a blessing in disguise for Buddha and Buddhism.Thus credit goes to the British East India Company and its members for the revival of Buddhism in India and the world.


--- संजय सावंत https://sanjaysat.in 9136323832


https://thehimalayantimes.com/opinion/buddhism-in-india-its-rise-fall-and-rise-again


☸️☸️☸️

गुहा, गुंफा की लेणीं - काय म्हणायचे?

 गुहा, गुंफा की लेणीं - काय म्हणायचे?


आजकल काही इतिहास अभ्यासक आणि पुरातत्त्वीद "कोरलेल्या लेणीं"ना गुंफा म्हणायला सुरुवात केली आहे. मुळात गुंफा, लेणीं, कपारी किंवा इंग्रजीतील cavern म्हणजे काय?


कपारी किंवा घळ किंवा घळी या डोंगराच्या उतारावर नैसर्गिक रित्या तयार झालेली उभी खोलगट चीर जिच्यातून नंतर पावसाळ्यातील पाणी वाहून आणखीन खोल होते.


वातावरणामुळे डोंगरातील नैसर्गिक रित्या झालेली झीज आणि त्यामुळे डोंगरात झालेली गोलाकार किंवा लंबाकृती जागा यालाच "गुहा" म्हणतात. इंग्रजीत याला cavern असेही म्हणतात. ही अतिशय ओबडधोबड जागा असते आणि जंगलातील जनावरे ऊन, वारा आणि पाऊसापासून बचावासाठी त्याचा वापर करतात. अतिप्राचीन काळातील मानव देखील अशाच गुहेत राहायचा.


याच गुहेला "गुंफा" देखील म्हणतात. याचाच अर्थ गुहा किंवा गुंफा या नैसर्गिक वातावरणात तयार झालेल्या खोली सारखी जागा ज्याचा उपयोग केवळ आसरा म्हणून पूर्वीचा मनुष्य आणि जनावरे करीत. भ.बुद्धांच्या काळात आणि नंतरही अनेक बौद्ध भिक्खू यांचा उपयोग केवळ वर्षावासात करीत.


लेणीं हा शब्द लेणं या धातूपासून तयार होतो ज्याचा अर्थ "लयण" म्हणजेच "नटविणे" ज्याला इंग्रजीत to make decorative असा होतो. हा शब्दच मुळात "लेणीं" या शब्दापासून तयार झाला आहे. लयन, लावण्य हे शब्द लेणं, लेणीं पासून तयार झाले आहेत!


सम्राट अशोक यांनी भारतात सर्वात पहिल्यांदा डोंगर "कोरून" लेणीं बनविली आणि आजीविक संघाला दान दिली. पुढे या लेणींचा प्रसार झाला आणि भारतभर डोंगरात लेणीं कोरण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणीं "कोरल्या" आहेत. भारतातील एकूण लेणींपैकी 85% बुद्ध लेणीं, 10 % हिंदू (काहींच्या मते ब्राह्मण) लेणीं तर 5 % जैन लेणीं आहेत.


या सर्व लेणीं स्थापत्य, शिल्पकला आणि शिलालेखाने "नटविल्या" म्हणजेच "बनविल्या" गेल्या आहेत. त्या "नैसर्गिक बनल्या" नाहीत! या लेणींना हिंदी मध्ये "गुफाएं" (गुंफा नाही) म्हटले गेले आहे.


एवढ्या सुंदर, अप्रतिम शिल्पकलेने नटलेल्या या लेणींना "गुंफा" म्हणणे हे त्या अनामिक कलाकारांचा अपमान नव्हे काय? की बौद्ध संस्कृतीने सर्वात आधी बनविलेल्या या अलौकिक अप्रतिम वास्तूंना गुंफा म्हणून हेटाळणी करायची? म्हणजे कैलास "लेणं" म्हणायचे पण अजंठा "गुंफा" म्हणायची? बुद्ध लेणींप्रति द्वेष, अज्ञान, पोटशूळ की सर्वच?


मित्रांनो, गुफा, गुंफा, कपारी आणि लेणीं यातील फरक समजून घ्या. डोंगरात कोरलेली एखादी बुद्ध लेणीं अथवा खोली असेल तर ती "लेणी"च असते. त्यातील कोरीव काम कमी जास्त असू शकेल मात्र छिन्नी हतोड्याने पिढ्यान पिढ्या काम करून, डोंगरात कोरलेल्या असीम सौंदर्याच्या या वास्तूंना, त्या अनामिक कलाकारांच्या कौशल्याला आणि या लेणीं दान देणाऱ्या त्या दात्यांना अपमानीत करण्यात येऊ नये....


बाकी, तथाकथित इतिहासचार्यांना, पुरातत्त्वविद यांनी लेणींना 'गुंफा' म्हणू द्यात...त्यांची री न ओढता, आपण या सुंदर कलाकृतींना, बौद्ध भिक्खुंना अतिशय श्रद्धेपूर्वक दान दिलेल्या या कोरीव वास्तूंना "लेणीं"च म्हणायची....चला, या "लेणींचा" यथोचित गौरव करू यात...


अतुल मुरलीधर भोसेकर

9545277410

Monday, 23 May 2022

महायान पंथाच्या जपमाळेचे महत्व

 *महायान पंथाच्या जपमाळेचे महत्व* 

The Significance of Mala Beads in Mahayana Buddhism



भगवान बुद्धांच्या काळानंतर तर्कशास्त्र व वास्तवता यांचा उदय झाला. प्रज्ञेच्या दृष्टीने विकास होत गेला. नैतिक विचारांना स्थान मिळू लागले. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीमुळे दुःख मुक्तीच्या मार्गाचे, सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. आंतरिक शांती ही मन विकारमुक्त केल्यानेच लाभते आणि ती ध्यानसाधनेमुळेच प्राप्त होते हे उमगले. मात्र ही स्थिती कायम राहिली नाही. संघामध्ये फूट पडली. सम्राट अशोक यांनी भरविलेल्या धम्मसंगिती नंतर दोनशे वर्षांनी ध्यानमार्गाची शुद्धता लोप पावू लागली. मन एकाग्र करण्याचे विविध मार्ग भारतात शोधले जाऊ लागले. यातूनच महायान पंथात मनाचे १०८ क्लेश दूर करून एकाग्रता साधण्यासाठी १०८ मण्यांची माळ जपणे चालू झाले. अवलोकितेश्वरांचे ध्यान करणे हा देखील उद्देश त्यामागे होता. ही पध्दत एवढी लोकप्रिय झाली की हिंदू, जैन यांच्या बरोबर मुसलमान, रोमन कॅथलिक आणि जगातील इतर संप्रदायात देखील ध्यानासाठी व ईश्वरनामासाठी जपमाळ ओढणे कालांतराने चालू झाले.


या जपमाळेत १०८ मणी का असतात ? याचे उत्तर बौद्ध संस्कृतीत आहे. बुद्धांनी सांगितले की चक्षू, श्रोत, घ्राण, जिव्हा, काया आणि मन हे सहा स्पर्शायतन ( इंद्रिये) आहेत. त्या कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णामध्ये मोडतात.( ६ × ३ = १८) महायान पंथात त्या लौकिक आणि आध्यात्मिक प्रकारामुळे (१८×२) ३६ झाल्या. भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळामूळे त्यांची एकूण संख्या ३६×३=१०८ आली. अशा या तृष्णांमुळे  दुःख उत्पन्न होत असते. या दुःखाचा प्रतित्यसमुत्पाद या  तत्वाने निरोध करता येतो. हेच तत्व वापरून एकएक मणी ओढली जाणारी जपमाळ महायान पंथात २-३ ऱ्या शतकात उदयास आली. कालांतराने त्यास मंत्रांचा उच्चार जोडण्यात आला. त्याचा पुढे अफाट प्रसार झाल्यावर अनेक संप्रदायानीं त्यास स्वतःच्या ईश्वराचे नाम जोडले. अशा तर्हेने १०८ मण्यांची जपमाळ जपत मन एकाग्र करण्यावर व ईश्वराचे नामस्मरण करण्यावर अनेक योगी, तपस्वी, धर्मगुरू यांनी भर दिला. 


सुरुवातीला जपमाळ ही लाकडी मण्यांची असे. कालांतराने ती रुद्राक्षाची, तुळशीमाळेची, स्फटिकांची, मोत्यांची बनविण्यात येऊ लागली. तरी त्यातील मण्यांची संख्या १०८च राहिली. हिंदू संप्रदायात रुद्राक्षाची जपमाळ  शिवशक्तीचे प्रतीक झाल्याने सर्वश्रेष्ठ मानली गेली. १०८ मणी पार केले की एक मेरुमणी जपमाळेत असतो. तो १०८ वेळा जप पूर्ण झाल्याची सूचना हाताला देतो. इस्लामी जपमाळेत ९९ मणी असतात तर कॅथलिक जपमाळेत १५० मणी असतात. अशा या जपमाळेचा उपयोग विविध पंथात ईश्वराच्या नामस्मरणासाठी होत असला तरी ध्यानधारणेसाठी ती योग्य परिणामकारक दिसून येत नाही. शेवटी मन एकाग्रतेसाठी शरीराच्या श्वासाचेच आलंबन योग्य ठरते. 


अशा या १०८ तृष्ण संख्येला जगात जादुई नंबर समजला जातो. तिबेटियन बौद्ध संस्कृतीमध्ये १०८ पवित्र ग्रंथ आहेत. भारतीय ज्योतिष शास्त्रातील ९ ग्रह आणि १२ राशी यांचा गुणाकार १०८ येतो. काठमांडूत एकूण १०८ बुद्ध प्रतिमा आढळून येतात. लिप वर्षात ३६६ दिवस असतात. त्यांच्या संख्येचा गुणाकार १०८ येतो. चीनच्या ज्योतिष शास्त्रात १०८ तारे आहेत. Fibonacci sequence या गणितीय सूत्रात १०८ संख्येला महत्व आहे. १०८ मधील संख्येची बेरीज ९ येते व तो लकी नंबर मानला जातो. चंद्र आणि पृथ्वी यांच्या मधील अंतर चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे. तसेच सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधील अंतर सूर्याच्या व्यासाच्या १०८ पट आहे. अशा बऱ्याच गोष्टी १०८ संख्येशी निगडीत आहेत. तरी आपण जपमाळ घेऊन साधना करीत असाल तर ती मूळ बौद्ध महायान पंथाची देण आहे हे ध्यानी असू द्यावे. 


--- संजय सावंत (नवी मुंबई) https://sanjaysat.in


❇❇❇


Tuesday, 10 May 2022

सामनेर पञ्हो

                                                          🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                                                                      *_सामनेर पञ्हो_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                 _*धम्मपद अट्ठकथेच्या शंभराव्या भागात* सारीपुत्त आणि कुंडलकेशा यांच्यामधील प्रश्नोत्तरोंचा प्रसंग खूप विस्ताराने दिला आहे. त्यातील निवडक भाग पुढीलप्रमाणे, परिव्राजीकेने सारीपुत्तांना विचारले, एक प्रश्न विचारू? हा भगिनी विचार. सारीपुत्ताने मृदृ आवाजात म्हटले, परिव्राजिकेने एक एक करून हजार प्रश्न विचारले. सारीपुत्त थेरांनी प्रत्येक प्रश्नाचे खुप चांगल्या प्रकारे उत्तर दिले. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सारीपुत्तांनी विचारले, भगिनी, तू तर खूप प्रश्न विचारले. आता मी तुला एक प्रश्न विचारला तर उत्तर देणार का? भन्ते, समजले तर मी उत्तर अवश्य देणार, परिव्राजिकेने म्हटले. *थेर सारीपुत्तांनी प्रश्न विचारला, एक नाम किं?* प्रश्न ऐकून परिव्राजिका निरुत्तर झाली, तिने पराभव स्वीकारला व म्हणाली. भन्ते, या प्रश्नाचे उत्तर मला माहिती नाही. तुम्ही सांगा या प्रश्नाचे उत्तर काय आहे. *सारीपुत्तांनी म्हटले, भगिनी हा बुद्ध प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी पहिल्यांदा प्रवज्जा करुन घ्यावी लागेल. बुद्धांवर विश्वास ठेवावा लागेल जम्बु परिव्राजिका तयार झाली. सारीपुत्तांनी तिची भिक्खुणी संघामध्ये दीक्षा करुन दिली. तिचे केस कुरळे असल्या कारणाने तिला कुंडलकेशा हे नाव पडले. हजार प्रश्नांची उत्तरे सारीपुत्तांकडून ऐकल्यानंतर तिला ज्ञानप्राप्ती झाली. परंतु त्यामुळे ती अर्हत झाली नाही.* परंतु दहा प्रश्नांची उत्तरे समजल्यानंतर परिव्राजिका अर्हत झाली. *दहा बुद्ध प्रश्न, जे आज सुद्धा श्रामनेर दिक्षा घेतात, तेव्हा त्यांच्याकडून हे दहा बुद्ध प्रश्न गिरवून घेतले जातात श्रामनेर प्रश्नांच्या स्वरुपात "सामनेर पञ्हो" दीक्षेच्या सहा भागांपैकी हा एक महत्वाचा भाग आहे.* श्रामनेर होण्यासाठी कायदेशीर वयोमर्यादा सात वर्ष आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे सात वर्षांच्या श्रामनेरांना सुद्धा माहित असतात, त्या *दहा पैकी पहिलाच प्रश्न सारीपुत्तांनी जम्बु परिव्राजिकेला विचारला होता, एक नाम किं? एक म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. आणि काही काळानंतर दहा प्रश्नांची उत्तरे अनुभवाच्या आधारे समर्पक उत्तरे, फक्त बुद्धीला पटणारी नाही तर समजून उमजून ती परिव्राजिका, कुंडल केशा अर्हत झाली. या दहा प्रश्नांमध्ये जवळपास संपूर्ण धम्म सामावलेला आहे. परंतु या दहा प्रश्नांचे बौद्धिक स्तरावर निराकरण झाले नाही तर अध्यात्मिक समाधी चा सराव केल्यास, ती व्यक्ती अर्हतपद प्राप्त करू शकते.*_

_मूळ तीपीटकात कुमारप्रश्न नावाचं एक छोटेसे सूत्र आहे. *कुमारप्रश्न (कुमारपञ्हा) ज्यास 'श्रामणेर प्रश्न' म्हणून काहीजण ओळखतात, ते पवित्र तीपीटकातील सुत्तपिटक, खुद्दकनिकाय,खुद्दकपाठपाळि, या ग्रंथात उपलब्ध आहे.* सदर निकायावरील कुमारपञ्हवण्णना या अठ्ठकथेनुसार तथागत सम्यक संबुद्धांनी सोपाक नावाचे सात वर्षीय महाश्रावक होते, त्यांना उपसंपदा द्यायची, या हेतूने १० प्रश्न विचारले. इथे महाश्रावक सोपाक यांचे वय ७ वर्ष म्हणून त्यांचा आणि सदर प्रश्नावलीचाच एकंदरीत उल्लेख 'कुमार प्रश्न' म्हणून नोंदविला गेला. ते दहा प्रश्न व त्यांची उत्तरे हे जरी सूत्र रुपात असली, तरी त्यांच्या सविस्तर विश्लेषणात उत्तुंग असे बौद्ध जीवन तत्वज्ञान दडलेलं आहे.

            _१, , ...,१० या संख्या म्हणजे गणितीय मूल्य, ज्या वस्तू मोजण्यासाठी, गणना करण्यासाठी असतात. या सूत्रात त्या संख्या 'वैश्विक सत्य' सांगण्यासाठी, ज्याचा हेतू अर्थातच 'अखिल जीवसृष्टीचे कल्याण' व्हावं हाच आहे, केलेला आहे. उत्तरे तंतोतंत एका वाक्यात आहेत. त्यांचा अर्थ अतिशय खोल, गहन असा आहे._ 

          *_पहिला प्रश्न आहे एक नाम किं? म्हणजे एक काय आहे. उत्तर आहे, एक आहार आहे. ज्यावर सर्व प्राणिमात्र अवलंबून असतात. संत नेहमीच म्हणतात, सबका मालिक एक. खरं हेच की, आहारच सर्वांचा मालक आहे, सर्व त्यावर विसंबून असतात. निर्भर असतात. काही प्राणी तर फक्त पाण्याचा आहार घेतात, काही हवेचा आहार घेतात. तर काहींचा सूर्यप्रकाश आहार असतो म्हणून आहारच सर्वांचा एकमेव मालक आहे. श्रामणेर दिक्षेचे सहा भाग फक्त श्रामनेर व भिक्खूंसाठीच महत्वाचे नसून ते उपासक-उपासिकांसाठीही तेवढेच महत्वाचे आहेत. त्यात स्वारस्य, कुतूहल असणारे व तत्वज्ञानाची आवड असणारे लोक व अभ्यासक यांना सहा भागांमध्ये जवळजवळ संपुर्ण धम्म सापडतो. हे सहा भाग बौद्धांच्या कठीण व आयोजित प्रशिक्षणाचा एक भाग आहे. या कठोर प्रशिक्षणात सुलाखून निघालेला भिक्खू किंवा उपासक मानवतेसाठी मोलाचा ठरतो. सयूंक्त निकायातील अत्थिरागसुत्तात आहाराचे चार प्रकार आहेत असे बुद्ध सांगतात,

  _*“चत्तारोमे, भिक्खवे, आहारा भूतानं वा सत्तानं ठितिया सम्भवेसीनं वा अनुग्गहाय कतमे चत्तारो? कबळीकारो आहारो ओळारिको वा सुखुमो वा, फस्सो दुतियो, मनोसञ्चेतना ततिया, विञ्ञाणं चतुत्थंइमे खो, भिक्खवे, चत्तारो आहारा भूतानं वा सत्तानं ठितिया सम्भवेसीनं वा अनुग्गहाय”।*_

पहिला कबळीकर आहार– रोजच्या आहारातील जड, पातळ अन्न, जे प्राणी-वनस्पती-माणस जन्म ते मृत्यूपर्यंत खात असतात. 

दुसरा स्पर्श आहार– सहा इंद्रियांना सहा इंद्रिय विषयांचा स्पर्श होतो, त्यातून उत्पन्न होणारा. सहा इंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक आदी, व सहा इंद्रिय विषय म्हणजे दृश्य,ध्वनी,वास आदी..

तिसरा मनोसंचेतना आहार आणि  चौथा विज्ञान आहार. 

इथे मनो संचेतना आहार म्हणजे कामभव आणि रूप-अरुप भव आहार व पटीसंधीनामरूप म्हणजे विज्ञान आहार. 

सोप्या भाषेत मनोसंचेतना आहार म्हणजे मनात योजलेला हेतू (intention) आणि विज्ञान म्हणजे जाणीव. _*

◆ *_२. दोन काय आहे? नाम-रूप_*

तथागत सांगतात, “कतमञ्च भिक्खवे, नामरूपं? वेदना, सञ्ञा, चेतना, फस्सो, मनसिकारो – इदं वुच्चति नामं। चत्तारो च महाभूता, चतुन्नञ्च महाभूतानं उपादायरूपं। इदं वुच्चति रूपं।इति इदञ्च नामं, इदञ्च रूपं।इदं वुच्चति, भिक्खवे, नामरूपं।

हे नामरूप काय आहेनाम म्हणजे – वेदना, संज्ञा, चेतना, स्पर्श आणि मनसिकार व रूप म्हणजे– पृथ्वी,जल,तेज आणि वायू.

 *_३. तीन काय आहे? तीन वेदना. सुखद वेदना,दुःखद वेदना आणि असुखद-अदुःखद वेदना._*

 *_४. चार काय आहे? चार आर्य सत्य._*

दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध मार्ग.

 *_५. पाच काय आहे? पाच उपदान स्कंध_*

वेदना स्कंध, संज्ञा स्कंध, संस्कार स्कंध, विज्ञान स्कंध आणि रूप स्कंध.

 *_६. सहा काय आहे? सहा आयतन (खिडक्या). सहा इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन._*

 *_७. सात काय आहे? सात बोध्यंग._* 

'बोधाय संवत्तन्तीति खो, भिक्खु, तस्मा ‘बोज्झङ्गा’ति वुच्चन्ति।

बोधी जागृत करण्याचे सात अंग. स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी, उपेक्षा

 *_८. आठ काय आहे? आर्य अष्टांगिक मार्ग._* 

सम्मादिट्ठि (सम्यक दृष्टी) , सम्मासङ्कप्पो (सम्यकसंकल्प), सम्मावाचा (सम्यकवाणी), सम्माकम्मन्तो (सम्यककर्म), सम्माआजीवो (सम्यकअजीविका),  सम्मावायामो (सम्यक व्यायाम),  सम्मासति (सम्यक स्मृती),  सम्मासमाधि (सम्यक समाधी)

 *_९. नऊ काय आहे? नऊ प्रकारचे जीव ठिकाण.-* इथे सत्तावासा मधील 'वासा'– ठिकाण ही मनोवस्था (stations of consciousness) असते असे बौद्ध विद्वानांचे मत आहे. 

 *_१०. दहा काय आहे? दहा अंगांनी युक्त असलेला ज्यास पुढील प्रशिक्षणाची आवश्यकता उरली नाही त्यास अर्हत असे म्हणतात._*

             _ही दहा अंगे काय आहेत? तर अरिय अष्टांगिक मार्गातील आठ अंग आणि सम्यकज्ञान, सम्यकविमुक्ती असे दहा अंग. जो आर्य श्रावक सम्यक दृष्टी,सम्यक वाणी आदी उपरोक्त दहा अंगांच्या पलीकडे गेलाय, सदर मार्गातील प्रशिक्षणाच्या पलीकडे गेला आहे. निष्णात बनला आहे तो अर्हत._ 

अशाप्रकारे उपरोक्त दहा प्रश्नाच्या उत्तरांचा जर विस्तार करत करत गेलं तर विमुक्तीचे सर्वोच्च ज्ञान दडलेलं आहे हे स्पष्ट होते. वर केवळ आजच्या बौद्ध युवा वर्गाला हे दहा प्रश्न आणि त्याची उत्तरे माहित असावयास हवीत या हेतूने संक्षिप्त नोंद करून ठेवली आहे. हे दहा प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांमध्ये संपूर्ण तिपिटक सामावलेले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या दहा अंगांनी, गुणांनी युक्त व्यक्ती अर्हत होऊ शकतो._*

*_जर या प्रश्नांचे तसेच उत्तरांचे चिंतन केल्यास, दैनंदिन जीवनात आचरण केल्यास ही सुद्धा एक साधना, तप होऊ शकते. तो केवळ अभ्यास च नाही तर परित्राण अर्थात रक्षण आहे. रोग, दुःख, भिती आपत्ती, संकट इत्यांदीपासून संरक्षण म्हणूनच या दहा बुद्ध प्रश्न व त्यांची उत्तरे यांना परित्राण पाठाच्या ग्रंथांमध्ये आवश्यक व महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे._*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*११/०५/२०२२*

*संदर्भ : -*

*१) धम्मपद अट्ठकथा*

*२) मैत्री संपूर्ण धम्म आहे*

*३)  कुमारप्रश्न*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/05/blog-post_10.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 9 May 2022

लाफिंग / हसणारा बुद्ध

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_लाफिंग / हसणारा बुद्ध_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _भगवान बुद्धांची कल्पना केल्याबरोबर मनाच्या पडद्यावर एक प्रतिमा तयार होते. चिंतनशील - डोळे अर्धवट उघडे अर्धे मिटलेले, ओठांवर कोमल हास्य, दृढ शांत स्थिर शरीर, जर आपण वाद-संवाद करणाऱ्या बुद्धांची कल्पना केली तर, त्यातून सौम्यता, शांतता, गंभीरता इ. विशेषणात्मक शब्द चित्रांमधून डोकावतात, पुढे येतात.हास्यविनोद, मस्करी करणाऱ्या बुद्धांची प्रतिमा आपल्या विचारातच कधीच येत नाही, परंतु तीपिटकामध्ये असे काही प्रसंग येतात ज्यामध्ये बुद्ध गोड स्मित करताना दिसतात. *भगवान बुद्धांचे एक नाव *सुखविहारी किंवा सुगत आहे.* सुगत याचा शब्दशः अर्थ जो आनंदी राहतो, जो खुश असतो, तो हसणार नाही, हे कसे शकत आहे.... *लाफिंग बुद्ध हे बौद्ध जगातील एक पौराणिक किंवा दंतकथेतील पात्र नसून एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. चीनमध्ये एक अर्हत झालेत, जे सर्व विश्वात लाफिंग बुद्धांच्या (हसणारा बुद्ध) नावाने प्रसिद्ध झाले.*_ 

           _*दहाव्या शतकात चीनच्या फेंगुआ भागात एक बौद्ध भिक्खु झाले, क्वेसी त्यांच नाव. ते शरीराने स्थुल होते, लठ्ठ होते. असे म्हणतात की, जेव्हा त्यांना अर्हत पद प्राप्त झाले तेव्हा ते खळखळून हसले होते. दोन्ही हात उंचावून नाचू लागले.* जसे पाणी ज्या भांड्यात जाते ते त्याचेच रूप घेत तसे *अर्हत पद ज्या शरीरास प्राप्त होते, ज्या शरीरात उत्पन्न होते ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वानुसारच व्यक्त होते. जर कवी मनाचा व्यक्ती अर्जत झाल्यास तर तो अर्हत कविता म्हणून व्यक्त होणार, जसे की वंगीश, मातृचेट, मिलारेपा इत्यादी. तत्वज्ञ व्यक्तीमध्ये ते तत्व म्हणून व्यक्त होणार उदा, सारीपुत, महाकश्यप, कात्यायन नागार्जुन, असंग, वसूबंधू, इत्यादी. नर्तकातील नृत्याने ते व्यक्त होणार. कलाकार चित्रकारांमध्ये चित्रकला म्हणून व्यक्त होणार, अशा प्रकारे चीन चे अर्हत क्वेसी यांनी स्वतःला खळखळून हसण्याच्या स्वरूपात व्यक्त केले.*_

          _या अत्युत्तम प्राप्तीनंतर क्वेसी यांचे दैनंदिन जीवन असे झाले की, ते त्यांच्या खांद्यावर एक थैली लटकवून फिरायचे त्यामध्ये फळे व मिठाई असे. जिथे त्यांना एखादे मूल किंवा मुलांचा घोळका दिसला की ते खांद्यावरची थैली उतरुन खाली मुलांना मिठाई वाटायचे मुले त्यांना बघून खळखळून हसायचे. ते सुद्धा मुलांना बघून हसायचे. जर एखादा वयस्कर व्यक्ती गंभीर चर्चेसाठी त्यांच्याकडे गेला तर ते त्यांची थैली खांद्यावर टाकून, मोठ्याने ठहाका मारत पुढे जायचे. *त्यांच्याबरोबर चर्चेचा हळुवार, प्रेमळ, झेनप्रसंग प्रसिद्ध आहे तो असा की, त्यांना समोरून येतांना पाहून एका विद्याव्यासंगी बौद्ध भिक्खूंनी पुढे जाऊन विचारले, संबोधी म्हणजे काय? क्वेसीने स्वतः च्या खांद्यावरून थैली उतरवली, जमिनीवर ठेवून खळखळून हसायला लागले. भिक्खूंनी पुन्हा विचारले, संबोधी कशी प्राप्त होते? क्वेसीने त्यांची थैली उचलून खांद्यावर ठेवली, आणि ठहाका मारुन जोरात हसून पुढे चालू लागले. या प्रसंगाची झेन व्याख्याकार विविधतेने व्याख्या करतात. त्यातील एक व्याख्या ही आहे की क्वेंसीने सुचक खुणेनेच म्हटले की, आसक्तीच्या मोहाच्या ओझाला उतरवून फेकणे हीच संबोधी होय. आणि या मिळकतीला, प्राप्तीला लोकांना वाटण्यासाठी चालत राहणे ही संबोधीची मिळकत होय, सफलता होय.* या व्यतिरिक्त इतिहासकारांना क्वेसीचे संवाद अग्रलेखामध्ये कुठेही लिहिलेले मिळत नाहीत._

           _*चिनी भाषेत थैली किंवा पोत्याला "बुदई" म्हणतात, वियतनामी भाषेत "बोदाई" आणि जपानी भाषेत "होनेही" म्हणतात. थैली सोबत असल्यामुळे अर्हत क्वेसी चे नाव बुदई, बोदाई किंवा होतेई हे सुद्धा लोकप्रिय झाले.* टक्कल, मोठे पोट, हसणारे ओठ, फुगलेले गाल त्यांची ही मुद्रा बघून लोक खूष होत असत. *त्यांच्या मृत्यूनंतर, चिनी लोकांनी त्यांच्या विविध मुद्रा, मुर्त्या बनवून एकमेकांना भेट म्हणून देणे सुरु केले. आणि अशी मान्यता झाली की क्वेसी ची मूर्ती भेट म्हणून मिळणे किंवा देणे त्यांना घरात ठेवणे, म्हणजे आनंदाचा पुरवठा करण्यासारखे ठरते. फेंगशुई आणि वास्तुकलेमध्ये अर्हत क्वेसी यांना लाफिंग बुद्धाच्या रूपाने इतके प्रसिद्ध केले की, जे बुद्धिस्ट नाहीत ते सुद्धा लाफिंग बुद्धाची मूर्ती आपल्या घरात तसेच कार्यालयात ठेवू लागले. थैली सोबत त्यांच्या एकूण बारा प्रकारच्या आकारातील विविध कलाकृती आहेत. प्रमाणित झाले की, जर त्यांना घरात किंवा कार्यालयात ठेवल्यास व नियमित त्यांच्यासमोर फुल धूप दिवा लावल्यास सुख समृद्धी मिळते. शेवटी अर्हत हे सुखसमृद्धी उत्पन्न करणारेच असतात.*_

           _शतकानंतर जेव्हा चिनी लोक अमेरिकेमध्ये शरणार्थी म्हणून पोहोचले, तेव्हा ते सोबत क्वेसी ची मूर्ती सुद्धा घेऊन गेले. आणि शरणार्थी राहत असलेल्या वस्तीमध्ये मधोमध त्यांनी मूर्ती ठेवली. हात वर उचलून खळखळून हसणारी क्वेसी ची मूर्ती अमेरिकन लोकांच्यामध्ये आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली. *अमेरिकेच्या लोकांना अर्हत शब्द माहित नव्हता, म्हणून चिनी लोकांनी अमेरिकन लोकांच्या उत्सुकतेचे उत्तर देत क्वेसी यांना लाफिंग बुद्धाच्या स्वरुपात जगासमोर आणले. याप्रकारे चिनचे एक अर्हत क्वेसी हे लाफिंग बुद्धा, क्वेसी बुद्धा, च्या स्वरुपात जगात प्रसिद्ध झाले. कधीकधी पाश्चिमात्य लोक लाफिंग बुद्धा ला गौतम बुद्धाच्या रुपात ओळखण्यास चुकतात. खरं तर तो त्यांचा भ्रम आहे परंतु क्वेसी हे गौतम बुद्ध नाहीत.* लाफिंग बुद्धा वर संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी त्यांची उत्पत्ती, निर्मिती सरळ सरळ भगवान बुद्धांशी जोडतात, विशेष करुन मज्झिम निकायातील एका मधुपिंडक नावाच्या सुत्ताचे प्रमुख देसनाकार अर्हत कात्यायान यांच्या सोबत. ते खूप सुंदर होते. त्यांचे सौंदर्य असे होते की पुरुष सुद्धा त्यांच्याकडे, त्यांच्या रुपावर आकर्षित होत. तेव्हा त्यांनी स्वतःच्या शरीराला ओबडधोबड बनवले. अगोदर ते लोक त्यांना पाहून आकर्षित होत असत, तेच लोक आता त्यांच्यावर हसत होते. असे म्हणतात की लाफिंग बुद्धा चे पुर्वज कात्यायन होते. वास्तविक बुद्धांच्या काळातील अर्हत कात्यायन हे ऐतिहासिक सत्य आहे, आणि दहाव्या शतकातील चीनचे अर्हत क्वेसी हे सुद्धा एक ऐतिहासिक सत्य आहे. या दोघांचेही अस्तित्व वेगळे आहे. आणि दोघेही प्रथम कालखंडातील आहेत. सध्या जे लाफिंग बुद्धा च्या नावाने लोकप्रिय आहेत ते बुद्धकालीन अर्हत कात्यायन नसून चीनचे अर्हत क्वेसी आहेत.*_ 

       _*संताच्या प्रतिमा, मूर्ती पूजास्थानी ठेवणे सकारात्मक ऊर्जेचे घटक मानले जाते, अर्हत क्वेसी यांच्या प्रतिमा घरात ठेवल्यास आनंदाचे तरंग, लाटा येण्यास कारणीभूत ठरतात यामध्ये काही शंका असू शकते? यांच्या प्रतिमा जर भगवान बुद्धांच्या प्रतिम सोबत ठेवल्यास जास्त प्रभाव पडतो. लक्षात ठेवायला हवे की, जर क्वेसीची मुर्ती किंवा प्रतिमा भगवंताच्या मुर्ती सोबत ठेवल्यास बुद्धांची प्रतिमा ही मोठी असायला हवी. जर दोन्ही मुर्त्या सारख्याच आकाराच्या असतील तर तथागत बुद्धांची मुर्ती ही लाफिंग बुद्धांच्या, हसणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती च्या वरती, उंच जागेवर ठेवायला हवी.*_


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*१०/०५/२०२२*

*संदर्भ : -*

*१) मैत्री संपूर्ण धम्म आहे*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/05/blog-post_84.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

भगवान बुद्धांच्या शिकवणीचा मूलभूत सिद्धांत

 _*भगवान बुद्धांच्या शिकवणीचा मूलभूत सिद्धांत*_

                  *प्रतित्यसमूत्पाद* हा भगवंतांच्या शिकवणीचा मूलभूत सिद्धांत होय. *एकाचा विनाश झाला की त्यासोबतच दुसऱ्याची उत्पत्ती सुरू होते ह्या नियमालाच भगवंतांनी प्रतित्य-समुत्पाद नियम म्हटले आहे. (प्रतित्यसमुत्पाद किंवा प्रत्यय समुत्पाद)*. 

        *_प्रत्येक उत्पन्न होणाऱ्या वस्तूचा प्रत्यय आहे. प्रत्यय आणि हेतू (कारण) समनार्थक शब्द असल्याचे वाटते. परंतु प्रत्ययाचा अर्थ आहे उत्पाद; संपल्यावर उत्पाद म्हणजे एकाचा शेवट झाल्यावर, ते नष्ट झाल्यावर दुसऱ्याची उत्पत्ती._* भगवंतांनी सांगितलेला प्रत्यय, अशा प्रकारचा हेतू आहे. (कारण आहे) जो कोणत्याही वस्तू किंवा घटनेच्या उत्पन्न होण्याच्या आधीच्या क्षणीं नेहमीच लुप्त होतांना दिसतो. प्रतित्यसमुत्पाद कार्यकारण नियमाचा अविच्छिन्न नव्हे तर विच्छिन्न प्रवाह असल्याचे सांगतो. *प्रतित्यसमुत्पाद ह्याच विच्छिन्न प्रवाहाबद्दल पुढे नागार्जुनांनी आपल्या शून्यवादास विकसित केले*

             *प्रतित्यसमुत्पाद पूर्णतः विज्ञानावर (Science) आधारित असून अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे.* मूळ सिद्धान्त येणेप्रमाणे :

👉 *'जाती,'* (जन्म घेणे) जरा व मरण ह्यांचा हेतू आहे; म्हणून 'जाती' हेच जरा-मरणाचे कारण

होय.

👉 *'भव'* (समष्टिगत संसार) जातीचा हेतु आहे; म्हणून भव' हेच जातीचे कारण होय.

👉 *'उपादान'* (प्राप्त करण्यासाठी प्रयत्न) 'भवचे' कारण होय.

👉 *'तृष्णा'* उपादानाचे कारण होय.

👉 *'वेदना'* ही तृष्णेचे कारण आहे.

👉 *'स्पर्श'* हा वेदनेचे कारण आहे.

👉 *'षडायतन'* (सहा इंद्रिये) ही स्पर्शाची कारणे आहेत.

👉 *'नाम-रूप'* (मन-शरीर) षडायतनाचे कारण आहेत.

👉 *'विज्ञान'* नाम-रूपाचे कारण आहे.

👉 *'संस्कार'* विज्ञानाचे कारण आहे.

👉 *'अविद्या'* संस्कारांचे कारण आहे.

         *'अविद्या' म्हणजे केवळ विद्येचा अभाव नसून ती चित्ताची अंधकारमय अवस्था होय. अशा अवस्थेमध्ये जे 'अनित्य' आहे, ते 'अनित्य' असल्याचे लक्षात येणे संभवनीय नसते, जे दुःख आहे, ते दुःख असल्याचे लक्षांत येणे संभवनीय नसते. जे 'अनात्म' आहे ते 'अनात्म' असल्याचे लक्षात येणे संभवनीय नसते. ह्यास्तव अविद्या हीच संस्कारांची जनक आहे. जेथे अविद्या नाही, तेथे चित्तावर पडलेली छाया नाही, म्हणजेच संस्कार नाही.*


*संक्षिप्तरूपाने 'प्रतीत्यसमुत्पाद' येणेप्रमाणे -*

*१)* अविद्येपासून संस्कार (संखार Activities) निर्माण होतात.

*२)* संस्कारामुळे विज्ञान (विज्ञान Consciousness)

*३)* विज्ञानामुळे नामरूप (नाम रूप Mind and Matter or Body)

*४)* नामरूपामुळे षडायतन (सलायतन Six spheres of senses)

*५)* षडायतनामुळे स्पर्श (फस्स Contact)

*६)* स्पर्शामुळे वेदना (वेदना Feeling) सुख, दुःख, ना सुख, ना दुःख.

*७)* वेदनेमुळे तृष्णा (तण्हा Desire)

*८)* तृष्णेमुळे उपादान (उपादान Grasping)

*९)* उपादानामळे भव (भव Becoming) कम्म भव आणि उपपत्तीभव

*१०)* भवामुळे जाति (जाती Rebirth)

*११)* जातीमुळे जरा, मरण, दुःख, शोक, चिंता, निराशा, चित्तखेद यांची उत्पत्ती होते. (Decay, Death, Sorrow, Lamentation, Despair)

*१२)* जरा, मरण, दुःख, शोक, निराशा या दुःखाच्या स्कंधांची उत्पत्ति होते.

           वरील *बारा निदान किंवा कड्यांपैकी प्रथम दोन भूतकालाविषयी, मधील आठ वर्तमान आणि शेवटच्या दोन भविष्यकाळाविषयी आहेत. ही प्रक्रिया सदोदित (Adinifinitum) सुरूच असते. तिची उत्पत्ती कधी झाली हे सांगता येत नसल्यामुळे, जीवाची (Life -flux) उत्पत्ती अविद्येमुळे कधी झाली, हे सांगता येत नाही. (= अनतमग्गो यंम् संखारो. अविज्जा

पुब्बकोटि न पञ्ञायरे)*

           *प्रतित्यसमुत्पाद भगवंतांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा आधारस्तंभच होय.* त्यांचे तत्वज्ञान समजून घेण्याची ही गुरुकिल्लीच आहे. त्यांनी म्हंटले आहे - *"जो प्रतित्यसमुत्पादास बघतो, तो धर्मास *

(भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानास) बघत असतो. ज्याला धम्म दिसतो त्याला प्रतित्यसमुत्पाद दिसत असतो."*  हे पाच उपादान स्कंध (रूप, वेदना, संज्ञा, संस्कार,  विज्ञान) प्रतित्यसमुत्पन्न (विच्छिन्न प्रवाहाप्रमाणे उत्पन्न) असतात.

        प्रतित्यसमुत्पादाच्या नियमाला मानवाच्या व्यक्तित्वास अनुलक्षून त्यांनी त्याची १२ अंगे असल्याचे सांगितले. *सती केवठपुत्राचा* असा समज होता की, दुसरे नव्हे, हेच एक विज्ञान (जीव) संसरण - संधावन (आवागमन) करीत असते. भगवंतांनी तो सर्वथा चूक असल्याचे त्याला सांगितले; आणि भिक्खुंना समजावून सांगितले, *"भिक्खुंनो! ज्या-ज्या प्रत्ययामुळे विज्ञान (जीव-चेतना) उत्पन्न होते, तीच त्याची संज्ञा असते. चक्षुच्या निमित्ताने (जे) विज्ञान उत्पन्न होते, त्याची चक्षुविज्ञान हीच संज्ञा असते. याचप्रमाणे श्रोत्र-घ्राण-संज्ञा, रस, काया, मनविज्ञान संज्ञा असते. जसे ज्या-ज्या निमित्ताने (प्रत्येयाने) आग जळते, तिथे तिथे त्याची संज्ञा असते. काष्ठ-अग्नी, तृण-अग्नी, वगैरे."*

       *"हे (पंचस्कंध) उत्पन्न झालेले आहेत. त्यांना नीटपणे प्रज्ञेने बघितल्यावर (आत्म्याच्या अस्तित्वाबद्दलची) शंका नष्ट होते. भिक्खुंनो! हे पंचस्कंध (भौतिक तत्व आणि मन) निर्माण होतात. हे स्वतःच्या आहारामुळे निर्माण होतात. हे स्वतःच्या आहाराच्या निरोधामुळेच निरुद्ध होत असतात."*

*पाली भाषेत पटिच्च समुप्पाद येणेप्रमाणे :*

        *_अविजा पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञानं. विज्ञान पच्चया नामरूपं. नामरूपं पच्चया सळायतनं. सलायतन पच्चया फस्स. फस्स पच्चया वेदना. वेदना पच्चया तण्हा. तण्हा पच्चया उपादानम्. उपादान पच्चया भवो. भव पच्चया जाति. जाति पच्चया जरा-मरण- सोक- परिदेव- दुःख- दोम्मनस्स- उपायास संभवन्ति. एवं एतस्स केवलस्स दुक्खखन्धस्स समुदयो होति।_*


*संकलन :* *महेश कांबळे*

रोमन साम्राज्यात बौद्ध भिक्षू

 *






*रोमन साम्राज्यात बौद्ध भिक्षू*   

Buddhist Monk in Roman Empire.


रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट ऑगस्टस सीझर हा इ. स.पूर्व २७ ते इ. स. १४ पर्यंत गादीवर होता. ज्युलियस सीझरचा हा पुतण्या ज्युलियसच्या हत्येनंतर गादीवर आला. त्याच्या काळात सर्व राजकीय विरोधकांचा त्याने नायनाट केला. संपूर्ण रोमन साम्राज्याचा बादशहा झाल्यावर त्याने स्वतःला ऑगस्टस ( पवित्र ) ही पदवी लावली. अशा ह्या रोमन साम्राज्याच्या दरबारात दोन हजार वर्षापूर्वी गुजरातच्या भडोच मधील एका बौद्ध भिक्षूने येऊन भगवान बुद्ध यांचे तत्वज्ञान सांगितले, ही अचंबित करणारी गोष्ट होती. त्याकाळात स्ट्राबो हा ग्रीक तत्वज्ञानी, इतिहासकार आणि भूगोलवेत्ता  होऊन गेला. त्याने ऑगस्टस सिझर याच्या दरबारात आलेल्या राजदूत आणि बौद्ध भिक्षूबद्दलची नोंद निकोलस दमास्कस यांचेकडून घेतली होती. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.


पोरस म्हणजेच पुरूराजा. ज्याचे सिकंदर ( अलेक्झांडर ) बरोबर युद्ध झाले. त्याचे साम्राज्य आताच्या पाकिस्तानातील झेलम नदीपासून पंजाबमधील चिनाब नदीपर्यंत पसरलेले होते. त्यावेळी त्याने रोमच्या दरबारात एक ग्रीक राजदूत भाडोचमार्गे पाठवीला. या राजदूताने स्वतःच्या अंगावर पत्राचा मजकूर लिहुन घेतला होता. तसेच त्याच्या बरोबर भरूकच्छ इथले एक बौद्ध भिक्षू होते. धम्मप्रसार करण्यासाठी ते त्याच्या बरोबर निघाले असावेत. भरूच त्यावेळी मोठे व्यापारी बंदर होते. जहाजाने समुद्रातून प्रवास करीत व पुढे पायी चालत अथेन्समध्ये ते पोहोचले. तेव्हा तेथील लोक चिवर परिधान केलेली व्यक्ती पाहून चकित झाले. ऑगस्टस सिझरने सुद्धा राजदूता बरोबर आलेल्या या भिक्षूची चौकशी केली. अनेकांनी त्यांना बुद्धांबाबत प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांची माहिती दिली तसेच त्यांच्या उपदेशांचे सार कथन केले. मात्र काही दिवसांनी अथेन्स येथील वास्तव्यात त्यांनी आत्मदहन करून घेतले असा उल्लेख आहे. आणि मग ऑगस्टस सिझरने त्या भिक्षूचे समाधी स्थळ तेथे उभारले. त्यांच्या समाधीस्थळावर खालील वाक्य होते. 'The Shramana Master, an Indian, a native of Bargosa, having immortalized himself according to the custom of his country, lies here'.


हा काळ येशू ख्रिस्ताच्या उदयाचा होता. त्यांच्या जन्मापूर्वी बौद्ध भिक्षू रोमन साम्राज्यात पोहोचले होते हे सत्य होते. विल डूरंट या विद्वानाने १९३० मध्ये म्हटले आहे की सम्राट अशोकाने धम्म प्रसारासाठी बौद्ध भिक्षूना नुसते भारतातच नाही तर सीरिया, इजिप्त आणि ग्रीस मध्येही पाठविले आणि धम्माचा तेथे प्रसार केला. त्यामुळे पुढे ख्रिस्ती शिकवणूकीत पंचशिलाचे प्रतिबिंब पडत गेले. जीवनातील ती पवित्र बंधने ( Sanctity of Life) खालील प्रमाणे होती. 

Rejection of violence,Compassion for others, Emphasis of charity, Confession and Practice of virtue. 


स्ट्राबो या भूगोलवेत्त्याने केलेल्या नोंदीमुळे बौद्ध भिक्खूं भारताबाहेर पार रोमपर्यंत गेल्याचे उघडकीस आले. प्रसिद्ध दिवंगत लेखक मा.श.मोरे यांनीसुद्धा त्यांच्या पुस्तकात स्ट्राबोच्या नोंदीचा उल्लेख केलेला आहे. परंतु त्यांनी पोरस राजा ऐवजी मिलींद राजाने ( ग्रीक राजा मिनांडर ) राजदूत पाठवल्याचे म्हटले आहे.


--- संजय सावंत ( नवी मुंबई )

🟦🟦🟦


Thursday, 5 May 2022

जय भीम’ या घोषणेचे चे जनक

 हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास.... `जय भीम’ या घोषणेचे चे जनक ...

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरात साजरी होणारी जयंती असो की, चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाणदिन असो, नाही तर नागपुरातील दीक्षाभूमीवरील धम्म सोहळा असो या सर्व ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या मुखातून एकच आवाज निनादला जातो तो म्हणजे `जय भीम’. हिंदू धर्मातून बाहेर पडल्यानंतर बौद्ध धम्माची स्वतंत्र वाटचाल अंगिकारल्यानंतर बौद्धांना नवी ओळख प्राप्त व्हावी यासाठी `जय भीम’ हा शब्द मोठय़ा आदरभावाने संबोधला जातो.
 
आंबेडकरी समाजातील राजकारणात अनेक गट-तट असो किंवा आंबेडकरी समाजातील नेते इतर पक्षात स्थिरावलेले असो त्यांच्या मुखातून वेळोवेळी आपसूकपणे `जय भीम’ हे शब्द बाहेर पडतात. मात्र, कोणत्याही आंबेडकरी नेत्यांना `जय भीम’ चे जनक बाबू हरदास यांची जयंती साजरी करावी असे वाटले नाही किंबहूना समाजही त्यांच्याबाबतीत अज्ञानी असल्याने बाबू हरदास अद्यापही दुर्लक्षितच राहिले असल्याचे दिसत आहे.
 
हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास यांचा जन्म 6 जानेवारी 1904 रोजी नागपुरातील कामठी येथे एका गरीब दलित कुटूंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव नगराळे हे रेल्वे खात्यामध्ये कारकून म्हणून कार्यरत होते. बाबू हरदास यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा संस्कृतवरही मोठा प्रभाव होता. अवघ्या 17 व्या वर्षी `महारथ’ नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. 1927 त्यांनी दलित समाजातील मुला-मुलीसाठी कामठी येथे रात्र शाळाही चालवली. त्यात 86 मुले आणि 22 मुली शिकून बाहेर पडल्या. संत चोखामेळा यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
 
1928 साली हरदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली. देशात दलितांचा नेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता त्यावेळी बाबू हरदास यांनी 1930-31 साली दुसरी गोलमेज परिषद भरली त्या सुमारास रॅमसे मॅक्डोनाल्ड यांना यासंबंधी पत्रव्यवहार करून स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, देशात एकमेव दलित नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. त्यांनी यासंबंधी मॅकडोनाल्ड यांच्याशी जवळपास 32 वेळा पत्रव्यवहार केला होता. `ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन’ च्या पदावर संयुक्त सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 1924 साली त्यांनी `मंडल महात्मे’ हा ग्रंथ लिहिला. `वीर बालक’ नावाचे नाटकही त्यांनी लिहिले. बाबासाहेबांच्या `जनता’ वृत्तपत्रातही त्यांनी लेखन केले.
 
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सचिवपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1937 साली नागपूर-कामठी या मतदारसंघातून ते निवडून आले होते. बाबू हरदास यांचे दलित चळवळीत खूप मोठे योगदान असून त्यांनी दिलेला `जय भीम’ शब्द हा अजरामर असाच आहे. म्हणूनच आज ते `जय भीम’चे जनक म्हणून ओळखले जातात.
 
बाबू हरदास यांचे 12 जानेवारी 1939 साली अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले. दलित समाजात राहून चळवळीला योगदान देणारे बाबू हरदास हे आज दुर्लक्षितच राहिले आहे. आंबेडकरी समाजाला स्वतंत्र बाण्याचा `जय भीम’ सारखा शब्द देऊनही त्यांची फारशी कुणी दखल घेतल्याचे जाणवत नाही. त्यांची जयंती साजरी झाल्याचेही दृष्टीक्षेपात दिसत नाही.
 
आज निवडणुकीच्या रणधुमाळीत आंबेडकरी समाजाची मते मिळविण्यासाठी गल्ली-बोळात, वाडय़ा-तांडय़ावर, शहरा-शहरात दलित नेत्यांसह इतर नेतेही `जय भीम’चा जयघोष करताना दिसतील. पण 6 जानेवारी रोजी `जय भीम’ चे जनक बाबू हरदास यांची जयंती आहे, याची आठवण किती जणांना राहील ही शंकाच आहे. त्यांच्या जयंती दिनाचे महत्वही या निवडणुकीच्या भाऊगर्दीत दरवर्षीप्रमाणे हरवून जाईल असे म्हटले तर नक्कीच चुकीचे ठरणार नाही.
 
हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास यांच्या कार्याला मुजरा आणि मानाचा जय भीम !!!!!
 
 
मित्र-मैत्रिणीनो ही माहिती जास्तीतजास्त शेअर करा .....!!!!!

१०४ वर्षानंतर

 *१०४ वर्षानंतर* 

(२१/०७/२०१८)


मूळलेखक - राजेश चंद्रा ( हिंदी ) 

मराठी भाषांतर - अरविंद भंडारे


भगवान बुध्दांद्वारे सांगितलेले कम्मठ्ठान अर्थात ध्यान साधनेचा निष्ठापूर्वक अभ्यास करत लकुण्टक भद्दीय अर्हत झाले. अर्हत झाल्यानंतर ते तथागतांच्या दर्शनास आले. भगवंतांना वंदन करून ते धम्मसभेतून हलक्या पावलांनी जसे उठून जाऊ लागले तसे भगवंतांनी त्यांना उद्देशित करत भिक्खूंना संबोधित केले: 

"पस्सथ भिक्खवे, अयं भिक्खु मातापितरो हन्त्वा निद्दुक्खो हुत्वा याति, 

हे पहा भिक्खूनो, हा भिक्खु माता पित्याची हत्या करून दुख मुक्त झालाय. 


"माता पित्याची हत्या करून हा भिक्खु दुख मुक्त झालाय" 

भगवंताचे हे शब्द ऐकून सगळे भिक्खू एक दुसऱ्यांकडे आश्चर्यचकीत होऊन पाहू लागले. 

ते या गाथेचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात भगवंतांनी आणखी एक गाथा उच्चारून सर्वांना अचंबित करून सोडले. 


मातरं पितरं हन्त्वा राजानो द्वे च खत्तिये । 

रट्ठं सानुचरं हन्त्वा अनीघो याति ब्राम्हणो ।।


माता पिता आणि दोन क्षत्रिय राजांची हत्या करून तसेच राष्ट्राचा नाश व सोबत्यांची हत्या करून ब्राम्हण निष्पाप होतात. 


या गाथांना जर तश्याच शाब्दीक अर्थात समजण्याचा प्रयत्न केला तर त्या भ्रम निर्माण करतात. त्या केवळ भ्रमच उत्पन्न करत नाहीत तर अर्थाचा अनर्थ करतात. 

परंतु भगवंतांचे हे कथन प्रतीकात्मक आहे. 

संपूर्ण त्रिपिटकात अनेक प्रसंग असे आहेत जिथे भगवंत प्रतिकांच्या भाषेत उपदेश करतात. 


दिघ्घनिकायातील सिगालवादसुत्त प्रतिकवादाचे सर्वश्रेष्ठ आणि लोकप्रिय उदाहरण आहे. ज्यामध्ये भगवंत सिगाल नावाच्या युवकाला सहा दिशांचे अर्थ समजवतात. 

पूर्व दिशा अर्थात माता पिता, पश्चिम दिशा म्हणजे पत्नी-मुले, उत्तर दिशा म्हणजे मित्र आणि नातेवाईक, दक्षिण दिशा अर्थात गुरू व आचार्य, खालची दिशा म्हणजेच सेवक, वरची दिशा म्हणजेच अर्हत श्रमण. 

हा युवक आपल्या दिवंगत वडीलांच्या सांगण्यानुसार सकाळी सहा दिशांची पूजा करत होता. हे भगवंतांनी पाहिल्यानंतर त्याला सहा दिशांच्या प्रतिकांचे अर्थ सांगितले व त्यांच्या पूजेचे अर्थ सांगितले. 

दिघ्घनिकाय म्हणजेच दिर्घ अर्थात दिर्घ प्रवचनांचा संग्रह. हे सिगाल सुत्त दिघ्घनिकायात आहे. 

प्रतिकवादाची पराकाष्ठा बघायची असेल तर मज्झिम निकायातील वम्मीक सुत्त वाचावयास हवे. त्यातील प्रतीकांचा अर्थ समजून कुमार कश्यप अर्हत झाले. 


इथे लकुण्टक भद्दीय यांच्यासंदर्भात या गाथा ऐकून धम्मसभेत बसलेले काही भिक्खु सोतापन्न झाले, काही सकृदागामी, कोणी अनागामी झाले तर कोणी अर्हत. खुद्दकनिकायातील धम्मपद अठ्ठकथेच्या पकिण्णकवग्गात या गाथांच्या संदर्भात असेच उल्लेख आहेत. 


आचार्य अश्वघोष यांनी अट्ठकथांच्या टिकांमध्ये या गाथांवर खुपच सुंदर आणि योग्य प्रतिक व्याख्या केलेली आहे. 

लकुण्टक भद्दीय याला उद्देशित करून भिक्खूंना संबोधित करत भगवंत पुढील गाथा म्हणतात. 

" पस्सथ भिक्खवे, अयं भिक्खु मातापितरो हन्त्वा निद्दुक्खो हुत्वा याति." 

हे पहा भिक्खुनो, हा भिक्खु माता पित्याची हत्या करून दुख मुक्त झालाय. 

शब्दावली ध्यान देण्यायोग्य आहे. 'निद्दुक्खो हुत्वा' तो दुख मुक्त झाला. 

आणि झाला कसा ? 

माता पित्याची हत्या करून. 

माता पिता कोण असतात ? 

ते जन्मदाता असतात. 


आध्यात्मिक अर्थात दुखाची जननी कोण आहे? 

दुखाची जननी तृष्णा आहे. 

दुखाचे जनक कोण आहेत ? 

अस्मिता अर्थात 'मी' पणा म्हणजेच अहंकार. 

म्हणजेच दुखाचे माता पिता कोण झाले ? 

माता तृष्णा व पिता अहंकार. 


आता या प्रतिकांच्या अर्थांना समोर ठेवून भगवंताच्या कथनाला पहा; "अयं भिक्खु मातापितरो हन्त्वा निद्दुक्खो हुत्वा याति" हा भिक्खु माता पित्याची हत्या करून दुख मुक्त झाला. 

अर्थात तृष्णा आणि अहंकार यांची हत्या करून हा भिक्खु दुख मुक्त झाला. 


भगवंताद्वारे संगायित गाथांमध्ये माता, पिता, क्षत्रिय राजा, क्षोत्रिय राजा, राष्ट्र, सोबती, वाघ, ब्राम्हण या शब्दांचा लौकीक अर्थाशी काही संबंध नाही. ते सर्व आध्यात्मिक प्रतिक आहेत. 

माता - तृष्णा 

पिता - अहंकार

दोन क्षत्रिय क्षोत्रिय राजा - शाश्वतवादी मिथ्या दृष्टी, उच्छेदवादी मिथ्यादृष्टी.

राष्ट्र - पाच उपादान स्कंध. 

अनुचर - राग 

पाच व्याघ्र - ज्ञानाची पाच आवरणे. 

ब्राम्हण - मैत्री, करूणा, मुदिता, उपेक्खा या चार ब्रम्हविहारात सुप्रतिष्ठित व्यक्ती. 


संसाराचा फेरा, जन्म-जरा-मरण, रोग- शोक-दुख हे सर्व कारक आहेत. या प्रतिकांना मनासमोर ठेवून भगवंतांच्या उपदेशित गाथांचे अर्थ समजून घ्या. 


मातरं पितरं हन्त्वा राजानो द्वे च खत्तिये ।

रट्ठं सानुचरं हन्त्वा अनीघो याति ब्राम्हणो ।।


माता पिता अर्थात तृष्णा व अहंकार आणि दोन क्षत्रिय राजे म्हणजे मिथ्यादृष्टी, उच्छेदवादी मिथ्यादृष्टीची हत्या करून तसेच राष्ट्र अर्थात पाच उपादान स्कंधांना नष्ट करून सोबती म्हणजेच रागाची हत्या करून ब्राम्हण निष्पाप होतो. 

बौध्दिक स्वरूपात आणखी विस्तृत व्याख्या होतील अशी आशा आहे. परंतु भगवंतांच्या वचनांचा योग्य अर्थ ध्यानाभ्यास केल्यानंतर समजतो. जर तिथूनही अर्थ नाही समजला तर अर्थाचा अनर्थ होण्याची संभावना असते. आणखी वरून वचनांची निंदा आलोचना याचा पापदोष घडण्याचा संभव असतो. 

तरी भगवंत खुपच विनम्रतेने सांगतात - जसे सोनार सोन्याला आगीत तापवून त्याचा कस तपासतो. तसेच तुम्ही माझ्या वचनांची पारख करा. मगच ते माना. 

भगवंत तर आमंत्रण देतात. 

एहि पस्सिको - या आणि पहा. 


भगवंतांच्या या वचनांच्या अर्थांचा बौध्दिक लोक कधी कधी अनर्थ करून तर्काच्या ऐवजी वितर्क करू लागतात.

भगवंतांच्या या कथनाला सुध्दा पहा. 

जसे सोनार सोन्याला आगीत तापवतो. 

आगीत तापवणे म्हणजे ध्यानाच्या आगीत तापवणे, विपस्सनेच्या आगीत तापवणे. 


बहुतकरून बौध्दिक लोक, इंटेलेक्चुअल लोक ध्यान तर करत नाही आणि बुध्द वचनांचे विवेचन विश्लेषण करू लागतात. 

याचे परिणाम काय होतात? 

अर्थाचा अनर्थ होतो आणि बुध्दवचनांची हेळसांड केल्याचे पापदोष लागतो. 

भगवंतांनी बुध्द वचनांना पारखण्याची सूट दिली आहे, परंतु सोनारासारखी आगीत तापवून म्हणजेच ध्यानसाधनेच्या आगीत तापवून पारखणे. जर तेव्हा दोष दिसले तर जे त्याज्य असेल ते त्यागा व जे ग्राह्य ते ग्रहण करा. 

संयुक्त निकायात दोन खुप सुंदर सुत्त आहेत. जे ह्या वेळच्या अमावस्या व पौर्णिमेच्या पवित्र दिवशी सामायिक झाले आहेत. सामायिक या अर्थात कि १३ जुलै, २०१८ ला अमावस्येच्या दिवशी सुर्य ग्रहण आले आहे. तसेच २७ जुलै, २०१८ ला आषाढ पौर्णिमा ज्याला प्रचलित परंपरेत गुरू पौर्णिमा संबोधले जाऊ लागले या दिवशी १०४ वर्षानंतर या शतकातील सर्वात मोठे चंद्र ग्रहण होणार आहे. 

एका पंधरवड्यातील सुर्य ग्रहण व चंद्र ग्रहण ही सर्वात दुर्लभ खगोलीय घटना आहे. जी शतकानुशतकात कधी कधी होते. ह्या प्रसंगी बौध्द देशातील श्रध्दाळू उपासक उपोसथ धारण करण्याबरोबर सुर्य ग्रहणादिवशी सुरिय परित्तं व चंद्र ग्रहणादिवशी चन्द परित्ताचे पठन करतात. 

ही दोन्ही सुत्तं बऱ्याच काळापासून महापरित्राण पाठाचे अनिवार्य अंग आहे. जर आता या सुत्तांचा पण शाब्दीक अर्थ लावला तर बौध्दिक लोकांच्या टिकेचा चांगला विषय आहे. परंतु याच्या प्रतिक अर्थांना लक्षात घेतले तर परित्तं हि एक रक्षा आहे. 

प्रथम या सुत्तांना विना प्रतिक अर्थामध्ये जसे आहेत तसे पाहूया.


चन्द परित्तं ( पालि ) 


एवं मे सुतं, एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डकस्स आरामे। तेन खो पन समयेन, चन्दिमा देवपुत्तो राहुना असुरिन्देन गहितो होति। अथ खो चन्दिमा देवपुत्तो भगवन्तं अनुस्सरमानो, तायं वेलायं इमं गाथं अभासि:


1. नमो मे बुद्धवीरत्थु विप्पमुत्तोसि सब्बधि। 

सम्बाधपटिपन्नोस्मिं तस्स मे सरणं भवाति।।


अथ खो भगव चन्दिमं देवपुत्तं आरब्भ राहुं असुरिन्दं गाथाय अज्झभासि:


2. तथागतं अरहन्तं चन्दिमा सरणं गतो।

राहुं चन्दं पमुञ्चस्सु बुद्धा लोकानुकम्पकाति।।


अथ खो राहु असुरिन्दो चन्दिमं देवपुत्तं मुञ्चित्वा तरमानरूपो येन वेपचित्ति असुरिन्दो तेनुपसंकमि, उपसंकमित्वा संविग्गो लोमहट्टजातो एकमन्तं अट्ठासि; एकमन्तं ठितं खो राहुं असुरिन्दं वेपचित्ति असुरिन्दो गाथाय अज्झभासि:


3. किन्नुसन्तरमानोव राहु चन्दं पमुञ्चसि।

संविग्गरूपो आगम्म किन्नुभीतोव तिट्ठति'ति।।


4. सत्तधा मे फले मुद्धा जीवन्तो न सुखं लभे। 

बुद्धगाथाभिगीतोम्हि नो चे मुञ्चेय चन्दिमन्ति।। 

 

चंद्र परित्राण ( मराठी ) 


असे मी ऐकले आहे की, एके समयी भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामामध्ये  विहार करीत होते. त्या समयी देवपुत्र चंद्रमा याला असुरेंद्र राहूने पकडले तेव्हा देवपुत्र चंद्रमा याने भगवंताना स्मरण करून पुढील गाथा म्हटली. 


१. हे बुध्दवीर, तुम्हाला माझा नमस्कार आहे. 

आपण सर्व प्रकारे विमुक्त आहात. मी भारी विपत्तीत आहे. तेव्हा तुम्ही मला शरण द्या. 


तेव्हा भगवंतांनी देवपुत्र चंद्रमा साठी असुरेंद्र राहुला पुढील गाथेत सांगितले. 


२. हे असुरेंद्र राहु, देवपुत्र चंद्रमा अर्हत तथागतांना शरण आलाय. बुध्द लोकानुकम्पि आहेत. तुम्ही देवपुत्र चंद्रमा ला मुक्त करा. 


तेव्हा असुरेंद्र राहु ने चंद्रमाला सोडून घाबरलेल्या मनस्थितीत जिथे असुरेंद्र वेपचित्री होते तेथे पोहचले. पोहचल्यानंतर रोमांचित होऊन एका बाजूला उभे राहिले. एका बाजूला उभ्या असलेल्या असुरेंद्र राहु ला असुरेंद्र वेपचित्री ने पुढील गाथेत सांगितले. 


३. हे असुरेंद्र राहु घाबरलेल्या मनस्थितीत  देवपुत्र चंद्रमा ला का तु सोडलेस? आणि भयभीत होऊन इथे का उभा आहेस! 


४. देवपुत्र चंद्रमाला सोडण्याचे आदेश बुध्दांनी गाथेत सांगितला. जर देवपुत्र चंद्रमाला सोडले नसते तर माझ्या डोक्याचे सात तुकडे झाले असते. सुखाने जगणे मुश्किल झाले असते. 


आणि आता सुरियपरित्तं ( पालि )


एवं मे सुतं, एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डकस्स आरामे। तेन खो पन समयेन, सुरियो देवपुत्तो राहुना असुरिन्देन गहितो होति। अथ खो सुरियो देवपुत्तो भगवन्तं अनुस्सरमानो, तायं वेलायं इमं गाथं अभासि:


1. नमो मे बुद्धवीरत्थु विप्पमुत्तोसि सब्बधि। 

सम्बाधपटिपन्नोस्मिं तस्स मे सरणं भवाति।।


अथ खो भगव सुरियं देवपुत्तं आरब्भ राहुं असुरिन्दं गाथाय अज्झभासि:


2. तथागतं अरहन्तं सुरियो सरणं गतो।

राहुं सुरियं पमुञ्चस्सु बुद्धा लोकानुकम्पकाति।।


यो अन्धकारे तमसी पभंकरो 

वेरोचनो मण्डली उग्गतेजो ।

मा राहु गिली चरं अन्तलिक्खे

पजं मम राहु पमुञ्च सूरियन्ति।।


अथ खो राहु असुरिन्दो सुरियं देवपुत्तं मुञ्चित्वा तरमानरूपो येन वेपचित्ति असुरिन्दो तेनुपसंकमि, उपसंकमित्वा संविग्गो लोमहट्टजातो एकमन्तं अट्ठासि; एकमन्तं ठितं खो राहुं असुरिन्दं वेपचित्ति असुरिन्दो गाथाय अज्झभासि:


3. किन्नुसन्तरमानोव राहु सुरियं पमुञ्चसि।

संविग्गरूपो आगम्म किन्नुभीतोव तिट्ठति'ति।।


4. सत्तधा मे फले मुद्धा जीवन्तो न सुखं लभे। 

बुद्धगाथाभिगीतोम्हि नो चे मुञ्चेय सूरितन्ति।। 


सुर्य परित्राण ( मराठी )


असे मी ऐकले आहे की, एके समयी भगवंत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामा त विहार करीत होते. त्या समयी देवपुत्र सुर्यला असुरेंद्र राहु ने पकडले. तेव्हा देवपुत्र सुर्याने भगवंताना स्मरण करून ही गाथा म्हटली. 


१. हे बुध्दवीर तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही सर्व प्रकारे विमुक्त आहात. मी भारी विपत्तीत आहे. तेव्हा तुम्ही मला शरण द्या. 


तेव्हा भगवंतानी देवपुत्र सुूर्यासाठी पुढील गाथा म्हटली. 


२. हे असुरेंद्र राहु, देवपुत्र सुर्य अर्हत तथागतांना शरण आलाय. बुध्द लोकानुकम्पि आहेत. तुम्ही देवपुत्र सूर्याला मुक्त करा. 


जो गडद अंधारात प्रकाशमान असतो, जो वैरोचन आभा वलयासह उग्रतेजाने अंतरिक्षात भ्रमण करतो. हे राहु! अशा सुर्याला ग्रासित करू नको. मला शरणागत झालेल्या माझ्या पुत्राला सुर्याला सोडून दे. 


तेव्हा असुरेंद्र राहु ने सूर्याला सोडून दिले व घाबरलेल्या मनस्थितीत जिथे असुरेंद्र वेपचित्री होते तेथे पोहचले. पोहचल्यानंतर रोमांचित होऊन एका बाजूला उभे राहिले. एका बाजूला उभ्या असलेल्या असुरेंद्र राहु ला असुरेंद्र वेपचित्री ने पुढील गाथेत सांगितले. 


३. हे असुरेंद्र राहु घाबरलेल्या मनस्थितीत देवपुत्र सूर्याला का तु सोडलेस ? आणि भयभीत होऊन इथे का उभा आहेस! 


४. देवपुत्र सूर्याला सोडण्याचे आदेश बुध्दांनी गाथेत सांगितला आहे. 

जर देवपुत्र सूर्याला सोडले नसते तर माझ्या डोक्याचे सात तुकडे झाले असते व सुखाने जगणे मुश्किल झाले असते. 


प्रथमत: वाटते की आपण कोणती तरी पौराणिक मिथक, आख्यान वाचत आहोत, किंवा ऐकत आहोत. असुरेंद्र राहु ने ग्रासित चंद्र आणि सुर्य भगवंतांच्या शरणात आले आहेत. हाथ जोडून मुक्त करण्याची प्रार्थना करत आहेत. आणि भगवंत असुरेंद्र राहु ला चंद्र आणि सुर्याला मुक्त करण्याचे आदेश देत आहेत. त्यानंतर असुरेंद्र राहु घाबरून त्यांना मुक्त करतो. संपूर्ण प्रसंग एखाद्या मिथकाचे कथानक वाटते. 


खरं म्हणजे या दोन खगोलीय घटना आहेत. - चंद्र ग्रहण आणि सुर्य ग्रहण, यांना डोळ्यासमोर ठेवून या दोन प्रतिक सुत्तांची रचना करण्यात आली आहे. 

काव्यशास्त्रानुसार यामध्ये मानवीकरण अलंकाराचा प्रयोग झाला आहे. ज्याला इंग्रजीमध्ये परसोनिफिकेशन ( Personification ) म्हणतात. 


इथे सुर्य, चंद्र, राहु, वेपचित्र याचे मानवीकरण केले आहे. आणि त्या निमित्ताने एक गहन संदेश दिला आहे. त्या संदेशाला आपण जाणू शकलो तर या सुत्तांचे पठन करणे  किंवा ऐकणे सार्थक झाले असे समजा. अन्यथा हे पण अंधश्रद्धेचे कारक आहे.


प्रसंग श्रावस्ती येथील आहे. भगवंतांनी श्रावस्तीमध्ये आपल्या जिवनातील सर्वाधिक म्हणजेच २५ वर्षावास केले. वर्षावास ज्याला आता चातुर्मास बोलले जाते, चार महिन्यांचा प्रवास असतो. चार महिन्यात कमीत कमी चार पौर्णिमा येतात, चार अमावस्या येतात, चार कृष्णपक्षातील अष्टमी येतात आणि चार शुक्लपक्षातील अष्टमी येतात. चारा ला पंचवीस ने गुणल्यास शंभर होतात. फक्त श्रावस्तीमधील वर्षावास मोजले तर भगवंतांच्या वर्षावास काळात १०० पौर्णिमा व १०० अमावस्या श्रावस्ती प्रवास काळात आल्या. 

सुर्य ग्रहण किंवा चंद्र ग्रहण जेव्हा ही होते ते पौर्णिमा किंवा अमावस्येलाच होते. या शंभर पौर्णिमा व अमावस्येच्या काळात कितीतरी वेळा चंद्र ग्रहण आणि सुर्य ग्रहण झाले असतील. खगोल वैज्ञानिकांसाठी हा शोधाचा एक मनोरंजक विषय होऊ शकेल की भगवान बुध्दांच्या पूर्ण जिवनकाळात किती वेळा सुर्य अथवा चंद्र ग्रहण झाले. 

निश्चितच हे त्याच एका घटनेशी संबंधित आहे जेव्हा सुर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण पडले असेल. भगवंत अर्हत आहेत, सम्यक सम्बुध्द आहेत. ते उपायकौशल्याने सांसारिक संवादाला सुध्दा आध्यात्मिक अर्थ देत असत. 


एके समयी भिक्खूगण आपआपसांत एका ओबडधोबड भूमिची चर्चा करत होते, की अमुक भूमी रमणीय आहे अथवा नाही. तेव्हा भगवंतांनी सारी चर्चा ऐकल्यानंतर म्हणाले - जिथे श्रमण वास करतात ती भूमी रमणीय आहे. 


एके समयी भिक्खूगण एका झोपडीची चर्चा करत होते, की तेथे पावसात पाणी गळत होते जिथे भिक्खू साधनारत होते. तेव्हा त्या समयी भगवंत म्हणाले : 

यथागारं दुच्छन्नं वुट्ठी समतिविज्झत्ति । 

एवं अभावितं चित्तं रागो समतिविज्झत्ति ।। 


जर घराच्या छतात छिद्र असेल, तर त्यात पावसाचे पाणी येते. असेच संयमरहित चित्तामध्ये राग प्रविष्ट होतो. 

या प्रकारे आपण पाहतो की भगवंत प्रत्येक घटनेला एक अंतर्निष्ठ अर्थ देत होते. पंचवीस वर्षावासाच्या दिर्घ अवधीमध्ये एखाद्या सुर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहणाच्या  घटनेेसमयी एक गहन आध्यात्मिक संदेश दिला असेल. 


एक गोष्ट इथे लक्षात घेण्याजोगी आहे की, जेव्हा भगवंत उपासकाबरोबर सांकेतिक, प्रतिकात्मक संवाद करत असत तेव्हा त्या संकेताचा अर्थसुध्दा विस्ताराने सांगत असत. जसे की सिगालाच्या प्रसंगी, परंतु ते  जेव्हा साधनेत परिपक्व भिक्खूंबरोबर चर्चा करीत, तेव्हा ते संकेत आणि प्रतिकांना अव्याव्खायितच सोडत असत. ते साधनेत परिपक्व लोक होते जे संक्षेप व संकेतात बोललेल्या भाषेतील अर्थ जाणून घेत असत. 

ह्या सुर्य परित्त व चंद्र परित्ताचा संवाद भिक्खूंसमोर झालेला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ विस्तार नाही आहे. 


आध्यात्मिक अर्थात चंद्र आपल्या मनाचे प्रतिक आहे तर सुर्य आपल्या चेतनेचे प्रतिक आहे. आज खगोल वैज्ञानिक सुध्दा या निष्कर्षावर पोहचलेत की चंद्राच्या कलांबरोबर आपल्या मनाचा संबंध आहे. पौर्णिमेच्या दिवशी वेडाचे झटके जास्त येतात, त्याच दिवशी तनाव, उन्माद, अवसाद, आत्महत्या - हत्या ह्या घटना प्रमाणात होतात.  पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात भरती ओहोटी जास्त असते. याचप्रमाणे सुर्याबरोबर आपल्या चेतनेच्या चल बिचल होण्याचा खोल संबंध आहेत. सुर्याच्या डागांची  संख्या वाढल्यावर पृथ्वीवर पर्यावरणात बरेच बदल होतात. युध्द, वादळ-वारा, पूर इत्यादि घटना जास्त होतात. दोन्ही महायुध्दाच्या काळात सुर्यावरील डागांची संख्या आकस्मिकपणे वाढली होती. 


आपल्या आध्यात्मिक जीवनात सुध्दा असेच होते की कधी कधी आपले चंद्र रूपी मन ग्रासले जाते. समस्त नकारात्मक तरंग मनाला घेरतात. अर्थात आपल्या मनाला चंद्र ग्रहण लागते. कधी कधी आपली चेतना समस्त अंधकाराने भरून जाते. आपलेच हित - अहित आपल्याला सुचत नाही. म्हणजेच आपल्या चेतनेला सुर्य ग्रहण लागले. आपल्याला अकुशल वृत्तीच्या राहु ने ग्रासले आहे. आपली चेतना मोह ग्रासित, लोभ ग्रासित, काम ग्रासित होते. अश्याप्रसंगी आपल्या अंतरमनातील बुध्दत्वाच्या शरणात जाणे हाच अंतिम उपाय आहे. हेच आहे बुध्दं सरणं गच्छामी । 

बुध्दाला शरणागत झाल्यावर आपली चेतना, आपले मन नकारात्मक वृत्तीच्या राहु पासून मुक्त होते. हिच आहे ग्रहणापासून मुक्तता. या सुत्तात करूणामय भगवंत सांगतात. " पजं मम राहु पमुञ्च सुरियन्ति राहु ! 

सुर्य माझा पुत्र आहे, त्याला मुक्त करा.


जसे रडणाऱ्या बालकाला माता आपल्या छातीशी कवटाळते आणि ते बालक गप्प होते, स्वतला सुरक्षित समजते, आरामाचा - शांततेचा अनुभव करते. तसेच सुर्य म्हणजेच आपली चेतना, आपल्या मनाला भगवंत आपला पुत्र म्हणत आहेत. जेव्हा आपण लहान बालकासारखे त्यांना शरण जातो म्हणजेच आपल्या अंतरमनातील बुध्दत्वाला शरण जातो तेव्हा आपले परित्राण होते. परित्राण अर्थात रक्षा. यालाच पालित 'परित्तं' असे म्हणतात. कारण की आपली चेतना, आपले मन परमचैतन्य आपल्या बुध्दत्वाचाच अंश आहे. या अर्थात ते बुध्दपुत्र आहेत. 


आषाढी पौर्णिमेच्या दिवशी भगवंताने आपल्या पंच भिक्खूंना दिक्षा दिली होती - कौडिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजी, महानाम यांना. भारताच्या इतिहासात पहिली वेळ गुरू शिष्य परंपरेची सुरूवात झाली. भगवान बुध्दांना लोकगुरू म्हटले गेले. या कारणामुळे आषाढ पौर्णिमेला गुरू पौर्णिमा सुध्दा म्हणतात. या पौर्णिमेच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येतो की ही पौर्णिमा आज प्रत्येक धार्मिक पंथात गुरू पौर्णिमेच्या रूपात स्थापित झाली आहे. 


१०४ वर्षानंतर हा अदभुत संयोग आला आहे की, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पुर्ण चंद्र ग्रहण होणार आहे. २३५ मिनिटाचे अर्थात जवळजवळ ३ तास ५४ मिनिटे म्हणजेच जवळजवळ ४ तास. 

बौध्द उपासक उपासिकांनी या दिवशी उपोसथ धारण करावे आणि ध्यान साधना करावी, दान पुण्य करावे आणि आध्यात्मिक अर्थांना धारण करीत चन्दपरित्ताचे पठन करावे. बौध्द जगतात अशी धारणा आहे की अशा दुर्लभ प्रसंगी या परित्ताचे पठण करण्याने लांबलेली कार्ये लवकरात लवकर पूर्ण होतात, अडकलेल्याला मुक्ती मिळते, दिर्घ आजारापासून मुक्तता मिळते. आस्था आपल्या जागेवर आहेत परंतु योग्य अर्थाचे अवलोकन केल्यास अज्ञानातून मुक्ती मिळते. 

हेच तर वास्तविक परित्राण आहे. 


आळवक यक्षाने भगवंतांना प्रश्न विचारला. " किसूधं वित्तं पुरिसस्स सेट्ठं ।

मनुष्याचे सर्वश्रेष्ठ धन काय आहे ? 


भगवंतांनी उत्तर दिले - सध्दीध वित्तं पुरिसस्स सेट्ठं । 

श्रद्धा मनुष्याचे सर्वश्रेष्ठ धन आहे. 


अर्थाला समजून धम्मं धारण केले तर श्रद्धा फलद्रूप होते. 

अन्यथा हीच श्रद्धा अंधश्रद्धा बनते. श्रद्धेने धम्माला धारण करणे यातच परित्राण आहे.





Wednesday, 4 May 2022

हरियाणा नव्हे, महायाना बौद्ध प्रदेश

 *हरियाणा नव्हे, महायाना बौद्ध प्रदेश* Ancient Rich Heritage of Mahayana Buddhism in Hariyana State


उत्तर भारतातील हरियाणा राज्य १९६६ साली पंजाब प्रांतातून वेगळे झाल्यावर स्वतंत्र झाले. पण आज हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्याची राजधानी केंद्रशासित प्रदेश असलेले चंदिगड आहे. हेच हिरवेगार हरियाणा एकेकाळी महायान पंथ संस्कृतीचे मोठे केंद्र होते, हे बऱ्याच जणांना ज्ञात नाही. शुंग आणि कुशाण राजवटीची बहरलेली शहरे येथे होती. त्यांच्या तांब्याच्या नाण्यांची टाकसाळ येथे होती. राजा हर्षवर्धन याची हरियाणात थानेसर येथे राजधानी होती.आणि मुख्य म्हणजे प्राचीन काळापासून परंपरेनुसार चालत आलेला पाच दिवसांचा एक उत्सव हरियाणात वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो. त्याचे नाव आज सरस्वती महोत्सव झाले असले तरी तो मूळ बुद्ध पौर्णिमेचा उत्सव आहे. सातव्या शतकात 'शिक्षासमुच्चय' हा महायानी तत्वे एकत्रितपणे सांगणारा २७ कारीकांचा ग्रंथ सौराष्ट्रातील आचार्य शांतिदेव यांनी तयार केला होता. तो वलभी विद्यापीठात व हरियाणात खूप प्रसिद्ध होता. त्यामध्ये बौद्ध देवता सरस्वतीचे गुणगान आहे. त्यामुळे हरियाणात सरस्वती देवीचे प्रस्त खूप आहे. म्हणूनच महायान या बौद्ध पंथाची भरभराटीला आलेली अनेक स्थळें या राज्यात आहेत. त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.


१) आदी बद्री : हे स्थळ हरियाणामध्ये यमुनानगर जिल्ह्यात असून शिवालिक या जंगली भागातील टेकड्यांच्या पायथ्याशी आहे. येथे असंख्य स्तूप आणि विहार यांचे अवशेष पसरले आहेत. इथेच सरस्वती व सोमा नदीच्या काठी पाच दिवसांचा मोठा महोत्सव वैशाख महिन्यात भरतो. त्यास 'आदी बद्री आखा तिज मेला' असेही म्हणतात. तसेच नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमेला इथे 'बद्रि कपाल मोचन' हा सात दिवसांचा महोत्सव भरतो. १४ एकर वनांच्या जागेवरील ३ टेकड्यांचे उत्खनन येथे झाले असून दोन हजार वर्षापूर्वीचे पक्क्या विटांचे स्तुप आढळले आहेत. तसेच उत्खननात मातीची असंख्य भांडी, पात्रे, टेराकोटा मणी, माळा, छोटी बुद्ध शिल्पे आढळून आली आहेत. भिक्खूंसाठी छोटी निवासस्थाने आणि त्यांची भिक्षापात्रे सुद्धा येथे आढळली आहे. 


२) सुंघ : हे ठिकाण यमुनानगर जिल्ह्यात असून एकेकाळी प्राचीन शुंग राजवटीची ती राजधानी होती. सम्राट अशोककालीन बौद्ध संस्कृतीचे अवशेष इथे आढळले आहेत. सम्राट अशोकाने जेथेंजेथें भगवान बुद्ध गेले होते, जेथेजेथे त्यांचा निवास होता आणि जेथेजेथे त्यांनी धर्मोपदेश दिला त्या ठिकाणी स्तुप उभारले आहेत. भगवान बुद्ध संकिसा वरून चालत या सुंघ गावी आले होते. व येथे येऊन त्यांनी धर्मोपदेश दिला. म्हणून या पवित्र ठिकाणी पक्क्या विटांचा मोठा स्तूप सम्राट अशोकाने उभारलेला आहे. अलेक्झांडर कॅनिंगहम यांनी प्रथम येथे सर्व्हे करून उत्खनन चालू केले होते.


३) हर्ष का टिला : हे ठिकाण थानेसर जिल्ह्यात असून ८८-८९ मध्ये केलेल्या उत्खननात तिथे बौद्ध संस्कृतीचे पक्क्या विटांचे बांधकाम आढळले. हर्षवर्धनच्या राजवटीची नाणी सुद्धा येथे सापडली. त्याकाळात थेरवादी पंथाचा संमितीय संप्रदाय तेथे प्रमुख होता. व हर्षवर्धन राजाची बहीण राजेश्वरी ही त्या संप्रदायाची होती.


४) भुना टेकडी : फतेहाबाद जिल्ह्यात ही टेकडी असून तेथील उत्खननात कुशाण राजवटीतील ६८ तांब्याची नाणी  व ठसे मिळाले. 


५) नौरंगाबाद : हे ठिकाण भिवणी जिल्ह्यात असून कुशाण राजवटीतील टांकसाळीचे भरपूर अवशेष येथे आढळले आहेत.


६) खोक्राखोट : या ठिकाणी कुशाण काळातील वालुकामय दगडातील दोन दानपत्रे मिळाली असून एकावर ब्राम्ही लिपीत 'हे दानपत्र कनिष्क राजाने दिले' असा उल्लेख आहे व दुसऱ्यावर 'दान देणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म' असे लिहिले आहे. येथे महायानी पंथाचे सखोल ज्ञान असलेल्या अनेक विद्वानांचे वास्तव्य होते. अनेक संघाराम इथे एकेकाळी होते.


७) हर्नोल : हे ठिकाण गुरगाव जिल्ह्यात असून शुंग आणि कुशन राजवटीतील बहरलेल्या महायान पंथाचे व संघाराम यांचे अनेक अवशेष येथील उत्खननात सापडले आहेत. 


८) मूहम्मदनगर : येथेही प्राचीन काळातील बौद्ध संस्कृतीचे भरपूर अवशेष सापडले. ११ व्या शतकानंतर मोहम्मद घोरी याच्या आक्रमणाने येथील बौद्ध संस्कृती नष्ट झाली असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. अनेक बौद्ध भिक्खुंचे वास्तव्य येथील संघारामात होते. 


९) चनेती बौद्ध स्तूप : पक्क्या विटांचा बांधलेला ३ ऱ्या शतकातील हा स्तुप सुस्थितीत असून चिनी प्रवासी भिक्खू ह्युएन त्संग यांनी सुद्धा त्यांच्या प्रवास वर्णनात याचा उल्लेख केलेला आहे. हा प्रसिद्ध स्तुप बघण्यास अनेक परदेशी भिक्खूं आणि हरियाणातील विद्यापीठातील विद्यार्थी वर्ग सतत इथे येतो. युट्युबर याचे व्हिडीओ आहेत. 


भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माचे जरी अठरा संप्रदाय झाले होते तरी मूळ बौद्ध सिद्धांत एकच होते. आजची हरियाणात विकसित झालेली संस्कृती ही मूळ बौद्ध धर्मातील महायान पंथाची आहे. म्हणून बौद्धांच्या प्रसिद्ध तिथींवर तेथे सरस्वती महोत्सव साजरे केले जातात. यासाठी हरयाणा सरस्वती वारसा विकास महामंडळ देखील स्थापित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात सैनी समाज हा स्वतःला सम्राट अशोक यांचा वंशज समजतो. व ते आज बौद्ध होत आहेत. मात्र हरियाणातील सैनी समाजाला त्यांच्या पूर्वजांचा इतिहास माहीत असूनसुद्धा ते गप्प आहेत. हरियाणातील इतर समाज सुद्धा स्वतःची मूळ संस्कृती विसरला आहे. प्रार्थना करूया की बुद्धांचा धर्मोपदेश भारतातील सर्व जनजातीला माहीत होवो आणि त्यांचे कल्याण होवो.  


--- संजय सावंत ( नवी मुंबई )


⚛⚛⚛

Tuesday, 3 May 2022

गेल्या दोनशे वर्षातील बुद्धीझम

 *गेल्या दोनशे वर्षातील बुद्धीझम*  

Buddhism in last two century.


भारतात १९ व्या शतकात बौद्ध साहित्य, चिनी भिक्खुंची प्रवासवर्णने आणि श्रीलंकेचे अनागारिक धम्मपाल यांच्या मदतीने बौद्ध स्थळांचा शोध घेणे सुरू होते, तेव्हा पाश्चात्य देशांत बौद्ध धर्माबाबतची माहिती तेथील समाजाला हळूहळू होत होती. त्या काळात पश्चिमी देशात बुद्ध विचारांची माहिती देणारा पहिला माणूस जर्मन तत्त्ववेत्ता ऑर्थर शॉपेनहॉर हा होता. त्याचे पुस्तक 'द वर्ल्ड ऍज विल अँड रिप्रेझेंटेशन' या १८१९ च्या पुस्तकात बुद्धीझमचा प्रथम उल्लेख आला. त्यानंतर डॅनिश विद्वान रासमूस रास्क १८२१ मध्ये सिलोनला आला होता. तेथे तो पालि आणि सिंहली भाषा शिकला व त्याने प्रथमच पालिचे व्याकरण लिहून प्रसिद्ध केले.


१८२५ मध्ये 'बुद्धांचे चरित्र' हे लेख सेंट पीटर्सबर्ग येथील एक विद्वान इस्साक जेकब यांनी लिहून एशियाटिक जर्नलमध्ये प्रकाशित केले. त्यानंतर डी. क्रास हा हंगेरियन तरुण लडाखला जाऊन तिबेट शिकला व त्याचा तिबेटन- इंग्रजी शब्दकोश १८३४ मध्ये प्रकाशित झाला. त्यामुळे अनेक दुर्मिळ तिबेटी बौद्धग्रंथ यांची माहिती जगाला झाली. ब्रायन होडसन हा ब्रिटिश होता. त्यांने संस्कृत मधील अनेक बौद्ध ग्रंथांचा संग्रह केला होता. रॉयल एशियाटिक सोसायटीसाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. १८२६ पर्यंत 'पालि' नावाची जगात भाषा आहे, हे काही ठराविक विद्वान सोडले तर कुणालाच याची माहिती नव्हती. तेव्हा फ्रेंच विद्वान युजिन बॉर्नोफने Essai sur le Pali नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच दरम्यान कलकत्ता टाकसाळ मध्ये मास्टर असणाऱ्या जेम्स प्रिसेपने १८३४ मध्ये सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा अर्थ लावला. त्या नंतर १८३७ मध्ये सिलोन मधील जॉर्ज टर्नोरने "महावंसा' ग्रंथातील काही प्रकरणे भाषांतर करून प्रसिद्ध केली. तसेच पालि भाषेतील बुद्धांच्या उपदेशांचे भाषांतर केले. त्याच्या या प्रकाशनाने पालि भाषेतील बुद्ध उपदेश मोठ्या प्रमाणावर पाश्चिमात्य देशात प्रकाशित होऊन तेथील सनातनी लोकांत खळबळ उडाली. पुढे जर्मन शिक्षक कार्ल फेडरिक कॉपेन याने Religion of Buddha (१८५७) हे पुस्तक लिहिले. 


त्याच वेळी बर्मा देशात सन १८७१ मध्ये मिंदोन राजाच्या कारकिर्दीत मंडाले येथील कुथोडाव पॅगोडात पाचवी धम्मसंगती जवळजवळ दोन हजार वर्षांनी भरली गेली. त्यामुळे पाश्चिमात्य देशात बुद्ध तत्वज्ञान मोठ्या प्रमाणावर माहीत झाले. त्यानंतर एडविन अरनॉल्डचे 'लाईट ऑफ एशिया' या अप्रतिम काव्याचे १८७९ मध्ये प्रकाशन झाले. या पुस्तकाने कमालच केली. याच्या दहा लाखापेक्षा जास्त प्रती युरोप आणि अमेरिकेत विकल्या गेल्या. व अजूनही या पुस्तकाच्या प्रिंट काढल्या जात आहेत. पुढे रीस डेव्हिडने पालि टेक्स्ट सोसायटीची स्थापना १८८१ मध्ये केली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने सोसायटीचे कामकाज सक्षमतेने हाताळले. व अनेक ग्रंथ उजेडात आणले. इटली देश म्हणजे रोमन कॅथलिक यांचा बालेकिल्ला. मात्र तेथील विद्वान गुसिपे टूस्सी हा तिबेटच्या दुर्गम भागात दुर्मिळ बौद्ध हस्तलिखिते मिळविण्यासाठी फिरला व अनेक संस्कृत आणि तिबेटी बौद्ध ग्रंथ मिळवून त्यांचे भाषांतर केले. अमेरिकेत हेंनरी क्लार्क वॉरेन यांनी हॉवर्ड ओरिएंटल मालिकेद्वारे 'बुद्धीझम इन ट्रान्सलेशन' हे ( १८९६) अप्रतिम लिखाण प्रसिद्ध केले. अशा तऱ्हने बौद्ध धम्म १९ व्या शतकात युरोप आणि अमेरिकेत पुनर्जीवित होत गेला. भारतातील सनातनी विद्वान मात्र त्याबाबत अनभिज्ञ होते. 


२० व्या शतकाच्या पूर्वार्धात बर्मामध्ये उपसंपदा घेतलेल्या आयरिश भिक्खू धम्मलोक यांनी तर मोठी खळबळ माजवली. त्यांनी सिंगापूर, जपान, चीन श्रीलंका, कंबोडिया, सयाम आणि ऑस्ट्रेलिया येथे जाऊन धम्माचा प्रसार केला. त्याच प्रमाणे आनंद मेत्तेय(अॅलन बेनेट) या ब्रिटिश भिक्खूनी The Buddhist Review पत्रिका (१९०८) चालवून ग्रेट ब्रिटनमध्ये धम्मप्रसार केला. त्यांच्या अकाली निधनानंतर इंग्लंडमध्ये अनेक बौद्ध संस्था नावारूपास आल्या. पुन्हा १९५४-५६ दरम्यान बर्मामध्ये भरलेल्या सहाव्या धम्मसंगतीमुळे बुद्ध जगाच्या अनेक देशांत गेला. भारतात १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर म्यानमार वरून आलेले आचार्य गोयंका यांनी धम्म साधनेची ओळख साऱ्या जगाला करून दिली. या अशा श्रेष्ठ लोकांनी केलेल्या कार्यामुळे बुद्ध तत्त्वज्ञान जगभर पसरले. बुद्ध विचारांची लाट जगात सर्वत्र पसरली. धम्म म्हणजे संप्रदाय नव्हे तर 'निसर्ग नियमांचे पालन करणे म्हणजेच धम्म' हे आकलन मानव जातीस झाले. त्यामुळे आशा करूया की या २१व्यां शतकात धम्म जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचेल. प्रार्थना करूया की सर्व मानव जातीस त्याचे आकलन होवो व त्या प्रमाने ते मार्गक्रमण करोत. सर्वांचे कल्याण होवो.


--- संजय सावंत ( https://sanjaysat.in )


🟦🟦🟦

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...