➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*७३
सुमेधा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_हि
मंतावती नगरीचा राजा कौय्च याची मुलगी. हि वयात आल्यावर तिच्या आईवडीलांनी तिचे
लग्न वाराणसी नगरीतील अनिकरत्त नावाच्या राजाशी ठरविण्याचा बेत केला. हि
लहानपणापासून आपल्या वयाच्या इतर राजकन्यांबरोबर भिक्खुनिंकडे जाऊन धम्म ऐकत असे.
दीर्घ काळापासून धम्म ऐकल्यामुळे तीला संसारापासून अनासक्ती वाटू लागली. लग्नाची
गोष्ट जेव्हा तिला कळाली तेव्हा ती आईवडिलांना म्हणाली – ‘मला सांसारिक जीवन आवड
नाही. मी प्रव्रज्या घेईन’. आईवडिलांनी तिचे मन वळविण्याचे खूप प्रयत्न केले.
परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. स्वतःच्या हाताने केस कापून तिने प्रव्रजीत
झाली. परीश्रमपुर्वक साधना करून तिने दिव्यज्ञानाचा साक्षात्कार केला. जेव्हा तिचे
नातलग तिला परावृत्त करीण्याकरिता गेले तेव्हा तिने उलट त्यांनाच धम्माचा उपदेश
करून बौद्ध धम्माबद्द्ल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण केली. आपल्या पूर्वजीवनाचे
प्रत्यवेक्षण करीत असता ती गाते :-_
*_मंतावती नगरीच्या कौय्च
नावाच्या राजाच्या पट्टराणीची मी मुलगी होते. बुद्ध शासनाचे पालन करणाऱ्या
भिक्खुंच्या बद्दल माझ्या मनात अती श्रद्धा होती. ||४४८||_*
*_मी सदाचरणी, धम्मकथांची शौकीन,
बहुश्रुत, बुद्ध शासनात विनीत होते. एके दिवशी आईवडिलांकडे जाऊन म्हणाले – ‘तुम्ही
दोघेही माझे म्हणणे ऐका. ||४४९||_*
*_”मी निब्बाणाकडे वळले आहे.
दिव्य जन्म जरी असला तरी तो अशाश्वत आहे. तर मग मनुष्यलोकीचे कामभोग किती तरी
तुच्छ, अल्प आस्वाद असलेले व विघ्नांनी भरलेले आहेत. ||४५०||_*
*_ज्यामध्ये मूर्ख मोहित होतात ते
कामभोग कटू, सर्पाप्रमाणे आहेत. त्यामुळे मूर्ख दीर्घकाळ नरकात पडून दुःखीत होतात
व नाश पावतात. ||४५१||_*
*_पापकर्म करणारे, पापबुद्धी लोक
नरकात पडून शोक करतात व ते मूर्ख नेहमी काया, वाणी व विचाराचे बाबतीत असंयत असतात.
||४५२||_*
*_मूर्ख प्रज्ञाहीन व चेतनाहीन
असतात, दुःखाचे मूळ असलेल्या तृष्णेमध्ये गुरफटलेले असतात. उपदेश केल्यावर सुद्धा
त्यांना ज्ञान होत नाही. तसेच त्यांना आर्यसत्याचा सुद्धा बोध होत नाही. ||४५३||_*
*_हे आई! श्रेष्ठ सम्यक
सम्बुद्धाने केलेल्या सत्याच्या उपदेशाच्या बाबतीत पुष्कळसे लोक अजाण आहेत. ते
जन्म पावलेल्यांचे अभिनंदन करतात आणि देवलोकात जन्म घेण्याची अभिलाषा बाळगतात.
||४५४||_*
*_देवलोकातही उत्पत्ती अशाश्वत
आहे. सर्व प्रकारचे भव अनित्य आहेत. असे असूनसुद्धा मूर्ख पुनःपुन्हा जन्म
घेण्याचे बाबतीत संत्रस्त होत नाहीत. ||४५५||_*
*_चार दुर्गती आणि दोन सुगती
आहेत. त्यापैकी दोन सुगती कशातरीच प्राप्त होतात. दुर्गतीला प्राप्त झालेल्यांना
नरकामध्ये प्रव्रज्या नसते. ||४५६||_*
*_दशबळ बुद्धाच्या शासनात
प्रव्रज्या घेण्याची मला दोघांनीही परवानगी द्यावी. जन्ममरणाच्या नाशाकरिता संसार
कृत्यात न गुरफटता प्रयत्न करीन. ||४५७||_*
*_ह्या संसारात असार व शुद्र अशा
शरीराचे अभिनंदन करण्यात काय अर्थ आहे? भव तृष्णेचा नाश करण्याकरिता मी प्रव्रज्या
घेईन. मला परवानगी द्या. ||४५८||_*
*_बुद्ध उत्पन्न झालेले आहेत.
अयोग्य क्षण वर्ज्य केलेले आहेत. सुसंधी मिळालेली आहे. मी जीवनभर आपले शील आणि
ब्रह्मचर्य भ्रष्ट करणार नाही. ||४५९||_*
*_जोपर्यंत गृहस्थाश्रमी तोपर्यंत
आहार ग्रहण करणार नाही व मरणोन्मुखीच राहीन.” अशाप्रकारे सुमेधा आई वडिलांना
वारंवार म्हणत होती. ||४६०||_*
*_सुमेधची आई दुःखीत होऊन रडू
लागली आणि तिचे वडील सुद्धा सर्व प्रकारे खचले. प्रासादाच्या फरशीवर पडलेल्या
मुलीला समाजाविण्याकरिता ते दोघे म्हणू लागले - ||४६१||_*
*_”हे मुली उठ. शोक केल्याने काय
फायदा? तुला वाराणसीचा राजा अनोकरक्त याला आम्ही दिलेले आहे. ||४६२||-*
*_हे मुली! तू अनोकरक्त राजाची
पट्टराणी होशील. शील, ब्रह्मचर्य आणि प्रव्रज्या हे सर्व आचरण्यास कठीण आहेत.
||४६३||_*
*_राज्यात हुकुमत, ऐश्वर्य, धन
यांचा सुखाने उपभोग घे. तू तरुण आहेस. कामभोगांचा उपभोग घे. हे मुली, तुझे लग्न
होवो.” ||४६४||_*
*_त्यानंतर सुमेधा म्हणाली – “अशा
प्रकारच्या गोष्टी नकोत. भवसंसार असार आहे. माझी एकतर प्रव्रज्या होईल नाहीतर मरण,
परंतु लग्न होणार नाही. ||४६५||_*
*_किडीने घाण झालेल्या, अपवित्र,
दुर्गंध बाहेर सोडणाऱ्या, भयानक, प्रेतवत, घाणीने भरलेल्या पखालीप्रमाणे, नेहमी
पाझरणारे अशुद्ध पदार्थाने परिपूर्ण असे हे शरीर आहे. ||४६६||_*
*_मांस व रक्ताचा लेप देऊन
आच्छादित, किळसवाण्या किड्यांचे घर, पक्ष्यांचे खाद्य, असे हे शरीर प्रतिकूल आहे
मी जाणते. अशा निर्जीव शरीराचे दान कशाकरिता द्यावयाचे? ||४६७||_*
*_चेतनारहित देह लवकरच स्मशानात
नेला जातो. घृणा करणाऱ्या नातलगांकडून तो अचेतन देह टाकाऊ ओंडक्याप्रमाणे स्मशानात
नेला जातो. ||४६८||_*
*_दुसर्याचे खाध्य म्हणून
प्रेताला स्मशानात सोडून घृणा करीत स्वतःचे आईवडील सुद्धा स्नान करतात, मग दुसर्या
सामान्य जनतेची गोष्टच काय? ||४६९||_*
*_अस्थी आणि स्नावीर म्हणजे
शिरांनी जोडलेल्या कलेवरावर, असार, लाळ, अश्रू, मलमूत्र इत्यादी घाणीने परिपूर्ण भरलेल्या
या सडलेल्या शरीरावर मूर्ख लोक आसक्त होतात. ||४७०||_*
*_या शरीराला फाडून आत असलेले
सर्व बाहेर काढले तर शरीरातून बाहेर पडलेल्या पदार्थांचा दुर्गंध सहन न
झाल्याकारणाने स्वतःची आईसुद्धा घृणा करील. ||४७१||_*
*_स्कंध, धातू, आयतने, सर्व
संस्कारमय गोष्टी, जन्ममुलक दुःख, ह्यांवर शहाणपणे विचार करणारी मी कशाकरिता
विवाहाची इच्चा करील? ||४७२||_*
*_जर माझ्या शरीरात प्रतिदिन
नवनव्या तीनशे सुऱ्या खुपसल्या आणि अशाप्रकारे शंभर वर्षे पर्यतसुद्धा आघात झाला व
जर त्यामुळे संसार दुःखाचा क्षय झाला तर ते माझ्याकरिता श्रेयस्कर आहे. ||४७३||_*
*_जो शास्त्याचे वचन जाणतो तो
वरील प्रकारचे आघात स्वीकारील पण जे लोक जाती – जरेने पिडीत होतात त्यांचा संसार
दीर्घकाळ टीकनाराच असतो. ||४७४||_*
*_देवलोकात, मनुष्यलोकात,
पशु-योनीत, असुर-योनीत, प्रेत योनीत तसेच नरक योनीत अपरीमाण आघात दिसतात. ||४७५||_*
*_दुर्गतीला जाऊन नरकात पुष्कळ
यातना भोगाव्या लागतात. देवलोकात सुद्धा संरक्षण नाही. निब्बाण सुखापेक्षा श्रेष्ठ
दुसरे कोणतेही सुख नाही. ||४७६||_*
*_जे अनासक्त होऊन जन्म –
मरणाच्या नाशाकरिता दशबळ भगवान बुद्धाच्या शासनात प्रवृत्त होतात, तेच लोक निब्बाण
प्राप्त करतात. ||४७७||_*
*_हे बाबा! मी आजच गृहत्याग करीन,
असार उपभोगांचा काय उपयोग? पुनः न फुटणाऱ्या तालवृक्षाच्या बुडाप्रमाणे माझ्या
कामतृष्णा ओकून टाकल्यासारख्या झाल्या आहेत व मला त्यांचा वीट आलेला आहे.”
||४७८||_*
*_ती अशाप्रकारे वडिलांशी बोलत
असताना इकडे ज्याला ती दिली होती, तो अनोकरक्त
सुद्धा लग्नाची वेळ जवळ आल्यामुळे वारणवतीत येऊन पोहचला. ||४७९||_*
*_परंतु सुमेधा आपले काळेभोर,
घनदाट आणि सुकोमल केल तलवारीने कापून व आपल्या प्रासादाचे दार बंद करून प्रथम
ध्यान करीत बसली. ||४८०||_*
*_ती ध्यानस्थ बसली असता अनोकरत्त
त्या नगरीत आला. त्यावेळी सुमेधा राजप्रसादात अनित्य संज्ञेची भावना करीत होती.
||४८१||_*
*_ती ज्यावेळी ध्यान भावना करीत
होती त्यावेळी अनोकरत्त राजाने त्वरित तिच्या प्रसादात प्रवेश केला व रत्ने, सोने
शरीर अलंकृत केलेल्या अनोकरत्त राजाने तिची लग्नाकरिता प्रार्थना केली. ||४८२||_*
*_”राज्यात हुकुमत, धन, ऐश्वर्य,
उपभोग, सुख यांचा तू तरुणी असल्यामुळे कामभोगांचा उपभोग घे. कारण कामसुख या जगात
अतिशय दुर्लभ आहे. ||४८३||_*
*_माझे सर्व राज्य तुला अर्पित
केले आहे. त्याचा तू इच्छेप्रमाणे उपभोग घे. दान दे. मन कष्टी होऊ देऊ नकोस. तुझे
आई-वडील अगोदरच दुःखीत झाले आहेत.” ||४८४||_*
*_तेव्हा काम-तृष्णा निरर्थक
वाटणारी मोहरहित झालेली सुमेधा राजाला म्हणाली – “कामतृष्णेचे अभिनंदन करू नकोस,
काम-तृष्णेतील दोष पहा. ||४८५||_*
*_चार द्वीपांचा राजा मान्धाता हा
कामभोगी माणसात श्रेष्ठ होता. परंतु तो सुद्धा अतृप्त राहूनच मरण पावला. त्याच्या
सर्व इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. ||४८६||_*
*_सर्व बाजुंनी दहाही दिशा भरून
टाकणारी सात रत्नांची वृष्टी जरी मेघाने सभोवार केली तरीसुद्धा कामवासनांची तृप्ती
होत नाही. माणसे अतृप्त राहूनच मरतात ||४८७||_*
*_कामतृष्णा तलवार व
भाल्याप्रमाणे आणि सापाच्या फण्याप्रमाणे आहेत. प्रज्वलित उल्केप्रमाणे त्या
जाळणाऱ्या आहेत आणि हाडाच्या सांगाड्याप्रमाणे आहेत. ||४८८||_*
*_कामतृष्णा अनित्य, अस्थिर,
पुष्कळ दुःखदायक, महाविषारी, संतप्त लोखंडी गोळ्याप्रमाणे, पापमुलक आणि दुःखद फळ
देणाऱ्या आहेत. ||४८९||_*
*_कामतृष्णा वृक्षाच्या
फळाप्रमाणे विनाश पावणाऱ्या मांसपेशीप्रेमाने दुःखकारक, स्वप्नाप्रमाणे फसवणूक
करणाऱ्या आणि उसनवारीप्रमाणे आहेत. ||४९०||_*
*_कामतृष्णा भाल्याच्या तीष्ण
टोकाप्रमाणे आहेत. रोग, फोड, दुःखदायक व मरण ओढवणाऱ्या आहेत. जळत्या निखार्याच्या
खड्ड्याप्रमाणे पापमुलक, भयदायक आणि वध करणाऱ्या आहेत. ||४९१||_*
*_अशाप्रकारे कामतृष्णा
बहुदुःखकारकव विघ्न आणणाऱ्या अशा सांगितल्या आहेत. तुम्ही जा. मला आता स्वतःला
संसाराविषयी आस्था नाही. ||४९२||_*
*_स्वतःचे डोके जळत असता दुसरा
माझ्याकरिता काय करील? जरा व मरण माझ्यामागे लागले आहेत. त्यांच्या नाशाकरिता मी
प्रयत्न केले पाहिजेत.” ||४९३||_*
*_खाली जमिनीवर बसलेल्या व
रडणाऱ्या आईवडिलांना व अनोकरक्त राजाला दार उघडून सुमेधाने पहिले व म्हटले -
||४९४||_*
*_”अनादी व अनंत अशा संसारात
वडिलांच्या मरणाचचे वेळी, भावाच्या मरणाच्या वेळी व स्वतःला मारपीट झाली असताना
पुनःपुन्हा रडणाऱ्या मुर्खांचा संसार दीर्घ असतो. ||४९५||_*
*_अश्रू, स्तन्य व रक्ताने
शिंपडला गेलेला हा संसार अनादि व अनंत आहे. याचे स्मरण करा. आवागमन करणाऱ्या
प्राण्यांचे आणि हाडांचा साठा याचेसुद्धा स्मरण करा. ||४९६||_*
*_अनादि व अनंत अशा संसारात एकत्र
केलेले अश्रू, स्तन्य आणि रक्त चार समुद्राएवढे आहे याचे स्मरण करा. एका कल्पात
एकत्र केलेली मनुष्यांची हाडे वैपुल्य पर्वताएवढी विशाल होतील याचेसुद्धा स्मरण
करा. ||४९७||_*
*_अनादि व अनंत अशा संसारात
आवागमन करणाऱ्या प्राण्यांचे मातृपरंपरेचे मोजमाप करण्याकरिता संपूर्ण
जम्बुद्विपातील माती एकत्र केली व तिच्या बोराच्या आठुळ्या एवढ्या गोळ्या केल्या
तरी त्या पर्याप्त होणार नाहीत. ||४९८||_*
*_अनादि व अनंत अशा संसारात
आवागमन करणाऱ्या प्राण्यांचे पितृपरंपरेचे मोजमाप करण्याकरिता सर्व पृथ्वीवरील
तृण, काष्ठ, फांद्या आणि पाने एकत्र केली व त्यांचे चार बोटाएवढे तुकडे केले तरी
ते पर्याप्त होणार नाहीत याचे स्मरण करा. ||४९९||_*
*_मनुष्यत्व किती
दुर्लभ आहे हे सांगणाऱ्या उपमेचे स्मरण करा- पूर्व समुद्रात पडलेले एकक्ष कासव,
अन्य समुद्रात पडलेल्या लाकडाच्या जुवात असलेले भोक व भोकातून बाहेर काढलेले त्या
कासवाचे डोके हि अत्यंत कठीण गोष्ट आहे, ह्याप्रमाणेच मनुष्यत्व-लाभ कठीण आहे.
||५००||_*
*_फेसाच्या गोळ्याप्रमाणे,
दुर्दशाग्रस्त आणि सारहीन असलेल्या शरीराचे स्मरण करा. स्कंध अनित्य आहेत असे पहा.
तसेच नरकातील अनेक यातनांचे स्मरण करा. ||५०१||_*
*_शरीर त्या त्या जन्मात मेल्यावर
स्मशानात भर घालणारे आहे याचे स्मरण करा. मगराच्या भीतीचे स्मरण करा. त्याचप्रमाणे
चार आर्य सत्यांचे स्मरण करा. ||५०२||_*
*_अमृत विद्यमान असतांना तुम्ही पाचही
अवस्थेत कडू असलेले पदार्थ का पिता? सर्व विषयभोग पाच तऱ्हेने कडू असलेल्या
पदार्थापेक्षाही जास्त कडू आहेत. ||५०३||_*
*_अमृत विद्यमान असताना कामभोगांचा
दाह कशाकरिता? सर्वच कामभोग जळणारे, उकळी फुटणारे, कम्प व संताप उत्पन्न होणारे
आहेत. ||५०४||_*
*_वैररहित निब्बाण असताना, पुष्कळ
वैरपूर्ण अशा कामतृष्णाशी तुम्हाला काय कर्तव्य? कामभोग राजा, अग्नी, चोर, पाणी
आणि अप्रिय यांच्याशी समानता बाळगणारे असून पुष्कळ शत्रुत्व वाढविणारे आहेत.
||५०५||_*
*_विमुक्ती विद्यमान असताना वध
आणि बंधनयुक्त कामतृष्णाशी तुम्हाला काय कर्तव्य? कामभोगामुळेच वध व बंधने उत्पन्न
होतात. कामासक्त माणसे दुःखाचा अनुभव घेतात. ||५०६||_*
*_गवताची जळती मशाल ग्रहण
करणाऱ्यालाच जाळते. सोडून देणाऱ्याला जाळत नाही. कामभोग सुद्धा, मशालीप्रमाणे,
ग्रहण करणाऱ्याला जाळतात. सोडून देणाऱ्याला जाळत नाहीत. ||५०७||_*
*_अल्प कामसुखाकारिता तुम्ही विमुक्तीच्या
विपुल सुखाचा त्याग करू नका. अनेक केस असलेल्या पुथूलोम नावाच्या मासळीप्रमाणे हुक
गिळून शेवटी नष्ट होऊन जगू नका. ||५०८||_*
*_साखळीने बांधलेल्या कुत्र्याप्रमाणे
तू ज्या कामातृष्णेने बद्द आहेस त्या कामातृष्णेचे दमन कर, भुकेलेले चांडाळ
कुत्र्याला खातात त्याप्रमाणे कामतृष्णा तुम्हाला खातील. ||५०९||_*
*_कामतृष्णात आसक्त झाल्यामुळे
अपरिमित दुःख आणि चीत्तक्लेश अनुभवावे लागत आहेत. कामातृष्णा अधृव आहेत. त्यांचा
त्याग करा. ||५१०||_*
*_जरारहित निब्बाण विद्यमान
असतांना जरायुक्त कामभोगाशी तुझे काय कर्तव्य? सर्व जन्म सर्व प्रकरे मरण व
व्याधीग्रस्त आहेत. ||५११||_*
*_हे निब्बाण अजर आहे, हे अमर
आहे, हे अजरता व अमरतेचे स्थान आहे. शोकरहित, वैररहित, विघ्नरहित, निश्चल,
अस्खलित, अभय आणि तापरहित आहे. ||५१२||_*
*_ह्या अमृताचा पुष्कळ लोकांनी आस्वाद
घेतलेला आहे. आजसुद्धा ते प्राप्त केले जाणारे आहे. जो त्याच्याकरिता शहाण्याप्रमाणे
प्रयत्न करील त्याला ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रयत्न न करणाऱ्याला
ते प्राप्त होणे शक्य नाही.” ||५१३||_*
*_सर्व संस्कारमय गोष्टीपासून
विरक्त झालेल्या सुमेधाने, आपले म्हणणे अनोकरक्तास पटवून देत असतांना आपले कापलेले
केस जमिनीवर फेकून दिले. ||५१४||_*
*_अनोकरक्ताने सुद्धा उभे राहून
तिच्या वडिलांना हात जोडून याचना केली – ‘विमुक्ती व सत्याच्या दर्शनाकरिता
प्रव्रजित होण्यासाठी सुमेधाला सोडून द्या.’ ||५१५||_*
*_आई वडिलांनी आज्ञा दिल्यावर
संसारातील शोक व भीतीने घाबरलेल्या सुमेधाने प्रव्रज्या घेतली. श्रेष्ठ फळाच्या
प्राप्तीकरिता शिकत असतानांच तिने सहा अभिज्ञांचा साक्षात्कार केला. ||५१६||_*
*_राजकन्येचे ते निब्बाण आश्चर्यपूर्ण
व अद्भुत होते. पूर्वजन्मातील चरित्र तिने नंतरच्या काळात याप्रकारे सांगितले - ||५१७||_*
*_”ज्यावेळी भगवान कोणागमन बुद्ध
संघाराम नामक नवीन बांधलेल्या विहारात राहत होते तेव्हा आम्ही तिघी मैत्रिणी (मी,
खेमा आणि धनंजानी) एक विहार बांधून भगवंताना दान दिला. ||५१८||_*
*_त्या पुण्याच्या प्रभावाने
आम्ही दहा, शंभर, हजार, दहा हजार वेळा देवलोकात उत्पन्न झालो. मनुष्य लोकातील उत्पतीबद्दल
तर प्रश्नच उद्भवत नाही. ||५१९||_*
*_देवलोकात आम्ही अत्यंत
ऋद्धीसंपन्न होतो. मनुष्य लोकाबद्दल तर प्रश्नच उद्भवत नाही. सात रत्न धारण
करणाऱ्या चक्रवर्ती राजाची स्त्री-रत्न म्हणून मी पट्टराणी होते. ||५२०||_*
*_मी कोणागमनाला जे दान दिले ते बुद्ध
शासनाबद्दलच्या आवडीचा हेतू, कारण व मुळ झाले. तेच बुद्ध शासनात पहिले आगमन आणि
नंतर धम्मात रत होऊन निब्बाण मिळाले. ||५२१||_*
*_त्या अनुपम प्रज्ञा असलेल्या
भगवान बुद्धाच्या उपदेशावर जे श्रद्धा ठेवतात ते माझ्याप्रमाणे आचरण करतात.
त्यांना संसाराबद्दल वीट येतो व वीट आल्यावर ते विरक्त होतात.” ||५२२||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*१८/०२/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖