Sunday, 28 February 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५

 *_प्रश्न_५- बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात ‘किर्लोस्कर’ने ५० वर्षे आघाडी उघडली, तरी अजूनही बुवाबाजी कमी झालेली नाही. असले काम कशाकरता करत रहावयाचे?_*

 

*उत्तर*   सामाजिक परिवर्तन हे अक्रोडाचे झाड लावल्याप्रमाणे आहे. अक्रोडाला खूप उशिरा फळे येतात. परिवर्तनाच्या चळवळीची फळे उशीरच मिळणार. समाजमन हळूहळू बदलते. महात्मा फुल्यांनी स्त्री-शिक्षणाचा प्रयत्न सुरु केला त्यावेळी लोक त्यांना हसले. आज स्त्री-शिक्षण सर्वमान्य व आवश्यक मानले जात आहे. र. धों. कर्व्यांनी संततीनियमनाचा विचार मांडला. लोकांनी त्या काळी त्यांची टर उडवली. आज संततीनियमन समाज-धारणेच्या परवलीचा शब्द बनला आहे. कोणी द्रष्टा कामाला सुरुवात करतो. त्याचा प्रयत्नही एकाकी असतो. हळूहळू लोकांना सत्याची जाणीव व्हायला लागते व लोक बदलायला लागतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केवळ ५-१० मुलांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु केला. आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचे प्रचंड वटवृक्षात रुपांतर झालेले आपणांस दिसते आहे ना?

किर्लोस्कर’ ज्या काळात बुवाबाजीवर हल्ले करत होते. त्या काळात शिक्षणाचा फारसा प्रसार नव्हता. विज्ञानाचा प्रसार मर्यादित होता. बुवाबाजीची यंत्रणा सामर्थ्यशाली होती. त्यामुळे ‘किर्लोस्कर’चा परिणाम व बुवाबाजीचे बळ यांची तुलनाच होऊ शकत नाही.

गेल्या काही वर्षांत विज्ञान शिक्षणाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. नवी पिढी चिकित्सक बनत चालली आहे. बुवाबाजी विरोधी लढ्यात तरूण मोठ्या संख्येने हिरीरीने भाग घेत आहेत. अनेक अंगांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची व परिवर्तनाची चळवळ वाढत आहे. *तथापि, बुवाबाजी हा बरकतीचा धंदा असल्याने या मंडळींनी तंत्रबदलाचे कसब दाखवले आहे. साधनसामग्री, फसवी विज्ञानभाषा आणि जनसामान्यांचा अजूनही त्यांनाच पाठींबा असल्याने आजही बुवाबाजी विरुद्धची लढाई विषमच आहे* . पण ही लढाई निग्रहपूर्वक चालू ठेवावी लागेल. उशिरा का होईना, पण यश निश्चित आहे.

 

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Saturday, 27 February 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ४

 *_प्रश्न ४- सध्याच्या युगाला आपण विज्ञानयुग म्हणतो. मग एवढ्या संख्येने लोक बुवा, बाबा, भगत यांच्या कच्छपी का लागतात?_*

 

 *उत्तर 👉*  _पूर्व संस्कारांचा जबरदस्त पगडा मानवी मनावर असतो. हिंदू धर्मात सांगितलेल्या कर्म विपाकाच्या सिद्धांताचा असाच जबरदस्त पगडा हिंदू-समाजावर आहे. पूर्वजन्मीच्या पापामुळे या जन्मात दु:खे आपल्या वाट्याला येतात. असे हा सिद्धांत सांगतो. मग ही :खे दूर करण्यासाठी बुवा, बाबा, भगत हे मध्यस्थाची भूमिका करतात. संकटात सापडलेला माणूस प्रारब्धाच्या कल्पनेने अशा मध्यस्थ-दलालाच्या जाळ्यात सापडतो. एका बाईच्या नवऱ्याच्या घशाला कॅन्सर झाला. बाई ज्योतिषाकडे गेली. त्याने सांगितले, ‘तुझा नवरा पूर्वजन्मी शिकारी होता. त्याने गर्भार हरिणीला बाण मारला. तो तिच्या गळ्याला लागला. हरिणीने प्राण सोडताना तुझ्या नवऱ्याला शाप दिला. त्याचा हा परिणाम आहे.’ यावर उपाय म्हणून ज्योतिषाने ‘सोन्याचे हरीण ब्राम्हणास दान कर’ असा बाईला सल्ला दिला. बाईने त्याप्रमाणे केले. पण नवरा वाचू शकला नाही. ही बाई विज्ञानयुगात असून काय उपयोग? *विज्ञानाने रेडीओ आला, टी.व्ही. आला, वीज आली. पण मनातील अंधाराचे काय? विज्ञानसृष्टी आली, पण विज्ञानयुगातील मानवाला विज्ञानदृष्टी आली नाही*. आपले मन, सभोवतालची माणसे व निसर्ग यांच्या परस्पर संबंधातून आपली दु:खे निर्माण होत असतात. हे समजण्यासाठी विज्ञानदृष्टी हवी. आणखीही एक महत्वाचे कारण आहे. विज्ञानयुगात जीवन असुरक्षित बनत चालले आहे. जगण्यासाठी करावी लागणारी तीव्र स्पर्धा, अपघाताची भीती, गुंडगिरी, बेकारी, महागाई, तणाव अशा कारणांनी येणारी अगतिकता हे पण बुवा, बाबा आणि भगत यांच्या कच्छपी लागण्याचे महत्वाचे कारण आहे._

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Friday, 26 February 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम- प्रश्न ३

 *प्रश्न ३- अनेक बुवा चमत्कार करत नाहीत. अशा बुवांना विरोध करण्याचे कारण काय?*

 

 * उत्तर 👉* केडगावचे नारायण महाराज कोणताही चमत्कार करीत नव्हते. मग‘केडगाव चे नारायण महाराज पळाले! असा सनसनाटी अग्रलेख लिहून आचार्य अत्र्यांनी नारायण महाराजांच्या कृष्णकृत्यांची चिरफाड का केली?

            चमत्कार हे बुवाबाजीचे उघड स्वरूप आहे. चमत्कार न करणाऱ्या बुवांचा हेतू समान असतो. तो म्हणजे बायांचा उपभोग व पैसा. बुवा तेथे बाया आणि बुवा तेथे माया हे सर्वार्थाने खरे असते.

           चमत्कार न करता बुवाबाजी करणाऱ्यांची भाषा अवैज्ञानिक असते. मूल न होणारी बाई अशा बुवाकडे दैवी कृपेचा प्रसाद मागण्यास जाते. दैवी कृपेने मूल होत नाही. ‘माझी सेवा कर’, ‘भैरवी पूजा कर’ असे अवैज्ञानिक प्रकार तो बाईला करावयास सांगतो. याच पद्धतीने वाघमारे बाबांनी ५० स्त्रियांचा उपभोग घेतला. बाईला वश करण्यासाठी ‘गेल्या जन्मी तू राधा होतीस व मी कृष्ण होतो’ अशी भाषा वापरून चमत्कार न करणारे बुवा बाईची अपराधीपणाची भावना मारून टाकतात व तिचा उपभोग घेतात. देवाची कृपा किंवा अवकृपा, पूर्वजन्मीचे पाप, दुष्ट शक्तीची लागण, करणीमुळे संकटे येणे, अशा अवैज्ञानिक कल्पनांचा हे बुवा आधार घेतात आणि यात त्यांच्या भजनी लागणाऱ्यांना धोका असतो. त्यांची दिशाभूल व फसवणूक असते.

           बुद्धीसामार्थ्य, विवेक व निर्भयता यांच्या आधारे स्वतःचे प्रश्न प्रयत्न करणे यातच माणसाचे शहाणपण आहे. मूल होत नसेल तर शारीरिक तपासणी केली पाहिजे, ही विज्ञानदृष्टी स्त्री-पुरुषांना दिली पाहिजे. अशी दृष्टी बुवा देत नाहीत. त्यामुळे समाज-जीवनाच्या दृष्टीने दीर्घकालीन विचार करता अवैज्ञानिक दृष्टीकोन वापरणाऱ्या, चमत्कार न करणाऱ्या बुवांना सुद्धा विरोध केला पाहिजे.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Thursday, 25 February 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न २

 

*प्रश्न_२- ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले, भिंत चालविली. असे अनेक संतांनी चमत्कार केले. हे सारे खोटे कसे मानता येईल?*

 

*उत्तर 👉* संतांनीसमाजालासमतेचीवमाणुसकीचीशिकवणदिली, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण संतांनी चमत्कार केले हे मात्र खरे नाही. तुकारामांनी आपल्या अभंगातून चमत्कार करणाऱ्या भोंदूंवर प्रखर हल्ला केला आहे. नवसे सायासे पुत्र होती| तरी का करणे लागे पती? असे विचारणारे तुकाराम स्वतः चमत्कार करतील अगर चमत्कारावर विश्वास ठेवतील हे अशक्य वाटते. ज्ञानेश्वरीत देखील चमत्कारांचा कोठेही उल्लेख नाही. तुकारामांची पोथी इंद्रायणीत बुडवली असताना कोरडी राहिली, ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, दामाजीपंतांसाठी विठ्ठल महार झाला इत्यादी चमत्कार कथा म्हणजे कीर्तनकारांनी या संतांवर केलेला अन्याय होय.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘विज्ञान आणि समाज’ (संपादक- प्र. न. जोशी) या पुस्तकातील खालील वर्णन या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे.

साधारणतः १३०० ते १६०० या काळात महाराष्ट्रात संत होऊन गेले. याच काळात अल्लाउद्दिन खिलजीने महाराष्ट्रात थैमान घातले होते. १३१० पर्यंत तो रामेश्वरला जाऊन पोचला. ज्ञानेश्वर याच काळात होऊन गेले. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, मग सजीव माणसे आपल्या मंत्रबळे चालवून त्यांनी अल्लाउद्दिनला विंध्याच्या पलीकडे थोपवून का धरला नाही? अगर मंत्रबळे विंध्य पर्वतच खिलजीच्या सैन्यापुढे आडवा करून त्याची वाट का रोखली नाही? ज्ञानेश्वर रेड्याच्या तोंडून वेद बोलवू शकले. मग खिलजी देवगिरीवर हल्ला करायला येतोय हे रामदेवरायाला ज्ञानेश्वर मंत्रबळे आगाऊ का सांगू शकले नाहीत?

अलीकडच्या काळात होऊन गेलेले संत गाडगे महाराज यांनी कसलाही चमत्कार केला नाही अगर त्यांनी चमत्काराचे समर्थन केलेले नाही.

गाडगेमहाराजांचा अंत्यविधी हजारो लोकांच्या साक्षीने झाला. त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. तरीही गाडगेमहाराज हे तुकारामाचे अवतार होते व ते सदेह वैकुंठाला गेले, अशी चरित्रे तीही उच्चविद्याविभूषित व्यक्तींनी लिहिलेली आज विकली जात आहेत. ज्ञानेश्वरांचे पहिले चरित्र तर त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास अडीचशे वर्षांनी लिहिले गेले. अशा वेळी त्यामध्ये काही चमत्कार घुसवले जाणे सहज शक्य झाले.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

Wednesday, 24 February 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम'- प्रश्न_१

 *प्रश्न_१- चमत्कार करणारे बहुसंख्य बुवा हे भोंदू असतात हे खरे. पण काही दैवी पुरुषांना तरी चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त असते, हे खरे नाही काय?*

उत्तर- चमत्कार करणारे बुवा, बाबा आणि तथाकथित दैवी पुरुष यांपैकी कोणालाही चमत्कार करण्याचे सामर्थ्य नसते. जे अशा चमत्काराचा दावा करतात ते केवळ हातचलाखी अगर विज्ञान यांच्या आधारेच चमत्कार करतात. दैवी शक्तीने नव्हे.

जगप्रसिद्ध बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिक डॉ. अब्राहम कोवूर यांनी चमत्काराचा दावा करणाऱ्या जगभरच्या ज्योतिषी, हस्तसामुद्रिक, मांत्रिक, देवऋषी, दैवी शक्ती प्राप्त असलेले तथाकथित स्त्री-पुरुष या सर्वांना १९६३ साली चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाला जगभरच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्धी दिली होती. उभयपक्षी मान्य अशा व्यासपीठावर डॉ. कोवूर व त्यांचे सहकारी यांच्यासमोर चमत्कार सिद्ध करावा व हातचलाखी आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार डॉ. कोवूरांना असावा अशी त्यांची अट होती. या अटी मान्य करून जो चमत्कार सिद्ध करेल, त्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे कोवूरांनी जाहीर केले होते.

कोवूरांच्या मृत्यूपर्यंत हे आव्हान स्वीकारण्यास कोणीही पुढे आला नाही. यास अपवाद बंगलोरमधील एका डॉक्टरचा. डॉ. जी. व्यंकटराव याने प्रथम आव्हान स्वीकारण्याचे नाटक केले. पण चाचणीच्या अटी ऐकताच त्याने माघार घेतली व १००० रु. अनामत रक्कम गमावली. 

आपण सिद्ध पुरुष आहोत असा दावा करणारे विलासबाबा, तरडगाव (जि.सातारा) व गोडबाबा (बारामती) हे हातचलाखीच करत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशी कितीतरी प्रकरणे संपूर्ण महाराष्ट्रात उघडकीस आणली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र, आजही दैवी सामर्थ्याने चमत्कार करणाऱ्या स्त्री-पुरुषांची चाचणी घेण्यास एकवीस लाख रुपयांच्या आव्हान रकमेसह तयार आहे. अनुभवांती अं.नि.स.ची खात्री झाली आहे, की तथाकथित दैवी पुरुष हे हातचलाखी अगर विज्ञान वापरूनच चमत्कार करतात. चमत्कार हा बनवाबनवीचाच मामला असतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे

यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार

Wednesday, 17 February 2021

बोधी

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*झेन कथा – बोधी*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

      

               _*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_

 

                 _एक दिवस गुरूने जाहीर केले, “तरुण आऱ्हानला संबोधि प्राप्त झालीय.” या घोषणेमुळे थोडी खळबळ उडाली. काही भिक्खूंनी आऱ्हानकडे जाऊन विचारले कि, “आम्ही ऐकलंय, कि तुला संबोधि प्राप्त झालीय.?”_

_तो म्हणाला, “खरंय ते.”_

_”तुला कसं वाटतंय?”_

_”नेहमीप्रमाणे. अस्वस्थ आणि दुःखी.”_

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ: - झेनकथा*

*संकलन :- महेश कांबळे*

*१८/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

 

सुमेधा

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*७३ सुमेधा*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖    

                    _हि मंतावती नगरीचा राजा कौय्च याची मुलगी. हि वयात आल्यावर तिच्या आईवडीलांनी तिचे लग्न वाराणसी नगरीतील अनिकरत्त नावाच्या राजाशी ठरविण्याचा बेत केला. हि लहानपणापासून आपल्या वयाच्या इतर राजकन्यांबरोबर भिक्खुनिंकडे जाऊन धम्म ऐकत असे. दीर्घ काळापासून धम्म ऐकल्यामुळे तीला संसारापासून अनासक्ती वाटू लागली. लग्नाची गोष्ट जेव्हा तिला कळाली तेव्हा ती आईवडिलांना म्हणाली – ‘मला सांसारिक जीवन आवड नाही. मी प्रव्रज्या घेईन’. आईवडिलांनी तिचे मन वळविण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. स्वतःच्या हाताने केस कापून तिने प्रव्रजीत झाली. परीश्रमपुर्वक साधना करून तिने दिव्यज्ञानाचा साक्षात्कार केला. जेव्हा तिचे नातलग तिला परावृत्त करीण्याकरिता गेले तेव्हा तिने उलट त्यांनाच धम्माचा उपदेश करून बौद्ध धम्माबद्द्ल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण केली. आपल्या पूर्वजीवनाचे प्रत्यवेक्षण करीत असता ती गाते :-_

*_मंतावती नगरीच्या कौय्च नावाच्या राजाच्या पट्टराणीची मी मुलगी होते. बुद्ध शासनाचे पालन करणाऱ्या भिक्खुंच्या बद्दल माझ्या मनात अती श्रद्धा होती. ||४४८||_*

*_मी सदाचरणी, धम्मकथांची शौकीन, बहुश्रुत, बुद्ध शासनात विनीत होते. एके दिवशी आईवडिलांकडे जाऊन म्हणाले – ‘तुम्ही दोघेही माझे म्हणणे ऐका. ||४४९||_*

*_”मी निब्बाणाकडे वळले आहे. दिव्य जन्म जरी असला तरी तो अशाश्वत आहे. तर मग मनुष्यलोकीचे कामभोग किती तरी तुच्छ, अल्प आस्वाद असलेले व विघ्नांनी भरलेले आहेत. ||४५०||_*

*_ज्यामध्ये मूर्ख मोहित होतात ते कामभोग कटू, सर्पाप्रमाणे आहेत. त्यामुळे मूर्ख दीर्घकाळ नरकात पडून दुःखीत होतात व नाश पावतात. ||४५१||_*

*_पापकर्म करणारे, पापबुद्धी लोक नरकात पडून शोक करतात व ते मूर्ख नेहमी काया, वाणी व विचाराचे बाबतीत असंयत असतात. ||४५२||_*

*_मूर्ख प्रज्ञाहीन व चेतनाहीन असतात, दुःखाचे मूळ असलेल्या तृष्णेमध्ये गुरफटलेले असतात. उपदेश केल्यावर सुद्धा त्यांना ज्ञान होत नाही. तसेच त्यांना आर्यसत्याचा सुद्धा बोध होत नाही. ||४५३||_*

*_हे आई! श्रेष्ठ सम्यक सम्बुद्धाने केलेल्या सत्याच्या उपदेशाच्या बाबतीत पुष्कळसे लोक अजाण आहेत. ते जन्म पावलेल्यांचे अभिनंदन करतात आणि देवलोकात जन्म घेण्याची अभिलाषा बाळगतात. ||४५४||_*

*_देवलोकातही उत्पत्ती अशाश्वत आहे. सर्व प्रकारचे भव अनित्य आहेत. असे असूनसुद्धा मूर्ख पुनःपुन्हा जन्म घेण्याचे बाबतीत संत्रस्त होत नाहीत. ||४५५||_*

*_चार दुर्गती आणि दोन सुगती आहेत. त्यापैकी दोन सुगती कशातरीच प्राप्त होतात. दुर्गतीला प्राप्त झालेल्यांना नरकामध्ये प्रव्रज्या नसते. ||४५६||_*

*_दशबळ बुद्धाच्या शासनात प्रव्रज्या घेण्याची मला दोघांनीही परवानगी द्यावी. जन्ममरणाच्या नाशाकरिता संसार कृत्यात न गुरफटता प्रयत्न करीन. ||४५७||_*

*_ह्या संसारात असार व शुद्र अशा शरीराचे अभिनंदन करण्यात काय अर्थ आहे? भव तृष्णेचा नाश करण्याकरिता मी प्रव्रज्या घेईन. मला परवानगी द्या. ||४५८||_*

*_बुद्ध उत्पन्न झालेले आहेत. अयोग्य क्षण वर्ज्य केलेले आहेत. सुसंधी मिळालेली आहे. मी जीवनभर आपले शील आणि ब्रह्मचर्य भ्रष्ट करणार नाही. ||४५९||_*

*_जोपर्यंत गृहस्थाश्रमी तोपर्यंत आहार ग्रहण करणार नाही व मरणोन्मुखीच राहीन.” अशाप्रकारे सुमेधा आई वडिलांना वारंवार म्हणत होती. ||४६०||_*

*_सुमेधची आई दुःखीत होऊन रडू लागली आणि तिचे वडील सुद्धा सर्व प्रकारे खचले. प्रासादाच्या फरशीवर पडलेल्या मुलीला समाजाविण्याकरिता ते दोघे म्हणू लागले - ||४६१||_*

*_”हे मुली उठ. शोक केल्याने काय फायदा? तुला वाराणसीचा राजा अनोकरक्त याला आम्ही दिलेले आहे. ||४६२||-*

*_हे मुली! तू अनोकरक्त राजाची पट्टराणी होशील. शील, ब्रह्मचर्य आणि प्रव्रज्या हे सर्व आचरण्यास कठीण आहेत. ||४६३||_*

*_राज्यात हुकुमत, ऐश्वर्य, धन यांचा सुखाने उपभोग घे. तू तरुण आहेस. कामभोगांचा उपभोग घे. हे मुली, तुझे लग्न होवो.” ||४६४||_*

*_त्यानंतर सुमेधा म्हणाली – “अशा प्रकारच्या गोष्टी नकोत. भवसंसार असार आहे. माझी एकतर प्रव्रज्या होईल नाहीतर मरण, परंतु लग्न होणार नाही. ||४६५||_*

*_किडीने घाण झालेल्या, अपवित्र, दुर्गंध बाहेर सोडणाऱ्या, भयानक, प्रेतवत, घाणीने भरलेल्या पखालीप्रमाणे, नेहमी पाझरणारे अशुद्ध पदार्थाने परिपूर्ण असे हे शरीर आहे. ||४६६||_*

*_मांस व रक्ताचा लेप देऊन आच्छादित, किळसवाण्या किड्यांचे घर, पक्ष्यांचे खाद्य, असे हे शरीर प्रतिकूल आहे मी जाणते. अशा निर्जीव शरीराचे दान कशाकरिता द्यावयाचे? ||४६७||_*

*_चेतनारहित देह लवकरच स्मशानात नेला जातो. घृणा करणाऱ्या नातलगांकडून तो अचेतन देह टाकाऊ ओंडक्याप्रमाणे स्मशानात नेला जातो. ||४६८||_*

*_दुसर्याचे खाध्य म्हणून प्रेताला स्मशानात सोडून घृणा करीत स्वतःचे आईवडील सुद्धा स्नान करतात, मग दुसर्या सामान्य जनतेची गोष्टच काय? ||४६९||_*

*_अस्थी आणि स्नावीर म्हणजे शिरांनी जोडलेल्या कलेवरावर, असार, लाळ, अश्रू, मलमूत्र इत्यादी घाणीने परिपूर्ण भरलेल्या या सडलेल्या शरीरावर मूर्ख लोक आसक्त होतात. ||४७०||_*

*_या शरीराला फाडून आत असलेले सर्व बाहेर काढले तर शरीरातून बाहेर पडलेल्या पदार्थांचा दुर्गंध सहन न झाल्याकारणाने स्वतःची आईसुद्धा घृणा करील. ||४७१||_*

*_स्कंध, धातू, आयतने, सर्व संस्कारमय गोष्टी, जन्ममुलक दुःख, ह्यांवर शहाणपणे विचार करणारी मी कशाकरिता विवाहाची इच्चा करील? ||४७२||_*

*_जर माझ्या शरीरात प्रतिदिन नवनव्या तीनशे सुऱ्या खुपसल्या आणि अशाप्रकारे शंभर वर्षे पर्यतसुद्धा आघात झाला व जर त्यामुळे संसार दुःखाचा क्षय झाला तर ते माझ्याकरिता श्रेयस्कर आहे. ||४७३||_*

*_जो शास्त्याचे वचन जाणतो तो वरील प्रकारचे आघात स्वीकारील पण जे लोक जाती – जरेने पिडीत होतात त्यांचा संसार दीर्घकाळ टीकनाराच असतो. ||४७४||_*

*_देवलोकात, मनुष्यलोकात, पशु-योनीत, असुर-योनीत, प्रेत योनीत तसेच नरक योनीत अपरीमाण आघात दिसतात. ||४७५||_*

*_दुर्गतीला जाऊन नरकात पुष्कळ यातना भोगाव्या लागतात. देवलोकात सुद्धा संरक्षण नाही. निब्बाण सुखापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही सुख नाही. ||४७६||_*

*_जे अनासक्त होऊन जन्म – मरणाच्या नाशाकरिता दशबळ भगवान बुद्धाच्या शासनात प्रवृत्त होतात, तेच लोक निब्बाण प्राप्त करतात. ||४७७||_*

*_हे बाबा! मी आजच गृहत्याग करीन, असार उपभोगांचा काय उपयोग? पुनः न फुटणाऱ्या तालवृक्षाच्या बुडाप्रमाणे माझ्या कामतृष्णा ओकून टाकल्यासारख्या झाल्या आहेत व मला त्यांचा वीट आलेला आहे.” ||४७८||_*

*_ती अशाप्रकारे वडिलांशी बोलत असताना इकडे ज्याला ती दिली होती, तो अनोकरक्त  सुद्धा लग्नाची वेळ जवळ आल्यामुळे वारणवतीत येऊन पोहचला. ||४७९||_*

*_परंतु सुमेधा आपले काळेभोर, घनदाट आणि सुकोमल केल तलवारीने कापून व आपल्या प्रासादाचे दार बंद करून प्रथम ध्यान करीत बसली. ||४८०||_*

*_ती ध्यानस्थ बसली असता अनोकरत्त त्या नगरीत आला. त्यावेळी सुमेधा राजप्रसादात अनित्य संज्ञेची भावना करीत होती. ||४८१||_*

*_ती ज्यावेळी ध्यान भावना करीत होती त्यावेळी अनोकरत्त राजाने त्वरित तिच्या प्रसादात प्रवेश केला व रत्ने, सोने शरीर अलंकृत केलेल्या अनोकरत्त राजाने तिची लग्नाकरिता प्रार्थना केली. ||४८२||_*

*_”राज्यात हुकुमत, धन, ऐश्वर्य, उपभोग, सुख यांचा तू तरुणी असल्यामुळे कामभोगांचा उपभोग घे. कारण कामसुख या जगात अतिशय दुर्लभ आहे. ||४८३||_*

*_माझे सर्व राज्य तुला अर्पित केले आहे. त्याचा तू इच्छेप्रमाणे उपभोग घे. दान दे. मन कष्टी होऊ देऊ नकोस. तुझे आई-वडील अगोदरच दुःखीत झाले आहेत.” ||४८४||_*

*_तेव्हा काम-तृष्णा निरर्थक वाटणारी मोहरहित झालेली सुमेधा राजाला म्हणाली – “कामतृष्णेचे अभिनंदन करू नकोस, काम-तृष्णेतील दोष पहा. ||४८५||_*

*_चार द्वीपांचा राजा मान्धाता हा कामभोगी माणसात श्रेष्ठ होता. परंतु तो सुद्धा अतृप्त राहूनच मरण पावला. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. ||४८६||_*

*_सर्व बाजुंनी दहाही दिशा भरून टाकणारी सात रत्नांची वृष्टी जरी मेघाने सभोवार केली तरीसुद्धा कामवासनांची तृप्ती होत नाही. माणसे अतृप्त राहूनच मरतात ||४८७||_*

*_कामतृष्णा तलवार व भाल्याप्रमाणे आणि सापाच्या फण्याप्रमाणे आहेत. प्रज्वलित उल्केप्रमाणे त्या जाळणाऱ्या आहेत आणि हाडाच्या सांगाड्याप्रमाणे आहेत. ||४८८||_*

*_कामतृष्णा अनित्य, अस्थिर, पुष्कळ दुःखदायक, महाविषारी, संतप्त लोखंडी गोळ्याप्रमाणे, पापमुलक आणि दुःखद फळ देणाऱ्या आहेत. ||४८९||_*

*_कामतृष्णा वृक्षाच्या फळाप्रमाणे विनाश पावणाऱ्या मांसपेशीप्रेमाने दुःखकारक, स्वप्नाप्रमाणे फसवणूक करणाऱ्या आणि उसनवारीप्रमाणे आहेत. ||४९०||_*

*_कामतृष्णा भाल्याच्या तीष्ण टोकाप्रमाणे आहेत. रोग, फोड, दुःखदायक व मरण ओढवणाऱ्या आहेत. जळत्या निखार्याच्या खड्ड्याप्रमाणे पापमुलक, भयदायक आणि वध करणाऱ्या आहेत. ||४९१||_*   

*_अशाप्रकारे कामतृष्णा बहुदुःखकारकव विघ्न आणणाऱ्या अशा सांगितल्या आहेत. तुम्ही जा. मला आता स्वतःला संसाराविषयी आस्था नाही. ||४९२||_*

*_स्वतःचे डोके जळत असता दुसरा माझ्याकरिता काय करील? जरा व मरण माझ्यामागे लागले आहेत. त्यांच्या नाशाकरिता मी प्रयत्न केले पाहिजेत.” ||४९३||_*

*_खाली जमिनीवर बसलेल्या व रडणाऱ्या आईवडिलांना व अनोकरक्त राजाला दार उघडून सुमेधाने पहिले व म्हटले - ||४९४||_*

*_”अनादी व अनंत अशा संसारात वडिलांच्या मरणाचचे वेळी, भावाच्या मरणाच्या वेळी व स्वतःला मारपीट झाली असताना पुनःपुन्हा रडणाऱ्या मुर्खांचा संसार दीर्घ असतो. ||४९५||_*

*_अश्रू, स्तन्य व रक्ताने शिंपडला गेलेला हा संसार अनादि व अनंत आहे. याचे स्मरण करा. आवागमन करणाऱ्या प्राण्यांचे आणि हाडांचा साठा याचेसुद्धा स्मरण करा. ||४९६||_*

*_अनादि व अनंत अशा संसारात एकत्र केलेले अश्रू, स्तन्य आणि रक्त चार समुद्राएवढे आहे याचे स्मरण करा. एका कल्पात एकत्र केलेली मनुष्यांची हाडे वैपुल्य पर्वताएवढी विशाल होतील याचेसुद्धा स्मरण करा. ||४९७||_*

*_अनादि व अनंत अशा संसारात आवागमन करणाऱ्या प्राण्यांचे मातृपरंपरेचे मोजमाप करण्याकरिता संपूर्ण जम्बुद्विपातील माती एकत्र केली व तिच्या बोराच्या आठुळ्या एवढ्या गोळ्या केल्या तरी त्या पर्याप्त होणार नाहीत. ||४९८||_*

*_अनादि व अनंत अशा संसारात आवागमन करणाऱ्या प्राण्यांचे पितृपरंपरेचे मोजमाप करण्याकरिता सर्व पृथ्वीवरील तृण, काष्ठ, फांद्या आणि पाने एकत्र केली व त्यांचे चार बोटाएवढे तुकडे केले तरी ते पर्याप्त होणार नाहीत याचे स्मरण करा. ||४९९||_*

 *_मनुष्यत्व किती दुर्लभ आहे हे सांगणाऱ्या उपमेचे स्मरण करा- पूर्व समुद्रात पडलेले एकक्ष कासव, अन्य समुद्रात पडलेल्या लाकडाच्या जुवात असलेले भोक व भोकातून बाहेर काढलेले त्या कासवाचे डोके हि अत्यंत कठीण गोष्ट आहे, ह्याप्रमाणेच मनुष्यत्व-लाभ कठीण आहे. ||५००||_*

*_फेसाच्या गोळ्याप्रमाणे, दुर्दशाग्रस्त आणि सारहीन असलेल्या शरीराचे स्मरण करा. स्कंध अनित्य आहेत असे पहा. तसेच नरकातील अनेक यातनांचे स्मरण करा. ||५०१||_*

*_शरीर त्या त्या जन्मात मेल्यावर स्मशानात भर घालणारे आहे याचे स्मरण करा. मगराच्या भीतीचे स्मरण करा. त्याचप्रमाणे चार आर्य सत्यांचे स्मरण करा. ||५०२||_*

*_अमृत विद्यमान असतांना तुम्ही पाचही अवस्थेत कडू असलेले पदार्थ का पिता? सर्व विषयभोग पाच तऱ्हेने कडू असलेल्या पदार्थापेक्षाही जास्त कडू आहेत. ||५०३||_*

*_अमृत विद्यमान असताना कामभोगांचा दाह कशाकरिता? सर्वच कामभोग जळणारे, उकळी फुटणारे, कम्प व संताप उत्पन्न होणारे आहेत. ||५०४||_*

*_वैररहित निब्बाण असताना, पुष्कळ वैरपूर्ण अशा कामतृष्णाशी तुम्हाला काय कर्तव्य? कामभोग राजा, अग्नी, चोर, पाणी आणि अप्रिय यांच्याशी समानता बाळगणारे असून पुष्कळ शत्रुत्व वाढविणारे आहेत. ||५०५||_*

*_विमुक्ती विद्यमान असताना वध आणि बंधनयुक्त कामतृष्णाशी तुम्हाला काय कर्तव्य? कामभोगामुळेच वध व बंधने उत्पन्न होतात. कामासक्त माणसे दुःखाचा अनुभव घेतात. ||५०६||_*

*_गवताची जळती मशाल ग्रहण करणाऱ्यालाच जाळते. सोडून देणाऱ्याला जाळत नाही. कामभोग सुद्धा, मशालीप्रमाणे, ग्रहण करणाऱ्याला जाळतात. सोडून देणाऱ्याला जाळत नाहीत. ||५०७||_*

*_अल्प कामसुखाकारिता तुम्ही विमुक्तीच्या विपुल सुखाचा त्याग करू नका. अनेक केस असलेल्या पुथूलोम नावाच्या मासळीप्रमाणे हुक गिळून शेवटी नष्ट होऊन जगू नका. ||५०८||_*

*_साखळीने बांधलेल्या कुत्र्याप्रमाणे तू ज्या कामातृष्णेने बद्द आहेस त्या कामातृष्णेचे दमन कर, भुकेलेले चांडाळ कुत्र्याला खातात त्याप्रमाणे कामतृष्णा तुम्हाला खातील. ||५०९||_*

*_कामतृष्णात आसक्त झाल्यामुळे अपरिमित दुःख आणि चीत्तक्लेश अनुभवावे लागत आहेत. कामातृष्णा अधृव आहेत. त्यांचा त्याग करा. ||५१०||_*

*_जरारहित निब्बाण विद्यमान असतांना जरायुक्त कामभोगाशी तुझे काय कर्तव्य? सर्व जन्म सर्व प्रकरे मरण व व्याधीग्रस्त आहेत. ||५११||_*

*_हे निब्बाण अजर आहे, हे अमर आहे, हे अजरता व अमरतेचे स्थान आहे. शोकरहित, वैररहित, विघ्नरहित, निश्चल, अस्खलित, अभय आणि तापरहित आहे. ||५१२||_*

*_ह्या अमृताचा पुष्कळ लोकांनी आस्वाद घेतलेला आहे. आजसुद्धा ते प्राप्त केले जाणारे आहे. जो त्याच्याकरिता शहाण्याप्रमाणे प्रयत्न करील त्याला ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रयत्न न करणाऱ्याला ते प्राप्त होणे शक्य नाही.” ||५१३||_*

*_सर्व संस्कारमय गोष्टीपासून विरक्त झालेल्या सुमेधाने, आपले म्हणणे अनोकरक्तास पटवून देत असतांना आपले कापलेले केस जमिनीवर फेकून दिले. ||५१४||_*

*_अनोकरक्ताने सुद्धा उभे राहून तिच्या वडिलांना हात जोडून याचना केली – ‘विमुक्ती व सत्याच्या दर्शनाकरिता प्रव्रजित होण्यासाठी सुमेधाला सोडून द्या.’ ||५१५||_*

*_आई वडिलांनी आज्ञा दिल्यावर संसारातील शोक व भीतीने घाबरलेल्या सुमेधाने प्रव्रज्या घेतली. श्रेष्ठ फळाच्या प्राप्तीकरिता शिकत असतानांच तिने सहा अभिज्ञांचा साक्षात्कार केला. ||५१६||_*

*_राजकन्येचे ते निब्बाण आश्चर्यपूर्ण व अद्भुत होते. पूर्वजन्मातील चरित्र तिने नंतरच्या काळात याप्रकारे सांगितले  - ||५१७||_*

*_”ज्यावेळी भगवान कोणागमन बुद्ध संघाराम नामक नवीन बांधलेल्या विहारात राहत होते तेव्हा आम्ही तिघी मैत्रिणी (मी, खेमा आणि धनंजानी) एक विहार बांधून भगवंताना दान दिला. ||५१८||_*

*_त्या पुण्याच्या प्रभावाने आम्ही दहा, शंभर, हजार, दहा हजार वेळा देवलोकात उत्पन्न झालो. मनुष्य लोकातील उत्पतीबद्दल तर प्रश्नच उद्भवत नाही. ||५१९||_*

*_देवलोकात आम्ही अत्यंत ऋद्धीसंपन्न होतो. मनुष्य लोकाबद्दल तर प्रश्नच उद्भवत नाही. सात रत्न धारण करणाऱ्या चक्रवर्ती राजाची स्त्री-रत्न म्हणून मी पट्टराणी होते. ||५२०||_*

*_मी कोणागमनाला जे दान दिले ते बुद्ध शासनाबद्दलच्या आवडीचा हेतू, कारण व मुळ झाले. तेच बुद्ध शासनात पहिले आगमन आणि नंतर धम्मात रत होऊन निब्बाण मिळाले. ||५२१||_*

*_त्या अनुपम प्रज्ञा असलेल्या भगवान बुद्धाच्या उपदेशावर जे श्रद्धा ठेवतात ते माझ्याप्रमाणे आचरण करतात. त्यांना संसाराबद्दल वीट येतो व वीट आल्यावर ते विरक्त होतात.” ||५२२||_*   

     

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ: - थेरिगाथा*

*संकलन :- महेश कांबळे*

*१८/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...