*प्रश्न ३- अनेक बुवा चमत्कार करत नाहीत. अशा बुवांना विरोध करण्याचे कारण काय?*
* उत्तर 👉* केडगावचे नारायण महाराज कोणताही चमत्कार करीत नव्हते. मग‘केडगाव चे नारायण महाराज पळाले!’ असा सनसनाटी अग्रलेख लिहून आचार्य अत्र्यांनी नारायण महाराजांच्या कृष्णकृत्यांची चिरफाड का केली?
चमत्कार हे बुवाबाजीचे उघड स्वरूप आहे. चमत्कार न करणाऱ्या बुवांचा हेतू समान असतो. तो म्हणजे बायांचा उपभोग व पैसा. बुवा तेथे बाया आणि बुवा तेथे माया हे सर्वार्थाने खरे असते.
चमत्कार न करता बुवाबाजी करणाऱ्यांची भाषा अवैज्ञानिक असते. मूल न होणारी बाई अशा बुवाकडे दैवी कृपेचा प्रसाद मागण्यास जाते. दैवी कृपेने मूल होत नाही. ‘माझी सेवा कर’, ‘भैरवी पूजा कर’ असे अवैज्ञानिक प्रकार तो बाईला करावयास सांगतो. याच पद्धतीने वाघमारे बाबांनी ५० स्त्रियांचा उपभोग घेतला. बाईला वश करण्यासाठी ‘गेल्या जन्मी तू राधा होतीस व मी कृष्ण होतो’ अशी भाषा वापरून चमत्कार न करणारे बुवा बाईची अपराधीपणाची भावना मारून टाकतात व तिचा उपभोग घेतात. देवाची कृपा किंवा अवकृपा, पूर्वजन्मीचे पाप, दुष्ट शक्तीची लागण, करणीमुळे संकटे येणे, अशा अवैज्ञानिक कल्पनांचा हे बुवा आधार घेतात आणि यात त्यांच्या भजनी लागणाऱ्यांना धोका असतो. त्यांची दिशाभूल व फसवणूक असते.
बुद्धीसामार्थ्य, विवेक व निर्भयता यांच्या आधारे स्वतःचे प्रश्न प्रयत्न करणे यातच माणसाचे शहाणपण आहे. मूल होत नसेल तर शारीरिक तपासणी केली पाहिजे, ही विज्ञानदृष्टी स्त्री-पुरुषांना दिली पाहिजे. अशी दृष्टी बुवा देत नाहीत. त्यामुळे समाज-जीवनाच्या दृष्टीने दीर्घकालीन विचार करता अवैज्ञानिक दृष्टीकोन वापरणाऱ्या, चमत्कार न करणाऱ्या बुवांना सुद्धा विरोध केला पाहिजे.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment