*_प्रश्न ४- सध्याच्या युगाला आपण विज्ञानयुग म्हणतो. मग एवढ्या संख्येने लोक बुवा, बाबा, भगत यांच्या कच्छपी का लागतात?_*
*उत्तर 👉* _पूर्व संस्कारांचा जबरदस्त पगडा मानवी मनावर असतो. हिंदू धर्मात सांगितलेल्या कर्म विपाकाच्या सिद्धांताचा असाच जबरदस्त पगडा हिंदू-समाजावर आहे. पूर्वजन्मीच्या पापामुळे या जन्मात दु:खे आपल्या वाट्याला येतात. असे हा सिद्धांत सांगतो. मग ही द:खे दूर करण्यासाठी बुवा, बाबा, भगत हे मध्यस्थाची भूमिका करतात. संकटात सापडलेला माणूस प्रारब्धाच्या कल्पनेने अशा मध्यस्थ-दलालाच्या जाळ्यात सापडतो. एका बाईच्या नवऱ्याच्या घशाला कॅन्सर झाला. बाई ज्योतिषाकडे गेली. त्याने सांगितले, ‘तुझा नवरा पूर्वजन्मी शिकारी होता. त्याने गर्भार हरिणीला बाण मारला. तो तिच्या गळ्याला लागला. हरिणीने प्राण सोडताना तुझ्या नवऱ्याला शाप दिला. त्याचा हा परिणाम आहे.’ यावर उपाय म्हणून ज्योतिषाने ‘सोन्याचे हरीण ब्राम्हणास दान कर’ असा बाईला सल्ला दिला. बाईने त्याप्रमाणे केले. पण नवरा वाचू शकला नाही. ही बाई विज्ञानयुगात असून काय उपयोग? *विज्ञानाने रेडीओ आला, टी.व्ही. आला, वीज आली. पण मनातील अंधाराचे काय? विज्ञानसृष्टी आली, पण विज्ञानयुगातील मानवाला विज्ञानदृष्टी आली नाही*. आपले मन, सभोवतालची माणसे व निसर्ग यांच्या परस्पर संबंधातून आपली दु:खे निर्माण होत असतात. हे समजण्यासाठी विज्ञानदृष्टी हवी. आणखीही एक महत्वाचे कारण आहे. विज्ञानयुगात जीवन असुरक्षित बनत चालले आहे. जगण्यासाठी करावी लागणारी तीव्र स्पर्धा, अपघाताची भीती, गुंडगिरी, बेकारी, महागाई, तणाव अशा कारणांनी येणारी अगतिकता हे पण बुवा, बाबा आणि भगत यांच्या कच्छपी लागण्याचे महत्वाचे कारण आहे._
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
No comments:
Post a Comment