*_प्रश्न_५- बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात ‘किर्लोस्कर’ने ५० वर्षे आघाडी उघडली, तरी अजूनही बुवाबाजी कमी झालेली नाही. असले काम कशाकरता करत रहावयाचे?_*
*उत्तर* सामाजिक परिवर्तन हे अक्रोडाचे झाड लावल्याप्रमाणे आहे. अक्रोडाला खूप उशिरा फळे येतात. परिवर्तनाच्या चळवळीची फळे उशीरच मिळणार. समाजमन हळूहळू बदलते. महात्मा फुल्यांनी
स्त्री-शिक्षणाचा प्रयत्न सुरु केला त्यावेळी लोक त्यांना हसले. आज स्त्री-शिक्षण
सर्वमान्य व आवश्यक मानले जात आहे. र. धों. कर्व्यांनी संततीनियमनाचा विचार मांडला.
लोकांनी त्या काळी त्यांची टर उडवली. आज संततीनियमन समाज-धारणेच्या परवलीचा शब्द
बनला आहे. कोणी द्रष्टा कामाला सुरुवात करतो. त्याचा प्रयत्नही एकाकी असतो. हळूहळू
लोकांना सत्याची जाणीव व्हायला लागते व लोक बदलायला लागतात. कर्मवीर भाऊराव पाटील
यांनी केवळ ५-१० मुलांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु
केला. आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचे प्रचंड वटवृक्षात रुपांतर झालेले आपणांस
दिसते आहे ना?
‘किर्लोस्कर’
ज्या काळात बुवाबाजीवर हल्ले करत होते. त्या काळात शिक्षणाचा फारसा प्रसार नव्हता.
विज्ञानाचा प्रसार मर्यादित होता. बुवाबाजीची यंत्रणा सामर्थ्यशाली होती. त्यामुळे
‘किर्लोस्कर’चा परिणाम व बुवाबाजीचे बळ यांची तुलनाच होऊ शकत नाही.
गेल्या काही वर्षांत विज्ञान शिक्षणाचा
प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. नवी पिढी चिकित्सक बनत चालली आहे. बुवाबाजी
विरोधी लढ्यात तरूण मोठ्या संख्येने हिरीरीने भाग घेत आहेत. अनेक अंगांनी
अंधश्रद्धा निर्मूलनाची व परिवर्तनाची चळवळ वाढत आहे. *तथापि, बुवाबाजी हा बरकतीचा धंदा असल्याने या मंडळींनी
तंत्रबदलाचे कसब दाखवले आहे. साधनसामग्री, फसवी
विज्ञानभाषा आणि जनसामान्यांचा अजूनही त्यांनाच पाठींबा असल्याने आजही बुवाबाजी
विरुद्धची लढाई विषमच आहे* . पण ही लढाई निग्रहपूर्वक चालू ठेवावी लागेल. उशिरा का
होईना, पण यश निश्चित आहे.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment