Monday, 9 June 2025

ञाय पटिपन्नो

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_9.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_संघाच्या वंदन करताना बौद्ध अनुयायी म्हणतात:_

_सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो_

_उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो_

_ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो_

_सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो_

_भगवान बुद्धांचा पवित्र संघ सुमार्गावर, सत्मार्गावर चालणारा आहे. भगवान बुद्धांचा पवित्र संघ ऋजुमार्गी म्हणजे सरळ मार्गावर चालणारा आहे. भगवान बुद्धांचा पवित्र संघ न्यायमार्गावर चालणारा आहे. भगवान बुद्धांचा पवित्र संघ नेहमीच योग्य मार्गावर चालणारा आहे._

_तिसरी ओळ विशेष लक्ष वेधून घेण्यासारखी आहे - *ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो* - भगवान बुद्धांचा पवित्र संघ न्यायमार्गावर चालणारा आहे._

_संहितांच्या संदर्भात, भारतात अशी व्यवस्था होती की एकाच गुन्ह्यासाठी चार वर्णांसाठी वेगवेगळी शिक्षा होती, तर न्यायाचा अर्थ ‘सर्व समान आहेत’ हा आहे. परंतु बुद्धकाळात *समता* आणि *न्याय* ही मूलभूत मूल्ये होती. हे मूल्य केवळ संघातच नव्हे, तर समाजात आणि व्यवस्थेतही होते._

_पारंपारिक अर्थाने संघाचा अर्थ *भिक्खू संघ* किंवा *भिक्खुनी संघ* असा लावला जातो, परंतु मूळ अर्थाने भगवान बुद्धांनी *चतुर्परिषद* म्हणजे *संघ* असे म्हटले आहे. चतुर्परिषद म्हणजे:_

१. भिक्खू संघ

२. भिक्खुनी संघ

३. उपासक संघ

४. उपासिका संघ

_या चार संघांना धम्माच्या इमारतीचे चार आधारस्तंभ म्हटले पाहिजे. कोणत्याही स्तंभात न्यायाचा अभाव असेल, तर संपूर्ण इमारत कोसळून जाईल._

_भगवान बुद्धांनी संघाच्या पायाभरणीतच *न्यायाची वीट* लावली - *ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो* - भगवान बुद्धांचा पवित्र संघ न्यायमार्गावर चालणारा आहे, त्यामुळे उर्वरित व्यवस्थांमध्ये न्यायाचे मूल्य असणे आवश्यक आहे._

_भगवान बुद्धांच्या काळात प्रशासकीयदृष्ट्या न्यायव्यवस्था कशी होती, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

बुद्धांच्या काळात न्यायव्यवस्थेचे सात टप्पे होते, विशेषतः वज्जी गणराज्यात. बुद्धघोषाचार्यकृत अट्ठकथेत वज्जींच्या न्यायव्यवस्थेचे सविस्तर वर्णन मिळते._

_जेव्हा एखादा अपराधी पकडला जात असे, तेव्हा तो अपराधी सिद्ध होण्यापासून ते त्याला शिक्षा दिली जाईपर्यंतच्या प्रक्रियेत त्याला सात टप्प्यांतून जावे लागे:_

१. विनिश्चय महामात्य

२. व्यवहारिक

३. अन्तःकारिक

४. अष्टकुलिक

५. सेनापती

६. उपराजा

७. राजा

सार्वत्रिकरित्या मुख्य अपराध पाच आहेत:

१. हिंसा,

२. चोरी,

३. दुराचार,

४. खोटे बोलणे, आणि

५. मद्यपानामुळे होणारे उत्पात.

_भगवान बुद्धांनी याच मुद्द्यांवरून *पाच शीले* दिली आहेत:_

  • हिंसा न करणे - पाणातिपाता वेरमणी
  • चोरी न करणे - अदिन्नदाना वेरमणी
  • दुराचार न करणे - कामेसुमिच्छामारा वेरमणी
  • खोटे न बोलणे - मुसावादा वेरमणी
  • मद्यपान न करणे - सुरामेरयमज्जपमादाट्ठाणा वेरमणी

_असे नाही की ही शीले, *पंचशीले* केवळ बौद्धांसाठी आहेत. ती *मानवमात्रासाठी* आहेत, *सार्वत्रिक समाजव्यवस्थेच्या सुप्रबंधनासाठी* आहेत. जगात जिथे कुठे अव्यवस्था असेल, तिथे या पाच शीलांपैकी एक किंवा अनेक भंग झाल्यामुळेच ती अव्यवस्था निर्माण झाली असेल._

_कोणताही बाप आपल्या मुलीसाठी हिंसक, चोर, दुराचारी, खोटा किंवा मद्यपी जावई शोधत नाही. पाच शीलांवर बौद्धांचा *एकाधिकार* नाही, उलट ही एका *श्रेष्ठ मानवासाठीची मानके* आहेत, मोजमाप आहेत._

_बौद्धकाळात जेव्हा एखादी व्यक्ती या शीलांचा भंग केल्यामुळे गुन्हेगारीत गुंतलेली आढळत असे, तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीला *विनिश्चय महामात्यांकडे* सोपवले जात असे. विनिश्चय महामात्य पकडलेल्या गुन्हेगाराची सूक्ष्म तपासणी करत असत. पहिल्या टप्प्यात ते ठरवत असत की दोष खरोखरच घडला आहे की नाही. बारकाईने तपासणी केल्यानंतर जर तो निरपराध आढळला, तर त्याला त्याच स्तरावर सोडून दिले जाई. जर तो अपराधी सिद्ध झाला, तरी त्याला त्याच पातळीवर शिक्षा न देता, पुढील टप्प्यात म्हणजेच *व्यवहारिकांकडे* सोपवले जात असे._

_विनिश्चय महामात्यांनी केलेल्या सूक्ष्म विवेचनाचा आधार घेऊन व्यावहारिक अमात्य अपराध्याची आणखी *गहन विवेचना* करत असत. अमात्य आजच्या भाषेत अधिकारी म्हटले जातील - ऑफिसर. ते सर्व व्यावहारिक पैलूंचा बारकाईने अभ्यास करत असत. आपल्या विवेचनात जर ते त्याला निरपराध आढळले, तर त्याला सोडून देत असत आणि जर अपराधी आढळले, तरी त्याला शिक्षा न करता उच्चतर न्यायपीठ म्हणजे *अन्तःकारिकांकडे* सोपवून देत असत._

_अन्तःकारिक न्यायपीठ पुन्हा गहन विवेचना करत असे. अन्तःकारिक म्हणजे ते आणखी आतपर्यंत जाऊन संपूर्ण घटनाक्रमाची अतिसूक्ष्म विवेचना म्हणजेच *इन्व्हेस्टिगेशन* करत असत._

_प्रत्येक उच्चतर पीठ आधीच्या पेक्षा अधिक कुशाग्र, अनुभवी आणि परिपक्व होते. विवेचनांच्या टप्प्यांची ही *चाळणी* केवळ यासाठी होती की, प्रमादवश कोणताही निरपराध व्यक्ती दंडित होऊ नये._

_बौद्धकाळात या सर्व समित्या क्रमबद्ध न्याय प्रक्रियांचे भाग असत, ज्यांना आजच्या न्यायिक व्यवस्थेत बेंच, लोअर बेंच, हायर बेंच म्हणजे पीठ इत्यादी म्हणतात. विनिश्चय महामात्य सर्वप्रथम हे सुनिश्चित करत असत की प्रश्नगत व्यक्ती अपराधी आहे की नाही. वास्तविक व्यावहारिक समीक्षा व्यावहारिक समिती म्हणजेच न्यायपीठ करत असे. व्यवहारिकांनी अपराधी सिद्ध केल्यानंतर अन्तःकारिक गहन चौकशी करत असत. अन्तःकारिकांनी जर त्याला निरपराध आढळले, तर त्याला सोडून दिले जाई, अन्यथा त्याला उच्चतर न्यायांग टप्प्यात म्हणजेच *अष्टकुलिकांकडे* सोपवले जात असे._

_*अष्टकुलिक, नावाप्रमाणेच स्पष्ट आहे की, आठ अधिकाऱ्यांचे न्याय मंडळ होते.* ते आठ अधिकारी पूर्वीच्या समित्यांपेक्षाही *गहन तपासणी*  करत असत. ते अधिक अनुभवी आणि वरिष्ठ अधिकारी होते. कोणताही शातिर अपराधीच या स्तरापर्यंतच्या विवेचनेत पोहोचत असे. या स्तरापर्यंतच्या विवेचनेत पोहोचलेला व्यक्ती जवळजवळ *निश्चित अपराधी* मानला जात असे. साधारणतः त्याला शिक्षा निश्चितच मिळत असे. तरीही, जर अष्टकुलिक त्याला निरपराध आढळले, तर सोडून देत असत आणि अपराधी आढळले, तर पुढे *सेनापतीकडे* हस्तांतरित करत असत._

_आजच्या न्याय प्रक्रियेत याला असे घेऊ शकतो की, जेव्हा पोलीस एखाद्याला कोणत्याही गुन्हेगारीत गुंतलेले आढळते, तेव्हा त्याच्याविरुद्ध *एफआयआर (FIR)* दाखल करून त्याला ताब्यात घेते. पहिल्या विवेचनेत जर तो निरपराध आढळला, तर त्याला सोडून दिले जाते किंवा गुन्हा दाखल करून सत्र न्यायालयाकडे सोपवले जाते. सत्र न्यायालय संशय असल्यास त्याला अधिक गहन विवेचनेसाठी *न्यायिक कोठडीत* सोपवते. न्यायिक कोठडीत त्याची गहन समीक्षा करून बयान घेतले जातात. त्यानंतर त्याला दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात सोपवले जाते. अशाप्रकारे सत्र न्यायालय, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा एक क्रम चालतो. सर्वोच्च न्यायालयाच्याही वर राष्ट्रपतींचा निर्णय असतो आणि तरतूद संसदेच्या सभागृहापर्यंत जाण्याचीही आहे._

_अष्टकुलिकांनी सोपवलेल्या प्रश्नगत व्यक्तीची सेनापती आपल्या अधिकाऱ्यांसह विवेचना करत असे, त्याचा *आपराधिक इतिहास* इत्यादी पाहत असे. गुन्हा सिद्ध झाल्यानंतरही सेनापती त्याला शिक्षा देत नसे, फक्त त्याला आपल्यावरील *उपराजाकडे* सोपवून देत असे. न्यायाची ही लांब प्रक्रिया केवळ या कारणामुळे होती की, अपराधी दंडित झालाच पाहिजे, पण *निरपराध दंडित होऊ नये.*_

_उपराजाही पूर्वीप्रमाणेच आपल्या मानकांवर विवेचना करत असे. जर तो निरपराध आढळला, तर त्याला सोडून दिले जात असे, अन्यथा अखेरीस त्याला *राजासमोर* सादर केले जात असे. राजाकडे प्रश्नगत व्यक्ती अपराधी आढळल्यास *अभयदान* किंवा *क्षमा* करण्याचा अधिकार होता किंवा शिक्षा कमी करण्याचाही अधिकार होता - जसे की मृत्यूदंडाचे आजीवन कारावासात रूपांतर करणे. पण राजा सहसा असे करत नसे. आपल्या अधीनस्थ न्यायांगांच्या शिफारसींचा संज्ञान घेऊन, आपल्या *मंत्रिपरिषदेद्वारे* तपासणी केल्यानंतर जर प्रश्नगत व्यक्तीला राजा निरपराध आढळला, तर सोडून देत असे आणि दोषी आढळला, तर त्याला *'प्रवेणी ग्रंथ'* वाचायला सांगत असे.

_*'प्रवेणी ग्रंथ*' हा बुद्धांच्या काळात वज्जी गणराज्याचा *विधान ग्रंथ* होता. आजच्या युगात आपण याची तुलना *भारतीय दंड संहिता (इंडियन पेनल कोड)* आणि *भारतीय संविधानाशी* करू शकतो._

_'प्रवेणी ग्रंथात' अमुक अपराधासाठी अमुक शिक्षेचे विवरण होते. त्या ग्रंथात वर्णित विधानानुसार राजा अपराध्याला दंडित करत असे. जोपर्यंत या देशात ही न्यायिक प्रक्रिया होती, असे म्हटले जाते की, लोक आपल्या घरांना कुलूप लावत नव्हते, विहिरीच्या काठावर वाटसरूंची घागर तिथेच ठेवलेली मिळत असे, जिथे ती विसरली किंवा सोडली गेली असे. यामागे निश्चितच *बुद्धांच्या शिकवणीचा* परिणाम होता._

_बुद्धांच्या धम्माला त्यांच्या संघाला *ञायपटिपन्नो* म्हटले गेले आहे, म्हणजेच *न्यायावर आधारित संघ*.

जगात दोन प्रकारची शासने आहेत - *राजशासन* आणि *बुद्ध शासन.* राजशासन समाजाला *दंडाची भीती* दाखवून नैतिक ठेवण्याचा प्रयत्न करते आणि बुद्धांचे शासन व्यक्तीला *धम्ममय जीवनाने* नैतिक बनवते. दंडाच्या भीतीमुळे निर्माण झालेली नैतिकता ही वास्तविक नैतिकता नाही. उलट, धम्ममय जीवनातून अभिव्यक्त झालेले जीवनच नैतिक जीवन आहे._

_*बुद्ध शासनाची सहज व्याख्या?*_

_सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा।_

_सचित्तपरियोदपनं एतं बुद्धान,,सासनं ॥_

_सर्व प्रकारची पापकर्मे न करणे, कुशल कर्मे संचय करणे आणि चित्ताचे निरंतर परिशोधन करत राहणे, हेच बुद्धांचे शासन आहे._

_बुद्धांचे शासन भय आणि दंडावर आधारित नसून *करुणा आणि मैत्रीवर* आधारित आहे, *शील आणि विनयावर* आधारित आहे. हॉलंडमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. तेथील ग्रंथालयात जगभरातील न्याय ग्रंथ ठेवलेले आहेत, ज्यांची संख्या अंदाजे सहा लाख आहे. सहा लाख न्याय ग्रंथ असूनही जगात इतकी विषमता, इतका अन्याय! खरेतर, न्यायाच्या ग्रंथातून समता आणि न्याय स्थापित होऊ शकत नाही, *बुद्धांचा धम्मच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय देऊ शकतो,* कारण बुद्धांचा धम्म - *ञाय पटिपन्नो - न्यायावर आधारित* आहे._

_भारताचे संविधानशिल्पी *डॉ. बी. आर. आंबेडकर* यांनी संविधान लोकार्पण प्रसंगी मोठ्या अभिमानाने हे तथ्य उघड केले की, भारताच्या संविधानातील *लोकशाही* आणि *न्यायाची मूल्ये* त्यांनी *बुद्धांच्या संघातून* घेतली आहेत. त्या महान बोधिसत्त्वांनी *समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची बौद्ध मूल्ये* संविधानाच्या प्रस्तावनेत मोत्यांप्रमाणे जडवली आहेत:_

_"आम्ही, भारताचे लोक, भारताला एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्न, समाजवादी, पंथ-निरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनवण्यासाठी आणि त्याच्या सर्व नागरिकांना:_

_*सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,*_

_*विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य,*_

_*प्रतिष्ठा आणि संधीची समानता*_

_प्राप्त करून देण्यासाठी, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करणारी *बंधुता* वाढवण्यासाठी दृढसंकल्प होऊन आपल्या या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १9४9 ई. (मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत् दोन हजार सहा विक्रमी) रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मार्पित करतो."_

_महान बोधिसत्त्वांनी या देशाला या देशाचा मूळ वारसा *बुद्ध धम्म* तर परत दिलाच, पण भारतीय संविधानाद्वारे त्यांनी *लोकशाही व न्यायाची बौद्ध मूल्ये* देखील पुन्हा स्थापित केली._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*मूळ (हिंदी) लेखक :श्री राजेश चंद्रा *_

_*अनुवादक : महेश कांबळे_*

_दिनांक : ०९/०६/२०२५_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...