महाराष्ट्रातील बौद्ध मंगल -परिणय विधी धम्मसंगत आहे ?
- डॉ. डि.जी. धुळे
मो. ९४२३७४५०५४ औरंगाबाद
_डॉ. बाबासाहेबांनी १९५६ मध्ये आपल्याला बौद्ध धम्माची दिक्षा दिली तेव्हापासून आम्ही हिंदू धर्मातील सर्व कर्मकांडे नाकारुन बौद्ध जीवन पध्दती अंगीकारीली. त्यानुसार आपल्या लग्नविधीमध्ये देखिल अमूलाग्र बदल करून बऱ्यापैकी सोपी पध्दत उदयाला आली. *सुरुवातीच्या काळात बौद्ध भिक्खूच नव्हते त्यामुळे गावातीलच एखादा शिक्षीत व्यक्ती मंगल परिणय विधी पार पाडत असे व ती विधी बऱ्यापैकी साधी व धम्मसंगत असे. कर्मकांडांचा तर त्यात लवलेशही नसायचा.*_
_हळू हळू आपल्या समाजात भिक्खू निर्माण होऊ लागले आणि भिक्खूंनीच लग्नविधी पार पाडायचा ही प्रथा रुढ झाली. *धर्मांतरानंतर बौद्ध समाजाने जी लग्नविधी प्रचलित केली आहे, त्यात हिंदू लग्नविधी प्रमाणेच कर्मकांडांची पध्दत तशीच ठेवली. फक्त प्रतिके बदलली, भाषा बदलली आणि आज असे दिसते कि, आपले मंगल परिणय विधी हिंदू लग्नविधीपेक्षा देखिल कर्मकांडी झालेला दिसतो.* बौद्ध धम्मात कर्मकांडाला थारा नाही. *भिक्खूंनी लग्नविधी पार पाडणे धम्मसंगत आहे का ?* त्याच प्रमाणे बाहेरच्या बौद्ध देशात लग्न विधी कसे होतात ? तेथे भिक्खू लग्ने लावतात काय ? हे आपण पाहू. जगातील अनेक बौद्ध देशांमध्ये लग्न पध्दती कशी असते ? याचा अभ्यास केल्यास काही ठळक बाबी आपल्या लक्षात येतील. त्यासाठी आपण काही बौद्ध देशातील लग्न पध्दती बघू :-_
*_१. श्रीलंका -_*
_या देशात लग्नविधीच्या एक दोन दिवस अगोदर भिक्खू संघाला वधू - वरांच्या घरी भोजनासाठी निमंत्रीत करतात. भोजनानंतर भिक्खू संघ यथोचित व प्रसंगाला आवश्यकच सुत्तपठण करुन आशिर्वाद देतात. या देशात प्रचलीत असलेली "नकुलमाता" व "नकुलपिता" या दांम्पत्याच्या सुखी, समाधानी व यशस्वी संसारिक जीवनाची कथा भिक्खू संघातील जेष्ठ सदस्य उपस्थितांना विस्ताराने सांगतात. "पति - पत्नीचे जीवन श्रध्दा, शील, त्याग, दानवृत्ती, करुणा व परस्परांवरील विश्वास या सद्गुणांवर व्यतित होत असेल तरच वैवाहिक जीवन यशस्वी व सुखी होते." असा या कथेचा सार आहे. त्यानंतर भिक्खू संघ निघून जातो. *मुख्य लग्नविधीसाठी भिक्खू अथवा भिक्खूसंघ थांबत नाही.*_
*_त्यासाठी एका जेष्ठ उपासकाला निमंत्रीत करण्यात येते. तेथील "सामाजिक" मान्यते प्रमाणे लग्नविधी संपन्न होतो._*
*_२. थायलंड -_*
_थायलंड मधे लग्नविधीच्या आधीच नोंदणी विवाह (रजिस्टर मॅरेज) संपन होतो. येथे देखिल भिक्खू गणाला भोजनदानासाठी निमंत्रीत केले जाते. *भिक्खूगण प्रसंगोचितच सुत्तपठण करतात. भोजन दानानंतर भिक्खूगण निघून जातात. त्यानंतर मुख्य लग्नविधी सुरु होतो, आणि तेथील सामाजिक मान्यतेनुसार लग्नविधी पार पडतो.*_
*_३. म्यानमार (ब्रम्हदेश) -_*
_*येथेही लग्नविधी संपन्न करण्यासाठी भिक्खू उपस्थित राहात नाहीत, तर ज्येष्ठ उपासकाला (मास्टर ऑफ सेरेमनी) यासाठी निमंत्रितांना अल्पोपहार अथवा जेवण दिल्या जाते.* यावेळी नव दांपत्य प्रत्येकाजवळ जाऊन उपस्थितांचे आभार मानते. सर्वांचे जेवण झाल्यावर हे नवदांपत्य बुद्ध विहारात जाऊन वंदन करते._
*_४. जपान -_*
_*या देशात बहुतांश विवाह हे शिंटो धर्म पध्दतीने पार पाडतात.* आधुनिक जपानमध्ये तर काही वधू वर चर्चमध्ये जाऊनही लग्न करतात. येथे लम्नविधी कसा असावा हे सर्वस्वी वधु-वरांच्या मर्जीनुसार ठरविले जाते. पण ज्या वधु वरांना बौद्ध पध्दतीने लग्न करावयाचे असते, अशा *लग्नविधीमध्ये देखिल भिक्खू लग्न विधी पार पाडत नाहि. तर जेष्ठ उपासकांच्या हस्तेव लग्नविधी पार पडतो. त्रिशरण, पंचशील आणि बुध्द, धम्म, संघ बंदना, गुलाबपुष्पाचे हार वधु - वर परस्परांना घालणे यांचा समावेश असतो.*_
*_५. चीन -_*
_कम्युनिझमच्या प्रभावामुळे या देशात धर्माचे स्थान थोडे गौण झालेले आहे. सांप्रत कालात जी काही लग्न पध्दती अस्तित्वात आली आहे ती थोडक्यात खालील प्रमाणे आहे._
_लग्नाच्या दिवशी सकाळीच नियोजित वर आपल्या आप्तेष्टांना सोबत घेऊन नियोजित वधूच्या घरी पोहोचतो. तेथे प्रवेशदाराजवळ नियोजित वधुच्या मैत्रिणी (करवल्या) वराला घरात प्रवेश देण्या अगोदर त्याला अनेक प्रश्न विचारतात. ही एक प्रकारची वर परिक्षाच असते. त्यानंतर सर्व करवल्यांना वराकडुन बक्षीसी दिल्या जाते. नंतर वराला प्रवेश मिळतो. मग नियोजित वर वधू सर्वांसोबत वराच्या घरी जातात. तेथे वधू - वर माता पित्यांच्या समोर गुडघ्यावर बसून त्यांना अभिवादन करतात व त्यांना चहा अर्पण करतात. *या विधीला "टी सेरिमनी" म्हणतात.* हा विधी सर्वात महत्वाचा मानला जातो. या "टी सेरिमनी" शिवाय लग्नविधी संपत्र झाला हे मानले जात नाही. नंतर सर्व उपस्थित चहा पितात. येथे लग्नविधी संपन्न होतो. *येथेही लग्नविधीसाठी भिक्खू उपस्थित राहत नाही.*_
*_६. लाओस -_*
_*येथेही लग्नविधी पार पाडणारा विधी प्रमुख हा वधू पक्षाकडील एक ज्येष्ठ उपासक कि ज्याने आपले संसारिक जीवन अत्यंत यशस्वीपणे जगलेले आहे असा असतो. विधी प्रमुख वधूला वराच्या शेजारी बसवितो व प्रसंगोचितच सुत्त पठण करतो.* येथे उपस्थित निमंत्रीत सुत्त म्हणत नाहीत. *वधू-वराच्या मनगटावर पांढरा दोरा बांधला जातो व मंगल गाथेचे पठण विधी प्रमुख करतो. उपस्थितांपैकी ज्येष्ठ मंडळी पांढरा दोरा वधू-वरांच्या मनगटावर बांधतात व त्यांना आशिर्वाद देतात.* मग वधू - वर त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या जागेवर जाऊन बसतात. सर्वांना भोजन दिले जाते. नव दांपत्य सर्व उपस्थितांचे आभार मानते. यावेळी पाहुणे मंडळी पाकीटात पैसे घालून वधु -वरांना भेट देतात. या देशांत लग्नाचा सर्व खर्च हा वर पक्षातर्फे केला जातो. पण आता मात्र स्त्रि पुरुष समानाता वाढीस लागल्यामुळे लग्नाचा खर्च दोन्ही बाजूंनी मिळून करताता._
*_७. व्हिएतनाम -_*
_लग्नाच्या दिवशी वर व त्याचे नातेवाईक अगदी सकाळीच वधूच्या घरासामोर येतात. येथे ते रांगेत उभे राहतात. पुरूष सुटाबुटात असतात व प्रत्येकाने एक एक मोठा ट्रे हातात धरलेला असतो. ट्रेमध्ये फळे, केक, चहा दागिने इत्यादी असतात व त्यावर लाल रंगाचे कापड टाकलेले असते. या कपडयावर चिनी ड्रॅगन व फिनिक्स पक्षाची चित्रे काढलेली असतात. या सर्व भेटवस्तू वधू आणि तिच्या परिवारासाठी आणलेल्या असतात. पैकी एका ट्रेमध्ये वधूने लग्नात घालण्यासाठी एक पारंपारिक गाऊन असतो. ट्रे धरलेल्या पुरूषांच्या रांगेसमोर वधूच्या करवल्या येऊन रांगेत उभ्या राहतात. या रांगेत वधूमाता ही प्रमुख असते. पुरुष मंडळी मग एकेकाने पुढे येऊन आणलेल्या भेटवस्तू करवल्यांच्या हातात देतात. त्या वेळी वधूमाता या प्रत्येक पुरूषाला एक एक लाल रंगाचे पाकीट देते. त्यात काही पैसे असतात. नंतर सर्वजण हॉलमध्ये येतात. येथे वधूला लाल रंगाचा पोशाख (गाऊन) परिधान करुन आणतात. वधू वर बुध्द मूर्तीसमोर मेणबत्या, अगरबत्या पेटवून वंदना करतात. नंतर वधूच्या माता -पित्यांना वाकून अभिवादन करतात. माता पितासुध्दा त्यांना अभिवादन करतात._
_*वधू पिता वराला उद्देशुन असे जाहीर करतो की, "आम्ही आमची कन्या तुझ्या हवाली करीत आहोत." नंतर वधु पिता या नवदांपत्याला चहा देतो. हा विधी व्हिएतनामध्ये अतिमहत्त्वाचा मानला जातो.*_
_नवदांपत्य मग वराच्या घरी जाते. येथे वरमाता त्यांचे स्वागत करते. येथे वधू - वर बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करुन वंदन करतात. नंतर ते वरमातेला चहा अर्पण करतात. चहा प्यायल्यानंतर वरमाता वधूला आभूषणांनी सजविते. येथेच वधू - वर अंगठांची अदलाबदल करतात, नंतर रजिस्टर पध्दतीने कायदेशीर पध्दतीने कायदेशीर लग्न करतात, प्रत्येक निमंत्रित या नवदाम्पत्याला पाकिटात पैसे घालून भेट देतात._
_वरील काही बौध्द देशांमधील लग्नविधी पाहिल्यानंतर खालील महत्वाच्या बाबी आपल्या लक्षात येतील :-_
_१. *लग्नविधी पार पाडण्यासाठी बौध्द भिक्खू मुळीच उपस्थित राहत नाहीत.*_
_२. *लग्नविधीच्या अगोदर अथवा नंतर नियोजित वधू वर भिक्खूंचे आशिर्वाद घेण्यासाठी भिक्खू संघाला आदरपूर्वक घरी निमंत्रित करतात व त्यांना भोजन देऊन दान देतात. अथवा लग्नानंतर नवदांपत्य बुध्द विहारात जाऊन वंदना करुन भिक्खूंचे आशीर्वाद घेतात.*_
_३. भिक्खूंना देण्यात येणाऱ्या दानामध्ये अगरबत्या, मेणबत्या व पाकिटात घालुन पैसे यांचा समावेश असतो._
*_४. लग्नविधी एका ज्येष्ठ व आदरणीय उपासकाच्या हस्तेच पार पाडल्या जातो._*
_५. *लग्नविधीच्या स्टेजवर तथागत बुध्दाच्या मूर्तीची स्थापना केली जात नाही. तर लग्नानंतर किंवा अगोदर वधू वर बुध्द विहारात जाऊन बुध्दमूर्तीचे दर्शन घेतले.*_
_६. विधीप्रमुख प्रथम वधू-वरांची ओळख उपस्थितांना करुन देतो व नंतर फक्त यथोचितच सुत्त पठण करतो. त्याचप्रमाणे तथागत बुध्दांनी सांसरिक जीवन सुखी होण्यासाठी प्रतिपादलेली पती -पत्नींची कर्तव्ये नवदांपत्यांना सागतो._
_७. लग्नविधी हा त्या त्या देशातील सामाजिक रूढी व चालीरीतीप्रमाणे संपन्न होतो. म्हणूनच निरनिराळया देशातील लग्नविधीमध्ये भिन्नता दिसून येते. मात्र *कोणत्याही देशात भिक्खू लग्नविधी पार पाडत नाही.*_
_८. *लग्नविधी संपन्न झाल्यावर नवदांपत्यावर फुले वगैरे काही फेकले जात नाहीत. तसेच उपस्थितांना कशाचाही टिळा लावीत नाहीत. लग्नासाठी मुहूर्त वगैरे पाहिला जात नाही.*_
_९. विधीप्रमुख सुत्त पठण करीत असतांना उपस्थित लोक सुत्त म्हणत नाहीत. तर ते शांतपणे व आदरपूर्वक श्रवण करतात._
*_१०. लग्नाच्या अगोदर अथवा नंतर रजिस्टर्ड मेरेज करतात, अशीच पध्दत सर्वसाधरण पणे सर्वच बौध्द देशांमध्ये आहे._*
_आता आपल्याकडील लग्नविधी पाहू :-_
_प्रत्येक लग्नविधी हा वेगळ्या वळणाचा व वेगळ्या पध्दतीचा दिसतो. सर्वसाधारणपणे तो खालील प्रमाणे असतो._
१. _स्टेजवर तथागत बुध्दांची मुर्ती किंवा फोटो व बाबासाहेबांची मूर्ती किंवा फोटो एका छोटया टेबलावर ठेवतात._
२. _वधू वराला वरिल मुर्तीकडे तोंड करुन व उपस्थितांकडे पाठ करुन स्टेजवर बसवितात._
३. _स्टेजवर एका बाजुला खुर्च्यांवर भिक्खूगण बसतात. त्यांच्या हातात माईक असतो. ते मग खूप मोठ्या आवाजात त्रिशरण, पंचशील, त्रिरत्न वंदन, बुध्द पुजा पाठ, त्याच प्रमाणे अनेक सुत्तांचे पठण करतात. कोणकोणते सुत्त व काय काय म्हणावे हे त्या त्या उपस्थित भिक्खूंच्या मर्जीवर अवलंबून असतांना दिसते. जयमंगल अष्ठगाधा हि शेवटी म्हटली जाते. नंतर तीन वेळा साधू साधू साधू असे उच्चारताना कोणी कोणती कृती करावी हे माईकवरुन भिक्खू सांगतात ते असे असते_
अ. _पहिल्या साधूला वधूने वराच्या गळ्यात हार घालावा,_
आ. _दुसऱ्या साधुला वराने वधुच्या गळ्यात हार बघालावा, आणि_
इ. _तिसऱ्या साधूला उपस्थितांनी वधू-वरांस पुष्पवृष्टी करावी._
_वाजंत्रीच्या व फटाक्यांच्या कानठळी बसविणाऱ्या आवाजात उपस्थित मंडळी टाळ्या वाजवितात. नंतर पती पत्नीची कर्तव्ये वधू - वरांकडून वदवून घेतली जातात. येथे विधी संपतो._
_अशाप्रकारचा बौध्द लग्नविधी भिक्खूंनी कुठून शोधुन काढला हे शोधुन देखील कुठे सापडत नाही. काही ज्येष्ठ भिक्खूंना विचारले तर काहीच उत्तर मिळत नाही._
_आपण वर पाहिले कि, *कोणत्याही बौध्द देशामध्ये बौध्द भिक्खू लग्नविधी पार पाडीत नाही किंवा तेथे जात ही नाही.* याची प्रमुख दोन कारणे आहेत._
१. पहिले म्हणजे बौध्द तत्वज्ञानाप्रमाणे लग्न हि बाब निधर्मी (सेक्युलर) मानली जाते. म्हणून लग्नविधीसाठी कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी बौध्द साहित्यात उपलब्ध नाही. (हिंदू धर्मात लग्न ही धार्मिक विधी मानतात म्हणून तेथे खूप कर्म कांड असते.)
२. दुसरे कारण म्हणजे बौध्द भिक्खू हा पुजारी (भट) अथवा पुरोहित (प्रिस्ट) नव्हे. तर तो धम्म शिक्षक आहे.
_कोणत्याही बौध्द देशामध्ये लग्नासाठी मुहुर्त पाहिल्या जात नाही, कारण बौध्द तत्वज्ञानाप्रमाणे कोणताही महिना, दिवस अथवा कोणतीही वेळ शुभ वा अशुभ मानल्या जात नाही. (आपणही यातून योग्य बोध घ्यावा.)_
_*डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? :-*_
_पांढऱ्या दोऱ्याचा विधी, त्याच प्रमाणे स्टेजवर वधू-वरांनी कसे बसावे, कसे उभे रहावे, कोणते सुत्त म्हणावे. या संदर्भात डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले पत्र वाचावे. ते पत्र असे -_
_*१९५६ साली मुंबईचे व्ही. एस. कर्डक यांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेब लिहितात की, "विवाह समयी एक कोरे मडके पाण्याने भरून त्यात पाच पदरी दोरा सोडावा. हे मडके वधू-वरांच्या समोर एका स्टूलावर ठेवून वधू - वरांनी एकमेकांसमोर उभे राहावे. व त्या दोन्ऱ्याची एक एक टोक प्रत्येकी वधू-वरांनी धरावीत. नंतर मंगल सुत म्हटले जावे. जयमंगल अष्ठ गाधे ऐवजी मंगल सुत्ताचे पठण व्हावे." (संदर्भ - 'धर्मयान' वर्ष १ ले, अंक २.३, मे जून १९५७बाबांच्या पत्राचे पान नं. ११४.)*_
_ज्ञानसागर डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा देखिल येथे अपमान होत असतो. धर्मांतरानंतर दोन महिन्यांच्या आतच बाबांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौध्दांच्या अनेक विधींच्या संदर्भात डॉ. बाबासाहेबांच्या अमूल्य मार्गदर्शना पासून बौध्द समाज वंचितच राहिला. त्याच प्रमाणे धम्माचा योग्य रितीने व योग्य दिशेने प्रचार व प्रसार या संबंधात देखिल आपण बाबांच्या मार्गदर्शनापसून वंचित राहिल्यामुळे धम्म-शिक्षण व आचरणाच्या बाबतीत भटकलो आहोत._
_भ. बुद्धांनी धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिक्खू संघांची स्थापना केली आणि "चरथ भिक्खवे चारिक...... बहुजन हिताय बहुजन सुखाय" चा संदेश देऊन सर्व दिशांनी व सर्वदूर भिक्खूंचे भ्रमण होऊन अल्प काळातच बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार भारतभर झाला. हिच अपेक्षा आपण आपल्या वंदनिय भन्तेंजी कडुन करुया. सतत बौद्ध देशांना भेटी देणारे आदरणीय भन्ते देखिल लग्नविधी पार पाडताना दिसतात. धम्माच्या बाबतीत आपली वागणूक अथवा कृती ही धम्म विपरीत असू नये हिच कृती पुढे पक्की झाली तर एवढ्या वैज्ञानिक धम्माला विकृत रुप मिळेल. तसे होऊ न देण्याची काळजी घेणे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे._
No comments:
Post a Comment