✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_पालि व मराठी भाषेला अभिजात दर्जा पुढे काय?_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post_18.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
_जगभरात सहा हजारापेक्षा जास्त बोलीभाषा बोलल्या जातात. *त्यातील अनेक भाषा आज नष्टप्राय होत आहेत. त्या नष्ट का होत आहेत तर त्यातील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे त्याची लिपी अस्तिवात नसणे होय. तसेच त्या भाषा बोलणारे लोक उपलब्ध नसतील तर भाषा मृतप्राय किंवा लुप्त होतात.* त्याच बरोबर आज अनेक प्राचीन भाषा आधुनिक भाषात परावर्तीत झाल्या आहेत._
_आधुनिक भाषांच्या निर्मिती आधी ज्या अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या त्या प्राचीन भाषा उद्भव आहेत असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. सध्या बोलल्या जाणाऱ्या आधुनिक भाषा ह्या प्राचीन प्राकृत भाषांच्या पायावर उभ्या आहेत. प्राकृत, पालि व दक्षिणेकडच्या भाषांनी भारत देशाचा इतिहास रचला आहे._
*_प्राकृतातून सर्व भाषाची निर्मिती_*
_या भाषांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. *अभिजात (पालि संयम्भू) दर्जा मिळवण्यासाठी जे नियम आहेत त्यामध्ये एक नियम, ती भाषा किमान दोन हजार वर्ष जुनी असावी.* या निकषावर ह्या दोन्ही भाषा उतरल्यामुळे त्यांना हा दर्जा प्राप्त झाला. पालि भाषेला साधारणतः तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. दोन्ही भाषा ह्या प्राकृत भाषा असून त्या सामान्य लोकांच्या बोलीभाषा आहेत. त्यामुळे दोघींमध्ये बरेच साम्य आहे. त्याची निर्मिती प्राकृत भाषेपासून झाली आहे. *मराठीत शेकडा ८० टक्के शब्द पालितून आले आहेत.* दोघींचे व्याकरणसुद्धा सारखे आहे._
_जी संस्कृती जिवंत असते त्या संस्कृतीची भाषा कधीही मरत नाही. भले ती काळानुसार बदलत राहील कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. वैदिक भारतात येण्यापूर्वी भारतीय प्राकृत भाषा सुस्थापित होत्या आणि यातून दैनंदिन व्यवहार होत होते. भारतीय धर्म साहित्याचीही भाषा प्राकृतच होती. प्राकृतला स्वतंत्र अशी स्थानिक परंपरा असल्याने सिंधू काळातही याच प्राकृतचे प्राचीनरूप वापरात होते. याचा अर्थ सिंधू संस्कृतीचा प्रवाह केवळ धर्म, सांस्कृतिक व काही प्रमाणात व्यावहारिक गोष्टीपुरताच मर्यादित नव्हता तर तो भाषिक बाबतीतही होता. *प्रमोद पाठक म्हणतात 'पाश्चात्य विद्वानांनी संस्कृत आधीची व प्राकृत भाषानंतरच्या अशी केलेली मांडणी चुकीची आहे. वैदिक भाषेचे व्याकरण आणि शब्दसंग्रह अभिजात संस्कृतशी जुळत नाही तर प्राकृतशी जुळते, त्यामुळे संस्कृतमधून प्राकृतभाषा जन्माला आल्या हे मान्य करता येत नसल्याने रिचर्ड पिशेल यांनी सप्रमाण दाखवून दिलेले आहे. (प्रा. हरी नरके, प्रस्तावना, प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास, लेखक, संजय सोनवणी.)*_
_*आपल्या अंतःकरणातील अभिप्राय दुसऱ्या माणसाला समजून देण्याकरिता उच्चारला जाणारा जो ध्वनी त्याला भाषा असे म्हणतात. 'भाष्' या धातूपासून भाषा हा शब्द बनला आहे त्याचा अर्थ होतो, बोलणे.* जर ही भाषा नसती तर माणसाला आपल्या अंतःकरणातील विचार दुसऱ्या समोर व्यक्त करता आले नसते. *तसेच 'लिपी' हा शब्द लिंपणे म्हणजेच सारवणे या अर्थाने आला आहे.*_
_मराठी जशी अनेक प्रकारांनी बोलली जाते. १. पुणेरी २. कोकणी ३. मालवणी ४. कोंकणी ५. चित्पावनी ६. वऱ्हाडी ७. नागपुरी ८. खानदेशी ९. कारवारी._
*_प्राकृत भाषेचेही एकूण सोळा प्रकार आहेत. १. महाराष्ट्री (पुढे मराठी झाली) २. शौरसेनी ३. प्राची ४. अवंती ५. मागधी (पालि व अर्धमागधी) ६. शाकारी ७. चांडाली ८. शाबरी ९. आभिरिका १०. टाक्की ११. नागर १२. ब्राचड १३. उपनागर १४. कैकयी १५. पैशाची १६. पांचाली._*
_*प्राचीन पालि भाषेचे अवशेष हे आधुनिक भाषा हिन्दी, राजस्थानी, पंजाबी, बंगाली, उडिया, आसामी, मराठी इत्यादी बोलीभाषेत विशेष आढळून येतात. पालिभाषा ही वैदिक पूर्व प्राचीन भारतातील बहुजन समाजाची भाषा होती असे संशोधनार्थी दिसते.*_
_बुद्ध काळात छान्दस आत्ताची संस्कृत भाषा सुद्धा प्रचलित होती. परंतु संस्कृत भाषा ही त्याकाळी फक्त अभिजन वर्गाची अर्थात ब्राम्हणांची, ग्रंथांची, अधियन व अध्यापनाची, धार्मिक पूजाअर्चा व कर्मकांडाची पण रोजच्या व्यवहारात न बोलली जाणारी भाषा होती. ती बहुजनांची बोली भाषा कधीच नव्हती. याचा पुरावा म्हणजे जुन्या संस्कृत नाटकात ब्राम्हण पुरुष दुसऱ्या ब्राम्हणाशी संस्कृत मध्ये बोलतो तर आपल्या पत्नीशी प्राकृत मध्ये बोलतो. उपलब्ध काव्य, नाटक, शिलालेख प्राकृत भाषेतच आहेत. हीच आपली प्राचीन शिष्टाचाराची भाषा होती. राजभाषा होती. स्त्रियांनाच संस्कृत निषिद्ध असल्याने संस्कृत कोणाचीही मातृभाषा असण्याची शक्यता नव्हती. मग या भाषेचा अपभ्रंश होण्याने त्यातून प्राकृत भाषा निर्माण झाल्या, हा तथाकथित विद्वानांचा दावा हास्यास्पद आहे._
_*पण्डित हरगोविन्दास ती. सेठ म्हणतात 'संस्कृत भाषेची निर्मिती वैदिक भाषेतून झालेली नसून ती मध्यदेशातील प्राकृतपासून बनली आहे.'* जगातील सर्व आदी भाषा ह्या प्राकृतच आहेत. भाषेचा इतिहास म्हणजे संस्कृतीचा इतिहास असतो. *माणसंही भाषेच्या साह्याने संस्कृतीची जनुके एका पिढीकडून दुसऱ्या पिडीकडे पोहचवितात. (प्रा. हरी नरके, प्रस्तावना, प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास, लेखक, संजय सोनवणी.)*_
_वाक्पतीराज या आठव्या शतकांत होऊन गेलेला आपल्या महाकाव्यात म्हणतो की,_
_सायलाओ इम वाया विसंति एतो णेति वायाओ ।_
_एति समुदं चिय णेति सायराओ च्चिय जलाई ।_
_याचा अर्थ असा होतो की, 'सर्व नद्या समुद्राला मिळतात आणि समुद्राचे जल जसे बाष्परूपाने बाहेर जाते त्याप्रमाणे प्राकृत भाषेत सर्व भाषा प्रवेश करतात आणि प्राकृतातून सर्वभाषा निघतात.' मागधी व शौरसेनी यांचे ध्वनी उच्चार सारखे आहेत. *मागधी, अर्धमागधी व शौरसेनी आज निरनिराळ्या हिन्दीच्या उपबोली भाषांची जन्मदात्री आहेत.* याचमुळे हिन्दी भाषेचा विस्तृत पट्टा उत्तर भारतात आहे. *आजची बिहार मधील हिन्दी हे मागधीचे आधुनिक रूप आहे. मगधाच्या पश्चिमकडचा भाग व्यापणाऱ्या भाषेला अर्धमागधी म्हणतात. भगवान महावीरांनी याच भाषेतून आपला धमर्मोपदेश केला. श्वेताम्बारांचे बरेचसे वाङ्मय हे याच भाषेत आहे.*_
*_संतसाहित्याचे योगदान_*
_संतसाहित्याने प्राकृत भाषेत साहित्य निर्मिती करून तिला एक प्रकारचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांनी प्राकृत मराठीला प्रोत्साहन दिले. अभिजनांना प्रश्न विचारले, *संत एकनाथ म्हणतात की, 'संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरांपासून झाली?'* मराठी ही महाराष्ट्री प्राकृतच असून ती संस्कृत पासून जन्मलेली नाही. ती एक प्राचीन, समृद्ध आणि प्रतिष्ठीत भाषा आहे. अशी मांडणी प्रथम एकनाथांनी केली. *संत बहिणाबाई म्हणतात 'तुकारामांनी वेदांचा अर्थ प्राकृतातून सांगितला.' तर संत ज्ञानेश्वर मराठी ही भाषा 'अमृतातेही पैजा जिंकणारी आहे' असे सांगतात. रेड्या मुखी वेद उच्चारणे याचा प्रतिकात्मकरित्या अर्थ सामान्य जणांपर्यंत हे ज्ञान पोहोचवणे होय. ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर याच्या साहित्य लेखनात प्राकृत पालिचे अनेक शब्द जसेच्या तसे आले आहेत. हा त्याच्या वरचा प्रभाव आहे. उदा. पसायदान व करणीयमेत्त सुत्त अनेक साम्य स्थळे दिसतात. ज्ञानेश्वरीत ही पालि, प्राकृत शब्द आले आहेत.*_
*_पालि भाषा का शिकावी?_*
_मराठी आता आधुनिक काळाची भाषा आहे. ती महाराष्ट्र व आजूबाजूच्या प्रांतात मोठ्या प्रमाणात बोलली जाते पण मग पालिचे काय? ती तर कोणत्याही प्रदेशात बोलली जात नाही. सद्यस्थिती ती केवळ धर्मग्रंथाची भाषा बनून राहिली आहे. तर मग ही भाषा सामान्य लोकांनी का शिकावी? तिचा अभ्यास का करावा? तर पुढील चार गोष्टीसाठी अभ्यास करावा, शिकावी._
१. भाषाविज्ञान
२. इतिहास संशोधन
३. बौद्धधम्म
४. बौद्धतत्त्वज्ञान.
_सद्यस्थितीत पालि भाषेच्या अद्ययन, अध्यापन, संशोधन याबाबतीत जगभरात लोकांची उत्सुकता वाढत चालली आहे._
१. *भाषाविज्ञान :* _भाषाउत्पत्ती शास्त्रानुसार शब्दांची उत्पत्ती कशी झाली. आधुनिक भाषांचे शब्द मूळ कुठून आले, हे शोधण्यासाठी पालि भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्राकृत, संस्कृत व आधुनिक भारतीय भाषा यांना जोडणारा एक दुवा पालि भाषा आहे. कसे ते आपण पाहू._
१) पालि : चक्क, कम्म, मत्तिका, सोळ, सिक्खा, पानीय, नोनीत, केस
२) संस्कृत : चक्र, कर्म, मृत्तिका, षोडश, शिक्षा, पानीय, नवनीत, केश
३) मराठी : चाक, काम, माती, सोळा, शिकणे, पाणी, लोणी, केस
४) हिंदी : चका, काम, मिट्टी, सोलह, सिखना, पानी, +, +
अशारितीने शब्द कसे निर्माण झाले हे पाहण्यासाठी व बोली भाषांचे व्याकरण सारखेच असल्याने पालि भाषेचे अद्ययन आवश्यक झाले आहे.
२. *इतिहास संशोधन :* _भगवान बुद्धांनी धम्म, विनय, मातिका याचा उपदेश केला. पुढे जावून तेच सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक म्हणून प्रथम धम्म संगीतीत संपादित केले गेले. हे तिन्ही संग्रह तीन पेटीत किंवा टोपलीत वेगवेगळे ठेवले जात होते. यामुळेच त्यांना तिपिटक म्हटले जावू लागले. पण त्याकाळातील वाङ्मय श्रुती व स्मृतीच्या आधारे अखंड ठेवले जात होते. अर्थात मौखिक पद्धतीने सुरक्षित ठेवले जात असे. त्यामुळे या तिन्ही विभागांना पालन करून, रक्षण करून ठेवणारे साहित्याला तिपिटक म्हटले गेले. *हे साहित्य प्राचीन काळाच्या लोकभाषेत आहे. या भाषेने त्याचे पालन केले, रक्षण केले त्यामुळे ती पालि म्हटली जावू लागली. याचे कारण की, ज्या भाषेने बुद्धांच्या वाणीचे पालन केले, रक्षण केले. 'पा पलत्ती रक्खति पालि।' म्हणून पालि भाषा संबोधली गेली.* तिसऱ्या धम्मसंगीतीनंतर प्रियदर्शी अशोकाने धम्म विनयाला व पालि वाङ्मयाला भारताच्या सीमा ओलांडून ब्रम्हदेश (सुवर्णभूमी), श्रीलंका (लंकाद्वीप), थायलंड (सयाम) इ. देशात पोहचविले._
३. *बौद्धधम्म :* _प्राचीन पालि वाङ्मयातील उच्चकोटीतील नीतीमूल्ये, सोदाहरण विवेचन, मुद्देसूद युक्तिवाद, सोपी नितीतत्त्वे, बुध्दिवादी अन्वेषण पद्धती, खंडन मंडन वादविवाद पद्धत, नवांगानी नटलेले वाङ्मय, धम्मपद, सूत्तनिपाता सारखी गेय्य सुभाषितमाला इ. अनेक साहित्य प्रकारामुळे पालि वाङ्मयाने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हे सारे ग्रंथ तिन्ही धम्मसंगीतीमध्ये संगायन केले गेले. ते मौखिक पद्धतीने पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ जतन केले गेले. यानंतर श्रीलंकेत राजा वट्टगामिनी अभय याच्या काळात ते प्रथम लिपिबध्द झाले. हे सर्व वाङ्मय फक्त धार्मिक साहित्य नसून, मानवी जीवनाच्या सवींगाना स्पर्श करणारे मूळ भारतीय अस्सल वाङ्मय आहे._
_यात प्राचीन बुद्धकालीन समाज, संस्कृती, रूढी परंपरा यांचा समग्र संग्रह, इतिहास, भौगोलिक माहिती, तत्कालीन प्रदेश, जनपद, निगम, ग्राम यांची नावे, तत्त्वज्ञान, ते निर्माण करणारे विविध आचार्य, विविध संप्रदाय, अर्थव्यवस्था, श्रेणी, गण, सेट्ठी इ. व्यापारी समुहाची माहिती, व्यापारी केंद्रे, राजकीय व सांस्कृतिक केंद्रे, ज्ञानाची केंद्रे, भरभराटीला आलेली नगरे अर्थात वैशाली, श्रावस्ती, काशी यांचा सविस्तर अभ्यास करता येतो._
_हा पालि वाङ्मयाचा प्राचीन वारसा भारताला व एकंदर मानवी जीवनाला समृद्ध करणारा आहे. याच काळाला भारताचा सुवर्णकाळ असे म्हणतात. भारतीय इतिहासाचा हाच विश्वासार्ह स्रोत म्हटला जातो. यावर जम्बूद्वीपाचा अर्थात प्राचीन भारताचा समग्र इतिहास आधारित आहे._
४. *बौद्धतत्त्वज्ञान :* _या संदर्भात चार आर्यसत्य म्हणजे काय? याची माहिती करून देऊन दुःख निवारण्यासाठी मानवाने कोणते प्रयत्न केले पाहिजेत याचा अभ्यास करता येतो. यासाठी तिपिटक व तिपिटकेत्तर साहित्याची माहिती गोळा करून उपदेशांना अंगीकृत करण्यासाठी चालना मिळते._
_या अनुषंगाने जीवनमूल्ये व कौशल्यांचा समायोजन साधण्यास मदत होईल. विकसित होणाऱ्या जीवन कौशल्यांच्या प्रयत्नांमुळे सम्मादिट्ठि प्राप्त होवून सम्मासङ्कप्पोद्वारे प्रज्ञेचा विकास घडवून येईल. येथे सम्मादिठ्ठि, सम्मासङकप्पो, सम्मावाचा, सम्माकम्मन्तो, सम्माआजिवो, सम्मावायामो, सम्मासति व सम्मासमाधी याद्वारे शीलाचरणाचे महत्त्व समजेल. या सम्मावायामो, सम्मासती व सम्मासमाधीद्वारे समाधी अवस्थेचा सराव करून पायरी पायरीने त्यांचा विकास करण्यासाठी मानव प्रयत्न करण्यास प्रेरित होईल._
_चार अरियसत्याचा अभ्यास करताना आपण हे दुःख आहे, हे दुःखाचे कारण आहे, हा दुःखाचा निरोध आहे, हा दुःखाच्या निरोधाचा मार्ग आहे, हे यथाभूत जाणून घेणे आवश्यक आहे. ही चार अरियसत्य जो पर्यंत माणसाला सत्याची अनुभूती देत नाहीत, माणसाला सत्यवादी बनविण्यास जोपर्यंत सहाय्यकारी होत नाहीत. तोपर्यंत ती चार अरियसत्य मानवाच्या उपयोगी आहेत असे म्हणता येणार नाहीत. वरील सर्व गोष्टींसाठी पालि भाषेचे अद्ययन करणे आवश्यक आहे._
*_अभिजात (पालि संयम्भू) दर्जा मिळाला पुढे काय?_*
_*३ ऑक्टोबर २०२४ रोजी पालि बरोबर मराठीला अभिजात दर्जा मिळाला.* याने हे सिद्ध झाले की, ज्या दहा भाषांना आता पर्यंत अभिजात दर्जा मिळाला आहे. त्या संस्कृत पासून निर्माण झाल्या नसून स्वयंभू निर्माण झाल्या आहेत. याकरिता *पालि भाषा संविधानाच्या परिशिष्ट आठ मध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. तर केंद्र शासनाच्या अनेक सुविधा तिला प्राप्त होतील. याच बरोबर पालि भाषा ही २०१२ पर्यंत यूपीएसीला एक विषय म्हणून होती. परंतु ती त्यावर्षी यूपीएसीतून विदेशी भाषा म्हणून काढून टाकली गेली. याचे कारण दिले गेले की, २०११ च्या जनगणनेत पालि बोलणारे लोक भारतात नाहीत. ते श्रीलंका व म्यानमार, थायलंडची भाषा आहे. त्याची न्यायालयीन लढाई लढून ती जिकली आहे पण जनरेठा नसल्याने केंद्र सरकार अजून सुरु करण्याचा निर्णय घेत नाही. यासाठी पुन्हा जनरेठा दाखवावा लागेल. ही लढाई अधुरी आहे. हे पालि भाषेच्या प्रचार व प्रसारानेच होणार आहे.*_
*_पालि विद्यापीठाची निर्मिती होणे आवश्यक_*
_*१८ सप्टेंबर १९९७ मध्ये कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची महाराष्ट्र शासनाने स्थापना केली.* या आधी संस्कृत अभ्यासासाठी कोणतेही विद्यापीठ नव्हते. ह्या विद्यापीठातर्फे संस्कृत साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि अध्यापनाच्या व्यवस्थेसाठी अनेक विभागांतर्गत काम केले जाते आणि पदविका, स्नातक, स्नातकोत्तर पदवी, विध्यानिष्णात पदव्या प्रधान केल्या जातात. म्हणूनच या विद्यापिठाच्या स्थापनेनंतर २००५ साली संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला व तिच्या संवर्धनासाठी करोडो रुपयांची तरतूद झाली._
_*पालि भाषेला साधारणतः तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. बौद्ध धम्म ज्या ज्या देशात गेला पालि भाषाही गेली. त्या त्या देशातल्या लोकांनी तिला आपली धर्मभाषा म्हणून स्वीकारली. त्यांनी पालि साहित्याचे जतन आपापल्या भाषेत केले. यामुळे जगातील लोकभाषांचे महत्त्व वाढले आहे. पालि भाषेने लोकभाषेची प्रतिष्ठा वाढवली आहे. आज भारत देशातील बहुजन समाज मोठ्या प्रमाणात पालिभाषा अद्ययानाकडे वळत आहे. भारतातील अनेक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात पालिभाषा शिकवली जात आहे. प्रमाणपत्र पदविका कोर्स सुरु झाले आहेत. पालिभाषेत मोठ्या प्रमाणात संशोधन कार्य सुरु आहे. याला युजीसी नवी दिल्लीकडून फेलोशिप दिली जाते. याकरिता अद्यायन, अध्यापन, संशोधन याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.*_
_भारतीय लोकांत पालिभाषा जाणण्याची, शिकण्याची ओढ लागली आहे. यासाठी पालि विद्यापीठाची गरज निर्माण झाली आहे. या विद्यापीठामुळे पालि शिकणे, जाणणे, बोलणे अधिक सोपे होईल. भाषेच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकता येईल. पालि विद्यापीठामुळे बौद्ध तत्त्वज्ञान, संस्कृती समकालीन अनेक आचार्याचे विचार प्रवाह, समाजजीवन इ. चा अभ्यास करणे सोपे होईल. हे सारे प्राचीन विद्यापीठात विद्यमान होते. याकरिता असंख्य विद्यापीठाची स्थापना झाली होती. या विद्यापीठाच्या माध्यमातून पालि साहित्य, बौद्ध तत्त्वज्ञान, संस्कृती, कला, सभ्यता जतन केली गेली. या विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी भारतात येत होते. शिक्षण घेवून येथील पालिभाषा ग्रंथ घेवून आपापल्या देशात भाषा, साहित्य, कला, बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करतात. या धर्तीवर पालिभाषा व साहित्याचा अभ्यास करण्यासाठी पालि विद्यापीठाची आवश्यकता आहे._
_*पालि विद्यापीठ स्थापन झाल्याने साहित्य बरोबरच, बौद्धकला, मूर्तीकला, शिल्पकला, धातुकला, चित्रकला ही भारतातील उच्चकोटीच्या कलांचा अभ्यास होईल.* त्या अनुषंगाने या कलांचे संरक्षण होईल. पालि भाषा साहित्य हे मानवी संवेदनांचा आविष्कार असल्याने जगभर मानवतावादाचा प्रचार प्रसार होईल. जे आज युद्धजन्य परिस्थितीत जगाला आवश्यक आहे. पालिभाषा मानवी जीवनाला उन्नत, सुंदर, सुसंकृत व अर्थपूर्ण बनवणारी आहे. म्हणून या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी पालि विद्यापीठाची आवश्यकता आहे._
_*आधुनिक काळात या पालिभाषेला जाणण्यासाठी उत्सुक असणारा मोठा वर्ग भारतात निर्माण झाला आहे. याचे कारण पालिभाषेत असलेले धम्म उपदेश माणसाला प्रगतीच्या मार्गावर नेणारे आहे. हा धम्म विज्ञानवादी असल्याने आधुनिक काळाला साजेसे लोककल्याण याने साधता येईल. म्हणून पालिभाषेचे व पालिसाहित्याचे अद्यायन, अध्यापन करणे याकरिता पालिभाषेचे संरक्षण आवश्यक आहे. पालिभाषेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे, तर चला पाली करू वैभवशाली, पोहोचवू घर घर पाली.*_
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- *_प्रा. विजय मोहिते_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* १८/०४/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment