Thursday, 17 April 2025

पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/04/blog-post_17.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*सांप्रत काळी काही विद्वानांमध्ये खल सुरू आहे की बाबासाहेबांनी* बौद्ध वाङ्मयाचा जो अभ्यास केला व त्यावर आपली मनोभूमिका बनविली ते सारे ग्रंथ इंग्रजी होते. *मूळ पाली ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला नाही. याचे कारण बाबासाहेबांना पाली येत नव्हते,* असा धांदात आरोप केला जात आहे. त्यामुळे *बाबासाहेबांच्या बौद्ध वाङ्मयाच्या अभ्यासातील व त्यांनी मांडलेल्या बुद्ध आणि त्यांच्या धम्म यातील सिद्धांताविषयी त्रुटी व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही महाभागांकडून केला जात आहे.* प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. *बाबासाहेबांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता. इतकेच नव्हे तर त्यांना पाली भाषा अवगत होती. त्याबरोबर पाली भाषेच्या विकासासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करून पुस्तकही लिहिलं आहे. महाराष्ट्र शासनाने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज एन्ड स्पीचेस, खंड १६ (१९९८) या खंडात पाली व्याकरण, दोन प्रकारचे पाली शब्दकोश (त्यापैकी एक फक्त 'आ' स्वरापर्यंतचा आहे व बुद्ध पूजापाठ हे साहित्य छापण्यात आले आहे.) या लेखनामुळे बाबासाहेबांचा पाली भाषाविषयक आणखी एक पैलू लोकांच्या नजरेसमोर आला.*_

_आता पाली भाषेच्या उत्कर्षासाठी व बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ बाबासाहेबांनी केलेले योगदान पाहू. *दि. ८ मे १९५५ मुंबई नरे पार्क मैदानातील बुद्ध जयंतीच्या वेळच्या भाषणात बाबासाहेब सांगतात "मी धम्माचा संशोधक नाही, प्रचारक आहे." पुढे ते म्हणतात- "या धर्माचे संशोधन करणे माझे कार्य नाही. आपले मुख्य कार्य प्रचार करण्याचे, आम्हांला लोकांना बुद्धिष्ट करून घ्यावयाचे आहे."* त्यांच्या वरील वक्तव्यावरून आपणांस बाबासाहेबांचा संशोधनापेक्षा प्रचारावर अधिक भर होता. हे समजते. यासाठी ते *बंगलोर येथे धर्मशिक्षणाचे विद्यापीठ बुद्धिष्ट सेमिनरी उभारणार होते.* धर्मान्तरानंतर अवघ्या दोन महिन्यांत ते बांधून तयार करणार होते. *'सर्वसामान्य लोकात बुद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता प्रचारक तयार करणे हा विद्यापिठाचा मुख्य उद्देश होता. त्यांची अशी योजना होती की ह्या विद्यापिठात जात, धर्म, राष्ट्र, हा भेद न मानता विद्यार्थी घेतले जातील, त्यांना निरनिराळ्या धर्माचे तौलनिक ज्ञान करून इतर संबोधित विषय शिकविले जातील. तसेच चीन, जपान, ब्रम्हदेश, अमेरिका इत्यादी परदेशातूनही अभ्यासक बोलावणार होते. बौद्ध वाङ्गमय छापण्याकरिता विद्यापीठात एक छापखानाही चालविला जाऊन ग्रंथालय मंदिरे असा विभागही विद्यापीठात केला जाणार होता. बौद्ध धम्माचे मिशन सुरू केल्याशिवाय बौद्ध धम्माचा जगात प्रसार करणे अशक्यच ठरणार, असे बाबासाहेबांना वाटे.* शिक्षण प्रसाराइतकेच धम्मप्रसाराचे कार्य महत्त्वाचे आहे. असा प्रसार करण्यास मनुष्यबळ व पैशाचे बळ लागणारच लागणार, हा पैसा कसा व कोठून जमवावयाचा. तो बौद्ध धम्म ज्या देशातून आज जिंवत आहे. त्या देशातूनच हा पैसा उभा करावा लागणार असे आवाहन बाबासाहेबांनी केले होते. भारतात बौद्ध धर्मीय प्रचारासाठी त्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाचे सर्व भारतीय भाषांत भाषांतर झाले पाहिजे. यासाठी दिल्ली, मुंबई, मद्रास या शहरात बुद्ध विहार स्थापन करून प्रत्येक रविवारी लोकांच्या उपासनेची सोय करण्याचा आपण प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले._

_*बाबासाहेबांनी २० जून १९४६ मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. यात इंग्रजी बरोबर संस्कृत, पाली, अर्धमागधी, उर्दू, पर्शियन, फ्रेंच, जर्मन व मराठी ह्या भाषांच्या व विज्ञानाच्या सर्व शाखांच्या अध्यापनाची सोय करण्यात आली, असे शां. शं. रेगे आपल्या 'भीमपर्व' ह्या पुस्तकात लिहितात. याचा अर्थ १९४६ पासून सिद्धार्थ महाविद्यालयात पाली भाषा शिकविण्याची बाबासाहेबांनी सोय केली. याचबरोबर १९४७ साली स्वतंत्र भारताच्या पार्लमेंटमध्ये सदस्य असताना बौद्धधम्माच्या पुनरुत्थानासाठी भारतीय राज्यघटनेत पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली. याबरोबर राष्ट्रपतीच्या राजवाड्यावर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतील पहिलेच चरण धम्मचक्र परिवर्तन (धम्मचक्र प्रवर्तनाय) घातले आहे. तसेच भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोकचक्र हे धम्मचक्र भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले व जिथे शपथविधी होतो त्या हॉलला 'अशोक हॉल' नाव दिले.*_

_बाबासाहेबांचे बौद्ध धर्माचे वेड पुरातन होते. बौद्ध धम्माचे प्रति डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फार पूर्वीपासून आकर्षण होते, अशी आत्मस्वीकृती त्यांनी अनेक वेळा दिली आहे. तुमचा बौद्ध धर्माकडे ओढा का? हा प्रश्न नेहमी विचारला जाई. 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेबांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ज्या वर्षी इंग्रजी चौथ्या वर्गाची परीक्षा पास केली. त्या वेळी समाजातील लोकांनी अभिनंदनापित्यर्थ जाहीर सभा घेतली. या सभेत वडिलांचे मित्र *गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळूसकर गौतम बुद्धाचे चरित्र हा ग्रंथ त्यांना भेट दिला.  बाबासाहेब म्हणतात, "मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो." हा ग्रंथ वाचल्यानंतर बाबासाहेबांनी रामायण-महाभारतातील विषम व या समाजव्यवस्थेविषयी वडिलांना विचारणा केली. आपण आणि महाभारतातील पात्रांच्या वागणुकीची समीक्षा त्यांनी वडिलांना विनंती केली. बाबासाहेब या विषयी लिहितात. "माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड झाले आहे. अशा प्रकारे दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे गेलो नाही.* मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धांच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची माझी सुरुवात होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवघ्या १४ वर्षाचे होते. या बालवयातच बाळासाहेबांच्या हृदयावर बुद्ध प्रतिबिंबित झाले. हा प्रसंग त्यांनी अनेकदा वर्णन केला आहे._

_*१४ जानेवारी १९५५ साली वरळी येथे बौद्ध धर्म प्रचार समितीतर्फे भरलेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वपूर्ण भाषण केले.* या सभेला संत गाडगे महाराज उपस्थित होते. या भाषणात सुद्धा त्यांनी बालपणीच त्यांचा बौद्ध धर्माशी परिचय झाला असल्याचे सांगितले होते. *ते म्हणाले, "बौद्ध धर्मसंबंधी मला सांगावयाचे आहे. बौद्ध धर्माची माझी घोषणा आजकालची नसून मी चौदा वर्षाचा असताना बौद्ध धर्माशी माझा परिचय झाला. लहानपणी माझ्या अभिनंदनाप्रित्यर्थ जी पहिली सभा घेण्यात आली. तिचे अध्यक्ष श्री. दादा केळुसकर होत. त्या वेळेला मी सभेत काय वेडेवाकडे बोल बोललो ते मला आत्ता आठवतही नाहीत, भाषण संपल्यावर केळुसकरांनी गौतम बुद्धांचे छोटेसे चरित्र मला बक्षीस म्हणून दिले. रामायण महाभारतासारखे बरेच ग्रंथ मी वाचून काढले होते. तसेच हेही पुस्तक मी वाचले, परंतु बुद्धांची शिकवण व इतर ग्रंथाची शिकवण यात बरीच तफावत आहे, असे मला आढळून आले. पुढे पुस्तकासारखी नवनवीन पुस्तके जसजशी मी वाचू लागलो तसतसा माझ्या डोळ्यात नवा प्रकाश पडू लागला. बुद्ध धर्म कसा व हिंदू धर्म कसा, दोहोंत किती भेद आहे. निराळी दृष्टी आहे मला कळू लागले उच्च शिक्षणासाठी मी अमेरिकेलाही धर्माचा बराच अभ्यास केला. धर्म काय हे समजून घेण्याकरिता व बुद्ध चरीत्राने मनात उडविलेली खळबळ शमविण्याकरिता मी तेथे बरेच वाचन केले. बराच विचार केला तेव्हा हिंदू धर्म व बुद्ध धर्म यातील अंतर मला कळुन चुकले. बौद्ध धर्माचे माझे वेड पुरातन आहे. बालवयात रुजलेल्या बुद्धाचा, वाढत्या वयात बाचासाहेबांच्या हृदयात बोधिवृक्ष झाला ह्या बोधिवृक्षाची पाने म्हणजे पाली, तिला पालवी फुटण्यासाठी खतपाणी घातले म्हणूनच ते म्हणाले होते "बोधिवृक्षाच्या मुळांना पाणी घातल्यास ती वाढेल."*_

_*बाबासाहेबांना पाली व संस्कृत सम प्रमाणात येत होते. म्हणूनच त्यांनी धम्मपद व भगवदगीता यांची चिरफाड केली आणि पुढे हेही म्हटले की, 'गीता म्हणजे धम्मपदाची नक्कल'.* बाबासाहेबांना पाली भाषेचे ज्ञान होते. याचा आणखी एक सबळ पुरावा म्हणजे देहुरोड येथील भाषण. त्यात *कमळाला पाली भाषेत पांडुरंग असे म्हणतात,* असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले तुम्ही पंढरपुरुला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणत पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता. यावर हुज्जत चालू आहे. पण *माझा त्यांना खडा सवाल आहे की विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पाडुरंग कोण? याचे पहिल्यांदा उत्तर द्या. तो होता कुठे? त्याला पळविले कोणी! कोणी डुबविले? पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते. हे मी त्यांना सिद्ध करून देईन, पुंडलिक या शब्दापासून पांडुरंग हा शब्द झाला. पुंडलिक याचा अर्थ कमळ, तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राम्हणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. पाली भाषेत पुंडलिक म्हणजे कमळ होय आणि विठ्ठल हा शब्द सुद्धा पाली भाषेतील आहे. विट् + थल म्हणजे = विट्ठल असा शब्द बनला. याचा अर्थ विठ आहे स्थळ ज्याचे तो विठ्ठल, कारण बौद्ध स्तुप हे सारे विटांनीच बनलेले आहे. म्हणून "अठ्ठावीस युगे विठेवरीच उभा असे त्यासंबंधी म्हटले जाते. 'बुद्धवंस' ह्या ग्रंथात अठ्ठावीस बुद्धाचा इतिहास अंतर्भूत आहे.* समता, सहिष्णुता व स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धम्माचे अस्सल भारतीय धर्माचा परिचय देशवासीयांना व्हावा, ह्या हेतूने त्यांनी १९४८ साली 'पी. लक्ष्मी नरसूच्या एसेन्स ऑफ बुद्धिसम' ह्या अभ्यासपूर्ण ग्रंथाची द्वितीय आवृत्ती विवेचक प्रस्तावना स्वतः लिहून प्रसिद्ध केली. *बाबासाहेबांचे ग्रंथपाल शां. शं. रेगे यांनी 'भीमपर्व या पुस्तकात प्रसिद्ध बाबासाहेबांच्या वाङ्मयाविषयी असल्या जबरदस्त आकर्षणाचा किस्सा सांगितला.* तो असा. १९५० च्या में महिन्यात जागतिक बौद्ध परिषदेसाठी ते सिलोनला गेले. तेथील वास्तव्यात विद्यापीठाच्या ग्रंथालयात त्यांना बौद्ध धर्मावर विवेचक आणि माहितीपूर्ण लेख असलेल्या एका दुर्मिळ मासिकाचे बांधीव संच आढळले. त्यांनी ते वाचावयास उसने बगितले. पण ग्रंथालयातले ग्रंथ बाहेर नेता येणार नाहीत असे सांगितल्यामुळे ते निराश झाले. भारतात परत जाण्यास फक्त एकच दिवस होता. त्यामुळे हे दुर्मिळ ज्ञानवैभव प्राप्त होणे असंभाव्य होते. पण त्यांनी ह्या समस्येवर उपाय शोधलाच. त्यांच्याबरोबर दिल्लीच्या मंत्रालयातले त्यांचे टंकलेखक श्री. पिल्ले आलेले होते. बाबासाहेबांनी त्यांना मागे ठेवले आणि ग्रंथालयात बसून सर्व लेख टंकलिखित झाल्यावर मग भारतात येण्यास सांगितले. श्री. पिल्ले हे अत्यंत हुशार आणि अनुभवी लेखक होते. त्यांनी दोन दिवसात काम पूर्ण करून टंकलिखित दोन प्रती दिल्लीस नेल्या. बाबासाहेबांनी ते सुबक  घेऊन एक प्रत पुन्हा मुंबईत आले तेव्हा माझ्या स्वाधीन केले व दुर्मिळ लेखसंग्रहाचे हे सहा खंड जपून ठेवण्याबद्दल सांगितले. बौद्ध वाङ्मयाबद्दल त्यांची असलेली निष्ठा व ग्रंथासंबंधीची अतिव ओढ स्पष्ट होते._

_*अनागारिक धम्मपाल यांनी कलकत्ता विद्यापीठात पाली सुरू केले. १९९० साली मुंबई विद्यापीठात पाली चे अध्यापन सुरू झाले. धर्मानंद कोसंबी व त्यांचे तीन शिष्य  पी. बी. बापट, चि. व्ही. जोशी आणि एन. के. भागवत यांनी पुणे, बडोदा व मुंबईमध्ये पाली भाषेचे अध्यापन केले. चि. व्ही. जोशी यांचे 'मॅन्युअल ऑफ पाली' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. परंतु १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर संविधानात पालीचा अंतर्भाव केल्यावर पाली एक जिवंत भाषा म्हणुन भारतातील सर्व विद्यापीठात शिकविली जाऊ लागली. हे योगदान बाबासाहेबांचे आहे. म्हणूनच आधुनिक भारतात यु. पी. एस.सी. च्या परीक्षेसाठी पालीचा एक भाषा म्हणून समावेश करण्यात आला असून आता एम. पी. एस. सी. साठी सुद्धा विचाराधीन आहे. प्रशासकीय सेवा परीक्षेमध्ये 'पाली भाषेचा अंतर्भाव हा पाली भाषा जिवंत असल्याचा भक्कम पुरावा आहे.*_

_*"पापालति रक्खति पालि।" या बुद्ध वचनाचे पालन व रक्षण पाली भाषा करते आणि या पाली भाषेचे रक्षण बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी पाली व्याकरण, शब्दकोश व बौद्ध पूजापाठ है साहित्य ग्रंथबद्ध करून वर उल्लेख केलेल्या पाली विद्वांनासारखे महत्त्वपूर्ण योगदान पाली भाषेसाठी दिलेले आहे आणि खऱ्या अर्थाने प्रचारक म्हणून बौद्ध धम्म सर्वदूर पोचविण्यासाठी प्रयत्न केले. ते म्हणतात, "बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे. तुम्हीही स्वीकारा. नुसत्या अस्पृश्य समाजानेच तो स्वीकारून चालणार नाही तर साऱ्या भारताने व त्याबरोबर साऱ्या जगानेही बुद्ध धर्म स्वीकारावा, अशी माझी इच्छा आहे."*_

_थोडक्यात, *संविधानात पाली भाषेची नोंद, राष्ट्रपती भवनात 'धम्मचक्क पवत्तनाय' हे पाली बुद्ध वचन, सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालयात पाली भाषेच्या अध्यापनास प्रोत्साहन आणि पाली भाषेचे व्याकरण व शब्दकोश, तसेच बौद्ध पूजापाठावरील ग्रंथ हे बाबासाहेबांचे कार्य म्हणजे पाली भाषेच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांनी केलेली पायाभरणीच होय.*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- *_प्रा. विजय मोहिते*_ 

                  _*हा लेख २००८ चा आहे*_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १७/०४/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...