Wednesday, 15 January 2025

भदंत ञाणीसारजींचे उद्‌गार

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भदंत ञाणीसारजींचे उद्‌गार_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_28.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

(संगाई, ब्रह्मदेशाचे प्रसिद्ध भिक्षु सितगू सयाडो (भदंत आणीसारजी) पूज्य गोगन्काजींचे खूप मोठे प्रशंसक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पूज्य गोयन्काजींच्या अस्थी-विसर्जनाच्या वेळी ब्रह्मदेशातील रंगून, मचीना व मांडलेत हजारो लोक एकत्र झाले. मांडलेत शेकडो भिक्षु व भिक्षुणींनी धम्ममंडल विपश्यना केंद्रापासून पासून पमादी जेट्टी तटापर्यंत अस्थी कलशाच्या यात्रेत खालील गाथांचा सस्वर पाठ केला, पाच मोठ्या नावांवर स्वार होऊन इरावती नदीच्या मध्यभागात चारही बाजूंनी गोल घेरा बनवून सर्व लोकांनी एक हजार दीपक प्रवाहित करून श्रद्धांजली अर्पित केली. कलश यात्रा आरंभ करण्यापूर्वी केंद्रावर संघदानाचे आयोजन केले गेले होते. उपस्थित भिक्षुसंघ व गृहस्थांना संबोधित करत त्यांनी खालील शब्दात आपली श्रद्धांजली अर्पित केली.)

*_अनिच्चा वत सङ्खारा, उप्पादवयधम्मिनो ।_* 

*_उप्पज्जित्वा निरुज्झन्ति, तेसं वूपसमो सुखो ।।_*

_*खरोखर सारे संस्कार अनित्यच आहेत. उत्पन्न होणा-या सा-या स्थिती, वस्तू, व्यक्ती अनित्यच आहेत. उत्पन्न होणे व नष्ट होणे, हा यांचा धर्मच आहे, स्वभावच आहे. विपश्यना साधनेच्या अभ्यासाद्वारे उत्पन्न होऊन निरुद्ध होणा-या या प्रपंचाचे जेव्हा पूर्णपणे उपशमन होते पुन्हा उत्पन्न होण्याचा क्रम समाप्त होतो, त्याचेच नाव परम सुख आहे, तेच निर्वाण सुख आहे.*_

_कुशीनाराच्या दक्षिण-पश्चिम भागात जेव्हा भगवानांचे परिनिर्वाण होत होते तेव्हा तावतिंस देवलोका मधून शक्र (इंद्र) देवतांसह या पृथ्वीवर (मनुष्यलोकात) उतरले व भिक्षु संघासमोर याच गाथेचा पाठ केला. महाब्रह्मासह मोठ्या संख्येने ब्रह्मागणांनी एकत्र होऊन पुष्पांजली अर्पित केली. त्या दिवशी पुष्कळशा भिक्षूंचा संघ भगवानांना अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र झाला होता. ठीक याचप्रमाणे जसे आज आम्ही श्री गोयन्काजींना श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र झालो आहोत. आयुष्मान सारिपुत्र व महामोग्गल्लान पूर्वीच परिनिर्वाणास प्राप्त झाले होते. आयुष्मान महाकाश्यप जे शासनाचे काम पुढे नेणार होते. येऊ शकले नव्हते. त्यामुळे पार्थिव शरीराच्या दहन-क्रियेची जबाबदारी आयुष्मान अनुरुद्ध सांभाळत होते._

_तेव्हा महाब्रह्मा सहम्पतीने एका गाथेचा पाठ केला, देवराज शक्राने एका गाथेचा पाठ केला, भदंत अनुरूद्धांनी दोन गाथांचा पाठ केला, आयुष्मान आनंदांनी एका गाथेचा पाठ केला. या प्रकारे भगवानांच्या पार्थिव शरीराचे अंतिम दर्शन करत सर्व लोकांनी प्रणाम केला._

_आचार्य श्री गोयन्काजींचा मृत्यू मुंबई, भारतात झाला. तेथे त्यांचा दहन-संस्कार केला गेला. ते मांडलेचे नागरिक होते व त्यांचे आपल्या मातृभूमीवर खूप प्रेम होते. *ते म्यंमाच्या एका कट्टर हिंदू परिवारात जन्मले, परंतु नंतर विपश्यनेचे समर्थक व प्रबळ प्रचारक झाले.* विपश्यनेच्या प्रती त्यांची अगाध श्रद्धा होती कारण विपश्यनेने त्यांच्या दुःखांना दूर केले होते. विपश्यनेच्या प्रती त्यांची श्रद्धा दोन बाबींवर होती एक तर सयाजी ऊ बा खिन, ज्यांनी त्यांना सांसारिक चिंता व दुःखातून मुक्त केले होते व त्यांचे गुरु सया तै जी तसेच त्यांचेही गुरू भदंत लैडी सयाडो, ज्यांनी गृहस्थ आचार्य परंपरेचे द्वार उघडले._

_दुसरी बाब ही होती की श्री गोयन्काजी म्यंमाच्या भिक्षुसंघाच्या प्रती खूप कृतज्ञ होते, ज्यांनी या परंपरेला २५०० वर्षांपर्यंत शुद्धरूपात सांभाळून ठेवले. हे एक असे कार्य होते ज्याला साधारण ब्रह्मदेशी भिक्षुसंघ समजू शकला नाही, भारतीय गोयन्काजी याच्ये महत्व चांगल्या प्रकारे समजले. याच तथ्यांनी श्री गोयन्काजींना भारतात विपश्यना केंद्र स्थापन करण्याची प्रेरणा दिली व संपूर्ण विश्वात विपश्यनेच्या प्रचार-प्रसारासाठी प्रेरित केले. मी स्वतः ही गोष्ट श्री गोयन्काजींना सांगितली व अनेक प्रसंगी दुस-यांनाही सांगितले की सम्राट अशोकानंतर श्री गोयन्काजीच अशी व्यक्ती होती जिने धम्माचा प्रसार भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात केला._

_वस्तुतः मी त्यांना कमीत-कमी तीन वेळा म्हटले की आपण आधुनिक अशोक आहात. यावर ते म्हणाले, 'अशोकाशी माझी तुलना केली जाऊ शकत नाही. हो, त्याच मोठ्या परंपरेशी एकरूप होऊन मी आपले जीवन जगू इच्छितोः दोनदा त्यांनी असेच म्हटले, परंतु तिस-यांदा जेव्हा आम्ही दोघेही मुंबईच्या समुद्रतटावर फिरत होतो, तेव्हा पुन्हा मी त्यांची तुलना अशोकाशी केली, तेव्हा त्यांनी केवळ स्मित केले, ठीक याचप्रकारे जसे आपण या चित्रात पाहत आहात. मी त्यांना म्हटले की भारतात आज वीस ब्रह्मदेशी संघाराम आहेत, परंतु आपल्याप्रमाणे कोणीही एकही विपश्यना केंद्र स्थापित करू शकले नाही._

_हो, यापूर्वी आचार्य आयुष्मान महसी सयाडो व टांग पुलु सयाडॉनीच केंद्र स्थापित केली. त्यांच्यानंतर कोणाचीही तुलना गोयन्काजींशी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे म्हणतो की आपण आजचे अशोक आहात तेव्हा त्यांनी फक्त स्मित केले._

_ते म्हणाले की *भारत धम्माची जन्मभूमी आहे, परंतु आज शुद्ध धर्म येथून लुप्त झाला आहे. आम्हा सर्वांचे कर्तव्य ठरते की आम्ही त्याला पुनर्जीवित करावे.* मी मुद्दाम त्यांना विचारले की धम्माचे त्यांचे तात्पर्य काय आहे ? (धम्म म्हणजे त्यांना नेमके काय म्हणायचे आहे) ते म्हणाले की *धर्म एक अनुशासन आहे, एक विचारधारा आहे, एक विधी आहे, एक तंत्र आहे. जोपर्यंत सत्य लक्षात येत नाही, जीवन-मरणाच्या अंतहीन चक्रात सापडून दुःखमय जीवन जगत राहू.*_

_आदरणीय लोकांनो, गोयन्काजींचे जाणे अशोकाचे जाणे आहे. गोयन्काजी गेले, म्हणजे आधुनिक अशोक गेले. त्यांच्या जाण्यामुळे जगाचे दोन्ही डोळे गेले. जग आंधळे झाले. संपूर्ण जग दुःखी आहे, प्रभावित आहे- *इंग्रज, अमेरिकन, अरब इत्यादी सर्वच श्री गोयन्काजी असे होते जे कट्टर मुस्लिमालाही शिबिरात बसवायचे, जे हा विश्वास ठेवतात की फक्त अल्लाहचे वचनच सत्य आहे. त्यांनी या लोकांनाही आपल्या विपश्यना केंद्रात जागा दिली व इस्त्रायलच्या यहूदींनाही.* त्यामुळे मी म्हणतो की त्यांच्या जाण्याचा अर्थ आहे की अशोकाप्रमाणे एका धर्मदूताचे जाणे. एका अशा व्यक्तीचे जाणे जिने जगाला डोळे दिले. आता मला ही कलश यात्रा आरंभ करण्याची अनुमती द्या व यादरम्यान शक्राद्वारे गायल्या गेलेल्या त्या गाथेलाही समजून घ्या. *अनिच्चावत सङ्खारा...।*_

_सङ्खार कर्म, चित्त, ऋतू व आहाराचे मिश्रण आहे. तसेच भौतिक पदार्थापासून बनलेले हे भवनही अनित्य आहे. याला आम्ही धर्मगाव म्हणू शकतो कारण येथे धर्मोपदेश होतो. जर आम्ही येथे भोजनाची विक्री करू तर हे हॉटेल होईल. जर इथे राजा व राणी राहतील तर हा राजमहाल होईल. जर येथे सामानाची विक्री करू तर हा बाजार होईल. परंतु वस्तुतः हे आहे काय? हे विटा, लोखंड, लाकूड, सीमेंटचे मिश्रण आहे. हे घरही आहे, महालही आहे, प्राणी संग्रहालयही आहे व शौचालयही. हे सर्वांसाठी एकसमान आहे. चीनी, इंग्रजी, भारतीय, ब्रह्मदेशी, ब्रह्म, देव, कोंबडी वा कुत्र्यासाठीही. या सर्वांचे रूप, नाम व हेतू हे तिन्ही आहेत. या तिन्हीचे मिश्रण संस्कार आहेत. या तिघांचा गुण, धर्म, स्वभाव जसे वर म्हटले गेले, उत्पाद व व्यय आहे, बनणे व नष्ट होणे आहे. व्ययानंतर उत्पन्न होते व पुन्हा व्यय होतो. या प्रकारे हा क्रम अनंत चक्रवालांपर्यंत चालत राहातो._

_विपश्यना काय आहे? हा एक विधी आहे. आम्ही ध्यानाला आपल्या आत केंद्रित करतो, उत्पाद-व्ययाचा शोध घेतो. हे एक असे सत्य आहे जे आमच्या शरीराच्या आत अनुभव केले जाते. जे उत्पन्न होते ते नष्ट होते आणि नष्ट झाल्यानंतर पुन्हा उत्पन्न होते. *यदनिच्चं तं दुक्ख* जे अनित्य आहे ते दुःख आहे, म्हणजे जेथे अनित्यता आहे, तेथे दुःख आहे आणि जे अनित्य व दुःख आहे ते अनात्मच आहे. त्याला 'मी माझे' म्हणता येत नाही. त्यामुळे अनित्य, दुःख व अनात्म वेगवेगळे नाही. ते तिन्ही एकच आहेत. अनित्यता कशात आहे? उत्पाद व व्ययात. तर विपश्यनेत काय पाहतो ? जे सत्य आहे त्याला पाहतो. खरे सत्य काय आहे? या तीन मूळ बाबी- नाम, रूप व हेतू या तिन्ही मूळ बाबींवर ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे उत्पाद-व्ययाची क्रिया उजागर करणे आहे व यामुळे होणा-या दुःखाला समजणे आहे. याला समजल्यावर अनात्म समजते व हेही की आपण किती असहाय्य आहोत. आपला ताबा या तिन्हीवर मुळीच नाही. या प्रकारे ध्यान करण्यामु‌ळे नाम-रूपाने बनलेल्या या शरीराविषयीची आसक्ती हळूहळू कमी होऊ लागते. हेच आमच्या सर्वांच्या आतील सत्य आहे._

_या सत्याचे ज्ञान देणाऱ्या भगवान बुद्धांना प्रणाम करत देवराज शक्राने वरील गाथेने वंदन केले, याच प्रकारे इतर सगळ्यांनी आपली श्रद्धासुमन अर्पित केली. आम्हालाही श्रद्धासुमन अर्पित करतांना हेच म्हणायचे आहे की निर्वाण व संसारात फार अंतर नाही. निर्वाण आपल्यापासून तितके दूर नाही. याला एका उदाहरणाने समजा._

_इरावती नदीचे जल या किना-याच्या तटाला दुसऱ्या किनाऱ्याच्या तटाहून वेगळे करते. जेव्हा नदी भरलेली असते तेव्हा दोन्ही तटातील अंतर जास्त असेल. परंतु जेव्हा जलस्तर कमी होत जातो तेव्हा तटातील अंतर कमी होत जाते. शेवटी जेव्हा नदीत पाणी नसते तेव्हा दोन्ही तट एक होतात. दोन्ही तटांच्या मध्ये भिंत नसते, अडथळा नसतो. एका तटापासून दुसऱ्या तटाची यात्रा अखंड होते, सोपी होते._

_हे तथ्य खूप महत्वपूर्ण आहे. आम्ही आपल्या मनाला चित्तमळ-जलाने भरू नये. याच चित्तमळाने भरलेल्या जलराशीमुळे आम्ही त्या किनाऱ्याच्या तसल्या निर्वाणाला पाहू शकत नाही. निर्वाण वस्तुतः शरीरा (संसारा) च्या सोबतच चालते. चित्तमळाच्या कारणामुळे दोन वेगवेगळे तट दिसतात. विपश्यना या क्लेश-जलाला प्रज्ञारूपी माठाने बाहेर फेकत जाते. हे यावर निर्भर करते की एखाद्या विपश्यना केंद्रात जाऊन आपण दहा दिवसात किती जल बाहेर फेकले आहे. जलाला वाढू दिले नाही तर हळूहळू त्या तटाच्या जवळ जातच राहू. जेव्हा सर्व जल समाप्त होईल, तेव्हा दोन्ही तट एक होतील. संसार व निर्वाण एक होईल._

_जो वेळ माझ्याजवळ आहे त्यात येवढेच सांगू शकतो, आज आम्हाला आचार्य श्री गोयन्कार्जीच्या अस्थींचे विसर्जन इरावती नदीत करावयाचे आहे, तेव्हा त्यांना अंतिम प्रणाम करण्यासाठी आम्हीही या गाथेचा पाठ करूया. याव्यतिरिक्त अजून कोणताही पाठ नाही, कोणतीही कविता नाही. आम्ही केवळ याचाच पाठ करत राहू व आपल्या आतील अनुभूतींनाही पाहात राहू. *अनिच्चावत सङ्खारा...।*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_संदर्भ :- विपश्यना साधक, बुध्दवर्ष २५५८, आश्विन पौर्णिमा, ८ ऑक्टोबर, २०१४ वर्ष १ अंक ६_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १५/०१/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...