✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_'मोह' शब्दाचा खरा अर्थ_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_24.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
बसीन, म्यंमात राहातांना श्री गोयन्काजींनी आपल्या भावांना जे धर्मपत्र लिहिले त्याचे संक्षिप्त स्वरूप)
बसीन, ७-८-१९६८
प्रिय शंकर ! सीता ! राधे ! विमला ! धर्माच्या तत्वांना समजा !
_प्रिय शंकरने विचारले की हा *मोह काय आहे ?* आजच्या हिंदीत मोह शब्दाचा अर्थ जो केला जातो तो खरोखर खूप भ्रामक आहे. भगवान बुद्धांद्वारे पाली भाषेत उपदेशित 'मोह' शब्दाचा ज्या अर्थाने प्रयोग केला गेला आहे, त्यापेक्षा हा अर्थ फार वेगळा आहे. त्यामुळे याबाबत भ्रम उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. आज जेव्हा आम्ही म्हणतो की अमुक व्यक्तीला रुपये-पैशांचा खूप मोह आहे, तर या मोहाचा साधा सरळ अर्थ आसक्ती आहे. परंतु *भगवानांनी आसक्ती, द्वेष व मोह तीन वेगवेगळी बंधन सांगितलेली आहेत.* मोहाचा अर्थही जर आसक्तीच असेल, तर मग दोनच बंधन म्हणावयास पाहिजे होती, तीन बंधन म्हणण्यात काही अर्थ नव्हता. परंतु भगवान कधीही निरर्थक गोष्टी करत नाहीत. भगवानांच्या उपदेशात अशी चूक दिसून येत नाही._
_*पाली ग्रंथांच्या अध्ययनाने मोह शब्दाचा जो अर्थ दिसून येतो, तो आहे मूढता, मूर्खता, पशुता व मिथ्यादृष्टी. एखाद्याच्या प्रती आसक्त होणे व लोभ येणे, हे आसक्तीचे बंधन आहे. परंतु असत्याला सत्य समजणे, साराला निस्सार व निस्साराला सार समजणे हाच मोह आहे, हीच मूढता आहे, हीच मिथ्यादृष्टी आहे. जोवर कोणी व्यक्ती अनित्याला नित्य समजत राहील, दुःखाला सुख समजत राहील, अनात्माला आत्म समजत राहील, तोवर ती शीलवान व समाधीवान होऊनही, आसक्ती व द्वेषाच्या सर्व बंधनांतून मुक्त होऊनही, मोहाच्या कठीण बंधनांनी बांधलेलीच मानली जाईल.*_
_माझ्या नजरेत दोन प्रकारचे लोक मोहाच्या बंधनात बांधलेले असतात. एक खूप खालच्या श्रेणीचे लोक, ज्यांना धर्माच्या साधारण स्वरूपाचेही ज्ञान नसते. ते मोहाच्या लोखंडासारख्या शृंखलेने बांधलेले असतात. दुसरे असे लोक ज्यांना एका सीमेपर्यंत धर्माचे ज्ञान असते, परंतु वास्तविक परमार्थ धर्माच्या क्षेत्रात कोरे असतात. त्यांचे मोहाचे बंधन लोखंडी शृंखलेसमान नसते, तर रेशम व नायलॉनच्या धाग्यांप्रमाणे असते; जे पाहाण्यात खूप प्रिय वाटते, परंतु आहे इतके कठीण व मजबूत की यापासून सहज सुटका होऊ शकत नाही. कारण बंदी या बंधनांना बंधनच मानत नाही, शृंगार मानतो व त्यालाच धर्म मानून प्रसन्न राहतो, संतुष्ट राहतो. म्हणूनच हे बंधन तुटणे अधिक कठीण आहे. लोकात कधी कोणी 'प्रत्येक बुद्ध' उत्पन्न होतो, तेव्हा तो आपले असे बंधन स्वतः तोडतो. अथवा *जेव्हा कधी कोणी 'सम्यक संबुद्ध' उत्पन्न होतात, तेव्हा ते न केवळ आपलेच बंधन तोडतात, तर असंख्य प्राण्यांना आपले आपले बंधन तोडण्याचा मार्ग दाखवतात. जोवर त्यांचा सांगितलेला मार्ग धर्मशासनाच्या रूपात जीवित राहतो, तोवर लोकांचा बंधन तोडण्याचा मार्गही मोकळा राहतो.*_
_येथे मी विस्ताराने सांगतो की मोहाची दोन प्रकारची बंधन कोणती आहेत ? तसे तर दोन्ही अवस्थेत मनुष्य अनित्याला नित्य समजतो, दुःखाला सुख समजतो व अनात्त्माला आत्म समजतो._
_प्रथम खालच्या प्रकारच्या मोह बंधनात बांधलेल्या व्यक्तीची दशा पाहा -_
_अशी व्यक्ती मोहाच्या म्हणजे मूढतेच्या आवरणात बांधली जाऊन या बाबीला विसरते की ती जन्मली आहे तर एक दिवस मरणारही आहे, तिचे जीवन अनित्य आहे. तिने जी धन-संपदा एकत्रित केली आहे, तिही अनित्य आहे, एक दिवस समाप्त होणारी आहे, सदैव राहाणारी नाही. मोहाच्या बंधनात बांधलेली ती व्यक्ती या अनित्य अवस्थेला नित्य मानते. याच प्रकारे कामभोगाद्वारे उत्पन्न होणा-या दुःखांना ती सुख मानते. वस्तुतः सर्व इंद्रियतत्व विषयांच्या सेवनात शेवटी दुःखच सामावलेले आहे परंतु या दुःखांना ती सुख मानते सांसारिक दुःखांना ती व्यक्ती दुःख न समजता उलट सुख मानून त्यामागे धावते. तिसरे देहात्म बुद्धिमुळे वशीभूत होऊन ती व्यक्ती या भौतिक शरीरालाच आत्मा मानून इतक्या सखोल अहंभावात जखडलेली राहाते की तिच्या अंतरीचा 'मी व माझे' चा आत्मभाव निघूच शकत नाही. प्रत्येक बाबीत 'हे माझे आहे, मी अशी आहे, माझा सन्मान झाला, माझा अपमान झाला' इत्यादी. या प्रकारे पोकळ आत्मवादी अहंभावात जखडलेली राहाते. अनात्माला आत्म मानीत मोहाच्या बंधनात बांधलेली राहाते. हे झाले खालच्या स्तरावरील मूढ प्राण्याचे, जो मोहाच्या स्थूल-स्थूल बंधनांनी जखडला राहातो. अशा व्यक्तीचे असे मोहाचे बंधन जेव्हा कधी लोकात कोणी सामान्य महापुरुष उत्पन्न होतो, तेव्हा त्याच्या सप्रयत्नाने, सदुपदेशाने तुटते. कधी-कधी जीवनात अनेक धक्के खाऊनही अशी व्यक्ती स्वतः आपल्या ज्ञानानेच मोहाच्या या मोठ्या बंधनांना तोडते._
_आता आम्ही मोहाच्या उच्च बंधनांना पाहू._
_ही जितकी उच्च आहेत तितकीच सूक्ष्म आहेत. मोहाची ही सुक्ष्म बंधन सहजासहजी तुटू शकत नाहीत. कारण ही दिसण्यात खूप प्रिय दिसतात, सुंदर दिसतात, त्यामुळे अधिक मोहक आहेत व अधिक दृढ आहेत. अशा दृढ बंधनात बांधलेली *व्यक्ती या बाबीला समजू शकत नाही की 'नाम' व 'रूप' यांच्या संयोजनाने बनलेले हे प्राणीतत्व प्रतिक्षण नष्ट होत आहे, क्षण-क्षण भंग होत आहे.* मोठ्यात मोठ्या पशुंपासून ते सूक्ष्मात सूक्ष्म ब्रह्मलोकांपर्यंतचे सर्व प्राणी अनित्य आहेत, नाशवान आहेत, मरणधर्मा आहेत. ती मोह-मूढतेच्या अंधकारवश अशा मिथ्या मान्यतेत गुंतलेली राहाते की अमुक लोक अमर आहे, अमुक प्राणी अमर आहे... इत्यादी. या प्रकारे सर्व जड-चैतन्य प्रकृती व प्राणी समूह जो वस्तुतः भिन्न-भिन्न कारणांनी उत्पन्न होणारा आहे व नष्ट होणारा आहे आणि जो खरोखर परिवर्तनशील आहे. त्यात एका नित्य, शाश्वत, ध्रुव सत्येचे आरोपण करणेच मोह आहे, मूढता आहे, वंचना आहे, फसवणूक आहे, माया आहे, मिथ्या दर्शन आहे._
_याच प्रकारे मोहाचे एक अजून रेशमी बंधन दुःखाला सुख मानणे आहे. इंद्रिय आनंदाला परमानंद व ब्रह्मानंद मानणे आहे. ज्या प्रकारे हा मोहग्रस्त प्राणी आपल्या मिथ्यादृष्टीमुळे शरीराच्या अंग-अंगात भासमान अनित्य चैतन्याला नित्य व शाश्वत मानतो, त्याच प्रकारे ध्यानजन्य सुख-आनंदालाही शाश्वत परमानंद मानतो. अशी व्यक्ती एखाद्या मंत्राच्या बळावर अथवा अन्य एखाद्या आलंबनाच्या बळावर चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करते. विचार व वितर्काने परिपूर्ण प्रथम ध्यानाच्या अवस्थेतून जरा उंच उठते आणि दुस-या ध्यानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचता-पोहोचता तिचे विचार शांत होतात._
_त्यानंतर ध्यानाच्या तिस-या अवस्थेत पोहोचता-पोहोचता त्याचे वितर्कही शांत होतात. आता तो सविचार, सवितर्क व सविकल्प समाधीच्या अवस्थतून वर जात निर्विकार, निर्वितर्क व निर्विकल्प समाधीला प्राप्त करतो म्हणजे तृतीय ध्यान समापत्तीत प्रतिष्ठित होतो. या तृतीय ध्यानापर्यंत पोहोचतांना संपूर्ण प्रवासात त्याच्या अंतरी सुख व प्रीतीच्या म्हणजे आनंदाच्या लहरी उठतात. तिस-या ध्यानाच्या अवस्थेत पोहोचून तर ही आनंद अवस्था अत्यंत तीव्र होते. चित्ताची एकाग्रताही स्थिर, अचंचल होते. केवळ प्रीतीसुखाचाच अनुभव होतो. आनंदच आनंदाचा अनुभव होतो. हे सत्य आहे की तृतीय ध्यानजन्य या निर्विकल्प अवस्थेत चित्त या प्रकारे अकंप व अचंचल होते की बाकी पाचही इंद्रिय जसे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा जवळपास काम करणे बंद करतात. परंतु तरीही चित्तरूपी सहावे इंद्रिय कायम राहाते व या चैतसिक आनंदाची अनुभूती करत राहाते. त्यामुळे हा आनंदही ऐंद्रिय आनंदच आहे, इंद्रियातीत नाही व त्यामुळे क्षण-क्षण परिवर्तनशील आहे, नाशवान आहे. त्यामुळे याच्या गर्भातही दुःखाचे बीज सामावले आहे. अशा चैतसिक, ऐंद्रिय, अनित्य आनंदाला अतींद्रिय आनंद मानून जी व्यक्ती यालाच अमर तत्व समजते, ती मोहाच्या रेशमी परंतु दृढ धाग्यांनी बांधलेलीच आहे._
_या निर्विकल्प अवस्थेत पोहोचलेला योगी अशा मिथ्या मोहात फसला गेला, हे तर कसेतरी समजून घेता येईल, परंतु अधिकांश साधक तर सविचार, सविकल्प, सालंब ध्यानाच्या प्रथम व द्वितीय अवस्थेतच ज्या थोड्याशा प्रीतीसुखाचा अनुभव करतात, त्यालाच नित्य, ध्रुव, शाश्वत, परमानंद व ब्रह्मानंद मानून भ्रमित होऊन फिरतात. ते जाणत नाहीत की प्रतिक्षण भटकते मन, वा-याच्या वेगाने प्रकंपित दिव्याच्या ज्योतीसमान अस्थिर मन, जेव्हा कोणत्याही ध्यान साधनेद्वारे एकाग्र होऊ लागते, तेव्हा त्या थकलेल्या मनाला विश्रांती मिळाल्यामुळे त्याला सुखाचा अनुभव होतो. शरीराचा रोम-रोम पुलकित होतो. जेव्हा ध्यान अधिक एकाग्र होते तेव्हा येत्या जात्या श्वासावर मन टिकल्यामुळेही सुख जाणवू लागते, आनंद पाझरू लागतो. त्यानंतर जेव्हा हे टिकलेले चित्त संवेदनांचे अवलोकन करता करता सा-या शरीरात पुलक रोमांच येऊन ते चेतनामय होते तेव्हा साधक यालाच तो अमृत रस मानतो, अमर तत्व मानतो. या लोकीय आनंदाला लोकोत्तर आनंद मानतो. हेच मोहाचे दुसरे रेशमी बंधन आहे._
_याच प्रकारे मोहाच्या तिस-या रेशमी बंधनात बांधलेली व्यक्ती या आत्मदृष्टीत गुंतलेली राहाते की मी तर अमरच आहे. अशी व्यक्ती वर सांगितल्या गेलेल्या तृतीय ध्यान अवस्थेलाच आत्मसाक्षात्त्कार मानून, परमानंद, आत्मानंद इत्यादी मानून, तिलाच जीवनाचे अंतिम लक्ष्य मानते. तिलाच परम मुक्त अवस्था मानते. वस्तुतः ती ज्या स्थितीचा अनुभव करते, ती विज्ञान, वेदना. संज्ञा व संस्कार रूपी चित्ताचीच एक शांत अवस्था आहे. यापेक्षा जास्त काहीही नाही._
_अशी व्यक्ती आसक्ती व द्वेषाचे नितांत निवारण केल्यावरही, मोह, मूढतेचे पूर्वी सांगितलेले स्थूल-स्थूल बंधन तोडल्यावरही, मोहाच्या ह्या तिस-या रेशमी परंतु दृढ बंधनात बांधलेली राहाते. त्यामुळे कधीही मुक्त अवस्था प्राप्त करू शकत नाही आणि संसार चक्रात गुंतलेलीच राहाते. अशा लाखो-करोडोंपैकी एखादीच व्यक्ती आपल्याच पराक्रमाने अनित्य, दुःख व अनात्म स्थितींना आपल्या योग्य रूपात पाहून समजून 'प्रत्येक बुद्ध' होते. ती निर्वाण रूपी मुक्ती प्राप्त करते अथवा लोकात 'सम्यक संबुद्ध' उत्पन्न झाल्यावर बुद्ध शासनाच्या संपर्कात येऊन अरहंत्व प्राप्त करून निर्वाण पद लाभी होते. परंतु बुद्ध शासन कायम असतांनाही सर्वच लोक त्याच्या संपर्कात येऊन आसक्ती, द्वेषासह या मोहाच्या बंधनांनाही तोडू शकतील, असे संभवत नाही. ज्या लोकांची पूर्व जन्मांची पारमी प्रबळ असते, तेच बुद्ध शासनात अमरत्व पान करू शकतात. बाकी लोक तर अन्य मार्गात पडून गुंतागुंतीच्या बंधनातच अडकून बांधलेले राहून चक्करग्रस्तच राहातात. म्हणूनच *भगवानांचा मार्ग सर्वात श्रेष्ठ आहे. कारण तो अन्य मार्गाप्रमाणे केवळ आसक्ती व द्वेषालाच दूर करत नाही तर मोहालाही मुळापासून काढून फेकतो.*_
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_बुद्धवर्ष २५५८, फाल्गुन पौर्णिमा, ५ मार्च, २०१५ वर्ष १ अंक ११_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २४/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment