✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_सम्यक दृष्टी (सम्मादिट्ठि)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_23.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
(श्री गोयन्काजींनी म्यंम्यातून परिवारातील लोकांना लिहिलेले धर्म-पत्र) रंगून, ५-६-१९६८, धर्मचारी बना !
_जेव्हा आम्ही म्हणतो की जीवनात सम्यक दृष्टी ठेवली पाहिजे, तेव्हा सम्यक दृष्टीचा एक अर्थ हाही होतो की प्रत्येक बाबीला योग्य प्रकारे तपासून पाहावे व समजावे, जी बाब जशी आहे, तिला तसेच पहावे - न वाढवून, न घटवून. *नेहमी होते असे की लोक अतिशयोक्ती करू लागतात, हीच मिथ्या दृष्टी आहे.*_
_आमच्या अतिशयोक्तीमुळेच कोणी आपल्या स्वतःला खूप उच्च मानू लागतो, तर कोणी अत्यंत हीन भावनेला बळी पडतो. याला स्पष्ट करण्यासाठीच भगवानांनी ब्राह्मण व शूद्रांच्या विषयी या प्रकारे म्हटले आहे -_
*_न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो ।_*
*_कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो ।।_*
*_(सुत्तन्तनीति-२१-२२, वसलसुत्तं)_*
*_- कोणीही जन्माने न वृषल म्हणजे चांडाळ असतो आणि न कोणी जन्माने ब्राह्मण होतो. कर्मानेच वृषल होतो व कर्मानेच ब्राह्मण होतो._*
_वृषल सूत्तात भगवानांनी सांगितले आहे की वृषल तो आहे जो क्रोधी आहे, द्वेषी आहे, ईर्षाळू आहे, मायावी आहे, निर्दयी आहे, हिंसक आहे, अत्याचारी आहे, चोर आहे, लुटारू आहे, अफरातफर करणारा आहे, ऋण घेऊन न फेडणारा आहे, डाकू आहे, खोटी साक्ष देणारा आहे, व्यभिचारी आहे, वृद्ध आई-वडिलांची अवहेलना करणारा आहे, मोठ्यांचा अनादर करणारा आहे, कपटी आहे, पापकर्म करून लपवणारा आहे, दुस-यांच्या वस्तू प्राप्त करण्यासाठी खोटे बोलणारा आहे, खोटी आत्मप्रशंसा करणारा आहे, खूप खाणारा आहे, खूप झोपणारा आहे, आळशी आहे, कंजूष आहे, मूर्ख आहे, वाईट काम करतांना न लाजणारा, न भिणारा आहे; जो सत्पुरुषांची व सत्य धर्माची निंदा करतो, धर्म न जाणताही व न पालन करताही जाणण्याचा व पालन करण्याचा खोटा देखावा करतो तो व्यक्ती वृषल आहे, चांडाळ आहे, नीच आहे; मग तो जरी एखाद्या ब्राह्मणीच्या पोटातून जन्मला असेल किंवा अन्य एखाद्या स्त्रिच्या पोटातून जन्मला असेल._
*_न जच्चा ब्राह्मणो होति, न जच्चा होति अब्राह्मणो।_*
*_कम्मुना ब्राह्मणो होति, कम्मुना होति अब्राह्मणो ।।_*
*_(म.नि. २४६०, ब्राह्मणसुत्तं)_*
*_- न जन्माने कोणी ब्राह्मण होतो आणि न जन्माने अब्राह्मण, कर्मानेच ब्राह्मण होतो आणि कर्मानेच अब्राह्मण._*
_*या प्रकारे भगवानांनी ब्राह्मणाचे गुण सांगतांना म्हटले ब्राह्मण तो आहे जो आपल्या तृष्णेच्या स्त्रोताला कापून टाकेल, प्रयत्न करून कामनांना दूर करेल, संस्कारांचा क्षय करेल, समथ व विपश्यना साधनेचा निरंतर अभ्यास करेल, निर्भय असेल, अनासक्त राहील, जो निर्मळ असेल, ध्यानी असेल, समतेचे आचरण करणारा असेल, अहिंसक असेल, शांत असेल, इंद्रिय संयमी असेल, मन, वाणी, शरीराच्या दुष्कृत्यापासून दूर असेल, सत्यवान असेल, धैर्यवान असेल, एकांतप्रिय असेल, असंग्रही असेल, असंचयी असेल, त्यागी असेल, क्रोधरहित असेल, सहिष्णू असेल, क्षमाशील असेल, प्रज्ञावान असेल, बुद्धिमान असेल; तो मार्ग-अमार्गाला व सत्य-असत्याला जाणणारा असेल, सर्व चर-अचर प्राण्यांच्या प्रती मैत्री विहार करणारा असेल, करुणा विहार करणारा असेल, मुदिता विहार करणारा असेल, तो मान, मृक्ष व मोहापासून दूर असेल, मितभाषी असेल, मधुरभाषी असेल, सत्यभाषी असेल, संशयरहित असेल, भयरहित असेल, शोकरहित असेल, बंधनरहित असेल, चित्तमळरहित असेल, असाच व्यक्ती खऱ्या अर्थाने ब्राह्मण आहे, मग तो एखाद्या ब्राह्मणीच्या पोटातून जन्मला असेल किंवा अन्य एखाद्या स्त्रिच्या पोटातून.*_
_हीच दृष्टी सम्मादिट्ठि आहे, सम्यक दृष्टी आहे, सत्य दृष्टी आहे. मनुष्या-मनुष्यात उच्च-नीचाचा भेद तर असतोच, ज्याला कोणी थांबवू शकत नाही. खोट्या समतेचा नारा लावणारे राजनीतीज्ञही नाहीत. परंतु हा उच्च-नीचतेचा भेद कोणत्या मापदंडाने मोजण्यात यावा ? *भगवानांनी स्पष्ट केले की जो शील, समाधी, प्रज्ञेने संपन्न आहे, तो उच्च आहे, तोच महान आहे. जो शील, समाधी, प्रज्ञेने हीन आहे, तो निश्चितच नीच आहे. परंतु याचा अर्थ हा नाही की सद्धर्मात समतेला स्थानच नाही. मानव आपल्या प्रगतीसाठी सद्धर्मात समान रूपाने प्रेरणा प्राप्त करतो, समान संधी प्राप्त करतो.* अतिपापी, अतिनीच व्यक्तीसाठीही प्रगतीचे क्षेत्र पूर्णपणे खुले आहे. *सद्धर्माचे पालन करून जो शीलवान नाही, तो शीलवान बनू शकतो. जो समाधीवान नाही, तो समाधीवान बनू शकतो. जो प्रज्ञावान नाही, तो प्रज्ञावान बनू शकतो.* सद्धर्मात मानवी समतेचा हाच मंगल घोष आहे. येथे कोणी यासाठी जन्मभर नीच व पतित राहात नाही की तो एखाद्या नीच जातीत जन्मला आहे. तसेच कोणी केवळ यासाठी जीवनभर पूज्य मानला जाऊ शकत नाही की तो एखाद्या उच्च समजल्या जाणा-या घराण्यात जन्मला आहे. जन्मभर पतित राहाण्याची अथवा जन्मभर पूज्य राहाण्याची मिथ्यादृष्टी सद्धर्माला मान्य नाही. *प्रत्येक मानवाला त्याच्या नैतिक आचरणानुसार उच्च वा नीच मानणे हीच सम्यक दृष्टी आहे.*_
_सम्यक दृष्टीविषयी बोलतांना अजून एका मिथ्यादृष्टीकडे लक्ष गेले. हे निर्विवाद सत्य आहे की इंद्रिय जगताच्या साऱ्या वस्तू अनित्य आहेत. डोळ्यांनी जे रूप दिसते, कानाने जो शब्द ऐकू येतो, नाकाने जो काही वास घेतो, जिभेने जो काही रस चाखतो, कायेने जो स्पर्श करतो, मनाने जो विचार करतो, ते सर्व अनित्य आहे, अशाश्वत आहे, प्रतिक्षण परिवर्तनशील आहे. इतके जाणून-समजूनही आम्ही एक मिथ्यादृष्टी, एक मिथ्या भ्रम आपल्या धारणांमध्ये ठाम केला आहे की सृष्टीच्या कणा-कणात कोणी एक ब्रह्म सामावला आहे. सृष्टीचा अणू-अणू ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मच आहे. ब्रह्म ध्रुव आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, त्यामुळे सृष्टीचा अणू-अणूही ध्रुव आहे, शाश्वत आहे, नित्य आहे. अशा मिथ्यादृष्टीमुळे सत्यावर असत्याचा लेप चढवून पाहाण्याची वृत्ती निर्माण होते._
_आमचा दागिना खोटा आहे, तांब्या-पितळेचा बनलेला आहे व आम्हाला अप्रिय वाटतो. त्यामुळे आम्ही त्यावर सोन्याचे पाणी चढवतो आणि त्याला सोन्याचा दागिना मानण्याचा मिथ्या भ्रम निर्माण करतो. आम्हाला हा भ्रम प्रिय वाटतो, अन्यथा वारंवार तो तांब्या-पितळेचा दागिना आमच्या मनात अप्रिय भाव निर्माण करत राहातो. याच प्रकारे भोळा मानव हे जाणत नाही की इंद्रियांद्वारे अनुभूत समस्त प्रकृती-प्रपंच अनित्य आहे, मरणधर्मा आहे, नाशवान आहे, अशोभनीय आहे, अशुभ आहे, अप्रिय आहे, तरीही हा शोभिवंत, शुभ व प्रिय वाटावा यासाठी यावर नित्य, शाश्वत व ध्रुवरूपी सोन्याचा थर चढवून आपली मानसिक संतुष्टी करतो. मनुष्य जाणतो की तो स्वतःही मरणधर्मा आहे, जरा, व्याधी व मृत्यूपासून त्याची सुटका नाही. मरणे कोणाला प्रिय वाटते बरे ! त्यामुळे या मरणधर्मा सत्यावर अमरत्वाचा थर चढवून तो आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या मिथ्यादृष्टीत अडकला जाऊन तो आपल्या स्वत:ला भुलवतो की मी तर अमर आहे. मी एका अशा परमात्म्याचा अंश आहे जो अमर आहे. माझ्या आत एका अशा आत्म्याचा निवास आहे जो अजर अमर आहे. शरीर मेल्यावरही जो स्वतः मरणार नाही, ज्याला आग जाळू शकणार नाही, पाणी बुडवू शकणार नाही, कोणतेही शस्त्र कापू शकणार नाही इत्यादी. मनुष्याच्या अमर राहाण्याच्या लालसेला या मिथ्या भ्रांतीने पोषण प्रदान केले आहे. परंतु या भ्रांतीमुळे सत्यात फरक पडू शकत नाही._
_ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात एक विशाल पक्षी असतो, ज्याला शहामृग म्हटले जाते. जेव्हा कधी वाळवंटात भयानक झंझावात व वादळ येते, वाळूची वावटळ उठते, तेव्हा ते या शहामृगास फार अप्रिय वाटते. अशा वेळी तो आपली चोच, डोळे, कान व मान रेतीत खुपसतो व आपल्या मनाला हे मिथ्या सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो की येथे कोणताही झंझावात, वादळ येत नाही. या शहामृगाप्रमाणे वाळूत डोके लपवून आम्हीही आपल्या जीवनाच्या सत्यांपासून दूर पळू शकत नाही. परिवर्तनशील प्रकृतीला ब्रह्माचे स्परूप म्हणून व आपल्या प्रवाहमान चित्तधारेला शाश्वत, ध्रुव आत्म्याचे नाव देऊन आम्ही सत्याला लपवू शकत नाही. याला लपवण्याचा प्रयत्न करणे आपल्या स्वतःला धोका देण्यासमान आहे._
_सम्यक दृष्टी यातच आहे की आम्ही जी बाब जशी आहे, तिला त्याच रूपात पाहावे. त्यावर खोटा लेप चढवू नये. उच्च साधनेद्वारे जो पर्यंत साधक इंद्रियातीत अवस्थेपर्यंत पोहचत नाही, अशा अवस्थेला प्राप्त करत नाही जिथे सर्व इंद्रियांचे कार्य समाप्त होते, तो पर्यंत तो इंद्रिय जगातच आहे आणि त्यामुळे अनित्य जगातच आहे. ध्यान करतांना चित्ताच्या एकाग्रतेमुळे विचार व वितर्क पूर्णपणे शमित झाल्यावर चित्त ज्या प्रीती-सुखाचा, म्हणजे, आनंदाचा अनुभव करते, तो निश्चितच इंद्रियजन्य आनंद आहे, इंद्रियातीत नाही. त्यामुळे अशा इंद्रियजन्य आनंदाला परमानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद अथवा सच्चिदानंद म्हणून अनित्यला नित्य मानणे, अशाश्वतला शाश्वत मानणे, अध्रुवाला ध्रुव मानणे, आपल्या स्वतःला धोका देण्यासमानच आहे._
_यात काही संशय नाही की अशी स्थिती अवश्य आहे की जी खरोखर ध्रुव आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, अजन्म आहे आणि अमर आहे. जिथे नित्य-ध्रुवतेची पोकळ कल्पना नाही, भ्रांती नाही. परंतु ती इंद्रिय जगाची स्थिती नाही, इंद्रियातीत अवस्थेची स्थिती आहे. तिला प्राप्त करण्यासाठी इंद्रिय जगाच्या स्थूलपासून सूक्ष्म, सूक्ष्मपासून सूक्ष्मतर व सूक्ष्मतरपासून सूक्ष्मतम अवस्थेची यात्रा स्वतः पूर्ण करावी लागते. तेव्हा त्या स्थूल व सूक्ष्मतेच्याही पलीकडे स्थित इंद्रियातीत अवस्थेचा साक्षात्कार होईल. या रस्त्यावर चालण्यासाठी सत्याचा आधार घ्यावा लागेल. असत्याच्या कुबड्या लावून आम्ही सत्याच्या ध्येयापर्यंत पोहचू शकणार नाही. साधना करतांना इंद्रिय जगाच्या ज्या सूक्ष्मतम अवस्थांची आम्ही अनुभूती करत जातो, त्याला सत्य रूपात स्वीकार करत जावे लागेल. जेव्हा जाणतो की त्या अनित्य आहेत, तेव्हा त्यांना अनित्य मानतच, अशुभ मानतच, अशोभनीय मानतच, जशी आहे तशीच मानत, एक-एक पाऊल पुढे ठेवावे लागेल. जेथे खोट्याचा आधार घेतला, तेथे प्रगती बंद होईल. जेव्हा ह्यापैकी कोणत्याही इंद्रियजन्य अनुभूतीला ब्रह्मानंद वा आत्मानंदाचे नाव देऊन नित्य, ध्रुव व शाश्वत मानून बसलो, तेव्हाच सत्याशी नाते तुटले. असत्याला धारण केले. अशा अवस्थेत परम सत्याच्या उपलब्धीची आशा कशी केली जाऊ शकते ? नित्य व अनित्य, सत्य व असत्य दोन्ही एकदुस-याच्या विरूद्ध आहेत. एकाचे तोंड पूर्वेकडे असेल तर दुस-याचे पश्चिमेकडे आहे. तेव्हा हे कसे होऊ शकते की आम्ही आपले तोंड तर पश्चिमेकडे करून चालू व आशा करू पूर्वेकडे पोहोचण्याची. आम्ही आसरा तर असत्यचा घेऊ व आशा करू सत्य दर्शनाची. हीच मिथ्या दृष्टी आहे, ज्यात सारे विश्व गुंतले गेले आहे. लोकांच्या दृष्टीवर गंज चढलेला आहे, मळ चढलेला आहे, जाळे पसरलेले आहेत. या गंजाला, या मळाला, या जाळ्याला सोडवितांना आम्हाला दुःख होते कारण यासोबत आमची सखोल आसक्ती झालेली आहे._
_जाणतो की ब्राह्मणाचे कर्म न करणारा कसा ब्राह्मण होईल ? प्रकृतीचे सतत परिवर्तनशील स्वरूप कसे ध्रुव व शाश्वत होईल ? मिथ्या दृष्टी हीच आहे. या मिथ्या दृष्टीला दूर करण्याचे नावच सम्यक दृष्टी आहे._
_त्यामुळे या, या मिथ्या दृष्टींपासून सुटका करून घेऊ व विपश्यनेचा नियमित आणि योग्य प्रकारे अभ्यास करत धर्ममार्गावर चालून आपले मंगल साधू. यातच सर्वांचे मंगल सामावले आहे._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
_बुद्धवर्ष २५५८, पौष पौर्णिमा, ५ जानेवारी २०१५, वर्ष १, अंक ९_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २३/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment