✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_रक्तबीज व प्रतीत्य-समुत्पाद_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/01/blog-post_12.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_!! भाग १ !!_*
(पूज्य गुरुदेवांनी हे पत्र त्यांचा लहान भाऊ श्री राधेश्यामला (एक इंजिनीअर, ज्यांनी भारतात विपश्यनेच्या प्रारंभिक प्रसारापासून त्रिपिटक प्रकाशन, सीडी निर्माण व संशोधन कार्य इत्यादी मध्ये मोठे योगदान दिले.) पत्रोत्तराच्या स्वरूपात लिहिले. ह्यात त्यांनी विचार व संस्कारांचे संवर्धन आणि विपश्यनेच्या अभ्यासामुळे त्यांचे निर्मुलन, ह्या गूढ विषयाला वैज्ञानिक आधाराने समजवले आहे.)
प्रिय राधे
रंगून, २-३-१९६७
_चांगले झाले आपल्या ३०-१२ च्या पत्रात तू 'चेन रिॳॅक्शनची तांत्रिक परिभाषा' (The technique of chain reaction) समजावलीस. *आपल्या पुराणातही ह्या प्रकारचा एक शब्द आला आहे 'रक्तबीज' एका राक्षसी शक्तीचा एकेक रक्त कण जिथे जिथे पडतो, तिथे-तिथे अनेक राक्षसी शक्ती जन्म घेतात.* जसे एका ॳॅटमच्या फुटण्यामुळे चेन रिॳॅक्शनद्वारे असंख्य ॳॅटम क्रमवार फुटू लागतात, त्याच प्रकारे एका रक्तबीजापासून असंख्य राक्षसी शक्ती जागृत होतात. तू बरोबर म्हटले आहेस की *एक वाईट भावना मनात आली की अनेक दुर्भावनांची रांग लागते आणि मनुष्य त्या प्रवाहात असा वाहत जातो की सांभाळणे कठीण होते.* त्यामुळे मुख्य बाब ही आहे की दुर्भावनारूपी प्रथम ॳॅटमलाच फुटू देऊ नये. चेन रिॳॅक्शन आपोआपच तुटून जाईल. मूळच उखडले तर वेल वाढणार नाही. फळेही लागणार नाहीत. दुर्भावनारूपी रक्तबीजाची पेरणीच होणार नाही, तर असंख्य राक्षसी शक्तींची उत्पत्तीही होणार नाही. ह्या *प्रथम ॳॅटमलाच म्हणजे दुर्भावनेच्या मुळाला उखडून फेकण्यासाठीच भगवानांनी विपश्यना भावनेचा (साधनेचा) मार्ग शोधून काढला.*_
_भगवानांच्या पूर्वी व नंतरच्या काळातही साधना होत होत्या. भिन्न-भिन्न आलंबनांद्वारे चित्ताला एकाग्र केले जात होते. परंतु भगवानांची विपश्यना साधना ह्या सर्वांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. ही भिन्नता काय आहे? अन्य साधनांद्वाराही चित्त शांत होते, आसक्ती व द्वेष कमी होतात. त्यामुळे साधक आध्यात्मिक प्रगतीच्या उंच पाय-यांवर चढत जातो, परंतु तो आध्यात्मिकतेची सर्वोच्य अवस्था प्राप्त करू शकत नाही. असे का ?_
_अन्य साधना मार्गातही मनात उत्पन्न होणा-या दुर्भावनांना, मग त्या आसक्तीसंबंधी असोत अथवा द्वेषासंबंधी (तसेही आसक्ती व द्वेष हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.), त्यांना दाबून टाकले जाते. कसे दाबले जाते? एक साधक आपल्या एखाद्या इष्ट देवतेचे स्मरण करतो, वारंवार त्याचे नाव जपतो. सर्वशक्तिमान सर्वेश्वर मानून त्याला आपल्या चित्तावर स्थापित करतो. जेव्हापर्यंत साधक त्या दैवी शक्तीच्या भावनेत अभिभूत आहे, तेव्हापर्यंत त्याचे मन शांत आहे. मन शांत आहे, तोपर्यंत चित्तवृत्ती जागृत होत नाहीत. चित्तवृतींचे शमन झाले असेल तर आसक्ती-द्वेषाच्या वृत्तीचे शमन आपोआप होते, त्या वेळी मन पवित्र होते. दुर्भावनांच्या ऐवजी मनात मैत्री, करुणा, मुदित्ता आणि उपेक्षेचे भाव जागृत होतात, जे परम पवित्र बह्याच्या चित्ताचे नाय आहेत, म्हणूनच अशा भावनेला ब्रह्मविहार म्हणतात. भगवानांनी याला कधीही वाईट म्हटले नाही, उलट आपल्या शिष्यांना ब्रह्मविहाराच्या साधनेचा पाठही शिकवला. परंतु मूळ बाबीत फरक पडला._
_अन्य साधनांमध्ये चित्तावर (एखाद्या काल्पनिक दैवी शक्तीचे) जाडसर आवरण चढवले जाते, त्यामुळे चित्त स्वच्छ होऊन चमकू लागते. साधारण मळक्या चित्ताची व या चित्ताची तुलना होऊ शकत नाही, कारण, जरी आवरण असले तरीही, हे आवरण इतके जाड आणि चमकदार आहे की ह्यावर कोणतीही दुष्पवृत्ती आपला प्रभाव टाकू शकत नाही, परंतु तरीही आवरण हे आवरणच आहे. शेवटी कितीही जाड व कितीही चमकदार असले, तरीही कल्पांनंतर एक वेळ येते जेव्हा हे आवरण निघून जाते आणि आतील चित्त आपल्या दूषित रूपात समोर येते, जोपर्यंत हे लोकीय चित्त कायम आहे आणि त्या चित्तात खोलवर आसक्ती, द्वेष व मोहाचा मळ कायम आहे, तोपर्यंत हे चित मुक्तीचे कारण बनू शकत नाही. 'योगश्चित्तवृत्ति निरोधः' च्या सिद्धांतानुसार ह्या चित्ताला ब्रह्म तत्व प्राप्त होऊ शकते, परंतु मुक्तिरूप निर्वाण तत्व प्राप्त होऊ शकत नाहीं. चित्तवृत्तीचा निरोध (समूळ नष्ट) होण्यामुळे ब्रह्मत्वाची प्राप्ती होईल, परंतु चित्ताचा निरोध (समूळ नष्ट) झाल्यावरच निर्वाण तत्वाची उपलब्धी होईल. हाच मुक्तीचा राजमार्ग आहे आणि ह्यासाठी विपश्यनाच एकमात्र शिदोरी आहे._
_विपश्यना तीच जिच्यात सत्याचा यथार्थ अनुभव केला जातो. जिच्यात एखाद्या काल्पनिक दैवी शक्तीच्या नावाचे, मंत्राचे, रूपाचे अथवा अरूपाचे साहाय्य घेतले जात नाही. हिच्यात आपल्याच चित्तवृतींच्या यथार्थ स्थितीचे साह्य घेऊन हळूहळू त्यांना समूळ नष्ट केले जाते आणि नंतर लोकीय चित्ताचे साह्य घेऊन चित्तालाही समूळ नष्ट केले जाते. ह्या प्रकारे चित्तवृतींना समूळ नष्ट केल्यावर आणि त्यानंतर लोकीय चित्ताला समूळ नष्ट केल्यावर लोकोत्तर निर्वाणाची उपलब्धी होते. कारण येथे कल्पनेचे अथवा असत्याचे साह्य घेतले जात नाही, त्यामुळे कोणतीही मिथ्यादृष्टी जवळ येत नाही. एखाद्या अनित्य सत्येला नित्य मानून, तिचे साह्य घेणे, दुःखसत्याला सुख व आनंद मानून त्याचे साह्य घेणे, अनात्म स्थितीला सर्वोच्य, अचल, ध्रुव आणि शाश्वत आत्म-स्थिती मानून तिचे साह्य घेणे विपश्यना मार्गात सर्वस्वी वर्ज आहे. येथे तर स्वतः आपल्या यथार्थ अनुभवाच्या आधारावरच साधना अवलंबून आहे. येथे तर केवळ सत्याचेच आलंबन आहे, सत्याचाच आधार आहे. सत्यापेक्षा मोठ्या कोणत्याही दुसऱ्या सत्तेला केवळ अंधश्रद्धेमुळे स्वीकारण्यात आलेले नाही._
_ही सत्याचीच शक्ती आहे जी मिथ्या भ्रांतीला दूर करते. असत्याला दूर करते, अंधकार व क्लेशांना दूर करते, चित्ताच्या मळांना दूर करते. चित्ताच्या गहनतम खोलीपर्यंत जमा झालेल्या मळांच्या थरांना उखडून बाहेर फेकते आणि ह्या प्रकारे चित्ताला खरोखर मळरहित, शुद्ध करते. केवळ बाहेरून - बाहेरून चकचकीत सफाई व चकचकीत लेप चढवत नाही, तर आतून बाहेरून सर्वत्र स्वच्छता करते. *ज्या प्रकारे सारहीन चित्तवृत्तींना नष्ट करते, त्याच प्रकारे सारहीन लोकीय चित्तालाही समूळ नष्ट करते. हीच स्थिती तर निर्वाणाची स्थिती आहे. निर्वाण शेवटी काय आहे? ही जी आसक्ती, द्वेष व मोहरूपी आग प्रतिक्षण जळत आहे, हिचे निवृत्त होणे, सर्वस्वी विझून जाणेच निर्वाण आहे.* केवळ चित्तवृत्तींच्या नष्ट होण्यामुळे ह्या अग्नीच्या ज्वाला उठणे बंद होते आणि जळत्या निखा-यांवर राखेचा जाड थर जमतो. तेव्हा वाटते की सर्व काही शमन झाले, आम्ही मुक्त झालो. परंतु कालांतराने जेव्हा ते राखेचे थर अनित्य असल्यामुळे क्षीण होत जातात, तेव्हा पेटत्या निखा-याप्रमाणे चित्त पुन्हा आपले काम करू लागते. पुन्हा आसक्ती, द्वेषरूपी चित्तवृत्ती ज्वालेप्रमाणे उठू लागतात आणि पुन्हा जन्म मरणाचे चक्र चालू लागते. *उच्चतम ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेला मानव तेथून निघून ३१ लोकांपैकी कोणत्यातरी एका लोकात प्रतिसंधी प्राप्त करतो.* पुन्हा नवीन-नवीन कर्मात गुंतून, नवीन-नवीन संस्कारांना जन्म देऊन, लोकांच्या चक्रातच गुंतून राहातो. ह्या प्रकारे ब्रह्मविहारी होऊनही, स्वतः ब्रह्मा होऊनही, प्राणी नितांत मुक्त अवस्थेला प्राप्त करूच शकत नाही._
*_!! भाग २ !!_*
_मी मूळ प्रश्नापासून जरा दूर गेलो, परंतु वरील तथ्य चांगल्या प्रकारे समजल्यावरच तुझ्या प्रश्नाचे समाधान सोपे होईल. जसे की वर म्हटल्याप्रमाणे *विपश्यना सत्याचा अनुभव करण्याचे नाव आहे आणि सत्य ते आहे जे साधकाला प्रत्यक्ष रूपाने स्वतः अनुभवास येत जाईल.* त्यामुळे साधनेच्या *प्रारंभिक अवस्थेत आनापानाद्वारे चित्ताच्या एकाग्रतेचा अभ्यास करवल्यानंतर जेव्हा प्रज्ञाचक्षुद्वारे विपश्यनेची साधना आरंभ करवतात, तेव्हा पहिल्यांदा कायानुपश्यना करतांना आतल्याआत सा-या शरीराचा अनुभव घडतो. आता त्याच कायेला आधार बनवून वेदनानुपश्यना आरंभ होते, शरीरात जिथे कोठेही, जशीही सुखद वा दुःखद अथवा असुखद अदुःखद वेदनेची अनुभूती होते, त्याची विपश्यना (विदर्शना) करत राहतो.*_
_*वेदनांची अनुपश्यना करत करत, अनुभव करत करत स्वतः चित्ताचा अनुभव करू लागतो आणि असे जेव्हा होते तेव्हाच 'धम्मानुपश्यना' होते. प्रकृतीच्या सत्य स्वभावाचा अनुभव होतो, तेव्हाच लोकोत्तर धर्म म्हणजे निर्वाणाचाही अनुभव होतो. आम्ही पाहातो की कायानुपश्यनाही केवळ आधार आहे. मुख्य साधना तर वेदनानुपश्यना व चित्तानुपश्यनेचीच आहे* आणि गुरुजींच्या विशुद्धी-मार्गात हीच आम्हाला शिकवली जाते. *वेदनानुपश्यना काय आहे? डोक्यापासून पायापर्यंत विपश्यना करतांना जिथे कुठे आम्हाला हालचाल माहीत होते, उष्णता माहीत होते, थंडी माहीत होते, पीडा माहीत होते, प्रीती व आनंदाच्या लहरी उठतांना माहीत होतात, जडपणा माहीत होतो अथवा फुलाप्रमाणे हलकेपणा जाणवतो, त्या सर्व भिन्न-भिन्न वेदनाच आहेत. भिन्न-भिन्न अनुभव आहेत आणि साधक ह्या सर्वांना एकाच भावाने जाणतो व तो भाव आहे सत्याचा भाव.*_
_काय सत्य ? हेच की सर्व वेदना अनित्य आहेत, न दुःखाची पीडा नित्य आहे. न आनंदाच्या लहरी, न अग्नीसारखी आग नित्य आहे आणि न बर्फासारखी थंडी, साऱ्या अवस्था परिवर्तनशील आहेत, क्षणभंगुर आहेत, नाशवंत आहेत, प्रतिक्षण भंग होणा-या आहेत. त्यामुळे विपश्यनेसाठी त्या भिन्न-भिन्न वेदना आधार बनतात, परंतु मुलत: अनुभव अनित्यत्तेचाच होतो. आम्ही पाहातो की साऱ्या लोकीय अवस्था अनित्य आहेत, शरीर व चित्त अनित्य आहेत, जे काहीही कृत म्हणजे कोणाद्वारे केले गेलेले आहे, बनवले गेलेले आहे, ते संस्कृत आहे, त्यामुळे अनित्य आहे. जे बनते, ते बिघडण्यासाठीच बनते. जे कधीही बनत नाही, तेच कधीही बिघडत नाही, म्हणजे ज्याचा जन्मच होत नाही तेच अमर आहे. हे सारे संस्कार, साऱ्या वेदना कृत आहेत, संस्कृत आहेत, म्हणून अनित्य आहेत. आम्ही याच अनित्यतारूपी सत्याचा अनुभव करत राहतो, भगवानांनी म्हटले आहे...._
*_सब्बे सङ्खारा अनिच्चा 'ति, यदा पञ्ञाय पस्सति।_*
*_अथ निब्बिन्दति दुक्खे, एस मग्गो विसुद्धिया ।।_*
*_(थेरगाथापाळिं, १५.१.६७६)_*
*_जेव्हा आम्ही प्रज्ञेच्या डोळ्यांद्वारे ह्या सत्याचे दर्शन करतो की सारे संस्कार अनित्य आहेत, तेव्हा सारे दुःख आपोआप उखडून जाते, निर्मूळ होते. असा आहे (भगवानांचा) हा विशुद्धी मार्ग !_*
_जोपर्यंत चित्ताच्या खोलवर तळात आसक्ती, द्वेष व मोहाचा एकही संस्कार दबलेला राहील, तोपर्यंत *"निब्बिन्दति दुक्खे"* ची स्थिती येणार नाही. सर्व दुःखांचे निर्मुलन होण्याची स्थिती येणार नाही, वरचे आवरण आतल्या मळाला भले दाबून टाकेल, परंतु त्याला निर्मूळ करू शकत नाही, *ही वेदनानुपश्यना व चित्तानुपश्यनाच आहे, जी चित्ताच्या क्लेशांना मुळापासून उखडून त्याला खऱ्या अर्थाने मळरहित, स्वच्छ करते.* आता आपण पाहू की हे होते कसे ?_
_*बोधी प्राप्त केल्यावर भगवानांनी ज्या सत्याचे अनुलोम (सरळ) व प्रतिलोम (उलट) पद्धतीने निरिक्षण केले, ते हेच होते की प्रत्येक संस्कृत (निर्मित) अवस्था एखाद्या कारणामुळेच निर्माण होते, त्या कारणाला नष्ट करताच ती अवस्थाही नष्ट होईल. ह्यालाच भगवानांनी प्रतीत्य- समुत्पाद म्हटले आहे, म्हणजे हे झाल्यामुळे हे होते आणि ह्याच्या नष्ट झाल्यामुळे हेही नष्ट होते. कसे होते ?*_
*_!! भाग ३ !!_*
*_!! समाप्त !!_*
_भगवानांनी म्हटले *"अविज्जापच्चया सङ्खारा"* म्हणजे अविद्या असल्यामुळे संस्कार उत्पन्न होतात आणि *"सङ्खारपच्चया विञ्ञाणं"* म्हणजे संस्कारांच्या उत्पन्न होण्यामुळे विज्ञान (चैतन्य) उत्पन्न होते. *"विञ्ञाणपच्चया नाम-रूपं"* म्हणजे विज्ञान असल्यामुळेच शरीर व चित्ताचे संयोजन होते. *"नाम-रूपपच्चया सळायतनं"* म्हणजे शरीर व चित्ताचे संयोजन झाल्यामुळे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन रूपी सहा इंद्रिय उत्पन्न होतात. त्यानंतर *"सळायतनपच्चया फस्सो"* म्हणजे जिथे सहा इंद्रिय उत्पन्न झाली, तिथे यांचा विषयांशी संपर्क म्हणजे स्पर्श होईलच. डोळ्यांचा रूपाशी, कानाचा शब्दांशी, नाकाचा गंधाशी, जिभेचा रसाशी, त्वचेचा एखाद्या पदार्थाशी आणि मनाचा विचारांशी स्पर्श होईलच, त्यानंतर म्हटले *"फस्सपच्चया वेदना"* म्हणजे स्पर्शाच्या कारणामुळेच वेदना उत्पन्न होतात._
_आता प्रतीत्य-समुत्पादाच्या शृंखलेला थांबवून आम्ही ह्या बाबीला स्पष्ट समजून घेऊ की डोळ्यांनी जे रूप दिसते ते फक्त रूप-मात्र आहे. ह्याच प्रकारे शब्द फक्त शब्द, गंध फक्त गंध, रस फक्त रस इत्यादी. त्यामुळे इंद्रियांद्वारे ह्यांच्या स्पर्शाने जो वेदनेचा अनुभव होतो ती फक्त वेदना-मात्र आहे. चांगली वा वाईट वेदना नाही. *वेदनानुपश्यना करांना आम्ही विभिन्न वेदनांना चांगली वा वाईट न मानता त्यांना त्यांच्या सत्य रूपात पाहतो की वेदना तर वेदना आहे. जरी जळण्याची वेदना असेल, थंडीची वेदना असेल, पीडेची वेदना असेल अथवा आनंदाची वेदना असेल, जी काही वेदना असेल ती संस्कारांमुळे उत्पन्न होणारी आहे आणि संस्कार तर अनित्य आहेत. अर्थात ज्याचे मूळ अनित्य आहे, ते स्वतःहि अनित्य आहे आणि आम्हाला ह्या अनित्यतेचा स्वतः अनुभवही होतो. कोणतीही वेदना नेहमीसाठी राहात नाही. सर्वच परिवर्तनशील आहेत, भंग होणाऱ्या आहेत. त्यामुळे आम्ही आपल्या आत अनुभव केलेल्या एकेका वेदनेला वेदनेच्या रूपात नाही, तर तिच्या सत्यस्वरूपात अर्थात अनित्यतेच्या रूपात पाहातो. साधना करतांना सुरवातीला हे काम सोपे नसते. अधिकांश साधक वेदनेला तिच्या सुखमय स्वरूपात अथवा दुःखमय स्वरूपातच पाहातात. असे न करता, तिला अनित्य स्वरूपात पाहाण्याचा अभ्यास करवला जातो.* असे का करवले जाते ?_
_ह्याला समजण्यासाठी आम्ही प्रतीत्य-समुत्पादाच्या पुढच्या कडचा पाहूया. पुढे म्हटले आहे- *"वेदनापच्चया तण्हा"* म्हणजे, वेदनेच्या कारणामुळे तृष्णा उत्पन्न होते. हीच सर्वात गहन बाब आहे. जेव्हा आम्ही वेदनेला चांगले वा वाईट मानले, तेव्हाच तिच्याप्रती आकर्षण अथवा द्वेषाचा भाव जागृत झाला. डोळ्यांनी जसे एखादे चांगले रूप पाहिले, कानांनी जसा एखादा मधुर, प्रिय शब्द ऐकला, तेव्हाच त्याच्याप्रती आसक्ती उत्पन्न झाली, 'मी', 'माझे' चा भाव उत्पन्न झाला, तृष्णा उत्पन्न झाली. मन इच्छिते की याला पाहातच राहावे, ऐकतच राहावे. कारण आम्ही त्या वेदनेच्या सत्य स्वरूपाला विसरलो. तिच्या अनित्य स्वभावाला विसरलो. तिला स्थायी मानून तिच्याप्रती लालसा जागवली, सुखमयी वेदना तृष्णेचे कारण झाली, अशीच अप्रिय दुःखमयी वेदनाही तृष्णेचे कारण झाली. एकीने आसक्ती उत्पन्न केली, तर दुसरीने द्वेष. दोन्हीही तृष्णेचीच रूप आहेत, स्वभाव आहेत. आपल्या स्वतःच्या प्रती तृष्णा बंधन आहे, तेव्हा स्वतःसाठी प्रिय वस्तु मिळवण्याची लालसा आणि अप्रिय वस्तूला दूर ठेवण्याची इच्छा आहे. दोन्हीही इच्छा आहेत, तृष्णा आहेत. जशी तृष्णा जागृत झाली तसेच *"तण्हापच्चया उपादानं"* म्हणजे तृष्णेमुळे इंधन उत्पन्न झाले. आता जळण्याची सारी सामग्री मिळाली. अग्नीला जळत राहाण्यासाठी लाकूड मिळाले, तूप मिळाले. *"उपादानपच्चया भवो"* जोपर्यंत हे इंधन कायम आहे, तोपर्यंत भव कायम आहेच, संस्कार कायम आहेतच. त्यानंतर म्हटले *"भवपच्चया जाति"* भव आहे तर जाती आहे, म्हणजे पुनर्जन्म आहे. त्यानंतर म्हटले *"जातिपच्चया जरा-मरणं सोक-परिदेव-दुक्ख-दोमनस्सुपायासा सम्भवन्ति"* म्हणजे जेथे जन्म झाला तेथे मृत्यू नक्की आहे. शोक, रडणे, क्रंदन, विलाप करणे, हे सर्व नक्की आहेत. पुढे म्हटले *"एवमेतस्स केवलस्स दुक्खक्खन्धस्स समुदयो होती 'ति"* म्हणजे ह्या प्रकारे संपूर्ण दुःखांचा डोंगर उभा होतो._
_त्यामुळे सर्व दुःखांच्या मुळाशी वेदनेनंतर उत्पन्न होणारी तृष्णाच आहे. तृष्णा तेव्हा होते जेव्हा आम्ही वेदनेला वेदनेच्या रूपात न पाहता तिच्या चांगलेपणाला वा वाईटपणाला पाहतो व आसक्ती वा द्वेष निर्माण करतो. *'मी', 'माझे' चा भाव कायम ठेऊन तिला प्रिय वा अप्रिय मानतो. हिलाच नष्ट करण्यासाठी सत्यदर्शिनी विपश्यनेची भावना केली जाते.* शरीरात जशी कोणतीही वेदना उत्पन्न झाली, तिच्याप्रती 'मी', 'माझे' चा भाव निर्माण होऊ देऊ नये, ताबडतोब तिला अनित्य रूपात पाहावे, खरोखर, हे खूप सोपे काम नाही, परंतु निश्चितच अभ्यासामुळे जमणारे, अभ्यासाने प्राप्त होणारे आहे._
_*विपश्यनेद्वारे ह्या प्रकारे प्रत्येक वेदनेला म्हणजे प्रत्येक चित्तवृत्तीला अनित्य समजण्याचा स्वभाव जसा जसा दृढ होत जातो, तसे तसे व्यवहार जगतातही, जसेही कोणताही दुर्भाव मनात जागृत झाला, त्या क्षणीच त्याला अनित्य मानून तिथेच त्याचे शमन केले तर विस्तार होत नाही.*_
_*ॳॅटॉमिक चेन रिॳॅक्शन (Atomic chain reac- tion) एका ॳॅटमपेक्षा पुढे सरकू शकत नाही. रक्तबीज अनंत दुःशक्तींची निर्मिती करण्यात असमर्थ होते. अशी आहे भगवानांची विपश्यना त्यामुळेच ही सर्व प्रकारच्या साधनांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. दुःखाच्या मुळांवर सरळ प्रहार करते. त्याला मुळापासून उखडून फेकते. त्याला निर्बीज करते. त्यामुळेच निर्वाणप्राप्तीचा साधा, सरळ राजमार्ग आहे. ह्याच आस्थेने व विश्वासाने आम्हाला ह्या मार्गावर एक-एक पाऊल चालावयाचे आहे. खरोखर ह्या मार्गावर चाललेले प्रत्येक पाऊल पुढील पाऊल उचलण्यासाठीच प्रेरित करेल. दुष्ट माराच्या ओढीला कमी करेल व हळूहळू परंतु दृढतापूर्वक लक्ष्यापर्यंत पोहोचवेल.* विपश्यनेचा नियमित अभ्यास करण्यातच सर्वांचे मंगल सामावले आहे, सर्वांचे कल्याण सामावले आहे._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* १३/०१/२०२५
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment