Friday, 10 January 2025

रुपगर्विता खेमा

 रुपगर्विता खेमा की महाप्रज्ञावान खेमा थेरी

“एतदग्गं, भिक्खवे, मम साविकानं भिक्खुनीनं महापनं यदिदं खेमा"

"माझ्या भिक्षुणी श्राविकांमध्ये खेमा ही महाप्रज्ञावानमध्ये सगळ्यात अग्र आहे"

खेमाची आधीची ओळख म्हणजे रूपगर्विता. खेमा हि सागल नगरीतील राजकुमारी, ती अतीशय सुंदर होती. तिचे सौंदर्य जगामध्ये अद्वितीय होते आणि म्हणूनच तीला तीच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. तिच्या या सौंदर्याला भाळून राजा बिंबिसार तिच्या मागे मागे फिरत असे, तीच्या सौंदर्भात तो पूर्णपणे वाहून गेला होता, त्याने तिच्याशी लग्न केले आणि ती राजाची मुख्य राणी बनते. आपल्या मागे स्वतः राजा बिंबिसार येतोय के पाहून तीला तिच्या सौंदर्याचा अधिक गर्व झाला.

अशा या रूपगर्विते बद्दल स्वतः भगवान म्हणतात की, जसे माझे दोन प्रमुख शिष्य, सेनापती म्हणून सारिपुत्र आणि मोग्गलान आहेत त्याचप्रमाणे भिक्षूणींमध्ये उप्पलवण्णा आणि खेमा वा दोन प्रमुख आणि अग्र आहेत

प्रस्तुत लेखात आपण रूपगर्विता खेमाचा प्रवास रूपगर्वितेपासून महाप्रज्ञावान भिक्षूणींमध्ये कसा झाला हे पाहणार आहोत.

खेमा हिचा जन्म हेमवती नगरीमध्ये भगवान पदमुत्तर बुद्धांच्या काळात झाला, त्यावेळी पदमुत्तर बुद्धांची अग्र श्राविका सुजाता थेरी हिला खेमाने तीन लाडू दान दिले आणि आपले केस कापून संकल्प केला कि, मी हि सम्यक सम्बुद्धांच्या काळात अग्र श्राविका होऊन महाप्रज्ञावान बनेल.

त्यानंतर आपल्या जीवनात अनेक कुशलकम्म करून ती भगवान विपस्सी बुद्ध, भगवान कोणागमन बुद्ध आणि भगवान कस्सप बुद्ध यांच्या काळात जन्म घेऊन दान-धर्म करून, कुशलकम्म करून या काळात सम्यक सम्बुद्ध भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात बिंबीसाराची पत्नी म्हनून जन्म घेते.

बिंबिसार राजा भगवान बुद्धांचा धम्मोपदेश ऐकण्यासाठी वेळुवनान जात असे. जेंव्हा बिंबिसाराला बुद्धांचा धम्म कळाला तेव्हा तो सोतापन्न झाला, धम्म कळला म्हणून तो पूर्वीसारखा बिंबिसार म्हणजे आधी तो दूर प्रदेशात जाऊन तिकडच्या नगरवधू, वैश्या यांच्या आहारी जात असे, पण आाता त्याच्यामधे अशी कुठलीच प्रकारची आसक्ती उरली नाही त्याचे चित्त कामवासनेमधून पूर्णतः मुक्त झाले होते.

पूर्वी बिंबिसार राजा मुक्त कंठाने खेमाची प्रशंसा करीत असे, तिच्या मागे मागे फिरत असे. पण जेव्हापासून बुद्धांचा धम्म समजला तेंव्हापासून तो खेमाच्या मागेपुढे करणे, तिच्या सौंदर्याची प्रशंसा करने हे त्याने थांबवले आणि याचा खेमाला भयंकर त्रास होत असे.

बिंबिसार वारंवार ध‌म्म ऐकण्यासाठी बुद्धांकडे जात असे, पण खेमा एकदाही बुद्धांच्या दर्शनाला गेली नाही. कारण तिला माहित होते भगवान बुद्ध म्हणतात की  "रूप अनित्य आहे, रूपावर आसक्त होऊ नका.' भगवान रूपाचे दोष बघतात, रूपाला घाण समजतात... या कारणांमुळेच ती भगवनांसमोर कधीच गेली नाही.

आपल्याला जी शांती लाभलेली आहे, जो लाभ झाला आहे, जो धम्म मिळाला आहे तो आपल्या सगळ्या नातलगांना, प्रजेला, राण्यांना मिळो आणि ते हि सूखी हावे अशी इच्छा बिंबिसार राजाच्या मनान जागृत होऊन त्याने आपल्या सर्व नातलगांना, प्रजेला, राण्यांना बुद्धांचा संदेश धम्म ऐकण्यासाठी प्रवृत्त करू लागला

आपली प्रिय राणी खेमा हि बुद्धांकडे जात नव्हती हे बिंबिसाराला माहित होते. त्याने तिने हि बुद्धांकडे त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी जावे अशी विनंती केली, तीला समजाविले पण खेमा काहि बुद्धांकडे गेली नाही.

खेमाने वेळूवनात जाऊन बुद्धांचे दर्शन घ्यावे म्हणून बिंबिसार राजाने एक युक्ती केली. त्याने आपल्या पदरच्या कवींकडून वेळूवनातील वनश्रींवर काव्य रचवून ते खेमा राणीसमोर म्हणावयास लाविले. वेळूवनाचे ते रसभरीत वर्णने ऐकून खेमाला वेळूवनात जाण्याची उत्कट इच्छा झाली आणि तिने राजाची परवानगी घेऊन ती वेळूवनात गेली.

वेळूवनाची सुंदरता पाहुन ती भाऊक झाली, प्रसन्न झाली आणि ती त्या सुंदरतेचा अनुभव घेत असता तीची नजर बुद्धांवर पडते. ज्यांना बघायचे नव्हतं - भेटायचे नव्हतं ती व्यक्ती प्रत्यक्षात समोर पाहून ती शांत झाली. - बुद्धांनी तिच्याकडे अपार करुणामय नजरेनेन पाहिले. खेमाला हि नजर खूपच नवीन होती, कारण तीने आतापर्यंत कामवासनेने भरलेले डोळेच बघितले होते. करुणामयी नजर कशी असते हे तीला माहितच नव्हते, ती थोडीशी गोंधळली, पण बुद्धांनी थोड्यावेळातच खेमाकडे पाहून आपली नजर फिरवली.... आपल्यासारख्या रुपवती, सौंदर्याकडे पाहुन बुद्धांनी नजर फिरवली हे  खेमाला सहन झाले नाही.

बुद्धांनी आपल्या रिद्धी बळाने खेमाच्या अंर्तमनात काय चाललय हे जाणले. त्यांनी हे हि जाणले कि, खेमा आता धम्म ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, तीला जरी धम्म सांगितला तरी तीला समजणार नाही. 

 तेव्हा त्यांनी आपल्या रिद्धी बळाने खेमापेक्षाही अतिशय सुंदर अशा स्त्रिची उत्पत्ती केली. जी भगवंतांना पंख्याने वारा घालीत मागे उभी आहे. खेमाने ते पाहिले आणि ती स्वतः च्या मनाशीच म्हणाली कि "हि इतकी सुंदर स्त्रि बुद्धांची सेवा करीत आहे. ती एवढी सुंदर आहे कि या जगामध्ये तिच्या सारखं, सौंदर्य आणि सुडोल शरीर कोणाकडेच नसेल आणि तरी सुध्दा ती बुद्धांची सेवा करत आहे. तीच्या तुलने समोर तर मी काहीच नाही."

हे विचार खेमाच्या मनात सुरू असतांना तोच ती सुंदर स्त्रि क्रमाक्रमाने बदलत चालली, थोड्याच वेळान ती प्रौढ, म्हातारी, आणि मरून पडलेली तिला दिसली. ते सर्व पाहुन खेमा मनामध्ये विचार करू लागली- 'माझी पण अशीच दशा होईल का? माझे जे लावण्य आहे हे जरजरित होऊन जाईल ?- मी सुद्धा मरून जाईल?.. वगैरे वगैरे 

असे खूप सारे प्रश्न तिच्या मनामध्ये पडू लागले आणि ती विचार करू लागली, हे तर जरा धर्म आहे, मरण धर्म आहे... जे आपल्या या पूर्ण शरीरामध्ये आहे... याचा एवढा चिपकाव कश्याला? याच्यामध्ये इतकी आसक्ती कशाला?.... असा ती विचार करू लागली.

भगवंतांनी आता तिच्या मनाची स्थिती जाणली. तिची मनस्थिती धम्म ऐकण्यासाठी  तयार झालेली पाहून भगवंत म्हणाले," या शरीरामध्ये एवढी आसक्ती आहे, जे जरा धर्म आहे. हे कालांतराने विनाश होणार आहे, संपून जाणार आहे. हे शरीरमृत आहे, या शरीरामध्ये इतकी दुर्गंध, दुर्गुण भरलेले आहेत त्या शरीराबद्दल इतकी आसक्ती कशाला? खेमा ध्यान साधना कर, कायागती सतीद्वारे या शरीराबद्दल अनासक्त हो, समजून घे की हे शरीर नश्वर आहे, हे जीवन सुध्दा नश्वर आहे 

अशा प्रकारे नाना प्रकारे खूप सारी उदाहरणे देऊन बुद्धांनी खेमाचे मन परिवर्तन केले. भगवंतांनी तिला तिथेच महानिदानसुत्त यांची खुप गंभीर अशी धम्म देसना दिली. ती ऐकून खेमा तिथल्या तिथेच सोतापन्न झाली. भगवान बुद्धांनी सांगितलेला हा कल्याणकारी धर्माला समजुन ती सोतापन्न फळामध्ये प्रतिष्ठित झाली.

ती भगवान बुद्धांचे आभार मानून त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव ठेवून महालात परत येते. तेथे येऊन बिंबिसार राजाची ती आभार मानते. त्यांना आपली कृतज्ञता प्रकट करते आणि ती बिंबिसार राजापुढे प्रवज्जित होण्याची इच्छा व्यक्त करते आणि त्यासाठी ती बिंबिसाराकडे अनुमती मागते.

बिंबिसार हि सोतापन्न अवस्थेत असतो, तो पूर्वीचा राजा आता राहिला नाही आहे. त्याने विचार केला कि, माझ्या प्रिय सुंदर पत्नीला प्रवज्जित होण्याची इच्छा झाली तेव्हा त्याने आनंदाने खेमा राणीला अनुमती दिली.

खेमा राणी प्रवज्जित झाली... प्रवज्जित झाल्यानंतर बुद्धांच्या धम्माचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून ती लवकरच अरहंत झाली. खेमा हिची प्रज्ञा खूपच बलवंत होती, तिची धम्म सांगण्याची पद्धत खूपच उच्च आणि गंभीर होती... म्हणूनच भगवंतांनी खेमाला महाप्रज्ञामध्ये अग्रघोषित केले होते. बुद्ध म्हणतात...

“एतदग्गं, भिक्खवे, मम साविकानं भिक्खुनीनं महापनं यदिदं खेमा"

"माझ्या भिक्षुणी श्राविकांमध्ये खेमा ही महाप्रज्ञावानमध्ये सगळ्यात अग्र आहे"

संयुत्त निकाय, सळायतनवग्गो, अब्याकतसंयुत्त (१०) पहिले सुत्त खेमासुत्त यामध्ये खेमा आणि प्रसेनजित राजा यांचा संवाद आला आहे तै थोडक्यात पुढीलप्रमाणे:-

भगवान श्रावस्ती येथे जेतवनान अनाथपिंडिकांच्या आरामात राहत होते. त्यावेळी खेमा भिक्षुणी कोसल देशात चारीका करीत करीत श्रावस्ती आणि साकेत यांच्या दरम्यान तोरणवत्थु गावी वर्षावासासाठी राहिली होती. त्यावेळी कोसल राजा प्रसेनजित साकेतहुन श्रावस्तीला येत असतांना एक रात्र तोरणवत्थुजवळ मुक्कामाला थांबला. त्या रात्री कोणातरी समणाचा किंवा  ब्राह्मणाचा उपदेश ऐकण्याची त्याला इच्छा झाली आणि त्यासाठी त्याने चौकशीसाठी गावात आपल्या सैनिकांना पाठविले. पन गेलेल्या सैनिकांनी निरोप दिला कि त्या गावात अशा प्रकारे आम्हांला कोणी श्रमण - ब्राह्मण तर नाही दिसला, पण त्या ठिकाणी आम्हांला भगवान बुद्धांची श्राविका खेमा थेरि दिसल्या आहेत आणि त्यांच्याबददल खूप साऱ्या गोष्टी प्रचलित आहेत की,

- त्या पंडित आहेत, मेधावी आहेत आणि बोलण्यामध्ये तत्पर आहेत, दक्ष आहेत. खूप चांगल्या प्रकारे गंभीर प्रज्ञावली आहेत आणि बुद्धिमतेच्या आधारावरती धम्म सांगणारी आहे. आणि राजाला ने सैनिक सांगतात की तुम्ही यांच्यासोबत चर्चा केलेली बरी, धम्म ऐकलेला बरा......

तेंव्हा हे सगळ येवून प्रसेनजित राजा खेमा थेरि यांच्याकडे जातो. त्यांना वंदन करतो त्यांचे सर्व कुशल मंगल विचारून एका बाजूचा बसतो. एका बाजूला बसल्यानंतर खेमा थेरिंना प्रश्न विचारतो...

प्रसेनजित राजा :- 'बुद्धांचे परिनिर्वाण झाल्यानंतर बुद्ध असतात का?"

खेमा :-  महाराज, हे भगवंतांनी सांगितले नाही. ह्या प्रश्नाचे उत्तर अव्याकृत सांगितलेला आहे.

प्रसेनजित राजा :- तथागत परिनिर्वाणानंतर नसतात ?

खेमा :- याच्याबददल सुद्धा बुद्धांनी अव्याकृत सांगितलेला आहे.

'किं नु खो, अय्ये, होति तथागतो परं मरणा'ति इति पुट्ठा समाना – 'अब्याकतं खो एतं, महाराज, भगवता - होति तथागतो परं मरणा'ति वदेसि । किं पनय्ये, न होति तथागतो परं मरणा'ति इति पुट्ठा समाना - 'एतम्पि खो, महाराज, अब्याकतं भगवता - न होति तथागतो परं मरणा'ति वदेसि ।

'किं नु खो, अय्ये, होति च न च होति तथागतो परं मरणा'ति इति पुट्ठा समाना – 'अब्याकतं खो एतं, महाराज, भगवता - होति च न च होति तथागतो परं मरणा'ति वदेसि ।

'किं पनय्ये, नेव होति न न होति तथागतो परं मरणा'ति इति पुट्ठा समाना - 'एतम्पि खो, महाराज, अब्याकतं भगवता - नेव होति न न होति तथागतो परं मरणा'ति वदेसि । 'को नु खो, अय्ये, हेतु, को पच्चयो येनेतं अब्याकतं भगवता" ति?

 - (SN 44.1) संयुत्त निकाय, सळायतनवग्गो  ",१० अब्याकतसंयुत्तं, १. खेमासुत्तं)

प्रसेनजीत राजाकडून बुद्धांच्या परिनिर्वाणाबद्दल वारंवार प्रश्न केल्यानंतर खेमा थेरि त्यांना अव्याकृत आहे असं वारंवार सांगतात आणि तेव्हा राजाला प्रतिप्रश्न करते आणि त्यांना उत्तर विचारते. विचारते की, "महाराज असं कोणी आहे का, की जो गंगा नदीच्या वाळूकणांना मोजू शकतो? की इथे इतकि वाळूकण आहेत, इतके हजार आहेत इतके लाख आहे?"

त्यावर राजा नकार देतो. पुढे थेरि विचारतात, "का महाराज असा कोणी व्यक्तीला तुम्ही ओळखतात का की जो महासमुद्राच्या पाण्याला खूप चांगल्या प्रकारे मोजू शकतो, की हे एवढं आहे तेवढं आहे याचं प्रमाण एवढं आहे अशाप्रकारे ?" तेव्हा महाराज उत्तर देतात, "नाही आहे असा तर कोणीच नाहीये."

त्यावर थेरि उत्तर देतात की, "अशाच प्रकारे भगवंतांच्या रूपाविषयी सांगितलं नाही जाऊ शकत की बुद्धांचे शरीर पूर्णपणे प्रहिन झालेला आहे का? तसे खूप सारे प्रश्नांचे उत्तर नसतं, खूप सारे प्रश्न अव्याकृत असतात. त्याला मोजता मापता येत नाही. त्याच प्रकारे भगवंतांचे उत्तर आहे की भगवंत परिनिर्वाणानंतर असतात का किंवा नसतात किंवा असुन सुद्धा आहे किंवा नसुन सुद्धा नाहिये अशा प्रकारची गोष्ट. 

खूप गंभीरपणे चर्चा झाल्यानंतर प्रसेनजीत राजा खेमा थेरीकडून खूप प्रभावित होतो आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांचे गुणगान गाउन त्यांचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या निवासस्थानी जातो. काही दिवसांनी प्रसेनजीत राजा बुद्धांच्या दर्शनासाठी जातो. तेथे गेल्यावर जे प्रश्न खेमा थेरिंना विचारले होते अगदी तेच प्रश्न भगवतांना विचारतो. भगवंत हि अगदी तशीच उतरे देतात जशी खेमा थेरिंनी प्रसेनजीत राजाला दिली होती.

त्यावर प्रसेनजीत राजा भगवंतांना म्हणतो कि भगवंत आश्चर्य आहे, अद्‌भूत आहे. तुमचे शब्द आणि तुमच्या श्राविकांचे शब्द आणि अर्थ एकदम बरोबर जुळत आहे, हुबेहूब मिळत आहे. 

भगवान बुध्द हे एकांतप्रिय होते आणि नेहमी एकांतासाठी कुठेतरी जाऊन छान प्रकारचे ध्यान करायचे. त्यावर जाणुसोनी ब्राह्मणाने त्यांना विचारणा केल्यावर भगवंत म्हणाले -

"बाह्मण, दोन गोष्टीसाठी मी एकांतवासाचे सेवन करतो. पहिलं, ह्या शरीराबद्दल आसक्ती कमी करण्यासाठी, सुखविहारी होण्यासाठी आणि पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या जनतेवर अनुकंपा करण्यासाठी कारण जेणेकरून ते माझं अनुकरण करतील आणि ह्या मार्गावरती सफल होतील."

आणि त्याच कारणासाठी अरहंत झाल्यावर खूप सारे भिक्षु आणि भिक्षुणी हे वेळोवेळी एकतांमध्ये जातात, अरण्यामध्ये ध्यान करतात.‌ आणि ह्या सुखाचा अनुभव करतात.

या प्रकारे खेमा थेरी यासुद्धा एकांतामध्ये जाऊन ध्यान करत. अरहंत झालेल्या खेमा खूप चांगल्या प्रकारे ब्रह्मचर्याचे पालन करीत असत. धम्माच्या मार्गाचे अनुसरण करून त्यांचे तेज अजून निखरून वर आले होत. त्या पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसू लागल्या.

अशाच एकांतामध्ये ध्यान करीत असताना मार तिथं आला आणि खेमा थेरी यांच्या मनामध्ये परत एकदा कामभोग, कामवासना उत्पन्न करावी म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करू लागला.

त्यांची चर्चा पुढीलप्रमाणे :-

"दहरा त्वं रूपवती, अहम्पि दहरो युवा। 

पञ्चङ्गिकेन तुरियेन, एहि खेमे रमामसे" ॥

हे रुपवती तू युवा आहे, मी पण युवा आहे, हे खेमा चल ये आपण पाच प्रकारचे वाद्य संगीतचे आनंद घेऊ आणि कामभोगामध्ये रमण करू.

खेमा ही पूर्वीची रूपगर्विता नव्हती ती आत्ता अरहंत झाली आहे, काम रागाबद्दल सगळी आसक्ती त्यांची आता नष्ट झालेली आहे आणि तेव्हा त्या माराला उत्तर देतात.

"इमिना पूतिकायेन, आतुरेन पभङ्गुना । 

अट्टियामि हरायामि, कामतण्हा समूहता ॥

या शरीरा प्रतीची या काये प्रतीची जी कामतृष्णा आहे त्याला मी पूर्णपणे उघडून ठेवलेली आहे, या घाणेरड्या अशा दुर्गंधी शरीराबद्दल आता माझी आजिबात आसक्ती नाहीये, आणि त्याच प्रकारे ह्या शरीराबद्दल माझी आता घृणा जागलेली आहे, मला ह्या शरीराची आता लाज वाटते.

"सत्तिसूलूपमा कामा, खन्धासं अधिकुट्टना। 

यं 'त्वं कामरतिं' ब्रूसि, 'अरती' दानि सा मम ॥

हि जी काम आसक्ती आहे, ही एखाद्या भाल्याप्रमाणे शरीरामध्ये घुसणारी आहे, ही काम आसक्ती ज्वलंत करते, जशी काही एखादी तलवार समोरच्या व्यक्तीला कापत असते, आणि ज्याला तू कामतृष्णा म्हणत आहे, ते माझ्यासाठी सध्या अतिशय घाणेरडे आणि घृणा उत्पन्न करणारी गोष्ट आहे.

"सब्बत्थ विहता नन्दी, तमोखन्धो पदालितो । 

एवं जानाहि पापिम, निहतो त्वमसि अन्तक ॥

मी कामभोगातून उत्पन्न होणाऱ्या सगळ्या आसक्तीला नष्ट केलेल आहे, आपल्या आत मी खूप प्रज्ञाच्या प्रकाशामध्ये सगळा अंधकार पूर्णपणे समाप्त करून टाकलेला आहे. समस्त प्राण्यांना कामभोगांमध्ये जन्म घेताना‌ - मरताना, त्या चक्रव्यूमध्ये परत परत मी पाहिलेला आहे. आणि हे मारा हे तूच करत आहे आणि मी तुला समजून घेऊन तुला हरवलेलं आहे आणि तुझाच अंत केला आहे.

"नक्खत्तानि नमस्सन्ता, अग्गिं परिचरं वने। 

यथाभुच्चमजानन्ता, बाला सुद्धिममथ ॥

असे मूर्ख व्यक्ती जे विपश्यना न करून खूप चांगल्या प्रकारे यथाभूत सत्य जाणत नाही, नक्षत्र, बली इत्यादी कर्मकांड करून आपल्या मनाला दूषित करून खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम रागामध्ये विलीन होतात, अग्निपरिचर करून कर्मकांड करून ते स्वतःला शुद्ध केलं आहे असं समजतात.

"अहञ्च खो नमस्सन्ती, सम्बुद्धं पुरिसुत्तमं । 

पमुत्ता सब्बदुक्खेहि, सत्थुसासनकारिका"ति ॥

मी त्यांना नमस्कार केला आहे जे सम्यक संबुद्ध आहे, या जगामध्ये देवता आणि मनुष्यांमध्ये उत्तम आहे. कारण की त्या बुद्धांनी असा धम्म सांगितलेला आहे की जो ह्या सगळ्या प्राण्यांच्या दुःखाच्या मुक्तीचे कारण आहे आणि ज्याला समजून आचरण करून त्याच्या दुःखातून मुक्त होऊ शकता येत.

- महेश हरिश्चंद्र कांबळे

१०/०१/२०२५

संदर्भ ग्रंथ :-

१) उराग जातक क्रं ३५४

२) मनोज जातक क्रं ३९७

३) रोहनमिग जातक क्रं ५०

४) चुल्हामस जातक क्रं ५०२

५) महाहंस जातक क्रं ५३४

६) थेरीगाथा - छक्कनिपात - ३ खेमाथेरी

७) संयुत्तनिकाय - सळायतनवग्ग - १० अभ्याकतसंयुत्त




No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...