✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_फलज्योतिषाचं थोतांड_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_26.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_भाग ८_*
*_शाहू महाराजांचा किस्सा_*
_राजर्षी शाहू महाराजांना १०० वर्षांपूर्वी सारासार विचारांनी एक अतिशय चांगला अशा स्वरुपाचा प्रश्न सुचला होता असे सांगितले जाते. ती घटना अशी घडली होती. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एकदा अशी वर्दी आली की, 'बाहेर एक ज्योतिषी आलेला आहे आणि तो अतिशय निष्णात आहे. अचूक भविष्य सांगतो. शाहू महाराजांचा यावर विश्वास नव्हता. पण शाहू महाराज म्हणाले, 'ठीक आहे. त्याला बोलवा. तो आत आला. त्यानं महाराजांना मुजरा केला. महाराज त्याच्याकडं न बघताच म्हणाले, 'याला काढण्या घाला आणि तुरुंगामध्ये पाठवा. आता महाराजांची आज्ञा, यापुढं कुणाची काय प्राज्ञा ? म्हणून त्याची तुरुंगात रवानगी झाली. दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि दरबार भरल्यानंतर पुन्हा शाहू महाराजांनी आठवणीनं त्या ज्योतिष्याला बोलावलं. त्याला उच्चासनावर बसवलं. त्याचा सन्मान केला. तो बिचारा अगदीच भांबावून गेला आणि तो असं म्हणाला की, 'महाराज, मला काही समजत नाही. काल मी या ठिकाणी आलो, त्यावेळी तुम्ही मला तुरुंगात का टाकलं हे समजत नाही. आणि आज तुम्ही लगेच तुरुंगातून माझी मुक्तता का केलीत आणि माझा एवढा सन्मान का केलात हे मला समजत नाही' *महाराज म्हणाले, 'मी हे सगळं एवढ्यासाठीच केलं की तुला काहीच समजत नाही, एवढं तरी तुला समजावं. तुला जर लेका, माहीत नसेल की, काल तुला अटक होणार आहे आणि तुझी सुटका होणार आहे. स्वतःचे एका दिवसाचे भविष्य ज्याला कळत नाही, त्यानं उगीच सगळ्या जगाचं भविष्य सांगत फिरण्याचा धंदा कशाला पत्करावा?'*_
_महाराष्ट्रामधल्या समाजसुधारकांनी हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. *म. फुलेंनी असं विचारलं की, 'प्रत्येक लढाई मुहूर्तावर करणारी पेशवाई बुडली आणि लढाईला मुहूर्ताशिवाय बाहेर पडणारे गोरेसाहेब जिंकले. हे कशामुळं घडलं?' त्यांनी पुढं जाऊन असा प्रश्न विचारला की, '३६ गुणांची पत्रिका जुळून आमच्या आयाबहिणींची लग्नं होतात आणि त्यांच्या कपाळी वैधव्य येतं आणि अशी कोणतीच पत्रिका न बघता गोऱ्या मडमांची लग्नं होतात आणि त्यांचे संसार सुखानं होतात. असं कशामुळं घडतं?' याचा अर्थ, फुलेंना सांगायचं होतं ते हे की, ज्यावेळेला दोन सैन्य समोरासमोर भिडतात त्यावेळी त्यांच्याकडं असलेली शस्त्रास्त्रं आणि त्यांचं मनोबल याच्यावर युद्धाचा निकाल लागतो. तो आकाशातल्या ग्रहगोल-ताऱ्यांच्यावर लागत नाही. पती आणि पत्नी यांचा संसार सुखानं चालेल की नाही हे त्यांच्या पत्रिकेतील ३६ गुणांच्यावर अवलंबून नसतं. फुलेंच्या काळामध्ये अत्यंत लहानपणी लग्नं व्हायची. मुलगी ४-५ वर्षाची असायची, मुलगा १०-१२ वर्षांचा असायचा. त्या काळामध्ये बालमृत्यूचे प्रमाण फार प्रचंड होतं. स्वाभाविकपणे अनेक स्त्रियांच्या कपाळी वैधव्य यायचं. जोपर्यंत या देशामध्ये आरोग्य व्यवस्था सुधारत नाही, बालविवाहाची प्रथा जात नाही; तोपर्यंत पत्रिकेतील गुण जमले काय वा न जमले काय, त्याला किंमत नाही. म. फुले असोत किंवा राजर्षी शाहू महाराज असोत, त्यांच्या विचार पद्धतीत अतिशय वैज्ञानिक दृष्टीकोन आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.*_
*_क्रमशः_*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*
*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २६/१२/२०२४
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment