✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_फलज्योतिषाचं थोतांड_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_24.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_भाग ६_*
*_तीन तकलादू आधार_*
_ज्यावेळेला आपली जुनी प्रतिपादनं चालत नाहीत, हे लक्षात येतं त्यावेळेला आधुनिक आधार देण्याचा प्रकार सुरू होतो. म्हणजे जुनीच दारू नव्या बाटलीमध्ये भरली जाते. हे तीन आधार असे सांगितले जातात._
१. _पहिला आधार म्हणजे ज्याप्रमाणे अमावास्येला आणि पौर्णिमेला समुद्राला भरती येते, त्याचप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळं मनाला देखील भरती येते. समुद्राची भरती ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणानं असते त्याचप्रमाणं अमावास्या पौर्णिमेला जी प्रक्षुब्धता व्यक्तीला येते, ती या चंद्रामुळे होते, *गुरुत्वाकर्षणाच्या सागरावरील परिणामाप्रमाणंच मानवी जीवनावर ग्रहगोलांचा परिणाम होतो. ही गोष्ट खोटी आहे. याचं कारण असं की ग्रहगोलांचा परिणाम चंद्रगोलांचा, गुरुत्वाकर्षणांचा परिणाम मानवी जीवनावर होतो; परंतु लक्षात घ्या, परिणाम कसा होतो, हे आपल्याला आता विज्ञानाच्या नियमाने चांगले माहीत आहे. दोन पदार्थांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणातच व अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो. याचा अर्थ असा की, एखाद्या पदार्थावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम कसा होतो हे आपल्याला या सूत्रानं शोधून काढता येतं. प्रत्येक पदार्थ दुसऱ्या पदार्थावर गुरुत्वाकर्षणाचा हा परिणाम करत असतो.* जसं माझ्यावर मी ज्या बिल्डिंगमध्ये भाषण देतोय, त्याचा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम चालू असतो. आणि माझ्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम भाषण ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांवर जसा होत आहे, तसाच माझ्या खिशातील पेनावरही होत आहे. आपण लक्षात घ्या की, समुद्राचं वस्तुमान हे इतकं प्रचंड आहे आणि त्या प्रचंड वस्तुमानाच्यामुळं काही प्रमाणात समुद्र उचंबळतो! मात्र समुद्राचे तेच पाणी जर भांड्यात घेऊन किनाऱ्यावर ठेवले तर त्याला भरती येत नाही. प्रत्येक माणसाचं वस्तुमान हे समुद्राच्या मानानं अत्यंत नगण्य असल्यामुळं अशा स्वरूपाचा कोणताच परिणाम त्याच्यावर होत नाही. आणि असा जर परिणाम होतो असं शास्त्राचं म्हणणं असेल तर आपल्याला माहीत असेल की पृथ्वीवर सतत आणि अखंड उल्कापात होत असतो. या उल्कापाताच्यामुळं पृथ्वीवर जवळपास दरवर्षी १० लाख टन धूळ साचली जाते असं मानलं जातं. याचाच अर्थ असा की, पृथ्वीचं वस्तुमान बदलतं. म्हणजे तुम्हाला पंचांगामध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट (गुरुत्वाकर्षणाचे स्थिरांक) द्यायला पाहिजे, जे ज्योतिषी कधीच देत नाही._
२. _दुसरा मुद्दा आधुनिक भाषेमध्ये मांडला जातो तो असा की, *विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे मानवी जीवनावर हे परिणाम होतात. विद्युत चुंबकीय क्षेत्राचाही मुद्दा टिकू शकत नाही. चंद्र आणि शुक्र ज्यांना व्यक्तीच्या कुंडलीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे, त्यांना चुंबकीय क्षेत्रच नाही. त्याच्यामुळं हाही मुद्दा निकालात निघतो.*_
३. _तिसरा मुद्दा येतो *ऊर्जालहरीचा की, ऊर्जालहरींच्या द्वारे हा ज्योतिषाचा परिणाम घडवून आणला जातो. ऊर्जालहरी पृथ्वीला वळसा घालून पलिकडच्या बाजूला पोचू शकत नाहीत; पण जर ऊर्जालहरींच्या द्वारे परिणाम घडवून आणला जातो असं मानलं तर मग रात्रीच्या वेळेला जी बालकं जन्माला येतात, त्यांना कुठलं भविष्यच राहणार नाही.*_
_आणखी एक मुद्दा सांगितला जातो की *पृथ्वीवर ७०% पाणी आहे माणसाच्या शरीरातही ७०% पाणी आहे. त्याच्यामुळं चंद्राचा परिणाम समुद्रावर जसा होतो, तसाच माणसाच्या शरीरावरही होतो. या उपमेला काहीही अर्थ नाही. माणसाच्या शरीरामधल्या पेशींमध्ये असलेलं पाणी आणि समुद्रातलं पाणी यांचा या पद्धतीनं संबंध जोडणं कमालीचं हास्यास्पद आहे.*_
_'उंदरांचा रंग काळा असतो, हत्तीचा रंग काळा असतो, उंदराला चार पाय असतात, हत्तीला चार पाय असतात. उंदराला एक शेपूट असतं, हत्तीला एक शेपूट असतं. म्हणून उंदीर हा हत्ती आहे!' हा युक्तिवाद अर्थहीन आहे. तोच प्रकार वरील बाबतीत आहे._
*_क्रमशः_*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*
*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २४/१२/२०२४
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment