Friday, 20 December 2024

फलज्योतिषाचं थोतांड - भाग २

 ✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_फलज्योतिषाचं थोतांड_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_20.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भाग २_*

*_फलज्योतिषाची तीन गृहितकं_*

_*शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हणजे तर्काला धरून केलेलं एखादं विधान. जे निरीक्षण, परीक्षण, काटेकोर तर्क, गणित, प्रत्यक्ष प्रचिती, प्रयोग याच्याआधारे सिद्ध करता यावं लागतं. हे जे मुक्त तर्काला धरून केलेलं विधान असतं याला आपण 'गृहीत कृत्य, हायपोथेसिस' असं म्हणतो. कुठलंही विधान तुम्ही करू शकता. हे करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र ते विधान तुम्हाला सिद्ध करावं लागतं. फलज्योतिषाचं गृहीत काय आहे? असं तुम्ही जर ज्योतिषांना विचारलं, तर ते तुम्हांला कधीच सांगणार नाहीत. कारण त्यांना ते माहीतच नाही.* परंतु फलज्योतिषाचं गृहीतक काय असावं, हे मी तुम्हाला सांगतो. आणि हे मी तुम्हाला एक शास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतो. ते तुम्हाला पटेल, याची मला खात्री आहे. तीन गोष्टी या गृहीतकामध्ये गृहीत धरल्या आहेत._

१. पहिली गोष्ट आकाशस्थ ग्रहगोलांचा परिणाम मानवी जीवनावर सतत होत असतो, 

२. दुसरी गोष्ट माणसाच्या जन्मवेळेवर तो परिणाम अवलंबून असतो आणि 

३. तिसरी गोष्ट याच्यामुळे माणसाचं भविष्य ठरतं किंवा बदलतं. 

_म्हणजे तीन गोष्टींच्या आधारे ज्योतिष बघितलं जात असतं. यापैकी प्रत्येक गोष्ट जर आपण तपासली, तर शास्त्र म्हणून ज्योतिषाला जो दर्जा दिला जातो किंवा दिला जावा असा आग्रह धरला जातो, त्यापुढची वस्तुस्थिती स्पष्ट होईल.&

*_ग्रहगोलांबाबत वस्तुस्थिती_*

_आकाशस्थ ग्रहगोलांचा आपल्या जीवनावर अखंड परिणाम होत असतो, असे मानले जाते. आपला जो सूर्य ग्रह आहे या सूर्य ग्रहाचा विशेष परिणाम आपल्यावर होत असतो. या सूर्यकुलामध्ये असलेल्या ग्रहांचा जास्त आणि नंतर आकाशस्थ असलेली नक्षत्रं, राशी यांचा प्रभाव होत असतो. यांच्याआधारे व्यक्तीचं भविष्य वर्तवता येतं, अशी कल्पना आहे. आता ज्या ग्रहगोलांच्याबद्दल ही चर्चा केली जाते त्या ग्रहगोलांची परिस्थिती काय आहे?_

_*खरं म्हटलं तर त्याच्यापैकी चंद्र हा ग्रह नाहीच. तो उपग्रह आहे पृथ्वीचा. आणि तो उपग्रह असताना जर त्याला आपल्या सूर्यकुलात स्थान असेल तर मग आपल्या सूर्यकुलात इतर छोटे-मोठे ४५ उपग्रह आहेत. त्यापैकी अनेक चंद्रापेक्षा अडीचपट मोठे आहेत असं खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. मग त्यांना कुंडलीत का बरं स्थान नसावं?*_

_*एका बाजूला चंद्र हा उपग्रह आहे तर दुसऱ्या बाजूला सूर्य हा तारा आहे. राहू आणि केतू हे जणू दाऊदच्या गँगचे खतरनाक शूटर असल्यासारखे ग्रह तर अस्तित्वातच नाहीत. पृथ्वीचं परिभ्रमण आणि चंद्राचं परिभ्रमण यांच्या छेदन कक्षाला, संपात बिंदूंना पूर्वी राहू आणि केतू असं नाव दिलेलं आहे. म्हणजे नवग्रहांच्यापैकी एक ग्रह नाही, तारा आहे; अनेक ग्रहांना उपग्रह आहेत; दोन ग्रह अस्तित्वातच नाहीत. म्हणजे ९ पैकी ४ बाबी मुळातच अस्तित्वात नाहीत; जवळपास ४४ टक्के बाबी तर पायामध्येच चुकल्या.*_

_त्याच्याही पेक्षा एक आणखी महत्त्वाचा प्रश्न. ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रामध्ये हमखास चुकीचं मिळतं. *प्रश्न असा आहे की, आपल्या सूर्यकुलात माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात खतरनाक ग्रह कोणता? आपल्या सूर्यकुलातील माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात खतरनाक, सगळ्यात प्रभावी ग्रह कोणता याचं उत्तर आपल्याकडं बहुधा शनी अथवा मंगळ असं दिलं जातं. याचं बरोबर उत्तर अजूनही महाराष्ट्रात मला मिळालेले नाही. लक्षात घ्या, मी आपल्याला विचारतो की, ज्या सूर्यकुलामध्ये आपली पृथ्वी आहे त्या सूर्यकुलामधला सगळ्यात प्रभावी ग्रह कोणता ? आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, आपल्या दृष्टीनं सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात खतरनाक ग्रह पृथ्वी. कारण शेवटी आपलं सगळं आयुष्य या पृथ्वीवर जायचं असतं. शनीवर प्लॉटचे दर काय चाललेले आहेत आणि घर बांधायला परवडेल का नाही? आणि मंगळावर पाण्याचा पुरवठा आहे की पाण्याची टंचाई आहे? याच्याशी आपला सुतराम संबंध नसतो. आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा असलेला ग्रह पृथ्वी हा आपल्या कुंडलीमध्ये का नसतो? तो आपल्या कुंडलीमध्ये नसतो याचं कारण फलज्योतिषतज्ज्ञ सांगतात की पृथ्वी ही सूर्यकुलाच्या मध्यभागी आहे. आता पृथ्वी ही सूर्यकुलाच्या मध्यभागी आहे असे म्हणणे याचा अर्थ काय होतो? एका फटक्यामध्ये तुम्ही कोपर्निकसपासून नारळीकरांच्यापर्यंत सगळ्यांना मोडीत काढता. आज तिसरीतल्या शाळेतल्या पोरांनी जरी हे लिहिलं, तरी त्याला पास होण्यापुरते मार्क शिक्षक देणार नाहीत. म्हणजे मुळात पायाच जेथे सदोष आहे, त्याच्या आधारे शास्त्राची निर्मिती कशी होणार?*_

_शास्त्राच्या निकषांमध्ये एक महत्त्वाचा निकष असा आहे की, निरीक्षणं करावी लागतात. ही निरीक्षणं कशासाठी असतात? सातत्यानं निरीक्षण करत गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची सत्यता उलगडली जाते. समजा एखाद्या झाडाला रोज सकाळी फूल येतं, तर त्याचं निरीक्षण सहज करता येईल. दोन वर्षातून एकदाच फळ येतं तरी निरीक्षण करता येईल. शंभर वर्षातनं एकदाच येतं, तर निरीक्षण करणं अवघड आहे; पण शक्य आहे. परंतु पृथ्वी, बाकीचे ग्रह आणि अन्य नक्षत्रं आणि राशी यांच्याबाबतीतली ही निरीक्षणं- यांची स्थिती काय आहे? पूर्वी आपण असं मानायचो की, हे ग्रह म्हणजे जणू काही नक्षत्रांच्या गर्दीमधून वाट काढत चालत असतात. आता आपणास समजलं आहे की, हे ग्रह आणि नक्षत्रे यांच्यामध्ये महाअफाट अंतर आहे. प्रचंड पोकळी आहे. ही पोकळी साधारण ५० हजार अब्ज मैल एवढी आहे. आता ५० हजार अब्ज मैल म्हणजे चटकन विचारलं, तर पाचावर किती शून्यं सांगता येणार नाही हल्ली एवढे मोठे आकडे ऐकायची आपल्याला सवय लागलीय, याचं एकच कारण म्हणजे आपल्या देशाचं कर्ज हे असं फार मोठं अब्ज आणि कोटी रु. मध्ये आहे. तर केवळ एवढीच गोष्ट घेऊ या. *ज्या आकाशगंगेचा आपला सूर्य हा तारा किंवा सूर्यकुल एक भाग आहे, त्या एकटया आकाशगंगेमध्ये सूर्याच्यापेक्षा अधिक प्रभावी असे एकंदरीत २०० अब्ज तारे आहेत. हा आकडा तुम्ही पुन्हा तपासू शकता. २० हजार कोटी एवढे सूर्याच्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात प्रभावी असे तारे या आकाशगंगेमध्ये आहेत.* आता आपण जर असं लक्षात घेतलं की, ही महाप्रचंड पोकळी, या महाप्रचंड पोकळीच्या पलीकडे फिरणारे हे अनेक ग्रह, त्याच्यानंतर हे असंख्य सूर्य तर तुम्हाला लक्षात येईल की, निरीक्षण करण्यासाठी तीच परिस्थिती परत यावी लागते. १०० वर्षातून एकदा फुलणाऱ्या फुलाची परिस्थिती तपासणे काही शतकं मिळून शक्य आहे. पण एक फूल जर असं असेल की एक लाख वर्षात एकदा फुलतं; तर मानवी इतिहासामध्ये त्याचा अभ्यास करणं हे अशक्य होऊन बसेल. निरीक्षणासाठी तीच स्थिती परत यावी लागते आणि जर आपण ग्रह, आकाशगंगेतले बाकीचे तारे की ज्यांचाही परिणाम स्वाभाविकपणे आपल्या शरीरावर होत असणार, त्या सगळ्यांचा विचार केला तर नेमकी तीच परिस्थिती पुन्हा कधीच येणं शक्य नाही. तेव्हा निरीक्षण शक्य नाही आणि त्याच्याआधारे शास्त्र शक्य नाही._

_आणि आणखी एक गमतीची गोष्ट आपण लक्षात घ्यावयास हवी. एखादी गोष्ट शास्त्र कशी सिद्ध होते? *समजा १०० गोष्टींचा एक काढा केला आणि तो काढा घेतल्यानंतर एक आजार हमखास बरा होतो. त्या १०० वनस्पतींच्यापैकी कुठल्या वनस्पतीचा नेमका गुण आला, हे कळणं अवघड आहे. यासाठी तुम्हाला मग वगळण्याच्या पद्धतीप्रमाणे जावं लागेल की, त्यातली एक-एक वनस्पती वगळायची आणि ती वनस्पती वगळल्यानंतर तयार होणाऱ्या काढ्यामध्ये गुण येण्यामध्ये काय फायदे-तोटे होतात याच्या नोंदी करायच्या आणि मग त्याच्या आधारे आपल्याला कळू शकतं की कुठल्या वनस्पतीमध्ये कोणता गुण आहे. मात्र १०० वनस्पतींच्या केलेल्या काढ्यावरून प्रत्येक वनस्पतीच्या कोणत्या गुणधर्मामुळे गुण आला, हे सांगता येत नाही. आता आपल्यावर सतत आणि अखंड सूर्यकुलातल्या सर्व ग्रहांचा परिणाम होत असतो. यापैकी मंगळाचा परिणाम, शनीचा परिणाम, गुरूचा परिणाम असा असा आहे. असं आपल्याला सांगितलं जातं. असं आपल्याला सांगितलं जाण्यासाठी ते आधी तपासायला हवं. आणि ते तपासलं जाण्यासाठी मंगळाचा परिणाम जर तपासायचा असेल तर बाकीच्या ग्रहांचा परिणाम, बाकीच्या सर्व ग्रहांचे परिणाम हे त्यावेळेला थांबविण्याची व्यवस्था घडावयास हवी. अन्यथा एकटा मंगळ, एकटा शनि हे कोणत्या प्रकारे व्यक्तिगत प्रभाव टाकतात हे लक्षात येणार नाही. याचा अर्थ असा की, अशी तरतूद जर नसेल तर प्रत्येक ग्रहाला जे गुण चिकटवलेले आहेत, त्यांना निरीक्षणाचा कुठलाच स्वतंत्र पाया नाही. जसा १०० औषधांच्या बनवलेल्चा काढ्यामध्ये जर स्वतंत्र तपासणी केली नसेल तर प्रत्येक वनस्पतीचा गुण कोणता याला कोणताच शास्त्रीय आधार नाही.*_

_याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा भाग असा की, *ज्यावेळेला माणसानं फलज्योतिष शोधून काढलं त्यावेळी त्यानं आकाशस्थ ग्रहांचे आकाशातील पोकळीचे १२ भाग केले. आणि या १२ भागांना विशिष्ट गुणधर्म जोडले. आकाशातल्या पोकळीचे हे १२ भाग करायचे, ते कायमस्वरूपी मानायचे आणि त्याला विशिष्ट गुणधर्म द्यायचे- हा एक प्रचंड विनोद आहे. एकतर आपल्याला माहीत आहे की, आपली पृथ्वी फिरते. परंतु आपल्याला पृथ्वी फिरते हे अजिबात जाणवत नाही; कारण आपली पृथ्वी दिवसाला ५४ हजार मैल एवढ्या वेगाने फिरते. स्वाभाविकपणेच ज्या आपल्या बाजूच्या अवकाशातल्या ग्रहगोलांचं आपण निरीक्षण करतो ते आपलं अवकाश हे बदलत असतं. ते जे बदलतं अवकाश असतं, त्या अवकाशातल्या १-१ तुकड्याला १-१ विशिष्ट प्रकारचा गुणधर्म आहे; त्याला कसलाही काडीचाही आधार आतापर्यंत कोणीही दिलेला नाही. त्यामुळे जो विचार केला जातो, जी मांडणी केली जाते, ती अजिबात शास्त्रीय नाही.*_

_काही नक्षत्रं सात्त्विक आहेत. काही राशी नपुंसक आहेत. मंगळ आणि रवी पुरुष प्रकृतीचे ग्रह आहेत. चंद्र व शुक्र स्त्री प्रकृतीचे आहेत. बुध व शनि नपुंसक आहेत. याला पुरावा काय? काही नक्षत्रं दुर्बल तर काही प्रबळ का? पुरावा काय? नक्षत्रं व राशी, पृथ्वी, जल, वायू व अग्नी यांपासून बनल्या याला पुरावा काय? या सर्व गृहीतांना काडीचाही आधार नाही. हे जर सगळं आपण विचारात घेतलं, तर आपल्या लक्षात येईल की, *आकाशस्थ ग्रहगोलांचे परिणाम मानवी जीवनावर अखंड आणि सतत होत असतात ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या टिकणारी नाही.* आणि *अलिकडे लागलेल्या शोधांमुळे आणखी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ज्याच्यामुळे तथाकथित ज्योतिषशास्त्राचा पायाच उखडला गेला. आपण असं मानतो की, पृथ्वी ही सूर्याभोवती व स्वतः भोवती फिरत असते. या दोन्हीही गती पृथ्वीला असतात. परंतु पृथ्वीला एक तिसरी गती असते. त्याला परांचन असं म्हणतात. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना आणि सूर्याभोवती फिरत असताना स्वतःच्या आसाशी झोकांड्या खाते आणि त्यामुळे पृथ्वीचा आस हा हळूहळू बदलतो. तो किती बदलतो, २६ हजार वर्षांमध्ये ही झोकांडी ३६० अंशामधून पूर्ण होते. याचा अर्थ असा की, जर पृथ्वीचा आस हा ध्रुवाकडे रोखलेला असेल; तर आजपासून ११ हजार वर्षांनी तो व्होगा नावाच्या नक्षत्राकडे रोखलेला असेल. पृथ्वी स्वतःच्या आसाशी झोकांड्या खाते. दोन हजार वर्षांपूर्वी फलज्योतिष हे शास्त्र निर्माण झाले, त्यावेळेला अवकाशाचे १२ भाग केले गेले. परंतु २६ हजार वर्षांमध्ये जर पूर्ण ३६०° अंशातून पृथ्वी फिरणार असेल तर दोन हजार वर्षांमध्ये जवळपास एका राशीमधून पृथ्वीचा आस फिरला. म्हणजे त्यावेळेला वृषभ राशी मध्ये जी नक्षत्रं होती ती आता मिथुन राशीमध्ये आली आणि निरीक्षणाचा पायाच बदलला. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या, तर आपल्याला असं पटेल की, फलज्योतिष याला आकाशस्थ ग्रहगोलांच्या निरीक्षणाच्या आधारे शास्त्राचा दर्जा देण्याचं काही कारण नाही.*_

*_क्रमशः_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*

*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २०/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...