🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अधम्म म्हणजे काय?_*
_* ७. केवळ धम्मग्रंथांचे पठन म्हणजे अधम्म होय*_
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_6.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_ब्राह्मणांनी सर्व भर विद्येवर दिला आहे. त्यांची अशी शिकवण आहे की विद्याच अथ (सुरवात) आहे आणि विद्याच इती (शेवट) आहे. यापुढे कशाचाही विचार करण्याची आवश्यकता नाही. याविरुद्ध *बुद्ध सर्वांकरिता विद्या, सर्वांना शिक्षा यांचे पक्षपाती होते. याशिवाय मनुष्य प्राप्त ज्ञानाचा, विद्येचा उपयोग कसा करतो यात बुद्धांना अधिक रुची होती. ज्ञानासाठी ज्ञान यात त्यांना काही गम्य नव्हते.*_
_*परिणामस्वरूप त्यांचा आग्रह होता की, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे शीलही असलेच पाहिजे. शीलाशिवाय ज्ञान म्हणजे अनर्थाला आमंत्रणच.*_
_भिक्खू पटीसेनाला बुद्धांनी जे सांगितले त्यात *बुद्ध प्रज्ञेच्या तुलनेने शीलाला अधिक महत्त्व देतात हे स्पष्ट आहे.* प्राचीन काळी बुद्ध श्रावस्ती येथे वास करीत होते तेव्हा त्याच वेळी श्रावस्ती येथे पटीसेन नावाचा वृद्ध याचक वास्तव्याला होता. तो प्रवृत्तीने मंदमती आणि मूढमती होता. त्याला एका गाथेचे अध्ययन करणेही कठीण होते._
_अशा स्थितीत बुद्धांनी पाचशे अर्हतांनी क्रमाक्रमाने एक एक दिवस त्याला शिकवावे अशी व्यवस्था केली. तीन वर्षे उलटून गेली तरीही त्याला गाथा मुखोद्गत करता आली नाही._
_तेव्हा त्या जनपदातील सर्वप्रकारचे लोक (चारही वर्गातील लोक) त्याचे अज्ञान जाणून त्याची निंदा करू लागले. त्याची टवाळी करू लागले. बुद्धांना त्याची दया आली. बुद्धांनी त्याला आपल्या निकट बोलाविले आणि मृदु मधुर स्वरात पुढील गाथा कथन केली._
*_"ज्याची वाणी संयत आहे. ज्याचे चित्त संयत आहे. जो कायेने कोणावरही आघात करीत नाही असे आचरण करणाऱ्या माणसाला निर्वाण प्राप्त होते."_*
_पटीसेन तथागतांच्या करुणेने हेलावला. त्याचे चित्त प्रमुदित झाले. त्याने गाथा पुनरुक्त केली. मुखोद्गत केली. बुद्धांनी त्याला पुढे असा उपदेश केला की, "हे वृद्ध भिक्खू, तुला फक्त एकच गाथा अवगत आहे. इतरांना याची माहिती आहे. ते तुझी निंदा करतील. म्हणून मी तुला या गाथेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून सांगणार आहे. तू सावधान चित्ताने तो ग्रहण करावा.'_
_त्यानंतर *बुद्धांनी कायेचे तीन अकुशल कर्म, वाणीचे चार अकुशल कर्म आणि चित्ताचे तीन अकुशल कर्म त्याला स्पष्ट करून सांगितले. त्याला हेही स्पष्ट करून सांगितले की या अकुशल कर्मापासून विरत झाल्यास माणसाला निर्वाण प्राप्त होते. बुद्धांनी त्याला अशाप्रकारे देशना दिल्याने त्या भिक्खूला सत्याचे ज्ञान झाले. तो अर्हत पदास प्राप्त झाला.*_
_याचसमयी पाचशे भिक्खुनी विहारात वास्तव्याला होत्या. त्यांनी बुद्धांकडे आपणापैकी एकीला पाठविले आणि प्रार्थना केली की, त्यांना धम्मोपदेश देण्यासाठी भिक्खू पाठवावा. त्यांची प्रार्थना बुद्धांनी स्वीकारली. बुद्धांनी अशी मनीषा व्यक्त केली की पटीसेनाने त्यांच्याकडे जावे आणि त्यांना धम्मोपदेश द्यावा._
_ही व्यवस्था केली आहे हे ऐकल्यावर त्या सर्व भिक्खुनी हसू लागल्या. त्यांनी सर्वांनी असे ठरविले की, भिक्खू पटीसेन उद्या आल्यावर त्या गाथेचे उलटे पठन करावे म्हणजे तो वृद्ध भिक्खू गोंधळून जाईल व लज्जित होईल._
_दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भिक्खू आला तेव्हा सर्व लहान थोर भिक्खूंनींनी त्याचे स्वागत केले. त्याला वंदन केले. असे करताना त्या एक दुसरीकडे पाहून स्मित करीत होत्या._
_त्यांनी त्या भिक्खुला आसन प्रदान केले. तो आसनस्थ झाल्यावर त्याला त्यांनी अन्नदान केले. अन्न ग्रहण करून कर प्रक्षालनानंतर त्यांनी त्या भिक्खूला धम्मोपदेश द्यावा अशी प्रार्थना केली._
_"भगिनींनो, मी अल्पबुद्धी आहे. माझे ज्ञान सीमित आहे. मला फक्त एकच गाथा अवगत आहे. मी ती गाथा आपणापुढे कथन करणार आहे. मी त्या गाथेचा अर्थही आपणास स्पष्ट करून सांगणार आहे. तुम्ही हा उपदेश सावधान चित्ताने ग्रहण करावा आणि समजून घ्यावा."_
_त्यानंतर सर्व युवा भिक्खुनींनी ती गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला. परंतु हे काय! त्यांच्या मुखातून शब्दच बाहेर पडले नाही. त्या लज्जित झाल्या. त्या दुःखीकष्टी झाल्या. त्यांच्या माना लज्जेने खाली वाकल्या._
_पटीसेनाने ती गाथा गायिली. ज्याप्रमाणे बुद्धांनी त्याला ती गाथा समजावून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद करून सांगितला. *सर्व भिक्खुनी त्याची वाणी श्रवण करून आश्चर्यचकित झाल्या. तो धम्मोपदेश श्रवण करून त्या प्रमुदित झाल्या. प्रसन्नता पावल्या. त्यांनी पटीसेनाला मनापासून वंदना केली. त्या सर्व अर्हत पदास प्राप्त जाहल्या.*_
_दुसऱ्या दिवशी राजा प्रसेनजिताने बुद्धांना त्यांच्या समस्त भिक्खुसंघासहित राजप्रासादी भोजनास्तव आमंत्रित केले. *बुद्धांनी पटीसेनाची विशेष उन्नत अवस्था जाणिली. त्याने अर्जित केलेली श्रद्धा जाणिली. पटीसेनाने त्यांचे भिक्षापात्र धारण करावे आणि त्याच्यासह असावे अशी बुद्धांनी मनीषा व्यक्त केली.*_
_ते सर्व राजप्रासादाच्या प्रवेशद्वारी आले. द्वारपाल पटीसेनाचा पूर्वपरिचित होता. त्याने *पटीसेनाला राजप्रासादी प्रवेश दिला नाही. द्वारपाल वदला, "ज्या भिक्खुला एकच गाथा अवगत आहे अशा भिक्खूचे आम्ही आतिथ्य करीत नाही. तुझ्यासारख्या सामान्य भिक्खुला येथे स्थान नाही. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भिक्खूंना वाट मोकळी कर आणि तू चालायला लाग."* त्यामुळे पटीसेन प्रवेशद्वारा- बाहेरच थांबला. तेथेच आसनस्थ झाला._
_बुद्ध आसनस्थ झाले. त्यांनी कर प्रक्षालन केले. परंतु हे काय? भिक्षापात्रासहित पटीसेनाचा हात तेथे उपस्थित झाला. राजा, त्याचे अमात्य आणि उपस्थित सर्व हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले आणि उद्गारले, "अरे हा कोण आहे?"_
_त्यावर बुद्ध उत्तरले, *"हा भिक्खू पटीसेन आहे. त्याला नुकतीच बोधी प्राप्त झाली आहे. त्याने माझे भिक्षापात्र धारण करावे आणि माझ्यासवे यावे हे मीच त्याला सुचविले होते. परंतु द्वारपालाने त्याला प्रवेश नाकारला."*_
_त्यानंतर पटीसेनाला प्रवेश दिला गेला आणि तोही भिक्खुसंघात सहभागी झाला. त्यानंतर राजा प्रसेनजित बुद्धांकडे वळून वदला, "मी असे ऐकिले आहे की पटीसेन हा अल्प क्षमतेचा भिक्खू आहे. त्याला फक्त एकच गाथा अवगत आहे. तर मग त्याला बोधी कशी प्राप्त झाली."_
_यावर बुद्ध उत्तरले, *"ज्ञान अधिक नसले तरीही चालेल पण ज्ञानापेक्षा शील अधिक महत्त्वाचे आहे."*_
_"या *भिक्खू पटीसेनाने एका गाथेचे मर्म जाणिले. त्याने ती गाथा हृदयस्थ केली. त्याची काया, वाचा आणि चित्त पूर्ण शांत पावले. माणूस खूप ज्ञानी असेल पण त्याचे आचरण त्या अनुसार नसेल तर त्याचे सारे ज्ञान त्याला विनाश पथापासून वाचवू शकत नाही. अशा ज्ञानाचे प्रयोजन काय ?*_
_त्यानंतर बुद्ध म्हणाले, *"एखादा माणूस हजार गाथांचे पठन करतो. परंतु तो ज्या गाथा उच्चारतो त्यापैकी एकाही गाथेचे मर्म तो जाणत नाही तर त्याचे हे पठन व्यर्थ आहे. एकच गाथा जी समजून उमजून पठन केली जाते आणि जिच्या पठनामुळे चित्त शांत होते अशा एका गाथेच्या पठनाची बरोबरी त्या हजार गाथा करू शकणार नाही. न समजता, न उमजता, हजार गाथा पठन केल्या तर त्याचे प्रयोजन काय? पण एकच गाथा श्रवण केली. समजली, उमजली, सत्य आकलन झाले आणि त्यानुसार आचरण केले तर माणसाला निर्वाण प्राप्त होते."*_
_*माणूस अनेक गाथांचे पठन करीत असेल पण त्या गाथा त्याला समजत नसतील. त्या त्याला समजावून सांगता येत नसतील तर ते पठन व्यर्थ आहे. परंतु धम्माचे एक पद जाणणे, त्यानुसार आचरण करणे हाच निर्वाण प्राप्तीचा मार्ग आहे.* हे वचन ऐकून ते दोनशे भिक्खू, तो राजा आणि त्याचे अमात्य प्रमुदित झाले. प्रसन्नता पावले._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०७/०८/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment