Saturday, 17 August 2024

बौद्ध धम्मातील पौर्णिमेचे महत्त्व

बौद्ध धम्मातील पौर्णिमेचे महत्त्व

वैशाख पौर्णिमा


बुद्ध जयंती


ज्ञानप्राप्ती


महापरिनिर्वाण दिन


वै शाख पौर्णिमा हा जगभरातील बौद्धांचा महान व मंगल दिन आहे. या पौर्णिमेला तीन मंगलमय घटना घडल्या आहेत. त्या आपण समजून घेणार आहोत. पहिले महत्व प्रसिद्ध आहे. इ. स. पूर्व काळात कपील वस्तू नगरीचा राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांना अनेक वर्षापासून मूल नव्हते. काही कालांतराने महामायेला गर्भधारणा झाली होती तेव्हा आपल्या पहिल्या प्रसूतिसाठी आपल्या माहेरी देवदहा नगरीला माहामायेला पालखीत बसवून घेऊन जात होते. नेपाळ प्रांतात तराईमध्ये लुंबिनी नावाचे प्रसिद्ध वन आहे. या स्थळी पालखी येताच महामाया आपल्या दास दासींना पालखी थांबविण्यास सांगितले. मला थोडी विश्रांती घ्यावयाची आहे आणि तुम्हालाही थोडी विश्रांती मिळेल. असा आदेश होताच नोकराने पालखी थांबविली. महामाया पालखीतून उतरली आणि दासी बरोबर बोलत बोलत शाल वृक्षाच्या शीतल छायेत उभी राहिली असता त्या शाल वृक्षाची एक फांदी खाली आलेली होती. ती महामायेने हातात धरली आणि बोलत असता हवेचा जोरात झोका आला त्या बरोबर शाल वृक्षाची फांदी वर उचलली गेली. त्यामुळे महामायेच्या शरीराला हेलकावा बसला आणि तिला प्रसूतिच्या वेदना होऊ लागल्या. त्या स्थळीच महामाया प्रसूत झाली. त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. ऋतू ग्रीष्म, वार शुक्रवार, नक्षत्र विशाखा होते. अशा मंगल वेळी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. या मंगल प्रसंगाने ही पौर्णिमा पवित्र ठरली आहे. इ. स. पूर्व ५६३ ला ही मंगल घटना घडली आहे. जगात वैशाख पौर्णिमा पवित्र मानली जाते. राजाला ही गोड बातमी समजताच त्याला फार आनंद झाला. नगरीत सर्व लोकांत आनंदाचे वातावरण पसरले होते. बाळाला कपिलवस्तू नगरीला आणले जाते. पाचव्या दिवशी बाळाचे नांव ठेवले जाते सिद्धार्थ गौतम. हे पहिले महत्त्व वैशाख पौर्णिमेचे आहे.


वैशाख पौर्णिमेचे दुसरे महत्व असेच महान आहे. कपिलवस्तूचे शाक्य आणि बाजूच्या नगरीचे कोलीय या दोन संघात रोहीणी नदीच्या वाटपावरुन संघर्ष निर्माण झाला. तो युद्धाच्या विषयापर्यंत पोहोचला. सिद्धार्थ गौतमाने त्या युद्धाचा विरोध  केला. त्या कारणाने संघाने सिद्धार्थ गौतम संघाच्या विरुद्ध गेला म्हणून त्याला शिक्षा ठोठावली. त्या कारणाने गृह त्याग करावा लागला. गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या आश्रमात चिंतन मनन केले. वयाच्या ३५ व्या वर्षी इ. स. पूर्व ५२८ ला वैशाखी पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधि प्राप्त झाली. त्यादिवशी बुधवार होता. बोधी वृक्षाखाली सिद्धार्थ बसला असता वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे या दिनाला 'संबोधी दिन' असे म्हणतात- या कारणाने ही पौर्णिमा मंगल दिन म्हणून मानली जाते.


वैशाख पौर्णिमेला तिसरे महत्व विशेष महत्त्वाचे व प्रसिद्ध आहे. बुद्धतव प्राप्ती नंतर तथागत संपूर्ण मानवाच्या कल्याणाचा, हिताचा जीवन मार्ग आपल्या वाणीमधून सांगत फिरले. अनेक राजे, महाराजे, काही साधू, मुनी, ब्राह्मण, श्रमण तथागत भगवान बुद्धाला शरण आले. त्यांच्या धम्माचा स्वीकार केला. मानवाला देव, आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म या काल्पनिक गोष्टींपासून मुक्त केले. यज्ञयाग, कर्मकांड, उपवास, पूजापाठ, नवस, सायास या अज्ञानातून मानवास मुक्त केले. अंगुलीमालासारख्या खुनी माणसाला पवित्र जीवन जगण्याचा महान संदेश दिला. तसेच आम्रपाली या नर्तकीला-गणिकेला भिक्षुणी संघात सामील करुन घेऊन तिला निर्मळ जीवन जगून निर्वाण प्राप्त करून देण्याचे महान कार्य केले. अशी ४५ वर्षे पायी प्रवास केला आणि वयाच्या ८० व्या वर्षी इ. स. पूर्व ४८३ मध्ये वैशाख पौर्णिमेला कुशीनगर येथील शाल वनात दोन शाल वृक्षांच्यामध्ये महापरिनिर्वाण झाले. त्या दिवशी मंगळवार होता. जगाला शांततेचा, सदाचाराचा, सद्गुणाचा मार्ग दाखविणारे महान असे मार्गदाते भगवान बुद्ध ठरले. म्हणून ही पौर्णिमा महान 'मंगल दिन' म्हणून साजरी करतात. या दिवशी विहारात सर्व उपासक-उपासिका, लहान बाल- बालिका जमतात. बुद्ध पूजापाठ करतात, वंदन सूत्र पठण, प्रवचने, सभा सम्मेलने आयोजित केली जातात. या दिवशी उपोसथ व्रत धारण करुन अष्टशीलाचे पालन करावे. पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात असा मंगल दिन आहे. सण उत्सव आहे. जन्म, ज्ञान प्राप्ती, महापरिनिर्वाण या तीन घटना एकाच दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून या पौर्णिमेला अनन्य साधारण स्थान प्राप्त झाले आहे. अशी ही मंगलमय वैशाखी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती असेही म्हणतात.


No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...