Thursday, 1 August 2024

ईश्वरावर श्रद्धा हे धम्माचे अनिवार्य, आवश्यक अंग नव्हे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*२. ईश्वरावर श्रद्धा हे धम्माचे अनिवार्य, आवश्यक अंग नव्हे*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_सृष्टीचा निर्माता कोण? हा सर्वसामान्य प्रश्न आहे. या सामान्य प्रश्नाचे सामान्य उत्तर असे आहे की, सृष्टीचा निर्माता, रचियता ईश्वर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला विविध नावांनी संबोधिले जाते. त्याला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म किंवा महाब्रह्म आदी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे? तो कसा अस्तित्वात आला? या प्रश्नांना मात्र काहीही उत्तरे नाहीत. ज्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे ते म्हणतात, ईश्वर सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे. त्याने संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. तो सर्वज्ञ आहे, असे ते मानतात. ईश्वराच्या ठायी काही नैतिक गुण असल्याचेही सांगितले जाते. ईश्वर शिव (मंगल) आहे. ईश्वर न्यायी आहे. ईश्वर करुणाघन आहे आदी._

_*प्रश्न असा आहे की, तथागतांनी ईश्वराला सृष्टीचा निर्माता, रचियता म्हणून स्वीकारले आहे काय?  याचे उत्तर "नाही" असे आहे. त्याने ईश्वराला सृष्टीचा निर्माता, रचियता म्हणून स्वीकारले नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत नाकारण्याची अनेक कारणे आहेत.*_

१. _कोणीही ईश्वर पाहिला नाही. लोक ईश्वराविषयी फक्त बोलतात._

२. _ईश्वर अज्ञात आहे. अदृश्य आहे._ 

३. _ईश्वराने सृष्टी निर्माण केली हे कोणीही सिद्ध करू शकला नाही. वस्तुतः सृष्टी उत्क्रांत झाली. कोणीही निर्माण केली नाही._

४. _ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचे लाभ ते कोणते? यात कोणताही लाभ नाही. कोणाचाही लाभ नाही._ 

_*बुद्ध असे म्हणतात की, ईश्वरावर आश्रित धर्म हा धर्मच नव्हे. त्याचा असून आणि नसूनही काहीच उपयोग नाही. यामुळे केवळ मिथ्या विश्वास उत्पन्न होतो. अंधश्रद्धा उत्पन्न होतात.* बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडला नाही. त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंवर विचार केला. ज्या कारणास्तव बुद्धाने या सिद्धांताचा अस्वीकार केला ती कारणे अनेक आहेत._

_त्यांचा असा युक्तिवाद आहे न की, ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारित नाही. *बुद्धांनी त्यांचा हा तर्क वासेठ्ठ भारद्वाज या  ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात सुस्पष्टपणे मांडला आहे.*_ 

_मुक्तीचा, मोक्षाचा सत्य पथ कोणता आणि मिथ्या पथ कोणता यावर या दोन ब्राह्मणांत विवाद उत्पन्न झाला होता. याच समयी तथागत कोशल - जनपदात चारिका करीत होते. त्यांच्या समवेत मोठा भिक्खू समुदाय होता. असे घडले की त्यावेळी *तथागत अचिरावती - नदीकाठी असलेल्या ब्राह्मणांची नगरी मनसाकद येथे आम्रवनात विहारास्तव थांबले.*_ 

_*वासेठ्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकद नगरीचे रहिवासी.* जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्याच नगरीत वास्तव्याला आहेत तेव्हा ते तथागतांकडे गेले. प्रत्येकाने तथागतांसमक्ष आपआपला दृष्टिकोन कथन केला._

_भारद्वाज म्हणाला, "तरुख्ख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. हा मुक्तीचा प्रत्यक्ष मार्ग आहे. जो या मार्गाचे अनुसरण करतो त्याला हा मार्ग सरळच ब्रह्माशी एकात्म करतो. एकरूप करतो."_ 

_वासेठ्ठ म्हणाला, "हे श्रमण गौतमा, विविध ब्राह्मणांनी विविध मार्गांचा उपदेश केला आहे. अध्वर्य ब्राह्मण, तैत्तिरिय ब्राह्मण, कन्छोक्य ब्राह्मण आणि भिहुवर्गीय ब्राह्मण. हे सर्व त्यांच्या मताच्या मानणाऱ्यांना ब्रह्माशी एकात्म, एकरूप होण्याचा मार्ग दाखवितात. त्यांच्या मार्गाचे अनुसरण करणारा ब्रह्माशी एकात्म होतो, एकरूप होतो असा त्यांचा आग्रह आहे._

_जसे एखाद्या नगराच्या आसपास अनेक वाटा असतात पण त्या सर्वच वाटा त्या नगरालाच येऊन मिळतात. तद्वतच अनेक ब्राह्मणांनी मुक्तीचे अनेक मार्ग सांगितले असले तरीही ते सर्वच मार्ग त्या मार्गाचे अनुसरण करणाऱ्यांना ब्रह्मात विलीन करतात. ब्रह्मात एकरूप करतात._ 

_तथागतांनी प्रश्न केला, "वासेठ्ठ, ते सर्व मार्ग योग्य आहेत असे तुझे म्हणणे आहे काय?"_ 

_"होय हे श्रमण गौतमा, माझे तसेच म्हणणे आहे."_

_*"परंतु वासेठ्ठ, तीनही वेदांच्या ज्ञात्या ब्राह्मणांपैकी कोणी एकतरी असा आहे काय ज्याने ब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे."*_

_"नाही, खरेच हे श्रमण गौतमा, असा कोणीही नाही."_

_*"या तीनही वेदांच्या ज्ञात्या ब्राह्मणांच्या आचार्यांपैकी कोणी एक तरी असा आहे काय ज्याने ब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे."*_

_"नाही, खरेच हे श्रमण गौतमा, असा कोणीही नाही."_

*_"कोणीही ब्रह्माला साक्षात पाहिले नाही. कोणालाही ब्रह्माचे सविकल्प ज्ञान नाही." "होय असेच आहे."_*

_वासेष्ठ बोलला. "मग तुम्हाला असा विश्वास कसा आहे की, ब्रह्माचे अस्तित्व आहे हे ब्राह्मणांचे कथन सत्यावर आधारित आहे."_

_*"वासेठ्ठ, जसे करबद्ध, पंक्तिबद्ध दृष्टिहीनांची रांग असावी. त्यांच्यापैकी सर्वात पुढे आहे त्याला काही दिसत नाही. जो मध्ये आहे त्याला काही दिसत नाही आणि जो अंती आहे त्यालाही काही दिसत नाही. त्याचप्रमाणे हे वासेठ्ठ, माझ्या मते ब्राह्मणांचे कथनही अशा दृष्टिहींनाच्या रांगेसारखे आहे. अन्य काहीही नाही. या रांगेतील प्रथम आहे त्याला काही दिसत नाही. जो अंती आहे त्यालाही काही दिसत नाही. तसेच या ब्राह्मणांचे हे कथन असेच उपहासास्पद आहे. ते केवळ शब्द आहेत. पोकळ आणि निरर्थक शब्द."*_ 

*_"काय हे असे नाही का, की एखादा माणूस अशा स्त्रीच्या प्रेमात पडला आहे की ज्या स्त्रीला त्याने पाहिलेही नाही."_*

_"होय हे असेच आहे." वासेठ्ठ उत्तरला._

_*आता वासेठ्ठा, तुला काय वाटते. "जेव्हा लोक त्या माणसाला विचारतील की, ठीक आहे, प्रिय मित्रा, या भूप्रदेशातील अति सुंदर अशा ज्या स्त्रीच्या प्रेमात तू पडला आहेस, तू जिची कामना करतो आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय स्त्री आहे काय? किंवा ती ब्राह्मण स्त्री आहे काय? किंवा ती वैश्य स्त्री आहे काय? किंवा शूद्र स्त्री आहे काय?"*_

_*सृष्टीचा तथाकथित रचियता, निर्माता महाब्रह्म, त्याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करताना तथागत भारद्वाज आणि वासेठ्ठ या ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, "ज्या प्राण्याने प्रथम जन्म घेतला तो स्वतःविषयी विचार करू लागला की मी ब्रह्म आहे. मी महाब्रह्म आहे. मी निर्माता आहे. मी रचियता आहे. मीच प्रमुख आहे. मीच नियामक आहे. मीच नियंत्रक आहे. मी आपलाच स्वामी आहे. मीच सर्वांचा पिता आहे. जे आहेत त्यांचाही आणि जे होतील त्यांचाही. माझ्या मुळेच ही जीव सृष्टी उत्पन्न झाली आहे."*_

_*"याचा अर्थ असा की, ब्रह्मा हा सर्वांचा पिता आहे. जे आहेत त्यांचाही अणि जे होतील त्यांचाही.*_

*_"तुमचे असे म्हणणे आहे की, तो पूज्य आहे. तो विजेता आहे. तो अविजित आहे. जे आहेत त्यांचा तो पिता आहे. जे होतील त्यांचा तो पिता आहे. असा जो ब्रह्मा आहे तो स्थायी आहे. तो चिरंतर आहे. तो नित्य आहे. तो अपरिवर्तनशील आहे. आणि अनंतकाळपर्यंत तसाच राहणार आहे. तर मग आपण सर्व, ज्यांची उत्पत्ती ब्रह्माने केली, ज्यांची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली ते आम्ही सर्व अनित्य का आहोत? परिवर्तनशील का आहोत? अस्थिर का आहोत? अल्पजीवी का आहोत? मरणधर्मी का आहोत?"_* 

_याला वासेठ्ठाकडे कोणतेही उत्तर नव्हते._

*_तथागतांचा तिसरा तर्क ईश्वराच्या सर्वशक्तिमान असण्याशी संबंधित होता. "जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे, तो सृष्टीच्या उत्पत्तीचे निमित्त आहे म्हणून याच कारणास्तव माणसाच्या चित्तात काहीही करण्याची इच्छा उत्पन्न होण्याचे काहीही प्रयोजन नाही. तसेच त्याला काही करण्याचेही प्रयोजन नाही. त्याच्या चित्तात काही करण्याचा संकल्पही उत्पन्न होणार नाही. किंवा तो काही प्रयासही करणार नाही. याचा अर्थ माणसाला या जगात ज्याला काहीही करावे लागत नाही, करावे लागणार नाही असा निष्क्रिय निरीह प्राणी म्हणूनच वावरावे लागेल. हे असे आहे तर ब्रह्माने माणसाची उत्पत्ती का आणि कशासाठी केली?”_*

_याचेही वासेठ्ठाकडे काही उत्तर नव्हते._ 

_*त्यांचा चवथा तर्क असा होता की, जर ईश्वर शिव आहे, कल्याणस्वरूप आहे तर, माणूस हिंसक, वध करणारा, चोर, व्यभिचारी, मिथ्या कथन करणारा, चहाडी करणारा, व्यर्थ बडबड करणारा, निंदक, लोभी, द्वेषी आणि विकृत का आहे? या सर्वांचेही निमित्त ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप, कल्याणमयी ईश्वराचे अस्तित्व असताना हे सर्व शक्य आहे काय ?*_ 

_*तथागतांचा पाचवा तर्क ईश्वराच्या सर्वज्ञ, न्यायी आणि कृपावंत असण्याशी संबंधित होता.*_

_*कोणी महान सृष्टिकर्ता आहे. तो सर्वज्ञ आहे. तो न्यायी आहे, तो कृपावंत आहे. मग या सृष्टीत एवढा अन्याय का होतो आहे? तथागतांनी विचारणा केली, "ज्याला दृष्टी आहे, जो दुःखद क्लेशकारक स्थिती पाहू शकतो असा ब्रह्मा आपल्या रचनेला सुधारीत का नाही? जर तो सर्व शक्तिमान आहे, त्याच्या शक्तीला कोणत्याही सीमा नाहीत तरीही त्याचे कर क्वचितच कोणाच्या कल्याणासाठी पुढे येतात. त्याच्याद्वारा निर्मित सर्व प्राणिमात्र, संपूर्ण सृष्टी दुःख का भोगीत आहे. तो सर्वांना सुखी का ठेवीत नाही. या सृष्टीत छल, कपट, मिथ्या कथन, अज्ञान, अत्याचार का फोफावत आहेत ? सत्यावर असत्याचा विजय का होतो आहे? सत्य आणि न्याय यांना पराजित का व्हावे लागते? माझी अशी मान्यता आहे की ब्रह्मा हा असा आहे की ज्याने केवळ असत्याला, अन्यायाला आश्रय देण्यासाठीच ही सृष्टी रचिली आहे. म्हणून हा तुमचा ब्रह्माही अन्यायी ठरतो. अत्याचारी ठरतो."*_

_*जर सर्व प्राणिमात्रात तो सर्वशक्तिमान ईश्वर विद्यमान आहे तर, जो त्या प्राणिमात्रांना सुखी अथवा दुःखी करू शकतो. जो त्यांना पुण्यकर्म किंवा पापकर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो तर असा ईश्वरही पापाने कलंकित होतोच. एकतर मनुष्य त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत नसावा. अथवा ईश्वर न्यायी वा शिव नसावा अथवा हा ईश्वर आंधळा तरी असावा.*_ 

_*ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच्या सिद्धांताविषयी त्यांचा पुढील तर्क असा होता की, "ईश्वराच्या अस्तित्वविषयक प्रश्नाची चर्चाच व्यर्थ आहे, निरर्थक आहे, निष्प्रयोजन आहे."*_

_*त्यांच्या मतानुसार धर्माचा केंद्रबिंदू हा मनुष्य आणि ईश्वर यांचे संबंध हा नाही. तर धर्माचा केंद्रबिंदू हा मानवामानवातील संबंध हा आहे. माणसाने माणसाशी कसे वागावे जेणे करून सर्वच सुखी होतील याचा उपदेश देणे, हाच धर्माचा हेतू आहे.*_

_तथागत ईश्वराचे अस्तित्व आहे या सिद्धांताचा विरोधी असण्याचे आणखीही एक कारण आहे._ 

_*ते धार्मिक कर्मकांडाचे घोर विरोधी होते. ते धर्मसंस्कारांचे विरोधी होते. ते कर्मकांड आणि धर्म संस्कार यांच्या विरोधी होते. - कारण त्यांच्या मते यातून अंधश्रद्धा उत्पन्न - पावते आणि मिथ्या विश्वास, अंधश्रद्धा ही - सम्यक दृष्टीची शत्रू आहे. आणि सम्यक दृष्टी ही आर्य अष्टांगिक मार्गाचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व आहे.*_

_*तथागतांच्या मते ईश्वरावर श्रद्धा असणे ही बाब सर्वात भयानक आहे. अतिशय धोकादायक आहे. कारण ईश्वरावर श्रद्धा ही ईश्वराची पूजा आणि प्रार्थना यावर असलेल्या विश्वासाची उत्पत्ती होय. ईश्वराची पूजा आणि प्रार्थना यातून पुरोहितपद उत्पन्न पावते. पुरोहित हा असा दुष्ट बुद्धी आहे की, तो मिथ्या विश्वास, अंधश्रद्धा निर्माण करतो. यामुळे सम्यक दृष्टीचा मार्ग अवरुद्ध होतो.*_

*_ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताच्या विरोधात दिल्या गेलेल्या तर्कापैकी काही व्यावहारिक होते. तर बहुतांश धर्मशास्त्रांशी संबंधित होते. तथागतांना याची - जाणीव होती की, त्याचे हे तर्क ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा - समूळ उच्छेद करण्यास पर्याप्त नाहीत._* 

*_याचा अर्थ असा समजू नये - की तथागतांनीही अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हावी - यासाठी तर्कच दिले नाहीत. त्यांनी असा एक तर्क दिला की जो, ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा - समूळ उच्छेद करावयास समर्थ आहे यात - शंकाच नाही. हा तर्क तथागतांच्या प्रतीत्य समुत्पादाच्या सिद्धांतात अंतर्भूत आहे. याच - सिद्धांताला "परस्पर निर्भर उत्पत्तीचा सिद्धांत असेही म्हणतात."_*

*_या सिद्धांतानुसार ईश्वराचे अस्तित्व आहे अथवा नाही हा काही महत्त्वाचा प्रश्न नाही. तसेच ईश्वराने सृष्टी रचिली अथवा नाही हाही खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न असा आहे की या सृष्टीच्या रचियत्याने ही सृष्टी कशी रचिली. सृष्टीची निर्मिती कशी केली. या प्रश्नाचे योग्य उत्तर सापडले तर त्याच्या निष्कर्षाच्या परिणाम स्वरूप ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील श्रद्धेचे समर्थन होऊ शकेल._* 

_*महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काय ईश्वराने शून्यातून, अभावातून सृष्टीची रचना केली. अथवा त्याने भावातून सृष्टीची रचना केली. अभावातून, शून्यातून काही निर्माण होऊ शकते यावर विश्वास ठेवणे शक्य नाही.*_ 

_*जर तथाकथित ईश्वराने भावातून (काही तरी अस्तित्वात होते त्यातून) सृष्टी निर्माण केली असेल तर मग ते पूर्वी अस्तित्वात असलेले काहीतरी हे ईश्वराने सृष्टीची रचना करण्यापूर्वीही अस्तित्वात होते, असा याचा अर्थ होतो. याचा अर्थ असा आहे की, ईश्वर हा जे पूर्वी काहीतरी अस्तित्वात होते त्याचा रचियता आहे, असे मानणे शक्य नाही.*_

*_ईश्वराने कोणत्याही वस्तूची रचना करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी रचिले असेल तर, ईश्वराला सृष्टीच्या रचनेचे आदी कारण मानता येणार नाही._*

*_अशाप्रकारे ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा समूळ नाश करणारा तथागतांचा हा अंतिम पण निर्विवाद तर्क होता._*

 *_ईश्वर हा सृष्टीचा रचियता आहे यावर श्रद्धा ही चुकीच्या आणि तर्क दुष्टगृहितावर आधारित श्रद्धा आहे. म्हणून अशी श्रद्धा असणे म्हणजे अधम्म होय. ही श्रद्धा केवळ असत्यावरील श्रद्धा होय._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०२/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...