🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_नकुलमाता_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*अंगुत्तरनिकायाच्या एककनिपातात एतदग्ग नावाचे एक प्रकरण आहे. निरनिराळ्या भिक्षूंना, भिक्षुणींना, उपासकांना आणि उपासिकांना या त्या गुणांत बुद्धाने अग्रस्थान दिले असल्यामुळे ह्या प्रकरणाला एतदग्ग असे म्हणतात. 'असीति महासावक" म्हणजे ऐशीं महाश्रावक अशा अर्थाचा उल्लेख बुद्धघोषाचार्यांच्या अट्ठकथांतून अनेक ठिकाणीं आला आहे.*_
_*ह्याच ऐंशी महाश्रावकांपैकी एक नकुलमाता. दुसऱ्यांचे समाधान करणाऱ्या उपासिकांमध्ये नकुलमाता श्रेष्ठ आहे असे बुद्धांनी म्हटले आहे.*_
_बुद्धांनी जीवन कसे जगावे आणि मरतांना कसे मरावे याबद्दल उपदेश दिला आहे. आज आपण आपल्या घरात किंवा आजूबाजूला पाहत असतो की, एखाद्या व्यक्तीचा अंतिम समय जवळ आला असतां त्याच्या घरातले, कुटुंबातले, नातेवाईक, पाहुणे मंडळी त्या व्यक्तीच्या आजूबाजूला जमतात आणि रडत बसतात सोबत घरातलं वातावरण नकारार्थी बोलून बोलून दूषित करीत असतात._
_बुद्धांचा या अशा गोष्टीला विरोध होता. अशा अंतिम समयी घरातले वातावरण कसे असावे ते आपण नकुल माता या उपासिकेच्या उदाहरणावरून पाहून घेऊ._
_*भर्गदेशात शिशुमारगिर या ठिकाणी भगवंत रहात होते.* तेथे त्या वेळी नकुलपिता नावाचा गृहस्थ फार आजारी होता. त्याचा मरणकाळ समीप आहे असे सर्वांस वाटत होते. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली_
१. "हे गृहपति, *प्रपंचासक्त होऊन तू मरता कामा नये. अशा प्रकारचे सापेक्ष (प्रपंचाच्या तळमळीने आलेले) मरण दुःखकारक आहे, असे भगवंताने सांगितले आहे.*
२. हे गृहपति, कदाचित् तुझ्या मनात अशी शंका येईल की, 'मी मेल्यावर, नकुलमाता मुलांचे पालन करू शकणार नाही, प्रपंचाचा गाडा हाकू शकणार नाही.', परंतु गृहपति, अशी शंका तू मनामध्ये आणू नकोस. कारण मला कापसाचे सूत काढण्याची कला माहिती आहे, व मला लोकर तयार करता येत आहे. या कलेने मी तुझ्या मरणानंतर मुलांचे पोषण करू शकेन. म्हणून हे गृहपति, *प्रपंचाची तळमळ मनामध्ये ठेवून तुला मरण येऊ नये, असे माझे म्हणणे आहे.*
३. हे गृहपति, दुसरी तुला अशी शंका येण्याचा संभव आहे की, 'नकुलमाता माझ्या पाठीमागे पुनर्विवाह करील,' परंतु ही शंका तू सोडून दे. *मी आज सोळा वर्षे गृहस्थब्रह्मचर्य (उपोसथव्रत) पाळीत आहे हे तुला ठाऊकच आहे.* मग मी तुझ्या मृत्यूनंतर पुनर्विवाह कसा करीन?
४. हे गृहपति, तुझ्या मरणानंतर मी भगवंतांचा आणि भिक्षकसंघाचा धर्मोपदेश श्रवण करण्यास जाणार नाही अशी तुला शंका येण्याचा संभव आहे; पण तुझ्या मागे पूर्वीप्रमाणेच बुद्धोपदेश ऐकण्याच्या कामी माझा आदर राहील, अशी तुझी पक्की खात्री असू दे; आणि म्हणून *तळमळीवाचून तुला मरण येऊ दे.*
५. हे गृहपति, तुझ्या पाठीमागे मी बुद्धोपदिष्ट शीलाचे यथासांग पालन करणार नाही, अशी तुला शंका येण्याचा संभव आहे. पण *ज्या उत्तम शीलवती बुद्धोपासिका आहेत, त्यापैकी मीहि एक आहे, हे तू खात्रीने समज;* आणि म्हणून तळमळीवाचून तुला मरण येऊ दे.
६. हे गृहपति, मला समाधिलाभ झाला नाही अतएव तुझ्या मरणाने मी फार दुःखी होईन- असे तू समजू नकोस. *ज्या कोणी बुद्धोपासिका समाधिलाभिनी असतील, त्यापैकी मी एक आहे असे तू समज, आणि मनाची तळमळ सोडून दे.*
७. हे गृहपति, बौद्धधर्माचे तत्त्व मला अद्यापि समजले नाही अशीहि तुला कदाचित् शंका येईल. परंतु *ज्या कोणी तत्त्वज्ञ उपासिका असतील त्यापैकीच मी एक आहे, हे तू पक्के घ्यानात ठेव, आणि मनाची तळमळ टाक."*
या नकुलमातेच्या सांत्वनाने नकुलपित्याच्या मनाचे समाधान झाले आणि त्याचा तो आजार लवकरच शमला. आजारातून बरा झाल्यावर तो बुद्धदर्शनास गेला. तेथे भगवंत त्याला म्हणाले *"हे गृहपति, तू मोठा पुण्यवान् आहेस; नकुलमातेसारखी उपदेश करणारी आणि तुझ्यावर प्रेम करणारी पत्नी तुला मिळाली आहे. हे गृहपति, उत्तम शीलवती अशा ज्या काही उपासिका आहेत, त्यापैकी ही एक आहे, अशी पत्नी तुला सापडली हे तुझे भाग्य होय !"*_
_या वरील उदाहरणावरून आपल्याला बोध होतो की, एखाद्या व्यक्तीच्या अंतिम समयी रडून रडून दुःखी वातावरण न ठेवता चांगले व प्रसन्न वातावरण ठेवले तर तो व्यक्ती आपला अंतिम श्वास कोणतेही दुःख, काळजीने, तळमळीने न घेता प्रसन्न चित्ताने घेईल._
_पूर्वीच्या काळी आणि आजही बहुतांशी उपासक चित्ताचा जागृत अवस्थेत आपला अंतिम श्वास घेतात. आणि अशाच प्रकारे तथागतांनी शिकवण दिली आहे की, अंतिम समयी चित्ताची जागृत अवस्थेत तसेच आजूबाजूचे वातावरण प्रसन्न असावे जेणेकरून अंतिम श्वास घेणारा कोणत्याही कष्टात, दुःखात, काळजीपोटी त्याने या जगाचा निरोप घ्यावा._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०१/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) अंगुत्तरनिकाय - एककनिपात - एतदग्ग वग्ग*_
*_२) बुद्ध धर्मावरील चार निबंध_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment