Saturday, 6 July 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ वर्षे अभ्यास करून बौद्ध धर्म घेतला.... एक मिथ्या दृष्टीकोन

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ वर्षे अभ्यास करून बौद्ध धर्म घेतला.... एक मिथ्या दृष्टीकोन_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_6.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

      _१३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली आणि ती १४ ऑक्टोंबर १९५६ साली म्हणजेच २१ वर्षांनी धर्मांतर करून त्यांनी आपली धर्मांतर करण्याची घोषणा पूर्ण केली._

           _या २१ वर्षांमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा व इतर धर्मांचा सखोल अभ्यास करून तुम्हां आम्हांला बौद्ध धम्म दिला.... असे अनेक प्रवचनांमध्ये, मोठ मोठ्या वक्त्यांच्या भाषणांमध्ये, चर्चांमध्ये आपण हे आपण ऐकत आलो आहोत. आणि आपण ही त्याला *होकार देत होतो, मान्य करीत होतो.*_ 

         _काल पर्वा पर्यंत मी ही असेच मानत आलो होतो. पण जेंव्हा बाबासाहेबांचा आपण अभ्यास करू लागतो तेंव्हा आपणाला हे सतत जाणवत राहते की *सार्वजनिक जीवन आरंभ करण्याआधीच बाबासाहेबांचा बुद्ध धम्मा वरील अभ्यास खूप आधीपासूनच सुरू झाला होता, किंबहुना तो धर्मांतर करण्याच्या घोषणेच्या खूप आधीच झाला होता. सोबत इतर धर्मांचा ही त्यांचा अभ्यास झाला होताच उदाहरणार्थ बायबल वर त्यांना पुस्तक लिहायचे होते इत्यादी.....*_

             _भारतीय समाजव्यवस्थेत बौद्ध तत्त्वज्ञानानेच परिवर्तन शक्य आहे, या निष्कर्षाप्रत ते पोहचले होते. त्यांच्या सर्व चळवळीचे अधिष्ठान बौद्ध धम्म होते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास बौद्ध धम्म हा त्यांच्या चळवळीचा कळस नव्हे तर पाया होता. बौद्ध धम्म हे केवळ दलितोद्धाराचे माध्यम नव्हते तर संपूर्ण भारतीय समाजव्यवस्था परिवर्तनाचे माध्यम म्हणून त्यांनी अपेक्षिले होते. त्याही पुढे जाऊन संपूर्ण मानव जातीच्याच कल्याणासाठी बौद्ध धम्म प्रासंगिक आहे असा त्यांचा विश्वास होता._

_बाबासाहेबांचा बुद्ध धर्मावरील अभ्यास खूप आधीच झाला या वाक्याची पुष्टी करण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया._

१. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी त्यांच्या बालपणी त्यांना *"गौतम बुद्धांचे चरित्र"* भेट म्हणून दिले. या ग्रंथामुळे त्यांना बुद्ध चरित्राची जाणीव झालीच शिवाय त्यांची धर्मविषयक चिकित्सक बुद्धी जागृत झाली. गौतम बुद्धांच्या चरित्राने त्यांना धर्माच्या तौलनिक अभ्यासाचा मार्ग दाखविला. तुलनात्मक अभ्यासाने त्यांच्या कक्षा रुंदावल्या. 

२. मूकनायक-बहिष्कृत भारताच्या लिखाणामधून बुद्धांच्या प्रकाशकीय ऐतिहासिक कार्याचे वर्णन आढळते. *दि. ३१ जुलै १९२० चा 'मूकनायक' किंवा ३ जून १९२७ सालच्या 'बहिष्कृत भारताचा अग्रलेख' बघावा म्हणजे गौतम बुद्धांच्या युगप्रवर्तक कार्याची पूरेपूर जाणीव बाबासाहेबांना होती याची खात्री पटेल.*

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यावर *१९२७ साली झालेल्या महाडच्या सत्याग्रहाप्रसंगी डॉ. बाबासाहेबांची बुद्धाप्रती असलेली अगाध श्रद्धा दर्शविणारी एक घटना गंगाधर निलकंठ सहस्त्रबुद्धे* यांनी कथन केली आहे. ते लिहितात,

              _"महाड येथे असताना एकदा डॉ. आंबेडकरांबरोबर आम्ही तेथील बुद्ध कालीन लेणी पहावयास गेलो होतो. *लेणी पाहून डॉ. साहेबांच्या भावना उचंबळून आल्याचे आम्हास दिसून आले. त्या लेण्यातील मध्यवर्तीय दिवाणखाना व चारी भिंतींना लागून असलेले दगडी वोटे पाहून त्या काळी कशा सभा भरत असाव्या याचे त्यांनी रसभरीत वर्णन केले. बुद्धांचे अनुयायी ब्रह्मचारी राहून, दारिद्रय स्वीकारून निःस्वार्थी बुद्धीने कशी समाजसेवा करीत याचे त्यांनी सुंदर चित्र आमच्या मनःचक्षूपुढे चितारले व आमच्या बरोबरच्या कोणीही, बौद्ध लोकांनी बसण्याच्या जागेवर बसून त्या अपमानीत करू नयेत असा जवळ जवळ हुकूम फर्मावला."*_

४. २५ सप्टेंबर १९२८ रोजी दादर गणेशोत्सवाप्रसंगी भाषण देताना त्यांनी सांगितले की, *"जातिभेदावर कुऱ्हाड घालून अस्पृश्यतेचे पाप मूळातच मारून टाकणारा खरा जर एखादा धर्मवीर आपल्या देशात अवतरला असेल तर तो एकटा गौतम बुद्धच होय."

_१९२७-२८ ही आंबेडकरी चळवळीच्या आरंभीची वर्षे आहेत. या प्रसंगावरून बाबासाहेबांच्या मनात बुद्धांप्रती असलेल्या अगाध निष्ठेचा प्रत्यय येतो._

५. १९२८ साली *बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या समाज समता संघाने 'समता' पाक्षिक चालविले होते. या पाक्षिकातून सुद्धा बुद्धांच्या ऐतिहासिक सामाजिक क्रांतीचे अनेक दाखले दिले गेले.

अशाप्रकारे चळवळीच्या आरंभ काळातच बुद्ध विचारांची अनिवार्यता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केली होती.

६. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची घोषणा केल्यावर त्यावर विचार विनिमय करण्यास एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. *३० व ३१ मे १९३६ रोजी आयोजित अखिल मुंबई इलाखा महार परिषदेतील बाबासाहेबांचे "मुक्ती कोण पथे?" हे भाषण प्रसिद्ध आहे. आश्चर्य म्हणजे या ऐतिहासिक भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी 'मुक्ती बुद्धांच्याच पथे' हे सत्य १९३६ सालीच निर्विवादपणे सांगितले. महापरिनिर्वाण सुत्तात नमूद असलेला भंते आनंद आणि तथागतामधील संवादाचा उल्लेख त्यांनी शेवटी केला. 'अत्त दीप भव। स्वयं प्रकाशित व्हा ।' या बुद्ध वचनांचा हवाला देऊन बाबासाहेब म्हणतात;*

             _*"भगवान बुद्ध म्हणाले की, आनंदा, भिक्षुसंघास मजपासून काय हवे आहे? आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे. त्यात तथागताने आचार्यसूप्ती मुळीच ठेवली नाही. तर मग आनंदा, तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा ! पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका ! स्वतःवरच विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका ! सत्याला धरून राहा! सत्याचाच आश्रय करा । व दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका !*_

                _*मी देखील बुद्धांच्याच शब्दांचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की, "तुम्ही आपले आधार व्हा ! स्वतःच्या बुद्धीला शरण जा! दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका ! दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका ! सत्याचा आधार घ्या ! सत्यास शरण जा ! दुसऱ्या कशासही शरण जाऊ नका !" हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही."*_

७. १९४४ साली मद्रासच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या भाषणांमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. वेद, भगवद्‌गीता, मनुस्मृती या विदुषकी बडबडी होत; या त्यांच्या वक्तव्यावर बराच गोंधळ माजला. *२४ सप्टेंबर १९४४ च्या या भाषणात त्यांनी प्राचीन हिंदुस्थानातील क्रांती व प्रतिक्रांतीविषयी प्रकाश टाकला. प्राचीन हिंदुस्थानात घडलेला बौद्ध व ब्राह्मण यामधील लढा हा काही इतिहासाच्या प्रोफेसरांनी म्हटल्याप्रमाणे केवळ पंथामधला मामुली लढा नव्हता. सत्य म्हणजे काय यासाठी तो लढा होता, बुद्धाने केलेली क्रांती ही सर्वंकष क्रांती होती हे नमूद करताना ते म्हणतात,*

            _"राजकारण, समाज, राज्यशासन, धर्म व बुद्धिवादात ज्या क्रांतीची बुद्धांनी मुहूर्तमेढ रोवली ती पुढे निष्फळ ठरली. धर्म व राजकारण यांना एकत्र जुंपून, चातुर्वर्ण्य ही केवळ सामाजिक प्रथा नाही, ते एक राजकीय तत्त्वज्ञान आहे, असे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृती लिहिण्यात आली."_

८. १६ जानेवारी १९४९ रोजी बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या स्वागताप्रीत्यर्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. *सभामंडपाच्या दर्शनी मध्यभागीच गौतम बुद्धाची प्रतिमा ठेवली होती. सभोवताल 'बुद्धं सरणं गच्छामी' लिहिलेल्या पताकांनी सभामंडप सुशोभित होता. या प्रसंगी बाबासाहेबांनी 'क्रांतीचे चक्र आपणच फिरवू' या आशयाचे भाषण दिले.

९. २ मे १९५० रोजी नवी दिल्ली येथे २० हजार लोक, अनेक राष्ट्रांचे राष्ट्रदूत व बौद्ध भिक्खूंच्या समोर बुद्धजयंती निमित्ताने त्यांचे भाषण झाले. *माझा वाढदिवस नको बुद्धाची जयंती साजरी करा असा संदेश त्यांनी या प्रसंगी दिला.* बुद्धांचे महात्म्य सांगताना बुद्धांमुळेच भारताची जगात शान आहे, हे त्यांनी समजावून सांगितले. ते म्हणाले, *"फक्त बौद्धधम्मामधूनच खऱ्या ज्ञानाचे किरण दिसतात आणि बौद्धधम्मामुळेच भारत देश महान असल्याचे आपण जगाला सांगू शकतो. आपल्या राष्ट्रध्वजावर बुद्धांचे चक्र आहे. आपली राजमुद्रा बौद्ध तत्त्वज्ञानावर अधिष्ठित आहे. शिवाय, नवीन भारतीय घटनेप्रमाणे आपल्या राष्ट्राध्यक्षास जेव्हा अभिषेक करण्यात आला तेव्हा बुद्धाची मूर्तीच सर्वात श्रेष्ठ मानण्यात आली."*

१०. २० मे १९५१ रोजी नवी दिल्ली येथे बुद्धजयंती अवाढव्य स्वरुपात साजरी झाली. फ्रान्सचे राजदूत अध्यक्षपदी होते. या प्रसंगी बाबासाहेबांनी लोकांच्या सामाजिक अधःपातास व राष्ट्राच्या हासास ब्राह्मणशाही कारणीभूत झाल्याचे सांगितले. बुद्धाचा विचार हाच जातीअंतांचा विचार असल्याचे सांगत असताना ते म्हणाले, 

               _*"धर्म शुद्ध तत्त्वावर आधारला असला पाहिजे. बुद्धांचा वर्णाश्रम पद्धतीवर कधीच विश्वास नव्हता. 'आपण सर्व सारखेच आहोत' ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. माणसा-माणसात कसलाच भेदभाव नाही. जन्माने उच्चनीच कोणीच असू शकत नाही. उच्चनीचता करणीने प्राप्त होते. या गोष्टी बुद्धांनी सांगितल्या आहेत. जर लोक पुन्हा बौद्धधम्माचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही, एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्धधम्माचा स्वीकार करावाः हाच एक उपाय आहे."*_

११. १५ फेब्रुवारी १९५३ रोजी इंडो-जपान सांस्कृतिक संघटनेचे सचिव श्री. मूर्ती व त्यांच्या पत्नीच्या सत्कारप्रसंगी बाबासाहेब उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी बुद्धाचा किंवा मार्क्सचा असे जगापुढे दोनच मार्ग उपलब्ध असल्याचे सांगितले. ते म्हणाले,

             _*"जगापुढे विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर, कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजिक होईल."*_

१२. मुंबईच्या नरे पार्कवर *२६ मे १९५३ रोजी बौद्धधम्म प्रचार समितीतर्फे बुद्धजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाबासाहेबांनी स्पष्ट केले की, ते बौद्धधम्माचे उपासक आहेत. बौद्धधम्माच्या प्रचाराबाबत ते म्हणाले,*

             _*"बुद्धांचे नाव काढले की ज्या हिंदू लोकांना एक प्रकारची भीती वाटत होतीः व आपणावर कोणी बाँब टाकीत आहे असे वाटत होते. त्यांच्यामधली कैक लोकात सुज्ञानपणा येऊन ते आज बुद्धांचा गौरव करू लागले आहेत. मी काही एखादा भविष्यवादी नाहीः व पुढे काय होईल हे सांगू शकत नाही, पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगू शकतो की बुद्धांचा धर्म या पृथ्वीतलावर पुन्हा अवतीर्ण होईल. तो कोणत्या मार्गाने येईल हे आज सांगता येत नाही.*_

               *_मी एक बौद्धधम्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे शेवटचे आयुष्याचे दिवस आता बुद्धधम्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्चित ठरविले आहे. मी बुद्धधर्माच्या शेत पेरणीवर आहे व त्यात कोणते पीक येते हे पहावयाचे आहे. बुद्धधम्माबद्दल आपणास विशेष आस्था कां वाटते, असे अनेक लोक विचारतात. डॉ. राधाकृष्णन् सारखे तत्त्ववेत्ते म्हणतात की बौद्धधम्मात विशेष असे काय आहे? त्यात व हिंदुधर्मात काय फरक आहे? उपनिषदातून बुद्धाने सारे घेतले, असे हिंदू तत्त्ववेत्ते म्हणतात. मला अशा लोकांबद्दल फारच आश्चर्य वाटते? ज्यांनी कोणी ब्राह्मणांच्या १३८ उपनिषदांचा अभ्यास केला असेल, अगर ती पूर्णपणे वाचली असतील तर त्यात ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टी शिवाय काय आहे, असेच त्यांना वाटेल._*

                 _*उपनिषदांच्या या कारखान्यातील ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टीकडे पाहिले तर बुद्धांनी त्यापैकी एकही गोष्ट मान्य केली नाही. बुद्धांनी स्पष्ट सांगितले की मला ईश्वर नको. या पृथ्वीतलावर जन्मास आलेल्या प्रत्येक माणसास सुख शांती मिळाली पाहिजे व सर्वांनी सुखाने राहिले पाहिजे. बुद्धांनी नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हे खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखे विचारवंत अजूनपर्यंत जगात झालेच नाही."*_

१३. १४ जानेवारी १९५५ रोजी वरळी येथे आयोजित सभेत त्यांनी स्पष्ट केले की, *उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले असताना त्यांनी तेथे बौद्ध धम्माचा बराच अभ्यास केला. त्यामुळे त्यांना हिंदूधर्म व बौद्ध धम्म यामधील अंतर कळून चुकले.* भारतातील विषमता, जातिभेद व दारिद्र्य याला कारणीभूत ब्राह्मणशाहीच असण्याच्या निष्कर्षाप्रत ते आले. त्यांनी नमूद केले की, वैदिक ब्राह्मण धर्माने निर्माण केलेल्या गुलामगिरी विरुद्ध बौद्ध विचारधारेने केलेला मुक्ती संघर्ष हाच भारताचा खरा इतिहास आहे. 

१४. अस्पृश्यांनीच नव्हे तर ब्राह्मणेतर हिंदूंनी सुद्धा बौद्ध धम्म स्वीकारावा असे आवाहन त्यांनी १९४१ सालीच केलेले आढळते. *जनता वृत्तपत्राच्या १७ मे १९४१ च्या अंकात हिंदूंना त्रिसरण गमन करण्याचाच सल्ला देणारा "बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्त्व" हा अग्रलेख त्यांनी लिहिला.* सर्व ब्राह्मणेतरांनी बुद्ध जयंती साजरी करावी, असे आवाहन या लेखातून करण्यात आले. जगाला प्रकाशित करणाऱ्या तेजस्वी सूर्यासमान बुद्धाचे हिंदुस्थानातील जनतेला विस्मरण व्हावे याविषयी त्यांनी दुःख प्रगट केले. *अग्रलेखात त्यांनी बुद्धांचे चरित्र आणि बुद्धाचे कार्य याविषयी विस्ताराने प्रकाश टाकला. बुद्धकालीन ब्राह्मणीधर्माचे तीन आधारस्तंभ वेद प्रामाण्य, यज्ञ बलिदान आणि वर्णाश्रम धर्म याविरुद्ध बुद्धाने केलेल्या कार्याची महती या अग्रलेखात कथन करण्यात आली. सामाजिक समतेचा बुद्धांइतका मोठा पुरस्कर्ता जगात झाला नाही, या शब्दात बाबासाहेबांनी बुद्धांचा गौरव केला. या प्रदीर्घ लेखाच्या शेवटी 'बुद्ध सरणं गच्छामी, धम्मं सरणं गच्छामी, संघं सरणं गच्छामी' हे त्रिसरण हिंदूंनी स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर ते सांगावयास विसरले नाहीत की,*

           *_"हिंदूंची रक्तशुद्धी रामाची जयंती करून होणार नाही, कृष्णाची जयंती करून होणार नाही, किंवा गांधीची जयंती करून होणार नाही. राम, कृष्ण, गांधी हे ब्राह्मणी धर्माचे उपासक आहेत. लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला त्यांचा काही उपयोग नाही. उपयोग झाला तर एका बुद्धांचाच होऊ शकेल."_*

१५. बुद्धांनीच भारतात राजकीय, सामाजिक, धार्मिक व बौद्धिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली होती, हे सांगूनच ते स्वस्थ बसले नाही. त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे तत्त्वज्ञान असलेली *त्रिसूत्री "स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व" ही बुद्धांच्याच शिकवणुकीतून त्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाविषयी आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून बोलताना १९५४ साली ते म्हणाले,*

             _*"माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान तीन शब्दातच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे."*_

१६. ४ डिसेंबर १९५४ रोजी *रंगून येथे तिसरी जागतिक बौद्ध परिषद भरली. या परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा बौद्धधम्माच्या प्रचाराची तळमळ व्यक्त केली. इतक्या देशात बौद्धधम्म असूनसुद्धा त्याचा म्हणावा तितका प्रचार-प्रसार होत नसल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. बौद्धधम्माचा प्रचार भारतात करण्याविषयी त्यांनी दृढसंकल्प व्यक्त केलाच शिवाय संसदेत असताना त्यांनी केलेल्या कार्याची माहिती पुढील प्रमाणे दिली,*

                  _*"मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्धधम्माच्या पुनरुत्थानाविषयी काही गोष्टी करून टाकल्या आहेत. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी ती घटना तयार केली तीत पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली आहे. ही एक गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यावर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतील पहिलेच चरण धम्मचक्र प्रवर्तन घातले असून ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉ. जी. पी. माळासेकर यांच्या दृष्टोत्पत्तीस आणले आहे. हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक चक्र हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करताना मला हिंदू, मुसलमान, खिश्चन व इतर पार्लमेंटच्या सभासदाचा विशेष विरोध झाला नाही. इतके स्पष्ट नि मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते."*_

१७. सावरकरांनी 'केसरी'तून बौद्धधम्मावर टीका केली तेव्हा त्याला बाबासाहेबांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले. बुद्ध हे माननीय नव्हे तर पूज्यनीय आहेत हे ठासून सांगितले. ते म्हणाले,

              _*"बुद्धधम्मावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होत. वास्तविक त्यांना काय म्हणावयाचे आहे हेच मला कळत नाही. बुद्ध हे वाईट मनुष्य आहे असे त्यांना म्हणावयाचे आहे का? बौद्धधम्म प्रचारक राजे वाईट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिद्ध केलेल्या 'बौद्धांच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद' या लेखातून त्यांना काय म्हणावयाचे आहे, हे स्पष्टपणे सांगितले नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्धधम्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावें, त्यांना उत्तर देण्याची माझ्यात हिंमत आहे. भगवान बुद्धांचा जो अफाट भिक्षुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राह्मण होते. हे सावरकरांना माहीत आहे काय? सारीपुत्त मोगलानसारखे पंडित ब्राह्मण होते. हे सावरकरांनी विसरू नये. सावकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की पेशवे कोण होते ते भिक्षू होते काय? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले? तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात. सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले !"*_

१८. १० जून १९५६ रोजी नवी दिल्लीत *आंबेडकर भवनाच्या पटांगणात त्यांनी सांगितले की ते बुद्धाचे विनम्र शिष्य आहेत. बुद्धांच्या मार्गाविषयी सांगताना ते म्हणाले, "भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांना सांगितले की कोणत्याही गोष्टीचा स्वीकार पूर्ण विचारांती करा आंधळेपणाने स्वीकारू नका. निसर्गतः मानव स्वतंत्र आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन की स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !"*

१९. २३ जून १९५६ रोजी दिल्लीला बुद्ध जयंती निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी *बाबासाहेबांनी धर्माला ग्लानी का येते याची कारणे स्पष्ट केली. बौद्धधम्माचा हास का झाला याची कारणमीमांसा स्पष्ट करून बौद्धांवर झालेल्या अत्याचारांची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

           _वरील उदाहरणे अभ्यासता आपल्याला हे दिसून येते की, बाबासाहेबांचा बौद्ध धर्माचा अभ्यास खूप आधीच झाला होता. सोबत इतर धर्मांचा अभ्यास झाला होताच. मग हे विधान बाद होते की, बाबासाहेबांनी धर्मांतर करण्यासाठी बौद्ध धर्माचा २१ वर्षे अभ्यास केला होता. मग ह्या सर्वांचा विचार करता *बाबासाहेबांनी धर्मांतर करण्यासाठी २१ वर्षे का घेतली?*....._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_लेखक - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०६/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३*_

*_२) मूकनायक_*

*_३) बहिष्कृत भारत_*

*_४) जनता_*

*_५) समता_*

*_६) गौतम बुद्धांचे चरित्र_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...