🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*
*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_38.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भाग १_*
_*सगळीकडे अंधश्रद्धेच्या जास्तीत जास्त बळी स्त्रियाच असल्यामुळे, त्याचबरोबर त्या अंधश्रद्धेच्या वाहकही असल्यामुळे 'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' हा विषय महत्त्वाचा आहे.* शोषणाचे बळी असलेल्यांना शोषणाबद्दल एक प्रकारचा राग असल्याचं सर्वसामन्यपणे दिसून येतं, परंतु महिला वर्गात मात्र याच्या उलट चित्र पाहायला मिळतं. *ज्या अंधश्रद्धेच्या, ज्या शोषणाच्या या महिला बळी असतात, त्या अंधश्रद्धा या महिला अतिशय सन्मानाने, अभिमानाने मिरवत असतात. त्यामुळे 'गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल', हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य 'स्त्री आणि अंधश्रद्धा' या प्रश्नाबाबत सगळ्यात जास्त लागू असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे ज्या वेळेला हातापायामध्ये बेड्या घातलेल्या असतात, त्या वेळी 'ऊठ वेड्या तोड बेड्या' असं सांगता येतं, परंतु हातापायांमधल्या बेड्यांना जर माणसं फुलांचे गजरे समजायला लागली, तर जी पंचाईत निर्माण होते, तीच आपल्याला 'स्त्री आणि अंधश्रद्धा' या प्रश्नाबाबत दिसते.*_
*_दुटप्पी समाज_*
_या सगळ्याची सुरुवात आपल्या दुटप्पी समाजापासून होते. म्हणजे मला शाळेमध्ये असलेली एक कविता आठवते. या कवितेमध्ये स्त्रीला अतिशय महान म्हटलेलं आहे. या कवयित्रीने म्हटलेलं आहे -_
_मी माता मी कान्ता शिक्षक मी सेवक मी_
_कलावती शास्त्रज्ञा विविध गुणे नटते मी_
_मी विश्वाची प्रतिभा मजमधी समृद्धी वसे_
_संस्कृती मी जणू समूर्त स्त्री माझे नाव असे._
_*म्हणजे एका बाजूला संस्कृतीचं साक्षात रूप म्हणजे स्त्री असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अनुभव मात्र असा की, पायातली वहाण पायातच बरी!* एका बाजूला म्हणायचं की, 'आता जग किती बदललंय, एके काळी भले स्त्रिया पिंजऱ्यामध्ये बंद असतील, परंतु आता पिंजऱ्याचं दार सताड उघडलेलं आहे. त्यांना बाहेर, आकाशामध्ये स्वैर मोकळीक घ्यायला काहीच हरकत नाही. पण पिंजऱ्याचं दार उघडलेलं असलं, तरी दुसऱ्या बाजूला मात्र पंखांचं खच्चीकरण कधीच झालेल असल्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यामुळे बाहेर, आकाशामध्ये भरारी घेणं ही गोष्ट स्त्रियांसाठी अजूनही तेवढी सोपी नाही. म्हणजे एका बाजूला देशामधल्या सगळ्या मोठ्या नेत्या स्त्रियाच असलेल्या दिसतील. मग त्या पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी असोत, उत्तर प्रदेशमधल्या मायवती असोत, तामीळनाडूमधल्या जयललिता असोत, लोकसभेच्या सभापती मीराकुमार असोत, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असोत किंवा सोनिया गांधी असोत. दुसरीकडे, दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेलादेखील नंबरामध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्या मुलीच; आणि ही परिस्थिती असताना प्रत्यक्षामध्ये हुंड्यासाठी जाळून मारल्या जाणाऱ्या स्त्रियाच, नवऱ्याने सोडून दिलेल्या असंख्य परित्यक्ता स्त्रियाच, अंगामध्ये येऊन घुमणाऱ्या आणि आपली मनोरुग्णता व्यक्त करणाऱ्याही स्त्रियाच..._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-२३/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर *_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment