Saturday, 2 March 2024

जीवनाचा अर्थ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_जीवनाचा अर्थ_*

*_सुभाष बोरकर_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _मानव म्हणजे काय? मानवाची निर्मिती कशी झाली? मानव कोठे जातो आहे? जीवनाचा उद्देश काय? हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांच्या उत्तरांचा मानवी जीवनावर परिणाम होतो सुरुवात करू या 'मानव म्हणजे काय मानव कोण आहे ह्या प्रश्नापासून._

               _मानव शरीरधारी आहे. हे शरीर डोळ्यांनी अथवा यंत्राच्या साहाय्याने पाहू शकतो. हे भौतिक शरीर सतत बदल पावणाऱ्या शक्ती आणि गुणांपासून बनले आहे. पदार्थ म्हणजे काय ह्याची स्पष्ट अशी व्याख्या करणे शास्त्रज्ञांना अवघड जाते. काही तत्वज्ञांनी अशी व्याख्या केली आहे. "ज्यात चलन वलन रूपी बदल होतात त्याला पदार्थ म्हणायचे आणि पदार्थात होणारा बदल म्हणजे चलन वलन होय"_

             _*पदार्थाला पाली भाषेत 'रूप' असा शब्द आहे. अर्थात् ज्यात बदल होतो किंवा जे नष्ट होते रूप्पती 'जे स्वतःचे अस्तित्व निर्मिते' असा देखील एक अर्थ केला जातो.*_

               _*बौद्ध धम्मात चार मूलभूत धातू मानले जातात. पृथ्वी, आप (जल), तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे पसरणारी, व्यापणारी वस्तु पदार्थाचा मुख्य गाभा. पृथ्वी धातूच्या अस्तित्वा विना कोणताही पदार्थ जागा व्यापू शकत नाही. जडपणा किंवा हलकेपणा हे ह्या धातूचे गुणधर्म होत. पसरणे, जागा व्यापणे हा गुणधर्म चारही मूलभूत धातूत विद्यमान आहे.*_

                 _*'आप' (जल) ही धातु संयोजनाची बांधून ठेवण्याची क्रिया करते. भौतिक अणू रेणूंना एकत्र बांधून आपणास पदार्थ दृश्य स्वरूपात दिसतात.*_

           _*'तेज' उष्णतेची धातू आहे. थंडी देखील उष्णतेचा एक भाग होय. संरक्षण आणि जीर्णता ह्या धातुमुळे संभवते.*_

           _*वायू ही चलनवलनाची धातू होय. उष्णता निर्माण करणे मागची शक्ती वायू होय. भौतिक जगातील चलन-वलनाची क्रिया आणि उष्णता ह्यांचे मानसिक जगातील जागृती/जाणीव (काँशसनेस आणि कम्म' (कर्म) ह्यांचेसी साम्य दर्शविले जाते.*_

                   _ही चार तत्वे एकमेकांना पुरक असून त्यांना वेगळे करणे कठीण आहे. मात्र कोण्या एका तत्वाची बहुलता पाहात येते. उदा. जागा व्यापण्याचा गुण पृथ्वी तत्वात प्रकर्षाने दिसून येते. एकत्र बांधून ठेवायचा गुण जलतत्वात दिसून येतो. उष्णतेचा गुण अग्नीत दिसून येतो. चलन-वलनाचा गुण वायु तत्वात दिसून येतो._

                _याप्रमाणे पदार्थात अशा शक्ती आणि गुण विद्यमान असतात ज्या सतत बदलत असतात. कोणत्याही दोन क्षणात पदार्थ एकसारखा नसतो. एका सेकंदाच्या चौथ्या भागात पदार्थात बदल होतो._

             _जीवशात्र असे सांगते की मानव गर्भाशयात जन्माचे वेळी आपल्या माता-पित्याकडून अत्यंत सूक्ष्म पेशी जीवाणू घेतो. नऊ महिन्याच्या कालावधीत ह्या पेशीचे पंधरा हजार पटीने आकारमान वाढ़ते. ही सूक्ष्म रासायनीक भौतीक पेशी मानवाचा मूलाधार होय. *गर्भधारणेच्या वेळी बालकाचे लिंग ठरले जाते असे बौद्धधर्म मानतो.*_

               _*गुंतागुंत असलेल्या मानव नामक यंत्रात महत्त्वाचा घटक असतो हा घटक मन किंवा 'चित्त' होय.* काही लेखकांना मानव हा शरीर अधिक मन असे म्हणण्यापेक्षा मनाचे शरीर म्हटलेले अधिक पसंत पडते. वैज्ञानिक असे म्हणतात की पदार्थापासून जीवन बनते आणि जीवनापासून पदार्थ बनतो परंतु मनाच्या विकासाबाबत वैज्ञानिक समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही._

              _पदार्थापासून बनलेले शरीर पाहात येते मात्र 'मन' हे पदार्थापासून बनलेले नसल्याने पाहाता येत नाही. परंतु त्याचा स्पष्ट अनुभव घेता येतो. एका जुन्या कवितेच्या ओळी पाहा -_

_मन काय आहे? पदार्थ नाही! पदार्थ काय आहे? ज्यात मनच नाही! आम्हाला जशी आपल्या विचारांची, भावनांची जाणीव होते इतरांनासुद्धा होते._

               _*मनाला चित्त, विज्ञान असेही म्हटले जाते.* कोणत्याही वस्तुविषयी जाण असणारे मन होय. मनात अनेक तरंग उठतात आणि लोप पावतात, जन्मापासून नदी प्रमाणे उगम पावणाऱ्या मनाचा प्रवाह मृत्युपर्यंत वाहातच असते. वाटेत भेटणाऱ्या उपनद्यांनी आणखी प्रवाहाची (पाण्याची) भर घालावी तसे इंद्रिंयांद्वारे मनाला खत. सतत बदलणाऱ्या मनात अदृश्यरूपाने जमलेले सारे संस्कार लोप पावणाऱ्या मनाद्वारे नवीन उत्पन्न होणाऱ्या मनाला हस्तांतरित केले जातात. त्यामुळे *नवीन उत्पन्न होणारे मन सारे जुने संस्कार तर घेऊन येतेच शिवाय त्यात आणखी भर पडते. हे सगळे सुप्त संस्कार एका जीवनातून दुसऱ्या जीवनात प्रवेश करतात. त्यामुळे मागील जन्मातील गोष्टी आठविण्याची किंवा मागचे जन्म आठविण्याची शक्यता बळावते. स्मृती जर केवळ मेंदूच्या पेशींवरच आधारली असती तर अशी शक्यता उरती ना!*_

                *_विजेप्रमाणे मन शक्तीशाली असून त्याचा सदूपयोग किंवा दूरूपयोग होऊ शकतो. दुधारी शस्त्राप्रमाणे त्याचा उपयोग कुशल किंवा अकुशल कार्यासाठी करता येतो. ह्या अदृश्य मनात उत्पन्न होणारा एक विचार जग बेचिराख करू शकतो किंवा जगाला तारू शकतो. असाच एक विचार एखादा देश निर्मनुष्य करू शकतो किंवा माणसांना वसवू शकतो. मनच मानवासाठी नरक निर्माण करू शकते._*

_*ऑस्पेन्सकी लिहीतो-* "विचार, भावना, इच्छा ह्यांमध्ये वसत असलेल्या कार्यप्रवण शक्तीकडे आणखी बारकाईने पाहिल्यास ह्या शक्ती अर्माद, अमाप आहेत. वैयक्तिक अनुभव, निरिक्षण आणि इतिहास पाहिल्यास कल्पना, इच्छा, भावना ह्या मूर्त स्वरूप धारण करतात आणि प्रचंड शक्ती, अनंत घटनांना जन्म घालतात. नवीन कल्पना शतकानुशतके वाढते, सखोल होते आणि नवीन प्रसंगांना घटनांना जन्म घालते, नवीन शक्ती प्रसारित करते. आम्ही जाणतो की विचारांना जन्म देणारी व्यक्ती नंतर एक आश्चर्य म्हटले जाते पण त्याचे विचार मात्र अस्तित्वात राहून कार्य करतात. शक्तीमान माणसे, हीरो, महान कवी, नेते आणि धर्मसंस्थापक हे आता इतिहासजमा झाले आहेत मात्र त्यांचे शब्द, काव्य कल्पना आजही लाखो लोक गुणगुणतात, अंमलात आणतात, त्यांचा अभ्यास करतात, त्यांवर टिका, अनुटिका लिहितात._

_"कोळशाच्या तुकड्यात किंवा एखाद्या जीवंत पेशीमध्ये जसी सुप्त शक्ती असते तशी कवीच्या विचारांमध्ये प्रचंड ऊर्जा असते ह्यात शंका नाही."_

_उदा. भगवान बुद्धांनी म्हटलेल्या ह्या चिरंतन ओळीत दडलेली ऊर्जा विचारार्थ घेऊ शकता- *"मनो पुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया"* प्रत्येक कृतीच्या आदी मन असते. मन प्रमुख आहे कृती मनाद्वारेच. इंग्रजी भाषेत ज्याला काँशसनेस म्हणतात, मराठी भाषेत 'मन' म्हणतात ते आणि भौतिक पदार्थ गर्भसंभवाचे वेळीच निर्माण होतात. गर्भात विद्यमान असतात. सुरूवातीचे 'काँशसनेस' चित्त तांत्रिक भाषेत पटिसंधी विज्ञान म्हणून ओळखले जाते, आणि त्या व्यक्तिच्या गतव्य कर्मावर आधारले असते. व्यक्ति-व्यक्तिमध्ये, माणसा माणसांमध्ये आढळणारी बौद्धिक, नैतिक, मानसिक भिन्नता कर्माधारित काँशसनेस किंवा पटिसंधी विज्ञानातील कर्म भिन्नता होय._

               _*नाम आणि रूप त्यानंतर माणसाला आवश्यक असणारा तिसरा महत्त्वाचा घटक 'जीवन' होय.* ह्या घटकामुळेच पुननिर्मितीची प्रक्रिया शक्य होते. भौतिक आणि मानसिक घटकांमध्ये जीवन अस्तित्वात असते._

                _*पदार्थ, चित्त आणि जीवन मिळून माणूस बनतो.* ह्या तिघांना एकत्र येण्याने 'मानव' नावाचा दूर्जेय, शक्तीशाली जीव अस्तित्वात येतो. तो स्वतःचा स्वत निर्माणकर्ता आणि विनाशकर्ता बनतो त्यात अकुशलांचे ढिगारे आणि सद्‌गुणांचे आगार अस्तित्वात असते. त्या मानवातच सहृदयी माणूस महामानव, देवमाणूस तसेच निर्दयी कृपण चलाख इ. अस्तित्वात असतो. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि संतप्त सुप्तावस्थेत त्याच्यात निवास करतात. इतरांसाठी तसेच स्वतःसाठी उपयुक्त उपद्रवी व्हायचे हे त्यानेच ठरवायचे असते मानव स्वतःच एक जग आहे दुनिया आहे. *मानव निर्माण कसा झाला हा आपला दुसरा प्रश्न, एकतर मानवाची सुरूवात कुठेतरी झाली असावी केव्हातरी झाली असावी किंवा सुरुवाच झालीच नसावी. जे पहिला विचार (कॉस्मीक फोर्स) किंवा सर्वशक्तीमान ईश्वर. जे लोक दुसरा विचार मानतात ते कारण स्वीकारीत नाही कां की जे कारणाचा परिणाम होतो आणि परिणामाचे कारण बनते कारण आणि परिणाम ह्यांच्या वर्तुळात पहिले कारण शोधणे कठिण आहे.*_

             _पहिल्या विचारानुसार जीवनाची सुरूवात असलीच पाहिजे. दुसऱ्या मतानुसार जीवन सुरूवात रहित आहे. काहींच्या मते 'पहिले कारण' ही कल्पना अशी हास्यास्पद आहे. जशी तीन कोन असलेले वर्तुळ._

              _वैज्ञानिकांच्या मते मानव हा माता पिता ह्यांच्या स्त्री-बीज आणि शुक्राणूंपासून बनला. जीवनापासून नवीन जीव असे मान्य करताना मन आणि जीवन ही जीवनरहित अवस्थेतून उत्क्रांत पावले असे सांगतात. मानवी पेशीत जीवन कसे आले ह्याबद्दल वैज्ञानिक अंधारात आहेत._

                 _*कर्मस्थितीमुळे माणूस (Marix of Action- Kammayoan) जन्मास येतो. माता-पिता केवळ भौतिक स्थिती (Material Layer) उपलब्ध करतात. गर्भाला प्राथमिक जाणिव (Initial Consciusnex) कर्माद्वारे प्रदान होते. भौतिक शरीर लाभलेल्या जीवाला गतजन्मीची अदृश्य कर्मशक्ती प्राप्त होऊन मन आणि जीवन मिळून माणूस किंवा व्यक्ती घडते.*_

               _*प्राणी जन्माविषयी भगवान बुद्ध म्हणतात- "तीन गोष्टी एकत्र आल्यास जीव-जन्माचे बीजारोपण होते. सक्षम माता- पिता एकत्र आले आणि माता परिपक्व बीज युक्त नसेल, आणि जन्माला येणारा (गंधर्व) उपस्थित नसेल तर जीवाचे बिजारोपण होत नाही. सक्षम माता-पिता एकत्र आले, माता परिपक्व बिजयुक्त असेल परंतु जन्मास येणार अनुपस्थित असेल ह्या वेळी देखील जीवाचे बिजारोप होणार नाही. सक्षम माता-पिता ह्यांचे एकत्र येणे, माता परिपक्व बीजयुक्त असणे तसेच जन्मास येणाऱ्या जीवाचे उपस्थित असणे तसेच जन्मास येणाऱ्या जीवाचे उपस्थित असणे- ह्या तीन गोष्टी एकत्र आल्यास जीवाचे बिजारोपण होते. येथे गंधर्व म्हणजे ज्याला जन्माला यायचे आहे तो जीव येथे जीव ह्या शब्दाचा अर्थ 'आत्मा' नाही.*_

                    _ह्या ठिकाणी जन्म घेणाऱ्या जीवाला अन्य ठिकाणी मरावे लागते. एके ठिकाणी झालेला सूर्योदय दुसऱ्या ठिकाणी सूर्यास्त जाल्याचे सुचवितो, त्याचप्रमाणे येथे जन्म घेणार जीव पूर्वी कुठेतरी मरण पावलेला असतो. *भगवान बुद्ध म्हणतात- "अविद्या आणि अज्ञान व तृष्णेमुळे संसमरण करणाऱ्या जीवाचे प्रथम अस्तित्वात येण्याचा शोध घेणे अशक्य आहे."*_

                  _*अविद्या आणि तृष्णेद्वारे पोषित होणारा हा दूषित जीवन- प्रवाह अनंत काळापर्यंत वाहात असतो. जेव्हा अविद्या आणि तृष्णा यांचा पूर्ण क्षय होतो तेव्हाच हा जीवन प्रवाह थांबतो. बुद्ध आणि अर्हतांप्रमाणे पुनः जन्म घेण्याची प्रक्रिया थांबते. जीवन प्रवाहाची नेमकी दिशा...*_

            _बुद्धांनी  केवळ जीवांच्या जीवनप्रवाहाचा संदर्भ येथे दिला आहे जगाची उत्पत्ती आणि उत्क्रांती कशी आणि केव्हा झाली हे वैज्ञानिकांनी शोधायचे._

              _*मानव जातीला बुचकाळ्यात टाकणाऱ्या सायऱ्याच नैतिक आणि तात्वीक प्रश्नांचे उत्तर देण्याच्या भानगडीत बुद्ध पडत नाहीत हे प्रथम स्पष्ट असावे. निर्वाणाकडे किंवा दुखमुक्त न जाणाऱ्या मार्गाविषयी त्यांनी कधी उहापोह केला नाही. आपल्या अनुयायांनी प्रथम आपल्यावर श्रद्धा ठेवावी अशी मागणीही भगवान बुद्धांनी कधी केली नाही. त्यांनी मुख्यत्वे विशिष्ट प्रश्नाची व्यावहारीक, प्रायोगिक बाजू अर्थात दुःख आणि त्याचा अंत ह्याचाच विचार आणि उहापोह इतर बाबी गौण ठरवून त्याकडे दूर्लक्ष केले.*_

_एकदा भगवान बुद्धांचा मालूंक्यपूत्त नावाचा शिष्य भगवान बुद्धांकडे आला आणि संन्यासी जीवन यापुढे जगणार नाही- जर भगवान बुद्धांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान न केल्यास असे म्हणू लागला._

_'भगवान'! 'जग शाश्वत आहे की अशाश्वत, जग असिम आहे की ससीम?' ह्या प्रश्नांची भगवंताने उत्तर दिली नाहीतर ह्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर भगवंताकडे नसेल तर यापुढे मी त्यांच्या सान्निध्यात संन्याशी जीवन जगणार नाही. भगवान बुद्धांनी शांतपणे त्याला विचारले, "तू संन्यासी होण्यापूर्वी असी काही 'अट' मी स्वीकारली होती काय? तू संन्यासी व्हावे असी काही सक्ती करण्यात आली होती काय?_

'नाही भगवान!'

_*'मालूंक्यपूत! ह्या निरर्थक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात सारे आयुष्य संपेल परंतु समाधान मिळणार नाही.* जसे कोण्या व्यक्तिस विषारी बाण लागून त्याला मित्रांनी अथवा नातेवाईकांनी वैद्याकडे न्यावे. वैद्याने बाण काढून त्यावर उपचार करण्यापूर्वी घायाळ व्यक्तीने वैद्यास म्हणावे, "हा बाण मला कोणी मारला, त्या बाणाला कोणते विष लावले होते, ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय मी हा विषारी बाण काढू देणार नाहीं' तर अशा स्थितीत_

_'हे जग शाश्वत आहे असे मानले तरी लोक पवित्र जीवन जगायला लागतील काय?'_

'नाही!'

_'हे जग शाश्वत नाही असे मानले तरी लोक पवित्र जीवन जगायला लागतील काय?'_

'नाही!'

_'जग शाश्वत असो वा जग अशाश्वत असो, ह्या जगात जन्म होतो, जरा (जीर्ण), म्हातारा येते, मृत्यु येतो. ह्या जन्म- मरण कसे सुटावे हेच मी सांगतो!'_

_*मालूक्यपूत्रा हे प्रश्न म्हत्त्वाचे, उपयोगाचे नाहीत. पवित्र जीवनाचा आधार नाहीत. ह्या प्रश्नांमुळे किंवा प्रश्नांच्या उत्तरांमुळे द्वेष, राग, तृष्णा, मोह नष्ट होत नाही. प्रज्ञा जागृत होत नाही. निर्वाण प्राप्तीत ह्यांची काही मदत होत नाही. म्हणून मी हे प्रश्न अव्याकृत ठेवले.'*_

_*'मानव कोठे जातो आहे' हा तिसरा प्रश्न.*_

                _*प्राचीन भौतिकवाद ज्याला 'लोकायत' अशी संज्ञा आहे त्यानुसार, मानवाच्या मृत्युनंतर त्याचे काहीच शिल्लक राहत नाही. मानव चार मूलधातूंपासून बनलेला आहे. मनुष्य मेल्यानंतर पृथ्वीतत्व (पृथ्वी धातु) हे पृथ्वीत, जलतत्व हे पाण्यात, अग्नीत हे अग्नीत, वायूतत्व हे वायूत आणि माणसाची इंद्रिये अवकाशात मिसळली जातात. शहाणा अथवा अडाणी, गरीब वा श्रीमंत साऱ्यांच्या बाबतीत असे घडते. दुसरे जग विद्यमान नाही. मृत्यु सर्व बाबींचा शेवट आहे. अस्तित्वात असणारे, दिसणारे जग खरे आहे. शाश्वत स्वर्ग किंवा नरक ह्या ठग लोकांच्या कल्पना आहेत."*_

                  _इंद्रियांद्वारे जाणल्या जाणाऱ्या गोष्टींवरच भौतिकवादी विश्वास ठेवतात. पदार्थच सत्य होय. पृथ्वी, जल, अग्नी आणि वायु ही मूलभूत तत्वे असून, अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातून जीन जसा प्रकटतो तसे स्व जाणीव असलेले जीवन मूलभूत तत्वांमधून प्रकट यकृतामधून जसा पाचक रस स्त्रवतो त्याप्रमाणे मेंदूतून विचार स्त्रवतात. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लिहितात- भौतिकवाद्यांच्या मते दुसऱ्या जगावर विश्वास ठेवणे म्हणजे भित्रेपणा, कमजोरी आणि अप्रामाणिक लोक एका धर्माच्या मान्यतेनुसार मानवाला भूतकाळ नाही. 'वर्तमान स्वर्ग आणि नरक ह्या दोन शाश्वत बाबींमधील स्थिती होय. ह्यांना रूळ समजा अगर स्थिती समजा मानवाचे भवितव्य नरकामध्ये अनंत दुःख भोगणे हे आहे. मानवाचे भौतिक शरीर मृत्युनंतर नष्ट होते मात्र त्याचा 'सारभूत भाग' शाश्वतकडे जातो._

_*शॉपेनहॉर नावाचा तत्वज्ञ म्हणतो-* "जो स्वतःबद्दल असा विचार करतो की माझी उत्पत्ती अभावातून (Out of nothing) तेव्हा त्याने हा देखील विचार करावा की त्याची समाप्ती देखील अभावात (become nothing) होईल. एक शाश्वत अवस्था त्याच्यापूर्वी निघून गेली. दुसऱ्या शाश्वत अवस्थेची सुरूवात झाली त्यामुळे ह्या शाश्वत अवस्थेत तो कायम राहणार हा भयंकर विचार आहे."_

                _एक विचारधारा भूतकाळ आणि वर्तमानकाळ मानते मात्र माणूस मृत्युनंतर संपतो असे मानीत नाही. मृत्युपश्चात मानव शाश्वत आहे असेही मानीत नाही. भूतकाळात अनंत जन्म झाले व भविष्यात अनंत वेळा जन्म होत राहणार असे ही विचारधारा मानते. जोवर कार्मिक ऊर्जा कार्यरत राहील लोवर ही जीवनधारा वाहात राहील. कालांतराने जीवाचे सारभूत तत्व अंतिम सत्यात विलीन होईल जेथून ते उगम पावले होते असे ह्या विचारधारेचे मानणे आहे._

             _*वर्तमानाच्या आधारावर बौद्ध धर्म भूतकाळ व भविष्य काळ मानतो. विजेच्या बल्बद्वारे दिसणारा प्रकाश हा जसे अदृश्य स्वरूपात वाहणाऱ्या विजरूपी उर्जेचे बाह्य प्रक्षेपण आहे, तसेच माणूस हा कर्मरूपी अदृश्य शक्तीचे बाह्य प्रक्षेपण आहे. विजेचा बल्ब फूटू शकतो, उजेड नाहिसा होऊ शकतो परंतु विजेचा प्रवाह कायम असला तर अन्य बल्बद्वारे परत प्रकाश मिळू शकतो. अगदी ह्याच न्यायाने भौतिक शरीर नष्ट झाले व वर्तमान चेतना (काॅंशसनेस) नष्ट झाली तरी कार्मिक उर्जा नष्ट होत नाही. पुढील जन्मात नवीन शरीरात उत्पन्न होते. येथे विजेच्या प्रवाहाचे साम्य कार्मिक उर्जेशी आहे आणि बल्ब चे साम्य माता पिता द्वारे मिळणाऱ्या शुक्राणू-बिज ह्यांचेशी आहे.*_

               _भूतकालीन कर्म वर्तमान जन्माचा आधार ठरतात. वर्तमान कर्म भूतकालीन काही कर्माशी संलग्न होऊन भविष्याचा बौद्धधर्मीय पूनर्जन्म केवळ काल्पनिक बाब होय, थिअरी होय असे न मानता एक तथ्य म्हणून स्वीकारतात जे प्रमाणित केले जाऊ शकते. ही बौद्धधर्माची मूलभूत प्रमेये आहेत. *निर्वाण साधणे हा बौद्ध धर्माचा मुख्य हेतू असून ह्याच जन्मी हे ध्येय साधता येत असले तरी बोधिसत्त्व आदर्श, आणि तत्वसंबंधी पूर्णत्वास नेणारे सिद्धांत पुनर्जन्माच्या सिद्धांतावर आधारित आहेत.*_

*_पुनर्जन्माची संकल्पना पायथागोरस, प्लेटो ह्या तत्वज्ञांनी, शेले, टेनिसन, वर्डस्वर्थ ह्या कविंनी आणि पूर्व तसेच पश्चिमेकडील अनेक लोकांनी स्वीकारली._*

              _*इतर धर्मियांच्या आणि बौद्ध धर्मियांच्या पुनर्जन्माच्या सिद्धांतात थोडा फरक आहे. अजर, अमर, अविनाशी आत्मा हा दिव्य परमात्म्याचा अंश ईश्वराचा अंश असून तोच शरीर बदलीत असतो असे इतर धर्मिय मानतात. बौद्ध धर्मिय ईश्वर, आत्मा, परमात्मा ह्यांचे अस्तित्व नाकारतो.*_

          _वर्तमानात प्रत्यक्ष वस्तुला प्रमाणाची गरज नसते. भूतकाळ स्मृतीवर किवा धॄतीवर रिपोर्टवर आधारित असतो. भविष्य हे उत्पन्न होणाऱ्या विचारांवर किंवा अनुमानांवर आधारित असते._

                 _कोणी असा वाद करू शकतो की जीवन भूतकाळात फार पूर्वी अस्तित्वात आले असेल आणि त्याचा कोणीतरी निर्माता असेलच. ह्यात एक शंका उपस्थित होते की निर्मात्याला कोणी निर्मिले असेल. जन्म ही जर जीवनाची निःसंशय सुरूवात असेल तर 'मृत्यु' निःसंशय शेवट असायला हवा. माणूस (किंवा मानव) जर शून्यातून किंवा अभावातून निर्माण झाला असे गृहीत धरले तर मृत्युनंतर सारेच संपले असे म्हणावेच लागेल._

             _*म्हणून मृत्यु हे मानवाचे समूळ उच्छेदन नव्हे. ज्या शक्तीद्वारे उर्जेद्वारे हा कालावधी निर्धारित केला गेला ती उर्जा नष्ट होत नाही. जोवर अविद्या आणि तृष्णेचे खतपाणी मिळत राहते तोवर जीवन प्रवाह माणसाच्या मृत्युपश्चातही वाहात राहातो. नंतर होणारा जन्म मानवाचा असेल असे काही आवश्यक नाही. कारण मानवा व्यतिरिक्त आणखी सजीव अस्तित्वात आहेत. ह्याशिवाय पृथ्वी ह्या ब्रह्मांडातील एक छोटासा तुकडा आहे. त्यामुळे पुढे येणारा जन्म पृथ्वीवरच होईल असेही आवश्यक नाही. अस्तित्वाच्या इतरही पातळ्या (ज्ञात) आहेत ज्यात जन्म होवू शकतो. जर मानवाची इच्छा वारंवारचे जन्म-मरण परिपूर्ण थांबविण्याची इच्छा .... माणूस कोठे जातो? तो ज्या स्थितीच्या लायक असेल तर इच्छेनुसार तेथे जाऊ शकतो. जर काही विशेष कामना नसेल, आणि आपसुक घडणाऱ्या घटनांनी तयार केलेल्या मार्गावर त्याला जायचे असेल तर त्याच्याद्वारे घडलेल्या कर्मानुसार तो जाईल.*_

_*स्पेन्सर लेवीस थिऑलॉजीचा सिद्धांतानुसार म्हणतात-* मानवाने कितीही इच्छा प्रदर्शित केली, प्रार्थना केली, ध्येय ठेवले तरी जन्मापासून तो शेवटल्या श्वासापर्यंत मानवाचे घडणे, निर्माण होणे ठरल्याप्रमाणे होत नसते. थिऑलॉजीचा भाग्यवाद असा आहे._

           _सारी माणसे पापी आहेत आणि अॅडम ने केलेले पाप सर्व माणसांमध्ये विद्यमान आहे ही विचारसरणी न्याय, दया, प्रेम आणि सर्वांप्रति समता यांना आव्हान आहे."_

_*हक्सले म्हणतो* "जर आपण असे गृहित धरले की कोणीतरी हे चमत्कारिक जग निर्माण करून चालवितो आहे तर माझ्यामते तो क्रूर आणि अन्यायी आहे."_

_*आईन्स्टाईनचे म्हणणे पाहा* "जर (ईश्वर) तो सर्वत्र आहे तर प्रत्येक घटना, मानवाद्वारा केली जाणारी प्रत्येक कृती. विचार, भावना, ध्येय ही सारी त्याची (ईश्वराची) कृती ठरते. मग मानवाच्या कृतींबद्दल मानवालाच कां जबाबदार धरले जाते?"_

_*लॉर्ड टेनिसन ह्या कविने* आपल्या उतारवयात एक कविता लिहून ईश्वर ह्या कल्पनेवर हल्ला चढविला._

             _पुराणमतवादी लेखकांनी अधिकृतपणे सांगितले की ईश्वराने आपल्या प्रतिमेनंतर मानवाची निर्मिती केली. आधुनिक विचारवंतांनी अगदी ह्याच्या उलट विधान केले. मानवी संस्कृति फुलत असताना ईश्वराची संकल्पना आणखी स्वच्छ होत गेली. देहधारी ईश्वराऐवजी अशरीरि ईश्वराची कल्पना रूजली._

_"वोल्टायर म्हणतो-* ईश्वराची निर्मिती ही मानवाची सर्वोत्कृष्ट निर्मिती होय. परंतु ह्या जगात अथवा जगाबाहेर सर्वशक्तीमान, सर्वव्यापी सर्वगुणसंपन्न, आदर्शाची उपस्थिति मान्य करणे अशक्य आहे._

             _*जीवनाचा उद्देश काय?* हा आपला शेवटला प्रश्न हा प्रश्न जरा विवादास्पद आहे. भौतिकवाद्यांचे मत पाहू या! भौतिक जगच सत्य आहे. त्यांच्या मते जीवन उद्देशहिन आहे. "खा, प्या, मजा करा. मृत्युनंतर सगळे संपणार आहे!" ही त्यांची विचारधारा आहे. *डॉ. राधाकृष्णन त्याबद्दल लिहितात-*_

_"शील-सदाचार हा भ्रम आहे. मौज-मजा सत्य आहे. 'मृत्यु जीवनाचा शेवट आहे. 'धर्म' ही खुळचट कल्पना असून तो रोग आहे. मानसिक व्याधि आहे. सर्व चांगल्या, उच्च, शुद्ध मूल्यांबद्दल एक प्रकारचा अविश्वास होता. स्वार्थपरायणता, इंद्रिय तुष्टीकरणासाठी, इच्छापूर्तीसाठी ही विचारधारा होती. इच्छेला मुरड घालण्याची गरज नाही कारण निसर्गाने ती मानवाला बहाल केली आहे."_

            _सर्वदर्शन संग्रहात नमूद केले आहे- "ऋणं कृत्वा घृतं पिठोत। आता विज्ञानाकडे वळून असे कां?' ह्या प्रश्नाचे समाधान शोधू या. विज्ञान म्हणजे वस्तुंचा अभ्यास, शोध. काय आहे आणि काय असावे ह्याचा शोध 'धर्म' विचारांचा अभ्यास आहे. *सर जे. ऑर्थर थाम्पसन मानतात* की विज्ञान अपूर्ण आहे म्हणून असे कां ह्याचे समाधान होत नाही._

_वैश्विक हेतू (उद्देश व) बद्दल विचार  मांडताना बर्ट्रान्ड रसेल* तीन प्रकारचे मत मांडतात "ईश्वरवादी (साकारवादी) निराकारवादी आणि नवोद्यवादी. प्रथम मतानुसार ईश्वराने जग निर्मिले, निसर्गाचे कायदे बनविले कारण समोर (पुढे) काहीतरी चांगले (उत्पन्न) विकसित, निर्माण होईल असे त्याला वाटले. आपल्या कृतीपासून वेगळे असणाऱ्या ईश्वराच्या मनात उद्देश होता असे दिसून येते._

_दुसऱ्या मतानुसार (निराकारवादी) ईश्वर जगापासून वेगळा नसून संपूर्ण ब्रह्मांड म्हणाजे ईश्वर होय. त्यामुळे निर्माण करण्याची कृती नाही. परंतु निर्मिती करणारी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या योजनेनुसार विकास घडून येतो आहे._

_तिसऱ्या मतानुसार उद्देश आणखी धूसर आहे. ह्या ब्रह्मांडात, पूर्विच्या अवस्थेत पुढील अवस्थेबद्दल भाकित केले जात नाही. एक प्रकारचे धूसर स्पंदन बदल घडवून आणते. पूर्वीपेक्षा अधिक विकसित अवस्था येते. अस्पष्टपणे 'अंत' हा सुरूवाती मध्येच दडलेला असतो."_

_उपरोक्त मते विचारवंतानी आणि धार्मिकांनी व्यक्त केली आहेत. आम्ही त्यावर काहीच मत व्यक्त करणार नाही._

                _वैश्विक उद्देश आहे अथवा नाही हा प्रश्न थोडा वेळ बाजूला केला तरी एक प्रश्न मनात येतो की *ह्या सृष्टीतील लहान सहान कृमी-किटक, डास, साप, इ. यांचा उपयोग काय? भूकंप पूर महामारी इ. नैसर्गिक आपदा कां?* वैश्विक उद्देशाबद्दल रसेल लिहीतो- 'माणसाचेच उदात्तीकरण का वाघ, सिंह इत्यादि बद्दल काय? माणूस जेवढी माणसे, प्राणी मारतो त्यापेक्षा ते कमीच मारतात आणि ते आपल्यापेक्षा अधिक चांगले आहेत. मुंग्यांचे उदाहरण पाहा! कोणत्याही फासिस्ट राज्यापेक्षा त्या त्यांचे राज्य सुरळीत चालवितात. मानवी जगातील युद्धे, कौर्य, हिंसाचार, अन्याय यांच्यापेक्षा पक्षी सृष्टी, प्राणी सृष्टी अधिक बरी नाही काय? वैश्विक उद्देशात विश्वास ठेवणारे मानवी बुद्धीची प्रशंसा करू देत. परंतु त्यांचे साहित्य पाहिल्यास शंका वाटते. मला जर सर्व शक्ती प्राप्त झाल्या आणि लाखो वर्षे प्रयोग करू दिले. माझे सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर देखील, मला वाटत नाही की मी माणसाचे उदात्तीकरण करेन."_

          _*बौद्ध धर्म ह्या प्रश्नाबद्दल काय म्हणतो ते पाहू या! बौद्ध धर्म निर्माता ईश्वराचे अस्तित्व नाकारतो. उद्देश आधीच ठरविला गेला असेही मानत नाही. भाग्य, नशिब, आधीच ठरलेले, मानवाच्या स्वतंत्र कृत्तीवर नियंत्रण आणणाऱ्या गोष्टीना बौद्ध धर्म दुजोरा देत नाही. अन्यथा जीवन निव्वळ यांत्रिक झाले असते.*_

                 _काही प्रमाणात माणसाच्या कृती स्वतःच्या कर्मानुसार पालनपोषण, इच्छाशक्ती वारू शकतो. उदा. उंच सुळक्यावरून खाली पडणारा माणूस निर्जिव दगडाप्रमाणे खाली येईल. ह्या ठिकाणी त्याला स्वतंत्र इच्छा शक्ती असूनही आपल्या मनाप्रमाणे तिचा वापर करता येणार नाही. दगडाला मात्र स्वतंत्र इच्छाशक्ती नसल्याने त्याला गंतव्यस्थळी पडावे लागेल. *बरे आणि वाईट, योग्य आणि अयोग्य ह्यात निवड करण्याची शक्ती माणसात आहे.* माणूस स्वत:शी आणि इतरांशी मित्रांप्रमाणे, कुटुंबवत्सलाप्रमाणे वागू शकतो. हे त्याच्या मनावर आणि मनाच्या योग्य विकासावर अवलबून आहे._

               ₹मानवाच्या अस्तित्वाचा काही विशेष हेतु नसला तरी मानवाला हेतू, ध्येय, उद्देश धारण करण्याचे स्वातंत्र्य आहे. नाहीतर जगण्याचा अर्थ काय? *ऑस्पेनस्की म्हणतो* - "काही म्हणतात की सेवा करणे हेच जीवन होय. 'स्व' विसरून स्वार्थत्याग करून सर्वस्वाचा त्याग करून जगले पाहिजे, इतर काही म्हणतात- शेवटी भयप्रद मृत्यु येणार तेव्हा आताच आनंदी जीवन जगावे काही म्हणतात की पूर्णत्व साधणे म्हणजे जीवन होय. पुढे आणि मरणोपरांत झटण्यातच जीवनाचा अर्थ आहे. पृथ्वीवरील जीवन सुरळीत करण्यात जीवनाचा अर्थ आहे. काही महाभाग तर असेही आहेत की जीवनाचा अर्थ शोधण्याच्या फंदातच पडू नये" ह्या सर्व मतांवर टिका करताना लेखक म्हणतो-_

_"उपरोक्त मते जीवनाचा अर्थ उद्देश बाहेर शोधतात. मानवता काय असावी. मृत्युनंतरचे अस्तित्व कसे असावे किंवा 'अहं' चा उत्तरोत्तर जन्मी कसा विकास होईल, उत्क्रांती कशी होईल इत्यादी. वर्तमान जीवन सोडून वर्तमानापलीकडे, बाहेर शोधतात. जर माणसाला इकडे-तिकडे टोलेबाजी, अंदाज न करता स्वत:च्या अंतरात पाहिले असता त्यांना सत्य दिसेल आणि कळेल की जीवनाचा अर्थ इतका काही जीवनाचा अर्थ आहे._

            _बौद्धांच्या मतानुसार जीवनाचा उद्देश "संबोधिप्राप्ती" असावा, अर्थात जो जसा आहे तसा समजणे. *शील, समाधी आणि प्रज्ञेद्वारे संबोधि प्राप्त करता येते.* दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाल्यास सेवा आणि पूर्णत्वाद्वारे संबोधि प्राप्त करता येते. सेवा ह्या शब्दात मैत्री करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्यांचा अंतर्भाव होतो. (ह्या चार गुणांना ब्रह्मविहार अशी संज्ञा आहे) माणसाला इतरांची सेवा करण्यास हे गुण प्रवृत्त करतात. पूर्णत्व म्हणजे आत्यंतिक शुद्धता आणि प्रजेची पक्वता, पूर्णता._ 

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०२/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक मे २०१४ अंक ७०, वर्ष सहावे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...