🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_आंबेडकरी बाणा_*
*_विमलकित्ती गुणसिरी_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_तथागत बुद्धांच्या महाकरूणेचा वारसा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अवघे जीवन दीन-दुःखीतांच्या सेवेसाठी पणास लावले होते. व्यक्तीगत पद-प्रतिष्ठेच्या आणि भौतिक समृद्धीच्या शिखरावर पोहोचून आपले जीवन सफल करण्याचे सर्व सामर्थ्य त्यांचेकडे होते. परंतु त्यावर पाणी सोडून त्यांनी मानवतेच्या सेवेचे खडतर व्रत अंगिकारले आणि उभे आयुष्य कडवा संघर्ष करण्यात घालविले. माणुसकीप्रधान सर्वांगिण न्यायासाठी त्यांनी बंड केले आणि सदैव संघर्ष केला. त्याचे अत्यंत ह्रद्य वर्णन आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेले आहे._
_*"आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरूद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आंतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय."*_
_*यातून आंबेडकरी बाणा स्पष्ट होतो. त्यांच्या जीवनकार्याचा वारसा चालविण्याचा आव आणणाऱ्यांना हा बाणा कधी कळलाय असे म्हणता येईल कां? त्यांच्या निःस्वार्थी आणि त्यागमय जीवनाची चाड कधी कोणाला वाटलीय असे म्हणता येईल कां? दीन-दुबळ्यांना आणि गोर-गरिबांना न्याय मिळावा आणि त्यांचे जीवन नैसर्गिक हक्कांनी तरी सुरक्षित व्हावे म्हणून त्यांनी निरपेक्ष बुद्धीने दिलेल्या लढ्यांची कोणी आठवण तरी ठेवली आहे कां? लोकशाहीतील माणुसकीच्या लढ्यात जनसामान्याच्या ऐक्याची आणि सामंजस्याची खरी गरज असते आणि ते जोपासण्यातच इमानदारी असते हा त्यांनी घालून दिलेला धडा कधी कोणी गिरवलाय कां?* केवळ भौतिक जीवन म्हणजे एखाद्या रेड्यासारखे जीवन होय. ते उंचावून माणसाला साजेल असे उच्च विचार आणि उच्च आचाराचे खऱ्या माणुसकीचे जीवन त्यांना देण्यासाठी बुद्धाच्या धम्माचा त्यांनी वारसा दिला. त्याची बूज कोणी राखलीय कां? आपल्या बरोबर जगाचा उद्धार करण्याचे दुर्दम्य स्वप्न त्यांनी पाहिले. त्याकडे लक्ष देण्यास कोणाला फुरसत मिळालीय कां? बाबासाहेबांच्या जीवनकाळात पोलादी समजला जाणारा समाज कोणी शिल्लक ठेवलाय कां? आज सर्वच क्षेत्रात आंबेडकरानुयायी केवळ भंगार बनलेला आहे. भारताची सद्धम्मरूपी महालाचे रूपात पुन्हा उभारणी करण्यासाठी त्यांनी समाजाला दिलेल्या मैत्री-करूणेचा भक्कम पाया आता जाती-पोटजाती आणि भरमसाठ संघटनांच्या तत्त्वशून्य विरोधाने आणि अंतर्गत संघर्षाने अगदी ठिसूळ झालेला आहे. तर त्यांनी तावून सुलाखून घडविलेल्या निष्ठावान अनुयायांच्या मजबूत विटांरूपी बांधकाम साहित्याचा चुराडा होऊन त्यांचा अनुयायी जणू फुटक्या विटांचे तुकडे बनलेला आहे. आणि या भंगार साहित्याचा वापर करून सद्धम्मरूपी महाल उभारण्याचे अवसान आणणारे रचनाकार म्हणजे नेते आणि कार्यकर्ते आपल्या स्वार्थाने आणि लाचारीने दुसऱ्यांचे गुलाम झालेले आहेत. फुसके सिमेंट बनले आहेत. तेही आपापसात जोडले जाऊ शकत नाहीत. मग तत्वशून्यता आणि लाचारीच्या अशा या ठिसूळ पायावर फुटक्या विटांच्या तुकड्यांनी आणि फुसक्या सिमेंटने बौद्धमय भारताचा महाल कोण आणि कसा काय बांधणार आहेत? आता, खरंच! हे सर्व भंगार टाकूनच दिले पाहिजे. नव्याची निर्मिती केली पाहिजे. 'जुने जाऊ द्या मरणालागूनी, जाळूनी किंवा पुरूनी टाका, सावध ऐका पुढल्या हाका।' हे लक्षात घेऊन प्राप्त परिस्थितीचा प्रत्येक सुजाण अनुयायाने आता तरी गंभीर विचार केला पाहिजे. या बिकट काळाची मागणी लक्षात घेऊन पुन्हा नव्याने उभारी घेण्याची जिद्द बाळगली पाहिजे._
_स्वतः बाबासाहेबांनी अनेक प्रकारे यंत्रणा निर्माण करून त्यांना कार्यप्रवण केले होते. त्या सर्व यंत्रणातील जवळ जवळ सर्वच पार्ट आता बिघडून गेलेले आहेत आणि ते बदलून टाकण्यास नवे चांगले पार्ट मिळणेही अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत सर्व काही नव्याने उभारणी करण्याशिवाय काही मार्ग दिसत नाही. *या दृष्टीने सर्व प्रथम जे केले पाहिजे ते म्हणजे धम्माच्या बांधिलकीने घट्ट बांधलेला नवा सद्धम्मिक समाज घडविणे होय.* जन्माने धर्म आणि जात चिकटविण्याची शक्कल लढवून ब्राह्मणांनी जातीभेदाची पद्धती अभेद्य केली. *बुद्धांनी सांगितले होते की, माणूस जन्माने केवळ माणूस नावाचा एक प्राणी असतो. तो पुढे मोठा होऊन जे काही बनतो, जे काही निवडतो, ते आपल्या कर्माने आणि इच्छेने होय.* जसा जन्माने कोणी डॉक्टर किंवा इंजिनिअर बनत नाही, त्याच प्रमाणे हिंदू, मुसलमान किंवा बौद्धही बनत नाही. *जन्माने जात आणि धर्म चिकटविण्याची युक्ती ही पुरोहित वर्गाने आपला चिरंतर स्वार्थ जोपासण्यासाठी केलेली आहे. हा सिद्धान्त नाकारल्याशिवाय जातीविच्छेदाचा लढा मुळी लढताच येत नाही. हे सत्त्य जाणूनच बाबासाहेबांनी धर्मांतरासह नामांतर करायला सांगितले होते. धम्मदीक्षा घेतल्याशिवाय कोणाला बौद्ध बनता येणार नाही, हे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु त्यांच्या अनुयायांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे जरी आज ते स्वतःला बौद्ध म्हणवून घेत असले, तरी त्यांची जात काही गेली नाही आणि त्यांना बौद्ध म्हणून नवी ओळख निर्माण करता आली नाही.*_
*_सर्वच बौद्ध लोक आपल्या मुला-बाळांना जन्माने बौद्ध समजू लागले, ही महाभयंकर चूक होती. ही चूक लवकरात लवकर सुधारली पाहिजे._* _*त्यासाठी सात वर्षांवरील मुला-मुलींना योग्य त्या प्रकारे धम्मदीक्षा देऊन मगच त्यांना बौद्ध म्हटले पाहिजे. ही प्रथा रूजवून सर्व भारतीय लोकांच्यासुद्धा प्रबोधनाचा मार्ग मोकळा केला पाहिजे, हे आंबेडकरी समाजाचे प्रथम कर्तव्य आहे.*_
_त्याच प्रमाणे *जाती व्यवस्था घट्टपणे टिकविण्यासाठी पुरोहित वर्गान मनुस्मृतीच्या नावाने नामकरणाचा धार्मिक कायदा राबविला आणि आडनावरून जात ओळखता येईल अशी सोय केली. ब्राह्मणाने मंगलवाचक, क्षत्रियाने बलवाचक, वैश्याने धन-संपत्तीसूचक, तर शूद्राने तिरस्करणीय नावे ठेवणे बंधनकारक केले. त्यावरून कोठेही गेला तरी त्याची जात ओळखण्याची सोय केली. बाबासाहेबांनी ती मनुस्मृति १९२७ साली जाळली. त्याला आता ८५ वर्षे उलटून गेली. तरी आंबेडकरानुयायी या बाबतीत पूर्णपणे बेफिकीर राहिले, हेच मुळी मोठे आश्चर्य आहे. घाणेरड्या आडनावाने आपला अपमान होतो, आपला स्वाभिमान दुखावतो, हे चांगले शिकून-सवरूनही बौद्ध म्हणविणाऱ्यांना कां कळत नाही?* आता तरी जागे होऊन त्यांनी मनुस्मृतीचा तो कायदा धिक्कारला पाहिजे आणि आपल्या जातीवाचक आडनावांची परंपरा ताबडतोब मोडून काढली पाहिजे. *ही दोन कामे केली तरच बौद्ध म्हणून एक नवा समाज संघटीत होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि लोक त्यांना बौद्ध म्हणूनच ओळखू लागतील.* जुन्या जातींना चिकटून राहून जातीविरहीत नवा समाज स्थापन करता येणार नाही, एवढे सत्त्य तरी प्रत्येकाने ध्यानी घ्यायला पाहिजे की नको? *बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे सर्वोच्च ध्येय या देशातील जाती- व्यवस्था समूळ उखडून टाकणे हेच होते आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणे हेच त्यांच्या अनुयायांचे प्रथम कर्तव्य होते.* हे आंबेडकरानुयायी म्हणविणारे कसे काय विसरू शकतात? अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून आता जरा अधिक जोर लावून हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे._
_*दुसरी गोष्ट म्हणजे संघाचा एकतेचा आणि सामंजस्याचा आदर्श स्वीकारून सर्व समाज धम्माच्या नावाने एकसंघ केला पाहिजे. या तिसऱ्या शरणगमनाकडे कोणी नीट लक्ष दिलेच नाही. त्यामुळे जरी हजारो बुद्धविहारे बांधली गेली असली आणि हजारो उपासक-उपासिका आपापल्या शक्तीनुसार धम्मकार्य करीत असले, तरी लोक नीट बौद्ध झाले नाहीत आणि बौद्ध समाज साकारला नाही.* उलट जितक्या संघटना तितके त्यांचे कार्यकर्ते आणि तितकेच त्यांचे आपापसातले मतभेद आणि परस्पर विरोध. त्यात भरीस भर म्हणून *विहार समित्यांची आपापसात आणि प्रसंगी भिक्खूसंघाबरोबरसुद्धा भांडणे आणि विरोधच. वर चांगले धम्मकार्य करणाऱ्या शीलवान भिक्खूंनासुद्धा विरोध करून विहारातून हाकलून देण्याची मुजोरीची प्रवृत्ती.* ही प्रवृत्ती जशी समाजघातक आहे तशीच ती बुद्ध धम्म आणि संघनाशक आहे. *बुद्धविहारे ही कोणाच्याही व्यक्तीगत मालकीची नसतात. तर ती सर्व समाजाच्या सार्वत्रिक मालकीची असतात. त्यांची निर्मिती आणि देखभाल उपासक वर्ग धम्मसेवक बनून करीत असतो.* पण आपणाकडे उलटेच झालेले आहे. *गृहस्थवर्गच विहारांचा मालक आणि चालक झालेला आहे.* तथागत बुद्धांनी आपल्या धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भिक्खू आणि भिक्खूनींचा संघ निर्माण केला. ती जबाबदारी त्यांनी गृहस्थांवर टाकली नाही. कारण गृहस्थ म्हटला की संसाराच्या वर्दळीत त्याचा काही ना काही स्वार्थ राहणारच. म्हणून जोपर्यंत गृहस्थ गृहत्याग करीत नाही, तोपर्यंत उपासक किंवा उपासिका म्हणून तो किंवा ती कितीही ज्ञानी असले तरी धम्मप्रचार करण्यास योग्य ठरत नाही. ती जबाबदारी प्रशिक्षित भिक्खू-भिक्खनीवरच असते. म्हणून भिक्खू आणि भिक्खूनीसुद्धा प्रशिक्षितच असावे लागतात. नाही तर तेही धम्म प्रचार-प्रसारास अयोग्य ठरतात. *बौद्धांनी याची प्रचिती थोडी बौद्ध देशात जाऊन घ्यावी, अशी आमची सूचना आहे. गृहस्थ वर्गाने प्रशिक्षित संघाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहून संघाच्या एकीच्या आणि सामंजस्याच्या आदर्शाचे अनुकरण केले पाहिजे आणि त्यायोगे धम्माच्या नावाने बौद्ध समाज सुसंघटीत केला पाहिजे. बुद्ध विहारे ही त्या सुसंघटीत बौद्ध समाजाच्या श्रद्धेची आणि प्रशिक्षणाची केन्द्रे म्हणून वापरली गेली पाहिजेत. गृहस्थांनी सेवा देऊन प्रशिक्षित झाले पाहिजे. ही गृहस्थ जनांची मोठी जबाबदारी आहे.*_
_*कधी कधी काही लोक म्हणतात की, बौद्ध समाजाच्या ऐक्यासाठी एखादी केंद्रीय संघटना पाहिजे. म्हणून फक्त बाबासाहेबांनी स्थापन केलेल्याच संघटनेला सर्वांनी सक्तीने केंद्रीय संघटना मानले पाहिजे. हे युक्तीवादाच्या दृष्टीने वरवर बरोबर दिसत असले, तरी ती इतर संघटनाइतकीच गृहस्थप्रधान आणि संसारात अडकलेल्या लोकांची संघटना आहे. त्यांच्याकडून स्वार्थहीन आणि परिशुद्ध धम्मसेवेची अपेक्षा करता येत नाही. जर त्यातील सर्वच संचालक गृहत्यागी असते, तर एखादे वेळी चांगले काही झाले असते. धम्माच्या दृष्टीने पाहाता, स्वतः तथागत बुद्धांनी स्थापन केलेल्या संघालाच केंद्रिय संघटना मानणे योग्य आहे. त्यासाठीच तथागत बुद्धांनी संघाला आपणा स्वतःइतके आणि आपल्या धम्माइतके श्रेष्ठत्व देऊन ते सर्वांसाठी तिसरे शरणगमन बनविले. बाबासाहेबांना याची योग्य ती जाण असल्यामुळेच त्यांनी बुद्धिस्ट रिलिजिअस सेमिनरी स्थापन करून प्रशिक्षित भिक्खू-भिक्खूनी संघाची निर्मिती करण्याचे योजले होते. बुद्धिस्ट सोसायटीच्या उपासक वर्गाला त्यांनी संघाच्या सेवेला लावून बौद्ध देशात आज विद्यमान असणाऱ्या संस्कृतीचे कदाचित पुनरूज्जीवन केले असते. म्हणूनच त्यांनी आपणास अभिप्रेत भिक्खू आणि संघाची स्पष्ट मांडणी आपल्या धम्मग्रंथात केलेली दिसते. जर त्यांना बुद्धिस्ट सोसायटीच केंद्रिय करायची असती, तर भिक्खूसंघाला त्यांनी सरळ सरळ नाकारले असते. उलट त्यांनी भिक्खूसंघाच्या योग्य त्या आदर्शाची आपल्या ग्रंथात मांडणी करून तसा संघ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते घडले नाही. असो. भिक्खू संघ हा धम्म चळवळीचे केंद्रस्थान आहे, हे त्यांनी स्पष्टपणे जाणले होते, यात काही शंका नाही.*_
*_"सच्चे बौद्ध बनू, सच्चा समाज घडवू आणि आपणा बरोबर जगाच्या उद्धाराला लागू', अशी प्रतिज्ञा करणे, हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन ठरेल. आपण ते आज तरी करणार आहात काय?_*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २८/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक एप्रिल - मे २०१२ अंक ४५ - ४६ वर्ष चौथे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_83.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment