🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_प्रबुद्ध भारताच्या दिशेने ...!_*
*_प्रा. नीरज बोधी_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*मग्गानट्ठङ्गिको सेट्ठो सच्चानं चतुरो पदा।*_
*_विरागो सेट्ठो धम्मानं द्विपादनञ्च चक्खुमा ।।_*
(धम्मपद : गाथा २७३)
_अर्थात- मार्गामध्ये अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे, सत्यामध्ये चार आर्य सत्य श्रेष्ठ आहेत. धम्मामध्ये वैराग्य (चित्ताची अनासक्त अवस्था) श्रेष्ठ आहे आणि मनुष्यांमध्ये बुद्ध श्रेष्ठ आहे._
_ही वास्तविकता जेव्हा संस्कृतीरूपात जनमानसात दृढमुल होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने भारताची 'प्रबुद्ध भारताच्या दिशेने' वाटचाल सुरू होईल._
_सुमारे अडिच हजार वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी मनुष्याला अंधकारमय जीवनातून मुक्त करून प्रबुद्ध बनविले. जे लोक दुक्खाग्नीमध्ये होरपरळले जात होते ते सुखमय जीवन जगू लागले. मनुष्य स्वतःच्या सुख-दु:क्खाला स्वतःच जबाबदार आहे हे सत्य त्यांनी लोकांना पटवून दिल्याने अल्पावधीत तथागतांची शिकवण जनमानसात रूजली. लोकांनी *तथागतांच्या मध्यम मार्गाचा स्वीकार केला की आर्य अष्टांगिक मार्गाच्या परिपूर्ण आचरणाद्वारे कोणताही मनुष्य पूर्ण सुखाला प्राप्त करू शकतो.* मनुष्याच्या सुखप्राप्तीमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश, लिंगभेद इ. कोणतेही कारण आड येत नाही. त्यामुळे अल्पावधीत बुद्धांची शिकवण भारतभर पसरली. भारत प्रबुद्ध होऊ लागला. अज्ञान नष्ट होऊ लागला. *सम्राट अशोकाच्या काळात समग्र भारत हा 'प्रबुद्ध भारत' बनला. एवढेच नव्हे तर विश्व सुद्धा 'प्रबुद्ध विश्व' होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. त्यांच्या महान कर्तृत्वाने बौद्ध धम्म वैश्विक धम्म बनला. त्यानंतरही अनेक शतके भारत आपल्या प्रबुद्ध रूपात अग्रेसर राहिला. बौद्ध धम्ममार्ग सांस्कृतिक रूपात स्थिर झाला.* मात्र हळुहळु ही स्थिरता अस्थिरते मध्ये परिवर्तीत होऊ लागली. आचरण मार्गाला सोडून लोक पून्हा कर्मकांडामध्ये गुंतू लागले. मानवताद्वेष्टा विघ्नकारी शक्तींनी डोके वर काढले आणि लोकांना सद्धम्माची शिकवण देणाऱ्या धम्मसेवकांना अर्थात भिक्खूंना त्या विपत्तीचे नाहक बळी बनावे लागले. *सद्धम्माची शिकवण समाजात प्रसारित होणे क्षीण होताच पुन्हा अधम्म बोकाळला. धम्ममार्गावर अधम्माचे वृक्ष पल्लवित झाल्याने लोकांना सद्धम्माचा मार्ग दिसेनासा झाला. प्रबुद्ध भारतात पुन्हा एकदा अंधःकार प्रादुर्भुत झाला, असमानता आणि मनुष्यद्वेष्ट्या शिकवणुकीचे प्रस्थ माजले, समग्र देश दुक्खाग्नीमध्ये पुन्हा होरपळु लागला.* मनुष्यच पुन्हा मनुष्याचा वैरी ठरला. मानवता कलंकीत झाली. अधर्म मनुष्य धर्म बनला, मात्र हे सुद्धा अनित्य अस्थिरच ...!_
_*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सफल सामाजिक संघर्षाचा परिणाम असा झाला की, पुन्हा एकदा भारतात बौद्ध धम्माचा पिवळा वारा वाहू लागला. त्यांनी लाखो पिडितांना त्यांचा हरवलेला धम्म पुन्हा मिळवून दिला. याअर्थी की, त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला अशोक विजयादशमी पर्वावर मोठ्या प्रमाणात लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. विषमताग्रस्त भारतात समताधिष्ठीत समाज व्यवस्था स्थापित करण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड रोवला. त्यांनी या प्रसंगी घोषणाच केली की, यानंतरचे पुढिल आयुष्य हे मी केवळ धम्मकार्यासाठी वेचणार आहे आणि सारा भारत बौद्धमय करणार आहे. अर्थात संपूर्ण भारत पुन्हा एकदा तथागत बुद्धांच्या मुळ शिकवणुकीप्रमाणे आचरणशील बनावा, समाज स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांवर अधिष्ठित व्हावा. समामाजिक व्यवस्था धार्मिक अवडंबरातून मुक्त व्हावी. धर्मनिरपेक्षता हे तत्व पुन्हा स्थापित व्हावे. प्रत्येक मनुष्यमात्राला सुखी होण्यासाठी समान संधी मिळावी, योग्य वातावण मिळावे, हिच त्यांची मनिषा असावी. म्हणूनच त्यांनी धम्माला सहजपणे जाणता येईल अशा पद्धतीने 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाची रचना केली.*_
_आपली यंत्रणा सज्ज करताना त्यांनी 'दरेकाने दरेकाला' धम्मदीक्षा द्यावी, असा उपदेश केला. याप्रकारे त्यांनी धम्मकार्यालाच नंतर प्राथमिकता दिलेली आढळते. मात्र ५० वर्षातील स्थित्यंतरात बाबासाहेबांच्या या धम्मकार्याकडे फारसे कुणी लक्ष दिलेले आढळत नाही. *एकेकाळचा उपेक्षीत समाज शैक्षणिक उन्नतीच्या बळावर काही अंशी भौतिक सुविधांनी संपन्न झाला. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाला. परंतु धम्ममार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने एक प्रबुद्ध समाज म्हणून नावलौकिक मिळविण्यात अपयशी ठरला.* प्रबुद्ध समाज आणि प्रबुद्ध भारत घडविण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणविणाऱ्या प्रत्येकाचे प्रबुद्ध योगदान अत्यावश्यक ठरते. मुल्याधिष्ठीत, व्यावहारिक, सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाल्याशिवाय कुठलाही समाज प्रबुद्ध समाज म्हणून प्रगती करू शकत नाही. यामध्ये व्यक्तीगत योगदान महत्वपूर्ण भूमिका वठविते._
_प्रबुद्ध भारताच्या दिशेने वाटचाल घडून येण्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपली व्यक्तीगत मुल्ये वाढवून धम्ममार्गाचा दैनंदीन जीवनात वापर वाढवावा. जसे वरील गाथेमध्ये हे स्पष्ट करताना तथागत बुद्ध उपदेश करतात की, 'मार्गामध्ये अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे,' जसे-सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधी. या आठ अंगांनी संपृक्त मार्गालाच तथागत मज्झिमा पटिपदा अर्थात मध्यम मार्ग म्हणतात. हा मार्ग मनुष्याला याच जीवनात सुख मिळवून देणारा आहे. शांत, सुखी, समाधानी जीवन जगण्यासाठी अष्टांगिक मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्याचे हे श्रेष्ठत्व जाणून प्रत्येकाने त्यानुसार आचरण करावे. कारण व्यावहारिक जीवन जगताना शील-सदाचारयुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. तथागत बुद्ध म्हणतात-_
_*सद्धो सीलेन सम्पन्नो यसोभोगसमप्पितो।*_
*_यं चं पढेसं भजति तत्थ तत्थेव पूजितो।।_*
_*अर्थात- "जो श्रद्धावान आहे, जो सदाचारी आहे, जो यशस्वी आहे. जो संपत्तीशाली आहे, तो जिथे जिथे जातो, तेथे-तेथे सत्कार प्राप्त करतो याप्रकारे त्याच्या यशाची वृद्धी होते."*_
_अष्टांग मार्गाच्या आचरणाने संपन्न व्यक्ती सर्वत्र सुख प्राप्त करतो. अशाप्रकारचा सुखी व्यक्ती सर्वांशी सलोख्याचे संबंध स्थापित करून आपल्या घरात, समाजात सर्वत्र शांतता प्रसारित करण्याचे कार्य करतो. याप्रकारे प्रबुद्ध समाजाच्या जडणघडणीत तो आपले योगदान देत असतो. याचप्रकारची सामुहिक कृती समाजाला प्रबुद्ध भारताच्या दिशेने घेऊन जाण्यास कारणीभूत ठरू शकते._
_*प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मनुष्याला वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान असणे आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या घडामोडींचे प्रत्यक्ष कारण शोधताना त्यांनी मुळ सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी स्वतःचे अवलोकन करताना जाणावे की, मी ज्या दुक्खाला भोगतो ते समाजात सर्वव्याप्त आहे. अर्थात दुक्खाचे अस्तित्व सर्वत्र सारखेच आहे. मात्र हे नित्य नाही. हे दुक्ख सुद्धा कोणत्यातरी कारणामुळे निर्माण होते, ज्याला तृष्णा म्हणतात, हे तथागत बुद्धाने शोधून काढलेले महान मानवी सत्य आहे. या तृष्णेमुळेच मनुष्य आणि समाज अशांततेत व्याप्त आहे. परंतु तथागत म्हणतात. या तृष्णेचे अस्तित्व सुद्धा क्षणिक आहे. प्रज्ञेच्या सहयाने अविद्यारूपी तृष्णेला नष्ट करता येते. याप्रकारे तृष्णा नष्ट करणारा प्रज्ञारूपी मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग होय. म्हणूनच तथागत बुद्ध या चारही सत्यांना सर्वश्रेष्ठ मानतात. ही वास्तविकता जाणणारा मनुष्यच सुख प्राप्तीसाठी अष्टांगमार्ग युक्त शील-सदाचाराचे जीवन जगू शकतो.*_
_शील-सदाचाराचे जीवन जगताना तो धम्मामध्ये प्रतिष्ठित होतो. मी ज्या सुखाने जगतो आहे तसेच इतरांनी सुखाने जगावे अशी उदात्त मानसिकता जोपासतो. सुखी जीवनाचा मार्ग चित्ताच्या परिशुद्धीमध्ये आहे हे जाणल्यामुळे तो अधिकाधिक अनासक्त होतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांवर अनासक्त होऊन विजय मिळविण्याचा प्रयत्न करतो. याप्रकारे धम्मामध्ये वैराग्य प्राप्त करतो आणि अधिकाधिक सुखाला प्राप्त करतो, म्हणून तथागत बुद्ध या अवस्थेला परम श्रेष्ठ मानतात. या वैराग्य अवस्थेला प्रत्यक्ष तथागत बुद्धाने प्राप्त करून परम सुखाला प्राप्त केले होते. तद्नंतर हा मार्ग त्यांनी समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी प्रसारित केला. अर्थात यशस्वी प्रयोगानंतर सांगितलेला तो रोगोपचार आहे. हाच मार्ग मनुष्याला प्रबुद्ध बनविणारा आहे. याचप्रकारे प्रबुद्ध मनुष्यांपासून प्रबुद्ध समाज आकारास येणार आहे._
_म्हणून प्रबुद्ध भारताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मनुष्यमात्रांनी हे उत्तमरित्या जाणावे की 'याची देहि, याची डोळा' ज्यांनी संपूर्ण सुखाला प्राप्त केले ते तथागत बुद्ध सर्व मनुष्यमात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. त्या सर्वश्रेष्ठ मनुष्याने कथन केलेला उपदेश प्रत्यक्ष अनुभूतीतून साकारलेला आहे. म्हणून आपणही त्याच मार्गाचे अनुसरण करून याच जीवनात सुखाला प्राप्त करू शकतो. तथागतांचा हा धम्म म्हणजे प्रत्यक्ष जीवनमार्ग होय. यात पोकळ तत्वज्ञान मुळीच नाही. आचरणाव्यतिरिक्त धम्माचे अस्तित्व नाही. म्हणून धम्ममार्गावर आरूढ राहण्यासाठी सतत जागरूकता तेवढीच आवश्यक आहे. याप्रकारे जीवनयापन करणारा प्रत्येक व्यक्ती संघाचा श्रावक बनतो. त्यांच्या शिष्यांविषयी धम्मपदात वर्णन आहे की,_
_*सुप्पबुद्ध पबुज्झन्ति सदा गोतम सावका।*_
*_येसं दिवा च रत्तो च निच्चं बुद्धगता, धम्मगता, संघगता सति ।।_*
_*अर्थात- "ज्यांची दिवस-रात्र बुद्ध, धम्म आणि संघ विषयक स्मृती कायम राहते, ते गौतम बुद्धाचे श्रावक (शिष्य) फार जागरूक असतात. अशाप्रकारे सतत जागरूक असणारे श्रावक स्वतः सुखी होऊन इतरांना त्याप्रकारे जगण्यास प्रेरित करतात."*_
_या माध्यमातूनच सामाजिक सौख्य आणि शांततामय वातावरण स्थापित होऊ शकते. भिन्न-भिन्न वंश, परंपरा, सभ्यतांमधील तेढ संपुष्टात येऊन पारस्पारिक मैत्रीभावना, प्रेम, आपुलकी यांची वाढ होऊ शकते. तेव्हाच मानवजात संपन्नता प्राप्त करेल. गरज आहे ती याप्रकारे प्रबुद्ध बनण्याची. म्हणून प्रबुद्ध भारतांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रत्येकाने या परिपूर्ण जीवनमार्गाचा अवलंब पूरेपर करावा._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २७/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक डिसेंबर २०११ अंक ४१ वर्ष चौथे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_26.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment