Monday, 29 January 2024

कृतज्ञता आणि कर्तव्यपरायणता

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_कृतज्ञता आणि कर्तव्यपरायणता_*

*_विमलकित्ती गुणसिरी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

            _जीवनात माणूस केंव्हा न् केंव्हा कोणा न कोणाशी तरी कृतज्ञता बाळगीत असतो. कोणी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवीत असतो. त्या उपकाराची जितक्या चांगल्या प्रकारे परतफेड करता येईल, तशी करण्याचा प्रयत्न करीत असतो. माणसाच्या अंगभूत नैसर्गिक गुणांपैकी हा एक अत्यंत मोलाचा सद्गुण आहे. हा सद्गुण जोपासण्यातून माणसास चांगले करण्याची, चांगले वागण्याची तसेच इतरांच्या चांगुलपणाचे अनुकरण करण्याची सतत प्रेरणा मिळत असते. कृतज्ञता माणसास विनम्र करते. त्याच्या ग्रहणशीलतेला मुक्त करते आणि त्याच्या आंतरिक विकासाचे दरवाजे खुले करते. कृतज्ञतेमुळे त्याची भावनिक शुद्धी होते. त्याच्या मनात इतरांबद्दल आदर आणि सन्मानाची वृत्ती वाढते. त्याच्या जीवनाच्या समृद्धीचे शिखर गाठण्याची प्रेरणा देते._

             _परंतु ही कृतज्ञता अंतःकरणाच्या गाभ्यातून यावी लागते. ती अत्यंत प्रामाणिकपणे जाणावी लागते आणि त्या भावनेचा आवेग जोपासावा लागतो. व्यवहारात प्रसंगापुरती मानली जाणारी कृतज्ञता ही एक सामान्य बाब असते. परंतु भावनेचा उमाळा घेऊन आलेली कृतज्ञता जीवनाला ध्येयाकडे भरारी घेण्यास भाग पाडते. थोरांप्रती आणि महापुरूषांप्रती बाळगली जाणारी कृतज्ञता तर या प्रकारातील सर्वश्रेष्ठ भावना असते; नव्हे, तर ती तशीच असावी लागते!_

           _हे नमूद करण्याचे कारण असे की, *आजकाल बोधिसत्त्व बाबासाहेब आंबेडकरांना आपले उद्धारकर्ते मसिहा मानणारे आणि त्यांच्याप्रती उदंड कृतज्ञता असल्याचे सांगणारे लोक त्यांच्या नावाचा खूप उदोउदो करतांना दिसतात. त्यांची संख्याही अमाप आहे. त्यांचा उत्साहसुद्धा जोरदार आहे. त्यांची आंबेडकर प्रसंशेची भाषाही मोठी मोहक आणि अलंकारीक आहे. त्यांनी गेल्या पन्नास वर्षात भारतभर त्यांचे इतके पुतळे उभारले आहेत की अरूण शौरीसारख्या आंबेडकद्वेष्ट्यांच्या पोटात पोटशूळ उठावा एवढा त्या पुतळ्यांचा दबदबा निर्माण झालेला आहे. आणि तरीसुद्धा हे आंबेडकरप्रेमी खऱ्या कृतज्ञतेला पारखे झाल्यासारखे वाटतात. ते कृतज्ञता भाव खरंच जाणतात, खरंच अनुभवतात काय? असा प्रश्न पडतो. कशामुळे? तर त्यांच्या प्रवृत्तीकडे पाहून जे दिसते त्यामुळे होय!*_

              _त्यांच्या कोणत्या प्रवृत्तीतून काय दिसते? ते जरा पाहा. आपणा सर्वांनाच ते दिसते आणि अखडतेसुद्धा. *आंबे‌‌डकरांच्या नावाने होणाऱ्या समारंभात एरव्ही प्रचंड प्रमाणात गोळा होणारा समाज जेव्हा आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धम्माच्या विषयापर्यंत येतो, तेव्हा त्यातील जास्तीत जास्त सगळीकडे तितरबितर होऊन जातात. एकंदरीत दीन-दलितांच्या सर्वांगिण उद्धारासाठी डॉ. आंबेडकरांनी सर्वोत्तम जे केले ते म्हणजे त्यांना भगवान बुद्धांचा धम्म दिला, हे होय. त्या त्यांच्या सर्वोत्तम उपकारासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगणे ही खरी कृतज्ञता ठरते. तो धम्मच नाकारून आंबेडकरप्रेमी खरंच त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगतात असे म्हणता येईल का? याचा थोडा गंभीरपणे विचार केला पाहिजे.*_

                  _माणुसकीला काळीमा फासून आणि उच्च-नीचतेच्या जातीभेदांची कुंपणे उभारून या देशातील करोडो लोकांची जीवने सुमारे एक हजार वर्षे नरकमय करून ठेवणाऱ्या धर्म-संस्कृती विरूद्ध डॉ. आंबेडकरांनी यशस्वी लढा दिला आणि माणसाचे इहलोकीचे जीवन सुखमय करण्याची व्यवस्था केली. त्यांनी केलेल्या जातीभेदावरील प्रखर आघातामुळे हे शक्य झाले. हे त्यांचे महान उपकार होते, हे निःसंशय खरे आहे. त्यामुळे पुलकीत झालेल्यांनी त्यांना आपले दैवत मानले, तर ते समजण्यासारखे आहे. परंतु त्या हजार वर्षाच्या नरकाचे कायमचे पारिपत्य करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हे जाणून त्या नरकीय प्रवृत्तींचे बळी असलेल्या आणि जातीभेदांच्या उच्च-नीचतेच्या विषाणूंनी बाधीत झालेल्या सर्वच जातींच्या लोकांना त्या विकारातून मुक्त करणे हे आपले सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे, हे डॉ. आंबेडकरांनी जाणले. त्या *जातीभेदाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी त्यांनी बुद्धाचा धम्म दिला. त्या धम्माची सर्वात पहिली आणि तातडीची गरज होती आणि आजही आहे ती जातीभेदाच्या पायाशी जखडलेल्या दीन-दलितांनाच होय. बौद्ध म्हणून दीन-दलितांतील असंख्य जाती आणि पोटजातींचे अडसर दूर करून त्यांचा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या सर्वश्रेष्ठ मानवी मूल्यांवर आधारित एकसंघ समाज घडविणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. दीन-दलितांच्या या सुसंघटीत समाजाच्या बहुसंख्येवरच त्यांचे लोकशाही शासनव्यवस्थेतील स्थान आणि सामाजिक न्याय अवलंबून आहे. तो समाजच जर धर्माच्या आणि माणसाला माणसापासून तोडणाऱ्या आणि आपापसात लढविणाऱ्या जुन्या जातीच्या श्रद्धा, रूढी आणि परंपरेत अडकून पडला, तर त्याचे भविष्य बिघडलेच म्हणून समजा. आणि आजचा दलित वर्ग, त्यातील अनेक जाती-जमाती नेमके हेच करीत आहेत. डॉ. आंबेडकरांच्या सर्वश्रेष्ठ दानाचे जातीची कुंपने सांभाळीत अक्षरशः मातेरे करीत आहेत.*_

                _आज भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीपासूनच्या गेल्या सहा दशकात नेमके हेच घडत असतांना दिसत आहे. हे सर्व उघडपणे दिसत असूनही *जर आंबेडकरीप्रेमी मागासवर्गीय जाती-जमाती अजूनही भानावर येत नसतील, तर त्यांचे आंबेडकरप्रेम बेगडी आहे, असेच म्हणावे लागेल, त्यांची कृतज्ञता वरवरच्या देखाव्याची आरास आहे, असेच म्हणावे लागेल.* ज्याला आज बहुजन समाज म्हणून ओळखले जाते, त्यातील आंबेडकरप्रेमींचीसुद्धा आजची हीच अवस्था आहे. एकीकडे लोकशाही शासनव्यवस्थेत आपणावर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध आक्रोश करायचा आणि न्याय संपादनचे सर्व मार्ग मोकळे असतांनाही त्याचा उचित लाभ न घेता जातीच्या कुंपनात स्वखुषीने नांदायचे ही बहुजनांची दुटप्पी मानसिकता झालेली आहे. त्यातूनच त्यांची सर्व क्षेत्रात कोंडी झालेली आहे. डॉ. आंबेडकरांचे न ऐकल्याचा हा परिणाम आहे. त्यांनी सर्वोत्तम दिलेले न घेण्याचा हा परिणाम आहे. बुद्धधम्माचा स्वीकार न करण्याचा हा परिणाम आहे. जुनी दुःखे हल्की झाली, नव्या काही सुखसोईची प्राप्ती झाली, यातच हा बहुजन समाज गुंगून गेला आणि आपल्या उद्धाराची खरी जबाबदारी ही आपलीच आहे हे विसरून गेला. ही स्वजबाबदारीची जाणीव गमाविल्याने बहुजन समाज डॉ. आंबेडकरांशी नामधारी कृतज्ञ राहीला._

               _त्यातच कधी नव्हे, ती बहुजन समाजातील लोकांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळू लागली. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाच्या किमान एक हजार वर्षाच्या काळात गुलामीत जगलेल्यांना सत्ता मोठी प्राप्ती वाटणार यात शंका नाही. त्यामागे सर्वच जाती-जमाती धावू लागल्या. सत्ताधिश होण्याची आपली काही पात्रता आहे की नाही, याची काही चाड न बाळगता आपल्या जातीच्या नावाचे भांडवल करून सर्व जाती-जमातीतील पुढारपणास हपापलेले महत्वाकांक्षी लोक आपापल्या जातीच्या संख्याबळाचा आधार घेऊन सत्तेच्या प्रांगणात सौदेबाजी करू लागले. पूर्वी सेवाभावी, चारित्र्यवान, ज्ञानी आणि विचारवंत लोकच समाजाची आणि देशाची उत्कृष्ट सेवा करण्यासाठी सत्तेत जात असत. पण लोकशाही यंत्रणेत ही नैतिकता पूर्णपणे धुळीस मिळाली आणि जातीच्या आणि त्यात भरीस भर पडलेल्या पैशाच्या बळावर स्वार्थी, चारित्र्यहीन, आणि गुन्हेगार प्रवृत्तीचे लोग राजरोसपणे पुढारी बनू लागले. ही *सत्तेची नशा पुढारपण करणाऱ्यांबरोबरच जनतेलाही चढत असते. त्यात त्या जनतेला आपल्या जातीची झिंग चढते आणि मग चांगले-वाईट गेले चुलीत म्हणत 'आमच्या जातीची उमेदवार' म्हणून तो जातीसाठी माती खातो आणि कोण्या लंफग्याला मत देऊन मोकळा होतो.* याचे काय दुष्परिणाम होतात, हे आज उभ्या देशाला दिसते आहे. भोगावे लागत आहे. निरनिराळ्या पक्षांमधून का होईना परंतु बहुजनांचे बऱ्यापैकी प्रतिनिधी सध्या मत्रिमंडळात जातांना दिसतात. तरीही बहुजनांचे हाल थांबत नाहीत आणि त्यांना न्याय मिळत नाही. कारण निरनिराळ्या पक्षांच्या गुलामगिरीत राहून बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारे त्या त्या पक्षाचे बांधील गुलाम बनत असल्याने त्यांना बहुजनांच्या कल्याणाचे कोणतेही कार्य करता येत नाही. उच्च वर्णीयांचे पक्ष मात्र धर्म आणि जातीच्या नावाने जातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात आणि आपला टाकावू धर्म बहुजनांच्या गळ्यात लोढण्याप्रमाणे अडकवून ठेवण्यात यशस्वी झालेले दिसत आहेत._

                   _डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुरतेपणी जाणलेले होते. बहुजनांच्या सर्वांगिण हिताची लोकशाही अशा प्रकारे त्यांच्याच अज्ञानाने निकामी होऊ शकते, हे ते ओळखून होते. जाती संस्कारातील गुलामी वृत्ती एकाएकी जात नसते. *जात मानणारा धर्म जोपर्यंत सोडला जात नाही, तोपर्यंत जातीय मानसिकता मुळीच जात नसते.* या मानसशास्राचा अचूक वापर करून उच्चवर्णीयांनी बहुजनांना धर्म-संस्कृतीच्या नावाने जाती- जातीच्या कोंडवाड्यात डांबून ठेवले आणि त्यांना पुन्हा एकदा दैन्य-दारिद्र्याचे, हीनतेचे आणि मागासलेपणाचे शिकार बनविले. ज्यांचे जवळ समाजाचे नेतृत्त्व करण्याची आणि त्यांच्या कल्याणासाठी राबण्याची मुळीच काही योग्यता नाही असे लोक दुसऱ्याच्या मेहरबानीने राज्यकर्ते झाले तर असेच होते. *जातीच्या नावाने बहुजनांच्या एकीची वाटचाल रोखून ते जाती-जातीच्या नावाने बेकीच जोपासतात. हे घडू नये म्हणून बहुजनांनी तरी बौद्ध बनून या गुलामी मानसिकेतून मुक्त व्हावे, ही डॉ. आंबेडकरांची अपेक्षा होती.* बुद्धाचा धम्म या कामी एकमात्र उपाय होता. तो त्यांनी निवडला आणि बहुजनांनी त्या मार्गाने जावे, असे सांगितले. ही त्यांची बहुजनांच्या कल्याणाची सर्वश्रेष्ठ देणगी होती, त्यांनी केलेले सर्वश्रेष्ठ उपकार होते. परंतु त्या दीन- दलितांनीसुद्धा जाती मोडण्याऐवजी मागास जातींना सत्तेचे गाजर दाखवून कसे बसे एकत्र आणण्याचेच जातीय राजकारण केले. जाती तोडून आणि बौद्ध बनून एकसंघ समाज जोडण्याऐवजी त्यांनी जाती कायम ठेवून 'जाती जोडो'चाच नारा लावला आणि त्यांचा मूळ आधार जो धर्म तो टिकवून ठेवला. डॉ. आंबेडकरांचा विचार त्यांनी अशा प्रकारे निकालात काढला. डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा विसर बहुजनांना पडला, हे वाईट झाले. परंतु त्यांना मानणाऱ्या दीन-दलितांनाही त्याची फार चाड राहिली नाही, हे दिखाऊ वाटते._

                _*डॉ. आंबेडकरांबरोबर धम्मदीक्षा घेणारेसुद्धा असेच वाहवत गेले. नीट बौद्ध बनायचे, सचोटीने जाती मोडून अखंड बौद्ध समाज घडवायचा सोडून ते जुन्या जाती-पोटजातींचे स्तोम माजवून राजकारण करीत राहिले.* जुनी जात कायम ठेवून आणि जुन्या जातीप्रथांची थोडी फार डागडुजी करीत त्यांनी बुद्धधम्माचीच एक जात बनवून टाकली. *धर्म बौद्ध आणि जात महार सांगू लागले.* हाही जातीय राजकारणाचाच प्रताप. त्यामुळे इतर जातींना बुद्धधम्मात येण्याचा मार्ग बंद झाला. एक प्रकारे त्यांनी बुद्धधम्माचा जातीय कोंडवाडा निर्माण केला. काही मागास जाती स्वतःच्या गौरवासाठी इतिहासाची लक्तरे शोधू लागल्या आणि तुमचे बाबासाहेब तर आमचे अमूक अमूक म्हणत पुन्हा जातीचा बिगुल वाजवू लागले. अशा प्रकारे जर ते जातीच्या तुकड्यांमध्ये अडकू लागले, तर त्यांचे बहुमत होईल कसे? आणि त्यांना सत्तेचा खरा लाभ मिळून त्यांचे भवितव्य घडेल कसे? परंतु जातीच्या नावाने इतर पक्षांकडून मिळणाऱ्या क्षुद्र स्वार्थास बळी पडून त्यांचेतील भुक्कड नेते नको तोच स्वघात आणि समाजघात करीत आहेत. म्हणून त्यांनीसुद्धा आंबेडकरांप्रती दाखविलेली प्रासंगीक कृतज्ञता दिखाऊ वाटते._

                _*आम्ही सुरूवातीस म्हटल्याप्रमाणे कृतज्ञता जीवनाचे शिखर गाठण्याची प्रेरणा देणारा महान सद्गुण आहे. जेव्हा हा सद्गुण खऱ्या अर्थाने मन व्यापतो, तेव्हाच माणसाचे हातून त्यायोग्य कार्य घडते. तो कर्तव्यपरायण बनतो. तो आचरणशील बनतो. ध्येयनिष्ठ बनतो.* आज तथाकथित बौद्ध समाज कर्तव्यनिष्ठ कां नाही, याचे उत्तर या मानसिकेत दडलेले आहे. त्यामुळे त्याचे इमान बिघडून तो स्वार्थाचा पाईक आणि अहंकाराचा नाईक झालेला आहे. या दोन गोष्टींपुढे त्याला कशाचीही पर्वा राहिलेली नाही. त्याचे आंबेडकरप्रेम म्हणून दिखाऊ आणि टाकाऊ झाले आहे. *खरे, तर डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करीत तो त्यांच्या जीवनादर्शाचाच मारेकरी झालेला आहे.* नाही तर एकीकडे स्वतःला बौद्ध म्हणून घेत दुसरीकडे तो जुन्या देवधर्मात आणि रूढीपरंपरांत कां अडकला आहे? केवळ अज्ञान हे त्याचे कारण नाही. ते फक्त एक सांगायचे निमित्त आहे. कारण कृतज्ञतेतून निर्माण झालेली कर्तव्यनिष्ठा भल्या-बुऱ्याचे आणि आपल्या आदर्शाच्या विरोधाचे पुरते भान ठेवणारी असते. म्हणून *कर्तव्यनिष्ठ माणून जे काही करायचे ते चांगले जाणून आणि त्याबद्दलची खात्री पटवूनच करीत असतो. आपल्या होणाऱ्या चुका सतत दुरूस्त करीत राहतो. सतत नवनवे शिकत राहतो. ही वृत्ती वर्तमान बौद्ध समाजात दिसत नाही. उलट तो बुद्धधम्माचे बाबतीत चुकीचे आणि तुटपुंजे ज्ञान असलेल्या आणि आचरणात शून्य असलेल्या लोकांनी चालविलेल्या संस्थांमध्ये हिरीरीने वावरतो आणि त्यांच्या विरोधात कोणी ब्र शब्द काढला तर त्याला सळो की पळो करतो.* विनाश काले विपरीत बुद्धी अशी त्याची गत झालेली दिसते. *अनेक प्रकारच्या सद्गुणांचे जोपासण्यासाठी आज तरी बहुजनांचे पुढे डॉ. आंबेडकरांचा दैदिप्यमान आदर्श आणि उपकार आहेत. गरज आहे ती सच्च्या इमानाची आणि स्वजबाबदारीची. या दोन गोष्टी जोपासल्या तर आजही त्यांचा ठरेल आणि उद्या तर ठरेलच ठरेल, यात काही शंका नाही.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २९/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक जुन २०१२ अंक ४७- वर्ष चौथे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_29.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...