🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_आंबेडकरवाद (बाबांचा संदेश)_*
*_विमलकित्ती गुणसिरी_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_तसे पाहिले तर, आंबेडकरवाद म्हणजे काय? असा प्रश्न विचारून वाद विवाद करण्याचे कार्य बाबासाहेब गेल्यानंतर लवकरच सुरू झाले. त्यांच्या जीवन शिकवणीचा एक इझम् किवा एक 'वाद' निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केलेला आहे. *त्यातील आंबेडकर म्हणजे काय? एवढा भाग सोडला तर बाकीचा "वाद" हा माणसाला "बाद" करण्यासच अधिक कारणीभूत झाला आहे.* असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही._
_*"आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्ञाची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली 'भीमा'चा गदा होय. आंबेडकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आंतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय."*_
_('दलितांचे बाबा' लेखक: आचार्य प्र. के. अत्रे)_
_*बाबासाहेबांचा जीवनसंग्राम हेच मुळी एक महाबंड होते.* तो मानवमुक्तीचा लढा होता. विशिष्ट शत्रूशी, विशिष्ट परिस्थितीत, उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीनि, मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा होईल तितका फायदा उठवित हा लढा लढायचा होता. त्याची कोणतीच चाकोरी ठरलेली नव्हती. त्यातील साधनेही अपूरी, अनिश्चित होती, ती वापरणारी माणसे अप्रशिक्षित होती. *'सैन्य पोटावर चालते असे म्हणतात. पण बाबांचे हे सैन्य मात्र 'पोटावर मारून चालणारे होते.* दैन्य-दारिद्र्याने लुबाडलेल्या, रूढी-परंपरांनी चिरडलेल्या, धर्मसंस्कृतीने पिळलेल्या आणि अस्पृश्यतेने माणसातूनच उठविलेल्या अन् त्या हद्दपारीची कोणतीच चीड आणि बव्हंशी चाडही नसलेल्या लक्षावधी मानवांच्या मुक्तीचा हा संग्राम होता. सर्वस्वाहूनही अधिक गमावून बसलेल्या, परंतु त्याविरुद्ध आवाज उठविण्याचीही सोय, क्षमता नसलेल्या, एकार्थाने मूक-बधिरांच्या नायकाने पुकारलेला तो मुक्तीसंग्राम होता. माणसाने माणसाविरूद्ध माणूसकीसाठी लढलेला हा न भूतो न भविष्यति असा एकमेव लढा होता. एरव्ही, सर्वस्व हिरावले गेलेले जगातील गुलाम आपले मनुष्यत्त्व तरी सांभाळून होते. परंतु येथे तर तेही हिरावले गेले होते. असा हा मतीहीन, गतीहीन, वित्तहीन, नीतीहीन, शस्त्रहीन, शक्तीहीन, युक्तीहीनांचा लढा विश्वाच्या इतिहासाने न कधी देखिला न कधी पाहिला असा होता. त्या संग्रामाला कोणत्या वादाच्या कोंदणात बसवू पाहायचे? सर्व इझमांचा इक्षम् असा तो ह्यूमेनिझम्, सर्व वादांचा वाद असा तो मानवतावादसुद्धा जेथे थिटा पहला होता. जेथे देववाद, दैववाद, धर्मवाद, कर्मवाद, ज्ञानवाद, विज्ञानवाद इतकेच नव्हे, तर या सर्व वादांचा दादा असलेल्या अज्ञानवादानेही हात टेकले होते, अशा गडद अंध:काराने प्रकाशाच्या एका किरणासाठी सर्व प्रस्थापितांविरूद्ध उभा केलेला हा होता साक्षात जीवनसंग्राम! त्याला कोणत्या साच्यात बसवायचे? आणि साच्यात बसवायचे तरी कशासाठी ? नीटस आकलनासाठीच ना? समजण्यासाठीच ना? परंतु साचेबंद समाज गतीहीन असल्यामुळे तो प्रत्यक्ष माणसालाच साचेबंद करीत असतो त्याचे काय? याचेही भान ठेवावे लागते. कारण साच्यात बसविले जाणारे आणि बसविणारे एकजीव नसतात. स्थळाकाळानेच नव्हे, तर तन-मनानेही दूरस्त असतात. म्हणून आकलनच करायचे असेल, तर साचे निर्माण न करता, सरळ सरळ केले तर काय बिघडले? म्हणून या जगावेगळ्या जीवनसंग्रामाला साकार करणाऱ्या, आकार देणाऱ्या काही अद्भूत शस्त्रास्त्रांचा तरी परिचय करून घेवू. ते आपल्या काही हिताचे ठरेल की नाही, हे तरी पाहू._
_ही शस्त्रास्त्रे बाहेरून आणलेली नव्हती. कोणी तयार केलेली नव्हती. कोणी पूर्वी वापरलेलीही नव्हती. ही शस्त्रास्त्रे अंतःरंगात साकारलेली होती, रोमारोमात संचारलेली होती, प्राणाप्राणात प्रकाशली होती. स्वयंतेजाने तळपत होती. विजेच्या चपळाईने खणखणाटत होती. धारण करणाऱ्या योद्धयाला थुईथुई नाचवित होती. प्रतिस्पर्ध्याच्या गोटाचा थरकाप उडवित होती._
_*यातील पहिलेच सर्वात तेजस्वी शस्त्र होते स्वाभिमान.* होय, स्वाभिमान. अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी या शस्त्राचे अंगी जे तेज आहे, तसे दुसऱ्या कशातही नाही. *मनुष्य म्हणून स्वाभिमान असणे हेच माणुसकीच्या लढ्यातील खरे शस्त्र होय.* ज्याच्या जवळ स्वाभिमान नाही, तो जिवंत असून मेल्यासारखा आहे, मुक्त असून गुलाम आहे, मनुष्य असूनही पशू आहे. त्याला जगण्याचा हक्क नाही. हा स्वाभिमान गमावून बसलेल्यांना बाबासाहेबांनी जागे केले, त्यांना स्वाभिमानाच्या शस्त्राने सज्ज केले. त्यासाठी त्यांना डिवचले, चिडविले, धिक्कारले, धुत्कारले आणि ललकारलेः_
_*"तुमची ही दीन वदने पाहून नि करूणाजनक वाणी ऐकून माझे हृदय फाटते. युगानयुगे तुम्ही गुलामगिरीच्या गर्तेत गंजत, कुजत, सडत पडला आहात. तरी तुमची हीच भावना आहे की, आपली दुर्दशा देवनिर्मित आहे. ईश्वरी संकेतानुसार आहे. तुम्ही गर्भात असतांनाचत कां मेला नाहीत? जन्मास येऊन तुम्ही जगातील दुःख, दारिद्र्य नि दास्य यांच्या अक्राळविक्राळ चित्रांचा भेसूरपणा आपल्या अवनत व अपमानित दुःखी जीवनाने वाढवीत आहात. जर तुमच्या जीवनाचे पुनरूज्जीवन होत नसेल, तर तुम्ही या जगातून नाहीसे होऊन, जगाच्या दुःखाचे ओझे का कमी करीत नाही? तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात. स्वतःच्या कर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्यास प्रत्येकास स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवासी आहात. तुम्हाला अन्न, वस्त्र व आसरा इतर भारतीयांच्या बरोबरीने मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून तुम्हाला स्वाभिमानपूर्वक जिणे जगायचे असेल, तर स्वावलंबन हाच खरा आत्मोन्नतीचा मार्ग होय."*_
*_(डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखकः धनंजय कीर, प्र.आ. १९६६ पृष्ठ ६४)_*
_तीरासारखे हे शब्द ऐकणाऱ्यांच्या हृदयाचा वेध घेत होते. माणसाच्या काळजाचे पाणी पाणी होत होते. गलितग्रात्र शरीरात हत्तीचे बळ संचारत होते. सुरकुतलेल्या चेहऱ्यांवर आत्मविश्वासाचे तेज झळाळत होते. माणूसपण हरविलेला माणूस जागा होत होता, सुप्त ज्वालामुखीचा विस्फोट होऊ पाहात होता._
_माणसासारखा माणूस असूनही त्याला पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागावा ? संगर करावा लागावा? लढा द्यावा लागावा? धर्मवेडाने, परंपरागत अज्ञानाने हिंदू माणूस इतका बुद्धिभ्रष्ट झाला होता, आंधळा झाला होता की, दलितांनी त्यांना *'आम्ही माणसेच आहोत'* असे ओरडून सांगितले तरी त्याला कळत नव्हते. त्याचे डोळे उघडत नव्हते. पाणी म्हणजे निसर्गाचं देणं! त्यावर किडा-मुंग्यांनाही आपला हक्क गाजविता येतो, तो माणसाला नसावा? काय हे आक्रीत? कोणी केला असला न्याय? माणसानं ! कोणी सोसला हा अन्याय? माणसानं ! त्यावर घालावा कोणी घाव? माणसानंच! मन-मन स्वाभिमानाने चेतले, आणि मग, चवदार तळ्याचे पाणीसुद्धा पेटले! माणुसकीच्या लढ्याचे रणशिंग फुंकले! धर्म-संस्कृतीच्या ठेकेदारांच्या तोंडचे पाणी पळाले! माणसातून उठलेल्यांनी मात्र आपले पाणी दाखविले! ज्वालामुखीचा पहिला हादरा बसला. स्वाभिमानाचा लाव्हारस उसळू लागला._
_'रहिमन पानी राखिएँ, बिना पानी सब सून। _
_पानी गए न उबरै, मोती, मानस, चून।'_
_*'हे रहिमन, आपलं पाणी राख, पाण्याविना सर्व काही शून्य होय. मोती पाणीदार नसेल, तर त्याची किंमत शून्य, चुन्यात पाणी नसेल तर त्याची किंमत शून्य;* त्याच प्रमाणे, माणसात पाणी नसेल, तर त्याचीही किंमत शून्यच होय.' अशा प्रकारे तो दलित आता महाडच्या तळ्याच्या चवदार पाण्याबरोबरच स्वाभिमानाचं अस्सल पाणी चाखू लागला होता. आपलं पाणी दाखवू लागला होता. बाबासाहेब पुन्हा गर्जले होते._
_*"आज अस्पृश्य वर्गात समाविष्ट होणाऱ्या जातीपैकी महार जात म्हणजे एक भिकार लोकांचा तांडा आहे. असे म्हणण्यास काही हरतक नाही. दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्याच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालविण्याची या जातीला सवय पडून गेली आहे. ह्या प्रघातामुळे या जातीला मुळी गावात इज्जत नाही, मान मरातब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान नष्ट झाला आहे. काहीही म्हणा! जोड्यात वागवा! पण मला तुकडा वाढा! अशी या जातीची वृत्ती बनून गेली आहे. या वृत्तीमुळे या जातीला स्वतंत्रपणे आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही.... अशा रितीने शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यासाठी आपलीमाणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शरमेची आहे."*_
*_(बहिष्कृत भारत, ३-४-१९२७)_*
_आता स्वाभिमानाचे पाणी चढले, आणि आन्नाला मोताद (मोहताज) झालेली, पोट खपाटीला लागलेली, उघड्या नागड्या शरीरांवर रया नसलेली, फाटक्या-तुटक्यात अब्रू झाकलेली ती हजारो माणसे नव्या तजेत्याने चमकू लागली. त्यांच्या रोमारोमात महाऊर्जेचा संचार झाला. युगायुगाच्या दबलेल्या माणुसकीचा स्फोट झाला, 'आम्हीही माणसेच आहोत, होय, माणसेच आहोत'च्या निनादाने धरणी दोलायमान झाली. आसमंत थरारून गेले, युगांतराचा प्रारंभ झाला. समता संगर सुरू झाला._
_*महिलाही आघाडीवर राहिल्या. बाबासाहेबांचा उपदेश ऐकल्याबरोबर तशा वागू लागल्याः*_
_*'अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न पुरूषांचा नसून तुम्हा स्त्रियांचा आहे. तुम्ही आम्हा पुरूषांना जन्म दिलेला आहे. आम्हाला इतर लोक कसे जनावरापेक्षाही कमी लेखतात हे तुम्हाला ठाऊक आहे ... तुम्ही आम्हास जन्मास कां घातले असा प्रश्न तुम्हाला कोणी केला तर त्याचे उत्तर तुम्ही काय देऊ शकाल? या सभेत बसलेल्या कायस्थ व इतर स्पृश्य बायांच्या पोटी जन्मलेल्या मुलांत व तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलात काय अंतर आहे? तुम्ही विचार करायला पाहिजे की ब्राह्मणाच्या स्त्रियात जेवढे शील आहे तेवढे तुमच्यातही आहे, ब्राह्मण स्त्रियात जेवढे पातिव्रत्य आहे, तेवढे तुमच्यातही आहे. आणि तुमच्यात जितके मनोधैर्य, करारीपणा व धमक आहे, तितकी ब्राह्मण स्त्रीयात देखील नाही. असे असतांना.. तुमच्या पोटी जन्मलेले बालक कां अवमानिले जावे, त्याला साध्या माणुसकीचा हक्क कां असू नये, याचा तुम्ही कधी विचार केला आहे काय? तुमच्या पोटी जन्म घेणे पाप कां ठरले जावे? आणि इतर स्त्रियांच्या पोटी जन्म घेणे पुण्यप्रद कां व्हावे? या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला एक तर प्रजा उत्पत्ती बंद करावी लागेल किंवा तुमच्यामुळे त्यांना लागत असणारा कलंक तरी तुम्हाला धुवून टाकावा लागेल... तुम्ही प्रतिज्ञा करा की, अशा कलंकित स्थितीत तुम्ही यापुढे जगणार नाही. समाजोचती करण्याचा जसा पुरुषांनी निश्चय केला आहे तसा तुम्हीही करा. दुसरी गोष्ट... तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरिती सोडून दिल्या पाहिजेत... ज्या गोष्टींमुळे लोक आपण अस्पृश्य आहोत असे ओळखतात त्या साऱ्या गोष्टी आता तुम्ही बंद केल्या पाहिजेत. तुमची लुगडी नेसण्याची पद्धत ही तुमच्या अस्पृश्यतेची साक्ष आहे. ती साक्ष तुम्ही बुजवली पाहिजे. वरिष्ठ वर्गाच्या बाया ज्या प्रमाणे लुगडी नेसतात त्याप्रमाणे तुम्ही लुगडी नेसण्याचा प्रघात पाडला पाहिजे. गळ्यामध्ये भाराभर गळसऱ्या व हातात कोपरभर कथलाचे किंवा चांदीचे गोठ ही देखील तुम्हाला ओळखण्याची खूण आहे... दागिना घालायचाच झाला तर तो सोन्याचा करून घालावा: नाही तर घालू नये त्याच प्रमाणे स्वच्छतेने वागण्याची खबरदारी घ्या... घरात कोणतीही अमंगल गोष्ट होऊ न देणे याबद्दल तुम्ही काळजी वाहिली पाहिजे.. दारूबाज नवऱ्याला, भावाला अगर मुलांना जेवायला घालू नका... तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे."*_
*_(बहिष्कृत भारत ३-२-१९२८)_*
_याचा तत्काळ परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी गावी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या पेहरावात नखशिखांत बदल केला. *त्यांच्या निश्चयाच्या कौतुकासाठी दरेकीला आठ आण्याचा इनाम दिला गेला. पुरुषांनीही हाताकानातील रानटीपणा दर्शविणाऱ्या दागदागिन्यांना फटक्यासरशी रजा दिली. इतकेच काय तर महाड म्युनिसिपालटीच्या कचरापट्टीत झाडूवाल्याची नोकरी करणाऱ्या महारांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला. स्वाभिमान जागृत होऊन कार्यरत झाला. संस्कारांचे मूळ उगमस्थान महिला होत.* अजाणतेपणापासून बालकांकडे त्या संस्कार संक्रमित करीत असतात. उगमस्थान शुद्ध झाले, तर सर्व शुद्ध झाले असे होईल. समाज परिवर्तनाला खरी गती येईल. *समाजोन्नतीच्या कार्यात जर स्त्रियांचा सहभाग नसेल तर ते कार्य कधीच यशस्वी होत नाही.*_
_गमावण्यासारखं काहीच नव्हतं, कमावण्यासारखं मात्र सर्वस्व होतं. नुसंत माणूसपण जरी मिळालं तरी जीवन सार्थ होतं. ही लखलखीत जाणीव झाल्याबरोबर एखादे विद्युत् जनित्र सुरू होऊन विझलेले लक्ष लक्ष दीप उजळून निघावेत, तसे हे मानवी दीप प्रकाशमान झाले. स्वयंप्रकाशाच्या पहिल्या किरणाच्या स्पर्शाने मनोमंदिर तेजोमय झाले. स्वाभिमानाच्या शस्त्राने वज्ररूप धारण केले._
_स्वाभिमानाची ऊर्जा ही माणसाची खरी नैतिक शक्ती होय. स्वाभिमान सर्व प्रकारच्या लांडी-लबाडीपासून वाचण्याचे बळ देतो. अन्यायाचा व लांडीलबाडीचा कर्दनकाळ बनण्याचे सामर्थ्य देतो. कष्ट आणि संकटांचा हिमालय पेलण्याची शक्ती देतो. स्वाभिमान स्वत सह जग बदलण्याची हिंमत देतोः निर्भय चिंतन-मननाचे बळ देतो, सर्व प्रकारच्या भिलीचा बागुलबोवा हद्दपार करतो. स्वाभिमान माणुसकीचे दिल्य पोसतो. माणूसकीचा धर्म जोपासतो. माणसाला सर्वार्थानं माणूस बनवून सोडतो._
_*परंतु सावधान, स्वाभिमानाचा एक जुळा भाऊसुद्धा असतो; त्याचे नाव दुराभिमान, अहंकार, कळत न कळत स्वाभिमानाची जागा दुराभिमान घेतो, आणि सारे चक्र उलटे फिरवितो. म्हणून स्वाभिमान दुराभिमान होणार नाही, अहंकार बनणार नाही, यासाठी सावधान!*_
_*"स्वाभिमान म्हणजे दुराभिमान नव्हे, अहंकार नव्हे, इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती नव्हे. स्वाभिमान ही पवित्र भावना आहे. आपण मनुष्य आहो, आपल्याला माणुसकीचे हक्क आहेत, आपले माणुसकीचे हक्क हिरावून घेण्याचा कोणाला अधिकार नाही, सर्वांना स्वतःची उन्नती करण्याची पूर्ण मोकळीक असली पाहीजे, असे वाटणे हा स्वाभिमान. खरा स्वाभिमानी मनुष्य दुसऱ्याच्या स्वाभिमानालाही जपत असतो, कारण त्याला स्वाभिमानाची किंमत ठाऊक असते."*_
*_(बहिष्कृत भारत, १.३.१९२९)_*
_दलितांची निखळ स्वाभिमानाने प्रभारित झालेली ऊर्जा आता मार्गस्थ झाली, आपल्या अंतरातले, आणि बाहेरचे कोने- कोपरे तपासू लागली. दृश्यादृश्य बंधनांचा शोध घेऊ लागली. प्राणाची बाजी लावून ती प्रत्येक अन्यायाचा प्रतिकार करू लागली. आपल्या उद्धाराच्या प्रत्येक अंगाचा विकास करू लागली. मुक्याला वाचा लाभली, पांगळ्याला गती लाभली, मरगळलेल्या जीवांना नवी संजीवणी लाभली, धर्मश्रद्धा बंधन महान परंपरागत संस्कारांचा पगडा महान, देव सर्व निर्माता, सर्व नियंता, सर्व ज्ञाता, सर्व करविता, सदा मायाळू, महादयाळू, परम कनवाळू ही श्रद्धा-भक्ती महान, स्वाभिमानाने सुरू केली चिकित्सा या धर्मबंधनाची, या श्रद्धा-विश्वासाची, माणसा-माणसातील व्यवहाराची, देवतांच्या पक्षपाताची, धर्माच्या बेइमानीची, श्रीक्षेत्र नाशकाची. 'बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल' हा रोकडा सवाल पुसण्याचीः मोहिम निघाली काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्त्याग्रहाची._
_सारे प्राणीमात्र म्हणजे ईश्वराची लेकरं! पण हा राम, त्याला उकिरड्यावरचं लेकरू कधी दिसलं नाही. सर्वज्ञाता, सर्वदृष्टा असूनही त्याच्या दृष्टीला कधी गावाबाहेरची वस्ती दिसली नाही. त्यांची श्रद्धा कधी त्याला कळली नाही, त्यांची भक्ती कधी त्याला भावली नाही. *पूर्वी म्हणे उकिरड्यावरच्या शंबूकानं स्वाभिमान कसून आणि हिंमत बांधून घोर तपश्चर्या सुरू केली, देवाच्या प्राप्तीसाठी घनघोर आत्मपिडा साहिली. अन् हा राम, ज्याच्यासाठी तप केले तो हा राम, आपल्या लेकराच्या कष्टानं कळवळून जाण्याऐवजी रागाने खवळून गेला. त्याने जाऊन शंबुकाचा शिरच्छेद केला. असा हा राम।* स्वाभिमानाने प्रकाशलेल्या मनांनी सवाल केला, 'एकच धर्म, एकच देव जर तुमचा आमुचा, तर पूजाअर्चेचा हक्क कां समान नसावा? देवळात जाऊन पुसू प्रत्यक्ष देवालाच.' बाबासाहेबांनी सत्त्याग्रहाचा व्यूह रचला, जना-मनाचा ठाव घेतला. सल्ला बिलाः मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पाहा,' सत्याचे आग्रही बनून तसे करून पाहिले, तर काय झाले? टाळके शेकून निघाले! धर्म श्रद्धेने झुकलेली मस्तके स्व-रक्तसिंचनाने माखून निघाली. *'कोण तुमचा तो देव?' या बाबांच्या सवालाचे उत्तर मिळाले. ऐन्ऱ्याचा सोयरा, गैऱ्याचा मेव्हणा.' तसा देव निघाला भ्रमाचा भोपळा, तो काय कोणाच्या कामाचा? झाले! आत्मज्ञान झाले! दगडी देवाच्या श्रद्धेचे पांग फिटले, सांडलेल्या रक्तापुढे शेंदराचे तेज फिके पडले. माणसाच्या डोईवरून तेहतिस कोटींचे ओझे उत्तरले.* माणसाचे मोडलेले पेकाट सरळ झाले. त्याचे मन बंधनातून मुक्त झाले. देव-दैवाचा बागुलबोवा मिटला, अमानुष संस्कृतीचा बांध फुटला, आपले-परायेचा पंचनामा झाला! देवासकट त्यांचा धर्म बुडाला, मना-मनाचा गंज झडला, होश सावरलेला मानव आता सद्धर्माच्या शोधात निघाला. *'हिंदु म्हणून मरणार नाही' या घोषणेने उभा भारत थरारला. कारण काळ्यारामाला काळे फासून नरसिंहाने माणुसकीचा नारा बुलंद केला होता. 'अरे, देवळातला कसला बाप, खरा बाप तर आहे आपल्यात!' असा साक्षात्कार घडविला होता.* तेव्हा कोठे माणसामाणसात स्वाभिमानाचे तेज फाकू लागले. तसे अघोरी ब्रह्मराक्षसांचे हृदय फाटू लागले. स्वाभिमानाचे शस्त्र आता प्रखर तळपू लागले. दश-दिशांना त्याचे तेज फाकू लागले, तसे सहस्त्रबाहू गुलामगिरीचे एकेक अंग गळू लागले, अन्यायाच्या शिरजोरीचे महाभूत दूर दूर पळू लागले. धर्मांतराचं मर्म मनी वसलं. बाबासाहेबांनी रणनीती कसली होती. बहिष्कृत भारतातून त्यांनी दृष्टी दिली होतीः_
_*"सत्त्याग्रह करून देखील आपणास हिंदू धर्मात थारा देत नाहीत याची जाणीव पटल्यावर अस्पृश्य लोक जे आज ढकलून दिले तरी हिंदुधर्मातून जात नाहीत तेच हिंदुधर्म हा दगडांचा धर्म आहे, त्याच्या पुढे कपाळ फोडून घेतले तरी काही होणार नाही अशी खात्री होऊन, स्पृश्यांनो! घ्या तुमचा धर्म! असे म्हणून आपोआप पर धर्मात जाण्यास तयार होतील."*_
*_(२५.११.१९२७)*_
_येवले गाव काय झाले, तेथे तर माणुसकीचे घबाड सापडले. शिकल्याने स्वाभिमान कळतो, शिकण्याने आत्मसन्मान बळावतो. शिकण्याने अस्मिता फुलते, शिकल्याने बुद्धि बहरते, भावविश्व मोहरते, माणूसपण सोन्यासारखे चकाकू लागते. म्हणून अठरा विश्व दारिद्रयाला ठोकरून, पोटातल्या आगीला थोपवून, अपमानाच्या राशी पचवून, शिकण्याचा व मुलाबाळांना शिकविण्याचा चंग बांधून, भीमरायाचे शिलेदार शस्त्र-शास्त्रात निपुण व्हायला सरसावले. हा स्वाभिमान जे शिकले ते धन्य होत! हा स्वाभिमान जे जगले ते धन्य होत! स्वाभिमानाचे शस्त्र परजून ज्यांनी गुलामगिरीचे शीर छेदले ते धन्य होत!_
_पण अकलेचे खंदक प्रत्येक समाजात सदासर्वकाळ वावरत असतातच. बाबासाहेबांच्या व त्यांच्या पिढीच्या पुण्याईवर पोसलेले काही पोळ आजही देवी-देवतांचे देव्हारे पूजीत असतात. नरकातून बाहेर पडले तरी पुन्हा नरकाची वाट दाखविणाऱ्या देव-धर्माला मानीत असतात. तेव्हा त्यांची चीडही येते आणि कीवही येते. 'जन्मा आला हेला, पाणी वाहून मेला' तशी यांची गत होते. बांडगूळ ज्या झाडावर उगवते, ज्यावर पोसते, त्याच्याच मुळावर उठत असते. तशी यांची नियत असते. ज्या देवी- देवतांच्या खुळाने त्यांच्याच सत्तर पिढ्या नरकात पिचत पडल्या होत्या, त्या खुळाची टाळी परंपरेच्या नावाने वाजवित राहतांना त्यांच्या अकलेचे खोबरे झालेले असते. इमानाची आणि आत्मसन्मानाची होळी झालेली असते. अशा बुद्धिभ्रष्टतेच्या बद्धकोष्ठाने पछाडलेल्या या निर्बुद्धांना स्वाभिमानाचे सात्त्विक अन्न चालत नसते, कधी खाल्ले तर पचत नसतेः जयभीम म्हटलेलं त्यांना खपत नसते. शिकल्या-सुधारल्याची त्यांना चढलेली असते चरबी. 'आता काय सवर्ण झालो' या भ्रमाने त्यांची वाढलेली असते गुर्मी. पण त्यांची सत्ता, संपत्ती, इतमाम नोकरीपुरता थिटा असतो, त्यांच्या वरच्या जातीसारखं बनण्याचा, भासविण्याचा याचा प्रयत्न त्यांचा अहंकार दुखवित असतो. संधी येताच तो प्रत्येकजण याला तुडवित असतो. एक समान देवादिकांच्या पूजनाने किंवा एका धर्माच्या मानण्याने ही रीत बदलत नसते. जातीपातीची भिंत हिंदुधर्मात राहून तुटत नसते. हे या अकलेच्या खंदकांना कधी कळत नसते. कारण कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहते, त्यासाठी अगोदर बिनशेपटाचे माणूस बनावे लागते. म्हणून त्याच्या विचारला प्रवृत्त करावे लागते._
*_"अशा विचारशून्य लोकांस विचार करणे भाग पाडले पाहिजे. पण विचार हा काही एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे आपोआप पेट घेत नाही. तो काही कारणपरत्तेवच प्रज्वलित होतो... रूढ मार्गाने जाणारा वाटसरू जोपर्यंत रस्ता सरळ आहे, त्याला वाटा फुटल्या नाहीत, जोपर्यंत डोळे झाकून काही एक विचार न करता चाल चालत असतो. त्याला विचारपूस करण्याची जरूरीच नसते, पण जेव्हा कां रस्त्याला वाटा फुटलेल्या दिसतात तेव्हा तो थबकतो, गोंधळून जातो आणि यातील आपल्या मुक्कामावर नेणारा मार्ग कोणता याचा तो विचार करावयास लागतो. यावरून उघड आहे की, रूढ झालेल्या मार्गात हरकत उत्पन्न झाली नाही, अडथळा भासला नाही, तोपर्यंत कोणीही आपल्या पूर्वापार रूढ मार्गाच्या बरे- वाईटपणाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त होत नाही." (बहिष्कृत भारत, २०-५-१९२७)_*
_म्हणजेच प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीचे दबावतंत्र राबविल्याशिवाय हे अक्कलशून्य लोक शुद्धीवर येणार नाहीत. हे जाणून काही केले पाहिजे. समाज अवरोधक धोंड्यांवर स्वाभिमानाच्या घणाचे घाव घातले पाहिजे._
_*दुसरे शस्त्र म्हणजे समतारूपी अस्त्र. न कधी पाहिले, न कधी जाणीले, न कधी परजले!* पण, आता हे अस्त्राहूनी अस्त्र हाती लागले. माणूस म्हणून सर्व सारखेच. रूप, रंग, अंग, व्यंग जरी विभिन्न, तरी मनुष्य जात मात्र एकसंघ ! ना कोणा कमी जास्त- हस्त, पाद, नाक, दंत, मस्तिष्क दोन हात, दोन पाद, दोन चक्षु, दोन कानः शरीर-मन सर्व समसमान माणसाचे पोटी माणसेच जन्मती परंतु म्हणे काय? देवमुखे ब्राह्मण जन्मला, बाहूपासून क्षत्रिय झाला, मांडीतून त्याच्या वैश्य व्याला आणि पायातून क्षुद्र निपजला. आता हो कसं? *आमच्या नजरेपुढे तर सगळी माणसं फक्त विटाळातूनच जन्माला येतांना दिसतात.* फुलपाखरासारखं कोणी कोषातून जन्मत नाही, किंवा कोंबडीसारखं अंड्यातून बाहेर पडत नाही. फार काय पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्रासारखं मातीतूनही कोणी माणूस जन्मत नाही, विटाळ कोणाला चुकत नाही. कोणाला तीन डोकी, चार हात दिसत नाही किंवा कोणाच्या डोईला शिंग आणि पाठीला पुच्छ दिसत नाही. तरी म्हणे ब्राह्मण पवित्र अन् शूद्र क्षुद्र! माणूस माणूस असमान? बाबासाहेबांनी मूळ सांगितलं तेव्हा रूढीचं इंगित कळलंः_
_*"ऋग्वेद काळानंतर, जेव्हा ब्रह्मदेव बाळंत झाला तेव्हाच ब्राह्मण जातिवाचक करंटी कराटी जन्मास आली; व त्यांनी आपल्याभोवती प्रथमतः तटबंदी केली. ही तटबंदी झाल्याबरोबर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा भेदभाव जन्मास आला व गुणभेद विभागशः हे तत्त्व अजिबात गाडले जाऊन त्याच्याऐवजी जातिभेद विभागशः हे तत्त्व प्रस्थापित करण्यात आले. पुढे कालानुसार ब्राह्मण जातीसाठी जसा ब्रह्मदेव बाळंत झाला तसा ब्राह्मणेतरांतही जे अनेक वर्गभेद होते, त्या वर्गांनी कोणा ना कोणास बाळंतपणाच्या वेदना सहन करावयास लावून आपण अमुक एका ऋषीपासून उत्पन्न झालो असे मानून इतर वर्गापासून वेगळे आहोत अशी भावना दृढमूल करून घेतली व ब्राह्मण वर्गाप्रमाणे दरेक वर्गाने आपल्याभोवती तट बांधण्याच्या कामास सुरवात केली. ब्राह्मण वर्गाचा तटबंदी करण्याचा हेतु इतरांपासून आपण श्रेष्ठ आहोत हे दाखविण्याचा होता... त्याप्रमाणे आपली जात इतर कोणत्या ना कोणत्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे, या भावनेने साऱ्या जाती पिडून गेल्या." (ब. भा. १-७-१९२७)*_
_अशी ही माणसाचीच करामत तर आपल्या स्वार्थासाठी धर्माच्या नावाने केलेली लबाडी. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या जीवाची केलेली होळी, दुर्बुद्धीने माणूसकीवर केलेली कुरघोडी._
_*"हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की, या मनोऱ्यास शिडी नाही; आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला इसम मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्रज्ञा नाही. उघड बोलायचे म्हणजे जातीजातीत असलेल्या या उच्चनीच भावना गुणावगुणांच्या पायावर झाल्या आहेत असे नाही. उच्च जातीत जन्मलेला तो मग कितीही अवगुणी असो तो उच्च म्हणायचा. तसेच नीच जातीत जन्मलेला मग तो कितीही गुणी असो तो नीचच राहायचा."*_
*_(बहिष्कृत भारत, ३-४-१९२७)_*
_किती हा अन्याय महान! माणसाची कशी करायची प्रतवारी? जन्मावरून तर शक्य नाही. हा अन्याय आम्ही नाही चालू देणार! करू हट्ट, राहू घट्ट, सांगू आक्रोशाने त्रिकाळाला सनसनाटी सत्य, मागू हक्क आमुचे स्पष्ट, आणि नाकारले तर? करू संघर्ष अफाट ! कारण समतेचा हक्क मागून मिळत नसतो, तेव्हा तो हिसकावून घ्यावा लागतो. समतेचीही किंमत मोजावी लागते, फुकट काही मिळत नसते. महाडचा चवदार पाण्याचा सत्त्याग्रह, हा तर खरा समतेचा आग्रह. काळाराम मंदिराचा सत्त्याग्रह हे तर विषमतेच्या मूळावर उगारलेले अस्त्र. अशा रितीने हे शस्त्र ज्यांनी गाजविले, त्यांनी विषमतेचे गंडस्थळ फोडले. समतेचा धडा गिरवून आपल्या पुत्र-पौत्रांना सहज जगण्याचे वरदान दिले._
_परंतु काही पुत्र-पौत्र निघाले असे बिलंदर की, शिक्षण, उच्चधिकार, विलास-सुख लाभूनी अवांतर, बुद्धधम्माचा स्वीकार करूनीही, वर पोटजातीच्याच निवाऱ्याला विसावले कलंदर! आला अशा या उपटसुंभा, *संत तुकारामांच्या सांगण्याप्रमाणे, 'मोजूनी माराव्यात पैजरा, पण तेवढ्याने नाही भागत, "जन्मजात उच्चनीच भाव हीच ब्राह्मणाची खरी व्याख्या आहे.* (पूर्वोक्त) हे बाबासाहेबांचे वचन ध्यानी धरून, आणि स्वपराक्रमाने नव्हे, तर आपल्या बापजाद्यांनी सांडलेल्या रक्ताच्या बळावर अस्पृश्यतेचा नरकातून बाहेर पडलेल्या या किड्यांची वळवळ थांबविलीच पाहिजे. कारण "ब्राह्मण्य हे ठेचलेच पाहिजे. मग ते कोठेही असो." बाबासाहेबांचा हा संदेश मनी ठसो. *(बहिष्कृत भारत, ३०-९-२७)*_
_समता जाणता येते, समता आणता येते, समाज जीवनात समता सदा उतरविता येते. पाहा, जरा आसपास पाहा, इतिहासाचा मागोवा घ्या. *समतेचा सोपान चढलेल्या बौद्ध देशांकडे पाहा, समतेच्या सामूहिक आचरणासाठी जपानचे उदाहरण पाहा, तेथेही होते वर्ग चार. १. दामियो, २. सामुराई, ३. हेमिन आणि ४. इटा. दामियो हे राज्यकर्ते सरदार वतनदार: सामुराई हे लढवय्ये, जमिनदार, हेमिन जनसामान्य हरकामगार तर इटा अस्पृश्य सेवाचाकरदार, राजा व राजघराणे परमेश्वराप्रमाणे वंदणीय मानण्याची जपानी मानसिकता व परंपरा. त्याच्या बळावर दामियो व सामुराईंनी प्रस्थ वाढविले बेसुमार दोन हजार वर्षे भोगले सुख अपार. परंतु कंफ्यूशियन व बौद्ध धर्मांचा तेथे सुरू झाला प्रसार प्रवाही झाले सामाजिक तट जमीनदोस्त करणारे विचार. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात घेतला जपानी स्त्रियांनी पुढाकार. जेनशिन्नि, जेनझोनि आणि कीझेन्चि या तीन विदुषी महान. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी गाठला त्यांनी टैंजुकु (स्वर्ग-भारत) महान. बादशाहने केला त्याचा पुरस्कार. परत जाऊन त्यांनी काढल्या पदयात्रा तुफान. बौद्धधर्माचा प्रचार नेला खेडोपाडी लहान-सहान, बौद्ध धम्म जोमाने वाढला. आपले वर्चस्व टिकविण्यासाठी दामियो व सामुराईंनी प्रथम स्थानिक शिंटो धर्माचा उदोउदो केला. त्यांनी केली बौद्ध धर्माची मुस्कटदाबी. बहुजन समाजाची दशा हीनदीन झाली. मानसिक, बौद्धिक, आर्थिक व धार्मिक प्रगतीला आळा बसला. उगवत्या सूर्याचा देश हवालदिल झाला. त्यात सतराव्या शतकात ख्रिस्ती पादऱ्यांचे लोंढे आले. आपल्या धर्माचे प्रस्त वाढवू लागले. रोखण्यासाठी त्यांच्या प्रचाराचा मारा, बादशहाने पादऱ्यांच्या शिरच्छेदाचा हुकूम जारी केला. ख्रिस्ती प्रचार रोकला, पण ख्रिस्ती झालेल्यांचाही हिरमोड झाला. सर्व जपान निराशा, निरुत्साह आणि मनःक्षोभाने जणु करपून गेला. शेवटी, अठराशे एकोणसत्तरच्या पाच मार्चला एक चमत्कार झाला. दामियोंनी बादशहाला अर्ज केला, त्याला सामुराईंनी पाठिंबा दिला. "जेथे आम्ही राहतो, ती बादशहाची भूमि, जे अन्न आम्ही खातो, ते बादशाहचे अन्न, मग देशाच्या संपत्तीवर आम्हीच आमचा कां गाजवावा अधिकार? सम्राटाने सर्व जनतेमध्ये भूमी वाटावी, समान दिवाणी व फौजदारी कायद्याची तजविज करावी.*"_
_सम्राटाच्या ठायी सर्व समान असावेत, सारा जपानी समाज एक व्हावा, अशा समतेचा त्यांनी आदर्श स्वीकारला. वर्गव्यवस्था नष्ट करून समतेचा समाज घडविला. बंधूभाव पुष्ट केला. परकीयांनी केलेले आक्रमण परतून लावले. चिमुकले असले तरी जपानने आपले स्वातंत्र्य आणि महात्त्म्य राखले. *(खैरमोडे, खंड १, पृ. २४१)* समता काय चीज आहे, याचे जगाला उदाहरण घालून दिले. *जपानी हा चमत्कार करू शकतात, तर भारतीय कां नाही? समता त्यांच्या विचारातून आचारात उतरते, तर आमच्या आचारात कां उतरू नये? विचार आचारात उतरण्यासाठी पद्धत पाहिजे, करण्याची रित पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी समतेच्या अंमलासाठी बुद्धधम्माची दीक्षा दिली. 'सारा भारत बौद्धमय करीन अशी घोषणा केली, भारताला महान करण्याची आशा दिली. हिंदूधर्माने हे होऊ शकत नाही म्हणून बुद्धधम्माची दिशा दावली.*_
_*तिसरे शस्त्र आहे, स्वातंत्र्याचे, स्वतंत्र बाण्याचे.* आपले जीवन कसे जगायचे? त्याची जडण-घडण कशी करायची? कोणत्या आदर्शाची परिपाठी करायची? हे ठरविण्याचा हक्क प्रत्येक माणसाला हवा. भूतलावरील प्रत्येक प्राणी जगतो, तो सुखासाठी जगतो. येत नाही मरण हे माझ्या जगण्याचे कारण. असे कोण्या प्राण्याला वाटत नसते निष्कारण. सुखाची आस कधी घटत नसते. जगण्याची जिद्द कधी सरत नसते. सुख मिळविण्याचे सामर्थ्य प्रत्येकाचे अंगी वसत असते. बुद्धबळ आणि सिद्धीबळ, यत्नाद्वारे अवगत होत असते. माणसाचे भविष्य त्याच्याच हाती असते. बस्स, ते घडविण्याची सोय असावी लागते. आवडी-निवडीचा, अंगभूत प्रतिभेचा सारीपाट मांडण्याची संधी मिळावी लागते._
_वर्णाश्रमाच्या ठेकेदारांनी तर हे सर्वच हिरावलं होतं. जगण्याला अन्न, अंगाला वस्त्र अन् विसाव्याला छत्रः एवढं तरी जन्मसिद्ध हक्कानं मिळायला हवं होतं. पण... पुरेसं मिळून त्याने माजू नये, अन् काहीच न मिळता तो मरू नये, त्याच्याकडून घ्यायाची सेवा बडू नये, म्हणून कुभांड रचून वर्णाश्रमाचं, भटभिक्षुकांनी त्यांना नागवलं होतं. माणसावर त्यांनी लादलं भूत अज्ञानाचं, त्याच्या मानगुटीवर जू ठेवलं मनुस्मृतीच्या गुलामगिरीचं. दावं लावलं नीचतेचं. मातेरं केलं त्याच्या जीवनाचं. सर्वस्व त्याचं गिळूनही लंबोदर भरलं नाही, म्हणून त्यांनी हिरावलं माणूसपणाही त्याचं. पिढ्यानपिढ्या गावकीच्या रहाटगाडयाला डांबून फिरवित ठेवलं अन् पिळून पिळून त्याचं अगदी चिपाड केलं. आता जीवाच्या आकांतानं आपल्या स्वातंत्र्याची किंमत मोजण्यास सरसावल्याशिवाय त्याचं मनुष्यत्व ओळखलं जाणार नव्हतं, विवेकाचं अस्त्र परजल्याशिवाय त्याचं स्वातंत्र्य परत मिळणार नव्हतं._
_*"जगातील सर्व भागात दरिद्री माणसे किंवा जे शोषित आहेत ते शोषकांविरुद्ध बंड करून उठतात आणि प्रस्थापितांविरुद्ध विद्रोही भूमिका घेतात. असे घडणे अपरिहार्य आहे. देवकल्पना प्रभावी असलेल्या युगात रंजल्यागांजलेल्या जनतेला वाटते की धर्मग्लानी आली की देव अवतार घेईल आणि सारे काही ठीक होईल. तर आधुनिक निधर्मी युगात दुबळ्या, वंचित आणि शोषित जनतेला वाटते की शोषकांची ताकद संपुष्टात येईल आणि शोषितांचे राज्य उदयाला येईल. या दोन्ही गोष्टी घडून येणार नाहीत, अध्यात्म किंवा ऐतिहासिक भौतिकवाद अपयशी ठरले आहेत. म्हणून येथील प्रस्थापित समाजव्यवस्था नव्या मूल्यांवर अधिष्ठित करावयाची असेल तर या व्यवस्थेवर सतत घाव घालीत राहिले पाहिजे आणि आपण हिंदु-मानसिकतेपासून मुक्त होऊन स्वतंत्र विवेकबुद्धीची कास धरली पाहिजे."*_
*(भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १०१ मौलिक विचार, संकलनः अ.म. सहस्त्रबुद्ध)*
_गुलामगिरी शरीराची जरी अंगी भिनली होती, तरी आता मती सद्विचाराने भारली होती. स्वाभिमानाने उचल खाल्ली होती. स्वातंत्र्याच्या उर्मीने उंच आकाशी भरारी घेतली होती. "ज्याचे मन स्वतंत्र तो खरा स्वतंत्र." विचार हा मनी ठसला होता, नरकातल्या किड्यांनीही उच्छाद आता मांडला होता. झुगारून रूढीची बंधनं, झिकारून देवादिकांची आर्जवं, तोडून संस्कृतीची कुंपनं, माणसाच्या मनाने आता कवटाळलं होतं खरं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य विचाराचे, स्वातंत्र्य आचाराचे, स्वातंत्र्य नवजीवन घडविण्याचे, स्वातंत्र्य माणसारखे माणूस म्हणून माणुसकीने जगण्याचे._
_*चौथे शस्त्र आहे, सदाचाराचे.*_
_"अंमल से जिंदगी बनती हैं, जन्नत और जहन्नुम भी। वरना यह खाकी अपनी फिदरत में, न नूरी है न नारी हैं।"_
_प्रयत्नांनीच जीवन घडत असते. अन्यथा हे शरीर स्वतःच्या बनावटीने ना देवदूत असत, ना सैतान ! थोडक्यात, "केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे।" जीवन सुधारायचे तर प्रयत्नांची कास धरली पाहिजे. माणसाला आतून तोडणारा दुराचार सोडला पाहिजे. सदाचाराचा अंमल करून जिंदगी बनवली पाहिजे, आपला स्वर्ग घडविला पाहिजे. पहिले पिणे तोडले पाहिजे. अभक्ष्य खाणे साडले पाहिजे. भाऊबंदकी मोडली पाहिजे. बंधूभावकी जोडली पाहिजे. मान, ईमान सांभाळले पाहिजे. आया-बहिणींचे स्वत्व जोपासले पाहिजे. सदाचाराचा कित्ता जुने ते सोने, मन गंजून कसे गेले? देवाविकांच्या गलक्याने कुंथत कां राहिले? कारण ते होते बनावटीचे खोटे, म्हणूनच त्या रुढिंचे मढे सर्वांना नडत राहिले. आता फोडून त्याचे नढे, माणसाला माणूस ओडत राहिले पाहिजे. एकदाभेदाने भटाळलेला नष्ट धर्म सोडावा, सदाचाराने नटलेला माणुसकीचा धम्म ओडावा ही शिकवण मनी ठसवली पाहिजे, भीमरायाने केलेली किमया पचवली पाहिजे, असे जीवनसंघर्षातील एक और शस्त्र हाती लागले, मरगळलेल्या जीवांच्या मनी काहूर माजले. निश्वयाचा महामेरू होऊन माणसाचे एकेक पाऊल दमदारपणे पुढे पडू लागले._
_पण सदाचार, सदाचार आहे तरी काय प्रकार? तर म्हणे, स्वधर्माचा आचार हाच परंपरेने दिलेला सदाचार, *सदाचार म्हणजे म्हणे स्वधर्माचार, सदाचार म्हणे स्वस्वभावाचार "परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् (गीता १८.४४) ज्ञानदेवांनी सांगितले.*_
_*"आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण। हे द्विजन्मे तिही वर्ण। ययांचे जे शुश्रूषण। ते शूद्र कर्म।। पैं द्विजसेवेपरौते। धावणे नाही शूद्राते। एवं चतुर्वर्णोचिते। दाविली कर्मे।।"*_
*_(ज्ञानेश्वरी, अध्याय १८ ओंवी ८३-४)_*
_आणि हा स्वधर्म पाळीत जगायचे आणि त्यातच मरायचे. हा स्वधर्म अवगुणी वाटला, कायम जाचत राहिला तरी सोडायचा नाही. त्यातच मरण आले तरी ते पुण्य थोर_
*"श्रेयान्स्वधर्मो विगुणः परमर्धात्स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।" (गीता ३.३५)*
_"उत्तम परधर्माहुनि विगुणहि निजधर्म पुण्य दे थोर। निजधर्मी मरण बरे परधर्मे नरक होय तो घोर।।_
असे मोरोपंत बजावतात. आणि ज्ञानदेव सहजपणे समजावतात,
_"या स्वधर्मात अनुष्ठितां।। वेचु होईल जिवीता। तोहि निका वर उभयतां। दिसत असे ।।"_
_*(ज्ञानेश्वरी, अध्याय ३, ओवी २९)* म्हणजे, बाबा रे आपला स्वधर्म आचरित असता, प्राणांचा वेंच (मृत्यू झाला, तरी तो इष्टच, कारण उभय लोकी तो श्रेष्ठच असणार. आणि पुन्हा याच संतांनी आपले संतपण गाजवित सांगायचे, दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात।। तरी अस्पृश्यांच्या पुढचा अंध:कार (तिमीर) कधी हटला नाही, त्यांच्या स्वधर्माचा सूर्य कधी उगवला नाही. त्यांनी इचिऊलेली माणुसकी त्यांना कधी लाभली नाही. सर्व संत. महात्त्म्ये कुचकामी ठरले. त्यांच्याने रूढीचे बंधन नाही तुटले. व्यवहारात बेकी आणि आध्यात्मात एकी या त्यांच्या बुद्धीहीन विचाराने जातीयतेचे शिकार झालेल्या कोट्यावधी लोकाचे नारकीय जीवन चिरंतर करण्याच्या पापाचे ते अप्रत्यक्षपणे धनी ठरले. त्यांच्या आध्यात्माने जातीव्यवस्थेला चिरंजीव केले._
_परंतु आता स्वाभिमान जागा झाला होता शिकण्याचा लळा लागला होता. बुद्धीचे बळ बळावत होते. विचारांचे वादळ शमत होते, चिकित्सेचे शस्त्र परजत होते. प्रश्नः या त्रिवर्णांच्या सेवेत सर्वस्व गमाविले त्याचे काय? माणूस असून माणूसपण हिरावले गेले त्याचे काय? पशूहून नीचपण लाभले त्याचे काय? दैन्य-दारिद्र्यात सर्वस्व हरवले त्याचे काय? जन्मापासून मरेपर्यंत दुःखाच्या आकांताने घायाळ केले त्याचे काय? प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. शब्द-शस्त्रास्त्रांचा खणखणाट झाला. धर्माच्या अर्थाची खिचडी करून, कधी या तर कधी त्या अर्थाने त्याला फिरवून, रूढीच्या रगाड्यात जखडून ठेवण्याचा कावा आता चालणार नव्हता. देव-धर्माच्या ठगाईने आता माणूस ठगणार नव्हता. धर्म-शस्त्रांच्या इषाऱ्यावर नाचणार नव्हता. संत महात्त्म्यांच्या शब्दांवर भाळणार नव्हता. आध्यात्माच्या नावाने विकला जाणार नव्हता. गमावलेले माणूसपण परत मिळविल्याशिवाय गप्प बसणार नव्हता. कारण त्याला आता कळून चुकले होते, माणूसकीचा धर्म म्हणजे सदाचार, माणसा-माणसातील उचित व्यवहार! हा अर्थबोध झाला होता. माणूसकीचा धर्म, आणि सदाचाराचे वर्म आता गवसले होते. स्वधर्माचे खरे मर्म मनी ठसले होते. प्रज्ञासूर्याचे वरदान आता फलद्रूप होत होते._
_*"ज्या वस्तूसाठी अर्जुन सत्त्याग्रह करीत होता त्या वस्तुला, ज्या वस्तुसाठी अस्पृश्य लोक सत्त्याग्रह करणार आहेत त्या वस्तूच्या मानाने फुटक्या कवडीचीही किंमत नाही. पांडव राज्यासाठी भांडत होते. अस्पृश्य लोक माणूसकीसाठी भांडत आहेत. माणुसकी गेल्याने माणसाचे सर्वच काही जाते, परंतु राज्य गेल्याने माणूसकी तरी शिल्लक राहते. राज्यावाचून पांडव काही मेले नसते. पण माणूसकीवाचून अस्पृश्य लोक जिवंतपणी मेले आहेत. राज्यासारख्या क्षुल्लक ध्येयासाठी जर पितृहत्या, गुरूहत्या, बंधुहत्त्या किंवा कुलक्षय या सारखी थोर कर्मे करावयास अर्जुनास श्रीकृष्ण सांगतो, तर माणुसकी कमाविण्यासारख्या अत्युत्तम ध्येयासाठी साधा हटयोग अस्पृश्यांनी करू नये, असे स्पृश्यांनी सांगणे म्हणजे निव्वड बाष्फळपणा होय. "(ब. भा. २५-११-१९२७)*_
_हा खरा स्वधर्म, जातीचा धंदा, निव्वळ पोटाचा फंदा, जातधर्माचा ध्यास, जीवघेणा गळफास. गलिच्छ कर्म हा कसला धर्म? माणूसकी हाच खरा स्वधर्म. माणूसकी हाच सदाचार, माणसा- माणसात भेदाभेद हा भयंकर दुराचार. माणूस माणसाला जोडतो तो सदाचार, माणसापासून माणसाला तोडतो तो दुराचार. माणूस जोडला जातो सत्य वागण्या बोलण्याने, धर्माच्या नावाने केलेल्या लबाडीने नव्हे. माणूस जोडला जातो स्त्री -पुरुषातील लैंगिक सदाचाराने, धर्माच्या नावाने केलेल्या दुराचाराने नव्हे. माणूस जोडला जातो एकमेका साहाय्य करण्याने परस्पर सहकार्याने, चोरी-मारी व दगाबाजीच्या करणीने नव्हे. माणूस जोडला जातो निर्व्यसनी शुद्ध मनाने, व्यसनाच्या बुद्धीमाने नव्हे. माणूस जोडला जातो मैत्री करुणेने, घातपाताच्या मार्गाने नव्हे. मनुष्य जोडला जातो सहचर्याने, धर्माच्या कर्मकांडाने नव्हे. मनुष्य जोडला जातो प्रज्ञेने, अज्ञानाच्या समृद्धीने नव्हे._
_*पांचवे शस्त्र म्हणजे बंधुत्वाचे.* सदाचार हाच बंधुत्वाचा आधार . माणुसकी हीच बंधुत्त्वाची जननी. या बंधुत्त्वातून संघटन साकार होते. मानवी समाजाच्या सामूहिक जीवनाचे निधमन होते. परस्परांच्या सुख-दुःखाचे शमन होते शांती समाधानाचे वरदान लाभते. अन्यायाचे निर्दालन सहज शक्य होते. *बाबासाहेबांनी पोलादी संघटना उभी केली मोडेन पण वाकणार नाही या बाण्याने ती उभी राहिली.* कारण सामूहिक उद्धाराची त्यात तळमळ होती, आपल्याच नाही तर सर्व कल्याणाची त्यात कळवत होती. एक विचार एक आचार, संघटनेचे हेच असते वरदान, त्यात श्रद्धा एकरूप असावी लागते. ध्येय एकरूप असावे लागते. जे जे मनी, ते ते जनी व्हावे लागते. जीवनाच्या सर्व अंगांनी एकरूप होऊन राहावे लागते. एका आदर्शात सर्व सामावून जावे लागते. केवळ सत्ता, संपत्ती, अधिकाराच्या गाजरासाठी अंतरंग झाकून एकोप्याचे सोग पांघरायचे नसते, सेवा-समर्पणाचा आव आणायचा नसतो, इतरांना तुच्छ लेखून आपलेच घोडे दामटायचे नसते. याची जाण आली होती. जरी मान, अहंकार होते मनातः ईर्षा, द्वेष जनागणातः पण माणुसकीची आच लागली होती, त्या एकमेव ध्येयाने सारी प्रजा बेभान झाली होती. आपल्या विकारांना फाटा देऊन, नाराजांना आंजारून, चुकारांना गोंजारून, फुटारांना सावरून टकारांना डावलून ते अभंग राहिले. आपल्या जीवनाचे ध्येय त्यांनी नजरेआड नाही होऊ दिले._
_*"आदर्श समाज गतिमान असावा लागतो, त्यात एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्यासाठी दारे खुली असावी लागतात. आदर्श समाजात संपूर्ण समाजाने जाणीवपूर्वक हातभार लावावा असे अनेक हितसंबंध असावे लागतात. इतर प्रकारच्या सामाजिक संस्थांशी संबंध ठेवण्यासाठी अनेक प्रकारची सुलभ अशी व्यवस्था असावी लागते. दुसऱ्या शब्दात, अशा समाजात सामाजिक अभिसरण होत राहिले पाहिजे. हीच खरी बंधुता व याचेच दुसरे नाव लोकशाही होय, लोकशाही हा केवळ शासनाचा प्रकार नव्हे, तर परस्परांच्या अनुभवाची देवाण घेवाण करीत संघबद्ध राहण्याची ती मुख्यता एक सहजीवनाची पद्धती आहे. आपल्या सोबत्याबद्दल अनिवार्यपणे आदर व सन्मानाची वृत्ती निर्माण करण्याची ती पद्धत आहे." (जाति निर्मूलन, परिच्छेद/१४)*_
_*सहावे शस्त्र स्वावलंबनाचे. स्वावलंबन म्हणजे स्व:त वर अवलंबून राहाणे.*
_*"केवळ कायद्याने लादलेले पारतंत्र्य एवढाच काही गुलामगिरीचा अर्थ होत नाही. तर दुसऱ्यांनी घातलेली आचार विचारांवरील बंधने मान्य करावयास भाग पाडणारी सामाजिक स्थिती म्हणजे गुलामगिरी होय." (पूर्वोक्त)*_
_ही बंधने झुगारून स्वतःच्या हिंमतीने जगणे म्हणजे स्वावलंबन होय. आपल्या विचाराप्रमाणे जगायचे तर आपण पोटासाठी कोणावर अवलंबून राहता कामा नये. स्वतःची उपजीविका स्वतः चालविली पाहिजे. *'ज्याची चूल बंद त्याची अक्कल बंद असे म्हणतात. आणि अक्कल बंद म्हणजे सर्वच बंद. म्हणून उपजीविकेसाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारा स्वतंत्र असू शकत नाही.* महाभारतात कौरव-पांडवांचे युद्ध सुरू होण्यापूर्वी रणांगणावर युधिष्ठिर भीष्माचार्यादिकांना वंदन करण्यासाठी जातो पांडवांची सत्याची बाजू असूनही भीष्म, द्रोण वगैरे कौरवांच्या बाजूने लढत असतात. युधिष्ठिर वंदन करतांना हा प्रश्न विचारीन म्हणून अगोदरच ओशाळून गेले भीष्माचार्य त्यांना म्हणाले.._
_*"अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित् । इति सत्यं महाराज बद्धोऽस्म र्थेन कौरवेः।।"*_
_*मनुष्य अर्थाचा गुलाम अर्थ कोणाचा गुलाम नाही. असा खरा प्रकार असल्यामुळे, हे महाराज, कौरवांनी आम्हास अर्थाने बांधले आहे.'* असा काही प्रसंग अस्पृश्य लोकांवर. आलाच तर त्यांची धारणपोषणशक्ती कसा तलग धरील व ते स्वावलंबी कसे होतील याचा विचार करणे इष्ट आहे. *या गुलामगिरीतून जर अस्पृशय लोकांना आपली सुटका करून घ्यायची असेल त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळविले पाहिजे. असे बाबासाहेबांनी म्हटले होते. त्यासाठी त्यांनी तीन सूचना केल्या होत्या. एक, वतनदारीतून मुक्त होणे: दुसरी, निराळ्या वसाहती स्थापन करणे आणि तिसरी, खादीचा धंदा करणे.* वेगळ्या वसाहतींचा प्रश्न व्यवहार्य नव्हता. म्हणून पुढे चालून त्यांनी शेती व व्यापार या दोन अंगावर भर देण्याची सूचना केली होती. या गोष्टीला आता पाऊणशे वर्षे होऊन गेली. मध्यंतरीच्या काळात राखीव जागांच्या, सुरक्षित सरकारी नोकऱ्यांच्या रूपाने थोडा आधार मिळाला, औद्योगिक शहरातील फुटकळ कामांचा टेकू लाभला. समाज कल्याणाचा काही घास मिळाला. सहकार समाज तसा पराश्रित आणि भागासंध राहिला, या घडामोडीत पन्नास वर्षाचा काळ गेला. एकविसाव्या शतकाच्या आगमनाने स्वावलंबनाचाच नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्याचा यक्षप्रश्न उभा केला. राखीव जागा, सरकारी नोकऱ्या कागदावर राहिल्या खाजगीकरणाने जीवनकलह प्रखर केला. जागतिकीकरणाने आशा-निराशेच्या चकवा उभा केला. आता कुठे स्वावलंबनाचा मुद्दा ध्यानी येऊ लागला._
_जग सद्याचं इतकं जवळ आलंय की सारी पृथ्वी जणू एक गाव झालंय. आता बुद्धिमत्ता, गुणवत्ता, नीतीमत्ता, धीतीमत्ता, बधुत्ता आणि सेवा-परायणता अंगी बाणविल्याखेरीज उत्तम प्रकारचे मनुष्य जीवन जगणे अश्यक्यप्राय होय. हे स्वकष्टानं आणि स्वकर्तृत्त्वाने चमकण्याचे युग आहे. स्वावलंबन हा त्याचा ध्यास आहे. त्या तयारीचा नवसमाज घडविण्याची आज खरी गरज आहे._
_*बुद्धिमत्ता ध्यानातून साधली जाते. मनाची एकाग्रता साधली म्हणजे स्मरणशक्ती सुधारते, प्रखर होते. स्मरणशक्ती सुधारली, तर आकलनशक्ती सुधारते. विषय कळतो, अचूक अर्थबोध होतो. आकलनशक्ती सुधारली की माणसाला आत्मविश्वास लाभतो. आत्मविश्वासाचे बळ हे खरे बळ. या बळावरच मनुष्य पुरुषार्थ गाजवू शकतो, स्वतःच्या हिंमतीवर जगू शकतो. ज्याच्या ठायी आत्मविश्वास आहे तो माणूस सदाचाराचे खरे महत्त्व जाणतो, आपल्या जबाबदारीचे मर्म ओळखतो आणि सरळमार्गाचे आत्महिताचे जीवन जगू लागतो. आत्मविश्वास सदाचार बळकट करतो. आपल्या जीवनाचा अर्थ कळतो. मनुष्य दुराचारापासून, दुर्व्यसनांपासून अलिप्त राहण्यास शिकतो. आपल्या जीवनाचे सार्थक करण्याची भावना अंगी बाणवितो. सदाचारापासून जीवनमूल्यांचा साक्षात्कार घडतो. माणूस इतरांप्रती जागरूक बनतो. त्याचे ठायी बंधुभाव वाढू लागतो. सहकार्याची वृत्ती रूजू लागते. स्वहिताबरोबर परहिताची भावना वाढीस लागते. मन घडविल तसा मनुष्य घडतो, तो या अर्थाने होय. परंतु हेसुद्धा 'केल्याने होत आहे रे' स्वरूपाचा असल्याने 'आधी केलेचि पाहिजे.'*_
_पण असे केले तर त्यातून गुणवत्ता खुलते. आपले अंगभूत कौशल्य खुलते. एकाग्रतेने त्याचा ध्यास घेतला तर तो आपला स्वाभिमान बनतो, आपल्या स्वत्त्वाचा अवतार बनतो. गुणवत्ता आपले खरे सामर्थ्य होते. या गुणवत्तेला जोड द्यावी लागते ती धीतीमत्तेची, धीतीमत्ता म्हणजे धैर्य, धाडस, पराक्रमाची वृत्ती. शौर्याचे तेज यातून प्रगट होते. पुढाकार घेण्याची ताकत अंगी बाणवावी लागते. धोका पत्करण्याची वृत्ती जोपासावी लागते. याला धीतीमत्ता म्हणतात. नव्या युगात याची फार कार गरज आहे. युगात स्वावलंबी होण्यासाठी नव्या या गुणांची जोपासना केल्याशिवाय काही खरे नाही. खुल्या जगात स्वतेजाने तळपण्याची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे तर बुद्धधम्माचा मार्ग अनुसरण्याशिवाय काहीच जमणार नाही. मनाच्या संस्कारातील जुनाट गाठी सुटणार नाही, ठायी हापी अडणाऱ्या नाहणाऱ्या मानसिकता हटणार नाहीत._
_*सातवे शस्त्र सेवाभावाचे,* पण ब्राह्मणी धर्माने शूद्रावर लाडलेल्या जातीय सेवाभावाचे नव्हे, तर मानव जातीला आपल्यासारखे मानून त्यांचेपैकी जे दुर्दैवाचे शिकार झाले आहेत, त्यांना मदत करण्याचे. त्याचप्रमाणे तमाम समाजाच्या सार्वजनिक हितासाठी झटण्याचे, मदतीचे, सुधारणेचे व सेवेचे कार्य ते मनःपूर्वक करण्याचे होय, एकमेकांना साहाय्य करीत सर्वांच्या उद्धारासाठी झटण्याची वृत्ती म्हणजे ही सेवाभावाची वृत्ती होय. प्रत्येक समाज कोणत्या न कोणत्या दुर्गुणांचा आणि अनिष्ट रुढींचा शिकार झालेला असतो. त्या अनिष्ट गोष्टींचे निराकरण सर्वांनी मिळून करणे अधिक सोईस्कर असते. त्यासाठी सार्वजनिक सेवेच्या यंत्रणा उभारून बाधित घटकांच्या मदतीसाठी त्यांचा वापर करणे गरजेचे असते._
_समाजरूपी जणू आपणच एक पुरूष आहोत, गावरूपी जणू आपणच एक पुरूष आहोत, मोहल्ला किंवा शहररूपी जणू आपणच एक पुरूष आहोत, अशी कल्पना केली तर त्या त्या ठिकाणी जे कोणी दुःखात, कष्टात, अभावात वावरत असतील, दुर्बल, शक्तीहीन झाले असतील, घातक चालीरिती किंवा व्यसने किंवा अंधश्रद्धेचे शिकार झाले असतील, तर एकार्थाने आपलेच एकेक अंग दुर्बल, किंवा रोगग्रस्त झाले आहे असे समजले पाहिजे. आणि त्याचे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष दुःख हे आपणासही भोगावेच लागेल, याची जाण ठेवली पाहिजे. सार्वजनिक सेवाकार्याकडे पाहतांना प्रसिद्धी, नेतेपण, स्वार्थ, अहंकारपोषण किंवा इतरांवर उपकार या भावनेने नव्हे, तर त्यातच आपलेही स्वहित सामावले आहे याची जाणीव ठेवून पाहिले पाहिजे._
_*बाबासाहेबांना बोधिसत्त्व म्हणतात. याचे कारण असे की बुद्धधम्मातील बोधिसत्त्वाची संकल्पना ही निरिच्छ सेवेच्या, आपले मंगल बाजूला सारून इतरांच्या सर्व मंगलासाठी सतत झटण्याची वृत्ती असणाऱ्या महामानवाची संकल्पना आहे. आपणास प्रत्यक्ष बुद्धत्त्व जरी प्राप्त होण्याची वेळ आली, तरी बोधिसत्त्व ते लांबणीवर टाकून जोपर्यंत सर्व प्राणीमात्रांना बुद्धत्त्वाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्यांच्या सेवेसाठी झटत राहतो. या सेवाभावाची समाज सुसंघटित ठेवण्यासाठी अत्यंत गरज आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी असे प्रसंशोद्गार काढले आहेत की,*_
_*"ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होल । गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन, मन, धन आणि तारूण्य कुरबान करतात ते धन्य होत! आणि आपली माणूसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची-वाईटाची, सुखाची-दुःखाची, संकटाची, वादळाची, मानाची अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत!" (नवयुग, १३-४-१९४७)*_
_हा सेवाभाव समाजात अद्यापीही म्हणावा तसा रूजलेला नाही. आपल्या स्वार्थासाठी किंवा आपले काही अंतस्थ हेतू तडीस नेण्यासाठी समाजकार्य करणाऱ्याची संख्या आज फार मोठी आहे. विशेष करून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात हा एक व्यावसायिक मामला बनला आहे. धनसंपत्ती, पद-प्रतिष्ठा आणि अधिकार प्राप्तीचा तो सोपान बनला आहे. आपले सर्वस्व वेचून समाजासाठी झटणाऱ्या बाबासाहेबांच्या पिढीची सर आज कोणाला येणार नाही असे नाही, त्यांचाच आदर्श गिरविण्याची कला साधणार नाही, असे नाही. त्याच रक्ताचा वारसा सांगणारे इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाहीत, असे नाही. पण त्यासाठी स्वस्थ बसून भागणार नाही. कारण 'दे ग माई जोगवा' म्हणून मागितली तरी आता भीक कोणी घालणार नाही. ही सप्त शस्त्रं परजविल्याशिवाय आता काही चालणार नाही._
_*ही सप्त शस्त्रे म्हणजे आंबेडकरी चळवळीचे प्राण होत. ही अमोघ रत्ने होत. त्यांना धारण करण्यास शूरांची छाती हवी आहे, शक्तीशाली मनगटे हवी आहेत आणि कळी काळालाही तोंड देणारे हिंमत बहाद्दर हवे आहेत. या शस्त्रांना धारण केल्याशिवाय माणसाची गुलामगिरी, माणूसकीची विटंबना आणि मानवाची दैना दूर होणार नाही; नव्या युगाच्या गतिशील मागणीला पुरे पडता येणार नाही, याची जाण असणारी माणसे हवी आहेत. आंबेडकरी आणि बौद्ध समाजापुढे आज तरी हेच खरे आव्हान आहे.*_
_*आवाहन*
_*म्हणून आमचे आवाहन आहे, "नेक बना, एक बना; नेकीत सुखशांती आहे, एकीत समृद्धी आहे. नेक बनणे म्हणजे बौद्ध बनणे, एक बनणे म्हणजे बौद्ध समाजाचा भाग बनणे. बौद्ध बनल्याशिवाय नेकी नाही, बौद्ध समाजात सामावल्याशिवाय एकी नाही. नेक - एकी आबादी आहे, बेइमानी - बेकी फक्त बरबादी आहे."*_
*_-विमलकिर्ती गुणसिरी._*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ३०/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक जुन २०१२ अंक ४७- वर्ष चौथे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_30.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment