🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संघ : पुण्य-पीक देणारे अतुलनीय शेत_*
*_विमलकित्ती गुणसिरी_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*मानवी समाजाच्या इतिहासात तथागत भगवान बुद्धांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक सुसंघटीत संघ स्थापन केलेला आहे. त्यातूनही गृहत्याग केलेल्या भिक्खूंचा संघ स्थापन करून तथागत बुद्धांनी काही वेगळाच प्रयत्न केलेला आहे.* त्याचे मर्म नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. *तथागतांनी संघ कां स्थापन केला? असा प्रश्न विचारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले आहे की, तथागतांना आपल्या धम्माच्या साहाय्याने एका आदर्श समाजाची रचना करायची होती. त्यांनी स्वतः घालून दिलेला आदर्श हा व्यवहारिक आहे, हे दाखवून देण्यासाठी कोणी तरी प्रत्यक्षात तसे करून दाखविणे आवश्यक होते. त्यामुळेच सर्वसामान्य माणसे त्या आदर्शानुसार वागण्यास पुढे सरसावत असतात. आम लोकांमध्ये अशी जिद्द निर्माण करण्यासाठी आणि आपण दिलेला आदर्श हा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासारखा आहे हे सिद्ध करून दाखविण्यासाठी तथागतांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला.* थोडक्यात आपल्या शिकवणीप्रमाणे आचरण करणाऱ्या समाजाचा एक नमुना त्यांनी आम जनतेपुढे ठेवला, जेणे करून लोक त्याप्रमाणे वागून सदाचारावर आधारित अशा एका आदर्श मानवी समाजाची रचना करू शकतील. *संघ म्हणजे बुद्धप्रणीत आदर्श समाज होय.* त्याचे अनुकरण करणे हे आम जनतेचे कर्तव्य आहे. *म्हणूनच तथागतांनी संघाला आपल्या स्वतःइतके आणि आपल्या धम्माइतके महत्त्व देऊन ते एक तिसरे शरण-गमन केले. बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्हीचे शरणगमन केल्याशिवाय कोणी बुद्धाचा अनुयायी बनत नाही. बुद्धाच्या धम्मजीवनमार्गाचा स्वीकार करण्यातील ही तीन शरणस्थाने अत्यावश्यक अंग आहेत. संघाचा सहवास हा संतांचा सहवास मानला जातो आणि तो निर्वाणाची प्राप्ती करेपर्यंत लाभो अशी उपासक इच्छा बाळगीत असतो.* वर्षावासाचे काळात भिक्खूसंघ एके ठिकाणी सतत वास करीत असल्याने त्यांच्या सहवासात राहून उपासक वर्ग आदर्शमय जीवन जगण्याची शिकवण आत्मसात करीत असतो. त्यामुळे वर्षावास हा धम्माचरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा कालखंड मानला जातो._
_*या वर्षावासाची सांगता अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला होत असते. त्यानंतरचा एक महिना भिक्खूसंघासाठी मुक्त संचाराचा महिना मानला जातो आणि त्याच्या शेवटच्या पौर्णिमेस म्हणजे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेस कठीन नावाने दिल्या जाणाऱ्या चीवर आणि अन्य वस्तूंच्या दानाचा समारंभ केला जातो. आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या दरम्यान आणि संपूर्ण कार्तिक महिनाभर कठीन दानाचे समारंभ केले जातात. वर्षावासाचे अखेरीस तथागतांनी भिक्खूसंघाची स्थापना केली. म्हणून तो संघदिन म्हणून मानला जातो. संघाचा उचित गौरव आणि आदर-सत्कार करून त्या दिवशी संघाचे आभार मानायचे असतात.*_
_वर्षावासाचे काळात उपासक वर्गाने भिक्खूसंघाच्या सहवासात राहून धम्मजीवनमार्गाचे गंभीरपणे पालन करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्या जीवनातील अनेक समस्यांवर संघाचे मार्गदर्शन घेतलेले असते. आपल्या वाईट सवयींचे निराकरण केलेले असते. साधना आणि नित्य पुण्यकर्म करून आपल्या मनाची शुद्धी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या मनात संघाविषयी प्रचंड श्रद्धा निर्माण झालेली असते. त्या श्रद्धाभावाच्या अभिव्यक्तीची वेळ म्हणजे संघदिनाचा समारंभ होय. यालाच लोक वर्षावास समाप्तीचा दिवस म्हणतात._
_*संघदिनाच्या दिवशी भिक्खूसंघ आपल्या पातिमोक्खाचे पठण करून आणि पवारणा म्हणजे एकमेकांची कळत न कळत झालेल्या अपराधांबद्दल क्षमा याचना करून आणि लाभलेल्या सत्संगाबद्दल एकमेकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून आणि आभार मानून निरोप घेत असतो.* एक तर संघ भ्रमण करण्यासाठी निघतो किंवा आहे तेथेच राहून आपले काम नव्या जोमाने सुरू करतो. नवे प्रकल्प, नव्या योजना उपासकवर्गापुढे मांडून नव-नव्या कार्याची सुरूवात करीत असतो. या विविध प्रकारच्या संघकार्यास साहाय्य करण्यासाठी उपासकवर्ग अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणात दान करीत असतो. *उपासकवर्गाच्या दृष्टीने संघदिन आणि त्यानंतरचा काळ हा मुक्तहस्ते दान करून पुण्यार्जन करण्याचा कालखंड असतो.* संघवंदनेत म्हटल्याप्रमाणे उपासकवर्ग भिक्खूसंघाचा आहुणचार करतो म्हणजे जेथे कोठे भिक्खूसंघ असेल तेथे जाऊन त्यांचा सत्कार करतो. त्याच प्रमाणे पाहुणचार करतो. म्हणजे संघाला आपल्याकडे निमंत्रित करून त्याचा आदर-सत्कार करतो. संघाला मुक्तहस्ते दान करतो. संघाला हात जोडून वंदन करतो. *संघ जणू काही पुण्याचे पीक देणारे अतुलनीय शेत आहे असे मानून आपल्या विविध प्रकारच्या पुण्यकर्माची बीजे तो संघदानाचे रूपाने पेरीत असतो.* संघाला दिलेले दान शेवटी संघ समाजासाठीच वापरीत असतो. *संघाला विहार दान केले तरी ते शेवटी सर्वांच्या धम्म प्रशिक्षणासाठी आणि सार्वजनिक कार्यासाठीच वापरले जाते. भिक्खूंची कुटुंबे किंवा गणगोत येऊन तेथे राहात नसते. ते शेवटी राहते समाजाच्याच मालकीचे.* परंतु संघाला दान दिल्याने त्यांचा धम्मकार्यासाठी योग्य तो वापर होत असतो. त्याच प्रमाणे विहारामध्ये विविध सोई निर्माण करण्यासाठीही भरपूर दान दिले जाते. भिक्खूंना चीवर आणि अन्य वस्तूदान दिले जाते, निधी दिला जातो जेणे करून विकासाची कामे करता येतील अशा प्रकारे सर्व प्रकारचे साहाय्य केले जाते. म्हणूनच *बौद्ध देशात प्रत्येक विहारासाठी योग्य अशा भिक्खूची विहाराधिपती (Ab- bot) म्हणून विनंती करून नेमणूक केली जाते. कोणत्याही विहाराचे कार्य केवळ उपासक वर्ग करीत नसतो. उपासकवर्ग किंवा त्यांचेतील धार्मिक प्रवृत्तीचे लोक विहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी विहाराधिपतींना मदत करीत असतात. आपल्याकडे अज्ञानामुळे आजही विहाराचे मालक स्थानिक मंडळे किंवा उपासकांचे गट असतात आणि ते भिक्खूंचा आपल्या नोकरासारखा वापर करू पाहतात. कोणी भिक्खू कितीही चांगला असला आणि चांगले कार्य करीत असला, तरी त्याची निंदा- नालस्ती करून त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करीत असतात.*_
_*धम्माच्या नावाने हे महापाप करीत असतात. भारतीय बौद्ध समाजाने ही गोष्ट नीटपणे लक्षात घेतली पाहिजे की विहारे ही भिक्खूसंघातील विहाराधिपतीच्या अधिपत्त्याखालीच चालविली जावीत. अयोग्य भिक्खूंना आसरा देऊ नये, हे खरेच ! परंतु चांगल्या भिक्खूंच्या शोधात मात्र राहिले पाहिजे. भारतातील बुद्धधम्माच्या पिछेहाटीला हे एक महत्त्वाचे कारण घडलेले आहे.* हल्लीच्या काळात पूर्वीसारखी निर्वेधपणे जंगलात राहण्याची सोय नसल्यामुळे भिक्खूंना विहारात राहावे लागते. त्यांचे जगणे आणि मरणेसुद्धा विहारात होत असते. तो पूर्णपणे समाजाच्या भरवश्यावर जगत असतो. *जर बौद्ध माणसेच भिक्खूचे वैरी बनली, तर धम्म जगणार आणि वाढणार कसा? आणि बाबासाहेबांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण होणार कसे?* ही अतिशय गंभीर बाब आहे. उपासकवर्गाची ही प्रवृत्ती बुद्धधम्माच्या प्रचार-प्रसारामधील मोठा अडसर होऊन बसलेली आहे. त्याचे सुज्ञजनांनी निवारण करण्याचा आणि विहारे खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे._
_*तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे संघदिनाच्या निमित्ताने भिक्खू-भिक्खूनींसह सर्व बौद्ध समाजाने खरे संघ शरणं गच्छामि करण्याची प्रतिज्ञा करायची असते. सर्व बौद्ध समाज एकसंघ राहिला पाहिजे आणि समाजाचे धम्मिक ऐक्य आणि सामंजस्य कायम टिकवून ठेवण्याचा संकल्प प्रत्येक बौद्धाने करायचा असतो. ती खरी संघवन्दना किंवा संघपूजा होय.* मी बौद्ध समाजातील प्रत्येक माणसाबद्दल आदर-सन्मान बाळगीन आणि समाजाच्या सार्वजनिक हिताच्या विरूद्ध आणि विसंगत असे कोणतेच आचारकर्म करणार नाही अशी प्रतिज्ञा प्रत्येक बौद्धाने करायची असते आणि *कल्याणमित्र अशा भिक्खूसंघाकडून प्रतिकात्मक सूत्र घेऊन ते एकमेकांचे हातात बांधून बंधुत्त्वाचे नाते सुदृढ करायचे असते. हे सुत्रबंधन कोणत्याही तकलादू आणि दिखाऊ फ्रेन्डशीप बॉन्डपेक्षा पवित्र आणि श्रेष्ठ आहे, हे बौद्धजनांनी लक्षात घेतले पाहिजे आणि तो सांस्कृतिक वारसा जोपासला पाहिजे.* त्याचबरोबर शक्य असेल, तर या दिवशी एकमेकांना मैत्रीभावनेने काही भेट दिली पाहिजे आणि दान भावनेने एकमेकांना आपलेसे केले पाहिजे. *या प्रकारच्या समारंभाचे प्रात्यक्षिक महानाग साक्यमुनि विज्जासनात केले जाते.* त्याची सर्व बौद्धांनी माहिती करून घ्यावी आणि बौद्ध समाज सुसंघटीत करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. *बौद्ध जीवनपद्धतीप्रमाणे प्रत्येक बौद्धाने 'दानं च सीलं च पियवाचा । समानत्तता च अत्त्थचरिया।।' म्हणजे दान, शील, प्रिय वाचा, समता आणि सार्थक व्यवहार करून आपले जीवन जगले पाहिजे. याचा आदर्श संघाचे माध्यमातून साकार होत असल्याने संघाची संगत केली पाहिजे आणि संघाच्या आदर्शाची पंगत सजविली पाहिजे.*_
_*वर्षावास समाप्तीचे दिवशी सर्व बौद्धजनांनी पांढरीशुभ्र वत्रे धारण करून विहारात जमावे. येतांना स्वतः घरी तयार केलेल्या भोजनाचा डबा घेऊन यावे. वर्गणी करून आयते खाण्याच्या प्रकार करू नये. ते सर्वांचे अन्नदान मोठ्या टेबलावर निरनिराळ्या पदार्थासाठी वेगवेगळी पात्रे ठेऊन त्यात गोळा करावे. नंतर संघाची वन्दना करून आणलेले अन्नदान आणि इतर दानवस्तू संघास अर्पण कराव्यात. संघ ते दान आपल्या भिक्षापात्रात घेऊन भोजनास बसेल. त्यानंतर सर्व उपासक- उपासिकांनी तेच अन्न घेऊन एकत्रित बसून भोजन करावे.* संघभावनेने केलेले हे भोजन केवळ सहभोजन असत नाही, तर ते सर्वसहभागी भोजन असते. आपण सर्वजण आपल्या स्वकष्टार्जित अन्नाचे दान करून सर्व मिळून त्याचा आस्वाद घेत असतो, समतेच्या, सामंजस्याच्या आणि बंधुत्त्वाच्या भावनेने होय. *आपल्या जुन्या गाव-जेवणाच्या, भावकीच्या जेवणाच्या प्रथा बंद करून खऱ्या सर्वसहभागी भोजनाच्या या नव्या प्रथा सुरू केल्या पाहिजेत.* संघदिन अशा उपक्रमाचा एक अत्यंत योग्य दिन आहे. त्यानंतर परस्परांना भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम करावा. तो कशा प्रकारे केला जातो, ते महानाग साक्यमुनि विज्जासनाच्या कार्यक्रमात पाहावे. त्याच बरोबर मुलांसाठी होता होईल तेवढी खेळणी आणावीत आणि गोर- गरिबांच्या मुलांनाही चांगली खेळणी मिळतील अशा प्रकारे वाटण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडील वापरून झालेली आणि आता गरज नसणारी खेळणी अशा प्रकारे सर्वांच्या उपयोगाची ठरू शकतात. शेवटी धम्म प्रवचन ठेवावे आणि संघभावनेला बळकटी येईल अशा प्रकारे एकमेकांचे अभिनंदन करावे. वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम म्हणजे संघभावनेच्या जोपसनेचा आणि त्यात आनंदात सर्वांनी एकरूप होण्याचा कार्यक्रम आहे. त्याचा त्या भावनेने अंगिकार करावा. अशा योग्य प्रकारे संघदिन पाळण्याचा उपक्रम केल्यास बौद्ध समाजाच्या ऐक्याला बळकटी लाभण्यास साहाय्य झाल्यावाचून राहणार नाही. आणखीही काही गोष्टी करायच्या असतात. परंतु त्या आपण वेळोवेळी लक्षात घेत जाऊ. तूर्तास एवढे पुरे._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०७/०२/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक ऑक्टोबर २०११ अंक ३९ - वर्ष चौथे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment