Monday, 8 January 2024

बुवाबाजीला अंनिसचा प्रखर विरोध

_*प्रश्न ११ -* आत्तापर्यंतच्या दहा प्रश्नांमधून असं लक्षात येतंय की, *सर्व प्रकारच्या बुवाबाजीला अंनिसचा प्रखर विरोध आहे. तर हा विरोध नेमका कशासाठी आहे आणि तुम्ही तो विरोध कशा प्रकारे करताय ?*_

_*उत्तर - बुवा काय म्हणतात, माहीत आहे का? 'हे वत्सा, तुझं कल्याण कशात आहे हे मला समजतं आणि ते तुला समजणार नाही हेपण मला समजतं.' यातला पहिला अर्धा भाग म्हणायला माझा काही आक्षेप नाही.* कारण माझी आईदेखील असंच म्हणते. *पण 'ते तुला समजणार नाही, हेपण मला समजतं.' या भागाला मात्र माझा आक्षेप आहे. हे म्हणताना आपोआप तो बुवा मनातल्या मनात सांगत असतो की, 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.'*_

_*आसाराम बापूंनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुलाखत देऊन म्हटलेलं आहे की, 'आम्ही बाबा लोक काय करतो ?*_ 

_*१.* आम्ही आमच्या भक्ताचं भौतिक कल्याण करतो._ 

_*२.* आम्ही त्याचं प्रारब्ध बदलतो, आयुष्याचं सगळं प्रारब्ध बदलतो! जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातनं त्याची सुटका करतो._

_*३.* आम्ही त्याच्या वासनाविकाराचा अंत करतो आणि त्याच्यामध्ये दया, क्षमा, प्रेम, शांती या भावनांचा उद्भव करतो.'_

              _*पण हे काम आत्तापर्यंत परमेश्वराचं होतं ना? मग ते परमेश्वराचं काम आसाराम बापूंनी कसं काय घेतलं?* याचं कारण, आपल्या देशामध्ये जी अवतार कल्पना आहे, त्यामुळे लोकांना असं वाटतं की, ही गोष्ट शक्य आहे._ 

                 _*मला आत्तापर्यंत 'तुम्ही चुकीचं काम करता', असं म्हणणारा एकही माणूस भेटलेला नाही. लोक असं म्हणतात, 'डॉक्टर तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करता, ते चांगलंच आहे. बुवा आणि बाबा लेकाचे हरामखोर असतात. ते लोकांना फसवतात. स्त्रियांचं शोषण करतात.'*_

              _एवढं सगळं एका दमात बोलून झाल्यानंतर *लोक म्हणतात, 'पण डॉक्टर सगळेच बाबा काही तसे नसतात बरं का! आमचा बाबा खर्राखुर्रा आहे. बाकीचे लेकाचे सगळे बदमाष !* याबद्दल मंगेश पाडगांवकरांची एक अतिशय चांगली कविता आहे. तेवढी मी सांगितली की, आम्ही याला का विरोध करतो, ते तुम्हाला कळेल. *समर्थ रामदासांनी 'दासबोध' लिहिला आणि मंगेश पाडगांवकरांनी आजची परिस्थिती बघून जे लिहिलं, त्या कवितासंग्रहाचं नाव आहे 'उदासबोध'. त्यात 'बुवाबाजी' नावाची एक कविता आहे.* त्यात काय म्हटलंय ?_

_माणसे खपाट खंगलेली। आतून आतून भंगलेली।।_

_अदृश्य दहशतीने तंगलेली। आधार पाहिजे।।_

_प्रत्येकास येथे हवा। कोणीतरी जबरी बुवा ।।_

_जो काढेल साऱ्या उवा। मनातल्या चिंतेच्या।।_

_आधी म्हणे जय साई। मगच अधिकारी लाच खाई।।_

_अजून पकडला गेला नाही। कृपा म्हणे बाबांची।।_

_आपण शोधायचे नाही। आपण लढायचे नाही।।_

_आपण भिडायचे नाही। आयुष्याला ।।_

_कणा झिजून गेला पार। शिरजोरीपुढे सर्व लाचार ।।_

_बुवा नामजपाचा उच्चार। नशा देई।।_

              _म्हणजे *बुवाबाजी ही एका वेगळ्या प्रकारच्या नशेकडे नेते. त्याच्याविरोधी आम्ही तीन गोष्टी करतो.*_ 

_*एक, उघड संघर्ष करतो.*_

_*दुसरं, चमत्कारांना आव्हान देतो.*_

_*तिसरं म्हणजे व्यापक आणि आक्रमक प्रबोधन करतो.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  ०९/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_8.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...