Friday, 5 January 2024

फलज्योतिष' हे शास्त्रच नाही

_*प्रश्न ८ -* यालाच जोडून सुसंगत म्हणावा असा एक प्रश्न, जो फलज्योतिषाबद्दलचा आहे. असा एक दावा केला जातो की, *फलज्योतिषाला या देशात दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. आणि तुम्ही तर असं म्हणताय की, 'फलज्योतिष' हे शास्त्रच नाही. तुम्ही हे कशाच्या आधारावर म्हणता ?*_

_*उत्तर - कुठलीही गोष्ट शास्त्र आहे की नाही हे कसं सिद्ध होतं, याचे जागतिक पातळीवर सर्वमान्य असे काही निकष आहेत. ते निकष काय आहेत? आधी गृहीतक किंवा Hypothesis मांडावे लागते आणि ते सिद्ध करावे लागते. त्यानंतर त्याचं सिद्धान्तात रूपांतर होतं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही ज्योतिषाला जाऊन विचारा की, 'फलज्योतिषाचं गृहीतक काय?' तर तो तुम्हाला सांगणार नाही,* पण मी सांगतो._

_*१.* आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतात._

_*२.* हे परिणाम तुमच्या जन्माच्या वेळेवर अवलंबून असतात._

_*३.* त्यानुसार तुमचं भविष्य कळतं, ठरतं किंवा बदलतं._

_हाही पुन्हा एक तासाच्या व्याख्यानाचा विषय आहे, जो मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये समजावून सांगतोय._

                _आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर परिणाम होतात, असं क्षणभर आपण मान्य करू. समजा, मला ताप आला. मी पाच औषधांचा काढा घेतला आणि माझा ताप गेला, तर त्या पाच औषधांपैकी नेमक्या कुठल्या औषधानं माझा ताप गेला, हे कळणार नाही. बरोबर आहे ना? ते कळण्यासाठी मला प्रत्येक औषध वेगळं घ्यावं लागेल. त्याप्रमाणे *माझ्यावर गुरूचा किंवा शनीचा कुठला प्रभाव होतोय, ते ज्योतिषी सांगतात, तेव्हा त्यांनी उरलेल्या ग्रहांचा प्रभाव झाकून ठेवण्याची व्यवस्था करायला पाहिजे ना! त्याशिवाय त्यांना कसं कळलं की, या ग्रहाचा प्रभाव असा, त्या ग्रहाचा प्रभाव तसा ? शिवाय, अब्जावधी अंतरावर असलेल्या राशी आणि ग्रहांचा प्रभाव कसा ? म्हणजे आकाशस्थ ग्रहगोलांचा प्रभाव कसा असतो, हे त्यांना सांगता येणं शक्य नाही.*_

_*दुसरं गृहीतक, जन्माच्या वेळेवर ते अवलंबून असतं. आत्तापर्यंत फलज्योतिषाच्या कोणत्याही मांडणीत जन्माची वेळ सांगितलेली नाही. कारण ती वेळ कुठली ठरवायची आणि तीच का धरायची? मला डॉक्टर म्हणून हे माहीत आहे की, स्त्रीच्या शरीरामध्ये पुरुषबिजानं प्रवेश केल्यानंतर पुढच्या २४ ते ४८ तासांमध्ये स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचं मीलन होतं आणि नव्या जगाची-नव्या जीवाची पहिली पेशी म्हणजे एम्ब्रियो तयार होतो. पण ती वेळ तुम्हाला कधी कळते काय? आणि हे मी नव्हे, तर महात्मा फुलेंनी केलेलं आरग्युमेंट आहे. म्हणजे तुम्ही जन्माची वेळ ठरवता कशी? आणि तुम्ही जर म्हणालात की, 'जन्माला येईल ती वेळ!' तर मग अब्जावधी मैलांवरून, १०-१० मजली काँक्रीटच्या इमारतींवरून येणारी किरणं बाईच्या चार इंच जाडीच्या पोटाजवळ अडून बसतात होय ? त्यांना आत प्रवेश नाही! डिलीव्हरी झाल्यानंतर त्यांचं काय ते सुरू! असं होतं का ?*_

_आता *तिसरं गृहीतक पाहू- त्यानुसार नशीब ठरतं आणि बदलतं. हा सगळ्यात मोठा आक्षेपाचा भाग आहे. समजा या ठिकाणी तीन टेबलं मांडली. एकावर पुण्यामधल्या अत्यंत दरिद्री मजुराची मुलगी झोपवली- नऊ महिने पूर्ण. दुसऱ्या टेबलावर पुण्यातल्या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी झोपवली - नऊ महिने पूर्ण. तिसऱ्यावर भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस अंबानी त्याची मुलगी झोपलेली आहे- नऊ महिने पूर्ण. आणि एकाच ठिकाणी एका सेकंदाला सिझेरियन ऑपरेशन करून तीनही बालकांना जन्म दिला, तर तिघांचं भवितव्य एक असेल का? नाही ना! ती बिचारी शेतमजुराची लेक दुसऱ्या दिवशी स्वतःचं लेकरू सांभाळत कामाला जाईल, त्याशिवाय ती जगणार नाही. इथला श्रीमंत व्यापारी दहाव्या दिवशी स्वतःची आलिशान गाडी घेऊन स्वतःच्या लेकीला घेऊन जायला येईल. आणि इथे हेलिकॉप्टर कसं उतरवता येईल, याची अंबानी चौकशी करेल. म्हणजे माणसाचं भविष्य हे ग्रहगोलांच्या गतीवर नव्हे, तर समाजस्थितीवर ठरत असतं.*_

            _लक्षात घ्या, *दोन हजार वर्ष या देशातल्या बायकांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता आणि सावित्रीबाई जन्माला आल्यानंतर काय भराभरा योग बदलले काय ? सारांश भविष्य हे शास्त्र नाही, ते माणसाला परिवर्तनापासून रोखतं, म्हणून त्याच्याविरुद्ध आमची लढाई आहे.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  ०५/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_5.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...