Thursday, 18 January 2024

सम्मादिद्वि आणि व्यक्तित्व विकास

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सम्मादिठ्ठी आणि व्यक्तित्व विकास_*

*_-भदन्त विमलकित्ती गुणसिरी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


           _*सम्यक् दृष्टी ही श्रेष्ठ जीवनातील प्रत्येक गोष्टीची तसेच अज्ञान निवारण्याची प्रस्तावना आणि गुरूकिल्ली आहे. सम्यक् दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय.*_

             _-परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" (आवृत्ती १९७०, पृ.३१५)_

               _आजच्या पिढीच्या आणि खास करून युवकांच्या अनेक समस्यांच्या मुळाशी जीवनासंबंधी दोन प्रकारच्या मानसिकता आहेत, एक तर फार मोठे अज्ञान किंवा भोगवादी प्रवृत्तींचा जबरदस्त पगडा. अज्ञान हे की, नवयुगाच्या तांत्रिक शिक्षणातून भरपूर कमाई करण्याची विद्या म्हणजेच पोटाची विद्या मिळविणे आणि त्याबळावर केवळ चंगळीचे जीवन जगण्याची प्रवृत्ती जापासणे; बस्स इतकेच! जीवन जगण्याची, ते परिपूर्णतेकडे नेण्याची आणि सर्वसुखी बनण्याची विद्या त्यांना कोठेच शिकायला मिळत नाही. व्यावहारिक चाकोरीतून जातांना म्हणूनच मग केवळ भोगवादाचाच मार्ग दिसतो. आणि बखळ भौतिक संपन्नता लाभली, तरी सुखाने जगता येत नाही._

            _*"एक सर्वसामान्य समजूत आहे की, माणसाला पुरेसे मिळाले नाही की, तो दुःखी होतो; परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो". “दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे." (पृ.१८८) असे बाबासाहेबांनी आपल्या वर उल्लेखित ग्रंथात लिहिले आहे, ते काही उगाच नाही.* एक उदाहरण, आज असे काही पाहावयास मिळते की, काही तरूणी लग्नाचा विचार करतांना इतका-इतका पगार असणाऱ्याशीच लग्न करण्याची भाषा करतांना दिसतात. बाकीच्या योग्यायोग्यता, अनुरूपता, परस्पर प्रेम, विश्वास, समजदारी, इति- कर्तव्यता या गोष्टींशी त्यांना काही कर्तव्य नसते. हे पैशाशी लग्न करणे आहे, माणसाशी नव्हे. चंगळवाद, भोगवाद यांचा असा अतिरेक झाला की पुढे चालून भरपूर समृद्धी आणि श्रीमंती लाभली तरी दुःखाशिवाय पदरात काहीच पडत नाही. लवकरच मग तुझे-माझे सुरू होते, दुरावा निर्माण होतो आणि मग शुल्लक बाबींवरून धुस्स- फुस्स सुरू होते, अपेक्षाभंग होतो आणि मग होतो लग्नाचाच स्फोट, म्हणजे घटस्फोट! या गोष्टी लक्षात घेता *तरूण वयात व्यक्तीच्या निर्दोष विकासासाठी व्यावहारिक शिक्षणासोबत उच्च गुणवत्ता अंगी बाणविणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.* त्यासाठीच धम्म शिकवण आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य खर्या अर्थाने संपन्न आणि समृद्ध होऊ शकेल. म्हणूनच *भगवान बुद्धाच्या शिकवणीतील व्यक्तीत्व विकासाचे प्रशिक्षण तरूण वयात प्राप्त करणे अगत्याचे आहे.*_

               _परंतु या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे *खुद्द बौद्ध समाजातील प्रत्यक्ष बुद्धधम्मासंबंधी असलेली उदासिनता आणि घोर अज्ञान होय.* याला कारणेही तशीच आहेत. *एक तर धम्मदीक्षा दिल्यानंतर परमपूज्य बाबासाहेबांचे अल्पावधितच निधन झाले. त्या काळात बुद्धधम्माचा सखोल अभ्यास फक्त त्यांचाच होता. बाकी सर्व नवखे होते, अज्ञानी होते. धम्मशिकवणीसाठी ते सर्व बाबासाहेबांवर अवलंबून होते. आणि दुसरे कारण म्हणजे भारतात बुद्धधम्माचे कोणतेही मॉडेल किंवा परंपरा प्रचलीत नव्हती. परिणामी धम्म अध्ययनाचे तसेच धम्म प्रचार-प्रसार कार्याचे मातेरे झाले.* आपापल्या अल्पशा ज्ञानाच्या भांडवलावर, त्याला आचरण-अनुभवाची काहीही जोड नसतांना, आपापल्या आवडी-निवडीनुसार अनेकांनी इकडची तिकडची जुळवा-जुळव करून धम्म प्रचार-प्रसाराचे काम हाती घेतले. त्यात *बाबासाहेबांचा एक टक्का विचार घेऊन आणि आपले नव्यान्नव टक्के विचार मिसळून, जुन्यात नवे घालून कसाबसा धम्मप्रचाराचा खटाटोप केला. या अर्धवट प्रकाराने कोणाचेच समाधान झाले नाही आणि शेवटी बाबसाहेबांमुळे बुद्धधम्माची नव्याने ओढ लागलेला आंबेडकरी समाज प्रत्यक्ष धम्मापासूनच हळूहळू दुरावला गेला.* आज नव्या पिढीचे सोडा, खरे तर जुन्या लोकांनाही धम्माचे फारसे सोईरसुतक वाटत नाही. *जन्म, लग्न आणि मृत्यूच्या कार्यक्रमांखेरिज "बुद्धं सरणं गच्छामि" म्हणण्याची कोणाला फारशी गरज वाटत नाही.* म्हणून मग हे विधीसंस्काराचे कार्य करणाऱ्यांचा बुद्धधम्मात नसलेल्या आणि प्रत्यक्षात धम्म-विसंगत असलेला पुरोहीत वर्ग निर्माण होणे साहजिकच होते. कशाबश्या काही पाली गाथा पाठ केल्या, त्याला काही कर्मकांड जोडले की झाले. चार पैसे मिळतात, धम्माभ्यासाची आणि आचरणाची काही गरज राहात नाही. अशा प्रकारे पुरोहितशाही फोफावली आणि त्याला समर्थन देणारी यंत्रणाही सुरू झाली._

                _याचे एक मजेशीर उदाहरण आहे. घाटकोपरच्या भटवाडीत एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यात शेवटी सनदधारक पुरोहिताने आशीर्वाद देण्यासाठी कोणती गाथा म्हणावी? तर त्याने चक्क "चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय" म्हणजे "हे भिक्षूनो! आता बहुजनहितासाठी आणि बहुजनसुखासाठी सर्वत्र भ्रमण करा." ही गाथा म्हटली. त्याला शेवटी विचारले, 'ही काय आशीर्वादाची गाथा आहे काय?' तर म्हणे, 'मला माहित नाही, म्हणायला चांगली वाटते म्हणून मी म्हणतो धम्माच्या नावाने होणाऱ्या अशा पोरखेळाचा जो दुष्परिणाम व्हायचा तो झालाच, आणि अजूनही होत आहेच. त्यामुळे समाजसुद्धा मोठ्या संभ्रमात पडला आणि तथाकथित बौद्ध समाजातील तरूण वर्ग सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमापासून मोठ्या प्रमाणात दूर गेला.. म्हणून आंबेडकरी धम्म चळवळीचे भवितव्यसुद्धा संदिग्ध झाल्याचे दिसते. या गंभीर परिस्थितीची तशीच गंभीर दखल घेणे अगत्याचे आहे._

             _वास्तविक पाहाता, *बुद्धाचा धम्म हाच मुळी माणसाच्या संपूर्ण, परिपूर्ण विकासाचा कार्यक्रम आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. (Buddhism stands for perfect human development) माणसाला इहलोकीच सर्व सुखाच्या अवस्थेस नेणारा कार्यक्रम आहे.* परंतु त्याची कोणाला फारशी कल्पना नाही. त्यामुळे बुद्धधम्म केवळ एक प्रकारच्या कर्मकांडापुरता आणि रूढी- रिवाजापुरताच विषय बनला आहे. म्हणून *बुद्धधम्माचे व्यक्तित्व विकासाचे कार्य कसे होते याचे वैज्ञानिक पद्धतीने निरूपण करणे आवश्यक आहे.* त्याचे महत्व माणसास पटविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने केलेला हा एक उपक्रम आहे._

*_प्रथम स्वतःला जाणा, जसे आहात तसे !_*

                _माणूस हा एक प्राणी आहे, हे सत्य सर्वांनाच माहित आहे. परंतु तो एक खास प्राणी आहे आणि इतर प्राण्यांकडे नाही असे काही तरी खास त्याचेकडे आहे याची जाणीव मात्र फारशा लोकांना असत नाही. *बौद्ध वाङ्गमयात माणसाची व्याख्या केलेली आहे. ती अशी: "मनो उस्सन्नं येसं ति मनुस्सा". अर्थात, ज्याचे मन प्रगल्भ किंवा उत्कट आहे असा तो मनुष्य. (अभिधम्मत्थ संग्गहो, पृ.२)* तसा इतर प्राण्यांपेक्षा बराच दुर्बल असलेला हा मनुष्यप्राणी केवळ आपल्या मनाच्या सामर्थ्यावर सर्वात प्रबळ प्राणी ठरलेला आहे. इतर प्राण्यांप्रमाणेच नागडा उघडा राहणारा आणि शिकार करून जगणारा हा प्राणी सर्व प्राण्यात श्रेष्ठ ठरला आहे. त्याने नाना प्रकारच्या भौतिक समस्यांवर मात केलेली आहे आणि सृष्टीची कार्यप्रणाली शोधून, अगणित शोध लावून, सुधारणा घडवून आणल्या आहेत. आज मनुष्य पृथ्वीचा स्वामी बनलेला दिसत आहे, तो आपल्या मनःशक्तीच्या बळावर होय! कारण त्याने मनाचा सतत विकास करण्याची कास धरली. त्याने स्वतःला समजण्याचा तसेच आपल्या सभोवतीच्या निसर्गशक्तींना समजण्याचा सतत प्रयत्न केला. प्रत्येक समस्येच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याची सतत सुधारणा होत गेली. देवादिकांनी नाही केली ही सुधारणा. ती माणसाने आपल्या संशोधन प्रवृत्तीच्या दीर्घोद्योगातून केलेली आहे. त्यालाच आज आपण विज्ञान म्हणतो. परंतु असे असले तरी विज्ञानाने माणसास परिपूर्ण सुखी होण्याचा मार्ग काही दाखविला नाही. तो मार्ग दाखविला *तथागत बुद्धांनी, या विज्ञानाच्या पद्धतीचाच वापर करून तथागत बुद्धांनीसुद्धा आपले दुःखमुक्तीच्या ज्ञानप्राप्तीचे ध्येय सिद्ध केले. गृहत्याग करून त्या काळात जे काही लोक प्रयत्न करीत असत, ते सर्व त्यांनी प्रथम करून पाहिले. आणि शेवटी आपल्या मनाचे महत्व आणि सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी ध्यान-साधनेवर जोर देऊन वैज्ञानिक पद्धतीच्या जोरावरच दुःखमुक्ती आणि सर्व परिपूर्ती साधली त्यांना कोण्या देवाने साक्षात्कार दाखविला नाही किंवा कोण्या पारमार्थिक शक्तीने दृष्टान्त दिला नाही.* म्हणून ते म्हणतात की,_

_"सब्बाभिभू सब्बविदूहमस्मि, सब्बेसु धम्मेसु अनूपलित्तो।_

 _सब्बञ्ञहो तण्हक्खयो विमुत्तो, सयं अभिञ्ञाय कमुद्दिसेय्यं ।।_

_न मे आचरियो अत्थि, सदिसो मे न विज्जति।_ 

_सदेवकस्मिं लोकस्मिं, नत्थि मे पटिपुग्गलो।।_ 

_अहं हि अरहा लोके, अहं सत्त्था अनुत्तरो।_ 

_एकोम्हि सम्मासम्बुद्धो, सीतिभूतोस्मि निब्बुतो ।।_

_धम्मचक्कं पवत्तेसु गच्छामि कासिनं पुरं।_ 

_अन्धभूतस्मिं लोकस्मिं, आहञ्छं अमतदुन्दुभिं"ति।।"_

            _-अर्थात, *"मी सर्व विजीत आहे, सर्वज्ञ आहे. सर्व धर्मापासून निर्लिप्त आहे. सर्वव्यापक तृष्णाक्षय करून मी सर्वविमुक्त झालो आहे. मी स्वतःच सर्व काही जाणले आहे, मग मी कोणाला आपला गुरू मानू? मला कोणी गुरू नाही, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. सर्व देव आणि मुनष्य लोकातही मला प्रतिस्पर्धी असा कोणीही नाही. मी या लोकात एकमात्र अरहन्त आहे, एकमात्र शास्ता (अनुशासक) आहे. मी एकमात्र सम्यक् सम्बुद्ध आहे. मी शांतेन्द्रिये असून सर्व विषय-वासनांपासून मुक्त आहे. मी धम्मचक्र प्रवर्तन करण्यासाठी काशीनगरास जात आहे. वासना-विकारांनी अंध झालेल्या लोकात मी अमृतपदाची दुदुंभी वाजविणार आहे",*

                _*सत्त्याची अशी घोषणा फक्त बुद्धच करू शकतात.* कारण तो त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. कोणाची उसनवारी नाही. *एखादा शास्त्रज्ञ ज्याप्रमाणे आपल्या शोधाची घोषणा मोठ्या आत्मविश्वासाने करतो, त्याच प्रमाणे बुद्धांनी आपल्या अमृतमय प्राप्तीची घोषणा केलेली आहे, त्याच आत्मविश्वासाने.* त्यात कोणतीही लपवाछपवी नाही, कोणता अहंकार नाही आणि अतिशयोक्तीही नाही. त्याचप्रमाणे आपले अज्ञान दुसऱ्या कोणाच्या नावावर खपविण्याचा प्रयत्नसुद्धा नाही. उलट *आपल्या अमृतमय प्राप्तीची घोषणा सर्व लोकात करून त्यांना त्यांच्या आंधळेपणातून मुक्त करण्याची मंगल कामना आहे, महाकरूणा आहे. म्हणूनच बुद्धांना महाकारूणिक नाथ म्हणतात.*_

                _परंतु सध्या माणसाच्या अफाट वैज्ञानिक माहितीच्या बळामुळे त्याचे सर्व लक्ष हे बाह्य गोष्टींवर आणि त्यातून मिळणाऱ्या इंदियतुष्टीवर खिळलेले आहे. एक प्राणी म्हणून तो स्वतः चे आंतरिक अस्तित्वसुद्धा आता नीट समजू शकत नाही. त्याच्या स्वतःच्या मनः शक्तीच्या आंतरिक विकासाचा त्याला विसर पडला आहे. त्यामुळे माणसाला स्वतः नेमके काय आहोत, कसे आहोत याची ओळख करून घेण्यापासून सुरूवात करावी लागणार आहे. याचे कारण असे की, एवढे भौतिक भांडार मिळवूनसुद्धा तो नाना प्रकारे दुःखात आहे. हे भौतिक वैभव त्याला सर्व सुखी करू शकले नाही. उलट त्यातून नव-नव्या प्रकारची अनेक दुःखे निर्माण झाली आहेत. ताण-तणाव, धावपळ, बेशिस्त जीवनपद्धती यातून मधूमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, अकाली स्थूलपणा यासारखे बिनजंतूंचे रोग वाढू लागले आहेत. *मानसिक शांती आणि समाधान लुप्त पावू लागले आहे. ते बाहेर कोठे मिळेल याच्या शोधात पुन्हा माणूस भटकू लागला आहे.* म्हणूनच हे जण आंधळे आहे असे तथागत बुद्धांनी म्हटले जाते. या अन्धभूत लोकांमध्ये म्हणूनच त्यांनी आपला प्रज्ञादीप प्रज्वलित केला आहे, अमृतपदाची म्हणजेच सर्वसुखाच्या स्थितीची दुदुंभी (नगारा) वाजविली आहे. हे सत्त्य जाणण्यासाठी आपण नेमके काय व कसे आहोत हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे._

                   _माणूस शरीर आणि मन या दोन घटकांचा बनलेला आहे. जन्मल्यापासून त्याच्या या दोन्ही अंगांचा विकास होत असतो. काही प्रमाणात नैसर्गिक पद्धतीप्रमाणे तर काही प्रमाणात त्याला विशेष प्रयत्नांनी. शरीराचा विकास होतो तो अन्न-पाणी घेतल्याने. पण ते अन्न-पाणीसुद्धा पचावे लागते. ते पचण्यासाठी व्यायाम, खेळ किंवा कष्टरूपी शारीरिक हालचाली कराव्या लगतात. नुसतेच चांगले खात राहिले आणि पुरेशा शारीरिक हालचाली केल्या नाहीत, तर फोपसेपणा वाढतो आणि तो अनेक शारीरिक समस्यांना जन्म देतो. अन्न, वस्त्र, स्वच्छता, विश्राम या माध्यमातून मनुष्य स्वतःची काळजी घेत वाढत असतो, शारीरिकदृष्ट्या विकास पावत असतो. आणि ही विकास प्रक्रीया आपण जाणीवपूर्वक जोपासत असतो. या विकास प्रक्रियेचेच बाह्य अंग म्हणजे आपल्या दिसण्याची आणि इतरांशी वागण्याची पद्धती होय. त्यालाच रूबाबदार दिसणे, चांगला शिष्टाचार पाळणे असे आपण समजतो. रिती-रिवाज (Manners and Cus- toms) म्हणतात ते हेच आणि ते बव्हंशी सार्वत्रिक असतात. कोण्या विशिष्ट जाती-धर्माची ती मक्तेदारी नसते._

                      _पण मनाच्या विकासाचे काय? मनाला कोणते अन्न देतो? कोणता व्यायाम देतो? हे पटकन् सांगता येत नाही. तर *मनसुद्धा सुरूवातीला, आपल्या कळत न कळत, नैसर्गिकरित्या विकास पावत असते.* आणि कळायला लागल्यावर मग कोठे आपण जागे होतो आणि म्हणायला लागतो की मन मोठे चंचल आहे, अस्थिर आहे. आपल्या हाताबाहेर आहे तोपर्यंत सर्व काही अगदी नैसर्गिक आहे असे आपणास वाटत असते थोडक्यात आपण मनाच्या जडण-घडणीकडे योग्य वेळी पाहिजे तेवढे लक्ष देत नसतो. *मनालाही अन्न-पाणी लागले, व्यायाम लागलो पण ते आपणास काहीच माहित नसते आणि जेव्हा कळायला लागते, तेव्हा बराच उशीर झालेला असतो.* मनाच्या बऱ्या-वाईट प्रवृत्ती घट्ट झालेल्या असतात आणि त्यांच्यात बदल घडवून आणणे मंग फार कठीण वाटू लागते. जसे कुपोषणाने शरीर वाढूनही दुर्बल, खुजे राहते, त्याप्रमाणे मनसुद्धा दुर्बल आणि खुजे बनते, म्हणून लहानपणापासून मनाच्या संगोपनाचीसुद्धा योग्य ती काळजी घ्यावी लागते. *मग मनाचे अन्न-पाणी कोणते? ते केव्हा आणि कसे द्यायचे किंवा घ्यायचे असते? हे प्रत्येक माणसाला माहित असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे लहान वयापासून मुलांचे निकोप संगोपन करणे शक्य होते.*_

                  _तर *मनाचे अन्न आहे शिक्षण आणि व्यायाम आहे संस्कार,* या दोन्हींची सुरूवात होते ती अगदी जन्मापासून, जन्माच्या क्षणापासून, काय शिकते बालक जन्माच्या वेळी? तेव्हा तर त्याला काही कळत नसते. कळण्यासाठी दोन-चार वर्षे थांबावे लागते. मग कोठे आपण त्याला शाळेत जाण्यास योग्य समजतो. पण तसे काही नाही, *आज वैज्ञानिकांनी हे प्रयोगांती सिद्ध केले आहे की, मनाच्या शिक्षणाची सुरूवात अगदी जन्मापासून होते. अमेरिकन न्युरोसर्जन डॉ. पेनफिल्ड यांनी मेंदूचे कार्य कसे चालते आणि माणसाच्या बौद्धिक प्रक्रिया व स्मरणशक्तीवगैरे कशा चालतात हे प्रयोगांती निश्चित केले आहे.* त्यावर माणसाची एकंदरीत मानसिकता कशी घडते व कार्य करते यावर *डॉ. थॉमस हॅरिस* यांनी विस्तृप्त विश्लेषण केले आहे. *त्यांच्या प्रयोगानुसार जन्मापासूनच माणसाच्या मेंदूचे शिक्षणाचे कार्य सुरू होते. त्यावर निरनिराळ्या अनुभवांचे रेकॉर्डिंग सुरू होते. ते पुढे कायम राहते. काही पुसले जात नाही किंवा कमी होत नाही. परंतु वेळोवेळी त्यातील काही भाग वापरातून बाजूला सरतो. त्याला आपण विसरणे म्हणतो. परंतु काहीही नष्ट होत नाही. विसरलेलेसुद्धा मेंदूच्या विशिष्ठ भागाला वीजेचा हल्कासा धक्का दिला की लगेच आठवू लागते. मेंदूतील रासायनिक प्रक्रियांमुळे हे सर्व घडत असते, असे डॉ. पेनफिल्ड यांनी प्रयोगांती सिद्ध केले आहे.* मनाचे हे कार्य एखाद्या टेपरेकॉर्डरप्रमाणे चालते._

               _*प्रथम जन्माचे वेळी काय घडते? तर गर्भाशयात अगदी वेगळ्याच वातावरणात असलेले बालक जन्माच्या वेळी प्राणांतिक दुःखाचा अनुभव घेते. गर्भाशयात असतांना ते शांतपणे पडून असते. क्वचित एखादी हालचाल करते. तेथे त्याला खावे लागत नाही, प्यावे लागत नाही. शरीराच्या अवयवांची हालचाल करावी लागल नाही. त्याला तेथे हवा माहित नसते, प्रकाश माहित नसतो, उष्णता थंडी काही माहित नसते. परंतु जन्मल्याबरोबर ते अगदी वेगळ्याच वातावरणात येते आणि तेथे जिवंत राहाण्याचे तंत्र त्याला माहित नसते. बाहेरचे वातावरण त्याच्या जीवावर बेतले. म्हणून मरणाच्या भीतीने ते प्रथम घाबरून जाते. त्या प्रक्रियेत त्याचा श्वासोच्छवास सुरू करण्यापूर्वीची सर्व शुश्रूषा केली जाते, त्याची साफसफाई केली जाते, पाठीत थपथपाटले जाते. आणि मग त्याची श्वसनक्रिया सुरू होते. त्याबरोबर ते प्रथम रडते. आणि मग कोठे त्याची या नव्या वातावरणात जगण्याची सुरूवात होते. त्यावेळी त्याच्या मेंदूवर जे नोंदले जाते, ती आहे भीती. रडण्याचे कारण असते ते तसेच श्वासोच्छवास सुरू होण्याचेही. हे आहे जन्माचे दुःख.* त्यानंतर त्याला गरम कपड्यात लपेटून खांद्यावर घेतले जाते, थोपटले जाते. ती ऊब आणि शरिराचा सुखद स्पर्श पुन्हा अनुभवास आल्याने ते बालक शांत होते. त्याला सुखाची अनुभूती होते, पहिल्यासारखी, गर्भात असल्यासारखी. *हा सर्व अनुभव त्याच्या मेंदूच्या एका कप्प्यावर नोंदला जातो, अशा प्रकारे जन्माच्या वेळीच त्याला तीन अवघड गोष्टींचे शिक्षण मिळते. भीती, दुःख आणि सुख या त्या तीन गोष्टी होत.* माणसाला त्या पुढे केव्हाही, कोठेही शिकण्याची वेळ येत नाही. आणि हे धडे माणूस पुढे केव्हा विसरतही नाही. ते कायमचे स्मरणात नोंदले जाते. ही आहे माणसाच्या शिक्षणाची सुरूवात. *शिकणे हे आहे मनाचे अन्न. आणि माणसाचा जन्मसिद्ध अधिकार.* शिकल्याशिवाय तो जगण्याससुद्धा लायक होत नसतो. हे आपण पुढे पाहाणार आहोत._

                 _*माणसाच्या मनामध्ये ही नोंदणी (Recording) कशी होते? तर शास्त्रज्ञांनी अशी कल्पना केली आहे की, ती मनाच्या तीन कप्यात होत असते. त्यातील पहिला कप्पा सुरू होतो, जन्माच्या वेळेपासून. त्याला शास्त्रज्ञांनी म्हटले आहे बालक मन. आणि यामध्ये सर्व भावना, भावनिक अनुभव, वासना-विकार नोंदले जातात. आणि पुढे चालून माणसाला येणारे निरनिराळे भावनिक अनुभव त्यातील पूर्वानुभवांशी पडताळले जाऊन माणूस त्या त्या भावना अनुभवित असतो. या कप्यातील नोंदी या अत्यंत एकाग्र अशा मानसिक अवस्थेत झालेल्या असल्याने त्या पक्क्या होतात आणि पुढे कधीच विसरल्या जात नाहीत. लहानपणीचे अनेक अनुभव माणूस म्हणूनच मरेपर्यंत स्मरणात ठेवू शकतो आणि आठवतो. असा हा पहिला कप्पा म्हणजे बालक मन (Child Mind) होय.*_

                _*दुसरा कप्पा आहे, त्याला पालक मन (Parent Mind) असे म्हणतात. त्यामध्ये नोंदणी सुरू होते ती लहानपणापासून माणूस जे काही शिकतो, ते सर्व.* सर्व प्राणीलोकात सर्वात परावलंबी जर कोणता प्राणी असेल, तर तो मनुष्यप्राणी होय. अन्य प्राणी जन्मल्याबरोबर फारच लवकर आपापल्या पद्धतीचे जगणे शिकतात, व जगू लागतात. उदाहरणार्थ, कोंबडीचे पिलू अंड्यातून बाहेर आल्याबरोबर चालू लागते, पळू लागते, दाणे वेचूं लागते. जर कोंबडी गेली आणि त्याचे राखण केले, तर ते जिवंत राहू शकते व मोठे होऊ शकते. माणसाचे पिलू मात्र जगण्यास लायक होण्यास किती तरी दिवस लागतात. नव्हे, त्याला तर आपल्या अवयवांचा वापर करून जगण्याची कला शिकावी लागते, कित्येक दिवस चालण्यासाठी त्याला आपल्याच पायांचा लवकर उपयोग करता येत नसतो. त्याला खायला शिकवावे लागते, प्यायला शिकवावे लागते, चालायला, बोलायला शिकवावे लागते, काय करावे, कसे वागावे हे सर्व काही शिकवावे लागते. तेव्हा कुठे माणसाचे पिलू जगण्यास लायक होते. हे सर्व शिकणे त्या पालक कप्यात नोंदले जाते. पुढे चालून त्याला आपली उपजीविका कमविण्यासाठीसुद्धा वेगवेगळी विद्या किंवा कला-कौशल्य शिकावे लागते, कामधंदा शिकावा लागतो. ते सर्व या पालक कप्प्यातच नोंदले जाते. अशा प्रकारे *पालकमनात सर्व माहिती, सूचना, आज्ञा वगैरे नोंदल्या जातात.* त्या माणूस अधिक प्रमाणात नुसत्या स्वीकारत असतो. त्यांची काहीही चिकित्सा किंवा तपासणी न करता घेत असतो. थोडी-फार तपासणी केली, तरी ते या कप्याचे काम नसते. *एक प्रकारे मनाचा हा पालक कप्पा म्हणजे कम्प्यूटरच्या भाषेत आपली डाटा बैंक आहे, माहितीची कोठी आहे.* सतत मिळत राहणाऱ्या नवनव्या माहितीने हा कप्पा विकसित होत असतो. म्हणून माणसू जीवनभर शिकत असतो असे म्हटले जाते._

              _*तिसरा कप्पा आहे, त्याला चालक मन (Adult Mind) असे म्हणतात.* हा हळूहळू विकसित होत असतो. आणि पांच-सहा वर्षांनी तो स्वतंत्रपणे काम करू लागतो. *या कप्प्याचे मूळ कार्य आहे, ते सर्व माहिती, सर्व अनुभव तपासण्याचे आणि त्यांचे पृथक्करण करण्याचे. यालाच आपण चिंतन-मनन करण्याची शक्ती म्हणतो, आकलन शक्ती म्हणतो. म्हणून हा कप्पा सर्वात महत्वाचा असतो.* बरे-वाईट, खरे-खोटे, इष्टानिष्ट, योग्यायोग्य याचा विचार या कप्प्यात होतो. यालाच आपण बुद्धिमत्ता म्हणतो आणि यावरच माणसाचे पुढील भवितव्य अवलंबून असते. *लहानपणापासून माणूस जे काही शिकतो, ते सर्व बरोबर असत नाही. अनेक चुकीच्या गोष्टी, हानीकारक प्रवृत्ती, नकारात्मक विचार, कल्पना त्याच्या मनात भरल्या जातात. त्यांच्या प्रभावानुसार जेव्हा माणूस वागू लागतो, तेव्हा त्याला संस्कार म्हणतात. संस्कार म्हणजे पालक कप्प्यात नोंदलेल्या गोष्टींनुसार वागण्याचा माणसाचा कल किंवा प्रवृत्ती होय. म्हणून संस्कार चांगले किंवा वाईट असतात.* जे जे मनावर बिंबले आहे, ते सर्वच बरोबर नसते. म्हणून त्यांची परिक्षा व्हावी लागते आणि ते कार्य हे चालक मन करीत असते. परंतु ही परिक्षा करणे हे लहान वयात शक्य नसते. कारण हे चालक मन तेव्हा पूर्ण क्षमतेने कार्य करीत नसते. त्याची क्षमता हळूहळू वाढत जात असते शिकलेले परिक्षा करून नीट पचविले जाते. हा मनाचा व्यायाम आहे. म्हणून *शरीराला अन्न, तसे मनाला शिक्षण आणि अन्न पचायला जसा व्यायाम, तसे शिक्षण पचायला संस्कार होत.* पंरतु अन्न खाण्यात शिस्त नसेल तर ते पचले तरी शरीराला घातक होते, त्याचप्रमाणे *शिक्षणालाही कुसंस्काराने वेढले तर हानीकारक होतात. म्हणूनच तर सुसंस्कार हवे असतात.* ते सुखाला कारणीभूत होत असतात. *कुसंस्कारातून दुःखच होत असते. त्यासाठी लहानपणापासून जे काही कुसंस्कार म्हणून नोंदले जातात, त्यांना दुरूस्त करण्याचे काम पुढे जीवनभर करावे लागते. बुद्धाने यालाच सचित्त परियोदपनं म्हणजे चित्ताची परिशुद्धी करणे असे म्हटले आहे. ही परिशुद्धी प्रत्यक्ष ध्यानसाधनेने करता येते आणि अप्रत्यक्षपणे शील-सदाचाराच्या पालानाने करता येते. त्यालाच म्हटले आहे, सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा म्हणजे सर्व प्रकारचे पापाचरण टाळणे आणि पुण्याचरण करणे होय. हीच बुद्धाची मूळ शिकवण होय.*_

              _तर असे आहोत आपण, एक मनुष्यप्राणी म्हणून आणि आपण जगतो ते या शरीर आणि मनाच्या आधारे. या दोन्ही गोष्टी कायम एकत्रितच नांदत असतात. शरीर आहे, पण मन नाही किंवा मन आहे पण शरीर नाही, असे कधी होत नाही. शरीर आणि मनासह आपण जन्मतो आणि त्यांच्यासह मरतो. एक जाते आणि एक राहते असे काही होत नाही. त्यांचे सर्व कार्यसुद्धा एकमेकांवर अवलंबून असते आणि एकमेकांच्या साहाय्याने चालते. त्यालाच आपण म्हणतो जगणे._

            ‌ _बरे, या जगण्याच्या कार्यात कोण प्रधान असते? तर ते आहे मन. मनच जगण्याचा, अनुभवण्याचा, भोगण्याचा अनुभव घेत असते शरीराच्या माध्यमातून. आणि मनच शरीराला उत्तेजित करीत असते, वागण्यासाठी, जगण्यासाठी. म्हणून मनात येते, मनाला वाटते तसाच माणूस करीत असतो. मनाला नाही पटले, तर ते करीत नसतो. आणि कोणी जबरदस्तीच केली, तरीसुद्धा त्याचा माणस प्रतिकार करीत असतो. कोणी हात-पाय धरून, तोंड वासून जबरदस्तीने काही पाजू लागले, तरीसुद्धा शेवटी घोट गिळणे शेवटी जबरदस्ती होणाराच्याच हाती असते. आणि जबरदस्तीने गिळले, तरी थुंकून टाकणे त्याचाच हातात असते. सांगण्याचे तात्पर्य हे की, *माणसाचे सर्व करणे त्याच्याच हातात असते. इतर कोणतीही बाहेरची शक्ती, किंवा देव-देवता यांच्या हाती काही नसते.* ती केवळ एक समजूत आहे. आपला प्रत्यक्ष अनुभव मात्र वेगळा असतो. म्हणून स्वानुभव ही कसोटी आहे. तो खरा मानण्यातच शहाणपण आहे. म्हणून आपल्या स्वत: संबंधीचे हे सत्य आपण प्रथम जाणले पाहिजे. तरच आपणास स्व-जबाबदारीने जगणे, वागणे शक्य होते._

                        _आता आपण जगतो किंवा वागतो म्हणजे काय करीत असतो? ती वस्तुस्थितीसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की, जिवंत असणे म्हणजे काय? जिवंतपणाची लक्षणे कोणती? आणि मेला म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? तर आपण त्याला मेला असे म्हणतो, जो कोणतीच हालचाल करीत नसतो. हात-पाय हालवित नाही, पाहात नाही, ऐकत नाही, बोलत नाही आणि त्याचा श्वासोच्छवाससुद्धा चालत नाही. त्याला आपण म्हणतो मेला. आणि जिवंत कोण? तर जो सर्व प्रकारची हालचाल करतो तो. शरीराची हालचाल करतो, वाचेची हालचाल करतो, मनानेसुद्धा हालचाल करतो. याचा सरळ अर्थ असा की, जिवंत राहणे म्हणजे हालचाल करणे आणि हालचाल करणे म्हणजेच जिवंत राहणे होय. *वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला म्हणतात To be in motion means to act म्हणजे जगणे. आणि या अर्थानेच विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत परिवर्तन पावत असते. काहीही अचल, स्थिर, ठोस असत नाही. त्यालाच विज्ञानाच्या भाषेत म्हणतात Everything is in a flux की, प्रत्येक गोष्ट सतत प्रवाहाच्या वाहण्यासारखी परिवर्तन पावत असते.* हा या सृष्टीचा नियम आहे. तो कधी बदलत नसतो आणि त्यापासून कोणालाही सुटका नसते. तशी ती कोणत्याही माणसाला किंवा प्राण्याला असत नाही. हाच नियम माणसालासुद्धा लागू होतो. जसाच्या तसा. *माणसाच्या या हालचालीयुक्त जगण्यालाच पूर्वीच्या धम्माच्या भाषेत म्हणत असत कर्म करणे. याचा अर्थ माणूस कर्म करीतच जगत असतो. जगणे म्हणजे कर्म करणे. शारिरीक हालचाल म्हणजे कायाकर्म, वाचेची हालचाल म्हणजे बोलणे (तसेच खाणेसुद्धा) म्हणजे वाचाकर्म आणि मनाची हालचाल म्हणजे विचार वगैरे म्हणजे मानोकर्म होय. म्हणजे कर्म करीत जगणे हाच आहे आपल्या जगण्याचा अर्थ !* कर्म हेच आपले सर्वस्व आहे, तेच आपल्या हाती आहे, तेच आपले आहे आणि त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. जगण्यासाठी त्यालाच अनुसरावे लागते. म्हणून मग आता आपण या कर्म करण्याच्या प्रकाराचे थोडे मर्म लक्षात घेऊ या._

                            _*आता हालचाल किंवा कर्म हे नेहमीच कारण असते आणि जेथे कारण असते, तेथे त्याचा परिणाम होणेसुद्धा असते. हा सृष्टीचा कार्य-कारणभावाचा (Cause and effect) नियम आहे.* सृष्टीच्या सर्व नियमांप्रमाणे हा नियमसुद्धा अपरिवर्तनीय असून तो आपणास पूर्णपणे लागू होतो. याचा अर्थ असा की आपण जगण्यासाठी जी जी काही शारिरीक, वाचिक व मानसिक हालचाल करतो, त्या त्या प्रत्येक हालचालीचा परिणाम होत असतो. तो आपणास टाळता येत नसतो. यालाच म्हटले जाते कर्माचे फळ. उदाहरणार्थ, आपणास हात हालविण्याची हालचाल करण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि त्यामागे आपण खुल्या जागेत किंवा मैदानात अशी हालचाल केली, तर त्याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरास व्यायाम मिळेल. परंतु गर्दीच्या ठिकाणी हा हात मागेपुढे असा काही हालविता येणार नाही की, जेणेकरून तो इतर कोणाला तरी लागेल. आणि समजा तसा तो कोणाला लागला, तर व्यायामाचा एक परिणास शरीरावर होईलच होईल, परंतु ज्याला तो लागेल तोही आपणास दुसरा काही प्रसाद देऊन एक वेगळाच परिणाम दाखवून देईल. याया अर्थ असा की, आपल्या हालचालीतून सुख तसेच दुःख निर्माण होत असते. जे हाताचे तेच वाचेच. वाचेने जर आपण एकांतात शिवीगाळीची बडबड केली, तर आपणास श्रम पडतील, मानसिक त्वेष होईल आणि ते कोणी एकले, तर आपणास वेडा म्हणतील. पण तीच शिव्या देण्याची बडबड कोणाला उद्देशून केली, तर मात्र ऐकणारा आपणास उलट्या शिव्याही देईल आणि दांडगट असेल तर दोन ठेऊनही देईल. हा परिणास काही टाळता येत नाही. त्याचप्रमाणे, जर आपण कोणाला चांगले म्हटले, तर तो प्रसन्न होईल आणि कदाचित आपणाशी चांगले बोलेल. अशा प्रकारे कारण तेथे परिणाम आणि प्रतिक्रियासुद्धा होत असते. म्हणजेच जगण्याचा एक भाग म्हणून आपण जी काही हालचाल करीत असतो म्हणजेच कर्म करीत असतो, त्याचा परिणाम तर होतोच होतो, परंतु त्यातून सुख किंवा दुःखसुद्धा निर्माण होत असते. म्हणजेच जीवनातील अधिकांश दुःख आपण केवळ आपल्या कर्मातून टाळू शकतो, तसेच अधिकांश सुखसुद्धा आपल्या कर्मातूनच मिळवू शकतो, आता, इथे जगत असतांना! इहलोकी नित्याच्या व्यवहारात सुख प्राप्त करण्याचे हे खरे रहस्य आहे. म्हणून *निरर्थक कर्म केले, तर निरर्थक परिणाम होईल, आणि सार्थक कर्म केले तर सार्थक परिणाम होईल. हे साधे तत्व अनेकांना कळत नाही, हे खरे अज्ञान होय.*_

                          _*तथागत बुद्धांची शिकवण थोडक्यात सांगतांना एव्हढेच सांगितले जाते की, सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा । सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धान सासनं ।। - अर्थात, कुठलेही पाप न करणे, पुण्यकर्माचे संवर्धन करणे आणि स्वतःच्या चित्ताचे शुद्धीकरण करणे, हीच बुद्धाची शिकवण होय. याबाबत अशी एक सुप्रसिद्ध कहाणी सांगितली जाते की, जेव्हा आचार्य बोधिधम्म प्रथमतः चीनला गेले, तेव्हा तेथील बादशहाने त्यांचे जंगी स्वागत केले. तो बादशहा स्वतः धम्मप्रेमी होता. भारतातले एव्हढे महान आचार्य आले आहेत. तेव्हा ते आपणास धम्माचा खूप काही गंभीर उपदेश करतील अशी त्याला आशा होती. परंतु जेव्हा आचार्य बौधिधम्मांनी केवळ एव्हढीच गाथा सांगितली, तेव्हा बादशहा मोठा नाराज झाला. तो म्हणाला, "भन्ते! बस्स, एव्हढेच?" बोधिधम्म उत्तरले, "होय, महाराज एवढेच!" "पण हे तर एखाद्या सात वर्षाच्या बालकालाही समजेल." "होय राजन, हे एखाद्या सात वर्षांच्या बालकालाही समजेल, परंतु एखाद्या सत्तर वर्षाच्या वृद्धलाही आचरणात आणणे जड जाईल." तर अशी आपली अवस्था आहे. कळते पुष्कळ, परंतु वळते मात्र फार थोडे. याचे कारण लहानपणी पालक मनात भरलेल्या आणि संस्काराच्या माध्यमातून रूजलेल्या गोष्टी निघता निघत नाहीत. त्यासाठी फार जागृत राहून आणि सर्व शक्ती एकवटून प्रयत्न करावे लागतात. आणि त्याचा आपणाला येत असतो कंटाळा. म्हणून जाणून बुजून पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' अशी आपली अवस्था होते. साधनेद्वारा मनाची एकाग्रता साधणे यासाठीच फार आवश्यक असते. त्यामुळे कंटाळा वगैरे सारख्या मानसिक दुर्बलता दूर होतात आणि आपला विकास बिनदिक्कतपणे होत राहतो.*_

                  _साधनेमुळे चित्त समाहित, परिशुद्ध, पर्यवदात, उपक्लेषरहीत, मृद्ध, कोमल आणि स्थिर होऊन जाते. तेव्हा ते वीरश्रीने भरलेले असते. पराक्रमानुकूल होते. अशी चित्तदशा प्राप्त केल्या नंतरच सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाची प्राप्ती करता आली होती. हे आपणास *'महासच्चकसुत्ता'वरून (म.नि. सुत्त ३६)* समजते. यावरून स्पष्ट होते की, *ध्यानसाधनेमुळे माणूस दुर्बल किंवा भेकड बनत नाही, तर मनावर ताबा निर्माण झाल्यामुळे मनाची शक्ती अनंतपटीने वाढून तो खऱ्या अर्थाने शूरवीर होतो. म्हणूनच बुद्धाने ध्यानरत भिक्षुंना वीर म्हटले आहे. बाबासाहेब आपल्या 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात म्हणतात, “भगवंत, आम्ही स्वतःला वीर असे संबोधतो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत?” “भिक्खूंनो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात.” “भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करतो?" "श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यांसाठी आम्ही युद्ध करतो, म्हणून आम्हाला वीर म्हणतात." (पृ.३५१) यावरून जे लोक साधनेला विरोध करतात आणि बाबासाहेबांनी ध्यान-साधना नाकारली असे म्हणतात ते किती भ्रमात आहेत, हे दिसून येते.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक जानेवारी २०१० अंक १८ वर्ष दुसरे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_28.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼




No comments:

Post a Comment

भिक्खु, भदंत आणि उरगेन

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_भिक्खु, भदंत आणि उरगेन_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_22.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_भि...