Saturday, 20 January 2024

अंनिस ही फक्त हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धांबद्दलच बोलते

_*प्रश्न २३ -* अंनिसच्या चळवळीबद्दल सर्व स्तरांमधून कधी ना कधी घेतला गेलेला आणखी एक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे, *अंनिस ही फक्त हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धांबद्दलच बोलते. इतर धर्मांच्या अंधश्रद्धांचं नाव घेत नाही किंवा कचित कधीतरी घेते. अंनिसवाले त्यांना घाबरतात, की इतर धर्मांमध्ये अंधश्रद्धा नाहीत ?*_

_*उत्तर -* पहिलं म्हणजे, *या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या 'भ्रम आणि निरास' या पहिल्याच पुस्तकात दिलंय.* दुसरं म्हणजे, महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न मला हल्ली कमी विचारतात, पण तुम्ही आता विचारला आहे तर थोडं सविस्तर बोलतो._

_*एक, अंधश्रद्धा हा प्रकार श्रद्धेच्या क्षेत्रातला काळा बाजार असतो. काळा बाजार करणाऱ्यांची कुठली जात आणि कुठला धर्म आहे, हे विचारायची पद्धत नाही. त्यामुळे अंनिसनं सर्व जातिधर्मांमधल्या अंधश्रद्धांना विरोध केलेला आहे. याचे भरपूर लेखी पुरावे आमच्या पुस्तकांमध्ये आणि आमच्या मासिकांमध्ये उपलब्ध आहेत.*_

_*दोन, या देशामध्ये ८२ टक्के लोकसंख्या हिंदू आहे. माझ्याकडे जर अंधश्रद्धांची १०० प्रकरणं आली, तर त्यातली ८२ प्रकरणं हिंदूंचीच असतात. त्यामुळे आमचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं जास्त काम हिंदूंमध्येच होतं.*_

_*तिसरं म्हणजे, धर्माचं सोडा, आज आपल्या जातीमधल्या अंधश्रद्धेबद्दल दुसऱ्यानं बोललेलं चालत नाही. ब्राह्मणांना मुंजीबद्दल बोललेलं चालत नाही, विधवा मुलीच्या लग्नाबद्दल बोललेलं मराठ्यांना चालत नाही, यात्रेमधल्या पशुहत्येबद्दल बोललेलं धनगरांना चालत नाही. म्हणजे जिथं जातीमध्ये बोललेलं चालत नाही, तिथं दुसऱ्या धर्मीयांनी बोललेलं कसं चालणार ? स्वाभाविकपणे ८२ टक्के अंधश्रद्धा जशा हिंदूंच्या असणार, त्याचप्रमाणे माझे ८२ टक्के कार्यकर्तेदेखील हिंदूंमधूनच आलेले असणार.*_

       _परंतु ही झाली सुरुवातीची कारणं. यापलीकडचं अधिक महत्त्वाचं कारण असं आहे की, मला अंधश्रद्धा निर्मूलनासाठी साडेतीन हजार वर्षांची परंपरा आहे. लक्षात घ्या, साडेतीन हजार वर्षं... जगातला कुठलाही दुसरा धर्म निर्माण झालेला नव्हता... *चार्वाकाचा कालखंड आहे, तीन ते साडेतीन हजार वर्षांचा. त्यांनी एकदा ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. उत्तम जेवण केलं. स्वतः खाली बसले. ब्राह्मणांना पहिल्या मजल्यावर बसवलं. खाली मस्तपैकी जेवायला लागले. ब्राह्मणांना वर वाढलंच नाही. ब्राह्मण भयंकर चिडले, जिन्यावरून खाली आले. म्हणाले, 'ही काय पद्धत आहे का! तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलंय. तुम्ही खाली निवांत जेवताय आणि आम्हाला वर तसंच उपाशी ठेवलंय!' चार्वाक म्हणाला, 'अहो, माझं काही चुकलं नाही. मला असं वाटलं की, इथलं सगळं वाढलेलं तुम्ही जर देवाला स्वर्गात पोहोचवता, तर पहिल्या मजल्यावर तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकणार.' साडेतीन हजार वर्षांपूर्वी ही चिकित्सेची परंपरा जर मला लाभली असेल, तर मी तिचा वापर करायला पाहिजे की नको?*_

               _अलीकडची सावरकरांची परंपरा सांगतो. सावरकरांचं वाक्य म्हणून बोललो, तर लोकांना बरं वाटतं. दाभोलकर बोलले, तर मार खायची वेळ येईल. *सावरकर असं म्हणाले होते की, 'तुम्ही म्हणता की, गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात म्हणून. त्या बिचाऱ्या गाईच्या पोटात त्या देवांची भलतीच दाटीवाटी होत असणार. त्यामुळे जागा न राहिल्यामुळे ते गाईच्या शिंगाच्या टोकापासून ते तिच्या शेपटीच्या गोंड्यापर्यंत, जिथं जागा मिळेल तिथं गोचिडासारखे चिकटून बसलेले असणार. अशी देवांनी काठोकाठ भरलेली ती गोमाता जाऊन एका गोभक्त शेतकऱ्याच्या शेतात उभ्या पिकामध्ये तोंड घालते. तेव्हा त्या शेतीच्या बांधावर उभा असलेला गोभक्त शेतकरी स्वतःच्या हातामधल्या दांडक्याचे दोन-चार रट्टे त्या गाईच्या पाठीवर देतो. म्हणजे तिच्या पोटातले शे-दिडशे देव तरी लंबे करतो.' पुढं सावरकर असं म्हणतात की, 'एक वेळ या देशामध्ये थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण बुद्धिहत्या कधीही होता कामा नये.'*_

                _आता पुढचा मुद्दा, *आम्ही काय काम करतो? एका वाक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या विचारांचा वारसा पुढं नेण्याचं काम करतो.* माझी आणि माझ्या चळचळीची एवढी अजिबात क्षमता नाही की, तो सगळा वारसा आम्ही पुढं नेऊ. पण महाराष्ट्रामध्ये समाजसुधारकांची दिग्गज परंपरा आहे. लोकहितवादी, महात्मा फुले, सावित्रीबाई, न्यायमूर्ती रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, प्रबोधनकार ठाकरे... ही एवढी मोठी परंपरा... या सर्वांचं प्रचंड वाङ्मय उपलब्ध आहे... यातील एका तरी समाजसुधारकानं मुसलमानांच्या अंधश्रद्धेबद्दल किंवा अन्य धर्मीयांच्या अंधश्रद्धेबद्दल एक वाक्य लिहिल्याचं काढून दाखवा. का? एवढ्या प्रचंड वाङ्मयामध्ये या लोकांनी मुसलमानांच्या अंधश्रद्धेबद्दल एकही शब्द का लिहिला नाही? दोन कारणं आहेत._

             _पहिलं, ते घाबरले. त्या वेळी तर देशात ३० टक्के मुसलमान होते. लक्षात घ्या, देशाची फाळणी झालेली नव्हती. आपण म्हणतो, 'अहो, ते कसे घाबरतील? ती निर्भीड माणसं होती.' दुसर, मुसलमानांची अंधश्रद्धा दूर केली नाही, तर काय धोका होता, हे त्यांना कळलंच नाही. म्हणजे त्यांची प्रतिभा कमी पडली. आता ही माणसं तर महामानव होती. त्यांच्या प्रतिभेला आपण सलाम करतो. मग त्यांनी असं का केलं ? यामागे अगदी साधं कारण आणि विचार आहे. म्हणजे समजा, एक भला मोठा वाडा आहे. त्यात दहा दालनं आहेत. आपण असं म्हणू की, एकेका दालनात दहा-दहा कोटी लोक आहेत. म्हणजे त्या वेळी सात दालनं हिंदूंची झाली आणि तीन दालनं बाकीच्यांची झाली. सगळ्या दालनांमध्ये काळामिट्ट अंधार आहे. त्यांनी असा विचार केला की, 'चला, सात दालनांमध्ये आपण प्रकाश लावू या. त्यामुळे सात दालनांमधल्या लोकांना प्रकाश मिळेल. त्या प्रकाशाची काही तिरीप बाहेर जाईल की नाही? समोरच्या लोकांना प्रकाश म्हणजे काय ते कळेल की नाही? 'आपल्याकडेही प्रकाश लावावा.' असं त्यांनाही वाटेल की नाही? त्याच्याऐवजी ही प्रश्न विचारणारी मंडळी काय म्हणतायत की, 'आमच्याकडे अंधार आहे. पण त्यांच्याकडे अंधार असताना आमच्याकडे प्रकाश लावायचा नाही.' म्हणजे तुमचे हितसंबंध अंधारात गुंतलेले आहेत. लोकं अंधारातच राहावेत, असं तुम्हाला वाटतंय. 'आम्हीही अंधारात राहतो आणि तुम्हीही अंधारात राहा', अशी ही मानसिकता समाजाला पुढं नेणारी नाही, मतलबी आहे._

              _मला परवाच *एकानं असं विचारलं की, 'पण तुम्ही फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलन का करता?' मी त्याला म्हणालो, 'याचं कारण माझं घर जळत असेल आणि त्याच वेळी समोरच्याचंही घर जळत असेल, तर पहिल्यांदा सामान्यपणे कुठलाही माणूस स्वतःचं घर वाचवतो.' मग तो म्हणाला, 'म्हणजे काय?' मी म्हटलं, 'म्हणजे काय हे उघड आहे.' त्यावर तो म्हणाला, 'तुम्ही हिंदू कसे?' मी म्हटलं, 'तुम्ही आहात तसे. तुम्ही हिंदू झालात याच्यामध्ये हिंदू आईबापाच्या पोटी जन्माला येणं याच्यापलीकडे तुमचं काही कर्तृत्व आहे काय? तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलात आणि जन्मभर धर्म बदलला नाहीत. मीपण हिंदू आई-बापाच्याच पोटी जन्माला आलो आणि धर्म बदलला नाही. मग माझा धर्म हिंदूच आहे की नाही? मग मी माझं घर जळतंय म्हणून बोललो, तर तुमचं काय बिघडलं?' तुमचं बिघडलं याच्यासाठी की, तुम्हाला एका बाजूला लोकांना शहाणे करणाऱ्या चळवळींबद्दल लोकांच्या मनामध्ये भेद निर्माण करण्याची इच्छा आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लोकांना असं सांगताय, 'ते बघा, ती अंनिस अंधश्रद्धा निर्मूलन करणार. फक्त हिंदूंचं करणार. मग हिंदूंच्या अंधश्रद्धा जाणार. आणि अंधश्रद्धा गेलेले हिंदू नेभळट बनणार. ते मुसलमानांचं अंधश्रद्धा निर्मूलन करणार नाहीत. मग अंधश्रद्धा राहिलेले मुसलमान कडवे बनणार. मग या देशामध्ये एकदा हिंदू आणि मुसलमानांची गाठ पडणार. मग हिंदूंचं कसं होणार?'*_

            _अरे, तुम्ही जगाचा इतिहास काही बघाल की नाही? माणसं कशाच्या आधारे पुढं गेली? अंधश्रद्धा जोपासून पुढं गेली काय ? थेट *सावरकरांचा दाखला काढायचा, तर ते असं म्हणाले आहेत की, 'धर्मभेदाची आणि धर्मांधतेची नांगी मोडेल, असं एकच एक बळ आहे आणि ते म्हणजे, विज्ञानबळ!'* हे एवढं सगळं जर तुम्ही नीट समजून घेतलं, तर तुम्हाला समजेल की, हा आरोप एकाच वेळेला हास्यास्पद आहे, एकाच वेळेला हेत्वारोप आहे आणि एकाच वेळेला अंनिसच्या कामामुळे पोटामध्ये उठलेल्या भीतीच्या गोळ्यामधून आलेला आहे._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  २१/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

लकुण्डकभद्दियसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_लकुण्डकभद्दियसुत्तं_*     https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_59.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼     ...