Tuesday, 2 January 2024

व्यक्तींच्या अंगामध्ये येतं

_*प्रश्न ५ - भूत पाहिल्याचा दावा अनेक जण करतात, पण त्यांना ते इतरांना दाखवता आलेलं नाही.* 'माझ्या मित्रानं पाहिलं, त्याला दाखवलं' इथपर्यंत ती चर्चा आहे. *सार्वजनिक स्वरूपात, मोठ्या समूहाला असं भूत दाखवल्याचा दावा अद्याप कुणी केलेला नाही, हे सर्व खरं आहे.* परंतु आपण सर्वांनीच हे पाहिलेलं, अनुभवलेलं आहे की काही *व्यक्तींच्या अंगामध्ये येतं, देवीचा संचार होतो. त्याबद्दल काय म्हणणं आहे ?*_

_*उत्तर - खर सांगायचं, तर 'देवीचा संचार होतो' या विषयावर मला अर्ध्या तासाच भाषण द्यावं लागेल.* मात्र ते मी पाच मिनिटांमध्ये तुम्हाला समजावून सांगता माझ्या समोरच घड्याळ ठेवलंय. त्यामुळे मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना वेळ आणि माझे उत्तर असं एकेका शब्दांत जमवण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, *अंगात येण्याचे चार प्रकार असतात. एक म्हणजे ढोंग, दुसरं म्हणजे संमोहन, तिसरं म्हणजे पारंपरिक वर्तन (Culturally sanctioned behaviour) आणि चौथं म्हणजे प्रासंगिक मनोविघटन.* हे असं सांगून तुम्हाला काही कळणार नाही, म्हणून सोप्या भाषेमध्ये सांगतो._

            _*आपल्या मनाचे दोन भाग असतात. एक असतं बाह्यमन, दुसरं असतं आंतरमन.* आत्ता माझं बाह्यमन तुमच्या बाह्यमनाशी बोलतंय, पण तुमच्या आंतरमनामध्ये आणखी काहीतरी चाललेलं आहे! आणि त्याच वेळी माझ्या आंतरमनामध्येही आणखी काहीतरी चाललेलं आहे._

             _*आपलं आंतरमन गोडाऊनसारखं असतं. एखाद्या प्रचंड मोठ्या गोडाऊनमध्ये जसा माल भरलेला असतो, तसं आपल्या आयुष्यामध्ये आलेली दुःखं, व्यथा, वेदना, वैफल्य आपण आंतरमनामध्ये टाकतो.* एक हलकेसे व सोपे उदाहरण घेतो. तुम्ही स्त्री-पुरुषांनी मला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं की, लग्नापूर्वी तुम्हाला जशी बायको किंवा जसा नवरा पाहिजे होता, तसा मिळाला का हो? आता तुम्ही हसलात, याच्यातच सगळं आलं ! प्रत्येकालाच राजकुमार किंवा राजकुमारी पाहिजे असते. प्रत्यक्षात पमी, यमी, ठमीशी लग्न करावं लागतं. मग त्या राजकुमार किंवा राजकुमारीचं काय होतं? त्याला/तिला तुम्ही आंतरमनाच्या गोडाऊनमध्ये टाकून देता आणि म्हणता की, 'या जन्मात हे शक्य नाही, पुढच्या जन्मी बघू जमलं तर.' *पण गोडाऊन तोपर्यंतच व्यवस्थित असतं, जोपर्यंत त्यात मावेल एवढा माल असतो. जर सारखा सारखा माल येत राहिला, तर तो खिडकीतून, छपराजवळच्या जाळीतून बाहेर जातो; मग गोडाऊन अस्ताव्यस्त होऊन जातं. किंवा गोडाऊन नीट लावलंय, पण कीपर दारू प्यायला असेल तर? त्याला झोप लागली तर? तर गोडाऊनचं जे होतं, ते माणसाच्या मनाचं होतं. त्यामुळे तुमचं मन निरोगी असणं, याचा अर्थ तुमचं बाह्य मन आणि तुमचं आंतरमन यांची सुसंगती चांगली असणं.*_

              _*मग ज्या वेळी बाईच्या किंवा बुवाच्या अंगात येतं, त्या वेळी काय होतं? पहिली गोष्ट म्हणजे ते ढोंग असतं.* त्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. तुम्हाला ती तपासता येतील, पण आज मी त्या ढोंगाच्या दिशेनं जात नाही. तो चळवळीचा मुद्दा आहे. आपण वैचारिक चर्चा करतोय._

            _*दुसरं असतं, संमोहन. तुमच्यापैकी प्रत्येक जण ज्या वेळेला स्वतः स्वीकारलेल्या सूचनांच्या आधारे संमोहन अवस्थेत जातो, त्या वेळी तुमच्यापैकी प्रत्येकाच्या अंगामध्ये तुमचं कुलदैवत आणून दाखवता येतं. तुम्ही फक्त दहा मिनिटं माझ्या सूचना स्वीकारा, अकराव्या मिनिटाला तुम्हाला देवी दिसेल आणि तिला तुम्ही साष्टांग नमस्कार घालाल.* त्याचं व्हिडिओ शूटिंग करून मी तुम्हाला दाखवू शकतो. कारण ती मनाची संमोहन अवस्था असते._

                 _*तिसरं असतं, पारंपरिक मान्यताप्राप्त वर्तन. अष्टमीला, अमावस्येला, गावच्या जत्रेयात्रेमध्ये अंगात येतं, हे सगळं संमोहनच असतं; पण ते विशिष्ट परंपरेशी Culturally sanctioned behaviour म्हणून जोडलेलं असतं.*_

          _*सगळ्यात महत्त्वाचं अंगात येणं म्हणजे, प्रासंगिक मनोविघटन !* याचा अंनिस चळवळीशी जास्त संबंध आहे. म्हणजे काय? तुम्ही कधी असा विचार केलाय का की, *या देशात प्रामुख्याने बायकांच्याच अंगात का येतं? बायका देवींच्या राज्यात पॉप्युलर आहेत का? की देवींनी असं ठरवलंय की, 'आपण बायकांच्याच अंगात जायचं ?' लक्षात घ्या, याचं साधं कारण असं की, जर धरण पाण्याने काठोकाठ भरलं असेल आणि त्याच्यात आणखी पाणी साठवण्याची क्षमता राहिली नसेल, तर धरणाचे दरवाजे उघडावे लागतात, अन्यथा दाब वाढून धरण फुटतं. या देशाची व्यवस्था अशी आहे की, बाईच्या मनातल्या दुःखाचं धरण लवकर भरावं. तसं नसतं तर भ्रूणहत्या थांबवण्यासाठी "मॅग्नम ओपसला" कशाला काम करावं लागलं असतं? म्हणजे बाईच्या मनातलं दुःखाचं धरण भरलं की, तिच्या आंतरमनाचे दरवाजे उघडले जातात आणि काही काळ ती दुसऱ्या भूमिकेत प्रवेश करते. कृपया लक्षात घ्या, ते एक खरंखुरं नाटक असतं. स्वतःच्या दुःखाचा निचरा करण्यासाठी बाईने अबोध मनाच्या पातळीवर स्वीकारलेला तो मार्ग असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना आम्ही नेहमी असं सांगतो की, 'तिचा हा मार्ग चुकीचा आहे, पण तिच्या अज्ञानानं किंवा समाजाच्या प्रभुत्वाने तिच्यावर तो लादलेला आहे.'*_

            _*त्यामुळे अंनिसच्या कार्यपद्धतीचं मुख्य सूत्र असं आहे की, आपल्या कामामध्ये क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची मात्रा जास्त गरजेची असल्याचं भान ठेवणं. तसं भान ठेवलं तर तुम्ही कदाचित अधिक सहानुभूतीने, अधिक कृतिशीलपणे, अधिक योग्य उत्तरं देण्याच्या दिशेने बोलू शकाल.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  ०२/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_2.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...