_*प्रश्न १५ -* आता आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलोय. *तुम्हाला नीतीनं जगण्यासाठी देव आणि धर्म यांची आवश्यकता नाही, असं अगदी ठासून मांडायचंय* आणि आत्ता तुम्ही तसं मांडलंही आहे. दुसऱ्या बाजूला समाजसुधारकांचा वारसा तुम्ही फार ठोसपणे मांडता आहात. *सर्व समाजसुधारकांनी नीतीनं जगण्याबद्दलच मांडणी केलेली आहे,* परंतु काही वर्षांपूर्वी *'चला चोरी करायला शनि शिंगणापूरला ' असा उपक्रम अंनिसनं जाहीरपणे केला होता.* वर्तमानपत्रांमधून त्या विषयी आलं होतं. मग चोरी करणं हे नैतिक आहे, असं तुम्हाला म्हणायचंय का आणि नसेल, तर अशा प्रकारची अनीती तुम्ही समाजाला कशी शिकवता?_
_*उत्तर -* चोरी करणं हे निश्चितपणे अनैतिकच आहे; परंतु चोरी करायला शनिशिंगणापूरला जाण्याविषयी ज्या वेळी मी बोललो, त्या वेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, हे बरं झालं. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज झाली असती ! खरी गोष्ट अशी होती की, *मला एका पत्रकारानं विचारलं, 'तुम्ही म्हणता, जगात चमत्कार नसतो म्हणून, पण शनिशिंगणापूरला चमत्कार घडतो. त्या ठिकाणी घरांना दारं नाहीत. तरीदेखील त्या ठिकाणी कोणी चोरी केली, तर तो माणूस आंधळा तरी होतो, नाहीतर भ्रमिष्ट होतो. याबद्दल तुमचं काय मत आहे?' मी त्याला म्हटलं, 'शनिशिंगणापूरला चोरी करायची जबाबदारी माझी, मला शिक्षा देण्याची जबाबदारी शनीची, पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी मध्ये पडायचं नाही.' याला त्याने स्वतःच्या कल्पकतेनं मसालेदार शीर्षक दिलं की, "नरेंद्र दाभोलकर म्हणाले, 'चला शनिशिंगणापूरला चोरी करायला', असं आंदोलन आम्ही चालवणार आहोत."*_
_आता साधी गोष्ट अशी आहे की, चोरी करणं हे चांगलं नाहीच, पण त्यापेक्षा भ्रम पसरवणं हे अधिक वाईट आहे. *शनिशिंगणापूरला जर खरोखरच चोरी होत नसती, तर मी असं म्हटलं असतं, 'भले, ती अंधश्रद्धा राहू दे. चोरी न होणं महत्त्वाचं.' पण शनिशिंगणापूरच्या पोलिसांच्या डायरीमध्ये तुम्हाला ढीगभर चोरीच्या तक्रारी आढळतात. तिथल्या शाळेतल्या मुख्याध्यापकाची पंचाईत अशी आहे की, महत्त्वाची रजिस्टर्स कुलूप नसलेल्या कपाटात ठेवली, तर त्याची नोकरी जाण्याचा धोका निर्माण होतो आणि ठेवली नाहीत तर इज्जत जाण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून रोज तो ती सगळी रजिस्टर्स घरी घेऊन जातो आणि सकाळी येताना परत आणतो. बरं, शनिदेवाच्या प्रभावानं चोरी होत नसेल, तर देवासमोरची देणगीची पेटी उघडी पाहिजे ना! पण अडचण अशी की, ती उघडी ठेवली, तर पैसा जातो आणि बंद ठेवली, तर देवाचा प्रभाव प्रश्नचिन्हांकित होतो. मग त्यांनी काय केलं ? एक भली मोठी पेटी ठेवलेली आहे. तिला कुलूप वगैरे काही नाही. तिला भली मोठी चीर ठेवलेली आहे. त्यामधनं तुम्ही पैसे टाकायचे. पेटी तुडुंब भरली की पेटी उलटी केली जाते, खालच्या बाजूला असलेले नटबोल्ट आणि पत्रा काढला जातो, आतला सगळा माल बाहेर काढला जातो, परत नटबोल्ट आणि पत्रा लावला जातो, परत पेटी सुलटी केली जाते. हे काय देवावरच्या श्रद्धेचं लक्षण आहे का ?*_
_म्हणून भ्रम तपासला पाहिजे. *भ्रम आणि सत्याच्या तपासणीला नकार असेल तर, कुठलीच गोष्ट पुढं जाऊ शकत नाही. म्हणून लोकांच्या बुद्धीला धक्का द्यायला आम्ही तसं बोललो. त्याचं एका चमचमीत किंवा चमकदार वाक्यात रूपांतर झालं, म्हणून हा प्रश्न आला.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १३/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_13.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment