Thursday, 11 January 2024

अनिसला समाज- सुधारकांचा आधार वाटतो

_*प्रश्न १४ - अनिसला देवाचा आणि धर्माचा आधार वाटत नाही, पण समाज- सुधारकांचा मात्र आधार वाटतो.* तुमच्या सर्व विवेचनामध्ये समाजसुधारकांचा बारसा तुम्ही सातत्यानं सांगता, असं दिसतं. आत्ताच गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव यांच्याबद्दल बोललात. *हा आधार तुम्हाला कशामुळे वाटतो?*_

_*उत्तर - महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी शिक्षणाबद्दल, कामगारांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल फार मोठी कामं केली. ती आपण मानली. पण त्यांनी जो बुद्धिप्रामाण्यवादाचा वारसा दिला, तो मात्र आपण पुरेशा प्रभावीपणे समजून घेऊ शकलेलो नाही.* आपली परंपरा पाहा. *१८२३ साली लोकहितवादींचा जन्म झाला आणि १९७३ साली प्रबोधनकार ठाकरे वारले. दीडशे वर्षांची अखंड परंपरा आहे. माझ्या चळवळीला त्यातून काय मिळालं? महात्मा फुलेंनी असा प्रश्न विचारला,*_

_'जपे अनुष्ठाने पाऊस पडती। आर्य का मरती जळावीण।।_

_भटाब्राह्मणांत बहु स्त्रिया वांझ । अनुष्ठाने बीज नाही का रे।।'_

                 _जर जप आणि अनुष्ठान करून पाऊस पडत असता, तर त्याचं घाऊक कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे आहे, ते दुष्काळामध्ये टाचा घासत का मेले असते? येथे कार्यकारणभाव सांगितला आहे. *न्यायमूर्ती रानडे म्हणाले, 'रूढीचा प्रभाव गुंगी आणतो. त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवता येत नाही. मग माणसाची बुद्धी मंदावते आणि माणूस योग्य कर्तव्यापासून दूर होतो.' त्याच्या पुढे जाऊन गोपाळ गणेश आगरकर असं म्हणाले, 'लोक हो विचारकलहाला का घाबरता ?'* ज्या पुण्यामध्ये आगरकर होऊन गेले, त्या पुण्यामध्ये दाभोलकरांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ व्हावा, याचा अर्थ अजूनही लोक विचारकलहाला घाबरतात ! त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की, 'आज दाभोलकरांना बोलू दे. उद्या आम्ही बोलू.' *स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले? ते वटसावित्रीच्या पूजेबद्दल असं म्हणाले, 'वडाचं झाड जोपर्यंत उभं आहे, तोपर्यंत खाली बसलेल्या पांथस्थाला सावली देणार. तेच वडाचं झाड ज्या वेळी जीर्णशीर्ण होईल, त्या वेळी त्याच पांथस्थावर कोसळून पडेल. पांथस्थाला सावली द्यावी की त्याच्यावर कोसळून पडावं हे ज्या वडाच्या झाडाला कळत नाही, त्याची स्वतःच्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी पूजा करणं ही 'असत्याची पूजा' (सावरकरांनी वापरलेला शब्द) आहे.'* म्हणजे 'सत्यमेव जयते' असं देशाचं ब्रीदवाक्य आहे आणि 'असत्यमेव वर्तते' अशी आपली स्थिती आहे._

              _*त्यानंतर राजर्षी शाहू महाराज झाले. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध अतिशय कृतिशील संघर्ष केला. आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले, त्यांनी धम्माला किंवा धर्माला नीतीचा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. हा सगळा वारसा आम्हाला अतिशय प्रभावी वाटतो. महत्त्वाचं म्हणजे, यापैकी बहुतेकांचा वारसा हा कर्त्या सुधारकांचा वारसा आहे. या मंडळींनी जे मांडलं आणि जे बोलले, तसं ते वागले.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  १२/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_11.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...