_*प्रश्न १-* पहिलाच प्रश्न असा आहे की, अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल चर्चा करताना *'वैज्ञानिक दृष्टिकोन'* हा शब्द सातत्याने पुढे येतो. तर *'वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आग्रह अंनिसकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात का धरला जातो?*_
_*उत्तर - 'वैज्ञानिक दृष्टिकोन' याचा अर्थ जगाचा एका वेगळ्या दृष्टीनं अर्थ लावणं. कोपर्निकसनं पहिल्यांदा सांगितलं की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसत असलं, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपण त्याला 'कोपर्निकस रिव्होल्यूशन' म्हणतो.* कोपर्निकसच्या या शोधामुळे जगाचा केंद्रबिंदू बदलला. त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक शोध लागत गेले आणि मग हळूहळू 'वैज्ञानिक दृष्टिकोन' ही संज्ञा आकाराला आली. गेल्या शतकात तर हा दृष्टिकोन इतका महत्त्वाचा ठरला की, *भारतीय राज्यघटनेतल्या नागरिकांच्या कर्तव्यामध्येही त्याचा समावेश केला गेला; शिक्षणाच्या गाभाघटकांमध्ये, मूल्यशिक्षणामध्ये त्याचा समावेश झाला. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या चारशे-पाचशे वर्षांपूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास मात्र या देशामध्ये पाच-सहा हजार वर्षांपासून आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी १९५३ मध्ये लोकसभेत वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. आणि राज्यघटनेत असं म्हटलंय की, It is a duty of every Indian citizen to promote scientific temperament.* लक्षात घ्या, 'पाच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या धर्माचा आणि अध्यात्माचा प्रचार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं काम आहे' असं राज्यघटनेत म्हटलेलं नसून, 'नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा' असं म्हटलेलं आहे. पण म्हणजे नेमकं काय ? चार मुद्दे सांगता येतील._
_*१. 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या संज्ञेचा एका शब्दात अर्थ सांगायचा तर, कार्यकारणभाव. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. त्यामागे देव, दैव, नशीब, प्राक्तन, संचित, प्रारब्ध असं काहीही नसतं.*_
_*२. ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. या देशामध्ये असं सांगण्यात आलं की, 'तू ओबीसी आहेस, तुला एवढंच समजेल. तू दलित आहेस, तुला काहीच समजणार नाही. तू स्त्री आहेस, तुला शिकण्याचा अधिकारच नाही.'*_
_*३. जगातल्या सगळ्याच कार्यांमागची कारणं समजत नाहीत. उदा. कॅन्सर का होतो, याचं कारण आज माहीत नाही. पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो. तो असं मानतो की, आम्ही सत्याचा शोध अखंड चालू ठेवू. तो कधीही धर्मासारखा अंतिम सत्यावर उभा नसतो.*_
_*४. 'वैज्ञानिक दृष्टिकोन' हा आजतरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला सापडलेला सर्वांत खात्रीचा मार्ग आहे. ग्रंथप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, कुणीतरी कुणाच्यातरी डोक्यावर हात ठेवल्यामुळे मिळालेलं ज्ञान, या सगळ्या ज्ञानाच्या मार्गांना आता नकार मिळालेला आहे. त्यामुळे 'वैज्ञानिक दृष्टिकोनाचा' स्वीकार ही मानवी जीवनातली महत्त्वाची बाब आहे आणि या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीची पूर्वअटदेखील आहे.*_
_म्हणून अंनिस 'वैज्ञानिक दृष्टिकोनाचा' एवढा आग्रह धरते._
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २९/१२/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_29.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment