Monday, 11 December 2023

पाणी आणले

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! पानीयाहरणं !!_*

*_!! पाणी आणले !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _भगवान बुद्ध जंगलातून हमरस्त्यावर आले. उन्हाळ्याचे दिवस होते . ते एका गर्द झाडाच्या सावलीखाली बसले. सोबत त्यांचा परमशिष्य आनंद होते. तहान लागली होती. बुद्ध थकलेले होते. ते आनंदास म्हणाले, "आनंद, इथून दोन मैल मागे एक थंड, गोड पाण्याचा झरा आहे. तेथून पाणी आण. हे भिक्षापात्र घे. त्यातून पाणी आण. मला खूप तहान लागली आहे."_

_आनंद तत्परतेने भिक्षापात्र घेऊन झऱ्याकडे गेले. नुकत्याच त्या झऱ्यावरून बैलगाड्या गेल्या होत्या. सगळे पाणी गढूळ झाले होते. पालापाचोळा पाण्यावर तरंगू लागला होता. त्यामुळे पाणी घाण झाले होते._

_आनंद मोकळ्या हाताने परत आले आणि भगवान बुद्धांना म्हणाले, "तुम्हाला थोडे थांबावे लागेल. इथून पुढे तीन ते चार मैलांवर एक मोठी नदी वाहते. मी तिथून तुम्हाला पाणी आणतो. त्या झऱ्याचे पाणी गढूळ आहे. अस्वच्छ आहे. त्यावरून बैलगाड्या गेल्यामुळे ते पाणी गढूळ व घाण झाले आहे. ते पाणी पिण्यास योग्य नाही."_

_तथागत म्हणाले, "आनंद, तू परत जा आणि त्या झऱ्यातूनच पाणी आण." आनंदला आश्चर्य वाटले. मी सांगतोय पाणी घाण आहे, तरीदेखील बुद्ध त्याच झऱ्याच्या पाण्याचा का हट्ट धरताहेत? आपल्याला विनाकारण पुन्हा दोन-तीन मैलांची पायपीट करावी लागणार आहे; परंतु *शिष्याने गुरूचे ऐकलेच पाहिजे. आनंद पुन्हा जायला निघाले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, "हे आनंद, तू पाणी आणल्याखेरीज परत येऊ नकोस. तिथेच तू शांत बस. त्या झऱ्यात उतरू नकोस. शांतपणे झऱ्याला निरखत बस ! झरा झुळझुळ वाहत असेल. घाण तळाला बसेल. पालापाचोळा वाहून जाईल. पण तू झऱ्याकाठी शांत बसून झऱ्यात घडणाऱ्या स्थित्यंतराला न्याहळत बस. झरा स्फटिकाप्रमाणे निर्मळ झाल्यानंतर पाणी घेऊन ये."*_

_आनंद त्या झऱ्याजवळ गेले. बुद्ध म्हणाले होते तसेच घडले. पाणी स्वच्छ झाले होते. पालापाचोळा वाहून गेला होता. घाण खाली बसली होती. तरीदेखील पाणी म्हणावे तितके स्वच्छ नव्हते. म्हणून आनंद झऱ्याकाठी शांतपणे बसले. झरा शांतपणे वाहत होता. त्यात जमलेला कचरा बाहेर पडत होता. हळूहळू पाणी स्फटिकासारखे स्वच्छ झाले. आनंद पाणी घेऊन अत्यानंदाने नाचतच बुद्धांकडे आले. त्यांच्या लक्षात आले की, बुद्ध ह्या झऱ्याचेच पाणी का मागत होते. आनंद म्हणाले, "हा उपदेश केवळ माझ्यासाठी होता." आनंद यांनी बुद्धांना पाणी दिले, पाया पडले व आभार मानले._

_बुद्ध म्हणाले, "हे काय करतोस? मी तुझा आभारी आहे. तू एवढ्या लांब जाऊन माझ्याकरिता पाणी आणलेस."_

_*आनंद म्हणाले, "हे आता मला समजले, प्रथम मी मनातून रागावलो होतो. कारण त्या घाण पाण्याकरिता इतक्या लांब जायचे आणि फायदा तर काहीच नाही. तुमचा उपदेश मला तिथे झऱ्याजवळ गेल्यावर समजला. त्याक्षणी तुमच्या उपदेशाची मला गरज होती. मी जर झऱ्यात उतरलो असतो तर ते झऱ्याचे पाणी स्वच्छ होण्याऐवजी आणखी जास्त घाण झाले असते. मनाबद्दल देखील असेच आहे. आपण त्यात उतरलो तर सगळा गोंधळ होतो. अडचणीच निर्माण होतात. म्हणून तटस्थपणे मनाला न्याहाळत, निरखत बसणे सर्वात चांगले! काही वेळाने घाण निघून जाते आणि मन निर्मळ होते!"*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ११/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) महापरिनिब्बानसुत्त (मराठी अनुवादासह - संपादक आयु अरविंद भंडारे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_11.html🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...