🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भिक्षुणीने एकटे राहू नये_*
*_(एका आरोपाचे खंडन)_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_तथागतांनी भिक्षु संघाची स्थापना केल्यानंतर बर्याच कालावधीनंतर भिक्षुनी संघाची स्थापना केली. पण जेव्हा भिक्षुनी संघाची स्थापना झाली तेंव्हा बुद्धांनी त्या काळच्या परिस्थितीनुसार काही *अधिक नियम* घालून दिले होते. *बौद्ध धर्मावर कित्येक निराधार आरोप करण्यात येत असतात त्यापैकीच एक हा की बुद्धांनी स्त्री- स्वातंत्र्याला विरोध केला. विनयपीटकातील भिक्षु व भिक्षुनी यांच्या नियमांची / विनयांची संख्या पाहता हा आरोप वरकरणी खरा वाटू शकतो.*_
_इतर धर्मामध्ये प्राचीन काळात स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाधिकार नव्हता. असा प्रकार काही बौद्ध धर्मामध्ये स्थापनेपासून ते आजतागायत नाही. *बौद्ध धम्मात स्त्रियांना सर्व धर्मग्रंथ वाचण्याचे अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे.* ब्रह्मदेशात त्रिपिटक ग्रंथाचे अध्ययन केलेल्या आणि करणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. इंग्रज सरकारच्या तर्फेने ब्रह्मी राजाच्या पद्धतीस अनुसरून पालिभाषेतील बौद्ध वाङ्मयाची परीक्षा घेऊन काही बक्षिसे वाटण्यात येत होते. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन बऱ्याच स्त्रियांनी बक्षिसे मिळविली होती आणि आजही मिळवित आहेत._
_भिक्षुस एकटे राहण्याची अनुमती देत असतांना तथागत भिक्षुणीस एकटे राहण्याची अनुमती देत नाही हे वरवर पाहता हा भिक्षुणीं संघावर अन्याय आहे असे वाटते. ह्यावर उत्तर देत असताना आपण प्रथम तथागतांचा स्त्री विषयक दृष्टिकोन कसा होता हे आपण काहीं उदाहरणें घेऊन पाहूया_
_*मङ्गलसुत्तांत आणि सिगालसुत्तांत गृहस्थांनी गृहिणींचा आदर करण्याविषयी बुद्धांनी उपदेश केला आहे.*
*_उदाहरण क्र १_*
_*नकुलमाता नावाच्या एक प्रमुख उपासिकेस उपासिकावर्गात अग्रस्थान का मिळाले होते?* त्याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:-_
_भर्गदेशात शिशुमारगिर या ठिकाणी भगवान् बुद्ध रहात होते. तेथे त्या वेळी नकुलपिता नावाचा गृहस्थ फार आजारी होता. त्याचा मरणकाळ समीप आहे असे सर्वांस वाटत होते. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली "हे गृहपति, प्रपंचासक्त होऊन - तू मरता कामा नये. अशा प्रकारचे सापेक्ष (प्रपंचाच्या तळमळीने आलेले) मरण दुःखकारक आहे, असे भगवंताने सांगितले आहे._
_हे गृहपति, कदाचित् तुझ्या मनात अशी शंका येईल की, 'मी मेल्यावर, नकुलमाता मुलांचे पालन करू शकणार नाही, प्रपंचाचा गाडा हाकू शकणार नाही.', परंतु गृहपति, अशी शंका तू मनामध्ये आणू नकोस. कारण मला कापसाचे सूत काढण्याची कला माहिती आहे, व मला लोकर तयार करता येत आहे. या कलेने मी तुझ्या मरणानंतर मुलांचे पोषण करू शकेन. म्हणून है गृहपति, प्रपंचाची तळमळ मनामध्ये ठेवून तुला मरण येऊ नये, असे माझे म्हणणे आहे._
_हे गृहपति, दुसरी तुला अशी शंका येण्याचा संभव आहे की, 'नकुलमाता माझ्या पाठीमागे पुनर्विवाह करील,' परंतु ही शंका तू सोडून दे. *मी आज सोळा वर्षे गृहस्थब्रह्मचर्य (उपोसथव्रत) पाळीत आहे हे तुला ठाऊकच आहे. मग मी तुझ्या मृत्यूनंतर पुनर्विवाह कसा करीन?*_
_*हे गृहपति, तुझ्या मरणानंतर मी बुद्धभगवंताचा आणि भिक्षुसंघाचा धर्मोपदेश श्रवण करण्यास जाणार नाही अशी तुला शंका येण्याचा संभव आहे; पण तुझ्या मागे पूर्वीप्रमाणेच बुद्धोपदेश ऐकण्याच्या कामी माझा आदर राहील, अशी तुझी पक्की खात्री असू दे; आणि म्हणून तळमळीवाचून तुला मरण येऊ दे.*_
_*हे गृहपति, तुझ्या पाठीमागे मी बुद्धोपदिष्ट शीलाचे यथासांग पालन करणार नाही, अशी तुला शंका येण्याचा संभव आहे. पण ज्या उत्तम शीलवती बुद्धोपासिका आहेत, त्यापैकी मीहि एक आहे, हे तू खात्रीने समज आणि म्हणून तळमळीवाचून तुला मरण येऊ दे.*_
_हे गृहपति, *मला समाधिलाभ झाला नाही अतएव तुझ्या मरणाने मी फार दुःखी होईन- असे तू समजू नकोस. ज्या कोणी बुद्धोपासिका समाधिलाभिनी असतील, त्यापैकी मी एक आहे असे तू समज* आणि मनाची तळमळ सोडून दे._
_हे गृहपति, *बौद्धधर्माचे तत्त्व मला अद्यापि समजले नाही अशीहि तुला कदाचित् शंका येईल. परंतु ज्या कोणी तत्त्वज्ञ उपासिका असतील त्यापैकीच मी एक आहे, हे तू पक्के ध्यानात ठेव* आणि मनाची तळमळ टाक."*
_या नकुलमातेच्या सांत्वनाने नकुलपित्याच्या मनाचे समाधान झाले आणि त्याचा तो आजार लवकरच शमला. आजारातून बरा झाल्यावर तो बुद्धदर्शनास गेला. तेथे *बुद्धांनी त्याला म्हटले “हे गृहपति, तू मोठा पुण्यवान् आहेस नकुलमातेसारखी उपदेश करणारी आणि तुझ्यावर प्रेम करणारी पत्नी तुला मिळाली आहे. हे गृहपति, उत्तम शीलवती अशा ज्या काही उपासिका आहेत, त्यापैकी ही एक आहे, अशी पत्नी तुला सापडली हे तुझे भाग्य होय !"*_
*_उदाहरण क्र २_*
_सिगालसुत्तात भगवंत सिगालास उपदेश देतांना म्हणतात, हे गृहपतिपुत्र ! पाच गोष्टीनी पतीने पश्चिम दिशा जी पत्नी तिची पूजा करावी:_
_*(१) तिला मान द्यावा*_
_*(२) कोणत्याहि तऱ्हेने तिचा अपमान होऊ देऊ नये*_
_*(३) अन्य स्त्रीशी संबंध ठेवू नये (एक पत्नीव्रत आचरावे)*_
_*(४) घरचा कारभार तिच्यावर सोपवावा*_
_*(५) तिला वस्त्राच्छादनाची कमतरता पडू देऊ नये*_
_या पाच गोष्टीनी जर पतीने पत्नीची पूजा केली तर ती पतीस पाच प्रकारानी उपकारक होते :_
_*(१) घरात चांगली व्यवस्था ठेवते*_
_*(२) नोकरचाकराला प्रेमाने संभाळते*_
_*(३) पतिव्रता होते*_
_*(४) पतीने मिळविलेल्या संपत्तीचे रक्षण करिते (उघळेपणा करीत नाही)*_
_*(५) सगळ्या गृहकृत्यात उद्योगी आणि दक्ष होते. याप्रमाणे जर पतीने पश्चिमदिशा जी भार्या तिची पूजा केली तर ती त्याला सुखावह होते.*_
*_उदाहरण क्र ३_*
_*मल्लिक्का सुत्तात राजा पसेनदी यांस कळते की त्याच्या पत्नीने राणी मल्लिक्काने कन्येस जन्म दिला. हे ऐकून तो दुःखी होतो तेंव्हा भगवंत त्याला स्त्री कशी श्रेष्ठ असते समजावून सांगतात.*_
*_उदाहरण क्र ४_*
_*लोहिच्च सुत्तात लोहिच्च ब्राह्मण असे म्हणतो की स्त्री आणि शूद्र यांना शिक्षण देणे चुकीचे आहे. तेंव्हा तथागत लोहिच्च ब्राह्मणाचा धिक्कार करतात आणि तो कसा चुकीचा आहे हे त्याला समजावून सांगतात.*_
_*हे व अशा कित्येक उदाहरणावरून भगवंतांना स्त्रियांची योग्यता किती वाटत होती, ये स्त्रियांचा किती आदर करीत होते हे आपणास समजून येते.*_
*_स्त्री स्वातंत्र्य जर बुद्धाला पसंत होते, तर भिक्षुणीसाठी त्यांनी कडक नियम केले हे कसे? याचे उत्तर थोडक्यात द्यावयाचे म्हटले म्हणजे, त्या काळच्या समाज परिस्थितिला पाहून हे नियम बुद्धांना करावे लागले._*
_*भिक्षुणीने एकटे राहू नये असा बुद्धांनी नियम केला, असा निर्बंध भिक्षूंस नव्हता. अर्थात् हा नियम स्त्रीस्वातंत्र्यविघातक आहे; असे सकृतदर्शनी कोणालाहि वाटण्याचा संभव आहे. पण त्या काळच्या समाजरचनेकडे लक्ष्य दिले असता हा नियम योग्य होता असेच म्हणावे लागेल.* हे स्पष्ट करण्यासाठी आपण हे शुभा नावाच्या भिक्षुणीची गोष्ट पाहूया :-_
_शुभा भिक्षुणी एके दिवशी जीवक वैद्याच्या आम्रवनास एकटीच जात होती. वाटेत तिला एका लबाड मनुष्याने गाठले. तिच्या सुंदर रूपाकडे पाहून तो भुलून गेला, आणि आपली दुष्ट वासना तृप्त करण्यासाठी तिचे मन वळवू लागला. तिने त्याला अनेक प्रकारे उपदेश केला; परंतु त्या कामांध माणसावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. शेवटी तो बलात्कार करण्यास सुद्धा तयार आहे असे जेव्हा शुभेला दिसून आले, तेव्हा ती त्याला म्हणाली “अरे, तू मला का अडवीत आहेत?" तो पुनः तिच्या नेत्रादि सुंदर अवयवांचे वर्णन करू लागला, आणि म्हणाला "हे सुंदरि, हे तुझे सुंदर नेत्रयुग्म पाहून मी कामविकाराने पीडित झालो आहे. सुंदरि, तुझ्यावाचून प्रियतर असे मला या जगामध्ये काही नाही." शुभा म्हणाली, "एवढेच ना? या माझ्या डोळ्यांचीच तुला गरज. काही हरकत नाही. घे हा डोळा." असे म्हणून बोटाने डोळा उपटून तो तिने त्याच्या हातावर ठेवला. हे तिचे साहसी कृत्य पाहून तो मनुष्य घाबरून गेला, आणि त्याने तिला साष्टांग प्रणिपात करून तिची क्षमा मागितली.
*_आजच्या आधुनिक युगात एकटी स्त्री ही सुरक्षित नाही हे सत्य आपण स्वीकारतो. आपण अंदाज लावू शकतो की, भारतासारख्या प्रगतशील राष्ट्रात दर दिवसाला एक बलात्कार होत आहे जर आजच्या युगात स्त्री ही सुरक्षित नाही तर २६०० वर्षांपूर्वी परिस्थिती कशी असेल याचा निदान अंदाज तरी लावला तरी हे कळून येईल की त्यावेळची एकटी स्त्री ही खूपच असुरक्षित होती._*
*_भिक्षु जीवन म्हणजे गृहत्यागाचे जीवन. एखाद्या जंगलात-वनात-विहारात एकटे राहून निब्बान प्राप्त करण्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागतो त्यावेळी (आणि आजही) भिक्षु-भिक्षुणींना संसार त्यागावा लागतो आणि निब्बाण प्राप्तीसाठी अभ्यास करावा लागतो पण अशावेळी कोणत्याही भिक्षुणीवर जसा शुभा भिक्षुणीवर प्रसंग आला तश्या प्रकारचा प्रसंग येऊ नयेत एवढ्यासाठी त्यांनी एकाकी राहू नये, असा बुद्धांनी नियम केला असला पाहिजे._*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०९/१०/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) मङ्गल सुत्त_*
*_२) सिगालसुत्त_*
*_३) विनय पिटक_*
*_४) बुद्ध धर्मावरील चार निबंध, लेखक धर्मानंद कोसंबी_*
*_५) मल्लिका सुत्त_*
*_६) लोहिच्च सुत्त_*
*_७) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/blog-post_8.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment