🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_श्रामणेर प्रवज्जा_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध झाल्यानंतर खूप काळानंतर राजगृहातुन कपिलवस्तूला आले होते, तेथे ते *निग्रोधारामात* रहात असे. एके दिवशी तथागत व त्यांच्या संघास शुद्धोदन राजाने भोजनाचे निमंत्रण दिले. भोजनासाठी जेंव्हा तथागत शुद्धोदनाकडे गेले तेंव्हा, राहुलची आई त्यांना पाहून राहुल कुमाराला म्हणाली, "राहुल, हे तुझें पिता आहे. त्याजवळ जाऊन आपले दायाद्य माग." तेव्हा राहुल बुद्धांपुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, "हे श्रमणा, तुझी सावली सुखकर आहे." भगवान् आसनावरून उठून चालते झाले, व राहुल "मला दायाद्य द्या. दायाद्य द्या." असे म्हणून मागोमाग गेला. *विहारात गेल्यावर राहुलाला दायाद्य द्यावयाच्या उद्देशाने सारिपुत्राला बोलावून तथागतांनी त्याला प्रवज्जा देण्यास सांगितले.*_
_राहुलला आपण कशाप्रकारे प्रवज्जा द्यावी अशी सारिपुत्राने तथागतांकडे विचारणा केली, तेव्हा भगवान ह्या प्रकरणी भिक्षूंना गोळा करून म्हणाले, “भिक्षुहो, तीन शरण गमनांनी श्रामणेर प्रवज्जा देण्यात यावी. ती अशी:-_
*_१) प्रथम त्या मुलाचे क्षौर करावे._*
*_२) त्याला काषायवस्त्रे नेसवावी_*
*_३) भिक्षूंच्या पाया पडावयास लावून उकिडव्याने हात जोडून बसवावे* व ही वचने त्रिवार उच्चारावयास लावावी -_
*_बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि_*
_ह्या तीन वचनांनी श्रामणेराला प्रवज्जा द्यावी." ह्याप्रमाणे सारिपुत्राने राहुलला प्रवज्जा दिली._
_राहुलची श्रामनेर दीक्षा झाल्याची पाहून शुद्बोदन राजास अतीव दुःख झाले आणि ते भगवंताजवळ येऊन म्हणाले, “मी भगवंताजवळ एक वर मागतो.” बुद्ध म्हणाले, "तथागत वर देत नसतात." शुद्बोदन-"जो वर योग्य असून अनवद्य आहे तो भगवंत देतील की नाही ?" भगवंत-"असे असेल तर बोला. " शुद्बोदन -“भगवंताने प्रवज्जा घेतली तेव्हा मला अत्यंत दुःख झाले. त्यानंतर नंद भिक्षु झाला त्या वेळी ही झाले व आता राहुल श्रामणेर झाला तेव्हा तर विचारूच नये. पुत्रप्रेम असे आहे की, ते कावडी, मांस, स्नायु व हांडे ह्यांनाहि भेदून जाते. तेव्हा *आजपासून आईवडिलांनी परवानगी दिल्याशिवाय कोणालाहि श्रामणेर किंवा भिक्षु करण्यात येऊ नये."* शुद्धोदन राजा निघून गेल्यावर *भगवान संघास उद्देशून म्हणाले' "आजपासून आईवडिलांनी परवानगी दिल्यावाचून मुलाला प्रव्रज्या देऊ नये."*_
_कपिलवस्तूहून बुद्ध श्रावस्तीला आले. तेथे बरेच श्रामणेर गोळा झाले होते. आपणास पाळावयाचे नियम कोणते अशी त्यांना शंका आली; तेव्हा खालील दहा नियम पाळण्यास शिकावे अशी भगवंतांनी त्यांना परवानगी दिली :-_
*_(१) प्राणघातापासून विरति_*
*_(२) अदत्तादानापासून विरति_*
*_(३) अब्रह्मचर्यापासून विरति_*
*_(४) असत्य भाषणापासून विरति_*
*_(५) सुरापानादिक मादक पदार्थांपासून विरति_*
*_(६) विकाल- भोजनापासून विरति_*
*_(७) ग्राम्य नृत्य गीत वाद्यांपासून विरति_*
*_(८) पुष्पमाला गंधविलेपन भूषणे इत्यादिकांपासून विरति_*
*_(९) उंच आणि उंची शय्येपासून विरति_*
*_(१०) सोने आणि रुपे ग्रहण करण्यापासून विरति_*
*_हे श्रामणेरांनी पाळण्यायोग्य दहा नियम आहेत. ते पाळण्यास त्यांनी शिकावे._*
_त्या काळी *काही श्रामणेर भिक्षूंचा आदर ठेवीत नसत. तेव्हा त्यांना दंड करण्याची बुद्धांनी परवानगी दिली. तो दंड असा:-*_
*_१) त्यांना आपल्या उठण्या - बसण्याच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगावे. परंतु विहाराच्या आवाराबाहेर घालवून देऊ नये._*
*_२) त्यांना जेवणा खाणाची मनाई करू नये._*
*_३) जो श्रामणेर प्राणघात, चोरी, अब्रह्मचर्य, असत्य भाषण किंवा मद्यपान करील, अथवा बुद्धाची, धर्माची किंवा संघाची निंदा करील, मिथ्यादृष्टि घेऊन बसेल, किंवा भिक्षुणीशी असभ्य व्यवहार करील त्याला श्रामणेर ठेवू नये, संघातून बाहेर करावे_*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०८/१०/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर_*
*_२) बुद्ध धर्मावरील चार निबंध, लेखक धर्मानंद कोसंबी_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/10/between-two-farmers-1.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment