🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बुद्ध विहार_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*प्रत्येक धर्माचे एक धर्मस्थळ असते. हिंदूंचे मंदिर, मुसलमानांची मस्जित, ख्रिश्चनांचे चर्च, जू लोकांचे सिनेगॉग तर पारसी लोकांची अग्यारी वगैरे, तसे बौद्ध लोकांचे बुद्धविहार किंवा नुसते विहार असे समजले जाते. परंतु हा समज मुळीच बरोबर नाही.* भारतापुरते बोलायचे तर बुद्धधम्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्धांनी याच समजुतीनुसार ठिकठिकाणी बुद्धविहारांची निर्मिती केलेली आहे. धर्मांतरानंतर अवघ्या सातच आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले. तेव्हा भारतीयांना बुद्धधम्म पूर्णपणे नवाच होता. त्याची शिकवण माहित असणे सोडाच परंतु बुद्धधम्माची एखादी ठळक खूणसुद्धा येथे अस्तित्वात नव्हती. त्यावेळी साहजिकच बौद्ध बनलेल्या लोकांना वाटले की, *जशी इतर धर्मियांची धर्मस्थळे आहेत, त्याप्रमाणे बौद्धांचे बुद्धमंदिर असले पाहिजे. त्यालाच बुद्धविहार असे म्हणतात.*_
_इतरांची जशी धर्मस्थळे आहेत, तसे बुद्धविहार हे बौद्धांचे धर्मस्थल नाही, असे जे म्हटले आहे, ते अगोदर समजावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणास प्रत्यक्ष भगवान बुद्धांचे काळात जाणे आवश्यक आहे. *बुद्धविहार हा आधुनिक शब्द आहे. मूळचा शब्द आहे केवळ 'आराम'. 'आराम' याचा अर्थ आहे आनंद किंवा शांती उपभोगण्याचे स्थळ किंवा परिसर.* पूर्वी राजे-रजवाडे, धनवान श्रेष्ठी (व्यापारी) व श्रीमंत जमिनदार आपल्या ऐश-आरामासाठी निसर्गरम्य अशा ठिकाणी उद्यान व महाल बांधित असत. हल्ली त्याला आपण 'फार्म हाऊस' म्हणतो, तसा तो प्रकार होता, परंतु सर्व सुविधांनी युक्त अशा एकांतातील वास्तूला 'आराम' म्हटले जाई. *भिक्खू अरण्यात राहून धम्मात आनंद घेत असत म्हणून त्यांना 'धम्मे आरामो अस्स' म्हणजे धम्मात रममाण होणारे म्हणजे धम्मरत होणारे असे म्हणतात. म्हणून त्यांच्यासाठी धम्मात रममाण होऊन राहाता येईल अशा प्रकारची गावाजवळ, निसर्गरम्य असलेल्या जागेवर, एकांत ठिकाणी निवासाच्या सोई उपलब्ध करून देणारी वास्तु बांधणे म्हणजे आराम बांधणे अशी संकल्पना निर्माण झाली व ती अंमलात आली. त्या आरामांनाच विहार असे नाव लाभले.* अशी विहारे मगध देशात म्हणजे हल्लीच्या बिहार राज्यात सर्वात जास्त होती म्हणून *मगध हे नाव बदवून ते बिहार असे झाले. बिहार हे विहार या शब्दाचे हिन्दी रूपांतर आहे.*
_*पहिले विहारदान बिंबिसार राजाने आपले वेळूवनाराम* दान देऊन तेथे मोठी वास्तु निर्माण करून बुद्ध व भिक्षुसंघासाठी व्यवस्था केली._
_*अनाथपिंडीकाने जेतवन उद्यान* विकत घेऊन तेथे एक प्रचंड इमारत बांधून बुद्ध व त्यांच्या संघास दान दिले त्याचे नाव *अनाथपिण्डिकस्स आराम* असे पडले. जेत राजकुमारानेह आपले अर्धे उद्यान दान दिले म्हणून त्याला *जेतवनाराम* असेही म्हणत._
_*मिगारमाता विशाखा* हिने सत्तावीस करोड सुवर्णमुद्रा खर्चून प्रचंड इमारत बांधली आणि बुद्ध व त्यांच्या संघास दान दिले त्याचे नाव *पूर्वाराम* असे पडले._
_ज्यांना आपण आज बुद्धविहारे म्हणतो त्यांची निर्मिती अशा प्रकारे झालेली आहे. त्या विहारातून भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खूसंघ राहू लागला व धम्माचा प्रचार करू लागला. *शहराच्या जवळ असल्यामुळे शहरवासीय तेथे जाऊन, भिक्खूसंघाला दान देऊन त्यांच्या धम्मदेसनेचा लाभ घेऊ लागले. अशा प्रकारे आराम ही धम्म प्रशिक्षण, धम्माचरण, व धम्मदेसनेची प्रमुख केन्द्रे म्हणून विकास पावली.*_
_*जरी विहारे भिक्खू संघाला दान दिली जात असली, तरी भिक्खूसंघ त्यांचा मालक होऊन बसत नसे. तर अनिर्बंधपणे त्यांचा वापर करीत असे. भिक्खूंची तेथे सतत ये- जा चालत असे व सर्व देखभाल स्थानिक बौद्ध उपासकवर्ग करीत असे. येऊन जाऊन का होईना, परंतु संघाचा तो सहवास लोकांच्या दृष्टीने अमूल्य होता. नाही तर त्यांच्या शिवाय धम्मज्ञान मिळविण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. आज बौद्ध राष्ट्रांतील विहारेसुद्धा अशाच पद्धतीने निर्माण केली जातात व वापरली जातात. उपासकवर्ग त्यांचा मालक व पालक असतो, परंतु चालक मात्र मुळीच नसतो.*_
_*विहाराची देखभाल करण्याची व भिक्खूंना साहाय्य करण्याची सेवा देण्यासाठी 'आरामिक / आरामिका' नावाने ओळखल्या जाणाऱ्या उपासक उपासिकांची नेमणूक करीत असतात. त्यांना आपल्या भाषेत सेवेकरी असे म्हणतात.* विहारामध्ये काही ठिकाणी आचार्यांची परंपरा चालते, तर काही ठिकाणी आचार्य बदलत राहतात. अनेकदा भिक्खू आचार्य स्वतः होऊन विहार सोडून अन्य कामगिरीवर निघून जातात. मग संघाचे वतीने नवीन आचार्यांची नेमणूक केली जाते किंवा उपासक वर्ग कोणा तरी आचार्यांना निमंत्रित करून तेथे राहण्याची विनंती करतो व संघ त्याला मान्यता देतो._
_या घटनातून दोन गोष्टी स्पष्ट होतात._
_*१)* एक तर भिक्खूसंघ आपल्या जवळ राहावा, ही उपासकांची इच्छा प्रगट होते. त्याचे सरळ कारण एवढेच होते की भिक्खूंच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय धम्माचे ज्ञान मिळणे व आचरणाच्या पद्धती शिकणे अशक्य होते. म्हणून संघाचे मार्गदर्शन सतत मिळत राहावे, म्हणून संघ लोकवस्तीच्या जवळ राहावा, ही गृहस्थ वर्गाची गरज होती._
_*२)* दुसरी गोष्ट म्हणजे विहार हे भिक्खूसंघाच्या निवासासाठी असावे व त्यामध्ये राहून भिक्खूंना आपली साधना म्हणजे धम्माचे अध्ययन व आचरण करता यावे. त्यांची अशी काही सोय केल्याशिवाय त्यांचा निरंतर सहवास लाभणे व त्यांनाही धम्माचे योग्य प्रकारे पालन करणे शक्य होणार नव्हते. अशा प्रकारे विहारे बांधून ती भिक्खूसंघाला दान देण्याची परंपरा निर्माण झाली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- विहार संस्कृती_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०६/०७/२०२३_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/07/blog-post_5.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment