🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_श्रामणेर_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_बुद्धधम्मात भिक्खू भिक्खूनी बनण्याची परंपरा आहे, त्याचा एक खास विधी-संस्कार आहे. *ब्राह्मणाप्रमाणे कोणी जन्माने भिक्खू बनत नसतो किंवा जन्मजात वारसाहक्कानेही भिक्खू बनत नसतो. तर भिक्खू धम्मानुसार केलेल्या आचरणाने म्हणजेच कर्माने घडत असतो. हे कर्म करण्यासाठी जेव्हा कोणी पुढे येतात तेव्हा त्यांना भिक्खू-भिक्खूनीची दीक्षा घ्यावी लागते आणि आपली जडण-घडण करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते, राबावे लागते.* या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात फार योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. ते येणे प्रमाणेः_
*_'संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात.' (५.१.२-१६) 'त्रिशरण आणि दसशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. (५.१.२-१८) 'भिक्खू व्हायला दोन अवस्थांतून जावे लागेः पहिली प्रवज्जा होई आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यानंतर तो भिक्खू ठरे.' (५.१.२-२४) 'श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूच्या स्वाधीन असून भिक्खूच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने उपसंपदा घेतलेली नसे.' (५.१.२-२३) 'श्रामणेराला उपाध्यायाने त्याचा परिव्राजक ( श्रामणेर) म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. ' (५.१.२-२६) 'हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलाविलेल्या संघ सभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे.' (५.१.२ - २७) 'जो भिक्खूपदाचा प्रार्थी तो श्रामणेर त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी श्रामणेराला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत.' (५.१.२-२८) 'जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच श्रामणेराला भिक्खूपद मिळे.' (५.१.२-२९) 'भिक्खूनी संघात प्रवेशासंबंधी नियम भिक्खूसंघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत.' (५.१.२-३०)_*
_*बौद्ध राष्ट्रात अशा प्रकारे भिक्खू किंवा भिक्खूनी बनण्याची परंपरा चालू आहे. तशीच महिनाभर किंवा वर्षावासाच्या काळातील तीन महिने श्रामणेर बनण्याची परंपरासुद्धा आहे. परंतु एकाएकी कोणी असे टेंपररी श्रामणेर बनत नसतात. तर आचार्यांच्या सान्निध्यात राहून गंभीरपणे धम्म जाणण्याची आणि तसे काही आचरण करून पाहाण्याची जिज्ञासा निर्माण झाली तरच लोक अल्प काळासाठी श्रामणेर बनतात. परंतु श्रामणेर बनल्यानंतर तो कालावधी संपेपर्यंत ते विहारातच आचार्यांच्या बरोबर राहून सतत धम्म शिकत आणि आचरण करीत राहतात. त्यांना कोठे एकटे फिरण्याचा, एकटे राहण्याचा, विधी- संस्कार करण्याचा, प्रवचन देण्याचा आणि कोणाकडे काही मागण्याचा मुळीच काही अधिकार नसतो आणि लोक कटाक्षाने या शिस्तीचे पालन करतात.*_
*_थाईलँडमध्ये तर श्रामणेर एकटा राहतांना किंवा भिक्षाटन करतांना दिसला, तर त्याला अटक केली जाते आणि संघाचरणाचा भंग केला म्हणून तुरूंगवासाची सजा ठोठावली जाते. त्यामुळे धम्म सखोलपणे जाणण्याची आणि त्याप्रमाणे काही आचरण करून पाहण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाल्याशिवाय कोणीही अल्प काळासाठीसुद्धा श्रामणेर बनत नसतात. अशा प्रकारची तेथे धम्मश्रद्धेची संस्कृती आहे. म्हणून एखाद्या तरूणाच्या किंवा तरूणीच्या मनात श्रामणेर किंवा श्रामणेरी बनण्याची इच्छा निर्माण झाली, तर त्यांच्या पालकांना फार आनंद होतो. मग ते त्यांच्या श्रामणेर दीक्षेसाठी दानधर्मात मोठ्या प्रमाणात खर्च करतात. श्रामणेर बनणाऱ्यांची कधी कधी तर हत्तीवरून अभिवादनाची मिरवणूक काढतात. पालकांना वाटते की आपला मुलगा किंवा मुलगी आता सर्वश्रेष्ठ जीवनमार्गाला लागले आहेत. पुढे चालून जर ते भिक्खू किंवा भिक्खूनी बनले तर आपल्या जीवनाचे आणि मुलांच्या जीवनाचे सोने झाले असे त्यांना वाटते. म्हणून अल्पकाळासाठी श्रामणेर बनण्यालासुद्धा तेथे प्रचंड महत्त्व असून ते धम्मश्रद्धेचे महान प्रतिक आणि आदर्श मानला जातो._*
_या विवेचनावरून पहिली गोष्ट स्पष्ट होते ती अशी की *श्रामणेर बनायचे असते ते भिक्खू बनण्यातील पहिले पाऊन टाकण्यासाठी किंवा धम्माचरणाचा भिक्खू जीवनातून अनुभव घेण्यासाठी होय. म्हणजेच आचार्याच्या संगतीत राहून गंभीर धम्माचरणाचा धडा गिरविण्याचा प्रयत्न करण्यासाठी होय.* त्यातून जर भिक्खू जीवन जगण्याची श्रामणेराला उत्कट इच्छा झाली, तर त्याने भिक्खू बनण्याचे पुढील पाऊल उचलायचे. जर तशी इच्छाशक्ती निर्माण झाली नाही तर चीवर त्याग करून पुन्हा गृहस्थ जीवनात परतायचे. *अगोदरच काही दिवस श्रामणेर राहायचे आणि मग पुन्हा गृहस्थ उपासक बनायचे असे ठरवून श्रामणेर दीक्षा घ्यायाची नसते, असे केल्याने धम्माची मूळ चेतना आणि पावित्र्य नष्ट होते आणि श्रामणेर बनणे हा एक पोरखेळ होऊन जातो. श्रामणेर बनण्याच्या मूळ उद्देशाप्रमाणे धम्मभावना वाढत नाही, धम्माच्या अथांगतेची, धम्माच्या दिव्यत्वाची अजिबात कल्पना येत नाही आणि त्यामुळे धम्मश्रद्धा वाढत नाही.* धम्मश्रद्धेच्या अभावी माणूस शुष्क बनतो आणि त्याच्या दृष्टीने धम्म निरस बनतो. अशा प्रकारे माणसाचे अतोनात नुकसान होते._
_आपल्याकडची परिस्थिती अशी आहे की, अधिकांश पालकांना आपला मुलगा भिक्खू बनावा असे मुळीच वाटत नसते. मुला-मुलींनासुद्धा तसे कधी वाटत नसते. म्हणून *मिरविण्याच्या किंवा देखाव्याच्या, किंवा प्रसिद्धीच्या भावनेने किंवा धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून इतरांनी आग्रह केल्यामुळे काही लोक अल्पकाळासाठी श्रामणेर बनत असतात. म्हणून सुरूवातच मुळी खोटेपणातून होत असते. त्यामुळे भारतात मुळची पवित्र परंपरा आजपर्यंत सुरूच झालेली नाही.*_
_*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या श्रद्धेने बुद्धधम्माचा स्वीकार केला आणि आपल्या लाखो अनुयायांना त्याच श्रद्धेने दिला. म्हणून धम्मश्रद्धेचे मोल ओळखून ते कायम जोपासण्याचा बौद्धजनांनी प्रयत्न केला पाहिजे.* ह्या वर्षावास काळात आपण सम्यक संकल्प करून अधिकाधिक ज्ञानार्जन करून बाबासाहेबांच्या स्वप्नांतील बौद्धमय भारत देश बनविण्यासाठी प्रयत्न करूया._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- धम्म संस्कार म्हणजे काय?_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०३/०७/२०२३_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/07/blog-post.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment